Sunday, January 30, 2011

बंडभूषण


बंडखोरपणा आणि भांडखोरपणा करण्याचं वय तरुण असतं, असं म्हटलं जातं, गृहीत धरलं जातं आणि तसं सर्वत्र पाहायलाही मिळतं। पण पंडित सत्यदेव दुबे हा प्रायोगिक दिग्दर्शक या गोष्टीला सणसणीत अपवाद आहे. उलट एखादा तरुण करणार नाही इतकी बंडखोरी त्याच्यामध्ये या वयातही आहे. पण ‘हे सर्व कोठून येते?’ असा तेंडुलकरी प्रश्न दुबेंना विचारण्यात अर्थ नाही. कारण ते भडकून म्हणणार, ‘हा प्रश्न मूर्खासारखा आहे. मी जे काही करतो ते नाटकाच्या भल्यासाठी करतो॥’ नुकत्याच मिळालेल्या पद्मभूषणबद्दल दुबेंना ‘कैसा लगा’ छाप प्रतिक्रिया विचारण्याची मीडियाची टाप नाही, ती याचमुळे!
...तर नाटकाच्या भल्यासाठी आपल्या ‘दुबे स्टाइल’नं हा माणूस गेली 38 वर्षे इंग्रजी, हिंदी आणि मराठी रंगभूमीवर नाटकांशी खेळतो आहे. दुबेंची नाटकं प्रायोगिक म्हणून ओळखली जातात; पण मुळात दुबेच प्रायोगिक आहेत. व्यावसायिकता त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच नाही. स्थिर होण्याचं नाव सुरुवातीपासूनच नाही.




दुबेंचा जन्म मध्यप्रदेशातल्या विलासूपरचा। तिथल्या म्युनिसिपल शाळेत त्यांचं शिक्षण झालं. पण ते पाच वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. मग वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. तिथं ते अँग्लो-इंडियन कुटुंबात राहिले. पण काही दिवसांनी परत विलासपूरला गेले. तिथे शाळेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याशी ते जोडले गेले. इंटर झालं आणि दुबेंनी मुंबईला प्रस्थान ठेवलं. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं! झेविअर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये त्यांची निवडही झाली. याच कॉलेजात दुबेंना देव आनंदचा भाऊ विजय आनंद भेटला आणि दुबे नावाच्या स्कूलची नाटकाच्या दिशेनं पावलं पडायला लागली. विजय आनंदनं त्यांना स्वत:बरोबर न्यायला सुरुवात केली. बदली नट म्हणून कामंही मिळू लागली.




त्यावेळी मुंबईत भांगवाडीमध्ये गुजराती नाटकांची मोठी चळवळ जोमात होती। तिथेही दुबे जायला लागले। तिथेच त्यांना पार्श्वनाथ आळतेकर भेटले. ते दुबेंचे नाटय़क्षेत्रातले पहिले गुरू. दुबेंचा तोतरेपणा आळतेकरांनी घालवला. विजय आनंदनं एक दिवस दुबेंना ‘थिएटर युनिट’मध्ये नेलं. तिथे तेव्हा इब्राहीम अल्काझी आणि पी. डी. शेणॉय हे दोन स्टॉलवर्ट होते. दुबेंनी अल्काझींकडून नाटकाच्या कोरिओग्राफीचे धडे गिरवले. नाटकाच्या अक्षांश-रेखांशामध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे, आणि त्याच्या जेवढय़ा म्हणून शक्यता आहेत, त्या पणाला लावून पाहणारा दुबे हा दिग्दर्शक आहे. मग ते सात्र्चं ‘नो एक्झिट’ असेल, धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ असेल, बादल सरकारांचं ‘वल्लभपूरची दंतकथा’, महेश एलकुंचवारांचं ‘गार्बो’, ज्याँ अनुईचं ‘अँटिगनी’, मोहन राकेश यांचं ‘आधे अधुरे’ असेल किंवा विजय तेंडुलकरांचं ‘खामोश! अदालत जारी है।' दुबेंनी केलेल्या प्रत्येक नाटकात हे दिसेल.




