Sunday, September 25, 2011

बोलकी नव्हे, कर्ती माणसे !



( माझ्या 'कर्ती माणसे' या पुस्तकाची छपाई चालू आहे. पुस्तक संपादित असून त्यात महाराष्ट्रातील २४ सामाजिक कार्यकर्ते यांच्याविषयी लेख आहेत. या पुस्तकाला मी लिहिलेली ही प्रस्तावना. )

सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांनी बोलके सुधारकआणि कर्ते सुधारकअसे सुधारकांचे दोन वर्ग केले आहेत. जेव्हा बोलक्या सुधारकांचा संप्रदाय फोफावतो, तेव्हा कर्त्या सुधारकांची गरज निर्माण होते. महाराष्ट्रातल्या दुर्गम, आदिवासी भागांत, शहरांच्या बकाल वस्त्यांमध्ये काम करणारे कार्यकर्ते ते संतुलन राखण्याचे काम आपल्यापरीने करत असतात.
1960 ते 80 या काळात महाराष्ट्रातली तरुण पिढी समाजबदलाच्या ध्येयाने झपाटून गेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून बारा-तेरा वर्षे झाली होती. त्यामुळे उज्ज्वल आणि संपन्न भारताची स्वप्ने पाहणारी आधीची पिढी आणि विशी-बाविशीची तरुण पिढी स्वप्नाळू होती. पण स्वतंत्र भारताची सुरुवातीची पंधरा-सोळा वर्षे मोठी धामधुमीची होती. त्यातच 1962च्या युद्धात भारताला चीनकडून पराभवाची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यानंतर अशा नामुष्कीची एक मोठी मालिकाच घडत गेली. 64 साली भारताचे आशास्थान असणाऱया नेहरूंचे निधन झाले. 65 साली पाकिस्तानबरोबर युद्ध झाले. ताश्कंदमध्ये दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिकपणे निधन झाले. त्यातच 67-68 साली उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले.
 साधारणपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. फिडेल, कॅस्ट्रो, चे गव्हेरा हे तरुणाईचे हिरो म्हणून पुढे येत होते. तर शेजारच्या पाकिस्तानमध्ये लष्कराचे वर्चस्व वाढत होते आणि पूर्व पाकिस्तानमध्ये बरेच अराजक माजले होते.
या साऱया परिस्थितीचा आणि अस्वस्थतेचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. ‘युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी आयडेंटिटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढीअसे त्या वेळच्या तरुण पिढीचे वर्णन करतात. ‘भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज आहे. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक क्रांती आणि मग सर्वांगीण क्रांती करायची,’ असा मूलमंत्र काही जाणत्या लोकांनी तरुणाईला दिला. त्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. त्यातून महाराष्ट्रभर तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळी उभी राहिली.
1990 नंतर मात्र भारताने आर्थिक उदारीकरणाचा पुरस्कार केला. त्यातून पुन्हा एकदा मोठी सामाजिक घुसळण सुरू झाली. याच काळात सामाजिक चळवळीच्या आणि सामाजिक कार्याच्या व्याख्या बदलायला सुरुवात झाली. एमएसडब्ल्यूचे शिक्षण देणाऱया संस्था निघाल्या, त्यात नवे कार्यकर्ते तयार होऊ लागले. त्यातले काही तरुण आधीच्या सामाजिक चळवळींमध्ये तर बरेचसे एनजीओजमध्ये दाखल होऊ लागले. सामाजिक कार्याचेच मोठय़ा प्रमाणावर एनजीओकरण होऊ लागले. प्रश्नांना थेट भिडून संघर्ष करण्याऐवजी त्यांचे प्रदर्शन करण्याकडे कल वाढू लागला. त्यामुळे दूर कुठेतरी दुर्गम भागात काम करणाऱया संस्था-व्यक्तींकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यांचे प्रश्न प्रसारमाध्यमांमधून दुर्मीळ होऊ लागले. आणि हा बदल सर्वच क्षेत्रांमध्ये होऊ लागला. याच काळात हिंदी चित्रपटांमधून खेडी गायब होऊ लागली, समांतर चित्रपटांची चळवळ थंडावली. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे तळागाळातल्या समाजासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेने झपाटलेले मध्यमवर्गीय तरुण करिअरिस्ट होऊ लागले. एकंदर मध्यमवर्गानेच स्वतःला इतर समाजापासून तोडून घ्यायला सुरुवात केली. तो जागतिकीकरणाचा लाभार्थी आणि पुरस्कर्ता झाला. त्याच्या इच्छा-आकांक्षांना महत्त्व येऊ लागले. आणि त्याचीच प्रसारमाध्यमांपासून सरकारपर्यंत सर्वजण दखल घेऊ लागले.
थोडक्यात 90च्या दशकात महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींना उतरती कळा लागली. या धबडग्यात अनेकजण निराश झाले, बाहेर पडले, तर काहींनी मात्र आपला आशावाद जागता ठेवत आपले काम चालूच ठेवले. पण त्यांच्याबद्दलची समाजाची आस्था कमी होत गेल्याने त्यांचा आवाज क्षीण झाला.

