Sunday, December 25, 2011

दुबे द कॅटलिस्ट

दुबेंचा जन्म मध्य प्रदेशातील बिलासपूरचा. तिथल्या म्युनिसिपल शाळेत त्यांचं शिक्षण झालं. ते पाच वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. मग वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. तिथं ते अँग्लो-इंडियन कुटुंबात राहिले. पण काही दिवसांनी परत बिलासपूरला गेले. तिथे शाळेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याशी ते जोडले गेले. वयाच्या बावीसाव्या वर्षी इंटर झालं आणि दुबेंनी मुंबईला प्रस्थान ठेवलं. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं! झेविअर्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये त्यांची निवडही झाली. याच कॉलेजात दुबेंना विजय आनंद भेटला आणि दुबे नावाच्या स्कूलची पावलं नाटकाच्या दिशेनं पडायला लागली. विजय आनंदनं त्यांना स्वत:बरोबर न्यायला सुरुवात केली. बदली नट म्हणून कामंही मिळू लागली. मुंबईत तेव्हा भांगवाडीमध्ये गुजराती नाटकांची चळवळ मोठय़ा जोमात होती. तिथेही दुबे जायला लागले. तिथेच त्यांना पार्श्वनाथ आळतेकर भेटले. ते दुबेंचे नाटय़क्षेत्रातले पहिले गुरू. दुबेंचा तोतरेपणा आळतेकरांनी घालवला. एक दिवस विजय आनंद दुबेंना थिएटर युनिटमध्ये घेऊन गेले. तिथं तेव्हा इब्राहीम अल्काझी आणि पी. डी. शेणॉय हे दोन स्टॉलवर्ट होते. दुबेंनी अल्काझींकडून नाटकाच्या कोरिओग्राफीचे धडे गिरवले.
 
नाटकाच्या अक्षांश-रेखांशमध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे, आणि त्याच्या जेवढय़ा म्हणून शक्यता आहेत, त्या पणाला लावून पाहणारा दुबे हा दिग्दर्शक होता. मग ते सात्र्चं नो एक्झिटअसेल, धर्मवीर भारतींचं अंधायुगअसेल, बादल सरकारांचं वल्लभपूरची दंतकथा’, महेश एलकुंचवारांचं गाबरे’, ज्याँ अनुईचं अँटिगनी’, मोहन राकेश यांचं आधे अधुरेअसेल किंवा विजय तेंडुलकरांचं खामोश! अदालत जारी है’.. दुबेंनी केलेल्या प्रत्येक नाटकात हे दिसेल. श्याम मनोहर हे कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार. त्यांची नाटककार अशी ओळख दुबेंमुळेच झाली. दुबे साहित्य सहवासमध्ये राहत. एकदा त्यांची कवी दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. चित्रेंनी त्यांना मनोहरांचं नाटक सुचवलं. पण ते वाचल्यावर दुबे म्हणाले, ‘कशासाठी करायचं मी हे?’ चित्रेही तेवढेच खटनट. ते दुबेंना म्हणाले, ‘यू स्टार्ट फ्रॉम एंड.चित्र्यांच्या नावावर एवढा एकच विध्वंस जमा असला तरी दुबेंच्या नावे मात्र असे कैक विध्वंस जमा आहेत. नाटककाराच्या नाटकाची वासलात कशी लावायची हे दुबे पूरेपूर जाणत आणि आपल्या पद्धतीने ते त्याची स्टार्ट फ्रॉम दि एंडकिंवा स्टार्ट फ्रॉम इन बिट्वीनअशी कशीही मांडणी करू शकत, नव्हे करतच. त्यासाठी नाटककाराशी भांडत. वर सांगत, ‘नाटककाराचं नाटक त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं.आणि दुबेंचं हे म्हणणं खरंच होतं. नाटकाचा प्रयोगाच्या दृष्टीनं विचार दुबे ज्या शक्यतांनिशी करत, तो तेच करू जाणोत! याबाबतीत (तेंडुलकरांनंतर) ते कमालीचे वाकबगार होते.
 
दुबे हा माणूस स्टॉलवर्ट होता. त्यामुळे त्यांनी नाटकंही स्टॉलवर्ट लोकांचीच केली. धर्मवीर भारती, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार हे त्यांचे नाटककार; तर डॉ. श्रीराम लागू, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, विहंग नायक, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी हे त्यांचे नट. पण दुबे विशी-पंचविशीतल्या मुला-मुलींबरोबरही तेवढय़ाच तन्मयेतनं नाटक करत. तरुणांचा त्यांच्या भोवती कायम गराडा असे, विशेषत: मुलींचा.
 
गिधाडेया विजय तेंडुलकरांच्या नाटकानं एकेकाळी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली होती. सेन्सॉर बोर्डानं या नाटकातल्या गर्भपाताच्या लाल डागावर आणि अन्यकाही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर डॉ. लागूंपासून नाटय़क्षेत्रातल्या संबंधितांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आघाडी उघडली होती. तेव्हा दुबेंनी डॉ. लागूंना सुचवलं की, नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना सूचना करायची - आम्ही निळा डाग दाखवतो आहोत. तो लाल आहे असं प्रेक्षकांनी समजावं.त्यानुसार डॉ. लागूंनी ती सूचना देऊन नाटकाचे प्रयोग केले. कायद्याची लढाई कायद्यानंच लढली पाहिजे, पण ती लढतानाही आपल्या विरोधकांना सभ्यपणानं कसं हास्यास्पद ठरवता येतं, याचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार!
 
दुबे हे तीन अंकी गुरुकुल आहे’, ‘दुबे हा स्कूल ऑफ थॉट आहे’, ‘दुबे इज अ‍ॅन इन्स्टिटय़ूशनअसं काहीही म्हणण्यात अर्थ नाही. कारण दुबे आता आपल्यात नसले तरी ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला मूर्खात काढणार. कारण संस्था वा संस्थान म्हटलं की, फॅसिझमला सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं होतं. दुबे आक्रमकपणे, चढेलपणे आणि कधी कधी विक्षिप्तपणे वागत असले तरी ते पूर्णपणे लोकशाहीवादी होते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. यावर त्यांच्या मित्रांचं, शिष्यांचं, समकालीनांचं आणि  शत्रूंचंही एकमत होईल.
 
दुबेंनी हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी अशा चारही भाषांमध्ये नाटकांचं दिग्दर्शन केलं. अनेक नाटकांचे इंग्रजीतून अनुवाद केले. त्यांचे प्रयोग केले. चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि नाटकांमध्येही काम केलं. याचवर्षी नाटय़समीक्षक शांता गोखले यांनी सत्यदेव दुबे : अ फिप्टी इअर जर्नी थ्रु थिएटरहे दुबेंवरील पुस्तक संपादित केलं आहे. त्यात प्रत्येक दशकानुसार विभाग करून दिग्दर्शक, अभिनेता, नाटय़शिक्षक, नाटककार अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणा-या दुबेंचा सर्वागीण आणि तपशीलवार आढावा घेतला आहे. साठच्या दशकात दुबेंच्या नाटय़कारकिर्दीला सुरुवात झाली. साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी, बंगाली, कन्नड आणि मराठी रंगभूमीवर दुबेंनी उलथापालथ घडवली. दिग्दर्शक म्हणून नाटकाचा अतिशय सखोलपणे विचार करण्याची आणि नाटककाराच्याही लक्षात येणार नाहीत अशा संहितेतील अनेक शक्यता आजमावून पाहण्याची दृष्टी दुबेंकडे होती.
 
दुबेंनी मराठी नाटकातली अध्र्यापेक्षा जास्त माणसं घडवली. नाटय़लेखन कार्यशाळा/नाटय़शिबिरं घेऊन अनेक तरुण रंगकर्मीना घडवलं. त्यांच्या कारकिर्दीला दिशा दिली. त्यांच्यामध्ये रंगभूमीकडे आणि अभिनयाकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी रुजवली. सतत नवे नवे प्रयोग करून पाहिले. नाटककारांना स्फूर्ती दिली. त्यांच्यातील सामर्थ्ये त्यांनाच उलगडून दाखवली. म्हणून नाटकानं झपाटलेल्या दुबेंचं वर्णन एकाच शब्दात करायला हवं. ते म्हणजे, दुबे द कॅटलिस्ट. गेल्या पाच दशकांमध्ये भारतीय रंगभूमीवर जी काही उलथापालथ घडवून आली, जे काही प्रयोग झाले, जे काही तरुण नाटककार, तरुण नाटय़कर्मी पुढे आले, त्यातल्या बहुतेकांचे दुबे हे कॅटलिस्ट होते, उत्प्रेरक होते. विज्ञानात समीकरणं घडून यायला कॅटलिस्ट लागतो, तो नसेल तर ते घडून येत नाही. भारतीय रंगभूमीवर तीच भूमिका पं. सत्यदेव दुबे यांनी निभावली आहे.

ग्रेस यांच्याकडे कसे पहावे?

सतरा डिसेंबरची संध्याकाळ नागपूरकरांसाठी एक ग्रेसफुल संध्याकाळ होती. नाटककार महेश एलकुंचवार आणि कविवर्य ग्रेस या नागपूरकरांच्या दोन्ही आवडत्या व्यक्ती एकाच व्यासपीठावर होत्या. थेट समोरासमोर. निमित्त होते, ग्रेस यांच्या विदर्भ भूषण पुरस्काराचं. त्यामुळे एलकुंचवार ग्रेस यांच्याविषयी काय बोलतात याची सर्वाना उत्सूकता होती. आणि आपल्या बोलण्यावर ग्रेस यांची काय प्रतिक्रिया येईल, याचा अदमास स्वत: एलकुंचवारही घेत असावेत. कारण हे दोन्ही सारस्वत नागपुरात राहत असले, दोघेही नागपूरकरांचे लाडके असले तरी या दोघांमध्ये काहीसं शीतयुद्ध आहे असे बोलले जाते. त्यात हे दोघंही तसे कधी काय बोलतील आणि त्यांचं कधी बिनसेल याचा भरवसा नसलेले साहित्यिक. त्यात एलकुंचवारांनी ग्रेसविषयी बोलायचं आणि त्याला प्रत्यक्ष ग्रेस हजर असणार!

एलकुंचवारांचं त्यादिवशीचं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना क्षणभर नक्कीच त्यांची तारीफ केली असेल. ग्रेस यांच्या कवितेविषयी आणि त्यांच्या ललितलेखनाविषयी फारसं काही भाष्य न करता एलकुंचवारांनी ग्रेस यांच्याकडे कसं पाहावं यावरच जास्त बोलणं पसंत केलं. ते म्हणाले, ‘‘ग्रेस यांच्या कवितेत खोल-अतिखोल दु:ख आहे. मात्र या तात्कालिक, व्यावहारिक दु:खाबद्दल ग्रेस बोलत नाहीत. ते बोलतात अनाम आणि मानवजातीच्या अथांग दु:खाबद्दल. ग्रेस ही मराठी साहित्यातील एक अलौकिक घटना आहे. त्यांची कविता अनुकरणीय नाही. म्हणूनच सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे. ज्याला अस्वस्थ होता येत नाही, त्याने ग्रेस यांची कविता वाचू नये.’’
 
