Monday, March 19, 2012

जगाच्या भूगोलासाठी तीन पावलं...

OCT 1888

भूगोल रुक्ष असतो या समजाला चारीमुंडय़ा चित करण्याचे आणि त्यातील रोमांचकता व थरार दाखवून देण्याचं काम ‘नॅशनल जिओग्राफिक सोसायटी’(नॅजिसो) गेली 124 वर्ष करते आहे. भूगोलाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचा, ही संकल्पना सतत विकसित करण्याचा आणि तिला विज्ञानाची समर्पक जोड देण्याचा सुज्ञपणा ‘नॅजिसो’ गेली 124 वर्ष करते आहे. कालच्या 13 जानेवारीला ‘नॅजिसो’ने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे, (तर ‘नॅशनल जिओग्राफिक’ हे सोसायटीचे मासिक येत्या ऑक्टोबर महिन्यात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे) त्यानिमित्ताने हा विशेष लेख....



 भूगोल हा रुक्ष विषय आहे, असा समज आपल्या समाजात रूढ आहे. का कोण जाणे, पण ज्या अत्यंत थरारक, रोमांचक आणि मानवी आयुष्य समृद्ध करणा-या ज्ञानशाखा आहेत, त्याचीच नेमकी बहुतेकांना नावड असते. विज्ञान, भूगोल, गणित-भूमिती या ज्ञानशाखा हे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येतील. या क्षेत्राकडे वळणारे जसे हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात, तसेच या विषयांबद्दल केवळ कुतूहल असणा-यांची संख्याही साधारणच असते.
पण भूगोल ही सतत उत्क्रांत होत आलेली आणि त्यामुळे जगातल्या लोकांचे आयुष्य विज्ञानासारखेच बदलवणारी संकल्पना आहे. भूगोलामुळे जगाचा, पृथ्वीचा नकाशा तयार करता आला; राष्ट्रांच्या, देशांच्या, प्रदेशांच्या सीमा ठरवण्यात आल्या; समुद्रमार्ग, नद्या, पर्वत, जंगले, वाळवंटे यांची ठिकाणे निश्चित करता आली आणि भूगोलामुळेच साम्राज्यवाद, भांडवलशाही, राष्ट्रवाद या संकल्पना जन्माला आल्या!
आपला परिसर, राज्य, देश आणि जगातले इतर देश समजून घ्यायचे तर भूगोलाचाच आधार घ्यावा लागतो. भूगोलाशिवाय आपण एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी जाऊ शकत नाही. तसा शालेय पातळीपासून आपण भूगोल शिकतो, पण त्याची महती मात्र जाणून घेत नाही. वैज्ञानिक शोधांचा उपभोग घेणारे जसे विज्ञानाचे काही लागत नाहीत, तसेच भूगोलाचा पावलोपावली आसरा घेणारेही त्याविषयी कृतज्ञ राहत नाहीत. आणि असे उपराटे लोकच भूगोलाकडे दुर्लक्ष करतात!
म्हणून या क्षेत्रांकडे वळणाऱ्यांना असाधारण म्हटले जाते. असेच काही असाधारण आणि झपाटलेले 33 लोक 13 जानेवारी 1888 रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये एकत्र जमले. त्या आधी या सभेला हजर राहणारे निवेदन काही जणांना पाठवण्यात आले होते. त्यात लिहिले होते, kincrease and diffusion of geographical knowledgel. या जमलेल्यांमध्ये बँकर, ट्रेकर्स, धाडसी प्रवासी, संशोधक, शिक्षक, पर्यावरण अभ्यासक, हवामानतज्ज्ञ आणि भूगोलाचे अभ्यासक होते. यापैकी सगळेच काही गर्भश्रीमंत नव्हते आणि काही श्रीमंतही नव्हते. पण या सर्वाना जगाचा भूगोल समजावून घेण्याची आणि उर्वरित जगाला समजावून देण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. या बैठकीत जगाला भूगोल साक्षर करण्यासाठी काही संघटित प्रयत्न करण्याचा ठराव संमत करून गार्डिनर ग्रीन ह्युबर्ड यांची नॅशनल जिओग्राफिक सोसायटी (नॅजिसो)चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
या पहिल्याच बैठकीत सोसायटीने नॅशनल जिओग्राफिक मॅगझिन(नॅजिमॅ) सुरू करायचे ठरवले. लेखक-संशोधकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, माहिती जमा करून, रितसर संशोधन करून, लोकांशी बोलून लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेतल्या लेखांना चित्रे व नकाशांच्या जोडीने सादर करायचे, असे या मासिकाचे स्थूल स्वरूप ठरवण्यात आले. त्यानुसार सुरुवातीच्या काही अंकांमध्ये अल्बर्ट लॉईड यांनी आफ्रिकेतल्या नरभक्षक टोळ्यांबरोबर केलेल्या प्रवासाचे सविस्तर वृतान्त छापले, उत्तर ध्रुवाचा शोध लावणाऱ्या रॉबर्ट पियरीने लिहिलेले अनुभव नॅजिमॅमध्ये छापण्यात आले, तेव्हाच या नियतकालिकाचा प्रवास भविष्यात कुठल्या दिशेने होणार आहे, याची झलक पाहायला मिळाली होती.
ऑक्टोबर १८८८मध्ये नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. त्यात नॅजिसोने आपली भूमिका स्पष्ट केली ती अशी...It will contain memoirs, essays, notes, correspondence, reviews, etc. ralating to Geographic matters. As it is not intended to be simply the organ of the society, its pages will be open to all persons interested in Geography, in the hope that it may become a channel of intercommunication, stimulate geographic investigation and prove an acceptable medium for the publication of results...



पण नॅजिसोचे सुरुवातीचे काही अंक चाचपडतच निघाले. ते नियमितपणेही निघत नव्हते1888 ते 97 या दहा वर्षात फक्त 37 अंक प्रकाशित झाले. जानेवारी 1896 पासून नॅजिमॅ नियमितपणे मासिक स्वरूपात प्रसिद्ध होऊ लागले. या अंकाची किंमत 25 सेंट ठरवण्यात आली आणि नॅजिसोने पहिल्यांदाच अंकासाठी जाहिराती स्वीकारण्याचेही ठरवले. पण पुढच्याच वर्षी अध्यक्ष ह्युबर्ड यांचे निधन झाले. मग त्यांचा जावई अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल जानेवारी 1898 मध्ये नॅजिसोचा दुसरा अध्यक्ष झाला. बेलच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या वर्षानंतर सोसायटीचे सभासद फक्त 1400 चा आकडा गाठू शकले. बेल त्यात फक्त 260 ची भर घालू शकले. पण सोसायटीवर 2000 डॉलर्सचे कर्ज झाले होते आणि नॅजिमॅवर कधीही बँकेकडून जप्ती येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण तरीही बेल डगमगले नाहीत. त्यांनी सोसायटीच्या सभासदांना सांगितले की, Geography is a fascinating subject, and it can be made interesting. Let’s hire a promising young man to put some life into the magazine and promote the membership. I will pay his salary... बेल यांनी असे सांगितले असले तरी त्या तरुणाची त्यांनी आधीच मनाशी निवड केली होती. त्याचे नाव होते, गिल्बर्ट हॉवी ग्रॉसव्हेनोर. हा अवघ्या 23 वर्षाचा तरुण शाळाशिक्षक होता (आणि बेल यांच्या मुलीचा प्रियकरही. अर्थात तेव्हा हे त्यांना माहीत नव्हते.) बेल यांची ही निवड किती सार्थ होती, याची चुणूक लवकरच सोसायटीला पाहायला मिळाली. ग्रॉसव्हेनोर एप्रिल 1899 मध्ये सहसंपादक म्हणून रुजू झाले आणि नोव्हेंबर 1899 पर्यंत त्यांनी 750 नवे सभासद सोसायटीला मिळवून दिले. फेब्रुवारी 1903 मध्ये ग्रॉसव्हेनोर नॅजिमॅचे संपादक झाले आणि सोसायटीचे अध्यक्षही. तेव्हा ते केवळ 27 वर्षाचे होते. सोसायटीची सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपवण्यात आली. आणि नॅजिसोच्या बहराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली!
गिल्बर्ट ग्रॉसव्हेनोर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सोसायटीला वैभव मिळवून दिले. ते 1899 ते 1954 अशी सलग 55 वर्षे नॅजिमॅचे संपादक राहिले. 1920 ते 54 ही 34 वर्षात ग्रॉसव्हेनोर यांनी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते, तर 1954 ते 1966 या काळात ते सोसायटीच्या संचालक मंडळाचे चेअरमन होते. या काळात त्यांनी नॅजिमॅला जो वैश्विक चेहरा मिळवून दिला, तो केवळ थक्क करणारा आहे. या काळात नॅजिमॅचा खप पाच हजारांवरून 50 लाखांवर गेला!
डिसेंबर 1904 मध्ये छायाचित्र-मालिकेची सुरुवात ग्रॉसव्हेनोरने केली. या पहिल्याच अंकात तिबेटमधल्या ल्हासा प्रांताची झलक दाखवणारी 11 पाने छायाचित्रे छापली. एप्रिल 1905 च्या अंकात फिलिपाइन्समधील शिरगणतीची 138 छायाचित्रे 32 पानांवर छापली. कॅनेडियन पर्वताचे आठ फूट लांब छायाचित्र ग्रॉसव्हेनोर यांनी जून 1911 च्या अंकात छापले. ग्रॉसव्हेनोर सतत सुंदर आणि वैशिष्टय़पूर्ण छायाचित्रांच्या शोधात असत. 1908 मध्ये नॅजिमॅचा अर्धा अंक छायाचित्रांसाठी दिला जाऊ लागला.
या नव्या प्रयोगामुळे नॅजिमॅमध्ये जान आली. त्याची लोकप्रियता झपाटय़ाने वाढू लागली. 1905 पर्यंत नॅजिसोचे सभासद 3400 वरून 11000 झाले.
सोसायटीच्या वतीने लोकांसाठी व्याख्यानांचे आयोजन केले जात असे. ग्रॉसव्हेनोर सतत इतर नियतकालिकांचा आणि सोसायटीत व्याख्यानांसाठी येणाऱ्या लोकांचा अभ्यास करत असत. त्यांना नेमके काय हवे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आणि ते पूर्ण करण्यासाठी धडपडतही! त्यामुळे नॅजिमॅ वाचकाभिमुख होऊ लागले.
1954 मध्ये वयाच्या 78 वर्षी ग्रॉसव्हेनोर निवृत्त झाले, तेव्हा सोसायटीच्या सभासदांची संख्या, वीस लाख झाली होती! त्यानंतर त्यांचा मुलगा गिल संपादक झाला (आणि अध्यक्षही). त्याच्या काळात सभासदांची संख्या एक कोटीवर गेली. गिलने ट्रॅव्हलर, वर्ल्ड आणि नॅशनल जिओग्राफिक रिसर्च ही तीन नवी नियतकालिके सुरू केली; ‘नॅजिसोच्या शतकमहोत्सवानिमित्त नॅजिसो एज्युकेशन फाउंडेशन स्थापन केले.
आता नॅजिमॅ अरेबिक, चायनीज, कोरियन, बल्गेरियन, डच, ग्रीक, जर्मन, हिब्रू, पोलिश, रशियन अशा 35 भाषांमध्ये प्रसिद्ध होते. (या सर्व आवृत्त्या 1997 नंतर सुरू झाल्या आहेत.) प्रत्येक आवृत्तीची स्वतंत्र वेबसाइट आहे. नॅजिमॅच्या सर्व आवृत्त्यांचा मिळून एकंदर खप 90 लाखांवर आहे. याशिवाय नॅजिसोचा पुस्तक प्रकाशनाचाही स्वतंत्र विभाग आहे. नॅशनल जिओग्राफी चॅनेलही लोकप्रिय आहे.

