Monday, December 27, 2010

उत्तमराव, जबाबदारी तिहेरी आहे!


उत्तमराव, तुमची भेट सध्या जवळपास रोजच होते आहे! इतर वर्तमानपत्रांतून फारशी होत नसली तरी तुमच्या वर्तमानपत्रातून तुम्हाला कुठला तरी पुरस्कार मिळाल्याची, तुमचा कुणीतरी जाहीर वा नागरी सत्कार केल्याची वा तुमच्या एखाद्या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित झाल्याची सचित्र बातमी एकदोन दिवसाआड तरी वाचायला मिळतेच मिळते. परवाच पुण्यात तुमच्यावर ‘अस्वस्थ नायक’ हा माहितीपट प्रकाशित झाल्याचीही बातमी वाचली. त्याआधीच्या आठवडय़ात तुमच्या ‘आई समजून घेताना’ या पुस्तकाच्या अकराव्या विशेष आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत झालं. (हे पुस्तक इंग्रजीतही गेलं आहे. तुमच्या समग्र साहित्याचा कन्नडमध्ये अनुवाद होतोय.) नुकत्याच तुमच्या दीर्घ मुलाखती साप्ताहिक ‘साधना’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’मधून प्रकाशित झाल्या आहेत. ‘साधना’तली मुलाखत पूर्वायुष्याबद्दल असल्यानं ती उत्तम आहे आणि ‘सकाळ’मधली, मुलाखत आजच्या प्रश्नांबद्दल असल्यानं ती वाचवतसुद्धा नाही इतकी नीरस आणि अपेक्षाभंग करणारी आहे! उत्तमराव, अतिशय तळागाळातून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदार्पयत झालेला तुमचा प्रवास केवळ थक्क करणारा आहे. जीवघेण्या संघर्षाशी कायम दोन हात करत, तुमच्याच शब्दांत सांगायचं तर ‘भाकरीची शिकार करत’ तुम्ही इथर्पयत पोहोचलात! त्यातही ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूहाचे मुख्य संपादक असताना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद तुमच्या वाटय़ाला आलं! हा दुग्धशर्करा योग आहे. आजवर पत्रकार असलेल्याही कुणाही अध्यक्षाच्या वाटय़ाला असं भाग्य आलेलं नाही!!
एखाद्या महाकाव्यात शोभावं असंच तुमचं सगळं आयुष्य आहे. त्यामुळे तुम्ही बेभान व्हावं हेही साहजिक आहे, समजण्यासारखंही आहे! पण तुमचं भान हरवत तर नाही ना? उत्तमराव, तुम्हाला पूर्वायुष्यात एवढं मोठं अपयश पचवता आलं, पण हे यश तुम्हाला संयमानं पचवता येत नाहिए का? कारण संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासूनचं तुमचं वर्तन न पटणारं आणि प्रसंगी क्लेशदायी वाटावं असंच आहे. कुठल्याही सत्कार समारंभात, कुठल्याही भाषणात, आणि तुमच्या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यांत तुम्ही ‘माझी आई आणि मी’ याच विषयावर तरी बोलता किंवा तो विषय तुमच्या बोलण्यात एकदा तरी येतो. वरवर पाहता यात काही वावगंही नाही. पण पत्रकारितेसारख्या बौद्धिक क्षेत्रात इतकी वर्षे राहूनही उत्तमरावांकडे एवढीच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे, असं समजायचं का? ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’ असं गांधींजींसारखं तुम्ही सुचवू पाहात आहात का? तुमचं पूर्वायुष्य सर्वसामान्यांनी आणि महाराष्ट्रातल्या यच्चयावत तरुणांनी प्रेरणा घ्यावी असं आहे, हे खरं. पण तोच एकमेव तुमचा संदेश आहे का?
अशानं तुमची गणनाही अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केवळ आत्मपुराणंच सांगणा-या माडगूळकर बंधू, वामन चोरघडे, गो. नी. दांडेकर या प्रभृतींच्या मांदियाळीत होणार नाही का? ‘माझ्यात एक समाज तयार झाला आहे!’ हे तुमचं विधान चलाख आहे, बुद्धिभेद करणारं आहे असं कुणाही सुबुद्ध माणसाला म्हणताच येणार नाही. पण तीच आपल्या आयुष्याची इतिकव्र्यता आहे, असा समज तर तुम्ही करून घेत नाही आहात ना? आपल्या अतिशय दुर्धर संघर्षानं भरलेल्या पूर्वायुष्यातलं एक पर्व तुमच्याकडून ‘युटोपियन फँटसी’ म्हणून तर रंगवलं जात नाही ना? उत्तमराव, ही भूतकाळातच रमून जाण्याची आणि केवळ त्याच्याच गोष्टी करण्याची वेळ नव्हे, हे तुमच्यासारख्या पत्रकाराला सांगण्याची गरज नसावी.
सध्या मराठी साहित्यापुढे, समाजापुढे कितीतरी प्रश्न आ वासून आहेत!
ज्यांच्या साहित्यसेवेचा धाक वाटावा आणि ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर वाटावा अशी विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे यांच्यासारखी माणसं आता मराठी साहित्यातून दुर्मीळ होत चालली आहेत. वेळीच दक्षता घेतली नाही तर त्यांची जागा दुय्यम दर्जाची लोकं घेण्याचं मोठं संकट उभं ठाकलं आहे.
एकटय़ादुकटय़ाचं हे काम नाही हेही खरंच! पण तुम्ही सुरुवात तरी करू शकता.
निदान हे वर्षभर तरी तुमच्या शब्दाला महाराष्ट्रात मोठा मान असणार आहे. ती संधी तुम्ही घेणार की नाही? निदान हाकारे देण्याचं काम तरी तुम्ही करायलाच हवं. उत्तमराव, तेवढं कराच तुम्ही!
साहित्य महामंडळात यच्चयावत सगळी दुय्यम दर्जाचीच माणसं का बरं असावीत? अर्थात अशा माणसांचीही गरज असतेच. पण ही माणसं काम तरी त्या प्रतवारीचं करतात का? तर तसंही दिसत नाही हे आपण पाहतोच आहोत. त्यांच्या कामाची प्रतवारी तिय्यम दर्जाची असते. म्हणजे स्वत:कडे असलेल्या क्षमतांचाही ही मंडळी धड वापर करत नाहीत. एकंदर मराठी साहित्यातच या रोगाची लागण झपाटय़ानं होत चालली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळींचा ऱ्हासकाळ कधीच सुरू झालेला आहे, प्रसारमाध्यमांचाही एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातच सुरू झाला, असंही म्हटलं जातं आहे. मराठी साहित्याचा अस्तकाळ तर ऐंशीच्या दशकातच सुरू झाला आहे. अशा ऱ्हासपर्वात समाजाचं नेतृत्व करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा लागतो. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी समाजावर असते हेही मान्य आहे. आता तर तुम्हाला सामान्यांपासून अभिजनांर्पयत सर्वाचीच मान्यता मिळाली आहे. तेव्हा या समाजाला गदगदून हालवण्याचा प्रयत्न तरी तुम्ही करणार की नाही?
साहित्य संमेलनाचे संस्थापक न्यायमूर्ती रानडय़ांना अभिप्रेत असलेल्या ‘विवेकी नेतृत्वा’च्या रूपात आम्ही तुम्हाला पाहतो आहोत. त्यामुळे तुमच्याकडून कार्यकर्त्यांपेक्षा संपादक आणि संमेलनाध्यक्ष म्हणून अधिक जबाबदारीची अपेक्षा आहे. एरवीही पत्रकाराला बोलण्याची संधी क्वचितच मिळते. तुम्हाला तर पुढचं सबंध वर्ष मिळालं आहे बोलायला!
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला कुठलेही अधिकार नसतात, हे खरं आहे. पण संमेलनाध्यक्षाला वर्षभर महाराष्ट्रात मोठा मान असतो. त्याचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं जातं. पत्रकारासाठी एवढी संधीही खूप झाली! एवढय़ा जोरावर तुम्ही बरंच काही करू शकता. लेखकांच्या आरोग्य निधीचा जो संकल्प तुम्ही सोडला आहे, तो अत्यंत स्तुत्यच आहे. पण अशा उपक्रमांचा आजवरचा इतिहास मात्र फार निराशाजनक आहे. हे उपक्रम मोठय़ा उत्साहाने सुरू होतात, पण नंतर त्यांचं काहीच होत नाही. साहित्य महामंडळाच्या महाकोशाचं काय झालं हे तुम्हाला सांगायला नकोच. तेव्हा तुमच्या उपक्रमाचंही तसं होऊ नये असं वाटतं. त्यासाठी वर्षभर शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक प्रयत्न करावे लागतील. पत्रकार या नात्यानं तुमचा राजकारणी, उद्योगपती, लेखक, कार्यकर्ते अशा समाजातल्या विविध घटकांशी संपर्क आहे, येतो. त्यामुळे येत्या वर्षाअखेर या निधीत किमान काही कोटींची भर पडायला हरकत नाही. एवढं एकच काम तुम्ही तडीस नेलं, तरी ती तुमच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतली अपूर्व कामगिरी ठरेल!
आणखी एक. सध्या महाराष्ट्रात समाजकारण आणि साहित्य या दोन गोष्टींची ताटातूट झाली आहे. कुठल्याही सामाजिक प्रश्नावर मराठी साहित्यिक आणि संपादकही मूग गिळून गप्प बसतात. मग ते जेम्स लेन प्रकरण असो, बाबरी मशिदीबाबतचा निकाल असो, जैतापूर प्रकल्प असो किंवा लवासा प्रकरण असो.. अशा प्रश्नांवर सामान्य लोक भांबावून जातात, गोंधळून जातात. अशा वेळी जनमानसाची भूमिका घडवण्याची जबाबदारी वृत्तपत्रांच्या संपादकांची असते. महाराष्ट्रात आजघडीला जी तीन-चार आघाडीची दैनिकं आहेत, त्यातल्या एका वृत्तपत्रसमूहाचे तर तुम्ही मुख्य संपादक आहात. संपादकाला समाजकारणापासून राजकारणार्पयत आणि साहित्यापासून अर्थकारणार्पयत, अनेक विषयांच्या आंतरसंबधांची चांगली जाण असते. काय हितावह आहे आणि काय नाही याबाबतची व्हिजन असते. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांवर साहित्यिक - संपादक या नात्याने रोखठोक आणि सडेतोड भूमिका घेतली तर जनसामान्यांच्या मनातला गोंधळ दूर होऊ शकेल, विरोधासाठी विरोध करणाऱ्यांची धार बोथट होऊ शकेल आणि आमजनांना आपली मतं बनवता येतील. शब्दांचं सामर्थ्य तुम्ही जाणून आहात. त्यासाठी तुम्हाला कुणाच्याही मार्गदर्शनाची गरज नाही.
तेव्हा उत्तमराव, तुमच्याकडून अधिक जबाबदारपणाची अपेक्षा आहे. तशा क्षमता तुमच्याकडे निखालसपणे आहेत. तुम्ही सध्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आहात. त्याला साजेलशा वर्तनाची, जबाबदारीची आणि विचारांची अपेक्षा तुमच्याकडून करणं अनाठायी नाही! तेव्हा तुम्ही इतकं हुरळून जाऊ नये. सद्सद्विवेकाला तिलांजली देऊ नये. थोडं वास्तवातही राहावं असं वाटतं.उत्तमराव, अनेक जण तुमच्याकडून अनेक अपेक्षा व्यक्त करत आहेत. पण समाजातल्या कळीच्या प्रश्नाविषयी साहित्यिकांनी, पत्रकारांनी आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ब्रँड अ‍ॅम्बेसिडरनं फटकून राहणं हे निकोप सांस्कृतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं फारसं भूषणावह नाही आणि स्पृहणीय तर नाहीच नाही!

Monday, December 6, 2010

उन्हाळी राजधानीतला फेरफटका


सिमल्याला जाण्याची संधी अवचित चालून आली. ‘सेमिनार’ या महत्त्वाच्या इंग्रजी मासिकाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’मध्ये (पूर्वीश्रमीच्या ‘राष्ट्रपती निवास’मध्ये) दोन दिवसांचं चर्चासत्र भरतंय, हे मुख्य आमिष! चर्चासत्रात रामचंद्र गुहा (प्रसिद्ध इतिहासकार), गोपाल गांधी (प. बंगालचे राज्यपाल), नयनतारा सहगल (लेखिका), सुनील खिलनानी (‘आयडिया ऑफ इंडिया’चे लेखक), दिग्दर्शक श्याम बेनेगेल, परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन, अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शीद आणि ‘सेमिनार’ची टीम- मालविका सिंग, तेजबीर सिंग, हर्ष सेठी. एवढंच अमिष पुरं होतं सिमल्याला जाण्यासाठी! तिथं सप्टेंबर ते नोव्हेंबर हा उत्तम सीझन मानला जातो. आणि हे चर्चासत्र नेमकं ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात!!
सिमल्याची एक दिवस सैर करण्याचीही व्यवस्था संस्थेनं केली होती. शिवाय ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे याच संस्थेत गेली दोन वर्षे फेलो होते. त्यांचीही अनायसे भेट होणार होती. त्यामुळे ‘आंधळा मागतो एक डोळा..’ अशी काहीशी भावविभोर अवस्था झाली होती. एके दिवशी सहज गप्पा मारता मारता एका कविमित्राला ही बातमी सांगितली. कविलोक मुळात तुमचा बुद्धिभेद करण्यात पटाईत! हे मित्र तर दोन-तीन वेळा सिमल्याला जाऊन आलेले.. त्यांनी सल्ला दिला, सिमल्याला जायचं तर दिल्लीहून थेट कालकाला जायचं. तिथून सिमल्याला नॅरोगेज झुकझुक ट्रेन आहे. या ट्रेनचा प्रवास एकदम मस्त!! मग काय, दिल्लीहून थेट कालका गाठलं. तिथून सिमल्याचं अंतर 94 किलोमीटर. रस्त्यानं ते कापायला फक्त तीन तास लागतात, पण ट्रेननं त्यासाठी तब्बल सहा तास. पण हा प्रवास खरोखरच अद्भुत होता. बागा-शेतं, दऱ्या-खोरी, 103 लहान-मोठे बोगदे आणि ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’नी (मूळ शब्द नारायण सुव्र्याचा) तयार केलेले तब्बल 806 पूल. 2008 मध्ये युनेस्कोनं या मार्गाला ‘वर्ल्ड हेरिटेज साइट, माउंटन रेल्वेज् ऑफ इंडिया’चा दर्जा दिला आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही त्याची नोंद झाली आहेच. इतका रोमांचक आणि थरारक प्रवास कधीच करायला मिळाला नव्हता!
सिमल्याला सकाळी साडेपाच-पावणे सहाला पोचलो, तेव्हा एकदम हुडहुडीच भरली. सोबत काही नव्हतं. एका जागी किती वेळ थरथरणार? मग सिगरेट शिलगावली. पण छे! काही उपयोग नव्हता. तेवढय़ात संस्थेचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला अन् सुटका झाली!
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज’चा परिसर नयनरम्य आहे. ब्रिटिश जमान्यात सिमला ही ‘उन्हाळी राजधानी’ होती, तेव्हाचं हे ‘व्हाइसरीगल लॉज’- नंतर राष्ट्रपती निवास म्हणूनही या वास्तूचा वापर झाला. आजही ही संस्था त्याच्या दिमाखदार खाणाखुणा आपल्या अंगा-खांद्यावर मिरवत आहे. दिल्लीच्या तापदायक उष्णतेवर थंडाव्याचा उतारा म्हणून ऑकलंड, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी सिमल्याला जायला सुरुवात केली. ते अक्षरक्ष: सिमल्याच्या प्रेमातच पडले. 1864 मध्ये व्हाईसरॉय लॉरेन्स याच्या भेटीनंतर सिमला ‘उन्हाळी राजधानी’ म्हणून जाहीर करण्यात आलं. 1888 मध्ये तिथे ही वास्तू उभारण्यात आली. सिमल्याला येणारा पर्यटक या वास्तूला भेट द्यायला येतोच येतो. वास्तू गॉथिक शैलीतली. व्हाईसरॉय राहायचा ती रूम बघितली. त्यात त्याचा बेड, सोफासेट अजूनही चांगल्या स्थितीत आहे. आता तिथं संस्थेचे चेअरमन राहतात. नेमाडे सरांच्या शिफारशीमुळे तळमजला पाहायला गेलो. खरं तर तो ब्रिटिशांच्या काळातला खलबतखानाच असावा! त्याला तब्बल पाचसहा दारं होती आणि ती लांब डोंगरद-यात निघत होती. प्रत्येक गुप्तहेराला वेगवेगळ्या मार्गानं बोलवायचं आणि वेगवेगळ्या मार्गानं पाठवायचं, असा तो ब्रिटिशांचा ‘गनिमी कावा’ असावा!
सिमला हे शिवालिक रांगांमध्ये वसलेलं आणि समुद्र सपाटीपासून सात हजार फूट उंचीवर असलेलं थंड हवेचं ठिकाण. असं म्हणतात की, एवढय़ा उंचीवरील सिमला हे जगातील बहुधा एकमेव ठिकाण असावं. ‘सिमला’ किंवा ‘शिमला’ हे नाव ‘शामलादेवी’ या कालीमातेच्या एका रूपावरून पडलं असावं असं मानलं जातं. पण त्याबाबत एकवाक्यता नाही. ब्रिटिशांच्या काळात हे अतिशय पारंपरिक पण गजबज नसलेलं ठिकाण होतं, पण आता हिमाचल प्रदेशची राजधानी झाल्यापासून ते अतिशय गजबजून गेलं आहे.
सिमल्यात सलग अशी जमीन कुठेच नाही. सारी वस्ती डोंगर उतार आणि शिखरांवरच. आजूबाजूला सर्वत्र लहान-मोठे डोंगर आणि ओक, फर, पाईन, -होएडेंड्रॉन या वृक्षांनी नटलेला निसर्ग आणि तेवढय़ाच निसर्गसंपन्न द-या.
सिमल्याच्या आसमंतात दूरवर बर्फाच्छादित शिखरं दिसतात. ती आपल्याला साद घालतात, बोलावतात. पण चढण-उतरणीनं आपण इतके मेटाकुटीला आलेलो असतो की, पाय एका जागी थांबायचे आदेश देत राहतात आणि मन हिमशिखरांकडे झेपावत राहतं. मोठा बाका प्रसंग निर्माण होतो!
या सा-याचा कडेलोट झाला तो, जाखू या सिमल्यातल्या सर्वोच्च शिखरावर गेल्यावर. हे आठ हजार फूट उंचीवर आहे. सकाळी आठ-साडेआठची वेळ होती. नुकताच सूर्य हिमशिखरांच्या मागून ‘प्रगट’ झालेला. त्याची कोवळी किरणं हिमशिखरांना अभ्यंगस्नान घालत होती. त्याच्या प्रकाशानं सभोवतालच्या टेकडय़ा पाचूमय झालेल्या.. हाच तो ऋतु बरवा!
जाखू हिलवरून संपूर्ण सिमला दिसतं. तो देखावा मोठा नयनरम्य आणि भकास वाटवणारा होता. म्हणजे निसगाचं सौंदर्य कसं अगाध असतं याची तिथं प्रचिती येत होती आणि माणसांची घरं, सिमेंटच्या इमारती, अधेमधे डोकावणारी मोठेमोठे होर्डिंग्जही त्या सौंदर्यावर काजळीसारखी वाटत होती. या एवढ्या उंचीवरही बलोपासना करणा-या हनुमानाचं मंदिर आहे.
सिमल्यात बघण्यासारखं बरंच काही आहे. पण फिरायचं म्हणजे हा डोंगर चढायचा-उतरायचा, तो डोंगर चढायचा-उतरायचा. सपाटी अशी नाहीच. त्यामुळे एकटं फिरण्यात फार मजा नव्हती. फार लवकर दमवणूक होई. या ठिकाणी सोबत कुटुंबकबिला नेणंही गैरसोयीचंच. मित्रांचा ग्रुप हवा, आणि भरपूर वेळ. मगच सिमल्याच्या सौंदर्याचा अनुभव पूरेपूर उपभोगता येणार.
हिवाळा असल्यानं देखण्या चांदण्या रात्रीची मजाही अनुभवता आली. ‘व्हाइसरीगल लॉज’च्या टेरेसवरून साऱ्या आसमंतात पसरलेल्या चांदण्याच्या साम्राज्याच्या सीमांचा थांग लागत नव्हता. चांदोबाची स्वारी मात्र स्वत:वरच खूश असावी तशी वाटत होती. रात्रीचं सिमला इलेक्ट्रिक बल्बच्या झगमगाटात राहुटय़ांचा अंतराअंतरानं पडाव पडावा तसं वाटत होतं!
तिस-या दिवशी पुन्हा सिमला पाहायला निघालो. सोबत पद्मदेव हा संस्थेचा ड्रायव्हर होता. नावाप्रमाणंच स्वभावानं आणि भाषेनं गोड माणूस. पण तो देवच शेवटी, त्यामुळे पहिल्यांदा घेऊन गेला तो ‘संकटमोचन’ मंदिरात. मग प्रॉस्पेक्ट हिलवर गेलो. तिथेही कामना मातेचं मंदिर होतं. साधंच होतं पण तिथून आजूबाजूच्या द-या-खोऱ्याचा छान व्ह्यू दिसत होता. दूरवरली हिमालय-शिखरांची रांग पद्मदेवनं दाखवली, तेव्हा मात्र क्षणभर जागच्या जागी थिजल्यासारखं झालं. पण तो वर्ण्यविषय म्हणता येणार नाही इतका दूर आणि बर्फाची क्षितिजावर छोटीशी रेषा दिसावी तसा दिसत होता. या हिलवर दोन कंपन्यांचं मोबाईल टॉवर उभारायचं काम चाललं होतं. देवदर्शनानं सुरुवात केल्यानं निघताना पद्मदेवला सरळ सांगितलं, ‘अब मंदिर मत ले चलो, यार!’ तोही हुशार होता. त्यानं गाडी स्टेट म्यूझियमला वळवली. तिथं 16-17व्या शतकातल्या बौद्ध आणि इतर राजेमहाराजे-देवादिकांच्या मूर्ती अप्रतिम म्हणाव्या अशा होत्या. मग आर्मी हेड क्वार्टर पाहायला गेलो.
दुपारी सिमल्यातल्या माल रोडवर पायी गेलो. तर तिथल्या गेइटी थिएटरमध्ये श्याम बेनेगल यांच्या चित्रपटांचा महोत्सव चालू होता. माल रोडवरील द रीज, स्कँडल पॉइंट ही दोन ठिकाणंही पाहण्यासारखी होती. मुंबईतल्या चर्चचं वास्तुसौंदर्य जसं भूरळ घालणारं आहे, तसंच हेही पुरातन म्हणावं असं वैशिष्टय़पूर्ण चर्च. माल रोडवरील त्रिशूल बेकरीची शिफारस संस्थेतल्या काही लोकांनी केल्यानं तिथल्या पेस्ट्रीचा स्वाद घेतला. पण काही खास नव्हती. खाण्यापिण्याबाबत ‘अंदाज़्‍ा अपना अपना’च असतो! निघताना मात्र सरळ बाय रोड निघालो. हा ‘झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी’पेक्षा वेगळा अनुभव होता. ‘पृथ्वीवरच्या परमेश्वरां’च्या लीलाही अगाध असतात, हेच खरं!

