Monday, May 30, 2011

तुकड्यातुकड्यांतला `बापमाणूस'



विजय तेंडुलकरांच्या निधनाला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होतील. आतापर्यंत तेंडुलकरांविषयी पाच-सहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात खुद्द त्यांच्याच ‘तें दिवस’ या अपूर्ण आत्मचरित्राचाही समावेश आहे. ही सर्वच पुस्तकं ममत्वानं आणि आपुलकीनं लिहिलेली आहेत. त्यामुळे ती केवळ आठवणी आणि अनुभवपर आहेत. त्यात तेंडुलकरांच्या नाटकांचं आणि तेंडुलकर एक लेखक म्हणून कुठल्याही प्रकारचं विश्लेषण नाही. मराठी नाटय़ परिषदेनं वा एखाद्या साहित्य संस्थेनं तेंडुलकरांचा गौरवग्रंथ अजून प्रकाशित केला नाही, याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. कारण सध्या ग्रौरवग्रंथ नामक गोष्टीचं जे अजागळ खूळ मराठीत आहे, त्यात तेंडुलकरांचा समावेश करायचं धाडस कुणी करू शकलेलं नाही. हा बहुतेक तेंडुलकरांच्या वचकाचाच प्रभाव असावा!








‘बापमाणूस’ या निखिल वागळे संपादित पुस्तकाचं वर्णन ‘विजय तेंडुलकर नावाच्या माणसाचं आणि लेखकाचं देणं फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे,’ असं त्यांनी स्वत:च केलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात वागळे आणि मेघना पेठे यांनी ‘तेंडुलकर आमचे बाप आहेत’ असं म्हटलं होतं. या पुस्तकातल्या मेघना पेठे यांच्या लेखाचे नावही ‘माझा ‘मानद’ बाप’ असं आहे. त्यावरून या संग्रहाला तेच नाव दिलं असावं.
यात दिलीप प्रभावळकर, सदाशिव अमरापूरकर, दत्तप्रसाद दाभोळकर, जयंत पवार, राजू परुळेकर, युवराज मोहिते, कमलाकर नाडकर्णी, मेधा कुलकर्णी, हेमंत कर्णिक, रणधीर शिंदे यांचे लेख आणि वागळे यांनी घेतलेल्या तेंडुलकर-लागू यांच्या एकत्रित मुलाखतीचा समावेश आहे. यातल्या पहिल्या जवळपास अध्र्या लेखांचं स्वरूप अनुभव-आठवणीपर आहे. तर नंतर तेंडुलकरांची नाटकं, ललित लेखन आणि कथा यांच्याविषयी प्रत्येकी एक लेख आहे.








मेघना पेठे म्हणतात, ‘समाजाशी नाळेचं नातं असलेला आणि समाजमनाच्या नाडीचे ठोके नेमके मोजता येणारा हा लेखक..’ पेठेंचा हा लेखही उत्तम म्हणावं असं व्यक्तिचित्र आहे. दत्तप्रसाद दाभोलकर यांचा तब्बल 42 पानी लेख ‘पत्रांतून’ तेंडुलकरांचे काही मनस्वी पैलू उलगडून दाखवतो. बाकीच्या लेखांतूनही असाच एखाद-दुसरा पैलू पुढे येतो.