नॅजिमॅमध्ये भूगोल, विज्ञान, इतिहास, संस्कृती, चालू घडामोडी आणि छायाचित्रे या विषयांवरील लेखांचा समावेश असतो. पर्यावरण, जंगलतोड, रासायनिक प्रदूषण, ग्लोबल वार्मिग या विषयांवर नॅजिमॅ सातत्याने लेखन छापून लोकांना साक्षर करण्याचे काम करते आहे. प्रसंगोपात एकाच देशावर संपूर्ण अंक, प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयांवरही विशेषांक प्रसिद्ध करते.

नॅजिमॅशिवाय सोसायटीचे इतर अनेक उपक्रम असले तरी तिची खरी ओळख आहे, ती या मासिकामुळेच. सोसायटी म्हणजे हे मासिक आणि मासिक म्हणजे सोसायटी, असे हे समीकरण आहे. आणि या मासिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे ते त्यातल्या छायाचित्रांसाठी. या लेखाभोवतीच्या नॅजिमॅच्या मुख्यपृष्ठांवरील छायाचित्रांवरून या मासिकाच्या डिझाइनमध्ये, लोगोमध्ये होत गेलेला बदल पाहता येईल. त्यात अफगाणिस्तानतल्या एका मुलीच्या भयभीत चेह-याचे मुखपृष्ठ आहे. त्यानंतर 16 वर्षानी नॅजिमॅच्या टीमने पुन्हा अफगाणिस्तानात जाऊन त्या तरुणीचा शोध घेतला व तिचा फोटो मुखपृष्ठावर छापला. या एकाच घटनेतून नॅजिमॅची टीम आपल्या कामासाठी, एकेका छायाचित्रासाठी किती मेहनत घेते, याचा अंदाज येईल. अशा कितीतरी विक्रमांची मालिकाच या मासिकाच्या नावावर आहे.

अंटार्टिकावरील स्वारीपासून उत्तर-दक्षिण ध्रुवाच्या शोधापर्यंत नॅजिमॅने सर्व महत्त्वाचे बदल छायाचित्रांच्या माध्यमांतून टिपले आणि वाचकांपर्यंत पोहचवले आहेत. सोसायटीने प्रकाशित केलेली नॅजिमॅमधील उत्कृष्ट छायाचित्रांची पुस्तके पाहताना तर आपण स्तंभित होऊन जातो!
पण असे असले तरी नॅशनल जिओग्राफिक सोसायटी ही पक्की अमेरिकेधार्जिणी असल्याचा आरोप काही मंडळी करत असतात. पण हेही तितकेच खरे की, ‘टाइम साप्ताहिक भारताबाबत जितका पूर्वग्रहदूषित आणि कोतेपणा दाखवते, त्याचा लवलेशही नॅजिसोकडे नाही. या फरकांच्या उदाहरणांची मोठी मालिकाच सांगता येईल. पण एकच उदाहरण पुरेसे ठरावे. विसाव्या शतकातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणारे द सेंच्युरी कलेक्शन : द ग्रेटेस्ट इव्हेंट्स हे देखणे पुस्तक टाइमने 1997 साली काढले आहे. त्यात म. गांधींची दांडीयात्रा आणि भारतीय स्वातंत्र्यदिन या दोनच घटनांचा अन् तोही तळटिपा म्हणाव्यात असा त्रोटक उल्लेख आहे. पण नॅजिसो भारताबाबतच नव्हे तर जगातल्या कुठल्याच देशाविषयी असा दुजाभाव करत नाही, हेही त्याच्या मोठेपणाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली, तेव्हा नॅजिमॅने खास विशेषांक काढला होता. याशिवाय इतरही अनेक वेळा भारताविषयी मुखपृष्ठकथा केल्या, लेख-छायाचित्रे छापली आहेत.
अशोक शहाणे यांच्या तिरकस शब्दांचा आधार घेऊन सांगायचे तर ही थोरच गोष्ट म्हणायला हवी की, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी अमेरिकेत सुरू झाली आणि त्याहून थोर म्हणजे या सोसायटीच्या महत्त्वाकांक्षांना पुरी पडणारी माणसे अमेरिकेत होती!
गेल्या 124 वर्षात जग किती बदलले! अनेक साम्राज्ये उदयाला आली, तशी लयाला गेली. क्रांत्या झाल्या, माणूस चंद्रावर गेला, समुद्राच्या तळाशी गेला.. वामनाने जशी एका पावलात जमीन व्यापून टाकली, एका पावलात आकाश व्यापले आणि तिसरा पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवला, अगदी त्याच पद्धतीने माणसाने आकाश, जमीन आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला माणूस व्यापायला सुरुवात केली आहे. विज्ञानाने एकेका क्षेत्राचा कायापालट करून टाकायचा धडाका लावलाय, अवघे जगच कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. ते सारे बदल टिपण्याचा प्रयत्न नॅजिसोने आपल्या मासिकाच्या माध्यमातून केला आहे, करत आहे!
थोडक्यात आज वैश्विक सांस्कृतिक जीवनाचे जे काही मानदंड मानले जातात, त्यात बीबीसी, टाइम्स लिटररी सप्लिमेंट, नॅजिमॅ हे काही महत्त्वाचे मानदंड आहेत. त्यांना टाळून पुढेच जाताच येत नाही.
रंगीत छायाचित्रणाचा, चित्रपटांचा आणि टीव्हीचा शोध लागण्याच्या आधी अ विंडो ऑन द वर्ल्ड होण्याचे काम नॅजिसोने केले, आजही करत आहे आणि उद्याही करत राहील. कारण जगाच्या भूगोलाचा इंच न् इंच धुंडाळायचा अजून बाकी आहे. त्यामुळे जगाचा सगळा भूगोल आकळला नसल्याने नॅजिसोचे ध्येय पूर्ण झालेले नाही. पण सोसायटीने आजवर केलेले कामही थोडेथोडके नाही. नॅजिमॅचे आजवरचे नुसते अंक चाळले तरी जगाबद्दलचे आपले आकलन, माहिती आणि ज्ञान किती तोकडे आहे, याची खात्रीच पटते!
गेल्या 124 वर्षातल्या नॅजिसोच्या इंग्रजीसह 35 भाषांतील नॅजिमॅच्या एकूण एक प्रतींची चळत केली तरी तिची उंची आपल्या हिमालयाएवढी भरू शकेल!

JAN 2012
शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची भेट : नॅजिसोची जेट मोहीम
 नॅशनल जिओग्राफिक सोसायटीला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सोसायटीनं 2013 मध्ये एका जेट एक्सिपिडिशनचं आयोजन केलंय. या मोहिमेत जगभरातील विस्मयकारक ठिकाणं, प्राचीन शहरं, नैसर्गिक आश्चर्याची सफर घडवली जाणार आहे. अर्थात, ही निव्वळ सहल असणार नाही, तर या प्रत्येक ठिकाणी जाऊन नॅशनल जिओग्राफिकचे तज्ज्ञ आपल्या महत्त्वाच्या संशोधनाची आणि फिल्डवर्कची आतली माहितीही देणार आहेत. सागरी जीवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, पुराजीवशास्त्र, जनुकशास्त्र, जतनशास्त्र या विषयातील संशोधक, तज्ज्ञ, विशेषज्ञांचा त्यात समावेश असेल.