Monday, November 1, 2010

पाहता लोचनी...


सकाळी सात वाजता दिल्लीच्या निजामुद्दिन स्टेशनवरून ‘ताज एक्सप्रेस’नं निघालो, तेव्हा मनात दोन पुस्तकं तरळत होती. पहिलं होतं, पत्रकार मा. पं. शिखरे यांचं ‘स्मृतीची चाळता पाने’ आणि दुसरं होतं वास्तुरचनाकार- ललितलेखक माधव आचवल यांचं ‘किमया’. शिखरे यांनी कलावंत, संवेदनाक्षम साहित्यिक, विचारवंत आल्डस हक्सले आणि थोर कांदबरीकार सॉमरसेट मॉम यांच्या ताजमहालाविषयीच्या मतांचा ऊहापोह केला आहे. हक्सले यांनी ताजमहाल पाहून झालेल्या निराशेचं आणि सौंदर्यशास्त्राच्या व शिल्पशास्त्राच्या दृष्टीनं ताजमहाल ही एक अगदी निकृष्ट प्रतीची कृती आहे असं म्हटलं आहे तर सॉमरसेट मॉम यांनी ताजमहालाच्या सौंदर्यानं भारावून जाऊन ‘माझं अंत:करण एका विचित्र आणि सुखकारक भावनेनं भरून ते विस्तारल्यासारखं वाटू लागलं. आश्चर्य, आनंद आणि मला वाटतं मुक्ततेचीही जाणीव मला झाली. मी नुकतंच सांख्य तत्त्वज्ञान वाचलं होतं; त्यात संपूर्ण मुक्तीच्याच प्रकाराची तात्पुरती मुक्ती म्हणजे कलानंद असं म्हटलं आहे. कदाचित माझ्या प्रत्यक्ष भावनांत या वचनाची आठवण मी अभावितपणे मिसळू दिली असावी,’ असं म्हटलं आहे.
माधव आचवल यांनी ‘किमया’मध्ये ताजमहाल नेमका कसा पाहावा, कधी पाहावा, कुठल्या कुठल्या वेळी आणि प्रत्येक प्रहरानंतर ताजमहालाची रूपं कशी बदलत जातात, याचं अतिशय ललितरम्य वर्णन केलं आहे. आग्रा स्टेशनवरून सायकल रिक्षानं ताजमहालाच्या दिशेनं निघालो खरा; पण हक्सले, मॉम आणि आचवल पाठ सोडायला तयार नव्हते. आणि तिघांपैकी कुणाला फॉलो करावं याचाही निवाडा होत नव्हता.
सकाळची साडेदहा-अकराला ताजमहालाशी लोकांच्या गर्दीसह पोचलो, तेव्हा विरळ धुक्यानं गुरफटलेला ताजमहाल सिंहासनावर बसल्यासारखा वाटत होता. तो जसजसा जवळ येत गेला तसातसा त्याचा भव्यपणा जाणवू लागला, खरं म्हणजे अंगावर येऊ लागला. जनप्रवाहाबरोबर आत गेलो, तर अनेक लोक मुमताजच्या कबरीला सलाम/नमस्कार करत होते. पण आतमध्ये काहीच पाहण्यासारखं नव्हतं. मग बाहेर पडलो, तर कमानी आणि घुमटांची परस्परपूरक रचना आणि त्यांच्यातली एकरूप लय जाणवायला लागली. एकाच पांढ-या शुभ्र संगमरवराच्या प्रती काढून वापरल्या असाव्यात असा कमालीचा एकसारखेपणा!
मग वेगवेगळ्या कोनातून आणि वेगवेगळ्या बाजूंनी ताजमहाल कसा दिसतो हेही पडताळून बघावंसं वाटू लागलं. पण सगळीकडे माणसं आणि त्यांचा कलकलाट. निरव शांततेची सोय नव्हती. मग वाटलं, हा कातरवेळी कसा दिसत असेल? आणि पावसाळ्यात? रिमझिमत्या पावसात याचं रूप कसं दिसत असेल? आणि पौणिमेच्या रात्री बारा वाजता? हिवाळ्यात ताजमहालाचं रूप गर्भवती स्त्रीसारखं सोज्वळ आणि सुंदर दिसत असेल की लेकुरवाळीसारखं तृप्त? यमुनेच्या पैलतीरावरून हा कसा दिसत असेल?
मध्येच एका बाकडय़ावर बसून डावा डोळा झाकून उजव्या डोळ्यानं त्याला पाहू लागलो मग उजवा झाकून डाव्यानं. नंतर डोन्ही डोळे किलकिले करून. पण लेकाचा सर्व कोनातून सारखाच दिसत होता. मग खालच्या गवतावर पसरून त्याच्याकडे पाहू लागलो. आता त्याच्या मागचं निळं आकाश घन वाटू लागलं आणि ताजमहाल हलका हलका! परिसरात एवढी गर्दी आणि सुरक्षारक्षक की आचवलांच्या सुचनेबरहुकूम मधल्या तळ्यात पाय सोडून बसण्याची शक्यता दुरापास्त होती. आजूबाजूचं कोण फोटो काढतंय, तर कोण निवांत जागा बघून दशम्या सोडतंय, कोण गप्पा छाटतंय पण कुणीच ताजमहालाबद्दल बोलताना कानावर येत नव्हतं. मग स्वत:चंच हसू आलं. पण मग भव्यदिव्य कलाकृतीचा सौंदर्यबोध तो काय?
मग वाटलं की, ताजमहालाची खरी गंमत त्याच्या आजूबाजूला आहे. बाजूच्या चारी कमानींनी ताजमहालाला तोलून धरल्यासारखे वाटत होतं आणि डावी-उजवीकडच्या दोन इमारतींनी सावरल्यासारखं! प्रवेशदारातून होणाऱ्या त्याच्या दूरस्थ दर्शनात गंमत आहे, तशी बाजूच्या बागेतल्या झाडांच्या फांद्यांआडच्या त्याच्या क्षणिक दर्शनातही. समोरच्या तळ्यात आहे, तशी मागच्या यमुनेच्या प्रवाहातही. या साऱ्यांसह ताजमहाल आहे. तेव्हा ताजमहाल पाहायच्या तो या सर्वासह. पण तसा तो पाहता येत नाही. म्हणजे नजरेच्या टप्प्यात मावत नाही. म्हणून त्याची तुकडय़ातुकडय़ातून अनुभूती घ्यावी लागते. मग त्या तुकडय़ांचा मनातल्या मनात ‘कॅलिडोस्कोप’ जोडून पाहावा लागतो.
चार साडेचार तास ताजमहाल सर्व बाजूंनी पाहूनही वाटत होतं, इथून बाकी साऱ्यांनी निघून जावं अन् आपण एकटंच उरावं. मग खरं काय ते समजेल. पण ते शक्य नव्हतं. म्हणून शेवटी बाहेर पडलो.
ताजमहालाच्या आवारात तो शहाजहाननं कधी बांधला याचा फलक आहे, पण या बांधकामासाठी किती मजूर किती वर्षे खपले, कमानी आणि घुमटांचा एकेक दगड घडवण्यासाठी त्यांना किती दिवस लागले, त्याबदल्यात शहाजहाननं त्यांना किती मजुरी दिली? याचा कुठेही निर्देश नाही. ताजमहाल भव्यदिव्य असेलही पण शहाजहान आदर्श राजा होता का? मग त्यानं एवढा खर्च प्रजेसाठी न करता बायकोच्या स्मारकासाठी का केला? मुमताज आधीच मरून गेल्यानं तिला याचा काहीच उपयोग नव्हता आणि त्यावेळच्या प्रजेलाही. केवळ आपलं नाव नंतरच्या लोकांच्या आठवणीत राहावं म्हणून कुठलाही शहाणा माणूस एवढा टोकाच अट्टाहास करेल का? ती शहाजहानसारख्या पराकोटीच्या चक्रम माणसांचीच कामं!
त्यामुळे ‘एक आमीर बादशहाने दौलत का सहारा लेकर हम गरिबों के मोहब्बत का उडमया है मज़ाक’ म्हणणारे साहिर लुधियानवीसारखे कवीलोक भाबडे वाटू लागले आणि ताजमहालाला भव्यदिव्य कलाकृती म्हणून सर्टिफिकेट देणारे वाह्यात वाटू लागले. ताजमहाल पाहताना भारावलेपण चालत नाही, अभावितपणा कामाला येत नाही, त्याचा कैवारही घेता येत नाही अन् तिरस्कारही करता येत नाही. ताजमहाल पाहताना अशी साऱ्याच बाजूंनी अडचण होते. त्यामुळे ताजमहाल पाहून अगदीच निराशा झाली नसली तरी उदास मात्र जरूर वाटलं.

Sunday, October 17, 2010

मध्यममार्गी 'आऊटलुक'



‘आऊटलुक’ या इंग्रजीतल्या आघाडीच्या न्यूज मॅगझिनला याच आठवड्यात पंधरा वर्षे पूर्ण होताहेत. ‘आऊटलुक’ मध्यममार्गी आहे. मधममार्गी भूमिकाच मोठ्या प्रमाणावर ग्राह्य मानल्या जातात आणि त्यांचाच प्रभाव जास्त असतो. त्या न्यायानं ‘आऊटलुक’चाही प्रभाव जास्त आहे. आणि तेच त्याच्या यशाचं रहस्यही.


..............................................................................................