यात थोडी हुशारी आहे, थोडं शहाणपणही आहे आणि थोडं सत्यही आहे. खरं तर एलकुंचवार यांनी काहीच नवीन सांगितलेलं नाही. पण त्यांनी ‘सामर्थ्य असेल तर त्यांची कविता पचवावी अन्यथा त्यांच्या कवितेला शरण जावे’ असं जे म्हटले आहे, ते मात्र नक्कीच विचारणीय आहे. जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ नित्शे यांनी म्हटलं आहे, ‘‘चांगली पुस्तकं वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत,’’ तर दुसरे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ थोरो यांनी म्हटलं आहे, ‘‘ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने लिहिले जातात, तितक्याच हेतुपुरस्सरतेने आणि संयमाने ते वाचले गेले पाहिजेत ’’ नित्शे आणि थोरो यांच्या विधानांचा उत्तरार्थ जवळपास सारखाच आहे. चांगल्या पुस्तक वाचण्याच्या या पूर्वअटीच असतात. ते संयमानं आणि त्यामागचा हेतू जाणून घेऊनच वाचायला हवं आणि वाचून झाल्यावर लेखकाबरोबरचे मतभेदही शोधायला हवेत. पण हे होणार कधी? जर संबंधित विषयात आपलीही लेखकाएवढीच मातब्बरी असेल तर...

 मराठीतलं यच्चयावत समीक्षालेखन पहा. प्रत्येकाचा वकुब त्यात ठसठशीतपणे ठळक होत राहतो. प्रत्येकाची गृहितकं वेगळी आणि अभ्यासही तुटपुंजा. शिवाय स्वत:ची मतं कोणत्याही पूर्वग्रहानं दूषित न होऊ देण्याएवढंही शहाणपण अनेकांकडे नाही. त्यामुळे त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या पूर्वग्रहांची प्रतिबिंबं डोकावत राहतात.
 
मुळात ग्रेस हे मराठीतले एक अलौकिक प्रतिभेचे कवी आणि ललित लेखक आहेत. त्यांच्यावर दुबरेधतेचा शिक्का तर अनेकवार मारून झाला आहे. ग्रेस यांचं लेखन आपल्या आवाक्यात येत नाही आणि ते आपल्याला समजलंच पाहिजे तोवर माघार नाही, असं कुणी इरेलाही पडत नाही, त्यामुळे ग्रेसची पुरेशी व्यवस्थित समीक्षाच झालेली नाही. यथायोग्य समीक्षा ही तर दूरची गोष्ट झाली. ग्रेस आत्मलुब्ध कवी आहेत, गूढवादी आहेत, सौंदर्यवादी आहेत, अशा विशेषणांपलीकडे जाण्याची गरज कोणाला वाटत नाही. तर दुसरीकडे ग्रेस यांना स्वत:बद्दलच अनिवार प्रेम आणि इतरांच्या प्रतिक्रियेबद्दल बेदरकार कोरडेपणा असल्यामुळे ते त्याची पर्वाही करत नाहीत. ‘आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय’ असा त्यांचा बाणा असावा बहुतेक!
 
..तर असा हा तिढा आहे. तो सोडवायचा कसा?  काही लोक पारलौकिक सुखाच्या गोष्टी करत असतात, तसे ग्रेस पारलौकिक दु:खाच्या गोष्टी करतात. शिवाय त्यांची प्रतिमासृष्टी गहनगूढाच्या पातळीवर जाते. त्यांच्या प्रतिमा तरल आणि उत्कट नसतात, त्या जाणिवेच्या तीव्रतर पातळीवर जाणाऱ्या असतात. ज्यांची आपण कल्पनाही केलेली नसते, त्या विश्वाच्या अद्भुततेवर ग्रेस जातात. तिथपर्यंत जाणं वाचकाला शक्य होत नाही आणि वाचकाचा हात धरून त्याला आपल्या कवितेच्या गाभ्याबरोबर नाही, पण निदान कवितेबरोबर तरी न्यावं याकडे ग्रेस कधी लक्ष देत नाहीत. तरीही ग्रेस यांच्याभोवती एक आकर्षणाचं आणि आदराचं वलय आहेच. एखाद्या अनोळखी साधुपुरुषाबद्दल असावं तसं! ग्रेस हे संध्यामग्न कवी-ललित लेखक आहेत. त्याची लक्षणं समजून घेतल्याशिवाय त्यांना समजून घेता येणार नाही, ते समजणारही नाहीत.
 
काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव म्हणाले होते, ‘उत्तम कलाकृती वाचताना तिला शरण गेलं पाहिजे.’ म्हणजे नित्शे, थोरो, जाधव आणि एलकुंचवार या चौघांच्या विधानाचा लसाविमसावि साधारणपणे सारखाच आहे. ही कसोटी ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखांना लावून पाहिली तर काय होईल? मुळात ती लावता येईल का? ग्रेस यांची पुस्तके उत्तम कलाकृती वा चांगली पुस्तकं म्हणावीत काय? असे प्रश्नोपनिषद सुरू होईल. पण हा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवून हीच कसोटी लावून ग्रेस समजून घ्यायचा प्रयत्न केला तर काहीतरी सूत्र नक्कीच हाती लागण्याची दाट शक्यता आहे.
 
शिवाय ग्रेस यांच्या कविता आणि ललितलेखनाची भाषा पाहिली की, कुणीही जाणकार वाचक थक्क होत असणार. हे भाषा वैभव मराठीचंच आहे का, असा प्रश्न त्याला पडत असणार. भाषेच्या अक्षांक्ष-रेखांक्षच्या क्षितिजात जे जे काही होऊ शकते, त्या सा-या शक्यता ग्रेस यांच्या लेखनात पणाला लागलेल्या दिसतात. दिग्दर्शक म्हणून पं. सत्यदेव दुबे आणि कादंबरीकार म्हणून श्याम मनोहर हाच प्रयोग कमी-अधिक फरकाने अनेक र्वष करत आले आहेत. त्याअनुषंगानंही ग्रेस यांच्या लेखनाकडे पाहायला हवं.

 ग्रेस यांना उशिरा का होईना, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्तानं तरी ग्रेस यांच्याबद्दल अब्रुदार, समंजस आणि पूर्वग्रहांपलीकडे जाऊन विचार करायला हवा.

Thursday, December 22, 2011

त्या नांव ग्रंथ

वर्षाची अखेर आणि नववर्षारंभ हा काळ साहित्यक्षेत्रातील चैतन्याचा असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड, साहित्य अकादमीचे पुरस्कार, दमाणी पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार, 26 जानेवारी रोजी जाहीर होणारे पद्मसन्मान मागेपुढे जाहीर होतात. साहित्य अकादमीचे पुरस्कार तर 24 भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये 20 भाषांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आठ पुरस्कार कवितासंग्रहांना, सात कादंब-यांना, तीन निबंधांना, एक कथासंग्रहाला, एक इतिहासाला, एक नाटकाला आणि एक आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. म्हणजे, सर्जनशील लेखनाचाच पुरस्कारांसाठी प्रामुख्याने विचार केला गेला आहे. निवड समितीच्या सदस्यांमध्ये प्रामुख्याने सर्जनशील लेखकच असतात, हे याचे कारण असावे. त्यामुळेच यंदा रामचंद्र गुहा यांच्या इंडिया आफ्टर गांधीया इतिहासलेखनाला मिळालेला पुरस्कार सर्वार्थाने वेगळा ठरतो. भारतीय भाषांमध्ये वैचारिक लेखन होतच नसावे किंवा होत असेल तर ते पुरस्काराच्या गुणवत्तेचे नसावे! मराठीमध्ये तर गेली काही वर्षे वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद-समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन. म्हणजे भूतकाळाचंच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी, आजच्या समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठी आणि भारतीय भाषांमध्ये लिहिली जात नाहीत. एखाद्या पुस्तकाला वा लेखकाला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थच असा असतो की, ते पुस्तक, तो लेखक  आणि त्याचा विचार आजच्या समाजासाठी उपयोगाचा आहे. इतकी साधी अपेक्षाही राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्कारांमधूनही पूर्ण होताना दिसत नाही. आज कधी नव्हे इतकी वैचारिक मंथनाची-घुसळणीची भारतीय समाजाला नितांत गरज आहे. कारण, त्यातूनच समाजाला आपल्यापुढील आणि देशापुढील आव्हानांना समजून घेता येते. त्यांचा योग्य अन्वयार्थ लावता येतो. सामाजिक उत्तरदायित्वासाठी भूतकाळाचा डिंडिम वाजवून निभत नाही. त्यासाठी वर्तमानाची पालखी उचलावी लागते. ही जबाबदारी सुशिक्षित आणि बुद्धिवादी वर्गावरच असते. हा वर्ग सर्वकाळ संख्येने छोटाच असतो. त्याला उद्देशूनच तर कविवर्य केशवसुतांनी म्हटले आहे की, ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणीत तयात खोदा, निजनामे वरीती नोंदा’. आणि केशवसुतांच्याही कितीतरी आधी समर्थ रामदासांनी म्हणून ठेवले आहे, जेणें धारिष्ट चढे, जेणें परोपकार घडे, जेणें विषयवासना मोडे, त्या नांव ग्रंथ’.

Monday, December 12, 2011

प्रसन्न खुमासदारी!

जगातली कुठलीही कला रीतसर शिकता येते, तिचे प्रशिक्षण घेता येते. पण त्यात वाखाणण्याजोगी प्रगती करता येईल की नाही याबाबत कुणीच ठामपणे काही सांगू शकत नाही. मिरांडा आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी आर. के. लक्ष्मण यांनी जे.जे.चीच काय पण कुठल्याच चित्रकलावर्गाची शिकवणी लावली नव्हती. पण तरीही त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून जो लौकिक मिळाला तो अपूर्व असाच आहे. मिरांडा हे तर प्रसन्नतेचे आणि खुमासदारपणाचे स्वामी होते. त्यांनी भारतीय चित्रांच्या शैलीमध्ये बदल घडवून आणला, चित्रे आणि व्यंगचित्रे या दोन्हींमध्ये.
मिरांडांची कुठलीही चित्रे घ्या. त्यातून ते काही सांगू पाहत आहेत, सुचवू पाहत आहेत असे फारसे दिसत नाही; तर जे जसे आहे ते तसे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या चित्रातली झाडे असोत की, माणसे, इमारती असोत की वाहने, सर्व काही तपशीलानिशी, त्याच्या रंगरूपासह असते. त्यामुळे त्यांची चित्रे पाहणा-याला स्वत:कडे आकर्षून घेतात. प्रत्यक्ष त्या ठिकाणाचे दर्शन तर घडवतातच पण आपणही त्याच ठिकाणी आहोत असा फीलदेतात. अशी प्रसन्नता चित्रांत असण्यासाठी तुमचे आयुष्यही तसेच प्रसन्न असावे लागते. चला, आता आपण रस्त्यावरच्या भिका-यावर छान/वाचणा-यांचं मन हेलावून टाकणारी कविता लिहूअसे ठरवून लिहिता येत नाही, तसेच तशी चित्रेही काढता येत नाहीत. 
मिरांडा यांच्या चित्रांनी, त्यांच्या मिस्टर बंडलदास, निंबूपानी, मिस फॉन्सेका या पात्रांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती, ती त्यांच्या अंगभूत वैशिष्टय़ांमुळे. ती स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे होती. पण मिरांडांनी इतरांची सदरे, पुस्तके यांनाही प्रसन्न आणि खुमासदार करण्याचे काम केले आहे. राउण्ड अँड अबाउटया बिझी बीउर्फ बेहराम काँन्ट्रॅक्टर यांच्या वाचकप्रिय सदरासाठी मिरांडा यांनी बरीच वर्षं चित्रे काढली. विथ मॅलिस अँड टुवर्डस वन अँड ऑलया जवळपास सतरा भारतीय भाषांमध्ये सिंडिकेट होणा-या खुशवंतसिंग यांच्या सदराचं-विजेच्या दिव्यातील सरदार-हे बोधचिन्हही मिराडांनीच काढले होते. अलीकडेच हे सदर खुशवंतसिंग यांनी बंद केले, तेव्हा विजेच्या दिव्यातला सरदारआता भेटणार नाही या कल्पनेने अनेकांना चुकल्याचुकल्यासारखे झाले. ही मिरांडांच्या चित्राला मिळालेली मोठीच दाद मानायला हवी. 
मिरांडा मुंबईत असताना कुलाब्याला राहायचे. या त्यांच्या घरात पत्नीसह-मुलांसह कुत्रा, मांजर, कोंबडे, खार, चार कासवे आणि एक डुक्कर इतके लोक राहायचे. असा चित्रकार जगण्यावर आणि स्वत:च्या कलेवर उत्कटपणे प्रेम करणारा असणारच यात काही शंका नाही. कदाचित त्यामुळेच जगभर फिरलेले, जगभरातल्या तब्बल 22 देशांमध्ये स्वत:च्या चित्रांची प्रदर्शने भरवलेले मिरांडा स्वत:ला आय अ‍ॅम अ मेनली सोशल कार्टुनिस्टअसं म्हणवून घेत असत.