एका खाजगी जेट विमानातून ही सफर घडवली जाणार आहे. एकूण 24 दिवसांच्या या सफरीला लंडन येथून सुरुवात होईल. ओमानची राजधानी मस्कत, भूतानमधील पारो व थिम्पू, पलाऊ येथील रॉक आयलँड्स, मालदिव, ओकॅवांगो (डेल्टा), बोस्टवाना येथील कलहारी वाळवंट, रवांडा येथील व्होल्कॅनोज नॅशनल पार्क, स्पेनची राजधानी बार्सिलोना या ठिकाणांचा या सफरीत समावेश आहे. इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग, पुरातत्त्व, विज्ञान या अंगाने या ठिकाणं उलगडून दाखवली जाणार आहेत. जॉन रेनहार्ड, फ्रेंड हिबर्ट, एन्रिक साला, सिल्व्हिया इर्ले, डेरेक आणि बेव्हर्ली ज्युबर्ट, मिरिया मेयर हे तज्ज्ञ या मोहिमेत सहभागी होणार आहेत. तर प्रसिद्ध संशोधक आणि नॅशनल जिओग्राफिकचे एक्सप्लोरर इन रेसिडन्स वेड डेव्हीस हे या संपूर्ण मोहिमेत सहभागी असतील26 फेब्रुवारी ते 21 मार्च या काळात होणाऱ्या या मोहिमेचं शुल्क आहे प्रतीमाणशी 72,950 डॉलर्स. यातले 3 हजार डॉलर्स नॅशनल जिओग्राफिकच्या द फंड फॉर एक्सप्लोरेशनला जाणार आहेत. हा फंड संशोधन, जतन आणि विविध मोहिमांसाठी आर्थिक मदत देतो.

शोध ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा प्रेरणांचा!

भारतामध्ये येताना ब्रिटिशांनी आपल्याबरोबर दोन गोष्टी आणल्या असे मानले जाते. त्या म्हणजे शेक्सपिअर आणि बायबल. किंबहुना ब्रिटिशांनी जिथे जिथे वसाहती केल्या, त्या त्या ठिकाणी त्यांनी हा आपला सांस्कृतिक वारसा पोहचवला. भारतामध्येही ब्रिटिशांनी शेक्सपिअर आणि बायबल या दोन्ही गोष्टी रुजवण्याचे काम जास्त जाणीवपूर्वक केले, असे म्हटले तर ते फारसे वावगे होणार नाही. इंग्रजी वाङ्मयात अभिजात नाटककार म्हणून गणल्या गेलेल्या शेक्सपिअरची मोहिनी भारत समाजजीवनावर आणि साहित्यजीवनावर पडली. शेक्सपिअरच्या साहित्याचा मोठा वाचकवर्ग भारतामध्ये तयार झाला. महाराष्ट्रातही एकेकाळी शेक्सपिअरच्या साहित्याने वेडावून गेलेला एक वर्ग होता. मराठी साहित्यिक आणि नाटककारांवर शेक्सपिअरचा मोठाच प्रभाव पडला. तसाच तो बायबलचाही काही प्रमाणात पडला. मराठी मुद्रणाची सुरुवातच मुळी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी केली. विल्यम कॅरे या ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडे त्याचा मान जातो. ख्रिस्ती धर्म आणि बायबलचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या मिषाने कॅरे यांनी मराठीसह इतरही अनेक भारतीय भाषा शिकून त्यामध्ये बायबलची भाषांतरे करण्याचे मोठे काम केले!
ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिस्ती धर्माचा अतिशय शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक अंगाने प्रसार करायला सुरुवात केली. त्यावरून एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात वादळही निर्माण झाले. त्याचवेळी अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळकांचे पती रेव्हरंड ना. वा. टिळक, पंडिता रमाबाई ही यातील काही प्रमुख नावे. बायबलचे मराठीतले पहिले भाषांतर करण्याचा मान पंडिता रमाबाई यांच्याकडे जातो. त्यानंतर बायबलची अनेकांनी भाषांतरे केली. बायबलचे मराठी अवतार या पुस्तकामध्ये बायबलच्या मराठी भाषांतरांची तपशीलवार आणि इत्यंभूत माहिती दिली आहे. अगदी अलीकडे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही नवा करारचे भाषांतर केले आहे!
सांगायचे असे की, ख्रिस्ती धर्मामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक जीवनात बरीच उलथापालथ झाली. त्याचे वस्तुनिष्ठ म्हणता येईल असे चित्रण करण्याचा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश नरेन्द्र चपळगावकर यांनी सावलीचा शोध या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘चपळगावकरांची भूमिका या घटनांचे आणि मतांचे मूल्यमापन करण्याची नसून त्यांना जन्म देणा-या परिस्थितीचा शोध घेण्याची आहे. म्हणून त्यांनी या ग्रंथातील लेखनासाठी निवडलेल्या व्यक्तींचे मानस, त्यांना घडवणारी परिस्थिती, त्यांच्या कार्यामागील प्रेरणा, इच्छित कार्य करताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मनात निर्माण झालेले ताणतणाव, त्यांच्या कार्याचे समाजावर होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम-आणि या सर्वातील नाटय़ याचे मनोवेधक चित्र रेखाटण्यात चपळगावकर पूर्णत: यशस्वी झाले आहेत.’’
तर चपळगावकर यांनी आपली पुस्तकामागची भूमिका स्पष्ट करताना लिहिले आहे, ‘‘सातासमुद्रांपलीकडून सुखाचे जीवन सोडून धर्मप्रसाराच्या उद्दिष्टाने काही मिशनरी भारतात येतात, अनेक कष्ट सोसतात, काही तर येथेच देह ठेवतात. धर्मातराचे काम हा मतभेदाचा विषय असू शकतो; परंतु सगळे जीवनच ज्याला अर्पण करावे असे एक ध्येय त्यांना उपलब्ध झाले आणि त्यांच्या जीवनाला एक अर्थ मिळाला. जे तरुण ख्रिस्ती झाले व आपण काही नवे मिळवले आहे या आनंदात सर्व अडचणी सहन करून जीवन जगले त्यांचे जीवन समजून घेणे हा एक वेगळाच अनुभव आहे.’’
या पुस्तकामध्ये एकंदर नऊ प्रकरणे आहेत. आणि ती सर्वच प्रकरणे व्यक्तिचित्रे म्हणावी अशी आहेत. म्हणजे या प्रकरणांमध्ये चपळगावकर यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या काही महत्त्वाच्या व वैशिष्टय़पूर्ण धर्मप्रसारकांवर आणि त्यांच्या कामावर भर दिला आहे. त्यातून या धर्मप्रसारकांचे काम आणि त्यांना करावा लागलेला संघर्ष यांची ओळख होते. दोन पारशी तरुणांचे धर्मातर, ‘कहाणी : दोन भावांची आणि एका गावाची, ‘आई, बाप आणि लेक, ‘तंटा : पाण्याचा आणि धर्माचा, ‘रेव्हरंड खंडनमिश्र, ‘भारतातील पहिली स्त्री वकील आणि रावसाहेब या प्रकरणांतून त्याचा प्रत्यय येतो.
धर्माची प्रेरणा सर्व प्रकारच्या त्यागाला कशी उद्युक्त करू शकते आणि तसा त्याग करणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक कसे असतात याचे चित्रण चपळगावकर यांनी या पुस्तकात समर्थपणे रेखाटले आहे. ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या कामांमागच्या प्रेरणांचा शोध घेण्याचा प्रयत्न चपळगावकरांनी केलेला असल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्माची चिकित्सा केलेली नाही, तो या पुस्तकाचा उद्देश नाही. त्यामुळे त्या दृष्टीने या पुस्तकाकडे पाहता येणार नाही, पाहूही नये. पण धर्माची प्रेरणा ज्या पद्धतीने ख्रिस्ती धर्मप्रसारकांना आपले जीवन त्यागायला उद्युक्त करते, तसे इतर धर्माबाबत होते का, होत असेल तर कशा पद्धतीने होते, त्या धर्म प्रसारकांचा त्याग काय पद्धतीचा आहे, हा विचार हे पुस्तक वाचताना मनात बळावत जातो. तसा इतर धर्माचा विशेषत: हिंदू धर्माचा विचार प्राधान्याने करून पाहावासा वाटतो. ख्रिस्ती धर्माची तत्त्वे आणि मूल्ये मात्र शांत आणि सुखी जीवनाचा मंत्र देतात, कर्मकांड आणि बुवावाजीला थारा देत नाहीत; जे हिंदू धर्मात फार मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे हिंदू धर्म ख्रिस्ती धर्मासारखा स्वीकारार्ह होत नाही का किंवा कसे असे प्रश्नही निर्माण होतात. असो. तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. कुणा जाणकाराने त्याबाबत स्वतंत्र लेखन करायला हवे.
कार्ल मार्क्‍सने धर्माला अफूच्या गोळीची उपमा दिली आहे. त्या अफूची चांगल्या प्रकारे गुंगी आणणा-या आणि त्यातून महाराष्ट्राच्या समाजजीवनात एकेकाळी वादळे निर्माण करणा-या धर्मप्रसारकांच्या कामाविषयीचे हे पुस्तक वाचनीय आहे, एवढे मात्र खरे!
सावलीचा शोध : नरेन्द्र चपळगावकर
मौज प्रकाशन गृह, मुंबई
पाने : 172, किंमत220 रुपये