या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी साहित्यिकांची उमेद वाढवण्यासाठी महाराष्ट्र फाउंडेशनने 1994 साली  ‘साहित्य पुरस्कार योजनातर सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 1996 पासून समाजसेवा गौरव पुरस्कारया योजना सुरू केल्या.
पहिल्या वर्षी चार समाजकार्य पुरस्कार सुरू केले. प्रत्येकी 50 हजार रुपये आणि मानचिन्ह असे त्यांचे स्वरूप ठरवण्यात आले. या पुरस्कारासाठी संस्था व व्यक्ती यांच्या नावांचा विचार करताना पुढील बाबी विचारात घेण्याचे ठरले
1) सामाजिक संस्था व व्यक्ती आपले कार्य व विचार यांच्या साहाय्याने विवेकनिष्ठा व वैज्ञानिक दृष्टी, सामाजिक न्याय ही मूल्ये रुजवण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करत आहेत.
2) पर्यावरण-संतुलनाचा ध्यास घेऊन संशोधन, प्रयोग, लोकशिक्षण, जनसंघटन यांसारख्या विविध मार्गांनी ज्या व्यक्ती अविरत कार्य करत आहेत.
3) ज्या व्यक्तींच्या कार्यामुळे महिलांयांमध्ये स्वावलंबन व स्वातंत्र्याविषयीच्या जाणिवा वाढत आहेत आणि अन्यायाविरुद्ध झगडण्याची इर्ष्या जागृत होत आहे.
2005 पासून ज्येष्ठ कार्यकर्त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाऊ लागला, तर 2008 पासून तरुण कार्यकर्त्यांसाठी युवा पुरस्कार सुरू करण्यात आला.
या योजनेला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंधरा वर्षांत 70 व्यक्तींना आणि 17 संस्थांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे या हेतूने हा लेखसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे. मात्र 70 व्यक्तींविषयीच्या एकूणएक लेखांचा समावेश करणे शक्य नव्हते. ते व्यवहार्यही नव्हते. शिवाय त्यापैकी काही आता हयात नाहीत तर काहींचे काम वयोपरत्वे थांबले आहे. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या निवडक 24 व्यक्तींचाच यात समावेश आहे.
फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित होणारी मंथनही अतिशय देखणी स्मरणिका हे या योजनेचे सुरुवातीपासूनच वैशिष्टय़े राहिले आहे. त्यामुळे प्रस्तुत संग्रहातील जवळपास सर्वच लेख मंथनच्या स्मरणिकांमधून घेतलेले आहेत. मात्र या लेखांमध्ये नव्याने काही मजकुराची भर टाकण्यात आली, त्यांचे पुनर्लेखन करून घेण्यात आले. त्यामुळे काही लेख अद्ययावत झाले आहेत. सय्यदभाई यांच्या दगडावरची पेरणीया पुस्तकाला विशेष पुरस्कार मिळाला. ते त्यांचे आत्मकथन नसून कार्यकथनआहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्यालाच आहे, त्यामुळे त्यांचाही समावेश यात केला आहे. सय्यदभाई यांच्याविषयीचा लेख सुभाष वारे यांनी नव्याने लिहून दिला. या संग्रहातील सर्वच लेखकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार. तसेच या संग्रहाची कल्पना सुरुवातीपासून उचलून धरणारे पुरस्कार योजनेचे प्रवर्तक सुनील देशमुख आणि लोकवाङ्मय गृहाचेचे प्रकाश विश्वासराव यांचेही आभार. ‘लोकवाङ्मयआणि केशव गोरे ट्रस्ट यांनी या पुरस्कारांची कार्यवाही 12-13 वर्षे केली. मागच्या दोन वर्षांपासून ती साधना ट्रस्टकरत आहे. त्या सर्वांचे लेखांच्या संमतीबद्दल आभार.
या संग्रहातले सर्वच लेख हे त्या त्या व्यक्तींना पुरस्कार मिळाल्यावर लिहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा परिचय आणि गौरव हाच त्यामागचा प्रधान हेतू आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन आणि विश्लेषण अपेक्षित नव्हते. त्यामुळे प्रस्तुत संग्रहाचे संपादन करतानाही ते अपेक्षित नव्हतेच.
मात्र निवडलेल्या सर्वच व्यक्ती आणि त्यांचे काम परस्परांहून भिन्न आणि वैशिष्टय़पूर्ण आहे. यात आठ महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यांची संख्या पुरुष कार्यकर्त्यांपेक्षा निम्मी असली तरी त्यांचा लढाऊ बाणा पाहता त्या पुरुषांइतक्याच सक्षमपणे काम करत आहेत हे लक्षात येईल. मग ते उल्का महाजन-सुरेखा दळवी यांचे सेझविरोधी आंदोलन असो की भुरीबाई शेमळे, पूर्णिमा मेहेर यांचे आदिवासींसाठीचे काम असो. संग्रहातील सर्वाधिक म्हणजे दहा व्यक्ती विदर्भातील आहेत. याशिवाय तिस्ता सेटलवाड, आनंद पटवर्धन यांच्यासह बस्तू रेगे, काळूराम दोधडे, प्रतिभा शिंदे हेही आहेत. म्हणजे आदिवासी-दुर्गम भागातील लोकांसाठी काम करणारे आणि शहरांतील धार्मिक सलोख्यासाठी, न्यायासाठी झगडणारे अशा सर्वांची इथे मांदियाळीआहे. थोडक्यात, दुर्गम खेडे ते शहरांच्या मध्यवस्त्या या दोन्ही ठिकाणी कामाची गरज असते आणि आहे, हेच या व्यक्तींच्या कामातून अधोरेखित होते.

समाजबदल आणि सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत चार घटक महत्त्वाचे असतात. 1) राजकारण, 2) प्रशासन, 3) प्रसारमाध्यमे आणि 4) सामाजिक संस्था वा व्यक्ती.
1) राजकारण ः राजकारणातले पक्ष, संघटना आणि व्यक्तींना येनकेनप्रकारे सत्ता हस्तगत करायची असते. त्यासाठी त्यांना समूहाचा विचार करावा लागतो. तुलनेने लहान समूह वा समाजगट त्यांना निवडणुकीत यश मिळवून देत नाहीत. शिवाय भारतीय समाज जात, वर्ग, माझं गाव, माझं शहर असा विभागला जातो. त्यामुळे निवडणुका, मतदान याकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जास्त लक्ष असते.
2) प्रशासन ः प्रशासनातही प्रामुख्याने समूहाचाच विचार केला जातो. प्रत्येक विषयासाठी अगदी सामान्य पातळीवर जाऊन काम करणे प्रशासनाला शक्यही नसते. तसा प्रयत्न झाला तरी दोन-चार वर्षांनी नोकरी बदलणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांना त्या कामाबाबत तेवढी आस्था राहत नाही. शिवाय त्यांच्या काम करण्याला मर्यादा असतात. त्यांना ढोबळमानाने पाहावे लागते.
3) प्रसारमाध्यमे ः प्रसारमाध्यमांनाही प्रामुख्याने आपला वाचक वा प्रेक्षक कोण आहे, कुठल्या भागातला आहे हे पाहावे लागते. तो मुख्यतः महानगरांमध्ये एकवटलेला असल्याने त्यांना आवडेल, रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने पत्रकारिता करावी लागते. शिवाय जो विषय चर्चेत आहे त्याविषयी सजग राहावे लागते. सातत्याने एकच प्रश्न वा विषय लावून धरता येत नाही. कारण प्रेक्षक-वाचक त्याला कंटाळतात.
4) सामाजिक संस्था वा व्यक्ती ः आदिवासी, भंगी, कचरा कामगार, खाण कामगार अशा काही विषयांत काम करणे आवश्यक असते. पण इतक्या खोलात जाऊन त्या विषयाच्या कानाकोपऱयांना भिडणे राजकारणी, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे यांना शक्य नसते. ते फक्त सामाजिक काम करणाऱया व्यक्ती वा संस्थांनाच शक्य असते. त्यामुळे वरच्या तिन्ही घटकांची मर्यादा हेच त्यांचे मोठे बलस्थान असते. या व्यक्ती वा संघटना एकेक प्रश्न हातात घेऊन तो धसाला लावू शकतात. त्यांचे उद्दिष्ट एका अर्थाने काहीसे मर्यादित असल्याने ते त्याभोवतीच आपली सर्व ऊर्जा एकवटतात. त्यासाठी वरच्या तिन्ही घटकांशी लढा देऊन स्वतःच्या मागण्या पदरात पाडून घेण्याचे काम करतात, स्वतःची दखल घ्यायला भाग पाडतात. आपले उभे आयुष्य तळागाळातल्या लोकांसाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी खर्च करतात. त्यासाठी सातत्याने संघर्ष करत राहतात. ज्यांचे प्रश्न कुणी उचलून धरणार नाही अशा लोकांसाठी काम करतात. म्हणून ते उल्लेखनीय आणि अनुकरणीय ठरते.
प्रस्थापित ध्येयधोरणांविरुद्ध बंडखोरी पुकारून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करणारी ही कर्ती माणसंआहेत. त्यांनी हा निर्णय झपाटलेपणातून घेतलेला आहे. विकासाचा वाटा तळागाळातल्या लोकांना मिळावा, त्यांच्या आयुष्यातही स्वातंत्र्याची पहाट यावी यासाठी त्यांनी स्वतःला त्यांच्या वतीने पणाला लावले आहे. आपल्या सुखवस्तू जीवनावर आणि भौतिक सुखसोयींवर तुळशीपत्र ठेवले आहे. अर्पणपत्रिकेमध्ये म. गांधींनी सांगितलेली सात सामाजिकपापकर्मे दिली आहेत. प्रस्तुत संग्रहातील सर्वच कार्यकर्ते त्या पापकर्मांच्या विरोधात आपापल्या परीने झगडत आहेत.
रचनात्मक संघर्षाचा हा आविष्कार अनुकरणीय आहे. तशी प्रेरणा हे पुस्तक वाचणाऱया प्रत्येकाला मिळो. ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री लावणेअशी इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी सामाजिक नीतिमत्ताया शब्दाची व्याख्या केली आहे. त्या न्यायाने हे नीतिमत्ता जोपासणारे कर्तेलोक आहेत. सामाजिक नीतिमत्ता ही सार्वजनिक चारित्र्याचीही पूर्वअट असते. या संग्रहातील कर्त्या माणसांचे वेगळेपण आहे ते या अर्थाने.
(प्रकाशक लोकवांगमय गृह, भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई-२५. फोन-०२२-२४३६२४७४, किंमत - २०० रुपये.)