अडचण अशी आहे की, ‘आऊटलुक’बद्दल लिहिण्याआधी विनोद मेहतांबद्दल सांगावं लागेल. इतकं हे समीकरण एकजीव झालेलं आहे. विनोद मेहतांचा आधीचा प्रवास पाहता ते गेली सलग पंधरा वर्षे एका जागी राहिले, हे मोठं आश्चर्यच म्हणावं लागेल.
विनोद मेहतांचा जन्म रावळपिंडीत झाला पण त्यांचं बालपण लखनऊत गेलं. विसाव्या वर्षी ते लंडनला गेले. तिथं आठ वर्षे त्यांनी ‘पेंग्विन’ या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेत काम केलं. बी. ए. तिस-या वर्गात पास होऊन मेहता 1970 साली मुंबईत परतले. काही दिवसांनी त्यांनी ‘बॉम्बे : अ प्रायव्हेट व्ह्यू’ हे पुस्तक लिहिलं. नंतर 1972मध्ये मीनाकुमारीचं चरित्र लिहिलं. विनोद मेहता मीनाकुमारीला एकदाही भेटले नव्हते. पण तिचे काही चित्रपट मेहतांनी दूरदर्शनवर पाहिले होते. मग तिच्याबद्दल माहिती मिळवून आणि ‘फिल्मफेअर’, ‘फिल्म इंडिया’चे अंक वाचून चरित्र लिहिलं. त्याची त्या काळात बरीच चर्चाही झाली. नंतर मेहतांनी संजय गांधीचंही चरित्र लिहिलं. पण ती बरीच पुढची गोष्ट. विनोद मेहता 1974 साली India’s first real girlie magazine असणा-या ‘डेबोनिअर’ या मासिकाचे पहिले संपादक झाले. ‘डेबोनिअर’मध्ये अर्धनग्न-नग्न बायकांची चित्रं छापली जात आणि दर्जेदार मजकूरही, निदान मेहतांच्या काळात तरी. त्यात करंट अफेअरबद्दलही एक विभाग असायचा. सेक्स या विषयाची खुल्या मनानं आणि कलात्मक मांडणी करणारं मासिक म्हणून मेहतांनी त्याला लौकिक मिळवून दिला. मेहता जॉईन झाले तेव्हा ‘डेबोनिअर’ सुरू होऊन सात-आठ महिनेच झाले होते, पण त्याची अवस्था तितकीशी चांगली नसल्यानं ते बंद पडण्याच्या मार्गावर होतं. मेहता मालकाला म्हणाले, ‘मला थोडी संधी द्या. पुढच्या सहा महिन्यात त्याचा खप वाढवून दाखवतो.’ ते मेहतांनी करून दाखवलं. सलग सात वर्षे म्हणजे 1981 पर्यंत मेहता ‘डेबोनिअर’च्या संपादकपदी होते.
त्यानंतर ते ‘संडे आब्झर्वर’चे संस्थापक संपादक झाले. या वृत्तपत्राला मेहतांनी पुढच्या सहा वर्षाच्या काळात ‘आशियातील सर्वात जास्त खप असलेलं रविवार-वृत्तपत्र’ असा लौकिक मिळवून दिला. 1987मध्ये विनोद मेहता ‘दि इंडियन पोस्ट’चे संपादक झाले. पण थोड्याच दिवसात तिथंही राजीनामा दिला. मग अनुक्रमे ‘बॉम्बे’ आणि ‘इंडिपेडेंट’चे संपादक झाले. तीही वृत्तपत्रं गाजली. त्यानंतर मेहतांनी मुंबईलाच रामराम ठोकला आणि थेट दिल्ली गाठली. तिथं ते ‘पायोनिअर’चे संस्थापक संपादक झाले. पण तेही 1994 साली सोडलं. मग त्यांनी ‘आऊटलुक’ या न्यूज मॅगझिनची घोषणा केली. तेव्हा सा-यांनी गृहीतच धरलं होतं की, विनोद आहे तोवर ते चालेल आणि तो सोडून गेला की, त्याचेही बारा वाजणार. कारण मेहता होते तोपर्यंत आधीची सारी वृत्तपत्रं गाजली होती आणि ते सोडून गेल्यावर ती वाजलीही होती. पण विनोद मेहतांनी आपल्या आधीच्या प्रतिमेला छेद दिला. अन् तोही एक नव्हे, दोन नव्हे तब्बल पंधरा वर्षे. 18 ऑक्टोबर 1995 रोजी ‘आऊटलुक’चा पहिला अंक प्रकाशित झाला. ‘आऊटलूक’च्या पहिल्याच अंकातली कव्हर स्टोरी काश्मीरातल्या ओपिनियन पोलबाबत होती, “77 per cent say no solution within Indian Constitution”. या अंकाची शिवसेनेनं देशभर होळी केली आणि ‘आऊटलुक’ रातोरात प्रसिद्धीला आलं. भारतातल्या सर्व वृत्तपत्रांच्या हेडलाईनचा विषय झालं.
‘इंडिया टुडे’ हे तेव्हा पाक्षिक होतं. त्यामुळे आपण साप्ताहिक न्यूज मॅगझिन सुरू करायचं असं मेहतांनी ठरवलं. त्याच्या पहिल्या अंकाची तयारी तब्बल सहा महिने चालली होती. आणि त्या अंकाचं स्वागत हे असं झालं! त्याविषयी मेहता म्हणतात, opinion poll in the Kashmir valley. (Organising the poll was a nightmare; insurgency was at its height. Most Kashmiri Muslims took the surveyors for IB men!) The headline on the cover was authentic and revealing: 77 per cent say no solution within Indian Constitution.
Open, Debate-provoking and Liberal journal अशी ‘आऊटलुक’ची सुरुवातीपासून ओळख आहे. याशिवाय विविधता, लेखांचा आवाका, मजकुराची अचूकता, बोलकी छायाचित्रं-ग्राफिक्स, सुबक व उत्तम मांडणी, चांगलं मुद्रण आणि विनोद मेहतांचा अंकावरील खास ठसा ही वैशिष्टयंही. एखाद दुसरा चांगला अंक काढणं ही सोपी गोष्ट असते, पण सातत्यानं चांगले अंक काढणं, आपल्या वाचकांच्या विश्वासाला तडा न जाऊ देणं हे शिवधनुष्य पेलणं सोपं नसतं. ‘आऊटलुक’ त्याबाबतीत द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होतो. ‘आऊटलुक’ची भाषा अतिशय सुबोध असते. ललित-वैचारिक असं त्यातल्या लेखांचं स्वरूप असतं. ब-याचदा लोकांच्या मनातल्या विषयांवर लेख असतात. एकच विषय घेऊन त्याच्या वेगवेगळ्या बाजू समोर आणण्याचं कामही ‘आऊटलुक’ करतं आणि एकाच विषयाचा ब-यापैकी पाठपुरावाही. ‘डेबोनिअर’पासून विनोद मेहता शेवटच्या पानावर डायरी लिहितात. तो क्रम ‘आऊटलुक’मध्येही चालू आहे. ही डायरी खुशखुशीत आणि वाचनीय असते. खळबळजनक बातम्या, इंग्रजीत ज्याला ‘स्कूप्स’ म्हणतात, ‘आऊटलुक’ तेही ‘इंडिया टुडे’च्या चालीवर करतंच.
‘आऊटलुक’मध्ये 800-1000 शब्दांपेक्षा मोठा नसतो, ‘इंडिया टुडे’मध्ये कोणताही लेख साधारणपणे 1000-1200 शब्दांपेक्षा मोठा नसतो आणि ‘फ्रण्टलाईन’मध्ये तो 1500 पेक्षा मोठा नसतो. हे या तिन्ही नियतकालिकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे, तो त्यांच्या धोरणाचा एक भाग आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
17 ऑक्टोबर 2005 साली ‘आऊटलुक’ला दहा वर्षे झाली. तेव्हा त्यांनी A Decade like no other या नावाने विशेषांक काढला. त्याचं उपशीर्षक होतं, Looking Back, Looking Ahead, Looking in. अकराव्या वर्धापनदिन विशेषांकात सोनिया गांधी, अमिताभ बच्चन, बुद्धदेव भट्टाचार्य, कॅप्टन गोपीनाथ, अरुणा रॉय, सुनील मित्तल, अमिताव घोष, अशा अकरा व्यक्ती आणि अणू बॉम्ब, न्यूज चॅनेल्स, इंटरनेट, फास्ट फूड, पेज थ्री, मॉल्स, एक्सप्रेस वे, कॉल सेंटर्स, सेलफोन्स, स्टिंग पत्रकारिता यांचा 1995 ते 2006 काळातला आढावा घेतला होता. ‘आऊटलुक’च्या विशेषांकांत ‘सेक्स’पासून ‘बी स्कूल’पर्यंत सर्व विषय असतात. पण एकाचाच उल्लेख करायचा तर तो 23 ऑगस्ट 2004चा ‘व्हाट इफ’चा करता येईल. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्नांचा धांडोळा या अंकात घेतला आहे. भारताची फाळणी झाली नसती तर, नेताजी परत आले तर, सरदार पटेल पहिले पंतप्रधान झाले असते तर, म. गांधी जिवंत असते तर, भारतानं 1962चं युद्ध जिंकलं असतं तर, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या नसत्या तर, त्यांनी आणीबाणी घोषित केली नसती तर, अशा जवळपास चौतीस मिथ घेऊन त्यावर नामवंताकडून लेख लिहून घेतले. ‘जर-तर’ला इतिहासात स्थान नसतं, तो केवळ स्मरणरंजनाचा भाग असतो आणि त्याचा वर्तमानात काहीच उपयोग नसतो हे या अंकातून कुठलाही स्टँड न घेता ‘आऊटलुक’नं दाखवून दिलं.
आजघडीला इंग्रजीत ‘इंडिया टुडे’, ‘आऊटलुक’ आणि ‘फ्रण्टलाईन’ ही तीन आघाडीची नियतकालिकं आहेत. ‘इंडिया टुडे’ हे इंग्रजी नवसाक्षर लोकांचं, ‘फ्रण्टलाईन’ इंटेलेक्च्युअल लोकांचं तर ‘आऊटलुक’ या दोन्हींच्या मधल्या लोकांचं नियतकालिक आहे. जसा कथा-कादंब-या-कविता वाचणारा पहिला वर्ग असतो, चरित्र-आत्मचरित्रं वाचणारा दुसरा वर्ग असतो आणि वैचारिक लेखन वाचणारा तिसरा वर्ग असतो. तसंच हे आहे. आणखी नेमकेपणानं सांगायचं तर ‘इंडिया टुडे’ हे जास्त लोकानुनय करणारं आहे, ‘फ्रण्टलाईन’ आयडियॉलॉजिस्ट आहे तर ‘आऊटलुक’मध्ये दोन्हीचं मिश्रण पाहायला मिळतं.
एकंदर ‘आऊटलुक’ मध्यममार्गी आहे. जगात कुठेही मध्यममार्गीच सरकारच सत्तेवर येऊ शकतं. मध्यममार्गी भूमिकाच मोठ्या प्रमाणावर ग्राह्य मानल्या जातात आणि त्यांचाच प्रभाव जास्त असतो. त्या अर्थानं आणि न्यायानंही ‘आऊटलुक’चाही प्रभाव जास्त आहे. आणि हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे.
अलीकडच्या काळात मात्र ‘आऊटलुक’नं काही न पटणा-या भूमिका घेतल्या आहेत. त्या विनोद मेहतांच्या लिबरल आणि समन्वयवादी भूमिकेला छेद देणा-या आहेत. काश्मीर प्रश्नाबाबतची टोकदार भूमिका आणि अरुंधती रॉयला अवास्तव महत्त्व देऊन तिचं प्रस्थ वाढवणं ही त्याची दोन महत्त्वाची उदाहरणं. अरुंधतीचे मोठमोठे आणि प्रचंड एकांगी लेख ‘आऊटलुक’ सातत्यानं छापत असतं. (आणि दुस-या बाजूला रामचंद्र गुहा यांचे विचारप्रवर्तक लेखही.) अरुंधतीची भूमिका ही विनोद मेहता यांची वा त्यांच्या ‘आऊटलुक’ची असेलच असं नाही. कदाचित त्यांनी मार्केटमध्ये चलती आहे म्हणून या प्रकारचं लेखन छापलं असेल. पण या संवेदनशील विषयांवर ओपिनिअन मेकरची भूमिका घेण्यात ‘आऊटलुक’ कमी पडलं असं खेदानं म्हणावं लागतं. अशा प्रश्नांना स्थान देणं हे जरा घातक आहे. ते निदान ‘आऊटलुक’कडून होऊ नये. ‘आऊटलुक’ यापुढेही मध्यममार्गी राहील अशी अपेक्षा काही वावगी नाही.

Sunday, October 3, 2010

उत्तम मध्यम

‘‘मानवी स्वातंत्र्याच्या तत्त्वाचा स्पष्ट जाणिवेनें निष्ठापूर्वक अंगीकार करणारीं माणसें सांस्कृतिक प्रयत्न जितके अधिक करीत जातील तितका तितका सांस्कृतिक संघर्ष लोपत जाईल व प्रादेशिक संस्कृति संवादी बनतील. संवादित्व जसें समानाकार घडवितें तसे वैशिष्टय़हि टिकवितें.’’ - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी  
(अध्यक्षीय भाषण, 1954, दिल्ली, अभामसासं)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुठलीही गोष्ट ज्या हेतुपुरस्सरतेने सुरू केली जाते, ते हेतू सुरुवातीच्या काळात कसोशीने पाळलेही जातात. पण त्याला 25-50-100 अशी वर्षे उलटली की, त्याचा प्रवास काहीशा उलट्या दिशेने सुरू होतो. ‘अखिल भारतीय’ म्हणवल्या जाणा-या मराठी साहित्य संमेलनाबाबतीतही हे खरे ठरले आहे. ग्रंथकार संमेलन म्हणून सुरू झालेल्या या उत्सवाने आता स्वत:चा मोठा विस्तार करून घेतला आहे. त्याबद्दलचे आकर्षण जसे वाढते आहे, तशीच त्याबद्दलची आत्मीयताही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे 83 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तुलनेने उत्तम कांबळे यांच्यासारख्या तरुण पत्रकार-संपादकाची निवड झाली, याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
कुणाच्याही कारकीर्दीचा आढावा घ्यायचा असेल तर ती एका विशिष्ट टप्प्यावर असावी लागते किंवा पूर्ण व्हावी लागते. उत्तम कांबळे यांच्याबाबत आता ते शक्य आहे. कारण ते गेली तीसेक वर्षे पत्रकारितेत आहेत. आता एका माध्यम समूहाचे मुख्य संपादक आहेत. बालपण आणि तारुण्याचा काळ फार खडतर गेला की, माणूस कार्यकर्ता होता असे म्हटले जाते. कांबळे यांच्याबाबतही ते खरे आहे. आधी कार्यकर्ता, मग पत्रकार-लेखक आणि आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा त्यांचा आलेख चढता आहे. कविवर्य नारायण सुर्वे आणि कथाकार बाबुराव बागुल यांच्याशी त्यांची सगळ्याच अर्थाने नाळ जुळते. सुव्र्याचे तर ते मानसपुत्रच होते. ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही दोन कांबळे यांची महत्त्वाची पुस्तके. तसे त्यांनी कथा, कविता, कादंबरी आणि सामाजिक प्रश्नांवरही लेखन केले आहे, करत आहेत. पत्रकाराला सामाजिक प्रश्नांविषयी नेहमीच भूमिका घ्यावी लागते, ती कांबळेही घेत आले आहेत. त्यामुळेच ते ख-या अर्थाने कार्यकर्ता-पत्रकार आहेत.
कालपर्यंत आपल्या लेखनातून कांबळे ज्या समाजघटकांच्या बाजूने भूमिका घेत होते आणि यापुढेही घेतील, तो काही प्रस्थापित समाज नाही. तो सुव्र्याच्या आणि बागुलांच्या साहित्यातला समाज आहे. या समाजाची कड घेणा-यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात नाही, त्यांची दखल घेतली जात नाही अशी काही प्रमाणात रास्त असलेली तक्रार आहे. पण त्यातल्या ज्यांनी आपले श्रेष्ठत्व निर्विवाद सिद्ध केले त्यांना अध्यक्षपदाचा गौरव बहुमानाने दिला गेला हेही सत्य आहे.
याच समाजातून पुढे आलेले कांबळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि 741 पैकी 411 इतक्या मतांनी निवडूनही आले. पण सुव्र्याच्या या मानसपुत्राने ही निवडणूक मतदारांच्या सदसद्विवेक बुद्धीवर विश्वास ठेवून जिंकली असा निर्वाळा त्यांना स्वत:लाही देता येणार नाही. या निवडणुकीसाठी आजवर जी जी राजकीय समीकरणे जुळवली जातात, तीच दुर्दैवाने कांबळे यांच्याबाबतही जुळवली गेली. म्हणजे कालपर्यंत ज्या गोष्टींविषयी कांबळेंना आक्षेप होता, त्याच गोष्टी त्यांनी स्वत: अध्यक्षपदाचा उमेदवार असताना केल्या किंवा त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या नावाखाली केल्या. तिथे कांबळे यांचा प्रामाणिक निस्पृहपणा, चारित्र्यसंपन्नता कामी आली नाही हेही विदारक सत्य आहे. कांबळे यांचा महाराष्ट्रभर मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांना समर्थन देणाऱ्यांनी त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी मोठी आघाडी उघडली होती.
पण कांबळेही मोहात पडले आणि गडबड झाली. आपली आजवरची पुस्तके कुठल्या प्रकाशकांनी छापली, अर्पणपत्रिका कुणाच्या नावे लिहिल्या आहेत, त्यांच्या किती आवृत्त्या आल्या, त्यांचा आशय काय आहे, मृखपृष्ठे व रेखाटने कोणी केली आहेत आणि त्यावर कुठे कुठे किती परीक्षणे छापून आली, दिवाळी अंकांचे संपादन, पुस्तकांचे संपादन, भाषणांच्या पुस्तिका, अन्य ठिकाणी आलेले लेख, रेडिओवरील कार्यक्रम, शालेय पाठय़पुस्तकात समाविष्ट झालेले साहित्य, इतरांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना, एम. फिल, पीएच. डी किती जणांनी केल्या, पुस्तकांना मिळालेल्या पुरस्कारांच्या याद्या, कार्यक्रमातले सहभाग, आजवर केलेला प्रवास, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना हजेरी लावली याची डेमी आकारातील तब्बल 48 पानी पुस्तिका कांबळेंनी छापवून घेतली. ती सर्व मतदारांना पाठवली. या त्यांच्या ‘कारकीर्दी’चा अन्वयार्थ कसा लावायचा?
सांगलीला झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष उत्तम कांबळे होते. तेव्हा त्यांनी आर. आर. पाटील यांची एका धर्मसंकटातून सुटका केली होती, तेव्हा कांबळे यांचा मध्यममार्गीपणा दिसला होता. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला प्रत्यक्षात कुठलेच अधिकार नसतात. पण तो त्या वर्षाचा महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवक्ता असतो. मात्र अलीकडच्या काळात सरकार/प्रशासनावर नैतिक दबाव येईल असे प्रतिभावान महाराष्ट्रात उरले नाहीत आणि जे उरले आहेत त्यांच्याकडे तसा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे हे सांस्कृतिक प्रवक्तेपण कुणीच नीट निभावत नाही. सगळीकडे शाली आणि श्रीफळे स्वीकारत मानसन्मान करून घ्यायचा आणि कृतकृत्य व्हायचे असा एकंदर अध्यक्षाचा खाक्या असतो. अर्थात अलीकडचे अध्यक्षही ‘नयन लागले पैलतिरी’ याच पंथातले असल्याने त्यांच्याकडून कुठल्या अपेक्षा करताही करता येत नव्हत्या.
ते दुष्टचक्र पहिल्यांदा भेदायची संधी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवक्तेपण निभावायचे मोठे आव्हान उत्तम कांबळे यांच्यापुढे आहे. कार्यकर्ता असणारा माणूस लेखक झाला की, जे तोटे होतात, तेच तो लेखकाचा सांस्कृतिक प्रवक्ता झाल्यावरही होतात. ते टाळण्याचा प्रयत्न कांबळे करतीलच, अशी सदिच्छापूर्वक अपेक्षा आहे!

Sunday, September 19, 2010

मराठीतला भारतीय दिग्दर्शक


सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत प्रभावीपणे काम करणारा आणि तरीही, ‘मला मराठी सिनेमा करायचाच आहे.. पण मी मराठीत भारतीय सिनेमा करतो आहे’ असं बजावून सांगणा-या आजच्या पिढीचा दिग्दर्शक सचिन कुंडलकरविषयी..।

............................................................