कल्पकतेला पंख देणारे चित्रसंच

मुलांची पुस्तके म्हणजे मोठय़ा टाइपातील पुस्तके इतकी साचेबंद संकल्पना मराठीमध्ये अजूनही रूढ आहे. त्यात फार फार बदल झाला तर टाइप थोडा लहान आणि काही चित्रांची भर एवढाच काय तो क्रांतिकारक बदल मराठीमध्ये अलीकडच्या काळात झाला आहे. या संकल्पनेला पहिल्यांदा सुरूंग लावण्याचे काम पुण्यातील ज्योत्स्ना या प्रकाशनाने केले! मुलांच्या पुस्तकांच्या रूढ संकल्पना बदलवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अर्थात हे बदल इंग्रजी भाषेतील आणि इतर पाश्चात्य भाषेतील मुलांच्या पुस्तकांमध्ये होत होतेच! पण ज्योत्स्ना प्रकाशनने ते पहिल्यांदा मराठीमध्ये आणण्याचे काम केले. नॅशनल बुक ट्रस्ट आणि अगदी अलीकडे पुण्याच्याच ऊर्जा प्रकाशनने तो कित्ता गिरवला आहे. विंदा कंरदीकरांचे बालकवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनने सचित्र काढले तेव्हा त्याचे कोण कौतुक झाले! ते उचितच होते. पण त्याला इतर भाषांच्या तुलनेने बराच उशीर झाला होता हेही खरे!
कसेही असले तरी मराठीतल्या या काही मोजक्या प्रकाशनसंस्थांनी मुलांची पुस्तके प्रेक्षणीय केली! त्यांना मुलांचा विचार करून सचित्र केले, जिवंत केले. त्यामुळे या पुस्तकांनी मुलांशी संवाद साधायला सुरुवात केली आणि मुलांनीही त्यांना प्रतिसाद दिला, देत आहेत. मुलांच्या पुस्तकांसंदर्भात हा दुहेरी स्वरूपाचा संवाद नितांत गरजेचा असतो. पण मराठीमध्ये मुलांसाठी लिहिणारे बहुतेक लेखक हे मोठय़ांसाठी लिहिता येत नाही म्हणून मुलांसाठी लेखन करणारे असतात. त्यामुळे त्यातला बाळबोधपणा, उपदेशांचे डोस आणि संस्कारांची नको तितकी भरमार उबग आणणारी ठरते. त्याला सुरूंग लावले ते विंदा करंदीकर, माधुरी पुरंदरे, श्रीनिवास पंडित यासारख्या काही लेखकांनी. ते बरेच झाले. ज्यांना मोठय़ांसाठी चांगले लिहिता येते, त्यांनीच मुलांसाठी लिहिले पाहिजे, हे त्यांनी स्वत:च्या उदाहरणाने दाखवून दिले. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांचा दर्जा अव्वल ठरला.
मुलांशी अशा प्रकारची बांधीलकी बाळगायला प्रतिभा लागते आणि गुणवत्ताही. पण हे प्रयोग तसे संख्येने अजूनही कमी आहेत. त्यांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसा मुलांच्या पुस्तकांचा व्यवहार प्रगल्भ होत जाईल. पण याचबरोबर मुलांनी फक्त वाचायचे किंवा पुस्तकातील चित्रे पाहायची हा दृष्टिकोनही बदलण्याची गरज आहे. त्या दृष्टीने पुस्तकांची निर्मिती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी करंदीकर, पुरंदरे आणि पंडित यांच्या जातकुळीतल्या काही लोकांनी पुढे येण्याची गरज आहे.
असाच एक प्रयत्न नुकताच श्रीनिवास आगवणे या तरुण चित्रकाराने केला आहे. त्याने आय हेट कलरिंग बुक या नावाने दोन चित्रांचे संच तयार केले आहेत. या दोन्ही संचात पंधरा-पंधरा चित्रांचा समावेश आहे. या संचासोबत एकेक पेन्सिलही दिली आहे.
या दोन्ही संचातील सर्व चित्रे ही कृष्णधवल (म्हणजे ब्लॅक अँड व्हाइट) रंगामध्ये आहेत. मुलांनी ती तशीच रंगवायची आहेत. पण दोन्ही संचातील कुठेलच चित्र पूर्ण नाही. चित्रकार-लेखकाने फक्त त्या चित्रांची थोडीशी आऊटलाइन करून दिली आहे वा चित्रातला एखादा भाग काढला आहे. उर्वरित चित्र मुलांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचे आहे.
काय आहेत ही चित्रे? तुटलेली अर्धवट मूर्ती, भारतीय, चिनी आणि ऑस्ट्रेलियन विमाने, जंगल सफारीसाठीचे बूट, आदिवासी चित्रकाराचे अर्धवट चित्र, आईच्या आवडत्या साडीवर बसलेला श्ॉमेलियन, बुद्धिबळाच्या सोंगटय़ा अशा पंधरा चित्रांचा एका संचात समावेश आहे. म्हणजे या संचातील कुठलेच चित्र केवळ रंगवण्याचे काम मुलांनी करावयाचे नाही तर प्रत्येक चित्र त्यांनी स्वत:च्या कल्पनाशक्तीने स्वत: काढावयाचे आहे.
कारण आजची मुले फार चोखंदळ आणि स्वतंत्र असतात. त्यांना त्यांच्या मनानुसार चित्रे काढायची असतात. त्यांच्या कल्पनेतील चित्रे आणि पुस्तकातील चित्रांचे रूढ आकार यांचा बऱ्याचदा मेळ बसत नाही. त्यामुळे मुलांची चित्रे म्हणजे ही त्यांच्या अभ्यासासारखी घोकंपट्टी होऊन बसते. या दोन्ही चित्रसंचामध्ये या कल्पनेला पूर्णत: फाटा दिला आहे. इतर पुस्तकांतून पाहून यातले कुठलेच चित्र काढायचे नाही, तर स्वत:च्या कल्पनेनुसार चित्रे काढायची आहेत. पण स्वत:च्या कल्पनेने चित्रे काढणाऱ्या मुलांचेही काही प्रकार असतात. चित्र नीट काढून ते तन्मयतनेने रंगवणारे आणि चित्र रंगवायला आवडत नाही म्हणणारे, असा या चित्रसंचाच्या लेखक-चित्रकाराचा निष्कर्ष आहे. त्यामुळे अशा मुलांचे आग्रह लक्षात घेऊन आगवणे यांनी त्यांच्या धाडसाला आणि कल्पकेतला उजागर करता येईल अशा पद्धतीने या संचाची रचना केली आहे.
हा मराठीमधला एक अभिनव प्रयोग म्हणायला हवा. कारण मुलांच्या कल्पकतेचा आणि धाडसाचा विचार करून त्यांना प्रोत्साहन देण्याची कल्पनाच भन्नाट आहे. पण मुलांचे हे धाडस आणि कल्पकता त्यांच्या पालकांच्याही पचनी पडायला हवी. दुर्दैवाने तशा साक्षर पालकांची संख्या आपल्याकडे अजून कमी आहे. पण हे चित्रसंच नीट समजून घेणाऱ्या पालकांना आपला तो दृष्टिकोन बदलायला भाग पाडतील, अशी आशा आहे.
आय हेट कलरिंग बुक (दोन चित्रांचा संच): श्रीनिवास आगवणे
प्रकाशक लेखक स्वत:
किंमत : प्रत्येकी 200 रुपये
माहितीसाठी संपर्क : 9930329575

Monday, March 12, 2012

कर्म करोनि म्हणती साधू!

 मराठी साहित्यिक आणि सार्वजनिक चारित्र्य : एक मीमांसा ( भाग 3)
- अरुण टिकेकर
लेखांक : तीन