श्याम मनोहर हे मराठीतले कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे लेखक। पण त्यांची नाटककार अशी ओळख दुबेंमुळेच झाली. दुबे ‘साहित्य सहवास’मध्ये राहतात. एकदा त्यांची कवी दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. चित्रेंनी त्यांना मनोहरांचं नाटक सुचवलं. पण ते वाचल्यावर दुबे म्हणाले, ‘कशासाठी करायचं मी हे?’ चित्रेही तेवढेच खटनट. ते दुबेंना म्हणाले, ‘यू स्टार्ट फ्रॉम एंड.’ चित्र्यांच्या नावावर एवढा एकच विध्वंस जमा असला तरी दुबेंच्या नावे मात्र असे कैक विध्वंस जमा आहेत. नाटककाराच्या नाटकाची वासलात कशी लावायची हे दुबे पूरेपूर जाणून असतात, आणि आपल्या पद्धतीने ते त्याची ‘स्टार्ट फ्रॉम दि एंड’ किंवा ‘स्टार्ट फ्रॉम इन बिट्वीन’ अशी कशीही मांडणी करू शकतात, नव्हे करतात. त्यासाठी नाटककाराशी भांडतात. वर सांगतात, ‘नाटककाराचं नाटक त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं.’ आणि दुबेंचं हे म्हणणं खरंच आहे. नाटकाचा प्रयोगाच्या दृष्टीने विचार दुबे ज्या शक्यतांनिशी करतात, तो तेच करू जाणो! याबाबतीत (तेंडुलकरांनंतर) त्यांचाच हातखंडा आहे.




पण दुबेंनी दिग्दर्शित केलेली नाटकं समजायला तशी कठीण। सर्वसामान्यांच्या तर ती डोक्यावरूनच जात असणार. दुबेंना सांगायचं असतं ते लखलखीत अणि सरळसोट असतं खरं पण ते त्यांच्या बाजूने. प्रेक्षकांच्या बाजूने तो समजून घेतानाच दमवणारा भाग असतो! पण आपला प्रेक्षक नाटक मध्येच सोडून पळून जाऊन नये याचीही दुबे काळजी घेतात. चारेक वर्षापूर्वी पुण्याच्या भरत नाटय़ मंदिरात त्यांच्या ‘आडम चौताल’चा प्रयोग होता. दुबेंनी आधी त्यांच्या आवडीच्या दोन हिंदी कविता ऐकवल्या आणि सांगितलं की, ‘या नाटकाला मध्यंतर नाही, कारण मध्यंतरात लोक निघून जातात. तसं होऊ नये म्हणून ही सोय केली आहे.’




काही वर्षापूर्वी दुबेंनी पुण्यातच कुसुमाग्रजांच्या कवितांवर ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा कार्यक्रम केला होता आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या एका प्रस्तावनेचं सादरीकरणही केलं होतं। कधी तरी प्लेटोच्या डायलॉग्जचंही सादरीकरण करण्याचं दुबेंच्या मनात आहे. मनात आहे ते सादर करायचं हा तर दुबेंचा खाक्याच आहे. म्हणजे ‘वद जाऊ कुणाला शरण॥’ हे नाटय़पद त्यांना आवडलं, ते त्यांनी गो. पु. देशपांडे यांच्या ‘अंधारयात्रा’ या नाटकात वापरून टाकलं. ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ हे दुबेंचं नाव मराठी असलेलं नाटक हिंदी आहे! चित्रपटातली गाणी, ‘ये मकरंद देशपांडे जैसा नाटक नहीं है’ अशा कमेंट्स ..अशा अनेक गोष्टी दुबेंच्या नाटकात असतात. काहींना तो दुबेंचा चक्रमपणा वाटतो. दुबेंना मात्र अवतीभवतीच्या जित्याजागत्या गोष्टींचा तो योग्य आणि समर्पक वापर वाटतो. तो त्यांच्या प्रेक्षकांना आवडतोही.




दुबे हा माणूस स्टॉलवर्ट आहे। त्यामुळे ते नाटकंही स्टॉलवर्ड लोकांचीच करतात. धर्मवीर भारती, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार हे त्यांचे नाटककार. तर डॉ. श्रीराम लागू, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, विहंग नायक, किशोर कदम हे त्यांचे नट. पण दुबे विशी-पंचविशीतल्या मुला-मुलींबरोबरही तेवढय़ाच तन्मयेतनं नाटक करतात. तरुणांचा त्यांच्या भोवती कायम गराडा असतो.