Sunday, December 11, 2011

तुम तो मेरे बच्चे हों

गोष्ट असेल 2003 ची. पदवी परीक्षा पास होऊन वर्षे झाले होते. एका साहित्यिक मासिकात काम करत होतो. मराठी पुस्तकं, वाङ्मयीन मासिकं यांचं वाचन करण्याचा झपाटा लावला होता. त्यात पुण्यात रोज कुठे ना कुठे काही तरी सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रम होत असायचे. पुणे शहराचा सांस्कृतिक परीघ टिळक स्मारक मंदिर, भरत नाटय़ मंदिर आणि बालगंधर्व रंगमंदिर या वर्तुळात संपत असल्याने मजा होती. त्यामुळे रोज एक तरी कार्यक्रमाला जाण्याची आणि साहित्य-कला-संस्कृती या क्षेत्रातल्या एका तरी नव्या माणसाला भेटायची, त्यांच्याशी बोलायची संधी मिळत होती. त्यातल्या बहुतेकांची पुस्तके आधीच वाचलेली असत, काहींच्या मुलाखती वाचलेल्या असत, काहींबद्दल ऐकलेलं असे. त्यामुळे त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं संवाद करता यायचा. शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्याभोवती इतकी गर्दी असायची की, जास्त वेळही मिळायचा नाही. असे एकंदर बरे दिवस चाललेले होते.
 
माझा रूम पार्टनर एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. हे हॉटेल विजयानगर कॉलनीतल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या अपार्टमेंटच्या शेजारीच होते. त्यामुळे काही वेळा त्यांच्याकडे येणारे पाहुणे या हॉटेलमध्ये उतरत असत. एके दिवशी पार्टनर म्हणाला की, आमच्या हॉटेलमध्ये पद्मा सचदेव नावाच्या कश्मिरी लेखिका उतरल्या आहेत. त्यांचे नाव ऐकल्याबरोबर माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. त्यांना मंगेशकर कुटुंबीयांच्या वतीने दिला जाणारा वाङ्विलासिनी पुरस्कार मिळाल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचली होती. त्याआधीच्या आठवडय़ात साप्ताहिक लोकप्रभामध्ये निरंजन उजगरे यांनी सचदेव यांच्या एका कवितेचा मराठी अनुवाद केला होता. त्यात त्यांचा अल्पपरिचयही दिला होता. तेवढय़ावरून त्यांना भेटायची इच्छा निर्माण झाली. सचदेव मूळच्या काश्मीरच्या असल्या तरी हल्ली त्या दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे दिल्लीतल्या साहित्यिक वर्तुळाबद्दल माहिती कळेल असाही होरा होता. पण दुसरं मन सांगत होतं की, आपल्यासारख्या पोराला त्या एवढय़ा लेखिका कशाला भेटतील? आणि आपण काय बोलणार त्यांच्याशी? पण तरीही पार्टनरला म्हणालो, ‘मला त्यांना भेटता येईल का?’ तो म्हणाला, त्यांना विचारून सांगतो. पण मला काही खात्री नव्हती. पण दुस-या दिवशी पार्टनरचा फोन आला की, ‘अध्र्या तासात हॉटेलला ये. पद्माजी तुझी वाट पाहात आहेत.मी रेकॉर्डर घेऊन धावतपळत हॉटेलला गेलो. पार्टनर त्यांच्या खोलात गेऊन गेला. त्यांनी आमचं आनंदानं स्वागत केलं.
 
मला पाहून म्हणाल्या, ‘‘आप तो बडे नौजवान हो, दोस्त.
 
मी म्हणालो, ‘‘हां, अभी डिग्री पुरी की है और एक लिटररी मॅगझिन में काम कर रहा हूँ.’’
 
‘‘बडीं अच्छी बात है. लेकिन कुछ पढते हो या नहीं?’’
 मी म्हणालो, ‘‘पढते तो है. आपके कुछ आर्टिकल हमने साहित्य अकादेमी के समकालीन भारतीय साहित्यमें पढे है. कुछ कविताएँ भी पढी है.’’
यावर त्या खुलल्या. आणि सांगायला लागल्या की, मी मुंबई आकाशवाणीवर काम करत होते. त्यावेळी मराठीमध्ये प्रतिमा आणि प्रतिभाकार्यक्रम दूरदर्शनवर सादर होत असे. तो मी हिंदीमध्ये करत असते. धर्मयुगच्या धर्मवीर भारतींनी मला कसं कवितेकडून गद्य लिखाणाकडे वळवलं, इस्मत(चुगताई)आपाशी कसा संबंध आला, शांता शेळकेंशी कशी मैत्री झाली, मंगेशकर कुटुंबीयांबरोबरचे संबंध कसे जुळले, असं त्या बोलत राहिल्या. मी ते सारं रेकॉर्ड करत होतो.
 
अर्धा-पाऊण तास आमची प्रश्नोत्तरे चालली. पण मग आमच्याकडचे प्रश्न संपले. मात्र त्यांचा आमच्यासाठीचा वेळ संपलेला नव्हता. त्या म्हणायच्या, और पुछो. पण काय विचारणार आमच्याकडचे प्रश्न विचारून झाले होते. बरे त्यांच्या बोलण्यातून नवेनवे प्रश्न शोधून ते विचारण्याएवढी अक्कल तेव्हा नव्हती.
 
मी म्हणालो, ‘‘पद्माजी, आप की कौन कौन सी किताबें आई है?’’ उनके बारे में बताइयें. त्यांनी सांगितलं.
 
मग मी म्हणालो, ‘‘आपको कौन कौन से अ‍ॅवार्ड मिले है?’’ त्यांनी तेही सांगितलं.
 
थोडय़ा वेळाने त्यांच्या लक्षात आलं की, आम्हाला हिंदी आणि भारतीय साहित्यविश्वाची फारशी माहिती नाही. त्यातलं फारसं काही आम्ही वाचलेलं नाही.
 
पण पद्माजींचं मोठेपण असं की, त्यांनी मग आणखी तपशीलवार आणि खुलासेवार माहिती सांगायला सुरुवात केली. माझे एक शिक्षक सांगायचे की, पेपर कसा लिहायचा? तर तो तपासणा-याला त्या विषयातलं काहीही कळत नाही. तेव्हा त्याला नुसतं उत्तर वाचून तो विषय कळेल इतक्या सोप्या पद्धतीने ते लिहायचं. पद्माजी अगदी तसं आम्हाला हिंदी साहित्यविश्व-विशेषत: दिल्लीतलं साहित्यविश्व उलगडून दाखवत होत्या.
 
त्यांच्या वागण्या-बोलण्यात कमालीचा साधेपणा होता. तास-दीड तास गप्पा मारल्यावर त्या आम्हाला तीन मजले उतरून खाली सोडायला आल्या. कारण त्यांना लिफ्टची प्रचंड भीती वाटत असे. निघताना त्या म्हणाल्या, ‘‘तुम मेरे बच्चों जैसे हो. कभी कभी फोन किया करो.’’ त्यांनी आपलं व्हिजिंटिंग कार्ड दिलं. त्यावर फक्त त्यांचं नाव आणि दिल्लीचा पत्ता होता. दिल्लीला गेल्यावरही त्यांनी मला एक-दोनदा फोन केला. दोन वर्षानी पुण्यात आल्यावर मला पुन्हा बोलावून घेऊन माझी चौकशी केली.
 सांगायचं असं की, इतकी मोठी लेखिका नवख्या मुलांशी इतक्या आत्मीयतेनं वागू शकते, याचा इतका सुंदर अनुभव नंतर आजवर तरी मला पुन्हा आला नाही.

केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून..

मी तेव्हा पुण्यात राहत होतो. सकाळ दैनिकाच्या जवळ असणा-या एका लस्सी, सँडविच आणि दही विकणा-या दुकानात काम करत होतो. तिथे सर्वात जास्त आजूबाजूचे आणि ‘सकाळ’मधील लोक येत. तिथल्या ताकाची चव चांगली होती. आणि विशेषत: अजिबात आंबट नसलेले दही मिळायचं. त्यामुळे दुकान तसं व्यवस्थित चालायचं. ‘सकाळ’मध्ये कँटीन होतं. पण दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावंसं वाटणारे लोक तिथे आवर्जून ताक प्यायला येत. त्यांना हवे ते पदार्थ देऊन झाल्यावर आणि ब-याचदा त्यांना पदार्थ देताना माझ्या हातात पुस्तक असे. ते मी इतर वेळी वाचत बसलेला असे. लोक सँडविच खात गप्पा मारत बसत, त्यांचा तो निवांत वेळ असे काहीसा. पण मी मात्र त्यांच्याशी ओळख झाल्यावरही फारसा बोलत नसे. हातातलं पुस्तक वाचत असे. हळूहळू त्यातल्या काहींनी मी कुठलं पुस्तक वाचतोय ते विचारायला सुरुवात केली. मी त्यांना पुस्तक दाखवायला लागलो.

तेव्हा आचार्य जावडेकर, नरहर कुरंदकर, श्री. म. माटे, वा. म. जोशी यांची पुस्तकं मी आवडीने वाचत असे. ती पाहून ‘सकाळ’चे एक निवृत्त कर्मचारी काका गाडगीळ  फार खुश होत. ते मला नवनव्या पुस्तकांची नावं सांगत, लेखकांची नावं सांगत. ती पुस्तकं वाचायचा आग्रह करत. कधी कधी म्हणत, ‘जरा वेळाने घरी ये. तुला एक मस्त पुस्तक वाचायला देतो.’ त्यांच्या घरी खूपच पुस्तकं होती. ते एकटेच राहत, त्यामुळे घरात ते आणि पुस्तकंच पुस्तकं असत. मी जाई तेव्हा ते नवनवी पुस्तकं मला दाखवत, त्यातलं मला हवं असलेलं पुस्तक दोन दिवसांच्या अटीवर वाचायला देत. त्यामुळे माझी जावडेकर, माटे, कुरुंदकर, गोविंद तळवळकर, साने गुरुजी, ग. प्र. प्रधान, अशा अनेक लेखकांची पुस्तकं वाचून झाली. मी माझं शुद्धलेखन सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या लेखनात एकही चूक राहून नये म्हणून मी व्याकरणाचे नियम समजून घेत होतो. हे त्यांना समजल्यावर त्यांनी मला य. ए. धायगुडे यांचे ‘मराठी मुद्रितशोधन’चे दोन भाग भेट दिले. मी एकदा पुलंचं ‘बटाटय़ाची चाळ’ वाचत होतो. ते पाहून ते म्हणाले, ‘अरे, हे पुस्तक तू वाचतोस ते ठीक आहे. पण पुलंची वाचावीत अशी पुस्तकं म्हणजे, ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’. ते तू वाच. नाहीतर असं करतो मी ती तुला भेटच देतो.’ त्यानुसार त्यांनी मला ती भेट दिली.


काकांची पुस्तकांची आवड तशी चोखंदळ होती. भलतीसलती पुस्तकं ते मला वाचायला देत नसत. मी एकदा वपु काळे यांचं ‘पार्टनर’ हे पुस्तक वाचत होतो. पुस्तक तसं बेकारच होतं. ते काकांनी पाहिलं. मला म्हणाले, ‘मित्रा, वा.म. जोशी, कुरुंदकर, माटे वाचणा-या माणसानं वपु काळे यांच्या वाटय़ाला जाऊ नये.’