Saturday, September 24, 2011

आणखी एक ‘कन्नड टागोर’!


इतिहासाची जाण नसणं हे न्यून मानण्यालाच कंबार यांचा आक्षेप होता. त्यांच्या मते ब्रिटिशांसमोर आपण स्वीकारलेल्या बौद्धिक शरणागतीमुळेच इतिहासाच्या चौकटीबाहेरचं जगणं आपल्यालाही लांच्छनास्पद वाटू लागलं.
पाश्चात्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपणही आपल्या भूतकाळाचे अवशेष मांडून ठेवण्यासाठी संग्रहालयं उभारली, पण मुळात आपण आपला भूतकाळ आपल्या वर्तमानातून जगणारी माणसं होतो. कंबार सांगतात, इतिहासाची ब्रिटिश व्याख्या स्वीकारल्यामुळेच आपण आपलंच साहित्य शतखंडीत रूपात पाहू लागलो आहोत. 
  - शशी थरुर, 2003

कंबार हे दुर्मिळ साहित्यदृष्टी लाभलेले असे  साहित्यिक आहेत, ज्यांनी स्थानिक लोकसमूहांनी जपलेली विश्वात्मकता जाणली. ते नव्या पुराणांचे रचनाकार आहेत.
- यू. आर. अनंतमूर्ती, 2011

कन्नड साहित्य हे अखिल भारतीय साहित्यात सर्वात मानाचं, सुप्रतिष्ठित, चर्चेतलं आणि दर्जेदार मानलं जातं. एकविसाव्या शतकातल्या इंटरनेट, वेबसाईटस आणि गुगल यांचा भारतात कुणी सर्वाधिक उपयोग करून घेतला?असेल तर तो हिंदी आणि कन्नड या दोन भाषांनी. हिंदीतल्या तर जवळ जवळ एकूण एक मासिकांच्या वेबसाईट आहेत, नवं लेखन सातत्यानं ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं. अनेक लेखक-पत्रकार नियमितपणे ब्लॉग लिहितात. असंच कन्नडबाबतही आहे. मराठी मासिकं आणि मराठी साहित्यिक यांना वेबसाईट आणि ब्लॉग यांची दुनिया अजून अपरिचितच आहे.
 
आजवर सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार कन्नड साहित्यिकांनाच मिळाले आहेत. कुप्पली वेंकटआप्पा पुटप्पा (कुवेंपू) (1967), द. रा. बेंद्रे (1973), के. शिवराम कारंथ (1977), माटी व्यंकटेश अय्यंगार (1983), व्ही. के. गोकाक (1990), यू. आर. अनंतमूर्ती (1994), गिरीश कार्नाड (1998) आणि नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्काराचे मानकरी चंद्रशेखर कंबार (2010).
 
चंद्रशेखर कंबार यांची ओळख कवी, नाटककार, कादंबरीकार, लोककथाकार, फिल्ममेकर आणि संगीतकार अशी बहुविध आहे. कंबार यांचे साहित्य लोककलेचा वारसा सांगणारं आहे. उत्तर कर्नाटकातल्या लोककथा आणि मिथकथा यांचा त्यांच्या लेखनावर प्रभाव दिसतो. कंबार बालपणापासून लोकनाटय़ाशी संबंधित आहेत. माणसांचं जगण-वागणं त्यांनी आपल्या नाटकांमधून समर्थपणे उभं केलं आहे. त्यामुळे समकालीन भारतीय रंगभूमीनं त्यांच्या अनेक नाटकांची दखल घेतली आहे. ‘महामाई’, ‘गाणं पंचरंगी पोपटाचं’, ‘कहाणी वाघाच्या सावलीची’, ‘श्रीचंपा’ अशा त्यांच्या काही नाटकांचे मराठी अनुवाद झाले आहेत.
 
कंबार हे कन्नडमधील    द. रा. बेंद्रे यांच्यानंतरचे महत्त्वाचे द्रष्टे कवी आहेत. कंबार यांच्या नावावर 21 नाटकं, 8 कवितासंग्रह, 3 कादंब-या, 12 संशोधनपर लेखसंग्रह अशी विपुल ग्रंथसंपदा आहे. ‘संगीथा’, ‘सांग्या बाल्या’ आणि ‘सिंगरेव्वा मट्ट् अरमाने’ या त्यांच्या तीन पुस्तकांवर चित्रपट झालेले आहेत, तर ‘काडू कुदुरे’ (जंगली घोडा) या चित्रपटाचे दिग्दर्शन कंबार यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक लघुपट बनवले आहेत. अनेक ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शनही केले आहे. कंबार यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये दोन वर्षे अध्यापन केले. त्यानंतर बेंगलोर विद्यापीठात वीस वर्षे अध्यापन केले, हम्पी विद्यापीठाचे ते संस्थापक कुलगुरू झाले. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे चेअरमन, कर्नाटक नाटक अकादेमीचे संचालक अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. कबीर सन्मान, कालिदास सन्मान, टागोर साहित्य सन्मान, संगीत नाटक अकादेमी पुरस्कार, साहित्य अकादेमी पुरस्कार, पद्मश्री आणि ‘काडू कुदुरे’च्या गीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक सन्मानही त्यांना मिळाले आहेत. यावरून कंबार यांच्या सर्वस्पर्शी संचाराचा अंदाज यायला हरकत नाही. ‘आयुष्यभर केवळ लेखन, वाचन, मनन करणे ही समाजविकृती आहे’ असं इतिहासकार शेजवलकर यांनी म्हटलं आहे. ही समाजविकृती कन्नड साहित्यिकांमध्ये दिसत नाही. कंबारही त्याला अपवाद नाहीत.
 
सर्वच कन्नड साहित्यिक आपल्या मातृभाषेचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. अनंतमूर्ती, भैरप्पा, कार्नाड आणि कंबारही. शालेय शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे, असा त्यांचा आग्रह असतो आणि आहे. त्यासाठी ते आपल्यापरीने प्रयत्नही करतात. शासन व्यवस्थेशी पंगा घेण्याची तयारी दाखवतात. ही ‘कन्नडिगा वृत्ती’ अनुकरणीय आहे.
 