‘‘मला एकदा शनिवारवाडय़ावर सभा घेऊन सूज्ञ प्रेक्षकांना हे सांगायचे आहे की, प्रायोगिक नाटके हीच खरी जिवंत नाटके आहेत. त्यांच्यात खरे रसरशीत नाटक अनुभवायला मिळते. व्यावसायिक मराठी नाटके ही तिकिटाबरोबर दोन रुपयांची कुल्फी मोफत देऊन बालबुद्धीच्या प्रेक्षकांनी बघावीत इतकी कंटाळवाणी असतात. दुसरं म्हणजे ‘आर्ट फिल्म’चा काळ 1980 मध्ये संपला आहे. सिनेमा ही व्यावसायिक कला आहे आणि कुणाकडेही सध्या आर्ट फिल्मस् बनवत बसायला वेळ नाही. त्यामुळे अर्धशिक्षित प्रेक्षकांनी स्वत:ला न समजणाऱ्या चित्रपटांना आर्ट फिल्मस् म्हणणे कृपया बंद करावे आणि टीव्ही बघत उर्वरित आयुष्य घालवावे. स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) आणि उपभोगवाद या दोन आजारांनी हळूहळू भ्रष्ट होत चाललेल्या मराठी प्रेक्षकाने समंजसपणे स्वत:कडे पाहिले, तर अजूनही वेळ गेलेली नाही. टीव्हीवरच्या गवईशोध स्पर्धा आणि मतिमंद पात्रांच्या मालिका बघण्यापेक्षा स्वच्छ, ताजेतवाने होऊन नाटय़गृहात वा चित्रपटगृहात जाऊन नवे, ताजे व खऱ्या अर्थाने मनोरंजक असे काही बघितलंत तर तुमच्याच मनाला बरे वाटेल. तुम्ही जे जगता आहात ते जगणे मांडणारी ही नाटके आणि चित्रपट आहेत. तुमच्यासाठीच हे बनवले आहे. स्वत:मधल्या प्रेक्षकाला अधिकाधिक जाणकार व समृद्ध केल्याने आयुष्य जगायला एक नवे परिमाण मिळते हा माझा अनुभव आहे.’’
सचिन कुंडलकरने 2008 मध्ये ‘प्रेक्षकहो’ या नावाने लिहिलेल्या लेखातील हा उतारा. मराठी प्रेक्षकांना इतकं खणखणीत आवाहन करणा-या प्रशिक्षित रंगकर्मीची एक अख्खी पिढीच अलीकडच्या काळात उदयाला आली आहे. आज 30 वर्षाचा असणा-या सचिन कुंडलकरखेरीज संदेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, मोहित टाकळकर, विवेक बेळे, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, अद्वैत दादरकर, सतीश मनवर अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. ही पिढी स्वत:ला अतिशय जोरकसपणे आणि ठोसपणे व्यक्त करू पाहत आहे. या सर्वाची नाटके स्वत:ला पडलेले प्रश्न आणि समस्या मांडताना दिसतात. आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करणारी ही पिढी आजूबाजूच्या परिस्थितीतून आलेलं गोंधळलेपण, त्यांची संभ्रमावस्था, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्या नाटकांतून मांडताना दिसतात. सचिन कुंडलकर हा त्यातला आघाडीचा दिग्दर्शक आणि नाटककार. शाळेत असतानाच सचिनचं आपण सिनेमाच करायचा हे ठरलं होतं. आशुतोष गोवारीकर हे त्याचे फॅमिली फ्रेंड. आशुतोष त्या वेळी ‘नशा’ हा त्याचा पहिला चित्रपट करत होते. सचिन त्यांच्याकडे गेला. तेव्हा आशुतोषने त्याला चांगला सल्ला दिला, ते म्हणाले, ‘‘तू आधी तुझं बेसिक शिक्षण पूर्ण कर. काम आपलंच आहे, तू येऊन कधीही जॉइन हो.’’ पण त्यानंतर सचिनचं मन शाळेत लागेना. तरीही त्यानं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तो सुमित्रा भावेंकडे गेला. पुढची आठेक वर्षे सचिननं त्यांच्याबरोबर काम केलं. त्याविषयी तो म्हणतो, ‘‘सुमित्रा भावेंबरोबर अनेक ठिकाणी फिरलो, प्रवास केला; चित्रपट महोत्सव पाहिले. 1999 साली पॅरिसला जाईपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करत होतो. परत आल्यावरही त्यांच्याकडे एक वर्षे काम केलं. त्यामुळे त्यांचा माझ्यावर थेट प्रभाव नसला तरी मी त्यांच्यासारखा विचार करतो. आमची कामं वेगळी आहेत पण ती एका विचाराची वाटतात, त्याचं हे कारण आहे.’’
सचिनच्या चित्रपटांचे विषय, त्यांची मांडणी भाव्यांच्या चित्रपटांसारखी बांधेसूद वाटते, असं जाणकार सांगतात. आपला विषय आपल्याच पद्धतीनं मांडणं, मुख्य म्हणजे त्याचा व्हिज्युअली विचार करणं या गोष्टी सचिनच्या सिनेमा आणि लघुपटात प्रकर्षाने जाणवतात. तो म्हणतो, ‘‘माझ्या दृष्टीनं सिनेमा म्हणजे नक्कल नसून आपल्या संस्कृतीतलं आणि वातावरणातलं ताकदीनं मांडणं आहे. माझ्या आयुष्यातलं आणि आजूबाजूचं मी माझ्या सिनेमांतून मांडत असतो. सामाजिक, राजकीय चित्रपट मला बनवता येत नाहीत. दहा माणसं एकत्र आली तर मला त्यांचं काय करावं ते समजत नाही. पात्र हे माझा विचार सांगण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं, म्हणूनच माझा एकल माध्यमावर जास्त भर असतो.’’ सचिनचे ‘रेस्टारंट’, ‘गंध’, ‘निरोप’ हे चित्रपट काय किंवा ‘द बाथ’, ‘आऊट ऑफ बॉक्स’, ‘शुभ्र काही’ हे लघुपट काय, या सर्वामध्ये जाणवते ती माणसांमधल्या नात्यांबद्दलची अतीव ओढ. माणसांमाणसांमधील नाती, त्यातील ताणतणाव यांचा सचिन अनेक अंगानं शोध घेताना दिसतो. सचिननं ‘छोटय़ाशा सुटीत’, ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’, ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ ही नाटकंही लिहिली आहेत. त्यातही हेच जाणवतं. ‘छोटय़ाशा सुटीत’ हे सचिनचं नाटक दोन पुरुषांच्या समलिंगी संबंधाविषयीचं आहे. त्याचबरोबर त्यात आपल्या लग्नसंस्थेवर आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वरही मार्मिक भाष्य आहे. ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’मध्ये माणसाच्या एकाकीपणाची, एकारलेपणाची सहन न करत येणारी तडफड अ‍ॅब्सर्ड पद्धतीनं मांडली आहे, तर ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’मध्ये विकासाच्या अटळतेतून होणारं शहरीकरण, माणसांचं मोठय़ा प्रमाणावर होणारं स्थलांतरण, त्यातून निर्माण होणारे प्रश्न यातील ताणतणावांचा आलेख मांडला आहे. पण हे एकटय़ा सचिनमध्ये नाही तर त्याच्या पिढीतल्या इतर नाटककार-दिग्दर्शकांमध्येही हेच जाणवतं. मनस्विनी लता रवींद्रच्या ‘सिगारेटस्’ आणि ‘अलविदा’ या नाटकात आजच्या युवापिढीचं जगणं, त्यांना पडणारे लैंगिकतेविषयीचे प्रश्न यांची रोखठोख मांडणी आहे, तर हेमंत ढोकेच्या ‘लूज कंट्रोल’मध्ये वयात येणाऱ्या मुलांना भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची चर्चा आहे. म्हणजे ही पिढी किती एकसारखा, आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करते!
सचिनच्या ‘गंध’ या चित्रपटाला 2007 सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘गंध’मध्ये ‘लग्नाच्या वयाची मुलगी’, ‘औषधे घेणारा माणूस’ आणि ‘बाजूला बसलेली बाई’ अशा तीन स्वतंत्र कथा आहेत. या चित्रपटाची पहिली कथा सचिनच्या आईने ‘सुगंध’ या नावाने लिहिली होती. ती एकदा सचिनला कपाटात मिळाली. तेव्हा त्याला त्यावर शॉर्ट फिल्म करावीशी वाटली. दरम्यान त्याच्या पाहण्यात मल्याळम् दिग्दर्शक अडूर गोपाळकृष्णन यांचा ‘फोर विमेन’ हा चित्रपट आला. त्यात चार स्वतंत्र कथा होत्या. तो सिनेमा पाहिल्यावर सचिनला दुसरा एक अख्खा चित्रपटच सुचला आणि त्यातून ‘गंध’ तयार झाला. सचिन त्याच्या चित्रपटाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल म्हणतो, ‘‘मी मराठी सिनेमा करत नाही तर भारतीय सिनेमा करतो. सिनेमाची भाषा प्रादेशिक वगैरे नसते. ती स्वतंत्र असते आणि ती सिनेमाचीच असते. त्यामुळे मी सिनेमाकडे सिनेमा म्हणून पाहतो.’’
सचिनच्या या भारतीय धारणेमुळेच त्याचे सिनेमे वेगळे ठरतात हे नक्की. सध्या मराठी चित्रपटांमध्येही नाटकांप्रमाणेच नव्या दिग्दर्शकांची फळी पुढे आली आहे. त्यामुळे मराठीत अलीकडच्या काळात नवनवे प्रयोग घडताना दिसतात. त्यावर सचिन म्हणतो, ‘‘मराठी चित्रपट नव्या जाणिवांना, प्रयोगांना प्रतिसाद द्यायला शिकला असला तरी, मराठी प्रेक्षक आणि वितरक हे मात्र पारंपरिक मानसिकतेचेच आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांची नवी पिढी आली असली तरी त्यांना योग्य हातभार मिळत नाही. आणि तो लवकर मिळाला नाही तर ती एक छोटी लाट ठरेल आणि काही दिवसांनी ओसरून जाईल.’’
‘ड्रीम्ज् ऑफ तालीम’ हे सचिननं नुकतंच (आणि पहिलं) इंग्रजी नाटक लिहिलंय. सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. त्याचे सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. या नाटकाची जानेवारी 2011 मध्ये होणा-या ‘भारतीय रंगमहोत्सवा’साठी निवड झाली आहे. चेतन दातार या आपल्या मित्राला आदरांजली म्हणून सचिननं हे नाटक लिहिलंय. चेतनच्या नाटकाची तालीम असं त्याचं स्वरूप आहे. सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा माध्यमांत काम करत असल्याने सचिनचा सतत अनेक लोकांशी संपर्क येतो. शिवाय ही सर्वच कामं टीमवर्कची असल्याने लेखनासाठी सचिनला मुद्दामहून आणि ठरवून वेळ काढावा लागतो.
नुकतीच अनुराग कश्यप या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्दर्शकाने सचिनला आणि राही अनिल बर्वेला त्याच्यासाठी सिनेमे करण्याची ऑफर दिली आहे. त्या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे. सचिनचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असेल. त्याविषयी सचिन सांगतो, ‘‘अनुराग कश्यप हा माझा खूप आवडता दिग्दर्शक आहे. त्याने माझी ‘गंध’ ही फिल्म पाहिली होती. तिचा पहिला शो पाहायला मुंबईत जे मोजके लोक आले होते, त्याला अनुरागही आला होता. त्याला ती आवडली असावी. त्यानंतर त्याने मला हिंदी सिनेमाविषयी विचारलं. अनुरागबरोबरची ही फिल्म रोमँटिक कॉमेडी आहे. आम्ही दोघांनीही कधी केली नसेल अशी ती फिल्म आहे. 2011 च्या मे मध्ये तिचं शूटिंग सुरू होईल.’’ या सिनेमाचंही स्टोरी-स्क्रीन प्ले-डायलॉग असं सर्व नेहमीप्रमाणे सचिनचंच आहे. म्हणजे हीदेखील सबकुछ सचिन कुंडलकर फिल्म आहे का, असं विचारल्यावर तो पटकन म्हणतो, ‘नाही, कश्यप-कुंडलकर.’
पण हिंदी चित्रपट करतोय तसा सचिन एक इंग्लिश-फ्रेंच सिनेमाही करतो आहे. त्याचं काम दोन वर्षानी- 2012 मध्ये सुरू होणार आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘‘माझा हा सिनेमा महाराष्ट्रात आणि पॅरिसमध्ये घडतो. त्या अर्थाने तो बहुसांस्कृतिक आहे. पुढचा अख्खा महिना मी त्यासाठी फ्रान्सला जाणार आहे. मला हे करता येतं कारण मी कुठल्याही भाषेला, संस्कृतीला बांधून घेतलेलं नाही. मला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या चारही भाषा बोलता येतात. या सगळ्या भाषांमध्ये विचार करता येतो.’’ पण मग मराठी सिनेमाचं काय? त्यावर सचिन तत्परतेनं म्हणतो, ‘‘एका मराठी सिनेमाचं स्क्रिप्ट लिहून तयार आहे. मला मराठी सिनेमा करायचाच आहे.’’ दृश्यात्मकतेची उत्तम जाण, अन्य कलांमधला संचार आणि त्या त्या माध्यमांतल्या चांगल्या गोष्टींचा योग्य वापर करून घेण्याची हातोटी यामुळे सचिनचे सिनेमे, लघुपट आणि नाटकंही वेगळी ठरत आली आहेत. शिवाय आपण जे काही करतो त्याबद्दलचं उत्तम भान आणि जाण त्याला आहे. त्याची मतं ठाम आणि प्रगल्भ असतात, त्याचं कारणही पुन्हा हेच आहे.

Saturday, September 4, 2010

चळवळया रंगकर्मी


‘‘ये दिल माँगे गुरूजी, ये दिल माँगे मोअर
माँगे मथुरा माँगे काशी, माँगे ताजमहल
काबा मंदिर हो तो गुरूजी तंटे हो सब हाल
पंगे माँगे मोअर गुरूजी, दंगे माँगे मोअर
ये दिल माँगे गुरूजी’’

हा संवाद आहे ‘जन नाट्य मंच’च्या ‘ये दिल माँगे मोअर गुरूजी’ या नाटकातील. या नाटकात सुधन्वा देशपांडे यांनी काम केले आहे. जून 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर‘जन नाट्य मंच’ने हिंदुत्ववादी विचारसरणीची खिल्ली उडवणारे हे पथनाट्य केले होते. तात्कालिक आणि निकडीच्या सामाजिक प्रश्नांवर पथनाटय़ांच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम ‘जन नाट्य मंच’ ही दिल्लीस्थित संस्था 1973पासून करते आहे. अतिशय रोखठोक आणि प्रसंगी जहाल वाटावी अशी ही नाटकं असतात. त्यामुळेच या संस्थेचे संस्थापक सफदर हाश्मी यांची 1989मध्ये हत्या झाली. पण म्हणून ही संस्था बंद झालेली नाही आणि पथनाटय़ंही थांबलेली नाहीत. हाश्मी यांच्या पत्नी मौलश्री व सुधन्वा देशपांडे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
पण हाश्मींच्या निधनामुळे संस्थेचं नुकसान झालंच. एक धगधगता अंगार अचानक विझला. हाश्मींच्या आठवणीने सुधन्वा आजही व्याकूळ होतो, म्हणतो, ‘सफदरसारखा अतिशय प्रतिभावान, नाट्यकर्मी, नेता जातो तेव्हा नुकसान तर होतंच. विशेषत: ग्रूप छोटा असतो तेव्हा ते अधिकच जाणवतं. सफदरचा खून झाला तेव्हा तो 34 वर्षाचा होता. पण त्यानं जे फाउंडेशन केलं होतं ते एकदम सॉलिड होतं. सफदरच्या खूनानंतर ग्रुपला एकत्र ठेवणं, त्याला धीर देणं यात मौलश्रीचा फार मोठा वाटा होता. सफदर अतिशय चांगला ऑर्गनायझर होता. तो नाटकं लिहायचा, गाणी लिहायचा, लहान मुलांकरता कविता लिहायचा आणि संस्कृती-कलेवरही लिहायचा. तो खूप देखणा होता. मला तरी आठवत नाही की, एखादा त्याच्या संपर्कात आला आणि त्याच्या प्रेमात पडला नाही, असं झालेलं. अनेक लोक म्हणतात- सफदरने किती त्याग केला! त्यानं ठरवलं असतं तर तो मोठय़ा कंपनीत नोकरीला लागला असता वगैरे.. पण मला तरी यात काही त्याग वाटत नाही. कारण सफदर जे करत होता, त्यात तो समाधानी होता. त्यानं कमिट केलं, पण त्याग केला नाही. मी अमूक सोडून हे करतोय असं त्याला कधीच वाटलं नसेल. वाटलं नाही, हे मला नक्की माहीत आहे. तो ते करायचा कारण त्याला खूप मजा यायची. ’ त्याग आणि कमिटमेंटबाबतच बोलायचं झालं तर ते सुधन्वाबद्दलही बोलता येईल. त्यानेही ठरवलं असतं, तर तो उत्तम करिअर करू शकला असता. मराठीतले प्रसिद्ध नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्त्यां कालिंदी देशपांडे यांचा मुलगा असणं हेही त्याचं अ‍ॅडिशनल क्वॉलिफिकेशन होऊ शकलं असतं. पण सुधन्वानेही यापैकी काहीच केलं नाही. उलट ‘आपण आजवर कुठलीच गोष्ट फार विचारपूर्वक केली नाही’ असे तो सांगतो, ‘ मी तरी विचार करून कधीच काही केलेलं नाही. मी कॉपोरेट क्षेत्रात गेलो असतो, तर तिथे टिकू शकलो असतो का? नाही. ती माझी टेंपरामेंटच नाही. कोणत्याही क्षणी आपल्यासमोर ऑप्शन असतात आणि खूपदा नसतातही. गोष्टी होतात त्या बाय चान्स. नंतर आपल्याला असं म्हणता येईल की मी हाच चॉइस केला होता, पण तो काही चॉइस नसतो. ती एक वस्तुस्थिती असते आपल्यासाठी.’’
नाटक हा सुधन्वाचा वीक पॉइंट आहे. तो अगदी लहानपणापासून नाटकात काम करतो आहे. त्याची पहिली आठवणही नाटकाविषयीचीच आहे. कॉलेजात असताना तो नाटकाकडे गांभीर्याने पाहायला लागला. गो. पु. त्या वेळी दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त होते. सुधन्वाची आई कालिंदीताई महिला चळवळीत, तर मोठी बहीण अश्विनी विद्यार्थी चळवळीत काम करत होती. त्यांच्यामुळे सुधन्वाने 1985-87 या काळात ‘जन नाट्य मंच’ची खूप नाटकं पाहिली. त्यातून त्याची सफदर हाश्मी यांच्याबरोबर यारी झाली. हाश्मींनी त्याला ‘काय रे तू नाटकं करतोस. मग आमच्याबरोबर का नाही करत?’ असा सवाल करून त्याला आपल्या संस्थेत बोलावून घेतलं. ते वर्ष होतं 1987 आणि सुधन्वा होता 18 वर्षाचा. तेव्हापासून सुधन्वा ‘जन नाट्य मंच’बरोबर काम करतोय. हाश्मींबरोबर सुधन्वाला जेमतेम तीनेक वर्षच काम करायला मिळालं. पण तो त्याच्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता. कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळणार नाहीत, इतक्या गोष्टी या काळात तो शिकला.
‘‘सफदर मस्त माणूस होता. मुख्य म्हणजे तो हसमुख होता. तो डायनॅमिक होता, आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता. दुसरी गोष्ट म्हणजे, तो हायरार्कल नव्हता. त्यामुळे तरुण मुलांबरोबर त्याला मैत्री करायला कधीच प्राब्लेम नसायचा. त्याच्याभोवती नेहमी त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षानी लहान अशी पोरं असायची. पण ती फक्त हिरोवर्शिप नाही करायची. सफदर आमचा हिरो होता, पण तो फक्त हिरो नव्हता; ही गोष्ट पण खरी आहे. त्याच्याबरोबर आम्ही खूपदा वादही घालायचो. तशी स्पेस होती. सफदरने एखादा सीन लिहिलाय आणि तो एखाद्याला आवडला नाही, तर अशा गोष्टींना सफदर नेहमी पॉझिटिव्ह प्रतिसाद द्यायचा. त्यामुळे सफदरसमोर आपल्याला काही बोलता येणार नाही, आपला विकास होणार नाही, आपली ग्रोथ होणार नाही असं कधीच वाटलं नाही.’’
सुधन्वानेही हाश्मींबरोबर असा वाद घालून ‘चक्काजाम’ या नाटकात त्यांना बदल करायला लावला होता. ‘चक्काजाम’चा काही भाग सुधन्वाला पटला नाही. पण तोवर सुधन्वाला लेखनाचा काहीच अनुभव नव्हता. मात्र एके दिवशी अचानक त्याला स्फूर्ती झाली अन् त्याने मजा म्हणून पूर्णपणे वेगळा असा सीन लिहिला. तो घेऊन सुधन्वा रिहर्सलला गेला. तो सीन हाश्मींना एवढा आवडला की, त्यांनी त्याला मिठी मारली आणि तो सीन घेऊन ते नाटक नव्यानं लिहिलं. या नाटकाची पुढे हाश्मींनी आणखी एक आवृत्ती केली, त्याचं नाव होतं ‘हल्लाबोल’. या नाटकातही सुधन्वाचा सीन होता.
सुधन्वाचा सफदर हाश्मींसोबत काम करण्याचा अनुभव जसा त्याला समृद्ध करणारा होता, तसाच तो हबीब तन्वीर यांच्याबरोबरचाही. गंमतीचा भाग म्हणजे ‘जन नाट्य मंच’ सुरू झालं, तेच मुळी ‘इप्टा’पासून प्रेरणा घेऊन आणि तन्वीरांच्या नाटकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, तीही मुंबईतल्या ‘इप्टा’तच. 1988मध्ये तन्वीर यांनी ‘जन नाट्य मंच’साठी ‘मोटेराम का सत्याग्रह’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्या वेळी सुधन्वाचा त्यांच्याशी परिचय झाला, मग दोस्ती झाली. त्यांचा स्वभावही हाश्मींप्रमाणेच असल्याने सुधन्वाचं त्यांच्याशीही जमून गेलं. सुधन्वानं हबीब तन्वीर आणि त्यांच्या ‘नया थिएटर’वर 2005 साली संजय महारिषी यांच्यासोबत ‘गाँव का नाम थिएटर, मेरा नाम हबीब’ हा लघुपटही केला आहे. ‘विसर्जन’ या टागोरांच्या कथेवर आधारित नाटकावरचा सुधन्वाचा सविस्तर अभिप्राय ऐकून तन्वीरांनीही ते नाटक बदललं होतं.
पण हे सगळं झालं नाटकाविषयी. सुधन्वा याशिवायही खूप गोष्टी करतो. तो ‘लेफ्टवर्ड’ या प्रकाशन संस्थेचा व्यवस्थापकीय संपादक आहे. सुधन्वा प्रकाशन व्यवसायात आला तोही बाय चान्स. त्याआधी तो अहमदाबादच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’मध्ये लेक्चरर म्हणून काम करत होता. समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सुधन्वा तिथे वयाच्या चोविसाव्या वर्षी जॉइन झाला. एक-दीड वर्ष त्याने शिकवलंही. तो सांगतो, ‘‘तिथे मी शिकवलं कमी, स्वत:च जास्त शिकलो. पण ‘जन नाटय़ मंच’चं काम माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. ती नोकरी मला आवडत होती, पण ‘जन नाटय़ मंच’कडे पाहणं त्यामुळे शक्य होत नव्हतं. मग मी ते सोडून परत आलो.’’
परत दिल्लीला आल्यावर त्याला काही मित्रांनी सुचवलं की, ‘तुझं इंग्रजी चांगलं आहे. तू लिहितोस चांगलं. इतिहास तुझा अभ्यासाचा विषय आहे. मग तू प्रकाशन संस्थांमध्ये का नाही प्रयत्न करत?’ तेव्हा खरं तर सुधन्वाला संपादनाबद्दल काही म्हणजे काही माहिती नव्हती. पण तरीही त्यानं ‘ओरिएंट लाँगमन’ या प्रख्यात संस्थेत अप्लाय केला आणि त्याला तिथे नोकरीही लागली. पण सुधन्वा तिथे नोकरी करतोय हे समजल्यावर त्याच्या आई-बाबांची मैत्रीण आणि ‘तुलिका प्रकाशन’संस्थेची मुख्य संपादक इंदर चंद्रशेखर सुधन्वावर रागावली. म्हणाली, ‘तू तिथे का काम करतोयस? माझ्याकडे येऊन काम कर.’ सुधन्वा त्यांच्याकडे गेला आणि तिथे रमलाही. पाच-सहा वर्षे त्याने तिथे राजकारण, समाजकारण, इतिहास, समाजशास्त्र अशा अनेकविध विषयावरील पुस्तकांचं संपादन केलं. पण या कामाचाही कंटाळा आल्यावर सुधन्वानं ठरवलं की,आता आपण फुलटाईम अ‍ॅक्टिव्हिस्ट होऊ. पण त्यांच्या मित्रांनी स्वत:च प्रकाशन संस्था काढायची ठरवलं आणि त्यात काही दिवसांपुरतं म्हणून सुधन्वाला अडकवलं. त्यालाही आता अकरा वर्षे झाली. त्याविषयी सुधन्वा म्हणतो, ‘अजून दुसरी काही ऑफरही आली नाही आणि या कामात मला मजा येतेय. यात ‘डिप सॅटीसफॅक्शन ऑफ सेन्स’ आहे, म्हणून मी हे करतोय.’’
सध्या सुधन्वा आणि त्याची ‘जन नाट्य मंच’ ही संस्था स्वत:च्या जागेसाठी प्रयत्नशील आहे. पण दिल्लीसारख्या ठिकाणी स्वत:ची जागा हवी म्हणजे किमान एक कोटी रुपये उभे करायला हवेत. ‘जनम’ सध्या ते पैसे उभे करण्याच्या कामात गुंतली आहे. त्यातील काही पैसे देणग्या आणि नाटय़ महोत्सवाच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्ली आणि मुंबईला आठ-आठ दिवसांचे नाटय़ महोत्सव ‘जनम’ करते आहे. या महोत्सवात शबाना आझमी, रजत कपूर आणि गुलजार यांची नाटकं असतील, ‘नया थिएटर’चं नाटक असेल. सुधन्वा म्हणतो,‘‘आम्हाला दोन कारणांसाठी हक्काची जागा हवी आहे. ‘जनम’चं मुख्यत: लेफ्ट- विंग रॅडीकल पोलिटीकल थिएटर अशा स्वरूपाचं काम आहे. लहान मुलं-तरुण यांची इच्छा खूप असते पण त्यांना काही जमत नाही. अशा लोकांसाठी एक सेंटर असेल, तर लोक तिथे येऊ शकतात, भाग घेऊ शकतात. दुसरं म्हणजे, समजा एक ग्रुप नाटक करतोय. त्याची रिहर्सल तो उघडय़ावर, पार्कमध्ये, गॅरेजमध्ये कुठेही करतो. ती केल्यावर ते नाटय़गृहात जाऊन प्रयोग करतात. यात काय होतं की, त्यांचा पहिला शो टेक्निकली अनरिहर्सल्ड असतो. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की, एक व्हिडिओ थिएटर काढावं. तिथे नाटकवाल्या मंडळींना फायनल शोच्या आधी दहा-पंधरा दिवस प्रयोग करता येतील.’’
सुधन्वा हा असा आहे. ज्या कामात मजा येतेय, समाधान मिळतंय तेच काम तो करतो. तो डाव्या विचारसरणीकडे वळला ते नाटकांमुळे आणि डाव्या प्रकाशनसंस्थेकडे वळला, तो नाटक करत करता येईल असं काम आहे म्हणून. शिवाय तो ‘द ड्रामा रिव्ह्यू’,‘क्रॉस कल्चरल पोएटिक्स’,‘द सीगल थिएटर क्वार्टली’ आणि ‘द इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकांत राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा अशा विषयावर लिहितोही. एवढे सगळे उद्योग करण्यासाठी वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण तो त्याला पडत नाही. तो म्हणतो,‘‘यात खरं तर काही नवल नाही. खूप लोकं अशी काम करत असतात. माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत, जे एका वेळी तीन-चार कामं करत असतात. त्यांच्याकडे पाहून वाटतं, असं आपल्याला जमलं पाहिजे.’
अर्थात सुधन्वाला हे जमलेलं आहेच. तो एकाच वेळी अनेक गोष्टी यशस्वीपणे करत असतो. मात्र त्याविषयी तो फार आग्रही नसतो. कारण तो त्याचा स्वभाव नाही. तो म्हणतोच मुळी- ‘बेसिकली मी समाधानी प्रवृत्तीचा मनुष्य आहे. मी खूप महत्त्वाकांक्षी नाही.’
पण समाधानी आहे म्हणूनच सुधन्वा जे काही करतो, ते मूलगामी स्वरुपाचं असतं. चळवळीला बळ देणारं असतं।