कमलाकर नाडकर्णी यांनी तेंडुलकरांच्या ‘चिमणीचं घर होतं मेणाचं’, ‘झाला अनंत हनुमंत’, ‘भाऊ मुरारराव’ या काही बिनगाजलेल्या नाटकांविषयी लिहिलं आहे. तेंडुलकरांची ‘घाशीराम कोतवाल’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे!’, ‘सखाराम बाइंडर’ ‘कमला’ आणि ‘बेबी’ ही पाच गाजलेली आणि खळबळजनक नाटकं. पण त्यांच्याविषयी न लिहिता नाडकर्णीनी या नाटकांवर लिहिलं आहे. हा स्तुत्य प्रयत्न आहे. पण हेमंत कर्णिक यांचा ‘कादंबरी-एक’ आणि ‘कादंबरी-दोन’ याविषयीचा आणि रणधीर शिंदे यांचा कथेविषयीचा लेख म्हणजे तेंडुलकरांचे लेखनातले नेमके योगदान काय हे न समजल्याचे पुरावे आहेत. रणधीर शिंदे यांच्या लेखाची सुरुवातच मुळी ‘गेल्या अर्धशतकातील मराठीतील एक श्रेष्ठ लेखक म्हणून विजय तेंडुलकरांना आपण ओळखतो,’ या पठडीबाज वाक्यानं होते. या लेखात मराठी समीक्षेची परिभाषा एवढी आहे की, त्यापेक्षा प्रत्यक्ष कथा वाचलेल्या बऱ्या असं वाटतं. मेधा कुलकर्णी यांचा लेख या पुस्तकात घेतला नसता तरी चाललं असतं, असं वाटतं.








तेंडुलकरांचं एक प्रसिद्ध वाक्य होतं, ‘प्रत्येक माणूस तुकडय़ा तुकडय़ांनी लहान किंवा मोठा असतो.’ या पुस्तकातूनही तेंडुलकरांच्या बापपणाचे काहीच तुकडे हाती लागतात. त्यामुळे किमान वाचनीय या पलीकडे पुस्तकाची कक्षा रूंदावत नाही. त्याचं कारण बहुधा हे सर्वच लेख पूर्वप्रकाशित आहेत. त्यातून एक सलगपणाचं पुरेसं समाधान मिळत नाही.








बापमाणूस - संपादक - निखिल वागळे
अक्षर प्रकाशन, मुंबई
पाने : 174, किंमत- 250 रुपये

Sunday, May 22, 2011

बंडखोरीचा `सविनय' उद्गार



ओसामा बिन लादेनची हत्या झाल्यापासून मुस्लिम समाजाविषयी, विशेषत: त्यातल्या कडव्या, धर्माध आणि दहशतवादी गटांविषयी पुन्हा काही एक प्रमाणीत चर्चा सुरू झाली आहे. पण ओसामाने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतले वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर्स पाडले, त्याच्या जेमतेम आठवभर आधीच याच देशात राहणा-या इरशाद मंजी या मुस्लिम महिला पत्रकाराने आजच्या इस्लामचं नेमकं काय बिघडलं आहे, याची चाचपणी करायला सुरुवात केली होती. त्यासाठी तिने टीव्ही, व्याख्यानं, चर्चासत्रं यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. http://www.muslim-refusenik.com/ ही वेबसाइटही चालवली आहे.






मंजी मूळची आफ्रिकेतली, पण ती चार वर्षाची असताना तिचं कुटुंब युगांडातून कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये स्थायिक झालं. वडील अतिशय कट्टर परंपरावादी आणि आई सश्रद्ध. पण उत्तर अमेरिकी वातावरणात मंजीमधली बंडखोर मुलगी घडत गेली. आपल्याला पडणारे प्रश्न इतरांना विचारायची मुभा तिला मिळत गेली. त्याला तिनं वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच वाचनाची, अभ्यासाची जोड दिली.
मंजीने इस्लामविषयी नेमकं कोणत्या प्रकारचं बंड पुकारलं आहे, याचंच हे पुस्तक आहे. ती स्वत:ला ‘मुस्लिम रिफ्युजनिक’ आणि आपल्या बंडखोरीला ‘सविनय बंडखोरी’ म्हणते. ‘मुस्लिम रिफ्युजनिक’ याचा खुलासा करताना मंजीनं लिहिलं आहे, धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा उद्घोष करणा-या सोविएत ज्यूंसाठी ‘रिफ्युजनिक’ हा शब्द वापरला गेला. कम्युनिस्टांनी त्यांना इस्त्रायलमध्ये स्थलांतर करायला विरोध केला व त्यांची रवानगी श्रमछावण्यात करून छळ केला. मंजी पुढे म्हणतात, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी गिळंकृत करणा-या इस्त्रायली लष्कराला विरोध करणारे नवे इस्त्रायली हेही ‘रिफ्युजनिक’च. यातून मंजीची भूमिका समजून घ्यायला मदत होते आणि तिचा कल नेमका कोणत्या दिशेला आहे हेही स्पष्ट होतं.




