Thursday, May 17, 2012

समाज बदलविणाऱ्या माणसांविषयी...

लोकसत्ताच्या नागपुर आवृत्तीच्या विदर्भरंग या पुरवणीत (रविवार, १३ मे २०१२) मी संपादित केलेल्या ‘कर्ती माणसं’ या पुस्तकाबद्दल  प्रा. अजय देशपांडे यांनी लिहिलेला लेख.
 ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

           राम जगताप यांनी संपादित केलेल्या ‘कर्ती माणसं’ या पुस्तकात ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ या  संस्थेने उल्लेखनीय व अनुकरणीय सामाजिक कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविलेल्या चोवीस कार्यकर्त्यांची ओळख आहे. मोहन हिराबाई हिरालाल, भुरीबाई मानसिंग शेमळे, सुरेश खैरनार, अर्जुन कोकाटे, व्यंकप्पा भोसले, राजन इंदुलकर, वाहरू सोनवणे, प्रतिभा शिंदे, पूर्णिमा मेहर, तिस्ता सेटलवाड, रमेश हरळकर, पोपटराव पवार, विलास भोंगाडे, आनंद पटवर्धन, उत्का महाजन, दस्ता इस्वलकर, विवेक माँटेरो, कुमुद पावडे, काळूराम दोघडे, रेहाना बैलिम, बापुसाहेब म्हेत्री, सुरेखा दळवी, सय्यद भाई, बस्तु रेगे या चोवीस कार्यकर्त्यांविषयीचे लेख या पुस्तकात आहेत. या पुस्तकाचा हेतू आणि पुस्तकातील लेखन याविषयी मुखपृष्ठावर जो मजकूर दिला आहे ‘तो बोलका’ आहे.
‘या कार्यकर्त्यांच्या जीवनाविषयक प्रेरणा काय होत्या त्यांना प्रतिकूल परिस्थितीतही लढण्याचे व टिकून राहण्याचे बळ कोठून मिळाले आणि विकासाच्या वेगळ्या पायवाटा कशा तयार करता आल्या याचे काही वस्तुपाठ या पुस्तकात आहेत. या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या व संघटनेच्या माध्यमातून वंचित-शोषित-उपेक्षित घटकांचे प्रश्न ऐरणीवर कसे आणले, त्यांची कैफियत शासन दरबारी कशी मांडली व त्यांना संघर्षांस कसे प्रवृत्त केले याची झलक यात दिसते. त्यामुळे हे पुस्तक वाचताना आपल्या दैनंदिन जीवनाच्या परिघाबाहेर पाहण्यास व स्वत:चे जगणे वागणे तपासून घेण्यास तसेच सामाजिक जाणिवा विकसित करण्यास प्रवृत्त करते’.
          या पुस्तकातले लेखन सामाजिक कार्य करू पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या आगीची माहिती देणारे आहे. अगदी चाकोरीतील झापडबंद जगणे जगणाऱ्या माणसांना हे पुस्तक एका वेगळ्या जगाचे अवलोकन करायला लावणारे आहे. चाकोरीतील झापडबंद जगण्याला सामाजिक जाणिवांची दृष्टी देण्याचे कार्य हे पुस्तक करते.
          या पुस्तकाच्या प्रारंभी महात्मा गांधींनी सांगितलेली सात ‘सामाजिक’ पापकर्मे दिलेली आहेत. ‘तत्त्वहीन राजकारण नीतिमत्ताही व्यापार, कष्टाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण, मानवतेविना विज्ञान, विवेकहीन सुखोपभोग, त्यागरहितभक्ती’ या सात सामाजिक पापकर्माना आज समाज आकंठ बुडालेला असल्याचे दिसते. महात्मा गांधींनी सांगितलेल्या या सात पापकर्माचे मोह  टाळून खऱ्याअर्थाने दगडावर पेरणी करून आयुष्य फुलविणाऱ्या चोवीस कार्यरत कार्यकर्त्यांच्या जीवन आणि कार्याची ओळख या पुस्तकात करून दिलेली आहे.
          प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या चोवीस कार्यकर्त्यांविषयी ज्योती केळकर, जे.जी. खैरनार, विलास भोंगाडे, सुभाष वारे, सुरेश शिरपूरकर, सुरेश जोशी, अविनाश कदम, जयंत पाटील, रमाकांत पाटील, मीना कर्णिक, प्रतिभा जोशी, सुरेशचंद्र वारघडे, रूपा कुलकर्णी-बोधी, कुंदा प्रमिला नीळकंठ, सुरेखा दळवी, गजानन खातु, गीता महाशब्दे, नरेंद्र बोडके, राजन अन्वर यांनी लिहिले आहे. हे लेखन भक्तीच्या भावनेने झालेले नाही. हा या सर्व लेखनाचा सामायिक विशेष आहे. प्रत्यक्ष कार्यरत असणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या कार्याविषयी लिहिणारी ही मंडळी सामाजिक चळवळींची उत्तम जाण असणारी आहे. अशा प्रकारच्या लेखनासाठी आवश्यक ती तटस्थता आणि नि:पक्ष दृष्टी हे लेखन