Monday, August 30, 2010

इथे चमत्कार नव्हे, माणसं घडतात!



‘व्यसनमुक्त समाजनिर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे,’ या ध्येयातून 29 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यातील येरवडा भागात सुरू झालेलं ‘मुक्तांगण’हे व्यसन मुक्ती केंद्र आज रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. व्यसनमुक्तीच्या कामाची निराळी पद्धत राबवणा-या, पेशंटला केंद्रस्थानी मानणा-या या केंद्राच्या आजवरच्या वाटचालीचा हा आढावा..

‘मुक्तांगण’ हे राज्यातलं पहिलंच व्यसन मुक्ती केंद्र. ते सुरू कसं झालं याची कहाणीही थोडीशी गंमतीशीर आहे. अनिल अवचट त्या वेळी सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत होते, सामाजिक प्रश्नावर लिहीत होते; तर डॉ. सुनंदा (अनिता) अवचट येरवडा मेंटल हॉस्पीटलमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत होत्या. त्या वेळी व्यसनी व्यक्तीवर उपचार करण्याची खास अशी काही पद्धत नव्हती. उपचार म्हणजे त्याला सरळ मेंटल हॉस्पिटलला पाठवणे. तिथे काही उपचार नव्हते. ते फक्त झोपेच्या गोळ्या द्यायचे. थेरपी वगैरे काही नव्हती. तसे पेशंट येरवड्याच्या रुग्णालयात भरती व्हायचे. पण यांच्यावर वेगळ्या पद्धतीने उपचार केले पाहिजेत, यांना इथं ठेवणं बरोबर नाही असं सुनंदा अवचटांना वाटत असे. दरम्यान त्यांच्या मैत्रिणीचा मुलगाच गर्दच्या विळख्यात सापडला. मग सुनंदाताईंनी त्याच्यावर घरीच उपचार सुरू केले. तो ब-यापैकी बाहेर आल्यावर अनिल अवचट त्याला फिरायला नेऊ लागले. त्यातून त्यांना या व्यसनाबाबत माहिती झाली.
तोवर त्यांना वाटायचं की, हे श्रीमंतांचं व्यसन आहे, आपल्याला काही देणंघेणं नाही. सामाजिक प्रश्न असेल तर आपण त्याकडे लिहिण्यासाठी बघू. पण गरीब लोकांमध्येच- कामगार, रिक्षा ड्रायव्हर, कचरा वेचणारे-यांच्यामध्येच हे व्यसन जास्त आहे हे समजल्यावर अवचटांनी त्यावर लिहायचं ठरवलं. आधी‘गर्द’लेखमाला प्रसिद्ध झाली. ती वाचून लोक त्यांच्याकडे जायला लागले. मग अवचट पती-पत्नी खात्री करून त्या पेशंटना ससूनकडे पाठवायचे. पण ससूनच्या लोकांनी एक-दोन दिवसांतच‘आमच्याकडे पाठवू नका’असं सांगितलं. मग करायचं काय? दरम्यान ‘गर्द’ पु. लं. नी वाचलं होतं. त्यानं ते खूप अस्वस्थही झाले होते. त्यांना ही हकिकत समजली. मग त्यांनी अवचट पती-पत्नीला बोलावून घेतलं. ते म्हणाले, ‘यांच्यासाठी तुम्ही काहीतरी सुरू करा. पैशाला आम्ही कमी पडू देणार नाही.’
येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनंदा अवचटांकडे अल्कोहोलिक पेशंट यायचे. तेव्हा सुनंदाताईंना वाटायचं की, या लोकांना इथं ट्रीटमेंट देणं काही बरोबर नाही. कारण एक दारूचं व्यसन सोडलं तर ते तसे नॉर्मल असायचे. परंतु त्यांच्यासाठी दुसरी कुठलीच सोय उपलब्ध नव्हती.
पु. लं. च्या आश्वासनानं सुनंदाताईंना हुरूप आला. मेंटल हॉस्पिटलच्या आवारात एक वापरात नसलेली इमारत होती. तिथे ‘मुक्तांगण’ सुरू करायचं ठरलं. मग सरकारी परवानग्या वगैरे सुरू झाल्या. सरकारने ब-याच अटी लादल्या, पण एकदाची परवानगी दिली अन् ‘मुक्तांगण’ सुरू झालं.
सुनंदाताई सायकॅट्रिस्ट असल्या तरी व्यसन मुक्ती केंद्र चालवण्याचा त्यांच्याकडे कुठलाच अनुभव नव्हता आणि अशा प्रकारच्या कामाची त्यांना माहितीही नव्हती. त्यावर त्या म्हणायच्या, ‘गरज आहे, करायचं. आपल्याला जे ज्ञान नाही ते पेशंटकडून शिकायचं.’आणि खरोखरच पेशंटकडून त्या प्रत्येक गोष्ट शिकत गेल्या. त्या येणा-या पेशंटला विचारात, ‘तुझ्यासाठी काय झालं असता तुझं व्यसन सुटेल?’ त्यांचं हे शिकणं कधी थांबलं नाही. आपल्या पेशंटविषयी कमालीची आत्मीयता आणि त्याला विश्वासात घेणं हा त्यांचा मूलमंत्र होता. त्याविषयी अनिल अवचटांनी एका लेखात म्हटले आहे, ‘‘एक उद्योगपती त्यांच्या अ‍ॅडिक्ट मुलाला अ‍ॅडमिट करायला आले. ते सुनंदाला सांगू लागले, ‘याला हे सांगा, ते सांगा.’ सुनंदा त्यांना म्हणाली,‘त्याला काय सांगायचं ते मला कळतं, मी जेव्हा तुम्हाला काही विचारेन, तेव्हा तुम्ही सांगा.’ ते चमकलेच. त्यांच्या आक्रमकतेला असं कुणी अडवलं नव्हतं; पण हे ऐकणारा तिचा पेशंट मात्र खूश झाला, की तो सुनंदाचा भक्तच झाला. सुनंदाला कुठल्याही उच्च पदस्थाचं कधी दडपण येत नसे. एकदा एक खासदार बाई त्यांच्या मुलाला दाखल करायला आल्या. बरोबर इथल्या अ‍ॅडिशनल कमिशनरना घेऊन आल्या. त्या बोलत सुटल्या. सुनंदानं त्यांना थांबवले. म्हणाली, ‘हे तुम्ही आधी सांगितलं आहे. काही नवीन असलं तर सांगा.’ त्या एकदम थांबल्याच. नंतर सावरून शेजारच्या कमिशनरना म्हणाल्या, ‘बघा, आमचं राजकारणी लोकांचं असंच असतं. बोलतच राहतो; पण कोणी अडवत नाही. या बाईंनी हे केलं नसतं, तर समजलं नसतं.’ तिच्यामध्ये गरीब-श्रीमंत असाही कधी वागण्यात फरक पडत नसे. ज्याला कोणी नाही त्याला तर ती अधिक जवळ करीत असे.’’
एक पेशंट दहा-बारा वेळा अ‍ॅडमिट झाले. नंतरनंतर त्याला ‘मुक्तांगण’मध्ये अ‍ॅडमिट करायला घरचे वैतागायचे. पण सुनंदाताई मात्र शांत असायच्या. त्या म्हणायच्या, ‘तो दमतोय का मी दमतेय ते मी बघणार. तोपर्यंत मी त्याला उपचार देणार.’ शेवटी त्या पेशंटने हार मानली. नंतर तो अतिशय चांगला राहिला. या उलट एखादा पेशंट परत पिऊन यायचा, तेव्हा त्या त्याला म्हणायच्या, ‘हरकत नाही. आपलं मागच्या वेळेला काय चर्चा करायचं राहिलंय. आपण परत चर्चा करू. ही तुझी पहिलीच अ‍ॅडमिशन आहे, असं समजू.’ हे लोक चुकताहेत, वाईट वागताहेत या दृष्टीनं त्यांनी कधी पेशंटकडे पाहिलं नाही.
सुनंदाताईंनी एक उपचाराची पद्धत शोधून काढली, ती फॉलो करणारा स्टाफ तयार केला. तोही नव्वद टक्के ‘मुक्तांगण’मध्ये व्यसनमुक्त झालेल्या लोकांमधूनच. शिक्षण कमी असलं तरी ती इथं आडकाठी ठरत नाही. कामावर निष्ठा आणि निष्ठेनं काम हाच प्राधान्यक्रम मानला जातो. आता सुनंदाताई नाहीत, तरीही ‘मुक्तांगण’चे काम याच पद्धतीने चालले आहे. त्याविषयी अनिल अवचट म्हणतात, ‘‘आम्हाला फक्त ‘मुक्तांगण’ चालवायचं होतं. लोक म्हणत होते, तुमचं सेंटर बंद पडणार. कारण डॉक्टरच्या नावावर दवाखाने चालतात. हासुद्धा सुनंदाचा एक प्रकारे दवाखाना होता. पण तसं काही झालं नाही. तिच्या काळात पेशंटला जी आत्मीयता मिळायची, जो अनुभव मिळायचा तसाच आताही मिळेल अशा जिद्दीनं आम्ही ‘मुक्तांगण’ चालवलं. त्यामुळे अनेक पेशंट सांगतात, ‘आम्हाला जावंसं वाटत नाही.’ ते येतात तेव्हा त्यांना इथं थांबायचं नसतं. ते पळून जायचे प्रयत्न करतात. खूप आरडाओरडा करतात. ते एका आठवड्यानंतर शांत होताना आम्ही पाहतो. जाताना त्यांचा पाय निघत नाही, याचा अर्थ सुनंदानं घालून दिलेला रस्ता नीट आहे.’’
1997 साली डॉ. सुनंदा अवचटांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यानंतर ‘मुक्तांगण’च्या ट्रस्टींनी मुक्ता पुणतांबेकर यांच्यावर उपसंचालक म्हणून जबाबदारी सोपवली. मुक्ताताई सांगतात, ‘आईबरोबर मला चार वर्षे काम करायला मिळालं. सुरुवातीचे एक-दोन महिने तर मी फक्त तिच्या रूममध्ये बसून ती रुग्णांशी कसं बोलते, कसं वागतं हे शिकू लागले. मला तिचा काम करतानाचा उत्साह बघायला खूप आवडायचं, ती आजारी असली तरी. आमच्याकडे जे रुग्ण मित्र येतात. त्या प्रत्येकाला एकच गोष्ट खूप वेळा सांगायला लागते. आई पहिल्या पेशंटशी ज्या उत्साहाने बोलायची त्याच उत्साहाने ती शेवटच्या पेशंटशीही बोलायची. ती याबाबतीत दमायची नाही. मी तिला एकदा विचारलं, ‘तुला कसा एवढा उत्साह?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तो माणूस हे पहिल्यांदाच ऐकतोय याचं भान मला ठेवावं लागतं.’ आईच्या अशा छोट्या छोट्या गोष्टींतून मी खूप शिकत गेले.’’
‘मी कधीच लीडर नव्हते. आय वाज ऑलवेज फॉलोअर. पण ती लीडरशिप माझ्यावर पडली.’ असं मुक्ताताई म्हणत असल्या तरी ही लीडरशिप त्या उत्तम प्रकारे निभावत आहेत.
2000 साली ‘मुक्तांगण’ येरवडय़ाच्या जागेतून प्रतीकनगरातल्या स्वत:च्या स्वतंत्र वास्तूत गेलं. सध्या ‘मुक्तांगण’मध्ये एका वेळी 120च्या आसपास रुग्ण असतात. त्यातील सत्तर टक्के दारूचे असतात. पूर्वी ब्राऊन शुगरचे 80 टक्के आणि दारूचे 20 टक्के असायचे. आता ते उलट झालं आहे. सध्या मेडिसिनल अ‍ॅब्यूजचं प्रमाण खूप वाढतंय. औषधांचा दुरुपयोग केला जातो. हे प्रमाण बायकांमध्येही वाढतंय. व्हाइटनर आणि इंटरनेटचेही ‘व्यसनी’ असतात. या वर्षात मुक्ताताईंनी इंटरनेटचे व्यसन असलेल्या तिघांवर उपचार केले. फक्त जुगाराचे व्यसन असलेले पेशंट येतात; पण यातल्या 90 टक्के लोकांना निकोटीनचंही व्यसन असतं.
ज्याचा त्या लोकांना अजिबात सिरिअसनेस वाटत नाही.
आतापर्यंत ‘मुक्तांगण’ने 18,500 पेशंटवर उपचार केले आहेत. ‘मुक्तांगण’कडून प्रेरणा घेऊन दुसरीकडे सुरू झालेलीही काही व्यसनमुक्ती केंद्रे आहेत. नागपूरला ‘मुक्तांगण’चा पूर्वीचा एक पेशंटच केंद्र चालवतो आहे, महेश फडणीस हेही ठाण्यानजीक, कळवा इथं केंद्र चालवत आहेत. शिवाय अशा प्रकारचे काम जे करू इच्छितात, त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम ‘मुक्तांगण’मध्ये केलं जातं. महाराष्ट्राखेरीज छत्तीसगड, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात या राज्यांतल्या 92 केंद्रांना असं प्रशिक्षण देणारी संस्था, म्हणूनही ‘मुक्तांगण’ कार्यरत आहे.
‘मुक्तांगण’चा 18,500 हा आकडा महाराष्ट्राच्या तुलनेत लहान असला तरी एका संस्थेसाठी तो खूप मोठा आणि आश्वासक आहे. आजकाल व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे. अ‍ॅडिक्ट असणा-यांची मोठी फौज तयार होते आहे.‘मुक्तांगण’त्यातल्या काहींनाच दुरुस्त करू शकते. अनिल अवचटांच्या भाषेत सांगायचं तर ‘हे गणित कायमच विसंगत दिसणार. या परिस्थितीत आम्ही काय करू शकतो? जो माणूस अडकला आहे, त्याला मदत करणं हे आमचं काम आहे.’ नुसतं कामच नाही तर स्वप्न आणि ध्येयही. ‘मुक्तांगण’ सुरू झाले तेच मुळी ‘व्यसन मुक्त समाज निर्मिती हे आमचे ‘स्वप्न’ आहे’ या ध्येयातून. गेल्या पंचवीस वर्षातली ‘मुक्तांगण’ची त्या वाटेवरील कामगिरी कौतुकास्पद म्हणावी अशीच आहे।
.........................................................................................................................................
महिलांसाठी ‘निशिगंध’
अलीकडच्या काळात महिलांमध्येही व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढले आहे. हे लक्षात घेऊन ‘मुक्तांगण’ने जानेवारी 2009मध्ये खास अशा महिलांसाठी ‘निशिगंध’ हा वेगळा विभाग सुरू केला. या विभागात एका वेळी आठ-नऊ महिला उपचारासाठी अ‍ॅडमिट होतात. त्याविषयी मुक्ताताई सांगतात, ‘‘एक गोष्ट चांगली की, बायकांचा रिकव्हरी रेट जास्त चांगला आहे. तो जवळपास 85 टक्के दिसतो.’ मात्र बायका सुरुवातीला जास्त त्रास देतात, खूप आरडाओरडा करतात, सारखं रडत राहतात.. असाही अनुभव आहे. पण आठवडा झाला, त्या नीट सेट झाल्या की अगदी भरभरून प्रतिसाद देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा समज असतो की, व्यसनाधीनतेमध्ये एकतर झोपडपट्टीतल्या किंवा श्रीमंतच बायका असतात. ‘मुक्तांगण’मध्ये मात्र अगदी टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीही पाहायला मिळतात. त्याखालोखाल कॉल सेंटर, आयटी क्षेत्रातल्या महिलांचं प्रमाण वाढतं आहे. विशेष म्हणजे ज्या स्त्रिया ‘निशिगंध’मध्ये काऊन्सिलर म्हणून काम करतात, त्यांचे नवरे आधी व्यसनाधीन होते. त्यांचा ‘मुक्तांगण’मध्ये ‘सहचरी’ नावाचा ग्रूप होता. त्यातल्याच काही महिला ट्रेनिंग घेऊन आता ‘निशिगंध’मध्ये काम करतात