 टिकेकर यांनी लोकमतच्या मंथन (11 March.12) या रविवार पुरवणीत लिहिलेला हा लेख.
एका वृत्तपत्रानं टीका केली म्हणून ‘मी वृत्तपत्रं वाचत नसतो’ असं मानभावीपणानं म्हणणारा लेखकराव नवी ‘क्रांतिकारक’ कादंबरी प्रसिद्ध होताना मोठय़ा वृत्तपत्रांनाच नव्हे, तर लुंग्या-सुंग्या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना हस्ते-परहस्ते आमंत्रणं देत त्यांच्यासाठी तासन्तास मुलाखती देऊ लागतो. ही अशी घटना निष्कपटी, निरपराधी निश्‍चितच नाही. आजच्या मराठी सारस्वतात ती प्रातिनिधिक असल्यानं ती लक्षणीय आणि दखलपात्र ठरते. कारण परमताचा आदर करण्याच्या लोकशाही मूल्याची जी अपेक्षा साहित्यिकाकडून असते, तिचा गळा घोटण्याचा प्रयत्न त्यात असतो. जो मला, माझ्या शब्दकळेला, माझ्या साहित्यकृतीला नावाजेल तो खरा आणि जो टीका करेल तो खोटा या मतलबी समजातच कंपूशाहीची बीजं असतात. कंपूशाही ही साहित्यबाह्य गुणावगुणांना महत्त्व देते. म्हणून वाड्मयीन महत्तेला बाधक ठरते.
मागे एकदा एका ऐतिहासिक कादंबरीच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या प्रसंगी त्या कादंबरीचे प्रकाशक (मराठी लेखकांना ‘घडविण्याचं’ श्रेय हल्ली प्रकाशक आपल्याकडे घेतात!) आणि एक साक्षेपी (अतिवापरामुळे गुळगुळीत झालेला, पण संपादक म्हणताच त्याच्या मागे अपरिहार्यपणे लावण्यात येणारा शब्द!) संपादक असे दोघेही इतरांबरोबर बोलले. साक्षेपी संपादक म्हणाले, ‘या कादंबरीचं हस्तलिखित वाचताच माझ्या ध्यानात आलं की, ही टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’च्या तोडीची कादंबरी आहे.’ अर्थ उघड होता की, संपादकमजकुरांनी ‘वॉर अँड पीस’ वाचलेली नाही. कारण शीर्षक असं असलं तरी ती कादंबरी मानवी संबंधाची गुंतागुंत दाखवणारी, धागेदोरे उलगडून दाखवणारी आहे आणि मराठीतील कादंबरी प्रभावी युद्धकथा आहे. ते असंही म्हणाले की, लेखकानं इतिहासाचा इतका अभ्यास केला आहे की, या कादंबरीतील प्रत्येक विधान आणि घटना ऐतिहासिक आहे. मग तिला कादंबरी का म्हणायचे? इतिहासच म्हणावं की रसाळ भाषेत लिहिलेला आणि गोष्टीरूपानं सांगितलेला.
आज मराठी साहित्यविश्‍वात कोणीही कोणतंही कशाही प्रकारचं विधान करावं, दावा करावा, त्याकडे कोणीही पाहत नाही, त्यावर कोणी प्रतिवाद करण्याच्या भानगडीत पडत नाही. अशा प्रकारच्या वाड्मयीन वातावरणात प्रत्येक पुस्तकात आगळं-वेगळंपण शोधलं जातं. चांगल्याला चांगलं म्हणताना वाईट पुस्तकालाही चांगलं म्हटलं जातं. वाड्मयीन निकष मोडीत काढले जातात आणि पुस्तक परीक्षणाची घसरण ‘पुस्तक परिचया’त होते. परीक्षण करणं ही नवे शत्रू निर्माण करण्याची कला होऊन बसते. (म्हणून तर मराठी वृत्तपत्रांनीही परीक्षणांऐवजी परिचय छापण्यास सुरुवात नाही ना केली?)
पुस्तक-परीक्षण सर्वसामान्य वाड्मयप्रेमींना मार्गदर्शक ठरू शकतं. पण ते प्रकाशकांच्या नजरेत कुसळासारखं खुपतं. म्हणून आजकाल एखाद्या थोडंबहुत नाव असलेल्या व्यक्तीकडून लेखक वा प्रकाशकच तथाकथित परीक्षण लिहून घेऊन ते पुस्तकांबरोबरच संपादकांकडे पाठवू लागले आहेत. त्यालाही आयती ‘परीक्षणं’ मिळू लागल्यानं तोही खूश. शिवाय प्रत्येक मोठय़ा प्रकाशकांची आपापलं ‘गृह-नियतकालिक’ आहेच. त्यावर थोडा खर्च केला की, आपल्या प्रत्येक प्रकाशनाची वाड्मयीन ‘महत्ता’ सांगता येतेच. हे वातावरण ग्रंथांच्या वाड्मयीन दर्जातला फरक पुसून टाकणारे असल्याचं आपल्या ध्यानी येतं की नाही? त्यातही नवे गोंधळ आहेत. सर्जनशील साहित्यिक आणि समीक्षक हे आताआतापर्यंत आपण जो विचार, जी भावना शब्दांत पकडली त्यातील अपूर्णता जाणवून आपल्या लेखनाबद्दल नेहमीच समाधानी नसत. पण आताचे साहित्यिक स्वत:वरच खूश असतात. एखादा साहित्यिक वृत्तपत्राच्या संपादकासमोर ‘ही घ्या, मी एक सुंदर कथा लिहिली आहे’ असं स्वत:च म्हणतो, तेव्हा तो काय करू इच्छित असतो? संपादकावर मानसिक दबाव आणत असतो? हल्ली बहुतांश लेखक अशी आत्मप्रशंसा बिनदिक्कत करताना आढळत आहेत. इतरांसाठी आत्मस्तुती असली तरी ही आत्मवंचनाच म्हणावी लागेल.
प्राध्यापकांची समीक्षा ही जनसामान्यांपासून दूर तर गेलेलीच आहे, पण ती परभृत झाली आहे. पाश्‍चात्य वाड्मयीन संकल्पनांच्या आहारी गेली आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या गोतावळ्याशिवाय अन्य वाचक ती वाचत नाहीत. शैक्षणिक क्षेत्रातील चर्चा, परिचर्चा, परिसंवाद यांच्यापलीकडे ती पोहोचत नाही.
या सार्‍याचा परिणाम एखाद्या साहित्यकृतीचं खरं मोल समाजघटकांना न समजण्यात होत आहे. त्यामुळे अधिकार नसलेल्या मंडळींकडून नवनवे पण अनावश्यक वाड्मयीन निकष तयार केले जात आहेत. उदाहरणार्थ, स्त्री असल्याशिवाय स्त्रियांचे प्रश्न कळणार नाहीत. ग्रामीण भागात राहिल्याशिवाय ग्रामीण क्षेत्रांच्या समस्यांचं आकलन होणार नाही, शेतकरी असल्याशिवाय शेतकर्‍यांचे प्रश्न समजणार नाहीत. दलित नसलेल्यांना दलितांचे प्रश्न कळणार नाहीत, मग त्यांच्या वाड्मयनिर्मितीचं आकलन कसं होणार, हा एक अनावश्यक नवा निकष आजच्या मराठी वाड्मयक्षेत्रात रूढ झाला आहे. त्याचं खंडन करण्याचंही कुणा समीक्षकानं मनावर घेतल्याचं आढळत नाही. शेक्सपिअरची काव्यात्म नाटकं, इब्सेन, शॉची नाटकं, डिकन्स-हार्डीच्या कादंबर्‍या आताआतापर्यंत विद्यापीठीय विद्यार्थ्यांना कित्येक पिढय़ा शिकवल्या गेल्या. किती विद्यार्थ्यांनी लंडन वा तत्सम प्रदेश पाहिले होते हो? तरीही त्यांना हॅम्लेट कळला, लेडी मॅक्बेथ कळली, शायलॉक कळला, वृद्ध लियरची मानसिक अवस्था कळली, इब्सेनच्या नाटकातील नोराचं वागणं उमजलं वगैरे. पण मग आजच आपण तक्रार का करत आहोत? साधे-सोपे वाड्मयीन सिद्धान्तही आपल्याला कोणी सांगत नाही का? विदारक जीवनानुभव कच्चाच आपल्यासमोर ठेवला, तर त्याचा आपल्याला मानसिक धक्का बसेल. पण तो वाड्मयानुभव नव्हे. असं लेखन सामाजिक दस्तावेज म्हणता येईल. जीवनानुभवाचं वैश्‍विकीकरण झालं तरच तो वाड्मयनिर्मितीची उंची गाठू शकेल. हे आपल्या वाचकांना, लेखकांना तसंच प्रकाशकांना सांगणार कोण? समीक्षकांनी आपला हात कधीच आखडता घेतला आहे. वाईटाला वाईट म्हणण्याचं धैर्य ते जणू गमावून बसले आहेत. एखाद्या सुमार वाड्मयकृतीतील उणिवा दाखवणारी किती परीक्षणं आज प्रसिद्ध होत आहेत? सगळ्याच वाड्मयकृती मग आगळ्या-वेगळ्या, नवप्रवाह आणणार्‍या ठरणार. ही वाड्मयीन भोंदूगिरीच म्हणता येईल. लेखक-प्रकाशकांनी अनभिज्ञ वाचकांची फसवणूक केली तरी पुस्तकं विकली जातील, वाचक बिचारे ‘साहित्याभिरुची’ वाढवण्यासाठी पदराला खार लावून ती मुला-बाळांसाठी विकतही घेतील. राजा राममोहन रॉय फाउंडेशनच्या आर्थिक साह्यावर आपल्या सार्वजनिक ग्रंथालयांची कपाटं भरतील, पण तरुण वर्ग त्या ग्रंथांकडे फिरणारसुद्धा नाही.
बदलाची सुरुवात साहित्यिकांकडून व्हायला हवी, साहित्य-सेवकांकडून नव्हे, असे मला वाटतं. ‘मला दज्रेदार वाटतं तेच मी छापायला देईन’ अशी व्यावसायिक अस्मिता साहित्यिकांनी बाणवली, तरच काही बदल होऊ शकेल. त्या अस्मितेत ‘मी हे करेन, हे करणार नाही’ अशी आचारसंहिताही समाविष्ट असेल.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या संबंधातील एक घटना सांगावीशी वाटते. दिवाळी अंकासाठी कविता पाठविण्याचं पत्र मिळाल्यानंतर ‘यंदा माझ्याकडे कविता नाही, एक लेख मनात आहे. तो पाठविल्यास चालेल का?’ अशी उलटटपाली पृच्छा करणारा तो एकमेव कविराज! नाहीतर बहुतेक कवींना संपादकाचं पत्र येताच कवितेमागून कविता स्फुरू लागतात! यंदा केलेल्या कवितांपैकी सर्वात चांगली तुम्हालाच पाठवत आहे, अशी वर मखलाशी! जणू संपादक निरक्षर किंवा कार्यबाहुल्यामुळे वाचन न करणारा प्राणी! ‘ऐसे कैसे सारे भोंदू। कर्म करोनि म्हणती साधू।।’
या सार्‍या वातावरण बिघाडीची कारणं शोधू लागलं तर एक महत्त्वाची बाब ध्यानी येते. ती ही की, मराठी साहित्यिकांच्या मांदियाळीतील बहुतांश ‘अर्धवेळ लेखक’ आहेत. म्हणजे त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आहे. केवळ आत्ममग्नतेपोटी आणि खोट्या प्रतिष्ठेपोटी हा व्यवसाय करणार्‍यांना ‘लेखन-कामाठी’ ही गाजराची पुंगी वाटते. वाजली तर वाजली, नाही तर नाही! वाजली तर प्रतिष्ठित साहित्यिक म्हणून मिरवता येईल, नाही वाजली तरी साहित्यिकांच्या मेळाव्यांत ऊठबस तर होईल. स्वामित्व-धन नाही मिळालं (मराठी पुस्तकांसाठी ते अनेक वेळा मिळतच नाही!) तरी आपली नोकरी, व्यवसाय आहेच. साहित्यिकाची सामाजिक जबाबदारी स्वीकारून अपुर्‍या आणि तुटपुंज्या मानधनावर जगायचा प्रसंग मराठी साहित्यिकांवर येतच नाही कधी. मग सामाजिक जबाबदारी स्वीकारण्याचा आणि ती निभावण्याचा संबंधच कोठे येतो? दहा-पंधरा पुस्तकं स्वखर्चानं प्रसिद्ध केली तर दोन-चार वाड्मयीन पुरस्कार मिळतातच. हल्ली वाड्मयीन पुरस्कारच इतके झाले आहेत की कोणाचंही पुस्तक पुरस्कारापासून वाचणं कठीण झालं आहे.
साहित्यिक म्हणून प्रतिष्ठा मिळवताना यशस्वी साहित्यिकांच्या आवडी-निवडी सांभाळत त्यांच्याबरोबर ऊठबस करताना गंभीर मत-प्रदर्शनाची सक्तीही नसते. ना राजकीय मतांमुळे होणारा छळ, ना युद्धात सहभागी व्हावं लागल्यामुळे शत्रूकडून होणार्‍या शारीरिक-मानसिक त्रासाची झळ. तो विठ्ठल पोटापुरते देतोच आहे. राज्यघटनेनं सर्वांना लिहिण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे. सुमार दर्जाचं लेखन करू नये असं कायदाही सांगत नाही. जीवनानुभव तोकडा, लेखन-तंत्र दोषपूर्ण, प्रसिद्धी- तंत्र विकसित आणि विचार-अभ्यास न करण्याचं स्वातंत्र्य मात्र अर्मयाद! असा हा साहित्यिक मामला असल्यानं वाड्मयीन मूल्यं, प्रत्येक मराठी वाड्मयकृतीत परीक्षकांना आढळणार. पण मराठी वाचकांवर त्या वाड्मयकृतींचा प्रभाव पडणार नाही. राज्यस्तरावर, राष्ट्रस्तरावर, आंतरराष्ट्रीय जगतात मराठी साहित्यिकांचा दबदबा असणार नाही. नोबेल पुरस्कार मात्र मराठीला सतत हुलकावणी देत राहणार! एवढंच काय, विंदा करंदीकरांसारख्यांचा महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून विचारसुद्धा पद्मश्री, पद्मभूषणसाठी होणार नाही. तो मान सैफ अली खानसारखे पटकवणार!
(समाप्त)