टागोरांइतक्याच सर्वस्पर्शी प्रतिभेची देणगी लाभलेला माणूस म्हणून ‘यक्षगान’कर्ते के. शिवराम कारंथ यांचं वर्णन रामचंद्र गुहा यांनी ‘कन्नड टागोर’ असं केलं आहे. चौफेर मुशाफिरी करणारे चंद्रशेखर कंबार हेही कारंथांसारखा लोकसंस्कृतीचा वारसा आपल्यापरीने सांगत आलेत. त्यामुळे त्यांना दुसरा ‘कन्नड टागोर’ असं म्हटलं तर त्यात फारशी अतिशयोक्ती होईल असं वाटत नाही. कारण कुठलंही साहित्य हे त्या त्या प्रदेशाच्या इतिहास, भूगोल, संस्कृती, लोककला, मिथकं, परंपरा, आदर्श, प्रेरणा यांच्या सामीलकीतूनच निर्माण होत असतं. त्याचा नाद केवळ कंबार यांच्या लेखनातूनच नव्हे तर कन्नडमधल्या अनेक साहित्यिकांच्या लेखनातून येतो. त्यामुळेच कन्नड साहित्य हे भारतीय भाषेतलं सर्वोत्तम साहित्य आणि कन्नड भाषा ही अभिजात भाषा ठरते. कंबार त्याच परंपरेचे पाइक आहेत. लेखन ही त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा आहे. ज्ञानपीठ मिळाल्यावर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली तीही मार्मिक होती. ते म्हणाले की, ‘लेखकाला असे वाटत असेल की, त्याचे लेखन त्याला पूर्णपणे समाधान देते आहे, तर त्यानं लेखन थांबवलं पाहिजे. मला अजून तसं वाटत नाही. म्हणून मी लिहितो.’
 
भारतीय समाजाचं असं एक वैशिष्टय़ं आहे की, त्याला सगळ्याच गोष्टींमध्ये काहीतरी तिरपागडं दिसत असतं. निदान तसं तो शोधून तरी काढतोच. त्यामुळे केवळ पुरस्कारावर लेखनाचा दर्जा अवलंबून असतो का, असं कृतक समाधान काही लोक करून घेतात. पण कृतघ्नतेच्याही अनेक गोष्टी, विरोधाभास भारतीय समाजामध्ये दिसतात. त्यामुळेच ‘मानवी अनुभवातील सर्वात गौरवास्पद आणि सर्वात घृणास्पद असं जे जे काही आहे ते भारतात आढळतं’ असं पं. नेहरूंनी म्हटलं होतं. भारत हे एक अस्वाभाविक राष्ट्र आहे. विविध भाषा, विविध धर्म, विविध पंथ-वर्ग, विविध जाती-जमाती यांचं कडबोळं म्हणावं असा भारत आहे. पण ‘विविधेतत एकता’ या समानसूत्रावर भारताची सांस्कृतिक उभारणी झालेली आहे. त्यात सर्वात मोठा वाटा आहे, तो लोककलेचा. चंद्रशेखर कंबार नाटककार आणि कवी म्हणून या लोककलेचा वारसा सांगत आले आहेत. त्या समृद्ध वारश्याची जपणूक करत आले आहेत. भारतीय समाजाला आणि संस्कृतीला कशाचं अगत्य आहे, त्यांच्या स्वागतशील वृत्तीचं नेमकं गमक काय, या प्रश्नाचं खणखणीतपणे आणि अगदी ठासून सांगावं असं उत्तर आहे, लोककला. 

 इतरांना सतत नाकं मुरडणाऱ्या मराठी साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या लोककलेला असं व्यासपीठ मिळवून दिलं आहे का? मराठी नाटककारांनी अशी लोककलेच्या वारशाची जपवणूक केली आहे का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीतरी मिळायला हवी की नको? आपल्याकडे रा. चिं. ढेरे आणि तारा भवाळकर हे दोनच लोककलेचे संशोधक-अभ्यासक. बाकी लोककलेचा अभ्यास होणार तो विद्यापीठीय पातळीवर आणि त्याचा परिघ विद्यापीठाच्या आवारापुरताच, असाच महाराष्ट्राच्या लोककलेचा आलेख असेल तर महाराष्ट्राला कन्नडकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.

Saturday, September 17, 2011

दिवाळी अंकांची सांस्कृतिक रडकथा

(१८ सप्टेम्बर २०११ च्या प्रहार, कोलाज मधील लेख.)

सध्या मराठी साहित्य व्यवहारात मोठी धांदल सुरू आहे. लेखकांपासून बाइंडरपर्यंत सारे जण दिवाळी अंकांसाठी रात्रंदिवस खपत आहेत. कारण दिवाळी अंकांच्या निमित्ताने मराठी ग्रंथव्यवहारात मोठी उलाढाल होते. प्रस्थापित लेखकांपासून नवोदितांपर्यंत कितीतरी लेखक, संपादक, चित्रकार, मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते, जाहिरातदार कामाला लागतात. लेखकांच्या सर्जनशीलतेला, चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटतात; संपादकांची कौशल्ये पणाला लागतात, तर मुद्रक, बाइंडर, वितरक, विक्रेते यांना रोजगार मिळतो. कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक होते. आणि या सर्वाचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रातील तमाम रसिक वाचकांना दोन-अडीच महिने ‘वाचनानंदा’त मनसोक्त डुंबण्यासाठी, हुंदडण्यासाठी एक मोठा अवकाश उपलब्ध करून दिला जातो.
 
महाराष्ट्राच्या विविध भागांतून साधारणपणे 400-500 दिवाळी अंक प्रकाशित होतात. महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरूनही काही अंकांचे प्रकाशन केले जाते. समाजातील बहुविध वाचकवर्ग आणि त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन हे अंक काढले जातात. त्यामुळे या अंकांचे त्यांच्या प्रकारानुसार आणि वाचकानुसार काही गट पडतात. उदा. निखळ वाङ्मयीन, दैनिक-साप्ताहिकांचे, चळवळीची मुखपत्रे, ज्योतिष, धार्मिक-आध्यात्मिक, गुन्हेगारी-रहस्यकथा, आरोग्य, उद्योग-व्यापार, पर्यटन, पाककला, महिला, बाल-किशोर आणि चित्रपट-खेळ इत्यादी.
 
मात्र, गेल्या काही वर्षातल्या दिवाळी अंकांवर नजर टाकल्यावर काय लक्षात येते? अगदी स्पष्टपणे सांगायचे तर अलीकडच्या काही वर्षामध्ये दिवाळी अंकांमध्ये प्रचंड साचलेपण आले आहे. याची जाणीव काहींना आहेही; नाही असे नाही. ‘मौज’मध्ये आता कुठलीच ‘मौज’ उरली नाही. इतक्या वर्षानंतरही ‘मौज’चा फॉर्म्युला काही बदलत नाही आणि सुशेगात वृत्तीही. ‘ललित’ व ‘दीपावली’मध्येही आता फारसा दम राहिला नाही. ‘अक्षर’चे काम निखिल वागळे पाहात नसल्याने त्याची गाडीही घसरली आहे. ‘कालनिर्णय’च तेवढा तग धरून आहे. सदा डुंबरे निवृत्त झाले आणि ‘साप्ताहिक सकाळ’ची चांगल्या दिवाळी अंकाची परंपराही रिटायर केली गेली. ‘शब्द’ला अजून सूर सापडत नाही. अरुण शेवते गेल्या काही वर्षापासून आपल्या अंकाचे पुढे पुस्तक करता येईल असेच विषय घेऊन त्यावरच ‘ऋतुरंग’चा संपूर्ण अंक काढतात, तर इतरांना सतत चांगला दिवाळी अंक कसा काढावा याचा उपदेशामृत देणारे सुनील कर्णिक ‘नवा माणूस’ हा सामान्य वकुबाचा अंक काढतात. वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकांत तर, जाहिरातींचेच नावीन्य दिसते आणि मजकुराचा दर्जा त्यांच्या रविवार पुरवण्यांतील लेखांपेक्षा फार वेगळा नसतो. एखाद-दुसरा वाचनीय वा चांगला लेख, इतकेच या सर्वाच्या गुणवत्तेचे प्रमाण उरले आहे.
कमी पैशात भरघोस पुरवठादार