काका असं थोडंच बोलत. पण मी ते गांभीर्यानं घेत असे. त्यामुळे माझं वाचन फार भरकटलं नाही. त्याला एक शिस्त लागली. ते विचारप्रधान राहिलं. एकदा शांता शेळके यांचा कुठलासा कार्यक्रम होता. त्यात त्या म्हणाल्या की, मी माझ्या आयुष्यातला बराचसा वेळ नको ती पुस्तकं वाचण्यात घालवला. तेव्हा मी त्याचं समर्थन केलं खरं पण आयुष्याच्या उतारवयात मला त्याचं वाईट वाटतं.’ आदल्यादिवशीच मी त्यांचा एक जुना लेख वाचला होता. त्यांनी त्यात म्हटलं होतं की, ‘काही लोक केवळ जीवनसत्त्वाच्या गोळ्या खाऊनच जगावं, तशी काही निवडक पुस्तकं वाचत असतात.’ त्याचा प्रतिवाद त्यांनीच केला होता.


मी ते दुस-या दिवशी काकांना सांगितलं. काका तर चांगले वाचक होते, त्यांना त्यांच्या वाचनाचा अभिमानच होता. पण त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ते मला म्हणाले, ‘तू या आठवडय़ापासून दर रविवारी माझ्या घरी यायचं आणि तुझ्या आवडीची पाच पुस्तकं घेऊन जायची.’ माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण ते खरंच म्हणत होते. नंतर मला वाटलं, एक दोन आठवडे देतील. पण सतत सहा महिने दर रविवारी ते मला त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे पाच पुस्तकं देत होते. त्यात समग्र टिळक, श्री. व्यं. केतकरांच्या ज्ञानकोशाचे सर्व खंड, त्र्यं. शं. शेजवलकरांची पुस्तकं, माटे-कुरुंदकर-जोशी यांची पुस्तकं. किती नावं घ्यावीत?


खरं तर मी काही काकांचा नातेवाइक नव्हतो. त्यांच्यासाठी मी कुठलंही काम केलं नव्हतं. त्यांनीही कुठलीही कामं कधी मला करायला सांगितली नाहीत. मी केवळ पुस्तकं वाचतो, म्हणून त्यांच्याकडची सर्व पुस्तकं त्यांनी मला देऊन टाकली. ते मला तेव्हाही स्वप्नवत वाटत होतं आणि आजही आश्चर्यकारकच वाटतं.   

इतिहास माणसाला शहाणं करतो!

स्वतंत्र भारत नावाच्या लोकशाही देशाचा हा अगदी अलीकडच्या म्हणजे 1947 ते 2007 या साठ वर्षाचा इतिहास आहे. ही वाटचाल गुहांनी काहीशा स्थुलपणे मांडली आहे आणि तीही बव्हंशी राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अंगानं. पण वस्तुनिष्ठ इतिहासलेखनाशी प्रामाणिक राहून मांडली आहे. त्यांच्या लेखनात कुठलाही पूर्वग्रह नाही, ही या पुस्तकाची सर्वात मोठी आणि जमेची बाजू आहे. किंबहुना त्यामुळेच हे पुस्तक आपले अनेक गैरसमज दूर करण्यास मदत करतं. ‘इतिहास माणसाला शहाणा करतो’ असं बेकनचं एक वचन आहे. मुद्दा आहे तो, आपल्याला शहाणं व्हायचं की नाही?
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
रामचंद्र गुहा हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, इतिहास, क्रिकेट आणि पर्यावरण या विषयांचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे गुहांचं इंग्रजी पुस्तक 2007 साली प्रकाशित झालं, तेव्हा त्याची ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘वॉल स्ट्रिट जर्नल’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘सॅनफ्रॅन्सिको क्रॉनिकल’, ‘टाइम आउट’ या आंतरराष्ट्रीय  नियतकालिकांनी ‘बुक ऑफ ऑफ द इअर’ म्हणून निवड केली होती. तर लंडनच्या ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’नं ‘An insightful, spirited and elegantly crafted account of India since 1947' असा त्याचा गौरव केला होता.
गुहांनी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लिहिलं आहे, ‘‘सामाजिक संघर्षाची प्रयोगशाळा म्हणून एखाद्या इतिहासकाराच्या दृष्टिकोनातून विसाव्या शतकातील भारत हा एकोणिसाव्या शतकातील युरोपइतकाच रोमहर्षक आहे..निश्चित दृष्टिकोनापेक्षा माझ्यामधील कुतूहलाची भावना अधिक बळकट आहे. न्यायनिवाडात्मक निष्कर्ष काढण्यापेक्षा मला समजून घेण्यात अधिक रस आहे..पण या कथाकथनाची मी जी पद्धत अवलंबिली आहे ती निश्चित करण्यामागे दोन मूलभूत मनसुबे होते. एक म्हणजे भारताच्या सामाजिक आणि राजकीय वैविध्याचा आदर राखणे आणि दुसरे म्हणजे आतापर्यंत सर्व भारतीय व परदेशी अभ्यासक व नागरिकांना सदैव जे कोडे पडत आले आहे त्याचा उलगडा करणे. हे कोडे कोणते, तर भारत खरोखरच का अस्तित्वात आहे?’’
 
भारत नुसता टिकला नाही तर आता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे. शिवाय भारत आजघडीला जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. भारताचा हा प्रवास कसा झाला याचा आलेख गुहा यांनी यात सविस्तरपणे मांडला आहे.
 पुस्तकाचे एकंदर पाच विभाग असून त्यात 30 प्रकरणांचा समावेश आहे. ‘तुकडेजोडणी’, ‘नेहरूंचा भारत’, ‘केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न’, ‘लोकप्रियतावादाचा उदय’ आणि ‘ऐतिहासिक घटनांचा मागोवा’ अशी पाच विभागांची नावं तर उपसंहाराचं नाव आहे ‘एक अस्वाभिक राष्ट्र’ आणि उपोद्घाताचं ‘भारत टिकून का आहे?’.

पहिल्या विभागात स्वातंत्र्य, पाकिस्तानची फाळणी, देशभर उसळलेल्या दंगली थांबवण्यासाठीचे म. गांधींचे प्रयत्न, त्यांची हत्त्या, संस्थानांचं विलिनीकरण, जम्मू आणि काश्मीरचं विलिनीकरण आणि राज्यघटना कशी साकारली याचा सविस्तर आढावा आहे.
 
दुस-या विभागाचं शीर्षक, ‘नेहरूंचा भारत’, पुरेसं बोलकं व नेमकंही आहे. यात 1949 ते 54 या सर्वात धामधुमीच्या, ताणतणावाच्या आणि संघर्षाच्या काळाचा इतिहास आहे.
 
‘केंद्र सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न’ या तिस-या विभागात ‘दक्षिणेकडील राज्यांचं आव्हान’, ‘पराभवाचा अनुभव’, ‘वर्तमान कालखंडातील शांतता’ आणि ‘अल्पसंख्याकांची काळजी’ अशी चार प्रकरणं आहेत. 1962 च्या पराभवाचं खापर नेहरूंच्या माथी फोडलं जातं. गुहांनी त्याबाबत कोणतंही भाष्य करणं टाळलं आहे, पण त्यांनी दिलेले पुरावेच इतके सज्जड आहेत की, त्याची गरजही राहत नाही.
 
सुरुवातीच्या या तीन विभागांमध्ये साधारपणे 1963 पर्यंतच्या काळातली स्वतंत्र भारताची वाटचाल अतिशय सविस्तर रेखाटली आहे. यासाठी 450 पृष्ठे दिलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात लहान-मोठी 500 संस्थानं होती. सरदार पटेल आणि त्यांचे सहाय्यक व्ही. पी. मेनन यांनी ती किती चातुर्यानं, सामंजस्यानं आणि प्रसंगी दटावणीनं  सामील करून घेतली याची कहाणी मोठी रोचक व मजेशीर आहे.
 
‘लोकप्रियतावादाचा उदय’ या चौथ्या विभागातल्या पहिल्याच प्रकरणाची सुरुवात होते, पं. नेहरूंच्या निधनानं. स्वतंत्र भारताची  लोकशाही, निधर्मी आणि सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून पायाभरणी करणा-या नेहरूंचं निधन हा तमाम भारतीयांना मोठाच धक्का होता. त्यानंतर पंतप्रधान झालेल्या आणि ‘नेहरूंचा योग्य वारसदार’ म्हणवल्या गेलेल्या लालबहादूर शास्त्रींची अल्प कारकीर्दही धामधूम आणि संघर्षाचीच ठरते.
 
शास्त्रींनंतर ‘इंदिरा गांधी पर्वा’ला सुरुवात होते. त्यांचं धडाडीचं नेतृत्व काही ठाम निर्णय घेतं, पण जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे त्या देशावर आणीबाणी लादतात. गुहांनी आणीबाणीला फार महत्त्व दिलेलं नाही. पण तरीही आणीबाणीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठी गळचेपी झाली, वगैरे गैरसमज दूर करण्याचं काम या प्रकरणातून होतं. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता आणि केवळ इतिहासकाराच्या दृष्टिकोनातूनच गुहांनी आणीबाणीविषयी लेखन केलं आहे. पण ते मात्र सज्जड पुराव्यांच्या आधारे. त्यामुळे त्यांच्या प्रतिपादनातून असा निष्कर्ष निघतो की, आणीबाणीला इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायण दोघंही सारख्याच प्रमाणात जबाबदार आहेत. इंदिरा गांधी यांना खलनायक आणि जयप्रकाशांना हिरो ठरवणा-या अनेकांच्या गळी हे कटूसत्य उतरणं अवघड आहे.
 
शेवटचा विभाग निरोपाचा आणि सर्वसमावेशक आढावा घेणारा आहे. त्यातल्या ‘समृद्धी’ या प्रकरणाच्या शेवटी गुहा लिहितात, ‘‘भारत एक देश म्हणून टिकणार नाही ही कल्पना मात्र फारच अतिशयोक्तीपूर्ण आहे. कारण भारताची राज्यघटना बनविणा-या आपल्या पूर्वसूरींनी त्यात सांस्कृतिक बहुविधता या एकाच राष्ट्रामध्ये फळेल व फुलेल अशी व्यवस्था केलेली आहे. त्याच वेळी हेही लक्षात ठेवले पाहिजे की भरात नजीकच्या काळात महासत्ता बनेल ही कल्पनाही अपरिपक्व आहे.’’
 
‘लोकांचे मनोरंजन’ या शेवटच्या प्रकरणात जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा, धर्म आणि लिंग या सर्व प्रकारच्या भेदांना ओलांडून जाणा-या आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका निभावणा-या (म्हणजे हिंदी चित्रपट, नाटक, लोककला, हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत, बिलियर्डस, हॉकी, फूटबॉल, क्रिकेट, आकाशवाणी व दूरदर्शन यांचा) सांस्कृतिक बहुविधतेचा  ऊहापोह केला आहे.
 
या सर्वाच्या जोडीला गुहांनी पं. नेहरू, इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण, नागा चळवळीचे नेते अंगामी फिझो, केरळचे इ. एम. एस. नंबुद्रिपाद, काश्मीरचे शेख अब्दुल्ला यांची चरित्रंही लिहिली आहेत. भारताच्या पूर्वेकडच्या भागाविषयी एरवीही आपल्याला फारशी माहिती नसते. त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळाविषयी गुहांनी बरंच लिहिलं असल्यानं ती सर्वस्वी नवी आहे.
 