Sunday, March 4, 2012

साहित्यिक कसले? - याचक!

मराठी साहित्यिक आणि सार्वजनिक चारित्र्य : एक मीमांसा
- अरुण टिकेकर
लेखांक : दोन
टिकेकर यांनी लोकमतच्या मंथन (04 March.12) या रविवार पुरवणीत लिहिलेला हा लेख.


मराठीमध्ये ज्या प्रकारे आणि ज्या प्रकारचा ग्रंथव्यवहार सध्या सुरूआहे, तो पाहता तो तसाच सुरू राहिला तर मराठी भाषा आणि मराठी ग्रंथ यांना फारसं चांगलं भवितव्य आहे, असं म्हणवत नाही. काही ग्रंथ चांगले खपत आहेत, असं जरी दृश्य दिसलं तरी त्यामुळे मराठी भाषा-संगोपन आणि ग्रंथनिर्मिती यासंबंधात असलेली जबाबदारी मराठी साहित्यिक पार पाडत आहेत, असं म्हणता येत नाही. ग्रंथांचा समाजमनावर प्रभाव पडावा, हे अपेक्षित आहे. तो प्रभाव वैचारिक असावा, समाजाची मानसिकता प्रगल्भ करणारा असावा हे अपेक्षित आहे. समाजाला भावनिक साद घालणार्‍या वा मनोरंजन करणार्‍या वाड्मयकृती टाकाऊ असल्याचं म्हणता येत नसलं तरी गीतकार आणि कवी यांच्यामध्ये जो तर-तमभावाचा फरक असतो, तोच लेखक आणि साहित्यिक यांच्यात करावा लागेल. काल-परवापर्यंत हा फरक केला जातही असे.

