Wednesday, August 4, 2010

‘हिंदू’ -चर्चा,गप्पा आणि मतमतांतरे


सध्या मराठी वाचकांमध्ये एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे नेमाडय़ांच्या ‘हिंदू’ची। जो तो ‘हिंदू’ वाचतोय आणि रोज आपल्या मित्राला ‘माझी अमूक पानं आता वाचून झाली, तुझी किती पानं वाचून झालीत?’ मराठी वाचकांना चार भागातली कादंबरी वाचण्याचा सराव नाही. त्यात ‘हिंदू’चा पहिलाच भाग प्रकाशित झालाय. त्यामुळे या कादंबरीबद्दल जाम उत्सूकता आहे. ती अशीच चवथ्या भागापर्यंत टिकून राहिली तर मग ‘कोसला’, चांगदेव चतुष्टय आणि ‘हिंदू’ची तुलनात्मक चर्चा रंगणार असं विचारतोय.
पण सध्या मात्र पहिल्या भागाचीच चर्चा रंगतेय। काही हार्ड कोअर वाचकांनी मात्र सलग दोन-तीन दिवसांत कादंबरी वाचून संपवली आहे, तर काही मात्र थांबून थांबून वाचताहेत. ‘पुरवून पुरवून वाचन’ असा हा काहीसा प्रकार आहे. नेमाडय़ांचे हार्ड कोअर चाहते मात्र रोजची पानं वाचून झाल्यावर आपल्या मित्रांशी फार भारावून जाऊंन चर्चा करताहेत. आणि आपल्याला म्हणण्याला आता नेमाडय़ांच्या मांडणीचा आधार मिळालाय, या संतोषानं समाधान पावताहेत.
तर दुसरीकडे नेमाडय़ांनी ‘हिंदू’ ‘ज्ञानपीठ’ समोर ठेवून लिहिली आहे, ‘कोसला’ला साहित्य अकादेमी देता आले नाही म्हणून यू. आर. अनंतमूर्तीनी ‘टीकास्वयंवर’ला दिले. आता नेमाडय़ांचीही दिल्लीत वट वाढली असून ‘ज्ञानपीठ’ मिळवणं त्यांच्यासाठी काही कठीण काम नाही. ‘हिंदू’ लिहून त्यांनी त्याची सोय करून ठेवली आहे, असंही बोललं जात आहे.
तिसरीकडे ‘हिंदू’ची रचना एवढी मोठी करून नेमाडय़ांनी मराठी वाचकांची मोठी गोची करून ठेवली आहे. कारण या कादंबरीचे चारही भाग प्रकाशित होईपर्यंत त्याविषयी ठोसपणे भाष्य करता येणार नाही, विश्लेषणही करता येत नाही. त्यामुळे चवथा भाग येईपर्यंत थांबणं भाग आहे. आणि नेमाडय़ांच्या अलीकडच्या मुलाखती पाहता ते ही कादंबरी पूर्ण करतील असं वाटत नाही. चौथा भाग लिहायला त्यांनी आणखी २०-२५ वर्षे घेतली तर काय घ्या? आपण त्यांच्यावर दबावही आणू शकत नाही. एकंदर नेमाडय़ांनी त्यांच्या चाहत्यांना टांगणीवर ठेवलं आहे आणि त्यांच्या विरोधकांची सॉलिड गोची करून ठेवली आहे, अशीही चर्चा रंगत आहे.
चौथा जो वर्ग आहे, त्याचं म्हणणं आहे की, नेमाडय़ांनी ‘हिंदू’च्या पहिल्या भागात जी ऐतिहासिक दृष्टीने अनेक विधाने केली आहेत, त्यांचे पुरावे कादंबरीत कुठे दिले नाहीत. कादंबरीत पुरावे, संदर्भ देणं शक्य नसतं हे खरं पण त्यांचा आधार तर त्यांना स्पष्ट करता आला असता. तेही त्यांनी कुठं केलं नाही, तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? नेमाडे सतत काहीतरी तिरपागडं बघत संभ्रमात टाकणारी विधानं करत असतात. तसाच प्रयत्न त्यांनी या कादंबरीतही केला आहे. शिवाय पुरावे मागणाऱ्यांना ‘माझ्या वर्गात तासाला येऊन बसा म्हणजे स्पष्टीकरण देतो’, असं तिरपागडं उत्तर देतात. आता त्यांचा हा वर्ग भरतो कुठं आणि त्यात ते शिकवतात काय, हे पाहत बसण्याएवढा वेळ कुणाकडे आहे?
पाचवा वर्ग मात्र ‘हिंदू’चं वाचन झपाटय़ाने संपवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी मोठी आशा आहे की, ‘हिंदू’त अनेक गडबडी असणार आणि आपल्याला त्या आधारे नेमाडय़ांवर शरसंधान करता येईल. त्यामुळे ते अगदी बाह्या सावरून कादंबरी वाचताहेत.
तर एकंदर मराठी साहित्यातलं वातावरण असं ‘हिंदू’मय झालेलं आहे.

No comments:

Post a Comment