‘भारत टिकून का आहे?’ या उपसंहाराची कारणमीमांसा गुहांनी सार्वत्रिक निवडणुकांपासून केली आहे. ते लिहितात, ‘‘भारतीय लोकशाहीचे मृत्युलेख तर अनेक वेळा लिहिले गेले आहेत. पुन्हा पुन्हा असे आवर्जून सांगितले गेले आहे की, हा गरीब, फाळणी झालेला, प्रचंड वेगळेपण असलेला देश ख-या अर्थाने मुक्त आणि न्याय्य निवडणुका फार काळ घेऊच शकणार नाही.’’ पण पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून या देशात खरोखरच ख-या अर्थानं मुक्त आणि न्याय्य निवडणुका पार पडत आल्या आहेत. अगदी काश्मीरच्या खो-यात आणि नक्षलवादी भागातही हिंसाचाराला, धाकदपटशाला न जुमानता लोक मतदानासाठी मोठय़ा प्रमाणावर रांगा लावतात हे सत्य सा-या जगाला माहीत आहे. अनेक परदेशी निरीक्षकांनीही मतदानस्थळी हजर राहून त्याच्या न्याय्यतेचा निर्वाळा दिलेला आहे. भारतासारख्या अजब देशात सार्वत्रिक निवडणुका इतक्या निर्धोक वातावरणात पार पडू शकतात, हाताच्या बोटावर मोजता येतील इतपतच गैरप्रकार घडतात, ही एकच गोष्ट या देशाच्या एकसंधपणाच्या ग्वाहीसाठी पुरेशी ठरावी.
 
उठसूठ भारताची तुलना पाश्चात्य देशांशी-विशेषत: अमेरिका-लंडनशी करणा-या चिंतातूर जंतूनाही गुहांनी फटकारलं आहे. ते दाखवून देतात की, पाश्चात्य जगातील राष्ट्रांना एकत्र बांधण्यासाठी एक भाषा, एक धर्म, एक भूभाग, एक शत्रू या पैकी एखादा वा हे सगळेच घटक कारणीभूत ठरलेले आहेत. भारत या सर्वच गोष्टींना सणसणीत आणि दणदणीत अपवाद आहे. हिंदू बहुसंख्य असले तरी भारत हिंदू राष्ट्र नाही. भारत धर्मनिरपेक्ष आणि सार्वभौम प्रजासत्ताक आहे. सध्याचे पंतप्रधान, लोकसभेच्या सभापती, उपराष्ट्रपती व काँग्रेसच्या अध्यक्षा यांच्याकडे पाहिले तरी ते पटेल. आणि हे प्रातिनिधित्व हिंदी चित्रपटांपासून खेळांपर्यंत आणि उद्योगांपासून ते शिक्षणव्यवस्थेपर्यंत सर्वत्रच पाहायला मिळतं.
विविध धर्म, विविध भाषा हे भारतीय संघराज्याचे मैलाचे दगड आहेत. त्यामुळे राष्ट्रवादाचे पाश्चात्य सिद्धांत भारताला लागू होत नाहीत. भारतासारख्या इतकं वैविध्य असलेल्या देशात सलग साठ र्वष लोकशाही टिकून राहणं हा जगापुढे भारतानं निर्माण केलेला नवा आदर्श आहे, हे समजून घेण्याची गरज आहे.

पण भारत हा खरोखरच लोकशाही देश आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर गुहा ‘फिप्टी-फिप्टी’ असं देतात. ते लिहितात, ‘‘जेव्हा निवडणुका होतात किंवा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा व आचारस्वातंत्र्याचा प्रश्न असतो तेव्हा इथे लोकशाही आचरणच असते. पण जेव्हा राजकारण्यांचा व्यवहार आणि राजकीय संस्थांचा प्रश्न येतो तेव्हा तिथे लोकशाही अभावनेच असते. पण भारतात पन्नास टक्के लोकशाही आहे ही वस्तुस्थितीसुद्धा इतिहास, परंपरा आणि सनातनी शहाणपणाला चपराक मारणारी आहे. ’’ गुहा म्हणतात, भारतात 50 टक्के लोकशाही असली तरी 80 टक्के एकजूट आहे. ‘‘आजच्या भारताचे भवितव्य परमेश्वराच्या हातात नसून सामान्य माणसाच्या हातात आहे. जोपर्यंत भारतीय संविधान अगदी ओळखू येणार नाही इतके बदलले जात नाही आणि निवडणुका नित्यनेमाने व योग्य पद्धतीने पार पडतात, धर्मनिरपेक्षतेचे वातावरण व्यापक पातळीवर टिकविले जाते, नागरिक आपल्या पसंतीच्या भाषेत बोलू व लिहू शकतात, जोपर्यंत सर्वसमावेशक बाजारपेठ अस्तित्वात आहे आणि ब-यापैकी नागरी प्रशासन व सैन्यसेवा उपलब्ध आहे, आणि हो, हेही मी विसरू इच्छित नाही की जोपर्यंत हिंदी चित्रपट सर्वत्र पाहिले जातात आणि त्यातली गाणी गायिली जातात तोपर्यंत भारताचे अस्तित्व टिकून राहील.’’ असा गुहांनी या पुस्तकाचा शेवट केला आहे.
 
गुहांचं इंग्रजी लेखन अतिशय ओघवतं आहे. त्यांना जे काही सांगायचं असतं ते नीट तपशिलानिशी आणि स्पष्टपणे सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे त्यांची भाषणं आणि लेखन खूपच प्रभावी ठरतं. त्याचाच प्रत्यय त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’मध्येही येतो. शारदा साठे यांनी त्याचा तितकाच समर्थपणे मराठी अनुवाद केला आहे. मराठीमध्ये गंभीर पुस्तकांचे अनुवाद करण्याच्या फंदात फारसं कुणी पडत नाहीत. महिन्याला जे ढिगानं अनुवाद होत आहेत, त्यांची यादी पाहिली तरी याचा प्रत्यय येतो.
 
पण एवढय़ा मोठय़ा पुस्तकाचा अनुवाद करताना काही त्रुटी-चुका राहणं साहजिक असतं. तशा त्या या पुस्तकातही आहेत. पण त्या किरकोळ म्हणाव्या अशाच आहेत. या अनुवादाचं काटेकोरपणे संपादन झालं असतं, तर त्या टाळता आल्या असत्या, असंही वाटतं.
 
साठे यांनी मूळ इंग्रजी आवृत्तीतील ऋणनिर्देश, नोट्स व संदर्भसूचीची 126 पानं वगळली आहेत. अशा प्रकारच्या पुस्तकाला संदर्भसूची हवीच. अभ्यासकांसाठीच  ती गरजेची असते असं नाही, जिज्ञासू आणि जाणकारांसाठीही गरजेची असते. अशी पुस्तकं वाचकांना इतर पुस्तकांकडे वळायला मदत करत असतात.
 
गेल्या साठ वर्षात भारतात लोकशाही शासनप्रणाली टिकून राहिली, पण तिला काही अडचणींच्या डोंगरांचा कमी प्रमाणात सामना करावा लागला म्हणून नव्हे तर, तर अशा डोंगरामागून डोंगरांचा सामना करतच तिचा प्रवास चालू आहे. सुरुवातीची 10-15 वर्षे तर सर्वच बाजूंनी कस पाहणारी होती. सुदैवानं देशाच्या नेतृत्वाची धुरा पं. नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर अशा दिग्गजांच्या हाती असल्यानं भारत तगला. आणीबाणी, राज्य पातळीवरच्या आणि केंद्रीय पातळीवरच्या चळवळी, दंगली, हिंसाचार, राजकीय हिंसा-हत्या, जातीयवादी पक्ष-संघटना, हिंदुत्ववादी पक्ष-संघटना, नक्षलवाद, शेजारच्या देशांची आक्रमणं, विरप्पनसारखे बंडखोर अशा कितीतरी संकटांचा सामना करावा लागला, आजही करावा लागतो आहे. येत्या काळात ‘सिव्हिल सोसायटी’ नामक भंपक लोकांचा उच्छाद ही नवी डोकेदुखी उभी राहण्याची चिन्हं अण्णा हजारेंच्या तथाकथित आंदोलनानं अधोरेखित केली आहेत. असो. कुठल्याही घटनेचं, प्रश्नाचं समग्र आकलन करून घ्यायचं असेल तर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही बाजूंचा विचार करावा लागतो. तरच ते आकलन निर्दोषतेच्या जवळपास पोहोचू शकतं. गुहांनी या तिन्ही बाजूंचा पुरेसा विचार केला असल्यानं प्रस्तुत पुस्तक स्वातंत्र्योत्तर भारत समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गांधींनंतरचा भारत : रामचंद्र गुहा, अनुवाद- शारदा साठे, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
 पाने : 888+35, किंमत : 800 रुपये

Sunday, November 27, 2011

साहित्यशिक्षक

रवींद्र पिंगे यांना जाऊन आता तीन वर्षे झाली. पिंगे हयात असते तर आता 85 वर्षाचे झाले असते. पिंग्यांची आठवण मुद्दामहून कुणी करण्याचं कारण नाही. मागच्या आठवडय़ात मुंबईत एक छोटासा कार्यक्रम झाला खरा. पिंग्यांच्या पहिल्या स्मृतिदिनीही त्यांचं एक पुस्तक त्यांच्या मुलानं प्रकाशित केलं. पिंग्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या वाटेला आलेल्या एवढय़ाच दोन गोष्टी. त्याबद्दल खंत करण्याचं कारण नाही. खुद्द पिंग्यांनीही ती केली नसती. त्यांनी 2006 वा 2007च्या ललितमध्ये लिहिलंच होतं की, माझी आठवण कुणी करणार नाही. माझा वाढदिवसही कुणाला आठवणार नाही. पण माझ्या नातवाचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. त्यामुळे नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना माझी आठवण निघेल. पिंग्यांना स्वत:बद्दल किती अचूक अंदाज होता, याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल.
  

पिंग्यांनी तीसेक पुस्तके लिहिली. परशुरामाची सावली’ (कादंबरी) हे त्यांचं पहिलं पुस्तक. त्याला पु. ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात पुलंनी म्हटलं आहे की, दरवर्षी चार-दोन दिवाळी अंकांच्या संपादकांना पिंग्यांची आठवण यावी इतका पैस त्यांनी तयार केला आहे. आणि खरोखरच पिंग्यांनी या पैसची व्यवस्थित जपणूक केली. त्याचं आपल्या परीनं जतन-संवर्धनही केलं. म्हणजे पिंग्यांना आपलं लेखनकर्तृत्व चांगलंच ठाऊक होतं. शेवटच्या काळात ते आपल्या लेखनाची नीट दखल घेतली नाही, आपल्या पुस्तकांची नीट समीक्षा झाली नाही अशी तक्रार थोडय़ा नाराजीच्या सुरात करत. पण तीही क्वचितच. त्यामुळे त्यांना वैफल्य वा नैराश्य आलं नव्हतं हेही खरं. पिंग्यांचा स्वत:च्या लेखनकर्तृत्वाचा एकंदर अदमास हे मराठी साहित्यविश्वातलं एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल. उतारवयात हा साक्षेप भल्याभल्यांकडे राहत नाही. निदान मराठीत तरी!
 
सुखसंगत, रिमझिम पाऊस, देवाघरचा पाऊस, पश्चिमेची धनदौलत, पश्चिमप्रभा, समाधानाचे सरोवर, तुषार आणि तारे, सुखाचं फूल, पश्चिमेचे पुत्र, प्राजक्ताची फांदी, पिंपळपान, हिरवीगार पानं, अत्तर आणि गुलाबपाणी ही पिंग्यांच्या पुस्तकांची नामावली. पिंग्यांनी साप्ताहिक माणूसमध्ये ओळीने 200 लेख लिहिले. त्यातील निवडक लेखनाचा संग्रह पुढे शतपावलीया नावाने राजहंसनेच काढला. 2007 साली राजहंस प्रकाशनानं सर्वोत्तम पिंगेहा त्यांच्या निवडक लेखांचा देखणा संग्रह काढला. त्याची बातमी सांगायला ते तीन मजले चढून आले होते. मी एकदा चुकून म्हणालो, तुमचा तो उत्तम पिंगेसंग्रह येतोय ना?’ पिंगे तत्परतेने म्हणाले, ‘सर्वोत्तम, सवरेत्तम िपगे!’ 