आज मराठी ग्रंथ-व्यवहाराचा पसारा निश्‍चितच वाढला आहे. प्रकाशक, विक्रेते आणि लेखकही संख्येनं वाढले आहेत, हे जसं अपेक्षित होतं तशी स्वातंत्र्यानंतरच्या काळात लोकसंख्यावाढही अपेक्षित होती. पण वाचकांची संख्या मात्र अपेक्षेप्रमाणे न वाढता ती कमी होत चालली आहे, असं अनुमान काढलं जात आहे. मग हे अनुमान तरी चुकीचं आहे किंवा ग्रंथ-प्रकाशनांच्या संख्येवरून ग्रंथ-व्यवहारात सर्व आलबेल असल्याचा मराठी सारस्वताकडून करण्यात येणारा दावा तरी चुकीचा आहे. ग्रंथ विकत घेतला म्हणजे तो वाचला गेला असं समजण्यामागे फारच धाष्टर्य़ आहे, हेही स्वीकारणं आपल्याला जड जात आहे. मराठी साहित्य-विश्‍वात खळबळ माजवणारं एखादंच पुस्तक वर्षा-दोन वर्षाकाठी प्रसिद्ध होतं, पण बर्‍याचदा हेही ध्यानात येतं की ती खळबळ माजवली जाते - लेखकाकडून, प्रकाशकाकडून आणि पत्रकारांकडून. समाज-मन ढवळून काढणार्‍या किती साहित्यकृती आज मराठीत प्रकाशित होत आहेत? तरीही मराठी साहित्यिकाला नोबेल पुरस्कार का मिळत नाही (जणू नोबेल साहित्य पुरस्कार निवड-समितीही मराठी साहित्यिकांच्या विरुद्ध आहे), जागतिक स्तरावर मराठी वाड्मय का पोहोचत नाही (जगातील यच्चयावत ग्रंथ-प्रेमी मराठीच्या विरुद्ध?) मराठी ज्ञानभाषा का होऊ नये? ज्ञानेश्‍वर-चक्रधरांच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये? वगैरे अनावश्यक प्रश्न मोठय़ा हिरिरीनं चर्चिले जातात. ही अशी चर्चा निष्फळ आहे, मराठी साहित्यिकांनी आपली जबाबदारी ओळखून उत्तमोत्तम साहित्यकृती निर्माण कराव्यात हेच योग्य, हे न समजण्याइतपत का आपण खुळे आहोत?
मराठी ग्रंथ-व्यवहाराशी संबंधित असलेल्या सर्वांनीच - म्हणजे लेखक, प्रकाशक, वितरक, वाचक - आणि त्याबरोबरच प्रकाशनांचे मालक-संपादक, शासन आणि शासनप्रणीत संस्था, ग्रंथपुरस्कार देण्यासाठी रक्कम सुपूर्द करणारे दाते अशांनी आपापल्या ग्रंथविषयक भूमिकांचा प्रामाणिकपणे पुनर्विचार करणं अगत्याचं आहे. आत्मपरीक्षण करण्याची सर्वात मोठी जबाबदारी अर्थातच साहित्यिकांची असणार. साहित्यिकांनी निर्मिती केलीच नाही, तर पुढच्या साखळीला अर्थच उरत नाही. वृत्तपत्रात आज तीन संघनायकाचं अस्तित्व असल्याचं कबूल करावं लागतं ना - संपादक, जाहिरात-विभागप्रमुख आणि वितरण-विभागप्रमुख. पण संपादकाच्या संघानं वृत्तपत्र तयार केलं नाही तर बाकीच्या दोन विभागांना अर्थ काय राहणार? साहित्यिकानं लिहिलंच नाही तर प्रकाशक काय छापणार, वितरक काय विकणार, वाचक काय वाचणार?
म्हणजे साहित्यिक हा ग्रंथ-व्यवहारातला सर्वात महत्त्वाचा घटक. तो कसा वागत आहे आज? जबाबदारीनं आणि सचोटीनं की लबाड्या आणि अप्रामाणिकपणा करत? सुधारणांचा पुरस्कर्ता, समाजाच्या अस्मितेचा रक्षक! जो साहित्यिक अखिल समाजाला केवळ भावनिक साद घालतो, मनोरंजन करतो, त्याला साहित्यिक म्हणावयाचं की जो आपल्या साहित्यकृतीतून अगदी विनोदनिर्मितीतूनही लोकशिक्षण करतो, समाजाला सुसंस्कृत आणि प्रगल्भ बनवतो, त्या विचारवंताला? समाजातील विविध घटकांमधल्या आर्ष (म्हणून त्याज्य!) तत्त्वांना तिलांजली देण्यासाठी समाज-घटकांची मनोभूमिका तयार करणारा तो साहित्यिक! एका अर्थानं साहित्यिक हा अहिंसात्मक पद्धतीनं समाजातली शांतता भंग करणाराच असतो! समाजविघातक प्रवृत्तींपेक्षा त्याचं वेगळेपण हे त्याच्या वैचारिकतेत असतं. त्याच्या विलक्षण अशा तटस्थतेत आणि अलिप्तपणात असतं. त्यामुळेच त्याला मोठी विश्‍वासार्हता प्राप्त होते. ‘मी हे करीन, पण हे करणार नाही’ अशी आपली ‘आचार-संहिता’ तयार केलेले मराठी साहित्यिक आज किती आहेत? बहुतेक ‘नरो वा कुंजरोवा’ करणारे तरी आहेत किंवा ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी स्वत:ची समजूत करून घेतलेले तरी आहेत.
वास्तविक साहित्यिकांचा दरारा असा पाहिजे की, राज्य-शासन साहित्यिकांपासून वचकून असलं पाहिजे. आम-जनतेचे- वाचकांचे प्रतिनिधी म्हणून साहित्यिकांनी अन्यायाविरुद्ध उभं राहिलं पाहिजे. राज्य शासनाकडून होणार्‍या अन्यायग्रस्तांची बाजू घेऊन त्या अन्यायाचं निवारण करण्यासाठी काही खडे बोल शासनाला सुनावण्याचं धाडस साहित्यिकांत असलं पाहिजे. पण सरकारी पुरस्कार मिळण्यासाठी अर्ज करणार्‍या, त्यासाठी सरकारदरबारी स्वत: किंवा स्नेही सोबत्यांना खेटे घालायला लावणार्‍या, एखाद-दुसर्‍या शासकीय समितीत घुसण्यासाठी मिनतवार्‍या करणार्‍या साहित्यिकांवर शासनाच्या धोरणाची री ओढण्याची, निदान ऐनवेळी चूप बसण्याचीच पाळी येणार! त्यासाठीच तर शासन पुरस्कारांची आणि अनुदानाची खैरात करत असते. कोणत्याही नाजूक प्रकरणी आपल्या मराठी साहित्यिकांची प्रतिक्रिया ‘नो कमेंटस्’ अशी असते. वास्तविक समाजाभिमुख विचारवंत म्हणून दखलपात्र घटनांवर साहित्यिकांनी आवर्जून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. दुर्गाबाई भागवतांचं वेगळेपण यात होतं. शासनाला विचारवंतांचं मूग गिळून गप्प बसणं फायद्याचं ठरतं. समाजातला एक बोलका घटक गप्प बसवण्यासाठी अपात्री पुरस्कार देण्याची तसंच लुंग्या-सुंग्या संस्थांना अनुदान देण्याची शासनाची उदारता या साहित्यिकांच्या का ध्यानी येत नाही? छोट्या-मोठय़ा साहित्य संमेलनाला घसघशीत आर्थिक मदत देण्यामागचं हे इंगित सार्‍यांना ज्ञात आहे. पण रांगा लावून शासनाचे पुरस्कार घेणार्‍यांनी आपल्या अभिमानाला आणि आपल्या व्यवसायाच्या अस्मितेलाच गंगार्पण केलं आहे. दुबळ्यांचा दीनपणा समजून घेता येईल, पण सबळांची दीनता? तो मतलब, स्वार्थ किंवा अधाशीपणा या सदरातच मोडणार. नाही का? शिवाय हे शब्दप्रभू असल्यानं तर्कदुष्टतेचं त्यांना वरदानच! हे लोकशाहीत शासनाचं कर्तव्यच आहे वगैरे वाक्यं त्यांच्या ठेवणीत असतातच. मुळात प्रश्न शासकीय वा इतर पुरस्कार वा अनुदान देण्या-घेण्याचा नाही, तर स्वाभिमान सोडण्या-न सोडण्याचा आहे. आशाळभूतांचं ‘नो कमेन्ट्स’ म्हणणं हे स्वार्थीपणाचं असतं. आजच्या साहित्यिकांचा मतलब असा की कशाला दुखवा शासनाला? अशी भूमिका एकदा घेतली की मग काय? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार येऊ द्या किंवा शिवसेना-भाजप युतीचं सरकार येऊ द्या, लाभार्थी साहित्यिकांना काहीच फरक पडत नाही. त्यांची याचना पुरस्कार-अनुदान किंवा एखादं समिती सदस्यत्व वा साह्य एवढय़ापुरतीच. शासनाचं तरी काय जातं उदार व्हायला? जनतेचा पैसा, तो गरजू गरिबांना दिला काय किंवा दीनदुबळ्य़ा आणि स्वार्थी साहित्यिकांना दिला काय? एकवेळ जनता अति झालं तर खवळून उठेल, पण हे कुंभकर्णासारखे झोपलेले साहित्यिक वैचारिक संघर्ष वगैरेच्या बाबतीत जागे होणार नाहीत.
मागे एकदा महाराष्ट्राची नाळ पुरेपूर ओळखलेले मुख्यमंत्री शरद पवार यांनी आपल्या वयाची पन्नाशी ओलांडल्याचे निमित्त करून राष्ट्रीय पुरस्कार लाभलेल्या सर्व जिवंत साहित्यिक, कलावंत, क्रीडापटू यांना शासनाच्या तिजोरीतून लाख-लाख रुपयांचे पुरस्कार दिले होते. एखादा-दुसरा अपवाद वगळता सर्वांनी ‘लाखाची मोठी अमाउंट आहे’ असं सस्मित म्हणत ते स्वीकारले. फक्त ‘महाराष्ट्र टाईम्स’चे तत्कालीन संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांनी ‘पवारांचा रमणा’ शीर्षकाचा अग्रलेख लिहून त्यावर टीका केली. लाखभर रुपये घेणार्‍या किंवा ते न मिळालेल्या साहित्यिकांपैकी कोणीही ‘हे कशासाठी दिले?’ ‘कुठल्या गंगाजळीतून दिली?’ याची चौकशीसुद्धा केली नाही. बहुतेकांनी लक्षाधीश झाल्याचा टेंभा मात्र मिरवला. ज्यांना ती रक्कम मिळाली नाही, तेही गप्पच! न जाणो, भविष्यात आपल्यालाही एखादा राष्ट्रीय पुरस्कार वा सन्मान मिळाला तर आपलाही क्लेम आहेच या नव्या पुरस्कारावर! पवारांनी सत्तरी ओलांडली, पण पुन्हा एकदाही, एकालाही तो मिळाला नाही. एकाही साहित्यिकानं अजून त्याविरुद्ध ब्र देखील काढला नाही! पवारांच्या पंचाहत्तरीची वाट पाहत आशाळभूत नजरेनं बसले आहेत बापुडे!
असे याचक साहित्यिक आपल्या व्यवसायाचा काय स्वाभिमान बाळगणार आणि आपल्यावरची सामाजिक जबाबदारी काय पार पाडणार? पुरस्कार नाकारल्याची किती उदाहरणं आहेत आपल्या आजच्या समाजात? पुरस्कार खूप घेतले, यापुढे घेणार नाही, असं म्हणणारा ग. प्र. प्रधानांसारखा साहित्यिक - विचारवंत अपवादात्मकच! साहित्यिक याचक बनले म्हणून शासन शिरजोर बनले. सरकारवर अंकुश ठेवण्याची सामाजिक जबाबदारी असली तरी आपली लेखणी बाजूला ठेवलेल्या पत्रकारांसारखीच साहित्यिकांची स्वार्थी भूमिका अवसानघातकी ठरली. संस्कृतीचा अपकर्ष होतो तेव्हा साहित्यिक, कलावंत आपापल्या माध्यमाचा वापर करत समाज-बदल घडवून आणतात, या वचनातला पहिला भाग झाला आहे. दुसरा मात्र व्हायलाच तयार नाही. साहित्यिक आपली सामाजिक जबाबदारी विसरले. स्वार्थी झाले, स्वार्थामुळे मदान्ध झाले. आता समाज-बदलाचे नवे पाईक कोण होणार?
असं तर नव्हे की साहित्यिक म्हणून घेणार्‍यापैकी बरेचसे साहित्यिकच नव्हेत? शेक्सपिअरलासुद्धा त्याच्या एका टीकाकारानं an upstart crow beautified with other's feathers (अन्यांचे पंख चिकटवून सुंदर झालेला डोमकावळा) म्हटलं होतं. तसेच डोमकावळे समाजात जास्त झालेत का? आजच्या मराठी समाजात अन्य समाजाच्या मानानं लेखकच जास्त झाले आहेत (म्हणून वाचक कमी?). दगदगीचं जीवन जगणार्‍या आय.ए.एस. अधिकार्‍याला वेळी-अवेळी काव्य स्फुरणं, प्राध्यापकांना किंवा प्रशासकांना एकामागोमाग दहा-वीस मोठाल्ल्या कादंबर्‍या लिहावयास वेळ मिळणं, उद्योगपतीला मानवी जीवनावर नैतिक भाष्य करायला उसंत मिळणं, त्याची तशी प्रवृत्ती बनणं.. अशी बरीच उदाहरणं घेता येतील, की ज्यांचे उल्लेख समाजातले घटक आपल्या व्यवसायात सारे कसे असमाधानी, असं विचारत सार्‍यांना आपल्या कार्यकाळातच लेखक किंवा साहित्यिक होण्याचं स्वप्न का पडत आहे, असा प्रश्न उभा करावासा वाटतो.
आजच्या आपल्या साहित्यिकांमध्ये शिरलेल्या ढोंगाचा तर हा परिणाम नाही ना?

मरणोत्तर लोकोत्तर!

आपण मेल्यावर काय होतं, ही कुतूहलाची गोष्ट असते. पण ते पाहायला आपण हयात नसतो. पण एक खरं की, आपण, म्हणजे सर्वसामान्य माणसं, मेल्यावर आपल्याविषयीची स्वाभाविक प्रतिक्रिया ही चांगला माणूस होताअशीच (मोघम) असते! आपले कुटुंबीय काही काळ शोकाकूल होतात, उमाळे उसासे काढतात, तर आपला मित्र-परिवार आपल्याविषियीच्या त्यांच्या सहवासातल्या आठवणींना उजाळा देतो. म्हणूनच कदाचित कवीवर्य भा. रा. तांबे यांनी जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?’ असं म्हणून ठेवलं असावं! काही का असेना, कुठलाही सामान्य माणूस मेल्यावर तो काही काळ का होईना, सेलिब्रिटी होतो. त्याच्याविषयी सहसा वाईट बोललं जात नाही. जाहीरपणे तर नाहीच नाही. भले मग तो वाईट असेना! तसा अलिखित संकेत पाळला जातो.
 