या पुस्तकात एकंदर दहा लेख आहेत. ते सर्वच एका परीने स्वानुभवपर आहेत. पण त्यांचा घाट मात्र पत्रासारखा, व्याख्यानासारखा आहे. पहिला लेख म्हणजे मंजीने मुस्लिम बांधवांना लिहिलेलं अनावृत पत्र आहे. त्याच्या सुरुवातीलाच तिने ‘‘हे श्रद्धावंतांनो, न्यायापासून कदापि ढळू नका आणि अल्लाहला स्मरून साक्ष द्या, मग ती स्वत:च्या, माता-पित्यांच्या, सगे-सोय-यांच्या विरोधात गेली तरीही..’’ हे कुराणातलं अवतरण दिलं आहे. आणि हाच या पुस्तकाचा लसावीमसावी आहे. इस्लाममध्ये धर्मचिकित्सा मान्य नाही आणि त्याविरोधातच मंजीचं हे पत्र आहे. ख्रिस्ती आणि ज्यू धर्मातल्या त्रुटींची चर्चा करणारी असंख्य पुस्तके आहेत मग ती मुस्लिम धर्मासंबंधी का नसावीत, हा तिचा सवाल आहे. पण याचं उत्तरही तिनं पुढच्या काही लेखांत देऊन टाकलं आहे. कुराणातल्या विसंगतीची आणि परस्परविरोधाची चर्चा केली आहे.




‘मी बंडखोर मुस्लिम कशी झाले?’ यात मंजीने आपली जडणघडण कशी होत गेली याची सविस्तर मांडणी केली आहे. इस्लामचं पालन करायचं की नाही, हे ठरवण्यासाठी त्याच्या गुणवत्तेची पारख करण्याची गरज मंजीला वयाच्या तेराव्या वर्षीच वाटू लागली. त्या दृष्टीने तिने शोधही घ्यायला सुरुवात केली. ते करताना ती प्रसिद्ध विचारवंत एडवर्ड सैद यांच्यावरही टीका करते. याचबरोबर सैद यांच्या ‘ओरिएण्टॅलिझम’ या पुस्तकाने पौवार्त्यांकडे बघण्याच्या पाश्चात्यांच्या दृष्टिकोनाची उत्तम मांडणी केली आहे. मंजी म्हणते की, सलमान रश्दी यांच्या ‘द सतानिक व्हर्सेस’ नंतर मुस्लिमांच्या श्रद्धांना आव्हान देणारं साहित्य पाश्चात्य देशात राहणाऱ्या मुस्लिमांकडून आणि पाश्चात्यांकडूनही लिहिलं गेलं. पण त्याची सैद यांच्या अनुयायांनी ‘ओरिएण्टॅलिस्ट’ (वंशवादी) म्हणून वासलात लावली. ‘सत्तर कोवळ्या कुमारिका’ या लेखात पाश्चिमात्य देशातही मुस्लिमांना बायलबलपेक्षा कुराणच श्रेष्ठ आहे, हे कसं सांगितलं जातं, इस्लाम हा ज्यू-ख्रिस्ती परंपरातून उदयाला आलेला असूनही इस्लाम हाच ‘खरा धर्म’ असं कुराण कसं सांगतं, कुराणातली स्त्रियांबद्दलची प्रतिकूल मतं यांची चर्चा आहे. ‘आपण विचार करायचं कधी थांबवलं?’ या लेखात ‘इज्तिहाद’ या मुस्लिम परंपरेचा मागोवा घेतला आहे. ‘कवाडे आणि कमरपट्टे’ हा लेख मात्र मंजीच्या इस्त्रायल भेटीचा वृतांत आहे.