Monday, August 23, 2010

जगण्या-लढण्यातली शहाणीव



नारायण सुर्वे यांनी राजकीय विचारांशी बांधिलकी कधी नाकारली नाही। पण त्या विचारधारेशी निव्वळ बांधलेली त्यांची कविता कधीच राहिली नाही. सुर्व्यांनी युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणा-यांवर विश्वास ठेवला. स्वत:च्या मर्यादा ओलांडून विश्वमानवाला पाहणारी शहाणीव बहिणाबाई चौधरींप्रमाणे सुर्वेच्याही कवितेत होती. माणसांना समपातळीवरून पाहणा-या या कवीनं पुढारपणाच्या ऊर्मी नेहमी नाकारल्या, त्याही बहुधा याच शहाणिवेतून.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जॉर्ज ऑर्वेल या जगप्रसिद्ध लेखकानं ‘व्हाय आय राइट’ असा लेख 1946 साली लिहिला आहे. त्यात लेखक का लिहितो त्याची आर्वेल यांनी चार कारणे सांगितली आहेत. ती अशी Sheer egoism, Aesthetic enthusiasm, Historical impulse and Political purpose.राजकीय दृष्टिकोन म्हटलं की बहुतेक मराठी लेखकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. लेखकाला राजकीय भूमिका/निष्ठा नसते, नसावी असा युक्तिवाद ते करत असतात. अशा लोकांसाठी आर्वेल यांनी ‘राजकीय दृष्टिकोना’ची फोड करताना म्हटले आहे, ''Using the word ‘political’ in the widest possible sense. Desire to push the world in a certain direction, to alter other peoples’ idea of the kind of society that they should strive after. Once again, no book is genuinely free from political bias. The opinion that art should have nothing to do with politics is itself a political attitude.''
नारायण सुर्वे या बाबतीत मात्र जॉर्ज आर्वेलच्या वंशाचे म्हटले पाहिजेत. कारण त्यांचे लेखनही ‘राजकीय दृष्टिकोन’ व्यक्त करणारे आहे. त्यांनी लिहिले आहे,‘‘सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. व्यक्तिगत जीवनापासून तो सर्व समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. माणसातले सौंदर्य व त्याच्या बावन्न कला मला चित्रित करायच्या असतात. मी चित्रित केलेला माणूस पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला तरी तो पुन्हा नव्या संघर्षातही उभा राहणारा, ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव हा मानवी इतिहासाचा एक भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे हे विसरता येत नाही. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढलेपण दाखवणे मला मोलाचे वाटते ते याचसाठी. माझे लेखनसुद्धा याचसाठी असते.’’
सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एक नवे युग सुरू केले ते या अर्थाने. लढणा-या सामान्य माणसाचा पराक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला. कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांचं योगदान सुव्र्याच्या कवितेचा आत्मा झाला. कुणाही लेखकाचा जगण्याचा अनुभव, त्याचं थिंकिंग एखाद-दुस-या पुस्तकात येऊन जातं, त्यामुळे त्याची तेवढीच पुस्तकं चांगली होतात. अगदी जागतिक लेखकांनाही हा नियम लावता येईल. नारायण सुर्वे यांना यापैकी कुठल्याच मर्यादा पडल्या नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या जगण्याच्या, अनुभवांच्या पलीकडे फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी मुळात लिहिलंच फार कमी. गेल्या दहा-पंधरा वर्षात तर एकही कविता लिहिली नाही. त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन काहींनी त्यांच्याकडून लेख लिहून घेतले, तर काहींनी त्यांच्या एरवी पुस्तकरूपात आले नसते अशा लेखनाची पुस्तकं करायचा प्रयत्न केला. तरीही, खूप कमी लिहून साहित्यिक म्हणून किती मानाचा धनी होता येतं, याचं सुर्वे हे उत्तम उदाहरण आहे.

खरा प्रतिभावंत
सुर्व्यांना ख-या अर्थानं आणि पुरेशा गांभीर्यानं ‘प्रतिभावंत’ म्हणता येईल। मराठीत ‘विचारवंत’ या शब्दाची अलीकडच्या काळात जी फरफट झाली आहे, तीच ‘प्रतिभावंत’ या शब्दाचीही झाली आहे. आणि ती ज्यांना हे दोन्ही शब्द नीट समजलेले नाहीत त्यांनी केली आहे. इतरांच्या विचारांची पुनर्माडणी करणा-यांना विचारवंत आणि कल्पनांच्या बेगडी महिरपी रंगवणा-यांना प्रतिभावंत म्हटले जाते! सुर्वे विचारवंत नव्हते पण ते अस्सल प्रतिभावंत होते. एका अभागी आईनं रस्त्यावर टाकून दिलेलं पोर गंगाराम नावाच्या गिरणीकामगारानं काही काळ सांभाळलं खरं, पण त्यांनाही मर्यादा असल्यानं सुर्वे पुन्हा अनाथ झाले, अनाथ म्हणून मोठे झाले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा प्रवास. पण कविता मात्र त्या वेळच्या साहित्याला सुभेदारी मानणा-यांना इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला कवेत घेऊ पाहणारी, कष्टक-यांसाठी पसायदान मागणारी. अशी शहाणीव असायला प्रतिभाच लागते. जगण्याच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत सुर्व्यांचं कबीराशी नातं होतं, तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरींशी. जगण्याचा सच्चा अनुभव गाठीला असेल, मनगटात बळ असेल आणि सोबतीला प्रतिभा असेल तर काय करता येऊ शकतं, याची बहिणाबाई आणि सुर्वे ही दोन उत्कृष्ट उदाहरणं आहेत.
बाजारीकरणापासून दूर
सुव्र्याना आपली कविता नेमकी कशी आहे याचं पुरेपूर भान होतं। चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहणं ही जगण्याची प्रेरणा असते. सुव्र्यानी या युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणाऱ्यांवर विश्वास ठेवला. माणसांवर थेट समपातळीवरला विश्वास ठेवणारी ही कविता असल्यामुळे त्यांनी या ‘लोकां’चं पुढारपण केलं नाही॥ तसल्या पुढारपणासाठी कवितेतून क्रांतीच्याही फाजील अपेक्षा बाळगल्या नाहीतच; पण लोकरंजन हाही उद्देश मानला नाही. थोडक्यात त्यांनी कवितेचं बाजारीकरण होऊ दिलं नाही. ‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्वेबद्दल तीन दशकांपूर्वी म्हटलं होतं. मानवी जगणं प्रत्यक्षात छंदोमय नसतं, याची जाणीव त्या काळीही कविताव्यवहाराशी जोडलेल्या फार थोडय़ा मंडळींना होती. आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही, असे ठणकावून सांगणारे सुर्वे हे बहुधा मराठीतले एकमेव कवी असावेत. (हृदयनाथ मंगेशकरांना तर त्यांनी पुन्हा पुन्हा मागूनही कविता दिल्या नाहीत ही तर फारच थोर गोष्ट म्हटली पाहिजे!)
कवितासंग्रहांचं वेगळेपण
सुर्व्यांचे चारही संग्रह व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. सुव्र्याचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कवितासंग्रह 1962 साली प्रकाशित झाला. इथल्या प्रस्थापितांविरुद्ध दिलेला तो एल्गार होता. स्वत:च्या आगमनाची अतिशय रास्त आणि निर्धोक आत्मविश्वासानं ललकारी देणारी सुर्व्यांची कविता वेगळी ठरली ती इथेच. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’चं शीर्षक मॅक्सिम गॉर्कीच्या ‘माय युनिव्‍‌र्हसिटीज’शी साधर्म्य सांगणारं आहे. सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तोवर गॉर्की वाचला नव्हता हे खरे असले तरी सुव्र्याच्या विद्यापीठाची जातकुळी नेमकी कोणती आहे हे यातून स्पष्ट होते. तर ‘जाहीरनामा’ हा सरळसरळ मार्क्‍स-एंजल्स यांच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ याच्याशी नातं सांगणारा होता. ‘सनद’चे शीर्षक सुर्वे यांच्या अजेंडय़ाला मान्यता मिळाल्याचे द्योतक आहे. ‘नव्या माणसाचे आगमन’ हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्त्वज्ञानाशी, आम्हाला कुठल्या प्रकारचा नवा माणूस घडवायचा आहे, याच्याशी जुळणारा आहे.
या तुलनेमुळे त्यांच्या कवितेला कमीपणा येण्याचे काहीच कारण नाही. उलट सुव्र्याचे हे मोठेपण की, त्यांनी आपली बांधिलकी कधी दडवली नाही. बांधिलकी हा अनेक लेखक-कवींसाठी अडथळा ठरतो, पण सुव्र्याची कविता त्यापल्याड जाणारी आहे. म्हणूनच तर ती सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व समाजगटातल्यांपर्यंत पोहोचू शकली, त्यांची मान्यता मिळवू शकली. अशी सर्वमान्यता मिळवणारे बहुधा सुर्वे शेवटचेच ठरावेत.
सुर्व्यांचं लिहिणं हीच त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. लिहिणं हे जगण्याशी किती सम साधून असतं, याचं उदाहरण म्हणूनही सुर्व्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळेच सुर्व्यांच्या प्रत्येक कवितेत त्यांचं थोडं थोडं आत्मचरित्र आलं आहे. सुर्व्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही कारण ते त्यांच्या कवितेत आलं होतं. आणि ते लिहिलं असतं तर ‘बाळगलेला’ हे त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं. कोल्हापूरच्या रिमांड होममधल्या मुलांशी बोलतना सुर्वे म्हणाले होते,‘मी बाळगलेला पोर होतो, तुम्ही सांभाळलेली मुलं आहात.’ सुर्व्यांनी आपल्या अनाथपणाचं कधी भांडवल केलं नाही. लेखन ही अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असे मानणारे, जाणणारे आणि जगणारे सुर्वे होते. म्हणूनच त्यांच्या कवितेत जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. साहित्याच्या श्रेष्ठतेची मानकं अशा गोष्टींमुळेच तयार होत असतात. समूहाची भाषा बोलणारे लेखन नेहमीच क्लासिक सदरात मोडत आले आहे. सुर्व्यांच्या लेखनाचाही तोच दर्जा आहे.

Wednesday, August 4, 2010

‘हिंदू’ -चर्चा,गप्पा आणि मतमतांतरे


सध्या मराठी वाचकांमध्ये एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे नेमाडय़ांच्या ‘हिंदू’ची। जो तो ‘हिंदू’ वाचतोय आणि रोज आपल्या मित्राला ‘माझी अमूक पानं आता वाचून झाली, तुझी किती पानं वाचून झालीत?’ मराठी वाचकांना चार भागातली कादंबरी वाचण्याचा सराव नाही. त्यात ‘हिंदू’चा पहिलाच भाग प्रकाशित झालाय. त्यामुळे या कादंबरीबद्दल जाम उत्सूकता आहे. ती अशीच चवथ्या भागापर्यंत टिकून राहिली तर मग ‘कोसला’, चांगदेव चतुष्टय आणि ‘हिंदू’ची तुलनात्मक चर्चा रंगणार असं विचारतोय.
पण सध्या मात्र पहिल्या भागाचीच चर्चा रंगतेय। काही हार्ड कोअर वाचकांनी मात्र सलग दोन-तीन दिवसांत कादंबरी वाचून संपवली आहे, तर काही मात्र थांबून थांबून वाचताहेत. ‘पुरवून पुरवून वाचन’ असा हा काहीसा प्रकार आहे. नेमाडय़ांचे हार्ड कोअर चाहते मात्र रोजची पानं वाचून झाल्यावर आपल्या मित्रांशी फार भारावून जाऊंन चर्चा करताहेत. आणि आपल्याला म्हणण्याला आता नेमाडय़ांच्या मांडणीचा आधार मिळालाय, या संतोषानं समाधान पावताहेत.
तर दुसरीकडे नेमाडय़ांनी ‘हिंदू’ ‘ज्ञानपीठ’ समोर ठेवून लिहिली आहे, ‘कोसला’ला साहित्य अकादेमी देता आले नाही म्हणून यू. आर. अनंतमूर्तीनी ‘टीकास्वयंवर’ला दिले. आता नेमाडय़ांचीही दिल्लीत वट वाढली असून ‘ज्ञानपीठ’ मिळवणं त्यांच्यासाठी काही कठीण काम नाही. ‘हिंदू’ लिहून त्यांनी त्याची सोय करून ठेवली आहे, असंही बोललं जात आहे.
तिसरीकडे ‘हिंदू’ची रचना एवढी मोठी करून नेमाडय़ांनी मराठी वाचकांची मोठी गोची करून ठेवली आहे. कारण या कादंबरीचे चारही भाग प्रकाशित होईपर्यंत त्याविषयी ठोसपणे भाष्य करता येणार नाही, विश्लेषणही करता येत नाही. त्यामुळे चवथा भाग येईपर्यंत थांबणं भाग आहे. आणि नेमाडय़ांच्या अलीकडच्या मुलाखती पाहता ते ही कादंबरी पूर्ण करतील असं वाटत नाही. चौथा भाग लिहायला त्यांनी आणखी २०-२५ वर्षे घेतली तर काय घ्या? आपण त्यांच्यावर दबावही आणू शकत नाही. एकंदर नेमाडय़ांनी त्यांच्या चाहत्यांना टांगणीवर ठेवलं आहे आणि त्यांच्या विरोधकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे, अशीही चर्चा रंगत आहे.
चौथा जो वर्ग आहे, त्याचं म्हणणं आहे की, नेमाडय़ांनी ‘हिंदू’च्या पहिल्या भागात जी ऐतिहासिक दृष्टीने अनेक विधाने केली आहेत, त्यांचे पुरावे कादंबरीत कुठे दिले नाहीत. कादंबरीत पुरावे, संदर्भ देणं शक्य नसतं हे खरं पण त्यांचा आधार तर त्यांना स्पष्ट करता आला असता. तेही त्यांनी कुठं केलं नाही, तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? नेमाडे सतत काहीतरी तिरपागडं बघत संभ्रमात टाकणारी विधानं करत असतात. तसाच प्रयत्न त्यांनी या कादंबरीतही केला आहे. शिवाय पुरावे मागणाऱ्यांना ‘माझ्या वर्गात तासाला येऊन बसा म्हणजे स्पष्टीकरण देतो’, असं तिरपागडं उत्तर देतात. आता त्यांचा हा वर्ग भरतो कुठं आणि त्यात ते शिकवतात काय, हे पाहत बसण्याएवढा वेळ कुणाकडे आहे?
पाचवा वर्ग मात्र ‘हिंदू’चं वाचन झपाटय़ाने संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मोठी आशा आहे की, ‘हिंदू’त अनेक गडबडी असणार आणि आपल्याला त्या आधारे नेमाडय़ांवर शरसंधान करता येईल. त्यामुळे ते अगदी बाह्या सावरून कादंबरी वाचताहेत.
तर एकंदर मराठी साहित्यातलं वातावरण असं ‘हिंदू’मय झालेलं आहे.

Monday, August 2, 2010

राम पटवर्धन उवाच....


‘सत्यकथा’ हे मासिक बंद पडून आता जवळपास तीस वर्षे होत आलीत. पण अजूनही चांगल्या मासिकांचा विषय निघाला की, ‘सत्यकथा’चा हमखास उल्लेख केला जातो. आणि ‘सत्यकथे’चा उल्लेख आला की, श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धनांचीच नावं आठवतात. ‘सत्यकथे’ला या दोघा संपादकांनी लौकिक मिळवून दिला, तो मर्मज्ञ दृष्टी आणि साहित्यावरच्या अपार प्रेमाच्या बळावर. त्या आठवणी पुन्हा जागवण्याचा हा प्रयत्न, राम पटवर्धन यांच्याबरोबर...