पण जेव्हा आपले आयडॉल, आपले आदर्श जातात, तेव्हा काय होतं? सेलिब्रिटी तर ती आधीपासूनच असतात. निधनानंतर ती लिजंड (दंतकथा) होतात, आधीपेक्षाही जास्त माणूसहोतात! आपल्या अधिक जवळ येतात. प्रत्यक्षात आपण त्यांना कधी भेटलेलो नसतो, पण आता नेहमीच त्यांची भेट होऊ लागते!!
 
.तर आयडॉल म्हणता येईल अशा व्यक्तींविषयीच्या भाषणांचं फेअरवेल, गॉडस्पीडहे पुस्तक आहे. त्याचं उपशीर्षक आहे, ‘द ग्रेटेस्ट यूलजिज ऑफ अवर टाइम’. यूलजि म्हणजे शोकपर भाषण वा लेख. हा प्रकार आपल्याकडे फारसा नाही, पण पाश्चात्य देशात तो चांगलाच रुजलेला आहे. आणि अशा यूलजिजच्या संग्रहांची पुस्तकंही तिकडे प्रकाशित होतात, वाचली जातात आणि त्यांचा संग्रहही केला जातो. विसाव्या शतकातल्या 64 नामवंतांच्या अशा शोकपर भाषणांचं आणि लेखांचं फेअरवेल, गॉडस्पीडया पुस्तकाचं सायरस कोपेलँड यांनी संकलन-संपादन केलं आहे. सायरस हे काही लेखक-संपादक नाहीत. ते अ‍ॅड-गुरू आहेत. न्यू यॉर्कमध्ये राहणाऱ्या या अ‍ॅड-गुरूचा हा संग्रह उत्तम म्हणावा असा आहे. या पहिल्या पुस्तकानंतर सायरस यांनी तीन वर्षानी अ वंडरफुल लाइफ : 50 यूलजिज टू लिफ्ट द स्पिरिटहे पुस्तकही संपादित केलं आहे. 
 
फेअरवेल, गॉडस्पीडच्या प्रास्ताविक निवेदनात सायरस यांनी लिहिलं आहे- अ ग्रेट यूलजि इज बोथ आर्ट अँड आर्किटेक्चर-अ ब्रिज बिटविन द लिव्हिंग अँड द डेड, मेमरी अँड इटर्निटी. हेअर आर 64 ब्रिजेस टू क्रॉस.या आपल्याला पार करायच्या या पुलांमध्ये शास्त्रज्ञ, अभिनेते, लेखक, द्रष्टे, राजकारणी, संगीतकार या क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे. इझाडोरा डंकन, चे गव्हेरा, हेलन केलर, मार्टिन ल्यूथर किंग, कार्ल मार्क्‍स, हेन्री फोर्ड, ह्यूफरी बोगार्ट, रिचर्ड बर्टन, वॉल्टर मॅथ्यू, थॉमस एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाइन, कार्ल जुंग, मार्शल मक्लुहान, एमिली डिकिन्सन, रॉबर्ट फ्रॉस्ट, मार्क ट्वेन, वॉल्टर व्हिटमन, व्हर्जिनिया वूल्फ, जॉन एफ. केनेडी अशा अनेकांचा त्यात समावेश आहे.
 
या नामवंताविषयी ज्यांनी भाषणं केलेली आहेत वा लेख लिहिलेले आहेत, तेही तेवढेच तोलामोलाचे आहेत. फ्रेडरिक एंगल्स यांनी कार्ल मार्क्‍स यांच्याविषयी, अर्नेस्ट स्टॉऊस या संशोधक सहाय्यकानं अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्याविषयी, फिडेल कॅस्ट्रो यांनी चे गव्हेराविषयी, व्हर्जिनिया वूल्फविषयी ख्रिस्तोफर आयशरवूड यांनी, मार्क ट्वेन यांच्याविषयी हेन्री डायक यांनी, थिओडर सेऊस गेइसेल यांच्याविषयी रॉबर्ट बर्नस्टाइन यांनी लिहिलं आहे. यातील चे गव्हेरा वगळता, इतर सर्वाचं निधन तसं नैसर्गिक म्हणावं लागेल!
 
यातील काही भाषणं त्या त्या व्यक्तीचं योगदान नेमकेपणानं सांगणारी आहेत (उदा. चे गव्हेरा, कार्ल मार्क्‍स), काही मजेशीर आहेत (उदा. वॉल्टर मॅथ्यू), तर काही आदरभाव व्यक्त करणारी आहेत. फिडेल कॅस्ट्रो यांनी चे गव्हेराविषयी केलेलं भाषण हे कुठल्याही कार्यकत्याच्या अंत:करणातील स्फूल्लिंग चेतवणारं आहे, तर अल्बर्ट आइन्स्टाइन या जगविख्यात शास्त्रज्ञाविषयी त्यांचे सहाय्यक अर्नेस्ट स्ट्राउस यांचं भाषण आइन्स्टाइन यांच्यातलं माणूसपण आणि माणुसकी सांगणारं आहे. वॉल्टर मॅथ्यू या इंग्रजी रंगभूमीवरील नटाविषयी त्यांच्या मुलाचं, चार्ली मॅथ्यूचं भाषण त्यांच्या प्रकृतीनुसार मजेशीर आहे. काही वेळा भन्नाट आठवणी, काही ठिकाणी आजवर अज्ञात असलेले काही पैलू, काही ठिकाणी स्वत:वरील आणि इतरांवरील त्या व्यक्तीचा प्रभाव तर काही वेळा त्या व्यक्तीसोबत घालवलेला काळ, असं या भाषणांचं स्वरूप आहे.
 
यातली काही भाषणं पाच-सहा पानांची आहेत, तर काही अगदीच लहान आणि जेमतेम म्हणावी अशी आहेत. मार्क ट्वेन यांच्याविषयीचं भाषण अवघं दीड पानांचं आहे, अमेलिया इरहार्ट या अमेरिकन शास्त्रज्ञााविषयी तिच्या बहिणीनं केलेली छोटीशी कविताच आहे!
 
थिओडर सेऊस गेईसेल यांच्याविषयी त्यांचा प्रकाशक आणि मित्र रॉबर्ट बर्नस्टाइन यांचं साडेपाच पानी भाषण बहुतांशी वैयक्तिक आठवणी सांगणारं असलं तरी त्यातून थिओडोर यांना सुरुवातीच्या काळात लेखक म्हणून करावा लागलेला संघर्ष, त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं लेखन यांचाही आलेख मांडला आहे. थिओडोर हे मुलांविषयी लिहिणारे लेखक. त्यांच्या पुस्तकांनी अनेक विक्रम केले. मुलांविषयीच्या लेखनासाठी त्यांना पुलित्झर पारितोषिकानं गौरवण्यात आलं. तर हिटलर लाइव्हजया त्यांच्या लघुपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. पुढे थिओडोर यांनी गेराल्ड मॅकबोइंग-बोइंगया अ‍ॅनिमेटेड लघुपटासाठी दुस-यांदा ऑस्कर पटकावलं. मजा म्हणज,े थिओडोर यांचं अँड टू थिंक दॅट आय सॉ इट ऑनहे पहिलं मुलांविषयीचं पुस्तक 43 प्रकाशकांनी नाकारलं होतं! शेवटी ते त्यांच्या मित्रानं प्रकाशित केले, पुढे ते बरंच गाजलं.
 
ही भाषणं तशी नैमित्तिक, म्हणजे शोकसभेमध्ये केलेली, असल्यानं त्यात काही वेळा त्या व्यक्तीच्या  कारकिर्दीचा आलेख आलेला नाही, पण प्रत्येक भाषणाच्या शेवटी संपादकानं त्या त्या लेखकाचा जीवनपट थोडक्यात पण नेमकेपणानं दिला आहे. त्यामुळे आपल्याला एरवी अपरिचित असलेल्या काही व्यक्तींविषयी जाणून घ्यायला मदत होते. त्या व्यक्तीविषयीची उत्सूकता वाढते.
 
माणूस जन्माला का येतो, याचं बिनतोड आणि वादातीत उत्तर अजून सापडलेलं नाही. तसंच माणूस मेल्यावर कुठे जातो, या वरील संशोधनही अजून फारसं पुढे गेलेलं नाही. पण माणूस जेव्हा जगत असतो, तेव्हा तो जसा जगतो, त्यानुसार तो मेल्यानंतर लोक त्याची आठवण काढतात, त्याचं स्मरण करतात, त्याचे पुतळे उभारतात, त्याच्या नावे इमारती, प्रयोगशाला, रस्ते, बागा तयार करतात..माणूस मेल्यानंतरही त्याची सतत आठवण काढली जाणं, त्याच्या कामाचा उपभोग घेणं आणि त्याची पुस्तकं वाचणं, या साऱ्या गोष्टी त्यांच्याबाबतच होतात, जे लोक आपल्या निधनानंतरही जिवंतराहतात. त्यामुळे ते आधी होते, त्यापेक्षा आणखी मोठे होतात.
 
हे पुस्तक हयात नसलेल्या व्यक्तींविषयी असलं तरी ते फारसं गंभीर नाही, तर हलकंफुलकं, काही वेळा तर हसवणारंही आहे! काही लोकांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जात नाही, पण त्यांचं कर्तृत्व त्यांच्या मरणाचा सोहळा करायला उद्युक्त करतं! यातली माणसं तशीच आहेत.
 
फेअरवेल, गॉडस्पीड - द ग्रेटेस्ट यूलजिज ऑफ अवर टाइम : संपादक सायरस एम. कोपेलँड
हार्मनी बुक्स, न्यूयॉर्क
 पाने : 320, किंमत : 882 रुपये