‘फसवणूक कोण कुणाची करतंय?’ या लेखात पॅलेस्टाइन-इस्त्रायल यांच्यातल्या संघर्षाची चर्चा आहे. पॅलेस्टिनी लोक अरब जगतात शरणार्थी, नकोसे का झाले याची आणि झायोनिस्ट म्हणजे इस्त्रायलचं स्वतंत्र राष्ट्र स्थापन व्हावं, यासाठी युरोपात सुरू झालेली चळवळ यांचा आढावा आहे. इस्त्रायलचं अस्तित्व ज्यांना अमान्य होतं अशा अरब राष्ट्रांनी संघर्ष सुरू केला तेव्हापासून पॅलेस्टिनींची अवस्था बिकट झाली. म्हणून पॅलेस्टिनी हे अरब जगतातले ज्यू होत असे मंजी एके ठिकाणी म्हणते. ‘इस्लामचं छुपं अंग’ या लेखात इस्लमाच्या वंशवादाची काहीशी कठोर चिकित्सा आहे. कुराण हे अथपासून इतिपर्यंत खरोखरच ईश्वरलिखित आहे का, असा प्रश्न मंजीने उपस्थित केला आहे. इथे आणि अशाच इतर काही प्रश्नांच्या बाबतीत मंजी काहीशी गाफील राहिल्यामुळे तिच्याकडून अस्वीकृत प्रश्नांना स्वीकृत उत्तरं देण्याचा अनाहूतपणा घडला आहे.




इस्लामची कडवी आणि कट्टर वृत्ती ही त्याच्या टोळी प्रवृत्तीची खूण आहे, असा मंजी दावा करते. तिच्या मतानुसार इस्लामपुढे सध्या तीन प्रमुख आव्हानं आहेत आणि त्यांचा तातडीने सामना करायची गरज आहे. पहिलं, स्त्रियांच्या क्षमतेचा वापर करून मुस्लिम अर्थकारण पुन्हा सक्षम केलं पाहिजे. दुसरं, इस्लाममधल्या विविध विचारप्रवाहांना वाव देत, पैशाच्या जोरावर रुबाब करणा-या अरबांना धडा शिकवला पाहिजे. तिसरं, पाश्चात्यांच्या विरोधात नव्हे तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे. याच मार्गाने टोळी प्रवृत्तीला छेद देता येईल.




‘ऑपरेशन इज्तिहाद’ आणि ‘प्रामाणिकपणाला स्मरून’ हे दोन्ही प्रकरणं जरा सल्लेवजा झाली आहेत. पहिल्यामध्ये इस्लामी महिला उद्योजकांना साहाय्य करणं हाच इस्लाममध्ये बदल घडवून आणण्याचा मार्ग असून त्यासाठी काय करता येईल याचे सल्ले आहेत, तर ‘प्रामाणिकपणाला स्मरून’मध्ये युरोपिय देशांनी आणि गैर मुस्लिमांनी इस्लामी देशांशी व मुस्लिमांशी कसं वागावं याच्या सूचना आहेत.




‘थँक गॉड फॉर द बेस्ट’ हा शेवटच्या लेखात मंजीने स्वत:चे वेगवेगळे अनुभव आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोडक्यात मंजी मध्यममार्गी आहे. तिचा कुराणातल्या विसंगतींवर आक्षेप आहे, पण म्हणून तिला तस्लिमा नासरीनसारखा इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं काही वाटत नाही. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हेही तिला मान्य नाही. मात्र याचं समर्थन करण्यासाठी मंजी जे युक्तिवाद वापरते ते मात्र फार निर्णायक मानले जाण्याची शक्यता नाही. ती म्हणते, ‘महात्मा गांधींनी अहिंसेची-सत्याग्रहाची कल्पना हिंदू आणि जैन मूल्यांच्या आधारेच घेतली. दलाई लामांनी धर्माची बाजू घेतल्याबद्दल कुणी त्यांची निंदा केली नाही.’