खरंच होतं ते! तो संग्रह सर्वोत्तम म्हणावा असाच आहे. कारण पिंग्यांनी लिहिलं खूप. परदेशी लेखकांवर लिहिलं, तसंच आशयघन ललितलेखनही केलं. त्या सर्वाचा मसावि त्यांच्या या पुस्तकात एकवटला आहे.
 
पिंग्यांचा काळच ललित लेखनाला पोषक होता. शिवाय आकाशवाणीमध्ये अनेक वर्षे नोकरी केल्यामुळे दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, विजय तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांचा स्नेह/सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध झालं. तो त्यांचा खूप मोठा लाभ होता. एरवी या नामवंतांचा सहवासच काय पण भेट घ्यायलाही इतरांना फार यातायात करावी लागली असती. वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, बरंच काही सोसावंही लागतं. पण पिंग्यांना त्यासाठी फार काही करावं लागलं नाही. सारे त्यांच्याकडेच येत आणि आपल्या अनुभवाची श्रीमंती देत. त्यात पिंग्यांचं बालपण कोकणात गेलेलं. या दोन्हीमुळे पिंग्यांचं ललितलेखक होणं क्रमप्राप्तच होतं.
 
पिंग्यांना दोन व्यसनं होती. एक सतत फिरण्याचं आणि दुसरं, नव्यातल्या नव्या लेखकांचं वाचून त्याला प्रोत्साहन द्यायचं, मार्गदर्शन करायचं. नव्याबद्दल त्यांना फार कुतूहल असायचं. साहित्याच्या क्षेत्रात लुडबूड करू पाहणा-या तरुण मुलांच्या आजोबांची भूमिका करायला त्यांना फार आवडत असे. शिवाय त्याला वेगवेगळ्या साहित्यिकांचा परिचय करून देत. त्याविषयी भरभरून बोलत. त्याच्या वाकडय़ातिकडय़ा प्रश्नांना तर अक्षरक्ष: रात्री-अपरात्री कधीही उत्तरं देत, त्याचं समाधान करत. पिंग्यांना लेखक असण्याचा इगो नव्हता आणि ते भयंकर भ्रमनिरासापासून बचावलेले होते, ही थोरच गोष्ट होती. याचमुळेच त्यांची दृष्टी शेवटपर्यंत स्वच्छ आणि प्रसन्न राहिली.
 ग. प्र. प्रधान हे पिंग्यांचे समकालीन. प्रधानमास्तर ख-या अर्थाने समाजशिक्षक होते. तर पिंगे खऱ्या अर्थाने साहित्यशिक्षक होते असे म्हणावे लागेल. 

पिंगे अजातशत्रू होते. त्यांच्याबद्दल कुणीही वावगा शब्द कधी बोलल्याचं ऐकायलाही मिळालं नाही. आणि पिंगे तर कधीच कुणाविषयी वावदूक बोलत नसत. त्यांच्या लेखनात एक संथ लय आहे, पण कुठेही चढ-उतार नाहीत की चढा सूर नाही. पिंग्यांचा स्वभावही असाच होता. ज्याच्याशी पटत नाही, त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. संपला विषय!
 
पिंग्यांचं लेखन त्यांच्या काळातल्या मध्यमवर्गाला सुखावणारं होतं. त्यावेळचे अनंत काणेकरांसारखे काही लेखकही तसंच लेखन करत. तो मध्यमवर्गच आता राहिला नाही. त्यामुळे पिंग्यांच्या पुस्तकाबाबत आता बोललं जाणं दुरापास्तच आहे. आणि साहजिकही. त्यांचा काळ स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेल्या पिढीचा काळ होता. त्यामुळे त्यांच्या पिढीत ध्येयवाद होता. ध्येयवादी माणसं भाबडी असतातच. पिंगेही होते. पण त्यांच्यातला साहित्यशिक्षक त्याहून मोठा होता. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची आठवण कुणाला राहिली नाही, कुणी ती वाचली नाहीत तरी पिंग्यांची आठवण करणं हे मराठी साहित्यक्षेत्राच्या निकोपपणाला सुदृढ करणारंच आहे यात शंका नाही. 

Sunday, November 20, 2011

जनसामान्यांचा पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार वा. दा. रानडे हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळात वावरलेले आणि मुख्य म्हणजे पत्रकारिता केलेले एक महत्त्वाचे पत्रकार होते. त्यांचं मंगळवारी पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. ही बातमी सर्वात अगोदर समजली ती फेसबुकवर. ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी त्याविषयीची पोस्ट अपलोड केली तेव्हा. पुण्यातील वर्तमानपत्रांनी रानडय़ांच्या निधनाची बातमी देणं सयुक्तिक होतं, पण मुंबईच्या कुठल्याच वर्तमानपत्रातमध्ये ती छापून आलेली दिसली नाही.
 
रानडे मूळचे नगर जिल्ह्यातील. त्यांचं कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळात1943 मध्ये पुण्यात स्थायिक झालं. त्या वेळी रानडे अकरा वर्षाचे होते. रमणबागेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतली. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांना रस होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, पां. वा. गाडगीळ यांची काँग्रेस भवनातील भाषणं ऐकण्यास ते आवर्जून जात. 1945 मध्ये ते विद्यार्थी चळवळीत काम करणा-या नॅशनॅलिस्ट ग्रुपमध्ये सहभागी झाले. याचवर्षी ते सकाळमध्ये रुजू झाले. तिथं त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सलग 38 वर्षे पत्रकारिता केली. 1983 मध्ये निवृत्त झाले.
 
विद्यार्थिदशेतच राष्ट्रसेवा दलआणि नॅशनॅलिस्ट ग्रुपयांच्या संपर्कात आल्यानं रानडेंची वैचारिक जडणघडण होण्यास मदत झाली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळ, त्यामुळे राष्ट्रवादाचे ते पुरस्कर्ते झाले. पण रानडे अत्यंत मितभाषी होते. त्यामुळे कुठल्याच गोष्टीवर ते हिरिरीनं वाद घालत नसत. आपलं म्हणणं शांतपणे मांडत आणि समोरच्याचं तेवढय़ाच शांतपणे ऐकून घेत. आपण पत्रकारितेत दीर्घकाळ काम केलं आहे, ‘सकाळया आघाडीच्या दैनिकाचे काही काळ संपादकही होतो, याचा बडेजाव त्यांनी इतरांसमोर तर सोडाच स्वत:शी तरी कधी मिरवला असेल की नाही, याचीही शंकाच वाटते. पत्रकारितेत थोडंफार जरी काम केलं तरी अनेकांना चांगल्या गुणापेक्षा दुर्गुण जास्त चिकटतात. स्वत:ला ते इतरांपेक्षा आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळं समजायला लागतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात दर्प जाणवायला लागतो. पुण्यातलं पत्रकारितेचं पर्यावरण तसं सदाशिवपेठी असल्यामुळे तिथं हे प्रकर्षानं जाणवतं. त्याला काही अपवाद आहेत, नाही असं नाही. त्यातल्या आधीच्या पिढीतल्या अपवादांत्मक नावांपैकी पुणे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पटवर्धन, रामभाऊ जोशी आणि वा. दा. रानडे. आता तर तिघेही नाहीत. पण तिघांमध्येही बरंच साम्य होतं. वागण्या-बोलण्यातील ऋजुता, तरुण पत्रकारांविषयीची आस्था आणि मध्यममार्गी भूमिका या गोष्टी या तिघांनीही कधी कुणाला शिकवल्या नाहीत. त्यांच्या संपर्कात येणा-याला त्या आपोआप उमगत, समजत आणि त्यांचा गांभीर्यानं विचार करावा लागे.

2004 चा सुमार असेल. मी प्रभातमध्ये काम करत होतो. रविवार पुरवणीची जबाबदारी होती. एके दिवशी संपादकांनी बोलावून घेतलं आणि हे वा. दा. रानडेअशी समोरच्या वयोवृद्ध गृहस्थांची ओळख करून दिली. त्यांचं सदर सुरू करत असल्याचंही सांगितलं. ते रोजच्या अंकात संपादकीय पानावर होतं. तेही पान मीच पाहात असल्यानं मग माझा रानडय़ांशी नियमित संपर्क येऊ लागला. ते आठवडय़ातून दोन वेळा लिहीत. त्यांचं अक्षर अतिशय बारीक आणि गिचमिडं होतं. डीटीपी ऑपरेटरांना तर ते लागतच नसे. मग मला त्यांच्याशेजारी बसून तो मजकूर त्यांना सांगावा लागे, पण त्याचा सराव होईपर्यंत पंचाइतच व्हायची.
 
रानडे सिंहगड रोडला कुठेतरी राहायचे. प्रभातचं ऑफिस लक्ष्मी रोडला विजय टॉकिज शेजारी. पण लेख मात्र ते स्वत: आणून द्यायचे. दोन मजले चढत वर यायचे. खाली आल्यावर निरोप द्या, मी खाली येत जाईनअसं त्यांना अनेक वेळा सांगून पाहिलं, पण पुढच्या वेळी तसं करूम्हणून ते निघून जात. आणि पुन्हा तसंच करत. खरं तर या वयात त्यांनी इतका आटापिटा का करावा, असा प्रश्न पडे. पण त्यांच्याशी बोलण्यातून कळलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. शिवाय ते फक्त प्रभातमध्ये लिहीत असंही नाही. पुण्यातल्या अद्वैत फीचर्स या वृत्तसंस्थेसाठीही ते बरंच लिहीत. साप्ताहिक साधनामध्येही त्यांचे लेख अधूनमधून येत असत. लेखनाचे सर्व विषयही भारताचे शेजारी देश किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण.
 
आता विषय इतके महत्त्वाचे असल्यामुळे त्यांचं लेखन छापलं जात असेच. पण त्यांच्या लेखनाला अजिबात शैली नव्हती. शिवाय त्यातली माहितीही तशी सामान्य असे. कानकून परिषद अनिर्णित’, ‘एका भिंतीच्या निमित्ताने पुन्हा इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष’, ‘राजकीय मुत्सद्देगिरीतून आर्थिक विकास’, ‘संरक्षणाचे धोरण प्रोअ‍ॅक्टिव्ह हवे’, ‘दुस-या मंदीची भीती’, ‘दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशाअशी काही त्यांच्या लेखांची शीर्षकं. प्रांतरचना व महाराष्ट्र’ (1956), ‘भारताचे लोकमत’ (1962), ‘माओचा चीन’ (1967), ‘बंगला देस’ (1972), ‘निवडणुका कोणासाठी, कशासाठी?’ आणि समाजवादी चळवळीची वाटचाल’ (2010) अशी काही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.
 