‘‘क-हाडच्या कृष्णाकाठाविषयीची कथा दीपा गोवारीकरनं लिहिली होती. ती वाचल्यावर मी दीपाबाईंना म्हणालो, ‘‘हे कुठल्या ऋतूत चाललं आहे?’ त्या म्हणाल्या, ‘नवरात्र.’ मी म्हटलं, ‘अच्छा. बघू या.’ मग सरळ पंचांग काढलं. ते पाहिल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘हे अतिशय गारव्याचे दिवस आहेत. तुमच्या कथेत तर हा गारवा कुठे आलेलाच नाही!’
‘‘आशा बगे यांनी एकदा ‘सत्यकथे’कडं कथा पाठवली. त्या कथेला त्यांनी ‘गादी’ हे नाव दिलं होतं. कथा वाचल्यावर मला वाटलं की, या नावातून अर्थबोधच होत नाही. कथेतला काळ मध्ययुगीन होता. त्यातल्या कीर्तनांचं, त्यातल्या रागाचं फार सुंदर वर्णन त्यांनी केलं होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं की, हा संध्याकाळचा राग आहे. आपण या कथेला ‘मारवा’ असं नाव देऊ. कथा प्रकाशित झाल्यावर हे नाव खूप क्लिक झालं.
‘‘थोडक्यात मी कलाकृती घेऊन बसतो. त्यात कुठलाही अहंकार नसतो. ते सगळं लेखक आणि माझ्या एक्सचेंजमधून होत असतं. या लेखकाचा कोअर अनुभव काय? त्या अनुभवाला या लिखाणातून बळ मिळतंय का? की पुरेसं मिळत नाहीये? त्या दृष्टीनं मी संबंध कथा वा लेख वाचत असे. संपादन म्हटलं की, थोडासा मास्तरकीचा वास येतो. चुका काढणं वगैरे. पण संपादन म्हणजे संगोपन.’’
मराठी साहित्याचं अशा प्रकारे संगोपन करण्याचं काम श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून एकेकाळी केलं. त्यामुळं त्यांच्या नावांचा महाराष्ट्रात खूप दबदबा होता. नवकथा आणि नवकाव्याच्या परंपरेतील साहित्यिकांच्या लेखनाला पैलू पाडून ते अधिकाधिक फुलवण्याचं, शैलीदार बनवण्याचं काम श्री. पु. भागवत-राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथे’च्या माध्यमातून केलं. ‘तुमच्या कथेला टोक नाही, तिला टोक आणलं पाहिजे’ या त्यांच्या विधानाची तेव्हा खूप टवाळीही केली जायची. श्री. पु.-राम पटवर्धन कथा वा लेख पुन्हा पुन्हा लिहायला सांगत. त्यांच्या मनासारखं लेखन होईपर्यंत ते ‘सत्यकथे’त छापलं जात नसे. मराठी लेखकांनाही आपलं लेखन या दोन चिकित्सक संपादकांच्या पसंतीला उतरणं आणि ‘सत्यकथे’त छापून येणं हा मोठा गौरव वाटत असे. पण काही लेखक त्यांच्या या संपादनाची टवाळीही करत.
श्री. पु.- राम पटवर्धन हे मराठी साहित्यात कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जातात. श्री. पु. आता नाहीत. राम पटवर्धनांचं वयही 83 आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली तीच मुळी या प्रवादापासूनच. आमच्याबद्दलच्या सगळ्या समजुती या निव्वळ प्रवाद आहेत, असं सांगून पटवर्धन म्हणाले,‘‘आम्ही प्रत्येक कथेला भरपूर वेळ देत असू. अन् तोही लेखकावर बळजबरी न करता. हे काढा, ते काढा, असं आम्ही कधी केलं नाही. संपादन असं नसतं. ते फुलवणं असतं. आतमध्ये गुदमरलेली थीम फुलून आली पाहिजे.’’
राम पटवर्धनांनी अनेक नव्या आणि तरुण लेखकांना प्रोत्साहन दिलं, लिहितं केलं. आशा बगे, दीपा गोवारीकर, आनंद विनायक जातेगावकर, सानिया, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ अशा वेगवेगळ्या शैलीच्या आणि प्रकृतीच्या लेखकांना त्यांनी ‘सत्यकथे’त आणलं. ढसाळ ‘सत्यकथे’कडे कसे आले त्याचा किस्साही मोठा मजेशीर आहे. पटवर्धन सांगतात, ‘‘अनंत काणेकरांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन चालू होतं. तेव्हा नामदेव ढसाळ पुढे आला आणि म्हणाला, मला कविता वाचायची आहे. काणेकर म्हणाले, काय करता तुम्ही? तो म्हणाला, मी टॅक्सी ड्रायव्हर आहे. मी काही मोठं विशेष लिहिलेलं नाही, पण ही कविता मला श्रोत्यांना ऐकवायची आहे. त्या वेळी नामदेवनं जे वाचून दाखवलं, त्यानं अंगावर काटा आला. तो एका वेगळ्या जगाचा अनुभव होता. मी मनात म्हटलं, अरेच्चा हे पात्र जरा लक्षात ठेवलं पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर तो जायला निघाला तेव्हा मी त्याला थांबवून म्हटलं, उद्या मौजेत या. ढसाळ त्याप्रमाणे आला. त्यामुळं नामदेवच्या सुरुवातीच्या कविता सत्यकथेत आल्या.’’ चांगलं साहित्य कुठं दिसलं की, त्या लेखकाला आणि पर्यायानं त्याच्या साहित्याला उचलायचं हा पटवर्धनांचा कार्यक्रम होता. या धोरणामुळे ‘सत्यकथा’ पटवर्धनांच्या काळात वेगळ्या वळणानं जायला लागली. दलित, कामगार या वर्गातील लोकांबद्दल त्यांना अतिशय आदर होता. या लेखकांनी पटवर्धनांना पुष्कळ सहकार्य केलं आणि प्रेमही दिलं.
मौजेमध्ये फक्त लेखकांचाच राबता असायचा असं नाही. तर चित्रकला, शास्त्रीय संगीत, नाटक, चित्रपट या क्षेत्रातले लोकही तिथं येत असत. त्यात जे बंडखोर लोक होते, त्यांचे नेहमी इतरांशी वाद-संवाद चालायचे. ‘ये भडव्या’ अशा भाषेत ते बोलायचे. राम पटवर्धनांची त्यावर प्रतिक्रिया असायची, ‘ठीक चाललंय. चालू द्या.’ त्यांना खेचायचं काम कधी त्यांनी केलं नाही. त्यांना ते त्यांच्या पद्धतीनं जाऊ द्यायचे. त्यावर ते गंमतीनं म्हणतात, ‘‘अशा पद्धतीनं बघू शकलो तर आपण रिलॅक्स राहतो. कुठल्याही साहित्यिक वादामध्ये हिरिरीनं पडत नाही. हळूहळू नामदेव ढसाळचे वीकपॉइंट दिसायला लागले. पुढे तर तो शिवसेनेत गेला. मग राहिलं काय? मला वाटतं, ठीक आहे. असंच चालायचं.’’
राम पटवर्धन ‘सत्यकथे’चे संपादक असताना त्यांची सतत श्री. पु. भागवतांशी तुलना केली जात असे. अर्थात दोघांच्या कामाची पद्धत वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच असल्यानं त्यांना एकमेकांना कधी काही सांगावं लागलं नाही. मात्र काही वादाचे, गैरसमजाचे प्रसंग आलेच. पण त्या वेळी श्री. पु. पटवर्धनांना एवढंच म्हणाले की, ‘पटवर्धन, तुम्ही उत्साहाच्या भरात काही लोकांवर अन्याय केलाय.’ तेवढंच. बाकी त्यांनी पटवर्धनांना असं करा, तसं करा असं कधीही सांगितलं नाही. पटवर्धनांनी ‘सत्यकथे’त दिलीप चित्रे यांचा एक लेख छापला होता. त्यात त्यांनी ग. दि. माडगूळकर हे कवी नसून गीतकार आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे माडगूळकर नाराज झाले. असे आणखी एक-दोन प्रसंग घडले.
साहित्याच्या एवढय़ा सान्निध्यात राहूनही पटवर्धनांनी स्वत: मात्र फारसं लेखन केलं नाही. नाही म्हणायला त्यांनी केलेला मार्जोरी किनन रॉलिंग्जच्या ‘यार्लिग’चा ‘पाडस’ हा अनुवाद मात्र अप्रतिम म्हणावा असा आहे. ‘नाइन फिफ्टी टू फ्रिडम’चा ‘अखेरचा रामराम’ आणि बी. के. अय्यंगार यांच्या पुस्तकाचा ‘योगदीपिका’ या नावाने असे दोन मराठी अनुवाद केले खरे, पण ‘पाडस’चे अनुवादक अशीच त्यांची ओळख आहे. (पुष्कळ लोक अय्यंगारांच्या त्यांच्या अनुवादाला ‘तुमची योगायोगदीपिका’असं म्हणतात.) त्यांच्या वकील आणि ऑडिटर असणाऱ्या दोन्ही मुलांना ‘पाडस’ जवळपास तोंडपाठ आहे. अर्थात हे पुस्तक पटवर्धनांकडे अनुवादासाठी आलं ते अगदी योगायोगानं. जयवंत दळवी यांना ‘युसिस’साठी या पुस्तकाचा अनुवाद करून हवा होता आणि तो मौजेकडून प्रकाशित व्हावा अशी त्यांची इच्छा होती. ती त्यांनी विष्णुपंत भागवतांना बोलून दाखवली. त्यांनी हा अनुवाद आमचे राम पटवर्धन करतील आणि श्री. पु. तपासतील असं त्यांना सांगून टाकलं. या पुस्तकाच्या रूपानं पटवर्धनांच्या हाती घबाडच लागलं. म्हणून पटवर्धन म्हणतात, ‘‘अनुवादाची एक प्रक्रिया असते. मूळ इंग्रजी पुस्तक आपण वाचतो, ते आपल्याला आवडतं. मग आपण त्याचा अनुवाद करतो. ‘पाडस’च्या बाबतीत असं काहीही झालेलं नाही. तो एक अपघात आहे.’’
पटवर्धन यांनी कुठल्याही गोष्टीसाठी कधी धडपड केली नाही. सर्व गोष्टी त्यांना विनासायास मिळत गेल्या. पण त्याचा त्यांनी कधी अहंकार बाळगला नाही. ते याचं वर्णन ‘केवळ योगायोग’ अशाच शब्दात करतात. ‘‘मी ‘सत्यकथे’त गेलो ते योगायोगानंच! त्याआधी मी रुइया कॉलेजमध्ये शिकवत होतो. एके दिवशी श्री. पु. आले आणि म्हणाले,‘ग. रा. कामत फिल्मलाइनमध्ये चालले होते. मी तुमचे निबंध वाचलेले आहेत. मला असं वाटतं की, तुम्ही ‘सत्यकथे’चं काम चांगलं कराल. येता का मौजेत?’ आम्ही काय तयारच. मौजेसारख्या संस्थेत काम करायला मिळणं ही मोठी गोष्ट होती.’’
एकेकाळी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण धगधगतं ठेवणारी ‘अभिरुची’, ‘हंस’, ‘सत्यकथा’ ही मासिकं काय किंवा लघुअनियतकालिकांची चळवळ काय, या शेवटी अल्पजीवीच ठरल्या. आधी ‘अभिरूची’ मग ‘हंस’ बंद झालं. आणि ऑगस्ट 1982 मध्ये ‘सत्यकथा’ही बंद झालं. त्यानंतर काही काळ लघुअनियतकालिके निघाली, पण त्यांचा वकुब खूपच मर्यादित राहिला. आणि त्यातल्या कुणालाच संपादक म्हणून श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखी मोहोर उठवता आली नाही. सगळ्याच चांगल्या गोष्टी शेवटी अल्पजीवीच ठरतात काय? पण पटवर्धनांना मात्र तसं वाटत नाही. ते म्हणतात,‘‘त्याला अल्प वगैरे आपण म्हणतो. त्यांचा जो जीव असतो, तेवढी ती टिकतात. आपले कम्युनिस्ट घ्या. पूर्वेला लालरंग वगैरे देण्याचे त्यांचे मनसुबे होते. चीनमध्ये झाली तशी क्रांती आपल्याकडे व्हायला पाहिजे अशी ते स्वप्नं पाहायचे. क्रांतीची अशी कलमं लावता येतात काय? त्याचं एक गणित असतं त्यानुसार ते चाललेलं असतं. त्यात आपण बदल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे फक्त शिव्याच द्यायच्या, कुणाला काही कदर नाही वगैरे. कशाला पाहिजे हे? जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत, त्यांचा तुम्ही धांडोळा घेऊ शकता. ते सोडून आहे त्या गोष्टीला चिकटून बसणं हे चूक आहे. सध्या आपल्या आजूबाजूला जे काय चाललं आहे, त्याला सामावून घेणं मराठी साहित्यिकांच्या आणि मासिकांच्याही हातात नाही. सगळाच काळ आता बदलला आहे हे आपण लक्षात ठेवावं. आता कुठलीही सांस्कृतिक चळवळ निर्माण होणार नाही. तशा अपेक्षाही बाळगूही नयेत. आपण शांत बसावं. धडपड करू नये. यात साहित्याचं काही नुकसान वगैरे होत नाही. साहित्य नावाच्या गोष्टीला पूर्वी जे महत्त्व होतं ते आता उरलं नाही. वेगवेगळ्या गोष्टी पुढे आल्या. मला वाटतं, हे उत्तम आहे. सगळं स्वीकारावं लागतं! अट्टाहास कशाला करायचा? हे बदल सगळ्याच जगात होत आहेत. तिथे कुठल्याच एकटय़ादुकटय़ा माणसाचा पाड लागणार नाही.’’
राम पटवर्धन असं बोलू शकतात यावर विश्वास बसणं जरा कठीण जातं. पण त्यामागचा त्यांचा विचार समजून घेतला की, त्यांच्या काळाच्या बरोबर राहण्याचं आणि भूतकाळाच्या समंधाला मानगुटीवर बसू न देण्याचं कौतुकही वाटतं. सध्या वयोमानानं पटवर्धनांना वाचन करणं शक्य होत नाही. तरीही पुस्तकांबद्दलची उत्सूकता त्यांना शांत बसू देत नाही. वाचता येत नसलं तरी ते पुस्तकांबद्दल जाणून घेतात. वर्तमानपत्रं वाचतात. त्यामुळे नेमाडय़ांची ‘हिंदू’ एवढे दोन शब्द उच्चारताच ते म्हणाले, ‘‘आता ‘हिंदू’ची बरीच चर्चा चालली आहे. मी त्याकडे वेगळ्या त-हेने बघतो. आपली संस्कृती केवढय़ा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याला नाव देण्यासाठी ‘हिंदू ’हा शब्द कशाला वापरायचा? ते ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ असं म्हणू शकले असते. मुळात भारतीय संस्कृती हे अजब मिश्रण आहे. नेमाडय़ांनाही शेवटी म्हणावं लागलं, ‘ही अडगळ आहे पण ती समृद्ध आहे. आणि समृद्ध असली तरी ती अडगळच आहे.’ मला हा खुळेपणा वाटतो. नेमाडय़ांनी ही मांडणी त्यांच्यापुरतीच ठेवावी.’’
भविष्यात साहित्याला काही स्थान असेल का? की नसेलच? असे प्रश्न हल्ली निर्माण होत असतात. त्याचं कुठल्याच प्रकारे चित्रं रंगवता येत नसल्याने काळजीत आणखीनच भर पडते. असेच प्रश्न पटवर्धनांना पडतात का, म्हणून विचारल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मोठं मजेशीर होतं. ते म्हणाले,‘‘या प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज काय? साहित्याला माणसाच्या आयुष्यात स्थान असलं पाहिजे आणि नसलंही पाहिजे. साहित्याबद्दल कसलाही विचार न करता अतिशय समृद्ध जीवन जगलेली पुष्कळ मंडळी आहेत. त्यामुळे साहित्यवादी मंडळींनी यांच्याकडे तुच्छतेने बघू नये आणि यांनीही त्यांच्याकडे तुच्छेतेने बघू नये. या जगामध्ये सगळ्यांना जागा आहे आणि सगळ्यांनी राहावं.’’ ही एवढी स्वागतशील वृत्ती पटवर्धनांमध्ये कुठून आली असावी? अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘माझा डावा डोळा सुरुवातीपासूनच दुबळा आहे. तो इतका की, मला कधी चष्माही लावता आला नाही. पण ते एका अर्थानं बरंच झालं. त्यामुळं जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन ओपन राहिला.’

Wednesday, July 28, 2010

‘हिंदू’च्या निमित्ताने...


समर्थक आणि विरोधक
सध्या सगळीकडे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ची जोरदार चर्चा होते आहे. नेमाडपंथी आणि नेमाडेंचे चाहते ही कादंबरी झपाटल्यासारखी वाचत आहेत, तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे नेमाडेंचे विरोधक या कादंबरीच्या माध्यमातून नेमाडेंवर शरसंधान करण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे ते अगदी सुक्ष्मदर्शकातून पाहावे तसे कादंबरीचे वाचन करत आहेत. मात्र त्यातल्या काहींच्या पदरी निराशा पडत आहे, कारण कादंबरी वाचून संपल्यावर तिला वाईट म्हणणे त्यांना शक्य होत नाहीये. तर तिसरीकडे ज्या वाचकांनी उत्सूकतेपोटी या कादंबरीची आगावू नोंदणी केली होती, ते मात्र आपली प्रत नेमाडय़ांच्या स्वाक्षरीसह मिळण्याची वाट पाहात आहेत. ‘हिंदू’विषयीची उत्सूकता मात्र सर्व थरांपर्यंत पोहचते आहे, ही फार चांगली आणि सुखद घटना म्हणावी लागेल.
पॉप्युलर प्रकाशनाने ‘हिंदू’ची पहिली आवृत्ती २५ हजार प्रतींची छापायची ठरवली होती, असं म्हणतात. पण त्यांच्या अपेक्षेनुसार तर ‘हिंदू’ची नोंदणी झाली नाहीच पण ती पाच हजाराचाही आकडा गाठू शकली नाही अशीही चर्चा आहे. मात्र मराठी साहित्याचा आजवरचा लौकिक आणि परिघ पाहता ही संख्याही काही कमी म्हणता येणार नाही.


नेमाडे आणि भैरप्पा
नेमाडे यांच्या ‘हिंदू’चे प्रकाशनाआधीच एकदा पुनर्मुद्रण करण्यात आले. १८ जुलैला ‘हिंदू’चे प्रकाशन झाले, त्याआधी किमान दोन महिने तिची आगावू नोंदणी चालू होती. प्रकाशनाच्या दिवशीही अनेक जण उत्साहाने ५०० रुपये खर्चून ‘हिंदू’ची प्रत विकत घेत होते. याच सुमारास म्हणजे २८ जुनला कर्नाटकात एस. एल. भैरप्पा यांच्या ‘कवलू’ या नव्या कादंबरीचे प्रकाशन झाले. तिचे प्रकाशनाआधीच दोनदा पुनर्मुद्रण करण्यात आले तर पुढच्या दहा दिवसात पाच वेळा पुनर्मुद्रण करण्यात आले. आतापर्यंत हा आकडा दुप्पट झाला नसला तरी दीडपट नक्कीच झाला असणार. भैरप्पा गेली चाळीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात त्यांनी वीसपेक्षा अधिक कादंब-या लिहिल्या आहेत. म्हणजे दोन वर्षाला एक कादंबरी. इथे नेमाडे आणि भैरप्पा अशी तुलना करायची नाही तर कन्नड वाचक आणि मराटी वाचक अशी तुलना अपेक्षित आहे.