या प्रकारामुळे उथळ व फुटकळ साहित्याला चांगले दिवस आले आहेत. चटपटीत आणि चुरचुरीत मजकूर देखण्या सजावटीसह वाचकांच्या माथी मारला जातो. वाचकही डोक्याला फार ताप करून न घेता घटकाभराची करमणूक म्हणून त्याकडे पाहतात आणि सोडून देतात. कारण वाचन ही काही त्यांच्या आयुष्यातली नडीव गोष्ट नाही. त्यामुळे तो त्याला सहजासहजी जे उपलब्ध होईल, त्याचा स्वीकार करतो. आणि शेवटी कुठलाही वाचक ‘हे साहित्य आपल्याला अभिरुचिसंपन्न करणारे आहे की नाही?’ अशी फूटपट्टी घेऊन वाचायला बसत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेला आणि नाव प्रसिद्धीला हपापलेली लेखक मंडळी तेलाच्या घाण्यासारखा रतीब घालतात. संपादकांनाही कमी वेळेत, कमी पैशांत असे भरघोस पुरवठादार हवेच असतात.
 
एकेकाळी वीस-वीस अंकांमध्ये लिहिणारे लोक अजूनही जवळपास तेवढय़ाच अंकांत, त्याच प्रकारे लिहीत आहेत. त्यांच्या लेखनामध्ये आता काहीही नावीन्य राहिलेले नाही. अनिल अवचट, विजया राजाध्यक्ष, मंगेश पाडगावकर, शांताराम, यू. म. पठाण, गंगाधर पानतावणे, द. भि. कुलकर्णी, राजन खान, महावीर जोंधळे, फ. मुं. शिंदे, निळू दामले, भारत सासणे, बाबूमोशाय, ह. मो. मराठे, अच्युत गोडबोले अशा काही लेखकांनी त्यांचे लेखन थांबवावे असा उद्धट पण अतिशय नम्र सल्ला द्यावासा वाटतो. (या यादीत वाचकांना आपापल्या मनातील काही नावांचाही समावेश करता येईल.) अन् तेही वाचकांवर उपकार वगैरे करण्यासाठी नाही; तर त्यांच्या स्वत:साठीच त्यांनी लेखन थांबवणे गरजेचे आहे असे वाटते. कारण त्यांची जनमानसात जी चांगली प्रतिमा आहे, तिला त्यांच्याकडूनच तडा जातो आहे. संपादकांना-वाचकांना आपले लेखन हवे असेलही पण किती काळ लोकानुनय करायचा? आणि त्यातून आपलेच अवमूल्यन होत आहे त्याचे काय करायचे, याचाही विचार करायला नको काय?
 
तर दुसरी गडबड अशी आहे की, काही मासिकांचे, दिवाळी अंकांचे संपादक सुमार वकुबाच्या लेखकांना सातत्याने लिहायला कशासाठी सांगत असतात अणि त्यांचे ते सामान्य लेखन कशासाठी छापत असतात हेही कळायला मार्ग नाही. वैयक्तिक हितसंबंध-स्नेहसंबंध या पलीकडे तुमचे जग नसेल तर त्याला हरकत घेण्याचे कारण नाही; पण ते तुम्ही वाचकांच्या माथी कशाला मारता? अशा संबंधां-संबंधांवर हजेरी लावणा-यांमध्ये संजय भास्कर जोशी, विलास खोले, निरंजन घाटे, शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी, महेश केळुस्कर, प्रतिमा इंगोले, विजया वाड, विजय पाडळकर, श्रीनिवास हेमाडे, सुमेध वडावाला (रिसबूड), मधुकर धर्मापुरीकर, हेरंब कुलकर्णी, प्रवीण दवणे, अशा काहींचा सुळसुळाट झाला आहे.
 ब-याच अंकांतून प्रायोजित स्वरूपाचा मजकूर, गुणगौरवपर मुलाखती, नाटय़-चित्रपट क्षेत्रातल्या कलावंतांच्या प्रसिद्धीचा (गैर)वापर करून खपाच्या मार्गाने जाण्याची धडपड दिसते. असा मजकूर त्या त्या व्यक्तीची एक प्रकारची जाहिरातच असते. यापेक्षा उघड जाहिराती परवडल्या. त्यांचा निदान कुठला दावा तरी नसतो.


या कारणांमुळे दिवाळी अंकांविषयीची चर्चा आठवडय़ाच्या पुढे टिकेनाशी झालीय. मग त्यावरील वादविवाद तर दूरच राहोत. मग दरवर्षी ज्या संख्येने अंक निघतात, ते पाहता असे वाटू शकते की, एवढे अंक निघतात, म्हणजे त्यांना वाचकवर्ग असणारच. त्याचे कारण असे की, काही मोजके अपवाद वगळता संबंधितांकडून जे आकडे सांगितले जातात, ते सर्व चढय़ा बोलीतले असतात. त्यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होतो खरा, पण त्याला काही अर्थ नाही. गावोगावी भरणा-या पुस्तक-प्रदर्शनात ‘10 दिवसांत 10 कोटींची पुस्तक विक्री’ अशा ज्या बातम्या वृत्तपत्रांतून ठळक टायपातून छापून येतात, त्या वाचून सोडून द्याव्या अशा लायकीच्या असतात. जे पुस्तकांचे तेच दिवाळी अंकांचेही. मराठीत एका महिन्यात जेवढी पुस्तकांची विक्री होते, होऊ शकते, जवळपास तेवढीच दिवाळी अंकांचीही होते आणि त्यांना मिळणारा प्रतिसादही पुस्तकांसारखाच असतो. 

दुभती गाय, साईड बिझनेस
 एक मात्र खरे की, दिवाळी अंक काढण्यामागे अनेक उद्देश/हेतू असतात. त्यातही सुष्ट कमी, दुष्टच जास्त! मासिकांपुढे पर्याय नसतो.. वर्षाच्या शेवटी वाचकांना काहीतरी भरगच्च द्यावेच लागते. तो एक वाङ्मयीन परंपरेचा शिरस्ता झाला आहे. दैनिके-साप्ताहिके यांना जाहिरातींतून पैसा मिळतो. ज्योतिष, भविष्य, आरोग्य, वास्तुशास्त्र, पाककला ही लोकांची गरज असते. त्यामुळे याविषयांवरील अंक हमखास विकले जातात. दिवाळी अंक ही दोन-अडीच महिन्यांपुरती का होईना, पण काहींची ‘दुभती गाय’ झाली आहे. आपल्या हितसंबंधांचा वापर करून जाहिराती मिळवायच्या, मध्ये मध्ये मजकूर पेरायचा आणि दोन-चार लाखांची बेगमी करायची, असा ‘साइड बिझनेस’ या काळात भलताच फोफावतो. हे अंक बाजारात कधीच येत नाहीत. ते थेट जाहिरातदारांकडे जातात अन् उरलेले रद्दीत! राजकीय हेतूपोटी निघणा-या अंकांची संख्याही ब-यापैकी मोठी होत आहे. आता तर काळा पैसा ‘पांढरा’ करण्यासाठीही दिवाळी अंकांचा वापर होऊ लागला आहे, अशी कुजबूज कानावर येते.थोडक्यात काय तर परंपरा, अपरिहार्यता, स्पर्धा, चढाओढ, अहमहमिका आणि उद्दिष्टपूर्ती अशा काही कारणांवर दिवाळी अंकांचा डोलारा दरवर्षी उभा राहतो आहे.
त्यामुळे दिवाळी अंकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. ही स्थिती सुधारायला हवी हे तर खरेच! पण ते होणार कसे?
 