रानडय़ांच्या एकंदर लेखनाकडे कसं पाहावं हे लक्षात यायला बराच काळ जावा लागला. त्यांचं लेखन सक्तीनं वाचावंच लागत असल्यानं हळूहळू लक्षात येतं गेलं की, रानडे वर्तमानपत्रांचा सरासरी वाचक ज्या पद्धतीच्या लेखनाची अपेक्षा करतो, त्या पद्धतीचं लिहीत. त्यांचे लेखनाचे विषयच मुळी तसे अपरिचित, त्यामुळे त्यात फार सखोल विश्लेषणावरच भर दिला तर ते लेखन सामान्य वाचकांसाठी राहणार नाही. चाळीसेक वर्षे पत्रकारितेत काम करणा-या रानडय़ांना तसं लेखन करायचंच नव्हतं. कारण ज्यांना सखोल विश्लेषण जाणून घ्यायचं, त्यांच्यासाठी इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांचा वापर करावा. सामान्य वाचकांना अपरिचित विषयावरची परिचित म्हणजे सामान्य माहिती देणं, हाच रानडय़ांच्या लेखनाचा मुख्य पैलू होता. आणि तो महत्त्वाचाही होता. अशा पद्धतीच्या लेखनाची गरज काल होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच. कारण शेवटच्या माणसाचं हित पाहणं हे लोकशाहीचं काम असतं. तिचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचंही तेच काम असतं. त्या शेवटच्या माणसाला आंतरराष्ट्रीय घडामोंडीविषयी किमान साक्षर करावं, या व्रतानं रानडे शेवटच्या काळापर्यंत लेखन करत राहिले. त्यात त्यांची आर्थिक नड ही अपरिहार्यता होतीच, पण तरीही त्यांचं लेखन याच निकषावर तोललं जायला हवं.

 पण हेही महत्त्वाचं होतं की, रानडे काही इंटरनेटवर बसून आंतरराष्ट्रीय राजकारणावरील लेख पाडत नसत. ते रितसर ग्रंथालयात बसून, देशी-विदेशी वर्तमानपत्रं, पुस्तकं वाचून लिहीत. त्यासाठी त्यांना सतत अपडेट राहावं लागे. ते राहतही. त्यामुळेच आम्ही अमेरिकेला ठणकावून सांगतोअशी भाषा त्यांच्या लेखनात कधीच नसायची. म्हणूनच इंटरनेटचा काडीइतकाही आधार न घेता लेखन करणा-या रानडय़ांना सलाम करायलाच हवा.

Saturday, November 5, 2011

हजारेशाहीचे रंगरूप

हा लेख गोविंद तळवलकर यांनी दिव्य मराठीमध्ये  ३० ऑक्टोंबर २०११ रोजी लिहिला आहे.


भारताची राजकीय व्यवस्था, निवडणूक पद्धती इत्यादी पूर्णपणे बदलण्याचा विडा अण्णा हजारे यांनी उचलला आहे. तथापि राळेगणसिद्धी या त्यांच्या गावाचा एकंदर कारभार आणि तेथील लोकांचे जीवन कसे चालते हे पाहणे जरुरीचे आहे. याबाबतीत मुकुल शर्मा यांनी तेथे जाऊन कोणते अनुभव घेतले त्याची माहिती येथे देत आहे. शर्मा हे सामाजिक प्रश्न, पर्यावरण, ग्रामीण विकास यासंबंधी लिहितात. त्यांनी राळेगणसिद्धीवरही लिहिले आहे. त्यांचा एक लेख वेबवर 14 एप्रिल रोजी वाचला. त्यात जे काही लिहिले होते त्याची शहानिशा करण्यास राळेगणसिद्धीजवळील एकास सांगितले. तेव्हा त्याने शर्मा यांची निरीक्षणे चूक आहेत असे कळवले. मी शर्मा यांना पत्र लिहून त्यांनी राळेगणसिद्धीसंबंधात केलेल्या मतप्रदर्शनाच्या विरुद्ध मिळालेली माहिती नमूद केली.

शर्मा यांनी लिहिले की, ते काही वर्षांपूर्वी ‘नवभारत टाइम्स’मध्ये शिकाऊ पत्रकार असताना मला भेटायला आले होते. त्यांनी राळेगणसिद्धीला 1995, 1999 व 2002 या वर्षी भेट दिली. दर वेळी काही दिवस मुक्काम केला. 2002 नंतर ते राळेगणसिद्धीला गेलेले नाहीत. तथापि त्यांनी पत्रात लिहिले आहे की, यूएनआय-वार्ता या वृत्तसंस्थेच्या दिल्लीच्या एका वार्ताहराने 2004-05 या काळातील राळेगणसिद्धीसंबंधी लिहिलेल्या पुस्तिकेतील माहितीप्रमाणे या परिस्थितीत बदल झालेला नाही. शर्मा यांनी 21 मे 2006 रोजी ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’तही लेख लिहिला होता. त्याची प्रतही शर्मा यांनी मला धाडली. त्यांचा वेबवरचा लेख 2006 च्या लेखात भर घालून लिहिलेला आहे. शर्मा यांनी अशीही पुस्ती जोडली की त्यांनी हजारे यांचे लेख, पुस्तके तसेच त्यांच्या दोन ध्वनिमुद्रित केलेल्या दीर्घ मुलाखतींचा आधार लिखाण करताना घेतला होता. एप्रिलमधील लेखात शर्मा यांनी प्रारंभी राळेगणसिद्धीच्या विकासामागची मनोभूमिका काय आहे याचे विवेचन केले आहे. काही मतांबद्दल विविध प्रतिक्रिया होऊ शकतात. तसेच काही ऐतिहासिक संदर्भ बरोबर नाहीत. राळेगणसिद्धीमधील शेतीसुधारणा, जलसिंचनाची वाढती उपलब्धता, जमिनीखालील पाण्याची वाढलेली उंची, बरीच वृक्षराजी, शिक्षणाची सोय आणि त्या क्षेत्रातील शिस्त, गावातील स्वच्छता इत्यादींबाबत त्यांनी लेखात पुरेसे विवेचन करून कौतुक केले आहे. गावची वस्ती तेव्हा सव्वादोन हजार होती. मराठा बहुसंख्य, तर अनुसूचित जाती आणि जमातीचे अत्यंत थोडे. लोकांनी ही विकासकामे एकत्रपणे खपून केली आहेत. यात जमिनीची बांधबंदिस्ती, रस्ते, शाळा वगैरेंच्या इमारती इत्यादींचा समावेश होतो. विविध कार्यकारी संस्थांद्वारे लोकांनी अनेक क्षेत्रांत विकासाची यंत्रणा उभी केली आहे. नसबंदी, नशाबंदी, कुºहाडबंदी, चाराबंदी व श्रमदान हे पाच नियम गावात लागू आहेत. आपण ते पाळू, अशी शपथ सर्व गावक-यांना घ्यावी लागते. हजारे यांच्या विचारांवर धार्मिकतेचा पगडा असल्यामुळे ही शपथ देवळात घेतली जाते.

विकासकार्यात अडथळा येऊ नये आणि मतभेद होऊन गावातले वातावरण बिघडू नये म्हणून 2005 च्या आधी तीस वर्षे ग्रामपंचायतीच्या व सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. निवडणूक ही कल्पनाच अण्णा हजारे यांना त्याज्य आहे. शर्मा यांना त्यांनी सांगितले की, सत्ता आणि राजकारण यामुळे भ्रष्टाचार माजतो. हजारे यांनी गावाचा विकास घडवून आणल्यामुळे त्यांचा प्रभाव इतका आहे की लोक त्यांच्या म्हणण्याबाहेर नाहीत आणि स्वतंत्रपणे ते निर्णय घेत नाहीत.

गणपत औटी हे काही काळ सरपंच होते. त्यांनी सांगितले की, अण्णा सांगतील तसे होत असते. लष्करी हुकूम पाळला जातो तसे आम्ही करत आलो. वर जे पाच नियम नमूद केले आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होते? शर्मा यांनी हजारे यांची मते दिली आहेत. ती अशी की, सामाजिक बदलासाठी लोकांचे मन वळवावे लागते, परंतु दर वेळी लोक ऐकतीलच असे नाही; मग शारीरिक शिक्षा द्यावी लागते. पण नेहमी ती उपयोगात येतेच असे नाही आणि मग नैतिक बळ वापरावे लागते. आई मुलांचे लाड करते, पण चुकले तर तोंडात मारते; तसे कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याच्या वेळी करावे लागते, असे समर्थन हजारे करतात. अण्णा हजारे यांनी समाजकार्याला सुरुवात केली तेव्हा राळेगणसिद्धी व आसपास दारूच्या भट्ट्या ब-याच होत्या, दुकाने होती. हजारे यांनी गावक-यांची सभा घेऊन ही सर्व दुकाने व भट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ब-याच भट्ट्या बंद झाल्या. नंतर जो कोणी मद्यपान करील त्याला शारीरिक शिक्षा देण्याचे ठरले. हजारे यांनी शर्मा यांना सांगितले की, नियमभंग करणारास देवळाच्या समोरच्या काटेरी तार गुंडाळलेल्या खांबाला बांधून फटके मारले जातात. ग्रामसभेने ठराव करून गावातल्या पंचवीस तरुणांचा गट केला आणि ही फटक्यांची शिक्षा देण्याचा त्यास अधिकार दिला. काही मद्यप्यांना या तरुणांनी व हजारे यांनी मिळून फटके मारले, असेही गणपत बाळासाहेब पाठारे म्हणाले.

उपसरपंच कैलास पोटे यांनी स्वत:ला हा अनुभव आल्याचेही सांगितले. फटके मारून मग पोलिसांच्या हवाली केले जाते. कुटुंब नियोजनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होते, असे हजारे यांनी शर्मा यांना सांगितले. त्यांचे म्हणणे असे की, कुटुंब नियोजन हे देशभर झाले पाहिजे. जात व धर्म यांचा विचार न करता याची अंमलबजावणी बळाचा वापर करून झालीच पाहिजे; आपण राळेगणसिद्धीमध्ये तसा तो करतो. तेथे धूम्रपान बंद असून केवळ धार्मिक चित्रपटच बघण्यास परवानगी आहे आणि फक्त धार्मिक गीतेच ऐकता येतात. हजारे यांनी केबल टीव्ही निषिद्ध ठरवला आहे. म्हणून एकाने आपल्या घरावर डिश अ‍ॅण्टेना लावल्यावर त्याची कडक हजेरी घेतली गेली व त्याने माफी मागितली. कैलास पोटे यांनी शर्मा यांना ही माहिती दिली.

अण्णा हजारे स्वत: शाकाहारी आहेत. त्यांच्या मते हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे शाकाहार हा अधिक योग्य ठरतो; मांसाहारामुळे लोक युद्धाला प्रवृत्त होतात. मांसाहार हा कनिष्ठच ठरवून तसा गलिच्छ आहार खाता, तसेच कपडे करता म्हणून तुमचे विचारही गलिच्छ असतात, असे हजारे यांनी हरिजन इत्यादींना ऐकवल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. अर्थात हरिजनांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी दोन-चार दलितांना महाविद्यालयीन शिक्षणही मिळवून दिले आणि ते डॉक्टर झाले. तथापि शर्मा यांचा मुख्य आक्षेप असा की, हजारे व त्यांच्या सहका-यांनी राळेगणसिद्धीमध्ये दलितांना मदत केली असली तरी त्यांच्या चौकटीत दलितांना वरच्या वर्तुळात हक्काची जागा नाही; त्यात उपकाराची भावना आहे, स्वाभाविक हक्क मान्य करण्याची नाही. तथापि रा. स्व. संघाचे इंग्रजी मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ ने काही वर्षांपूर्वी हजारे यांच्या कार्यासंबंधी एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. हिंदू

संस्कार लोकांवर ठसवण्याचे हजारे यांचे कार्य त्या लेखकाला आदर्श वाटले. धार्मिक विचारांच्या संस्कारांमुळे आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत ही भावना वाढली असे त्या लेखकाचे म्हणणे. तथापि दलितांमध्ये यामुळे आज्ञाधारकपणाची भावना बळकट झाली आणि बहुसंख्य जमातीचे वर्चस्व मानण्याची प्रथा चालू राहिली.