‘गिधाडे’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकानं एकेकाळी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली होती। सेन्सॉर बोर्डाने या नाटकातल्या गर्भपाताच्या लाल डागावर आणि अन्यकाही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर डॉ. लागूंपासून नाटय़क्षेत्रातल्या संबंधितांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आघाडी उघडली होती. तेव्हा दुबेंनी डॉ. लागूंना सुचवले की, नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना सूचना करायची - ‘आम्ही निळा डाग दाखवतो आहोत. तो लाल आहे असं प्रेक्षकांनी समजावं.’ त्यानुसार डॉ. लागूंनी ती सूचना देऊन नाटकाचे प्रयोग केले. कायद्याची लढाई कायद्यानेच लढली पाहिजे, पण ती लढतानाही आपल्या विरोधकांना सभ्यपणानं कसं हास्यास्पद ठरवता येतं, याचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार!




दुबे क्रिकेटमध्येच रमले असते तर क्रिकेटचा काय फायदा झाला असता माहीत नाही; पण भारतीय प्रायोगिक नाटकांच्या चळवळीचं मात्र मोठं नुकसान झालं असतं. ते घडून आलं नाही हे बरंच झालं. बाकी ‘दुबे हे तीन अंकी गुरुकुल आहे’, ‘दुबे हा स्कूल ऑफ थॉट आहे’, ‘दुबे इज अ‍ॅन इन्स्टिटय़ूशन’ असं काहीही म्हणण्यात अर्थ नाही, दुबे मास्तर आपल्याला मूर्खात काढणार. कारण संस्था वा संस्थान म्हटलं की, फॅसिझमला सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं आहे. दुबे आक्रमकपणे, चढेलपणे आणि कधी कधी विक्षिप्तपणे वागत असले तरी हा माणूस लोकशाहीवादी आहे, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. आणि यावर त्यांच्या मित्रांचं, शिष्यांचं, समकालीनांचं .. शत्रूंचंही एकमत होईल.

Saturday, January 15, 2011

...हे तर श्रीपुंचे अवमूल्यनच!


‘‘ग्रंथप्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांच्याकडे आपल्या सांस्कृतिक आणि ज्ञानात्मक गरजा भागवणा-या संस्था म्हणून समाज बघतो. मराठी प्रकाशन संस्थांचा इतिहास पाहिला, तर त्यांतील कित्येक संस्था आपापल्या क्षेत्रात आणि काळात वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनाची केंद्रे बनल्या होत्या असे आढळेल.’’
-श्री. पु. भागवत (साहित्याची भूमी, पृष्ठ २१६)





अलीकडच्या दोनेक आठवडय़ात महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्यानं तीन महत्त्वाचे पुरस्कार जाहीर केले आहेत. पहिला विंदा पुरस्कार विजया राजाध्यक्ष यांना, नाटय़क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार मधुकर तोरडमल यांना आणि श्री. पु. भागवत पुरस्कार संजय भागवत यांना. यातल्या तिस-या पुरस्काराकडे मात्र प्रसारमाध्यमांचं नीट लक्ष गेलं नाही. त्याच्या बातम्याही व्यवस्थित आल्या नाहीत. त्याकडे जरा बारकाईने पाहिलं तर काय दिसतं? श्रीपुंचं २००७ साली निधन झालं, त्यानंतर सरकारने त्यांच्या स्मृत्यर्थ हा पुरस्कार सुरू केला. 2008 साली पहिल्या पुरस्कारासाठी पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ यांची न्यायोचित आणि योग्य निवड केली। पण त्यानंतरच्या दुस-या पुरस्कारासाठी औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाचे बाबा भांड आणि नुकत्याच जाहीर झालेल्या तिस-या पुरस्कारासाठी तर मौज प्रकाशन गृहाचेच प्रकाशक संजय भागवत यांची निवड जाहीर झाली आहे. प्रकाशन क्षेत्रातल्या ‘प्रदीर्घ आणि उत्तम कामगिरी’साठी हा पुरस्कार दिला जातो, असे पुरस्कार निवड समितीचे एक सदस्य मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले. असे असेल तर संजय भागवत यांची निवड या पुरस्कारासाठी करणे, हे सरकारच्या या निवड समितीचे खरोखरच धाडस म्हणायला हवे!