पण हा प्रश्न एकटय़ा दिवाळी अंकांपुरता असता तर ते शक्य होते. पण या प्रश्नाची व्याप्ती खूप मोठी आहे. ती आपल्या एकंदरच सांस्कृतिक-सामाजिक उत्तरदायित्वाशी निगडित आहे. 

अंगभूत आणि मुलभूत मर्यादा

आपल्याकडे एकंदरच हळहळे-हुळहुळे लोक फार आहेत. त्यामुळे सारा मामला हौसेचा नाहीतर एकांडय़ा शिलेदारांचा असतो. नुसत्या हौसेला वा एकांडय़ा शिलेदारीला स्वभावत:च अंगभूत आणि मूलभूत मर्यादा असतात. त्यात आपले प्रायोगिकतेचे वेडही अतोनात. अशा एकांडय़ा प्रयोगांचे वा वैयक्तिक अनुभवांचे सामाजिक सिद्धांत होत नसतात. तसे ते व्हावयाचे असतील तर त्यासाठी नियोजनबद्ध आणि सांघिक प्रयत्न करावे लागतात. अन् तेही वर्षानुवर्षे. पण सामोपचाराने आणि एकोप्याने प्रदीर्घ काळ काम करण्याचा मुळात महाराष्ट्राचा स्वभाव नाही आणि तशी इच्छाशक्तीही नाही. पन्नाशीनंतरही चालू असलेल्या कुठल्याही संस्था वा उपक्रम यांच्याकडे पाहिले की त्याची खात्रीच पटते.
 
‘नॅशनल जिओग्राफिक’ या मासिकाने भूगोल या शाखेला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, एवढेच नव्हे तर आजवर जगाच्या भूगोलाचा कोपरा न् कोपरा धुंडाळायचा प्रयत्न केला. ‘टाइम्स लिटररी सप्लिमेंट’ने इंग्रजी साहित्यासाठी केवळ एक व्यासपीठच उपलब्ध करून दिले नाही; तर समाज आणि साहित्याचा उत्तम अनुबंध निर्माण केला आहे. ‘ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ने दरवर्षी अपडेट आणि सर्वसमावेशक आवृत्ती प्रकाशित करून इंग्रजी भाषेचा आलेख चढता ठेवला आहे. असे किती उपक्रम महाराष्ट्रात 100 वर्षानंतरही तेवढय़ाच जोमदार आणि दमदारपणे चालू आहेत?
 
जे नाटय़संमेलनाचे रडगाणे तेच साहित्य संमेलनाचे, जे मराठी चित्रपटांचे, तेच मराठी नाटकांचे आणि जे मराठी साहित्याचे तेच दिवाळी अंकांचे! एकूण सा-या रडकथाच!! आणि तरीही आपण मराठी ज्ञानभाषा होण्याच्या बढाया मारणार!!! 

 ‘खाऊनपिऊन टामटुम’ इतकीच आपल्या एकंदर सामाजिक जीवनाची लांबी- रुंदी आणि खोली असेल, किमान तर्कसंगत आणि तारतम्यपूर्ण विचार आपल्याला करता येत नसेल, प्रतिक्रिया आणि विचार यातला फरक समजून घेता येत नसेल, सदासर्वदा भूतकाळातच आपण रमून जात असू तर वर्तमानाच्या हाकांना आपल्याला प्रतिसाद देता येणार नाही, हे उघड आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या दोन दशकांत मराठी समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि वैचारिक अशी सर्वच क्षेत्रात कमीअधिक फरकाने जी केविलवाणी अवस्था झाली, त्यातून याचे प्रत्यंतर येतेच आहे.
त्याला दिवाळी अंकही अपवाद नाहीत. 


या साचलेपणातून कसा मार्ग काढता येईल?
 
 काही गोष्टींना लगोलग सुरुवात करावी लागेल. पहिली गोष्ट म्हणजे स्वत:पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. इतिहासकार शेजवलकरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘समाजहितासाठी आपल्या आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार यांना कात्री’ लावावी लागेल.
 
त्यादृष्टीने ‘साप्ता. साधना’ चांगला प्रयत्न करत आहे, हे त्यांच्या अलीकडच्या अंकावरून कुणाच्याही लक्षात येईल. ‘उत्तम अनुवाद’चा अरुण जाखडे यांचा प्रयत्न चांगला आहे, पण केवळ इंग्रजी, रशियन, फ्रेंच या भाषांमधून थेट अनुवाद करणे पुरेसे नाही, दर्जेदार लेखनाची कसोशीने निवड करणेही अगत्याचे आहे.
 
खरे तर सध्या पूर्वीपेक्षा कधी नव्हे एवढा काळ आणि तंत्रज्ञान अनुकूल आहे. अजूनही काही लेखक आपले सर्वोत्तम लेखन दिवाळी अंकासाठीच राखून ठेवतात. आता जाहिराती मिळवण्यासाठी फार आटापिटा करावा लागत नाही. चित्रकार, मुद्रक यांचीही कमतरता नाही. संगणकामुळे, इंटरनेटमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी वेगाने काम होऊ शकते. अशा परिस्थितीत तर दिवाळी अंक अधिकच चांगले निघायला हवेत.
 
दुसरी गोष्ट निव्वळ साहित्यकेंद्री विषयांपेक्षा ताजे विषय काहींनी घेतलेही आहेत, पण ते फारच वृत्तपत्रीय आहेत हेही तितकेच खरे. नवे नवे आणि मुख्य म्हणजे समाजकेंद्री असलेले कितीतरी विषय हाताळता येण्यासारखे आहेत. पण असे फारसे घडताना दिसत नाही. ‘साहित्यकेंद्री’ सत्ताकेंद्र ‘समाजकेंद्री’  झाल्याने फारसे काही बिघडणार नाही.
 
पण असे अजूनही घडताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे. हे लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत. त्यांनी खरोखरच खडबडून जागे होण्याची नितांत गरज आहे.
 
मौज, ललित, दीपावली, अक्षर, साधना, अंतर्नाद असे अंकही चौकटीबाहेर जाण्याचा प्रयत्न का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही. या अंकांना महाराष्ट्रभरात मोठे नाव आहे, प्रतिष्ठा आहे. त्यामुळे त्यांनी कुठलेही प्रयोग केले तरी त्यांचा अंक घेतला जाईल, त्या प्रयोगांचे कौतुकच होईल. हेच गेली अनेक वर्षे दिवाळी/वार्षिकांक काढणाऱ्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रांनाही लागू आहे. त्यांच्या हाताशी एवढी मोठी यंत्रणा असते, त्यामुळे त्यांचे अंक संग्राह्यच व्हायला हवेत. त्यांनी केवळ मोठय़ा नावांचा हव्यास सोडायला हवा. 

 थोडक्यात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, त्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असते. दिवाळी अंकांचा बहुतांशी कारभार अजूनही पुण्या-मुंबईतच एकवटलेला आहे. पण इथून प्रकाशित होणारे अंक म्हापशापासून चंद्रपूपर्यंत आणि नांदेड-उस्मानाबादपर्यंत जातात. म्हणजे पुण्या-मुंबईतला एक छोटा वर्ग दिवाळी अंकांबाबत महाराष्ट्राचे पुढारपण करतो आहे. त्यामुळे या छोटय़ा वर्गावरच मोठी जबाबदारी आहे. त्यांनी हे सांस्कृतिक प्रवक्तेपण नीट निभावले पाहिजे. आपले इतर बहुसंख्य लोक अनुकरण करत आहेत याचे भान ठेवले पाहिजे.