ईश्वराच्या नावावर दहशतवाद आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करणं इस्लामने थांबवलं पाहिजे, हे मंजीने या पुस्तकात ठासून सांगितलं आहे. मुस्लिमांमध्ये टोळी वृत्तीची हुकूमशाही आहे. तिचा अधिक्षेप करायचा असेल तर कुराणाबाबतच शंका उपस्थित केल्या पाहिजेत. स्त्रियांबाबतचे कुराणातले अन्यायकारक तपशील, परस्परविरोधी विधानं आणि ज्यू द्वेष या शंकाही मंजीने काही प्रमाणात उपस्थित केल्या आहेत. पण कुराणाबाबत अशा शंका उपस्थित करणारी मंजी काही पहिलीच मुस्लिम नव्हे. याआधीही अनेकांनी हे काम केलं थोडय़ा प्रमाणात, दबक्या आवाजात केलं आहे. गैर मुस्लिमांच्या पुस्तकांची यादी तर मंजीनेच संदर्भसूचीमध्ये दिली आहे. पण त्यांच्या पुस्तकांना ‘वंशवादी’ म्हणणा-यांना मंजीच्या पुस्तकाबाबत मात्र तो आक्षेप घेता येणार नाही.




तिढा आजच्या इस्लामचा! : इरशाद मंजी
अनुवाद : रेखा देशपांडे, अक्षर प्रकाशन, मुंबई
पाने : 191, किंमत : 220 रुपये

Tuesday, May 10, 2011

शिकवणारे आणि घडवणारे शिक्षक



गोष्ट तशी दहा-पंधरा वर्षापूर्वीची आहे. मी नववी-दहावीत असेन. गावात शाळा नव्हती म्हणून वडिलांनी मामाच्या गावी शिकायला पाठवलेलं. पण हे गाव खरोखरच ‘मामाचं गाव’ होतं आणि तिथली शाळाही. कारण माझ्यासारखी इतरही बरीच मुली-मुलं मामाच्या घरी राहून शिकत होती. शाळा गावातल्याच एका कुलकर्णी नावाच्या माणसानं चालवलेली होती. तिचं नाव ‘श्रीसमर्थ माध्यमिक विद्यालय’.



गाव तसं लहान होतं. दोन-तीन हजार लोकवस्तीचं. शाळाही त्याला शोभेल अशी साधीशीच होती. ती एका मारवाडय़ाच्या जुन्या वाडय़ात भरायची. हा वाडा मातीचा होता. त्यामुळे चार-पाच दिवसांत आमचे पाय मातीनं माखू लागायचे. मग आम्ही शनिवारी शाळा सफाईची मोहीम राबवायचो. काही मुलं जवळच्या हापश्यावरून बादली-बादलीनं पाणी आणायची, काही आसपासच्या गोठय़ातून, मळ्यातून शेण आणायची आणि त्या त्या वर्गातल्या मुली आपापले वर्ग शेणानं सारवून घ्यायच्या. रविवारी सुट्टी. त्यामुळे दिवसभरात वर्ग छान सुकायचा. सोमवारी वर्गात एक छान सुगंध दरवळत असायचा.



शाळेतल्या शिक्षकांपैकी एक-दोन गावातले आणि दोन-तीन आसपासच्या गावातले होते. ते पायीच ये-जा करायचे. साकळगावाहून येणारे गाडेकर गुरुजी हिंदी हा विषय शिकवायचे. फार छान शिकवायचे. ‘हिंदी’च्या पाठय़पुस्तकात ‘बाढम् का निमंत्रण’ असा एक पाठ होता. तो त्यांनी इतकी मस्त शिकवला की, तो आम्हाला जवळपास तोंडपाठ होऊन गेला. त्यातला ‘कहाँ गोता मारू साब?’ या विधानात आम्ही ‘कहाँ गोटा मारू साब?’ असा बदल करून तो आमचा आवडता डायलॉग करून घेतला.