दुसरी गोष्ट, हा पुरस्कार व्यक्तीला आहे, संस्थेला नाही। पण प्रकाशन व्यवहारात व्यक्ती आणि त्याची संस्था वेगळी काढता येत नाही. ज्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो, ते श्रीपु मौज प्रकाशन गृहाचे प्रदीर्घ काळ प्रकाशक-संपादक होते. पण आता मौजचे प्रकाशक संजय भागवत आहेत आणि श्रीपु भागवतांचे पुतणेही. म्हणजे एका अर्थाने हा पुरस्कार श्रीपुंनाच देण्यासारखे नाही का? (हे सुदैवच म्हणायला हवे की, सरकारने श्रीपुंच्या नावाचा हा पुरस्कार त्यांनाच मरणोत्तर जाहीर केला नाही.) त्यामुळे इथे प्रश्न निर्माण होतो तो औचित्याचा. संजय भागवतांची कारकीर्द खरोखरच ‘प्रदीर्घ’ आणि ‘उत्तम’ म्हणावी अशी आहे काय?




तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय भागवतांच्या काळात प्रकाशित झालेली मौज प्रकाशन गृहाची पुस्तके या पुरस्कार निवड समितीने बहुधा पाहिली नसावीत। कारण ती पाहिल्यावर कुणाच्याही लक्षात येईल की, श्रीपुंनी प्रकाशन व्यवहारात संपादकीय दृष्टिकोन, प्रयोगशीलता, साहित्याविषयीची मर्मज्ञ दृष्टी आणि व्यावसायिक नीतिमत्ता हे मानदंड ‘मौज’च्या पुस्तकांतून उभे केले, त्याला तडे लावण्याचे काम संजय भागवतांच्या अल्प कारकीर्दीतच चालू झालेले आहे. नुकतेच संजय भागवतांनी निळू दामले यांचे ‘लवासा’ हे पुस्तक काढले. सध्या महाराष्ट्रात या प्रकल्पावर उलटसुलट चर्चा चालू आहे. त्यामुळे या विषयावर एवढय़ा तत्परतेने पुस्तक निघावे हे स्तुत्यच आहे. पण या प्रकल्पाच्या दोन्ही बाजू या पुस्तकात आल्या आहेत काय? हा प्रकल्प कसा उत्तम आणि चांगला आहे अशी एकच (आणि एकांगी) बाजू सांगणारं हे पुस्तक आहे. राज्य सरकारची बाजू ‘लवासा’ जमीन प्रकरणी योग्यच होती, असा सूर पुस्तकात आहे. या पुस्तकाच्या प्रकाशकांना सरकारच्या सांस्कृतिक खात्याचा पुरस्कार मिळतो, हा योगायोग मानायचा का?




याआधीही असे योगायोग घडले आहेतच। साकेत प्रकाशनाच्या बाबा भांड यांना हा पुरस्कार मिळाला होता. या भांड यांच्यावर राज्य सरकारच्याच ‘ऑपरेशन ब्लॅक बोर्ड’ या पुस्तक योजनेमध्ये गैर व्यवहार केल्याचा आरोप झाला होता. आणखीही काही गैर व्यवहाराचे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. अशा वादग्रस्त आणि संशयास्पद माणसांना श्रीपुंच्या नावाचा पुरस्कार दिला जात असेल तर मग या पुरस्काराची प्रतिष्ठा ती काय राहिली? हे तर राज्य सरकारने श्रीपुंचे चालवलेले अवमूल्यनच आहे.




सरकारच्या या पुरस्कार निवड समितीत कोण लोक आहेत? महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकपद ही दोन्ही सध्या मधू मंगेश कर्णिक यांच्याकडेच आहेत। त्यामुळे या दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी म्हणून कर्णिक, अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे, सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक. म्हणजे थेट सरकार आणि सरकारी संस्थांवर काम करणा-या लोकांचाच या समितीत भरणा आहे. उषा तांबे आणि उत्तम कांबळे ही तेवढी दोन नावे बाहेरची. त्यात कांबळे निवड समितीच्या कुठल्याच बैठकीला नव्हते. समितीतल्या या सदस्यांना मराठी प्रकाशन व्यवहाराची नीट माहिती आहे, असे कुणीही म्हणू शकणार नाही. या समितीत एकही ज्येष्ठ प्रकाशक वा प्रकाशक संघटनांचे प्रतिनिधी का नाहीत?