करणाऱ्या मंडळीं जवळ आहे. त्यातील काही तर प्रत्यक्ष कार्यरत असणाारे कार्यकर्ते आहेत. त्यामळे या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप फार वेगळे असल्याचे जाणवते. कार्यकर्ते व सामाजिक संस्थाची कार्यपध्दती आणि विचार प्रणाली यांची उत्तम जाण असल्याने या लेखकांचे लेखन प्रत्यक्ष सामाजिक चळवळीतील सारे ताणेबाणे व ताणतणाव देखील समजून घेणारे आहे. माणसांचे अनुभव , प्रत्यक्ष कार्य, जगणे आणि विचार या बाबी समजून घेतल्या की समाज आणि चळवळ देखील समजून घेता येते. आता सामाजिक चळवळी किंवा समाजकार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आणि समाजासाठी काही तरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना हे पुस्तक मार्गदर्शिकेसारखे उपयुक्त ठरणारे आहे.
          या पुस्तकाच्या पानापानांवर जे तत्वज्ञान वाचायला मिळते, ते प्रत्यक्ष कृतीतून उगवलेले आहे.  ‘आडनावावरून जात कळते म्हणून आडनावाचा त्याग करणे, स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान मिळते, बालकाला जन्म देण्याचे, त्यांचे संगोपन करण्याचे काम आईचे; परंतु तिच्या नावाला कुठे स्थान नाही, हे बदलायला हवे, असे मनोमन पटल्यावर आपल्या मोहन या नावापुढे आधी आईचे व नंतर वडिलांचे नाव लावणे त्याने आचरणात आणले. हे विचार आणि आचार यात समानता असावी, याचे हे बोलके उदाहरण’ (पृष्ठे १७) ‘डॉ. खैरनार यांनी आश्रम स्थापन केला नाही की एखादी एनजीओ स्थापन करून सरकारी व विदेशातील निधीवर सामाजिक कार्याची मर्दुमकी गाजवली नाही. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात हे कार्य बसत नाही. चळवळीत झोकून देणे हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे ते आयुष्यात जमिनीवर चाललेल्या चळवळीत सहभागी झाले. संस्थांचे वार्षिक अहवाल तयार करून व त्यावर फोटो चिकटवून निधी जमा करण्याच्या फंदात डॉ. खैरनार पडले नाहीत. त्यांच्या समाजिक कार्याचे मूळ जर कशात असेल तर त्यांच्या संवेदनेत. हा माणूस अत्यंत संवेदनशील आहे. मग भागलपूरचा संहार असो की, गुजरात सरकार पुरस्कृत विशिष्ट समाजाची कत्तल असो, अशा घटनांमुळे डॉ. खैरनार यांचे हृदय दुभंगले जाते. सांप्रदायिक शक्तीच्या विरोधात लढणाचे बळ त्यांच्या या संवेदनेत आहे.’(पृष्ठे ३६) अशी वाक्ये, घटना, प्रसंग सत्य प्रकटीकरण आणि नि:पक्षपणाच्या तळमळीतून सांगितली गेली आहेत. प्रत्यक्ष चळवळीतून अंकुरलेली विचारप्रणाली येथे प्रकट झाली आहे. या चोवीस कार्यकर्त्यांची वैचारिक घडण आणि कृतिप्रवणता त्यांचे अनुभव, त्यांचे लढे, त्यांच्यावर आलेले जीवघेणे प्रसंग, प्रतिकूल परिस्थितीतही न ढळणारा त्यांचा अभंग विश्वास, प्रबोधनाच्या चळवळीवरची आणि प्रबोधनकारी विचारांवरची अविचल निष्ठा त्यांनी उभे केलेले कार्य आणि घडवून आणलेल्या परिवर्तनाचा सारा लेखाजोखा वाचताना आपल्याही मनात प्रबोधनासाठीच्या  कृतिप्रवण विचारांचा झरा निर्माण होतो. आज संवेदनशीलता गमावून बसलेल्या आणि विलक्षण स्वार्थी बनलेल्या माणसांचे अनुकरण करीत आपण आपल्यापुरतंच आपल्यासाठीच वागले पाहिजे, असा संस्कारच रुजवणे सुरू असल्याच्या काळात ‘कर्ती माणसं’ या पुस्तकांसारखी पुस्तक काहीतरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी फार उपयुक्त आहेत. आपल्या जगण्याच्या परिघाबाहेर खूप माणसे आहेत त्यांना माणसासारखे जगता यावे म्हणून आपण काही तरी केले पाहिजे, ही जाणीव हे पुस्तक देते. 

1 comment:

  1. युनिक फीचर्सने काढलेल्या खरीखुरी टीम इंडिया, करके देखो या धाटणीच्या पुस्तकांपैकीच आपले हे पुस्तक होय. अशी पुस्तकेच समाजात खूप काही घडत आहे, याची जाणीव करून देतात. आयपीएल, अद्ययावत मोबाईल फोन, मोठमोठ्या कार्सच्या जगात रमलेल्यांपर्यंत ही पुस्तके गेली पाहिजेत. अभिनंदन.

    ReplyDelete