गणित-भूमिती शिकवणा-या शिक्षकांचं नाव होतं, अशोक जोगदंड. ते शेजारच्या येणोरे या गावाहून यायचे. अतिशय शांत आणि सज्जन माणूस. त्यांचा आवाज कधीही वाढत नसे. त्यांचं मोठं नवल होतं. बाकी सगळे शिक्षक हातात पाठय़पुस्तक घेऊन शिकवायचे. पण हे शिक्षक गणित-भूमिती हातात न घेता, प्रकरणच्या प्रकरणं शिकवायचे. त्यात कधीही गडबड व्हायची नाही. आम्हाला वाटायचं, रोज घरून येताना पाठय़पुस्तक वाचून येत असावेत. जोगदंड मास्तरांची मुलगी आमच्या वर्गातच होती, पण तिला विचारणार कसं? दुसरी गोष्ट म्हणजे, जोगदंड मास्तर इतके साधेसुधे होते की, विचारता सोय नाही. त्यांच्या कपडय़ांना कधीही इस्त्री नसायची. कधी कधी तर शर्ट-पँट उसवलेलीही असे. त्यावर घरीच पत्नीनं कशीतरी ओबडधोबड टीप मारलेली असे. पायात कायम चप्पल आणि हाता-पायाला कुठे तरी चिखल लागलेलाच. कारण ते थेट शेतातूनच शाळेत आलेले असायचे. म्हणजे शाळेत आले की, शिक्षक, बाहेर पडले की, शेतकरी अशाच भूमिकेत ते असत. शिकवायचे मात्र उत्कृष्ट. पण आम्ही विद्यार्थी तसे मठ्ठच. त्यांनी शिकवलेलं समजलेलं असलं तरी काही गणितं ‘सर, हे नीट समजलं नाही, जरा परत सांगता का?’ म्हणत आम्ही सोडवून घेत असू. हा प्रकार वर्गातील चार-पाच मुलं आलटूनपालटून करत. त्यामुळे त्यांनी आम्ही सोडवायला दिलेली जवळपास सर्व गणितं आम्ही त्यांच्याकडूनच सोडवून घेत असू. या आमच्या कटात त्यांच्या मुलीचाही समावेश असे. हा प्रकार त्यांना समजत असावा, पण त्यांनी कधी तसं दाखवलं नाही.





तिसरे शिक्षक हे शाळेतल्या सर्व मुला-मलींचे अतिशय आवडते शिक्षक होते. त्यांचं नाव एस.पी. सर. ते शाळेचे मुख्याध्यापकही होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व रूबाबदार होतं. वाचनही दांडगं होतं. त्यांच्या हातात सतत पुस्तक असायचं. त्यातले उतारे ते आम्हाला वाचून दाखवायचे, त्या लेखकाबद्दल माहिती सांगायचे. एस.पी. सर आम्हाला मराठी आणि विज्ञान हे दोन विषय शिकवायचे. फार सुंदर शिकवायचे. त्यांच्या तासाला आम्ही सर्वात खूश असायचो. कारण ते मराठीतल्या अनेक लेखकांबद्दल, त्यांच्या पुस्तकांबद्दल सांगायचे. त्या एवढय़ाशा खेडेगावात आम्हाला पाठय़पुस्तक विकत घ्यायचीच मारामार मग कथा-कादंबऱ्या कुठून घेणार? ग्रंथालय नावाची गोष्ट गावातल्या कुणाच्या खिजगणतीत नसल्यानं त्या संस्थेची आम्हाला ओळखही नव्हती. पण एस.पी. सरांच्या घरी मात्र खूप पुस्तकं होती. ते ती आम्हाला कधीकधी वाचायलाही देत.