सध्या ज्योत्स्ना प्रकाशन, राजहंस प्रकाशन, कॉण्टिनेण्टल प्रकाशन, श्रीविद्या प्रकाशन, लोकवाङ्मय गृह, मॅजेस्टिक प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, वरदा प्रकाशन, प्रास प्रकाशन, मेहता पब्लिशिंग हाऊस, रोहन प्रकाशन अशा अनेक प्रकाशन संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत। यातल्या काही प्रकाशकांची तर दुसरी पिढी निष्ठेने हा व्यवसाय करत आहे. तेव्हा श्रीपुंच्या नावाचा पुरस्कार देताना त्यांनी मराठी प्रकाशन व्यवसायाला नेमके काय योगदान दिले याचा प्राधान्याने विचार नको का करायला? प्रकाशनांची संख्या, विषय वैविध्य, विक्री व्यवस्था आणि व्यावसायिक नीतिमत्ता हाही एक निकष असायला काय हरकत आहे? पण त्याची दखल घ्यायची नाही आणि ज्यांच्याकडे या सगळ्याच गोष्टींबाबत वानवा आहे, त्यांचा उदोउदो करायचा असा हा सारा उफराटा कारभार आहे.




सर्वात चिंताजनक आणि गंभीर मुद्दा असा की, या सर्व प्रकारात श्री.पु. भागवतांचे अवमूल्यन होत आहे. त्याचा मराठी प्रकाशन व्यवहारातल्या प्रत्येक घटकाने, व्यक्तीने आणि संस्थेनेही तीव्र शब्दांत निषेध करायला हवा. श्रीपुंनी म्हटल्याप्रमाणे ‘सांस्कृतिक जीवनाच्या केंद्रां’मधून समाजाचे सांस्कृतिक अभिसरण, भरणपोषण होत असते. ते काम आजवर अनेक मराठी प्रकाशन संस्थांनी केले आहे, काही आजही करत आहेत. तेव्हा या प्रकाशन संस्थांची आणि त्यांच्या प्रकाशकांची यथायोग्य दखल घेण्यातूनच श्रीपु भागवतांच्या नावाच्या या पुरस्काराची बूज राखली जाऊ शकते, राखायला हवी. तरच या पुरस्काराला काहीएक प्रतिष्ठा राहील. अन्यथा त्याची गतही सुमारांच्या सद्दीतच होईल.

Monday, January 10, 2011

नुकसान कोणाचे?

नुक्ताच लोकसत्ताचे माजी संपादक अरूण टिकेकर याना महाराष्ट्र फाउनडेशनच साहित्यासाठीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला पण त्यांची दखल मराठी दैनिकानी फारशी घेतली नाही। काय कारण असावे बरे? टिकेकर लोकसत्ताचे सलग अकरा वर्ष संपादक होते। त्या कालातली त्यांची पत्रकारिता आजच्या पत्रकारानी आदर्ष मानवी अशी आहे। तेव्हा टिकेकर यांचा विसर मराठी पत्रकारितेला पडत असेल तर त्यात नुकसान मराठी पत्रकारिता आणि पत्रकार यांचेच नव्हे काय?