तर आणि तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.  

Wednesday, September 14, 2011

सार्वकालिक आणि समकालीन

(ही पोस्ट विजयाबाई यांना पहिला विंदा पुरस्कार मिळाला त्यावेळी लिहिली होती.
२७ डिसेंबर २०१० ) 

‘‘कवितेबाबत माझी आवडनिवड विशिष्ट किंवा ठराविक नाही. स्वायत्त कविता माझ्या मनात घर करून राहते.’’

‘‘जी. ए. कुलकर्णीच्या दर्जाची, जातीची कथा मला लिहिता आली नसती. त्या पातळीवर जाण्याची आपली कुवत नाही याची मला जाणीव आहे.’’

‘‘मर्ढेकरांच्या सर्व कवितांचा अर्थ मला कळला आहे, असा माझा दावा नाही.’’

असा प्रांजळपणा विजयाबाई राजाध्यक्ष करू शकतात, नव्हे करतात. कारण कुठल्याही दुराग्रहापासून, अट्टाहासापासून त्यांनी स्वत:ला मुक्त ठेवलं आहे. विंदांच्या नावाच्या पहिला पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यावरही ‘श्रेय विंदांचे आहे’ अशीच त्यांची प्रतिक्रिया होती.
 
खरं तर विजयाबाईंची पिढीच अशी आहे. ती सातत्यशील वृत्तीनं वाड्मयाचा गंभीरपूर्वक अभ्यास करणारी, साहित्यावर उत्कटपणे प्रेम करणारी आहे. रा. ग. जाधव, सुधीर रसाळ ही त्यांपैकीच काही नावं.
 
विजयाबाई मूळच्या कोल्हापूरच्या, विजया आपटे. शालेयवयात त्यांची वि. स. खांडेकर यांच्याशी मैत्री झाली. कोल्हापुरातच त्यांचं एम. ए. पर्यंतचं शिक्षण झालं.  1952साली मं. वि. राजाध्यक्ष कोल्हापूरला प्राध्यापक म्हणून आले. विजयाबाई त्यांच्या प्रेमात पडल्या, पत्नी झाल्या. नवपरिणीत जोडपं मुंबईला आलं, आणि त्यावेळच्या मुंबईत आणखी एका साहित्यिक दांपत्याची भर पडली. मुंबईत आल्यावर त्यांची पहिल्यांदा दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. वा. ल. कुलकर्णीचा तेव्हा समीक्षेमध्ये चांगला दबदबा होता. चित्र्यांनी बरईची वा.लं.शी, करंदीकरांशी ओळख करून दिली. ‘मौज’च्या गोटात सामील होण्याचा मार्ग ‘मौज’, ‘सत्यकथे’त विजयाबरईनी आधीच कथा लिहून सुकर करून घेतला होता.
 
विजयाबाई पहिल्यांदा एल्फिन्स्टन कॉलेजात मराठीच्या प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्या. पुढे एसएनडीटी विद्यापीठात गेल्या. तिथून मराठीच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या. तिथं विजयाबाईंनी अनेक उत्तमोत्तम चर्चासत्रं घेतली. निवृत्तीनंतर विद्यापीठाने त्यांची ‘प्रोफेसर एमिरेटस’ म्हणून नेमणूक केली. विजयाबाईंनी त्याचं ‘सुप्रतिष्ठ प्राध्यापक’असं शुद्ध मराठी नामकरण केलं, स्वत:ला शोभेलंसं! 
 
विजयाबाई गेली पन्नासहून अधिक वर्षे कथालेखन करत आहेत. अठरा-वीस कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. त्यातही त्यांनी स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. पण समीक्षेची पुस्तकं मात्र त्याच्या निमपटही नाहीत. आणि तरी ती मोलाची आहेत.
 
कवितेच्या आस्वादक समीक्षक अशीही विजयाबाईंची ओळख आहे. कविता हा त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा, आस्थेचा, प्रेमाचा आणि चिंतनाचा विषय आहे. म्हणूनच त्यांचं समीक्षालेखन प्राधान्यानं कवितेविषयीचंच आहे. मर्ढेकरांच्या कवितेवर अगदी महाविद्यालयीन काळापासून त्यांनी चिंतनाला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी मर्ढेकरांवरच पीएच. डी. केली. मर्ढेकरांच्या एका एका कवितेवर आणि त्यातल्या एका एका शब्दांवर विजयाबाईंनी रमेश तेंडुलकर, शांता शेळके, मं. वि. राजाध्यक्ष यांच्याशी अतिशय सखोल चर्चा केल्या. पुढे ते चिंतन ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ (1991) या दोन खंडातून प्रकाशित झालं. त्याला 1993 साली साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला.
 
त्यानंतर त्यांनी ‘पुन्हा मर्ढेकर’ आणि ‘शोध मर्ढेकरांचा’ ही दोन चरित्रपर पुस्तकंही लिहिली. त्यामुळे काही वेळा असं वाटतं होतं की, बाई मर्ढेकरांमध्येच अडकून पडल्या आहेत की काय! पण करंदीकरांच्या समग्र साहित्याचं परिशीलन ‘बहुपेडी विंदा’ या दोन खंडी ग्रंथातून त्यांनी अलीकडेच केलं. आणि आता त्यांनी आरती प्रभूंवरही सविस्तर लिहिण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. म्हणजे 77व्या वर्षीही लेखनाचे नवेनवे विषय त्यांना हाकारे घालत आहेत. हेही पुन्हा त्यांच्या ‘सार्वकालिक आणि समकालीन’ अभ्यासूवृत्तीचे द्योतक आहे. 

‘संवाद’ (1985) या पुस्तकात विजयाबाईंनी वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ आणि विंदा करंदीकर यांच्या दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. त्यात या तीन श्रेष्ठींच्या वाडमयीन व्यक्तिमत्त्वांचा, त्यांच्या लेखनामागील प्रेरणांचा, त्यांच्या एकंदर साहित्यिक वाटचालीचा सविस्तर आढावा आहे. वाड्मयीन मुलाखती कशा घ्याव्यात त्याचं हे पुस्तक चांगलं उदाहरण ठरावं. 

विजयाबाई वृत्तीनं धार्मिक, सश्रद्ध आहेत. तोच प्रकार त्यांच्या लेखनाबाबतीतही आहे. पण विजयाबरईच्या श्रद्धेला कर्मकांडाची झालर नसते. म्हणूनच त्यांना तटस्थ राहता येतं आणि मोकळेपणाने केवळ कवितेचाच विचार करता येतो. ‘बहुपेडी विंदा’च्या दुसऱ्या खंडांमध्ये ‘अष्टदर्शने’वर त्यांनी लिहिलं आहे, ‘‘पद्यीकरणाच्या मर्यादा ओलांडण्याइतपत तरी काव्य करंदीकरांकडून अपेक्षित होतेच. ‘अष्टदर्शने’मधून ही अपेक्षा त्यांना पूर्ण करता आलेली नाही.’’ ही टिप्पणी कुणाला सावधपणाची वाटेल. पण विजयाबाईंचं एकंदर लेखन पाहिलं तर त्या सगळ्यामध्ये असाच सूर दिसेल. ‘मला हे असं असं वाटतं..इतरांना यापेक्षा वेगळंही वाटू शकतं’ अशी त्यांची विनयशील आणि अनाग्रही भूमिका असते. सर्जनशील लेखनाविषयी फार ठाम भूमिका घेता येत नाहीत याचं ते चांगलं उदाहरण आहे. म्हणूनच विजयाबाई कुठल्याही सिद्धांताची फूटपट्टी कवितेला विनाकारण लावत नाहीत. पण त्यातही त्यांचा म्हणून एक ठामपणा असतोच.