नेमाडेंचे आयकॉनिक छायाचित्र
डॉ. भालचंद्र नेमाडे यांची मी ‘दै. प्रहार’साठी २२ जुनला मुलाखत घेतली. कांदिवलीच्या नेमाडे यांच्या घरी ही मुलाखत झाली. त्यासाठी आमचा दै. ‘प्रहार’चा सिनिअर फोटोग्राफर संदेश घोसाळकरला घेऊन गेलो होतो. नेमाडे यांच्या अभ्यासिकेत मुलाखत सुरू झाली आणि तसा संदेशचा कॅमेराही. मुलाखत जवळपास तासभर झाली. तोवर संदेशचा कॅमेरा चालूच होता. मुलाखत संपल्यावरही तो नेमाडे यांना हात वर करा, इकडे पाहा, तिकडे पाहा, असे उभे राहा, तसे उभे राहा अशा सुचनांबरहुकूम वागायला लावत होता. त्याचा तो बिनधास्त उद्योग पाहून मलाच मनातल्या मनात भीती वाटत होती, याच्या या सुचनांनी नेमाडे वैतागणार तर नाहीत ना. पण नेमाडे सर त्यांच्या झुपकेदार मिशांमुळे (आणि त्यांच्या तिखट बोलण्यामुळेही) उग्र आणि रागीट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते फारच साधे आणि प्रेमळ असल्याचा प्रत्यय आला.
असो. मुलाखत सुरू असताना नेमाडे यांचा बोलण्याचा ओघात संदेशने टिपलेला आणि आम्हा सर्वाना आवडलेला फोटो दै. ‘प्रहार’च्या ‘कोलाज’ (२७ जुन) पुरवणीच्या पहिल्या पानावर मुलाखतीसह छापला. या मुलाखतीची बरीच चर्चा झाली. अनेकांना आवडली. तसे फोन, एसएमएसही मला आले. विशेष म्हणजे नेमाडेंनाही आवडली.


पुढे १८ जुलैला ‘हिंदू’च्या प्रकाशनासाठी साडेचार वाजता मी रवीन्द्र नाटय़ मंदिरात गेलो, तर व्यासपीठावर संदेशने काढलेला आणि आम्ही ‘प्रहार’मध्ये छापलेला फोटो मोठय़ा आकारात बॅनरवर झळकत होता. दुस-या दिवशी या कार्यक्रमाची बातमी दै. ‘लोकमत’ने पहिल्या पानावर छापली. त्यासोबत जो फोटो छापला त्यात खुर्चीत बसलेले नेमाडे आणि त्यांच्या पाठीमागे हाच फोटो बॅनरवर झळकत होता. त्यानंतर समीक्षक शांता गोखले यांनी २२ जुलै रोजी ‘मुंबई मिरर’मध्ये ‘हिंदूज अँड हराप्पा’ हा लेख लिहिला. त्यातही हाच फोटो छापण्यात आला. संदेशच्या नावात थोडीशी चूक झाली पण त्याला क्रेडिट दिले गेले, पण त्यासाठीची पूर्वकल्पना मात्र संदेश आणि ‘प्रहार’ला देण्यात आली नव्हती. हे समजल्यावर स्वत: शांताबाईंनी दिलगिरी व्यक्त केली. प्रश्न तसा छोटाच होता. पण त्यातही शांताबरईनी स्वत: लक्ष घातले, हा त्यांचा मोठेपणा. असो.
तर सांगायचं असं की, नेमाडे यांचा संदेशने काढलेला हा फोटो असा आयकॉनिक होत चालला आहे.


सध्या मीही ‘हिंदू’ वाचतोय. आतापर्यंत शंभरेक पानं वाचली आहेत. लवकरच स्पीड वाढवून ती संपवण्याचा विचार आहे. तेव्हा तिच्यावर सविस्तर लिहिनच. तुर्तास एवढेच.

Monday, July 12, 2010

‘आवरणा’खालचे भैरप्पा समजून घेण्यासाठी


एस. एल. भैरप्पा हे गेली पंचवीस-तीस वर्षे कन्नडमधील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार मानले जातात. गेल्या चाळीस वर्षात भैरप्पा यांनी वीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांतील बऱ्याच कादंबऱ्यांचे हिंदी, मराठीसह इतरही भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. या कादंबऱ्यांचे सामान्य वाचकांनी मोठय़ा प्रमाणावर स्वागत केले तर जाणकारांनी त्यांच्यावर जोरदार टीका-टिप्पणीही केली. लेखन हाच धर्म मानणारे भैरप्पा मूलत: तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि प्राध्यापक आहेत. त्या विषयातील त्यांची चार पुस्तकेही प्रकाशित आहेत. तत्त्वज्ञान, इतिहास आणि समाजशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय. ‘केवळ गंभीर प्रकृतीची पुस्तकंच आपण विकत घ्यायला हवीत. हलकीफुलकी पुस्तकं कुणी फुकट दिली तरी ती वाचायला आपल्या आयुष्यात वेळ नाही’ अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे भैरप्पा कुठल्याही विषयावर कादंबरी लिहिताना त्या विषयाचा सांगोपांग अभ्यास-वाचन करतात. ‘पर्व’ ही बहुचर्चित कादंबरी लिहिण्याआधी ते तब्बल साडेसहा वर्षे केवळ महाभारतकालीन जीवनाविषयीच्या पुस्तकांचेच वाचन करत होते.
तर अशा या नामवंत कादंबरीकाराची ‘आवरण’ ही एकविसावी कादंबरी फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाल्यापासून चर्चेत आहे. कन्नडमध्ये तर तिने पुस्तकाच्या खपाचे आजवरचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत. (त्यात भैरप्पांच्या आधीच्या विक्रमाचाही समावेश आहे.) कन्नडमध्ये ही कादंबरी ५ फेब्रुवारी २००७ रोजी प्रकाशित झाली, १० फेब्रुवारी रोजी तिची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली; तर पुढच्या पाच महिन्यांत तिच्या एकंदर दहा आवृत्त्या प्रकाशित झाल्या. २००९ पर्यंत या कादंबरीच्या एकंदर बावीस आवृत्त्या प्रकाशित झाल्या. या कादंबरीचे कन्नड वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केले तर दुस-या बाजूला यू. आर. अनतंमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव अशा नामवंत कन्नड साहित्यिकांनी तिच्यावर भरपूर टीकाही केली. या कादंबरीवर कर्नाटकामध्ये एकंदर दहा चर्चासत्रे झाली. त्यांत वाचल्या गेलेल्या निबंधांची तेवढीच पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांतील सहा या कादंबरीच्या बाजूने आहेत, तर चार विरुद्ध.
‘आवरण’ म्हणजे विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारी माया! ‘सार्थ’नंतरची भैरप्पांची ऐतिहासिक विषयावरची ही दुसरी कादंबरी. ‘सार्थ’मध्ये भैरप्पांनी आठव्या शतकातील संधिकाळाचे वर्णन केले आहे तर ‘आवरण’मध्ये नंतरच्या म्हणजे मध्ययुगीन काळाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचा संबंध त्यांनी थेट वर्तमानकाळापर्यंत आणून भिडवला आहे. सुरुवातीच्या प्रास्ताविकपर निवेदनात भैरप्पांनी म्हटले आहे, ‘या कादंबरीतल्या विषयात माझं स्वत:चं असं काहीही नाही. यातला प्रत्येक तपशील आणि चलन यांचा आधार कादंबरी या साहित्य-प्रकाराला पेलवेल एवढय़ाच प्रमाणात देण्यात आला आहे.’
कादंबरीत त्यांनी काही ठिकाणी संदर्भग्रंथांची नावे दिली आहेत, आणि शेवटीही तब्बल १३६ संदर्भग्रथांची सूची दिली आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक विषयावरची कादंबरी असली तरी ती पूर्णपणे ऐतिहासिक कादंबरी नाही अन् चरित्रात्मकही नाही. किंबहुना भैरप्पांच्या आजवरच्या कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी अतिशय वेगळ्या आणि अभिनव स्वरूपाची आहे. ही कादंबरी एकाच वेळी वर्तमान आणि ऐतिहासिक अशा दोन पातळ्यांवर घडत जाते.
हम्पा, काशी येथील हिंदू देव-देवतांच्या मंदिरांचा विध्वंस मुस्लीम राज्यकर्त्यांनी केला, पण हे ऐतिहासिकसत्य निधर्मीवादी आणि डाव्या विचारसरणीच्या मंडळींनी कायम दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असून, हम्पीतील मंदिरांचा विध्वंस शैव-वैष्णवांनी केला असल्याचा निधर्मीवादी मंडळींचा दावा खोटा आहे आणि मुस्लीम राज्यकर्त्यांचा विशेषत: औरंगजेब बादशहाचा एकूण कारभार कसा रगेल आणि रंगेल होता, हे या कादंबरीचे मध्यवर्ती सूत्र आहे.
‘आवरण’ची नायिका लक्ष्मी उर्फ रझिया आपला नवरा अमीरसह हम्पीवर लघुपट निर्माण करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणाला भेट देते. तिथल्या मंदिरांचा विध्वंस पाहून लक्ष्मी निराश होते. मग लघुपटाचे काम सोडून ती हम्पीचा नाश नेमका कोणी केला याचा शोध घ्यायला लागते. त्याविषयी मान्यवर अभ्यासकांशी चर्चा करते, स्वत: पुस्तके मिळवून वाचते. सत्याच्या शोधाच्या या प्रवासात तिला तिच्या गांधीवादी वडिलांनी करून ठेवलेल्या टिपणांचा आणि जमवलेल्या संदर्भग्रंथांचा मोठा उपयोग होतो. त्या टिपणांच्या आधारे ती औरंगजेबाच्या काळातील सरदार-मनसबदार-जहागीरदार यांच्या जनानखान्यांविषयी एक छोटी कादंबरी लिहिते. लक्ष्मीची ती कादंबरी आणि सत्याच्या मार्गात काटे पेरणाऱ्यांविरुद्ध तिने दिलेला संघर्ष, असे ‘आवरण’चे थोडक्यात कथानक आहे. त्यामुळे भैरप्पांनी कुणा एका व्यक्तीला नाही तर निधर्मीवादाच्या नावाखाली सत्य दडपून ठेवणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाला खलनायक केले आहे. त्याचे प्रतीक म्हणून प्रा. शास्त्रींसारख्या निधर्मी,मार्क्‍सवादी विचारवंतांची त्यांनी निवड केली आहे. त्यात हे सर्व कादंबरीच्या माध्यमातून मांडायचे असल्याने भैरप्पा यांनी तशाच पद्धतीची पात्ररचना केली आहे. त्यामुळे त्यातल्या व्यक्तिरेखांचा विचार आणि व्यवहार यात टोकाचा अंतर्विरोध जाणवतो.
हा विरोधाभास प्रा. शास्त्री यांच्याबाबत तर फारच जाणवतो. इंटरनेटवर प्रकाशित झालेल्या काही प्रतिक्रियांमध्ये ही व्यक्तिरेखा यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावर बेतलेली आहे आणि त्यामुळे अनंतमूर्ती यांनी भैरप्पांवर सडकून टीका केली आहे, असा उल्लेख आहे. अर्थात, या आधीही भैरप्पांच्या दोन पुस्तकांवर अनंतमूर्तीनी टीका केली होती. ‘आवरण’विषयी अनंतमूर्ती म्हणतात,‘‘Bhyrappa does not know either Hindu religion or the art of story-telling. He is only a debater. He does not go beyond his opinions. He constructs opinions and end up as a bedater, rather than a creative writer.’’ ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी टिपू सुलतानला ‘राष्ट्रीय हिरो’ केले असले तरी तो प्रत्यक्षात तसा नव्हता, तर मुस्लीम राज्यकर्त्यांप्रमाणेच हिंसक आणि क्रूर होता, अशी मांडणी भैरप्पांनी केल्याने गिरीश कार्नाड यांनीही भैरप्पांच्या हेतूंविषयी शंका उपस्थित केली आहे. काही मान्यवरांनी मात्र या कादंबरीचे जोरदार समर्थन केले आहे. ‘हिडन टॉरिझन्स-१००० इअर्स ऑफ इंडियन सिव्हिलायजेशन’ या ग्रंथाचे सहलेखक एन. एस. राजाराम यांनी तर या कादंबरीची तुलना थेट डॅन ब्राऊनच्या ‘दा-विंची कोड’शी केली आहे. ‘स्वार्थी, पण प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोटय़ा इतिहासाचा प्रचार करणं, हे या दोन्ही कलाकृतींमधलं समान सूत्र’ असे राजाराम म्हणतात!
याशिवाय आणखी एक मतप्रवाह आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एस. एल. भैरप्पा हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे त्यांनी कितीही आटोकाट प्रयत्न केला तरी त्यांचा मनोदय या कादंबरीतून आपोआप उघड होतो. भैरप्पांच्या या विचारसरणीमुळे ‘आवरण’ला मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा भाजपाने कर्नाटकातील विदानसभेच्या निवडणुकीत करून घेतला आणि त्यामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली, असा या तिसऱ्या मतप्रवाहाचा कौल आहे.
भैरप्पा हे चलाख कादंबरीकार आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण आपल्या कादंबरीवर निधर्मीवादी मंडळी कोणते आक्षेप घेऊ शकतात, याची त्यांना चांगली जाणीव आहे. त्या आरोपांचा समाचार त्यांनी आधीच कादंबरीतून घेतला आणि तिच्या बचावाची सोय करून ठेवली. त्यामुळे कादंबरीवर कन्नडमधील नामवंत साहित्यिकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली, तेव्हा भैरप्पांनी त्यांची नायिका रझियाप्रमाणे कादंबरीच्या शेवटी दिलेल्या पुस्तकांच्या यादीकडे बोट दाखवले. ‘माझ्या कादंबरीवर बंदी आणायची असेल तर आधी या प्रत्येक पुस्तकावर बंदी आणावी लागेल. कारण मी सर्व या पुस्तकांतूनच घेतले आहे’ असा युक्तिवाद भैरप्पा यांनी केला. परंतु भैरप्पांची कादंबरी मात्र रझियाच्या कादंबरीप्रमाणे सरकारने जप्त केली नाही, त्यामुळे भैरप्पांची एका परीने सरशीच झाली. पण जरा बारकाईने पाहिले तर भैरप्पांनी कादंबरीच्या शेवटी दिलेल्या १३६ संदभग्रंथांपैकी किती पुस्तके खरोखरच वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेली आहेत आणि त्यांचे लेखक कोण आहेत?
प्रस्तुत लेखकाला माहीत असलेल्या नऊ-दहा हिंदुत्ववादी आणि अ‍ॅण्टी मुस्लीम लेखकांच्या ४०-५० पुस्तकांचा त्यात समावेश आहे. एन. एस. राजाराम यांची आठ, अरुण शौरी यांची दहा, सीताराम गोयल यांची सतरा, अन्वर शेख यांची दोन, स्वामी विवेवाकानंद यांचे समग्र वाडम्म््मय आणि इब्न बाराख, डेव्हिड फ्रॉले, व्ही. एस. नायपॉल, अरुण जेटली यांचे प्रत्येकी एक अशी या लेखकांच्या पुस्तकांची संख्या आहे. यातल्या काहींची विश्वासार्हता आधीच जगजाहीर असल्याने त्याबाबत वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. त्यामुळे भैरप्पांच्या यादीत वरवर देशी-विदेशी, हिंदू-मुस्लीम, प्राचीन-अर्वाचीन लेखकांच्या पुस्तकांचा समावेश दिसत असला तरी तिचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अ. का. प्रियोळकर, जदुनाथ सरकार, अल्बेरूनी, विल डय़ूरांट यांच्या पुस्तकांचा केवळ माहितीसाठी उपयोग आणि हिंदुत्ववादी लेखकांची पुस्तके सत्य म्हणून ग्राह्य धरण्याची क्लृप्ती भैरप्पांचा मनसुबा उघड करते.
‘सत्याकडून सोयीनुसार उचलेगिरी करून मी केवळ कला-निर्माता आहे, असे म्हणून जबाबदारी झटकणे साहित्यिकाच्या दृष्टीने योग्य नाही’ असे खुद्द भैरप्पांनीच प्रास्ताविकात म्हटले आहे. पण सोयीचे पुरावे निवडणे आणि मागचे-पुढचे संदर्भ वगळून तपशील देण्याचा प्रकार कुद्द भैरप्पांनीच केल्याने त्यांच्यासद्हेतूविषयी शंका आल्याशिवाय राहत नाही. प्रकाशनाआधी भैरप्पांनी ही कादंबरी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश एम. रामाजोईस, कट्टर गांधीवादी, थोर वकील हारनहळ्ळी रामस्वामी आणि प्रख्यात वकील अशोक हारनहळ्ळी यांना अभिप्रायार्थ वाचायला दिली, हा निव्वळ योगायोग मानता येत नाही.
मराठीतील ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांनी अवास्तव कल्पनारंजन आणि सत्यापलाप करण्याचे अपराध खूपच केले आहेत. त्यामुळे ‘ऐतिहासिक आणि चरित्रात्मक कादंबरी’ हा भ्रष्ट साहित्यप्रकार आहे अशी त्यांच्यावर अनेकदा टीकाही झाली, ती उचितही आहे. पण तरीही या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. सामान्य वाचकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, पण स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणाऱ्या मराठी साहित्यिकांनी त्यांच्या विरोधात (यू. आर. अनंतमूर्ती, गिरीश कार्नाड, चंद्रशेखर कंबार, जी. के. गोविंद राव यांच्यासारखी) स्पष्ट आणि सडेतोड भूमिका घेतल्याची फारसी उदाहरणे नाहीत. भैरप्पांची ‘आवरण’ याही अर्थाने एक वेगळी कादंबरी ठरते. तिच्यावर भरपूर टीका झाली पण बंदी घातली गेली नाही आणि त्यावरून सामाजिक वातावरणही कलुषित करण्याचा प्रयत्न झाला नाही, हे त्या समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण मानले पाहिजे. आणि पर्यायाने लोकशाहीच्याही! पण भैरप्पांसारख्या कादंबरीकारालाही आपल्या विचारसरणीच्या मायेने कसे वेढून घेतले आहे, हे समजून घेण्यासाठी तरी ‘आवरण’ वाचायलाच हवी! आता ती मराठीतही उपलब्ध झाली आहे. उमा कुलकर्णी यांनी तिचा नेहमीप्रमाणे चांगला अनुवाद केला आहे।
आवरण : एस. एल. भैरप्पा / अनु. उमा कुलकर्णी
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
किंमत : २५० रुपये