Sunday, January 2, 2011

फॅशनेबल प्रयोगांची सुगी


‘खेळ’, ‘दर्शन’, ‘ऐवजी’, ‘अनाघ्रात’ ही अनियतकालिकं सध्या मराठीमध्ये प्रकाशित होत आहेत. ‘अभिधानंतर’ हे अनियतकालिक काही महिन्यांपूर्वीच ‘सांगण्यासारखं काहीच राहिलं नसल्याचं’ कारण देत हेमंत दिवटे या कवीमित्रानं बंद केलं. या अनियतकालिकांमध्ये काही समान धागे आहेत. ही सर्व नव्वदोत्तर काळात सुरू झालेली आणि त्याच काळात लिहू लागलेल्या कवींनी सुरू केलेली आहेत. त्यांचा प्रधान विशेषही कविता हाच आहे.
नुकतंच शेगावहून ‘अतिरिक्त’(ऑक्टोबर 10) या नावानं दा. गो. काळे आणि दिनकर मनवर या कवीमित्रांनी नवं अनियतकालिक सुरू केलं आहे. त्याचं प्रयोजन सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘ ‘शब्दवेध’ आणि ‘अभिधानंतर’ बंद पडल्यानं निर्माण झालेली रिक्तता कारणीभूत ठरली आहे.’ पुढे म्हटलं आहे की, ‘‘आज कवी/लेखक/कलावंतांना असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा लागेल. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची कुणी हमी देऊ शकेल असे आजचे वास्तव नाही. आज किंवा मागच्या काही घटनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास समोर येणारे वास्तव नाउमेद करणारे आहे. एखाद्या चित्रकाराने देश सोडून जाणे, लेखक, कलावंत देशोधडीला लागणे, संपूर्ण कलाव्यवहार मूलतत्त्ववाद्यांच्या दहशतीखाली जाणे ही गोष्ट आजच्या प्रगत समजल्या जाणाऱ्या समाजाशी सुसंगत नाही. हा विचारही ‘अतिरिक्त’च्या प्रयोजनामागे असणार आहे.’’
हा मनोदय स्तुत्यच आहे. पण त्यासाठी संपादकांनी काही प्रयत्न केले आहेत का? त्यांनी तर मंगेश नारायणराव काळे या आपल्या कवीमित्राच्या कवितेविषयीचा विशेषांक म्हणूनच पहिला अंक काढला आहे. म्हणजे संपादकांचा मनोदय नेमका काय आहे? आधीच्या अनियतकालिकांप्रमाणे त्यांनाही आपल्याच गोतावळ्यातल्या लोकांचं साहित्य छापायचं आहे? आणि त्यालाच ‘साहित्यातला नवा प्रवाह’ असं नाव द्यायचं आहे?
कारण आधीच्या अनियतकालिकांमध्ये त्यांच्याच मित्रांच्या मुलाखती, त्यांच्याच कवितेवर लेख, विशेषांक असतात. त्यांचं कवितेबद्दलचं प्रकट चिंतन वगैरे असतं! तो सारा प्रकार कमालीचा एकसाची/एकछापी आहे. या साऱ्या कवींच्या कविता एकत्र छापल्या आणि त्यासोबत त्यांची नावं दिली नाहीत तर कुठली कविता कुणाची आहे, हे बहुधा त्या कवींनाही लवकर सांगता येणार नाही. दासू वैद्य यांच्या शब्दात सांगायचं तर हे सारे ‘शब्दांचेच मुके घेणारे’ आणि ‘सारा जोर घरातच’ काढणारे लोक आहेत. असं साहित्य हे कधीच केंद्रस्थानी येत नसतं. कारण राजकारणात-अर्थकारणात पोकळी नसते असं म्हणतात, तशी ती साहित्यातही नसते. चांगल्या साहित्याची वानवा निर्माण झाली की, त्याची जागा कमअस्सल साहित्य घेऊ लागतं. सध्या मराठी कवितेच्या बाबतीत तेच होताना दिसत आहे. पण म्हणून ते केंद्रस्थानी आहे असं अजिबात नाही.
नव्वदीच्या दशकात जगभर जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यातून जगभरातल्या मानवी समुदायासमोर आपापल्या भाषा, संस्कृती, कला, आचारविचार, प्रथा, परंपरा यांच्या जतन-संवर्धनाचं, त्या प्राणपणानं जपण्याचं संकट उभं राहिलं. त्यातून नवे सांस्कृतिक संघर्ष उभे राहिले. मराठी साहित्य संमेलन सुरू झालं, तेव्हापासूनच मराठी भाषेच्या भवितव्याच्या नावानं कंठशोष चालू होता. त्यानं या काळात पुन्हा उचल खाल्ली. आणि झालं काय तर मराठीमध्ये नव्यानं लिहू लागलेल्या बहुतेकांनी कविता हेच आपल्या अभिव्यक्तीचं माध्यम निवडलं. त्यातच हिमनगाचे पाण्याखालचे भाग उघड होत जावेत, तसा व्यक्तिवाद जागतिकीकरणाच्या काळात समोर येत गेला. त्यामुळे या काळातली कविताही अधिकाधिक व्यक्तिवादी आणि आत्मकेंद्री होत गेली.