..तर एस. पी. सर एकदा ‘युवकभारती’मधला ‘उपास’ हा धडा शिकवत होते. तो पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला होता. पण हे देशपांडे कोण हे आम्हाला काही माहीत नव्हतं. त्यामुळे एस. पी. सरांनी सुरुवातीलाच सांगितलं. म्हणाले, ‘महाराष्ट्रातल्या ज्या माणसाला पु.ल. देशपांडे हे नाव माहीत नाही, तो मूर्ख आहे असं खुशाल समजावं.’ ‘मूर्ख’ हे विशेषण आधीच आमच्यासाठी खूप अपमानजनक झालं होतं. कारण आमची शाळा, श्रीसमर्थ. त्यामुळे रोज प्रार्थनेबरोबर स्वामी समर्थाचे चार श्लोक म्हणावे लागायचे. शिवाय जांबसमर्थ हे त्यांचं जन्मगाव आमच्यागावाशेजारीच. त्यामुळे रामदास स्वामींबद्दल खूप प्रेम आणि आदर. पण त्यांनी मूर्खाची बत्तीस लक्षणं लिहून ठेवली आणि आम्हाला शालेयवयात त्याचा मोठा मनस्ताप झाला. सालं, रोज आमच्या वर्गातल्या एकाकडून तरी काही ना काही चूक व्हायचीच. मग एस.पी.सर त्यांच्या धीरगंभीर आवाजात म्हणायचे, ‘राजे! आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलेली बत्तीस लक्षणं जशीच्या तशी लागू पडतात. इतक्या परफेक्ट मॅचिंगबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन.’





हे अभिनंदन ज्याच्या वाटय़ाला यायचं त्याचे पुढचे दोन-तीन दिवस फार वाईट जायचे. बिचारा एकदम कानकोंडा होऊन जायचा. पण आमच्यापैकी कुणीही त्याला चिडवायचं नाही, कारण उद्या-परवा ती पाळी आमच्यातल्या कुणावरी तरी यायचीच. पण एवढं सोडलं तर बाकी एस.पी. सर आमच्यावर प्रेमही तेवढंच करायचे. त्यामुळे ते आमचे लाडकेच आणि आम्हीही त्यांचे.







पुढे मी बारावीनंतर पुण्यात शिकायला आलो. एस.पी. कॉलेजमध्ये इंग्रजी शाखेत गेलो. पण तिथल्या तीन वर्षात एकही शिक्षक मला एक दिवसापुरताही आवडला नाही. सारे आपले येणार तो-यात, शिकवणार तो-यात आणि जाणार तेही तो-यातच. दोन शिक्षिका तर फारच फॅशनेबल आणि नखरेल होत्या. विभागप्रमुखही आग्यावेताळ म्हणावे असेच. पाठय़पुस्तकंही या शिक्षकांसारखीच रटाळ. तेव्हा मला पडलेला प्रश्न अजूनही सुटलेला नाही. माझ्या शाळेतल्या शिक्षकांना तशा पाहिल्या तर कुठल्याच सुविधा नव्हत्या. सकाळी नऊ ते चार या वेळात पाच-सहा वर्गाना शिकवावं लागे. खाजगी संस्था असल्याने त्यांचे पगारही वेळेवर व्हायचे नाहीत. कॉलेजातल्या शिक्षकांना मात्र सुविधांचा सुकाळ. पगार भरपूर. एसी केबिनपासून प्यूनपर्यंत सारं दिमतीला. शिवाय दिवसभरात फक्त एक नाही तर दोन लेक्चर्स. पण तीही ते धड शिकवत नसत. या कॉलेजातल्या शिक्षकांमुळे नुकसान काही झालं नाही हे खरं, पण शाळेतल्या शिक्षकांसारखं प्रेम आणि आदर त्यांच्याबद्दल कधी वाटला नाही.