या सर्व माहितीवरून मला काही प्रश्न पडतात ते असे : फटक्यांची शिक्षा देण्याचा अधिकार हजारे आणि ग्रामसभा यांना कोणी दिला? पोलिस व सरकार यांना याची दखल घ्यावीशी का वाटली नाही? राज्य सरकार अण्णा हजारे यांचे दास बनले आहे काय? कुटुंब नियोजनाच्या बाबतीत संजय गांधींच्या पलीकडे हजारे यांची मजल गेली आहे असे दिसते. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य काही काळ होते तेव्हा त्याने प्रत्येक व्यक्तीचे जीवन साचेबंद केले होते. गाणीबजावणी बंद केली होती. हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये तालिबानच्या आधीच तसे केले. शाकाहार हा मांसाहारापेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असे मानणे हा अहंकार आहे व चूक आहे. हिटलरने हजारो-लाखो ज्यूंना जिवंत जाळले. तो तर शाकाहारी होता. पण अण्णा हजारे यांना आपल्याभोवती जग फिरत असल्याचा भ्रम होत असून त्यांना जे मान्य तेच इतरांनाही मान्य झाले पाहिजे, असा त्यांचा हुकूमशाही दंडक आहे.

Sunday, October 30, 2011

प्रशासनातल्या जिवंत, वास्तव आणि सच्च्या अनुभवांची बखर

‘‘पटेलांना याची चांगलीच समज होती की सनदी अधिका-यांविना ब्रिटिश साम्राज्य मुळी अस्तित्वातच आले नसते. त्याहीपेक्षा त्यांना हे चांगले कळले होते की नवोदित, आधुनिक व स्वतंत्र राष्ट्राला जटिल शासनयंत्रणा हाताळण्यासाठी अशा अधिका-यांची नितांत गरज होती. त्यांनी घटना संसदेच्या सदस्यांना सांगितले की, ‘नवीन संविधानाची कार्यवाही व्हावयाची असेल तर संपूर्ण देश एकत्र ठेवू शकेल असा सनदी सेवा अधिका-यांचा संच असायलाच हवा.त्यांनी सनदी अधिका-यांची क्षमता व सेवादक्षता यांची ग्वाही दिली.’’ असे सनदी अधिका-यांबद्दलचे गौरवोउद्गार रामचंद्र गुहा यांनी गांधींनंतरचा भारतया आपल्या पुस्तकामध्ये दिले आहेत.
तर ‘‘भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षाच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या, यशापयशाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे.
 
टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे.
 
भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे, पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-आमच्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलत: मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून बखरहा शब्द वापरला आहे!’’ अशी बखर : भारतीय प्रशासनाचीया पुस्तकामागची आपली भूमिका लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्पष्ट केली आहे. देशमुख यांच्या या पुस्तकाचे उपशीर्षक आहे, ‘सम्यक व सकारात्मक दृष्टिकोनातून..
 
इथेच या पुस्तकाचे वेगळेपण अधोरेखित होते. विशेषत: अलीकडच्या काळात सनदी अधिकाऱ्यांविषयी जनमानसात, विशेषत: मध्यमवर्गामध्ये अतिशय नकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. या पुस्तकाला माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातही याच भूमिकेचे प्रत्यंतर येते. म्हणजे सनदी सेवेपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेला मध्यमवर्ग आणि सनदी सेवेतून बाहेर पडलेला, निवृत्त झालेला व उच्च मध्यमवर्गात समावेश असलेला वर्ग यांच्या भूमिका सारख्याच आहेत.
 
ज्याला सनदी सेवेबद्दल फारशी माहितीच नाही, त्या मध्यमवर्गाचा दृष्टिकोन एकवेळ समजून घेता येईल. किनाऱ्यावर राहून कसे पोहायचे याचे दिग्दर्शन करणा-यांची फारशी तमा शहाणी माणसे बाळगत नाहीत, आणि त्यांनी बाळगूही नये. पण ज्यांनी दीर्घकाळ सनदी सेवेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, त्यांच्याकडून सकारात्मक दृष्टिकोनाची अपेक्षा असते. आणि ती असलीच पाहिजे. पण ती फारशी पूर्ण होताना दिसत नाही. असे का बरे व्हावे?
 
याची काही कारणे आहेत. तुम्ही खूप महत्त्वाकांक्षी असलात तर बदलांबाबत तुम्ही जरा जास्तच आग्रही राहता. समाजात काय किंवा शासनात काय, बदल कशाप्रकारे होत असतात, कसे होत आले आहेत आणि कशाप्रकारे होतील हे त्यांना ब-यापैकी माहीत असते, नाही असे नाही. पण मोठे पद आणि मोठी महत्त्वाकांक्षा ही कुर्मगतीच्या विरोधात असते. आणि नेमकी इथेच गडबड होते. कारण कोणतेच समाजबदल हे एकाएकी कधीच होत नसतात. जोपर्यंत कुणाचे तरी जगणे पणाला लागत नाही, तोपर्यंत बदलाची प्रक्रियाच सुरू होत नाही. त्यासाठी आधी समाजशिक्षण करावे लागते. त्यालाही पुन्हा वेळ लागतोच.
 
केवळ कायदे करून सर्व समाज वा सर्व शासकीय कर्मचारी बदलतील असे होत नसते. कारण कायदे हे एक समाजबदलाचे माध्यम असते. त्यामुळे त्याला अंगभूत मर्यादा असतात. सतीप्रथेसारखी अमानुष गोष्ट कायद्याने बंद होऊ शकते, मग गेल्या कित्येक वर्षात लग्नात हुंडा देण्या-घेण्याची पद्धत का कायद्याने बंद झाली नाही याचा नीट बारकाइने अभ्यास केला तर ही गोष्ट समजायला फारशी कठीण नाही. अलीकडच्या काळात हुंडय़ाची पद्धत शहरी भागात, विशेषत: सुशिक्षित मध्यमवर्गामध्ये काही प्रमाणात कमी झालेली दिसते, तिचे मुख्य कारण म्हणजे सुशिक्षित पालक आणि बहुतेकदा सुशिक्षित मुले-मुलीच स्वत:चे लग्न स्वत: ठरवू लागल्यामुळे, प्रेमविवाह करू लागल्यामुळे. म्हणजे शिक्षण या माध्यमाचा उपयोग जोपर्यंत स्वत:चा विकास करून घेण्यात होत नाही, तोपर्यंत इष्ट असे बदल घडत नाहीत. असो.
 
त्यामुळे आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, सनदी सेवा अधिकाऱ्यांनी गेल्या साठ वर्षात या देशाच्या जडणघडणीमध्ये काहीएक भूमिका बजावलेली आहे की नाही? या देशात सार्वत्रिक निवडणुका निर्भेळ आणि बहुतांशी पारदर्शक पद्धतीने पार पडतात, याचे श्रेय फक्त जनसामान्यांच द्यायला हवे की त्यात सनदी अधिका-यांचाही मोलाचा वाटा आहे? खरे तर ते श्रेय दोघांचेही आहे. अशी आणखी बरीच उदाहरणे देता येतील. अनेक कर्तबगार प्रशासकीय अधिकारी आजही प्रशासनात आहेत, कालही होते आणि उद्याही राहतील.
 
आणखी एक गोष्ट. सगळेच सनदी अधिकारी भ्रष्ट, कामचुकार आणि राज्यकर्त्यांना सामील असतात, हा आक्षेप घेताना एक गोष्ट हेतुपुरस्सरतेने विसरली जात असावी असे वाटते. ती म्हणजे सनदी अधिकारी ही काहीतरी आपल्यापेक्षा वेगळी जमात आहे. ती या देशातल्या नागरिकांचा भाग नाही. सर्व नागरिक एका बेटावर राहतात आणि सनदी अधिकारी एका स्वतंत्र बेटावर राहतात. असे काही आहे का? आपल्याच समाजात राहणारे, शेजारी राहणारे, आपले नातेवाईक असलेले आणि आपल्यासारखीच हाडामासाची माणसे सनदी सेवेत आहेत. मग सगळेच सनदी अधिकारी भ्रष्ट असतील तर सगळा समाजही भ्रष्टच असला पाहिजे. किंवा बहुतांशी अधिकारी भ्रष्ट असतील तर बहुतांशी समाजही भ्रष्ट असला पाहिजे.
 
त्यामुळे प्रशासन सुधारायचे असेल तर आधी समाजही त्या प्रमाणात सुधारायला हवा. त्यामुळे शिवाजी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरात यावा. त्याने आणखी कुणाशी युद्ध करावे आणि त्याचे फायदे मात्र आम्हाला मिळावेतही रामभरोसे वृत्ती आपल्या सरंजामशाही मानसिकतेचे द्योतक आहे. ती आधी टाकायला हवी. तर आणि तरच आपण इतरांकडून न्याय्य आणि नैतिक अपेक्षा करायला पात्र ठरू शकतो.
 
या पार्श्वभूमीवर देशमुखांचे हे पुस्तक वाचले तर आपला दृष्टिकोन सम्यक आणि सकारात्मक होऊ शकतो. तसा तो होण्याचे वस्तुपाठ या पुस्तकातल्या 31 प्रकरणांमध्ये  सांगितले आहेत. समाजसन्मुख आणि विकासाभिमुख नागरिक म्हणून स्वत:चा आणि त्याचबरोबर इतरांचाही विकास घडवण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक होऊ शकते.
 
देशमुख गेली पंचवीस वर्षे सनदी सेवेत आहेत. उपजिल्हाधिकारी म्हणून ते सनदीसेवेत दाखल झाले. तालुका-प्रांत-जिल्हा प्रशासनापासून ग्रामीण प्रशासन, नगरप्रशासन, जिल्हा प्रशासनीतल कामाचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. सध्या ते कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.  म्हणजे देशमुख यांनी ग्रासरूट लेवलवर-तळागाळात काम केले आहे. त्यामुळे त्यांचे अनुभव अधिक जिवंत, वास्तव आणि सच्चे आहेत.  आणि म्हणून मोलाचे आहेत. पण असे असले तरी सनदी सेवेत-प्रशासनात सारे काही आलबेल आहे, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. तर प्रशासनातल्या चांगल्या गोष्टींची नोंद करतानाच, त्यापुढील आव्हांनाचीही चर्चा केली आहे. प्रशासनाची सामर्थ्ये सांगितली आहेत, तशाच त्याच्या मर्यादाही अधोरेखित केल्या आहेत. त्याला स्वत:च्या चांगल्या कामांची जोड दिली आहे. त्यामुळे नेमके प्रशासन घटनेनुसार कसे आहे, त्यानुसार ते काम करते की नाही, त्यात कोणकोणत्या अडीअडचणी येतात, त्यातून कसा मार्ग काढला जातो, त्यांची अमलबजावणी कशी होते, त्याचा प्रत्यक्षात काय फायदा होतो, अशा अनेक प्रश्नांची त्यांनी चर्चा केली आहे.
 
म्हणजे प्रत्यक्ष काम, अभ्यास, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि घटना अशा चौफेर व्यासंगातून देशमुख यांचे हे पुस्तक साकारले आहे. त्यामुळेच आजवर सनदी अधिका-यांनी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा हे पुस्तक आगळेवेगळे आणि महत्त्वाचे आहे. कारण या पुस्तकामध्ये सारा ठपका राज्यकर्त्यांच्या माथी मारलेला नाही, तसेच तो जनतेच्याही माथी मारलेला नाही. तर प्रशासनाचा सर्वागीण परिचय करून देत त्याची समीक्षा केली आहे, तशीच घटनेतील तरतुदींचीही ओळख करून दिली आहे. प्रशासनातल्या भ्रष्टाचारावरही प्रांजळपणे लिहिले आहे. त्यावरची उपाययोजनाही सांगितली आहे. थोडक्यात प्रशासनाचा अतिशय साधबाधक आणि सर्वागीण-सम्यक विचार करणारे हे पुस्तक आहे. ते प्रशासनातल्याच एका जबाबदार अधिकाऱ्याने लिहिले असल्याने त्याची उपयुक्तता आणि विश्वासार्हताही वादातीत म्हणावी अशी आहे.
 
  • बखर : भारतीय प्रशासनाची - लक्ष्मीकांत देशमुख
  • साधना प्रकाशन, पुणे
  • पाने : 304, किंमत : 250 रुपये