गेल्या दोन दशकांमध्ये मोठय़ा शहरांमधला मध्यमवर्ग अधिकाधिक स्वार्थी, आत्मकेंद्री, समाजाविषयी असंवेदनशील आणि स्वत:च्याच खुज्या भावभावनांचं स्तोम माजवू लागला आहे. तोच प्रकार या शहरांमधून लिहिणाऱ्या लेखक-कवींच्या लेखनातही चालू झाला. आणि त्यालाच त्यांची ‘अभिव्यक्ती’, ‘नवा प्रवाह’ म्हणण्याची फॅशनही सुरू झाली. या फॅशनपासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करणारे काही लोक आहेत, नाही असं नाही. पण त्यांची संख्या इतकी रोडावत गेली की त्यांच्या मोजदादीसाठी दोन्ही हातांची बोटंसुद्धा जास्त भरावीत. या थोडय़ा लेखक-कवींनी जागतिकीकरणाच्या लाटेत दिवसेंदिवस होत असलेल्या मूल्यांचा ऱ्हास आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला, करत आहेत. पण आत्मकेंद्रीपणाच्या चक्रव्यूहात सापडलेल्या लेखक-कवींची संख्या इतक्या झपाटय़ानं वाढत जात आहे की, ती आता फक्त मुंबई-पुणे या शहरांपुरतीच मर्यादित राहिली नसून औरंगाबाद, नाशिक, नागपूर, लातूर, बीड, उस्मानाबाद या शहरांपासून अगदी तालुक्यापर्यंत पोचली आहे. या लोकांची साहित्यिक आकांक्षा इतकी मध्यमवर्गीय आहे की विचारता सोय नाही! त्यामुळे शहरी मध्यमवर्गीय लेखक-कवी आणि खेडय़ातले लेखक-कवी यांच्यातला भेदच नाहीसा होत आहे.
पॅरिस शहरात नवनव्या फॅशन्स जन्माला येतात, पण सध्या महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठी साहित्यात फॅशनेबल विचार, फॅशनेबल भूमिका, फॅशनेबल आचार, फॅशनेबल नकार (म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात सर्व सुखं-सोयींचा उपभोग घ्यायचा, पण आपल्या साहित्यातून मात्र त्यांच्याविषयी तुच्छतेनं लिहायचं.) आणि फॅशनेबल अभिव्यक्ती यांची सुगी सुरू आहे. आपल्याला वाटतं आणि आपण म्हणू तेच व तेवढंच खरं असा खाक्या झाला आहे. यांना आधीचं सगळं नाकारायचं आहे का? तर तसंही दिसतं नाही, आणि यांच्याकडे नवी कुठली मांडणीही नाही. म्हणून मग आधीच्या पिढीतले जे लोक आपल्याला बरं म्हणतील ते चांगले आणि बाकीचे वाईट अशी पद्धत सुरू झाली आहे. ‘अभिधानंतर’च्या दृष्टीनं दिलीप चित्रे चांगले होते, ‘दर्शन’, ‘ऐवजी’च्या दृष्टीने भालचंद्र नेमाडे चांगले आहेत, तर ‘खेळ’च्या दृष्टीने वसंत आबाजी डहाके चांगले आहेत. आधीच्या लोकांनाही आपल्या कंपूशाहीत सामील करून घ्यायचं आणि जे आपल्याबरोबर यायला तयार नाहीत त्यांच्यावरच कंपूशाहीचा आरोप करायचा असा सारा उफराटा प्रकार सुरू आहे.
सध्याच्या परिस्थितीचा अन्वयार्थ लावता येत नाही वा तो आवाक्यात येत नाही. आणि त्यात लेखक-कवी म्हणून असलेली नैतिकताही टिकवता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली की तिचं ‘संक्रमणाचा काळ’ असं वर्णन करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. पण सध्या तर सगळीच परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, त्याच्यापुढे विचारवंतांपासून सामान्यजनांपर्यंत सारेच हतबल झाले आहेत. या हतबलतेवर नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या लेखक-कवींनी मोठा नामी उपाय शोधला आहे. त्यांनी सरळ आपल्या गोंधळलेपणाचा उरूस साजरा करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला उल्लेख केलेल्या सर्व अनियतकालिकांमधून त्याचाच प्रत्यय येतो.
एक गोष्ट मात्र फार चांगली आहे की, या अनियतकालिकांना इतक्या दिवसांनंतरही फारसा वाचकवर्ग मिळालेला नाही. त्याचं कारण समाजात वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे, गंभीर वाचणारे वाचक राहिले नाहीत अशी उत्तरं हे लोक देतीलही. पण खरी गोष्ट अशी आहे की, मराठी वाचक बराचसा सुज्ञ आहे. तो या फॅशनेबल प्रयोगांना फार गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळे फार काळजीचं कारण नाही.