 विजयाबाईंची समीक्षा ही आस्वादक किंवा चरित्रात्मक स्वरूपाची आहे. अशा प्रकारच्या समीक्षेला मराठी साहित्य व्यवहारात फारसं मानाचं स्थान दिलं जात नाही. हा आक्षेप जमेस धरून विजयाबाई आपलं लेखन करत राहिल्या आणि आता त्यांनी त्यालाच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती होणार नाही. विजयाबाई बहुप्रसवा कथालेखिका आहेतच, पण तशाच त्या चांगल्या वाचकही आहेत. मराठीतल्या प्रस्थापितांपासून अगदी नवोदित कवी-कथाकारांचं लेखनही त्या तितक्याच अगत्यानं वाचत असतात. इंग्रजी साहित्याचंही त्यांचं मोठं वाचन आहे. 


2001च्या इंदूर इथं भरलेल्या साहित्य संमेलनाच्या विजयाबाई अध्यक्ष होत्या. आणि महाराष्ट्राबोहर झालेलं ते अलीकडच्या काळातलं शेवटचं संमेलन. तिथल्या आपल्या अध्यक्षीय भाषणाला त्यांनी ‘सार्वकालिक आणि समकालीन’ असं अन्वयर्थक शीर्षक दिलं होतं. त्यात साहित्याचा नेमका अर्थ, सृजनाची प्रक्रिया कशी असते, सर्जनाच्या वाटेवर काय काय असते याविषयी त्यांना आकळलेलं त्यांनी सांगितलं. हे त्यांचं असिधाराव्रत अजूनही चालू आहे, असंच चालू राहो.

Monday, September 5, 2011

बेकारी आणि पुस्तकं

माझ्या २००६ च्या दैनंदिनीतली ही काही पाने...


आज सोमवार होता. खिशात फक्त साडेसात रुपये. त्याचं पावशेर दही आणलं. त्यात साखर कालवून तेवढंच नाष्टय़ाला खाल्लं आणि बाहेर पडलो. आठवलेंकडे गेलो. त्यांच्याकडे ‘बासष्टचे गुन्हेगार’ आणि जॉन रीड यांचं ‘जगाला हादरवणारे दहा दिवस’ हे बोल्शेविक क्रांतीविषयीचं पुस्तक अशी दोन पुस्तकं उधारीवर घेतली, पन्नास रुपयांना. 
............
  आज जॉर्ज ऑर्वेलच्या निवडक लेखनाचा ओरिएंट लाँगमनचा एक छोटा संग्रह विकत घेतला. त्यातले सर्वच लेख चांगले आहेत. विशेषत: ‘व्हाय आय राईट?’ आणि ‘व्हाट इज सायन्स?’ हे दोन लेख उत्कृष्टच. ‘व्हाय आय राईट?’मध्ये ऑर्वेलनं लिहिलं आहे की, कोणताही लेखक चार कारणांसाठी लिहीत असतो- निव्वळ आत्माभिमान (Sheer egoism), सौंदर्यशोधाची ऊर्मी (Aesthetic enthusiasm), ऐतिहासिक जाणीव (Historical impulse) आणि राजकीय हेतू (Political purpose). ऑर्वेल म्हणतो गद्य लेखनामागे ही चार कारणं असतातच. ती व्यक्तीगणिक कमी-जास्त, मागे-पुढे असतील एवढाच काय तो फरक. पण या कारणांशिवाय लेखन करणारा लेखक दांभिक तरी असतो किंवा नि:सत्त्व तरी.     अप्पा बळवंत चौकातून आठवलेंकडे गेलो. सव्वाआठ वाजता. पाच-दहा मिनिटांनी आठवले आले. मग त्यांच्याकडे जॉर्ज आर्वेलची ‘अ‍ॅनिमल फार्म’, ‘लेनिन’ आणि ‘अरुण शौरी यांचे वडील एच.डी. शौरी यांच्यावरील एक पुस्तक अशी तीन पुस्तकं केवळ 25 रुपयांना घेतली. एच.डी. शौरी हे आयसीएस अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर दिल्लीमध्ये एक नागरी संस्था स्थापन करून बरंच काम केलं होतं. त्यांच्याविषयीचं हे पुस्तक निर्मितीच्या अंगानं नितांतसुंदर म्हणावं इतकं देखणं आहे. 
..............
आज संध्याकाळी डेक्कनवरील संभाजी पूलावरच्या रद्दीवाल्याकडे ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या बऱ्याच प्रती दिसल्या. कॉफी टेबल आकाराचं हे पुस्तक आजवरच्या ‘मिस इंडियां’बद्दल होतं. ते पर्सिस खंबाटा या एका मिस इंडियानंच संपादित केलं होतं. पण पुस्तक १९९७पर्यंतचं होतं. म्हणजे दहाएक वर्षापूर्वीचं. पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली, आजवर कोण कोण मिस इंडिया झालं अशी बरीच महत्त्वाची माहिती त्यात होती. रद्दीवाल्याला किंमत विचारली तर म्हणाला 200 रुपये. विचार केला, ‘आपल्याला काय उपयोग या पुस्तकाचा?’ म्हणून त्याचा विचार सोडून दिला.
.................. 
आज परत डेक्कनवर गेलो तर कालच्या ‘प्राइड ऑफ इंडिया’च्या प्रती जशास तशा होत्या. मग पुस्तक पुन्हा एकदा चाळलं. चांगलं वाटलं. आता किंमत 100 रुपयावर आली होती. मग घेऊन टाकलं. 
...................
आठवले आज जरा उशिराच आले. पावसाची भूरभूर चालूच होती. आल्यावर ‘शेक्सपिअर खंड’, दि. पु. चित्रे यांचं ‘चाव्या’, अ.भा. नाटय़ संमेलन 1975ची स्मरणिका आणि ‘पूर्वाचलाचे आवाहन आणि आव्हान’ ही चार पुस्तकं 70 रुपयांना घेतली. मागील बाकी 110 रुपये. एकंदर 180 रुपये.
.................... 
सकाळी साडेसातला उठलो. पावणे नऊच्या सुमारास आठवलेंकडे गेलो. ‘लोकहितवादींची शतपत्रे’, ‘सांगते ऐका’, ‘जंगलातील दिवस’, ‘यशवंतराव चव्हाण - राजकारण व साहित्य’ आणि कार्ल मार्क्‍स-इंगल्स यांचं ‘भारताचे स्वातंत्र्युद्ध’ ही पाच पुस्तकं 120 रुपयांना घेतली. एकंदर बाकी 320 रुपये. तेथून लक्ष्मी रोडला आठवलेंच्या मुलाकडे आलो. रात्रीच ‘कॅथरीन मेयो आणि भारत’ हे पुस्तक वाचलं होतं. मेयोबाईंच्या ‘मदर इंडिया’ला प्रत्युत्तरादाखल लिहिलं गेलेलं ‘सिस्टर इंडिया’ मिळालं. ते 30 रुपयांना घेतलं. मग नॅशनल जिओग्राफिकचा जानेवारी 2006चा आणि एक जुना अंक 30 रुपयांना घेऊन त्याचीही 60 रुपये उधारी केली.