Monday, August 27, 2012

शहाणा वाचक आणि पुस्तकं

दुपारी एकपर्यंतचा वेळ टंगळमंगळ करण्यात गेला. नंतर सुशील आला. मग दोघं अविनाश काळे यांच्याकडे गेलो. रात्री नऊला त्यांच्याकडून परतलो. दुपारी सुशीलसोबत काम करताना एक गंमत सुचली. सुशीलच्या कायम बॅगेत असलेलं पुस्तक म्हणजे प्रा. यास्मीन शेख यांचं ‘मराठी शुद्धलेखन मार्गदर्शिका’ आणि माझ्या बॅगेत अरुण फडके यांचे ‘शुद्धलेखन तुमच्या खिशात’ व ‘मराठी लेखन कोश’. सुशीलने त्याच्या पुस्तकावर ‘माझं बायबल’ असं लिहिलं आहे. ते वाचून मी माझ्या दोन्ही पुस्तकांवर ‘माझं कुराण’ असं लिहिलं.
..................................................
काल रात्री साडेनऊच्या सुमारास सुनीता देशपांडे यांचं ‘प्रिय जी. ए.’ हे पुस्तक वाचायला घेतलं. मौजेने आतापर्यंत जीएंच्या पत्रांचे चार खंड काढले आहेत. त्यातल्या पहिल्या खंडात त्यांनी फक्त सुनीताबाईंना लिहिलेली पत्रं आहेत, तर इतर तीन खंडांत म. द. हातकणंगलेकर, जयवंत दळवी, माधव आचवल, अशा लेखकांना लिहिलेली पत्रं आहेत. ‘प्रिय जी. ए.’मध्ये सुनीताईंना लिहिलेली एकंदर 47 पत्रं आहेत. जी. एं.च्या पत्रांचे चारही खंड चाळताना ते पटकन विकत घ्यावे आणि निवांत वाचावे, अशी काही इच्छा झाली नाही. पण सुनीताबाईंचं हे पुस्तक चाळताना मात्र ते विकत घ्यावं, असं तीव्रतेनं वाटलं. किंबहुना हे जी. एं.च्या पत्रांपेक्षा सरसच वाटलं. म्हणून ते परवा मुद्दाम विकत घेतलं. काल रात्री इतर कुठलं काम करायचा कंटाळा आल्याने वाचायला घेतलं. अगदी दोन वाजेपर्यंत 155 पानं वाचून काढली. पुस्तक एकंदर 184 पानांचं आहे. पण पुस्तक काही विशेष आवडलं नाही. किंबहुना जवळवळ नाहीच. उगाच विकत घेतलं, असं वाटलं. एखाद्या ग्रंथालयातून मिळवून वाचलं असतं तरी चाललं असतं. सुनीताबाईंनी तशी कुठल्याच विषयांवर फार गंभीर चर्चा केलेली नाही. अमूक पुस्तक मी वाचलं, तुम्ही वाचलं का; मला आवडलं, तुम्हालाही आवडेल; अमूक पुस्तक तुम्हाला पाठवू का, अशी अगदीच प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे. बाकी नुसत्याच अळमटळम गप्पा. चकाट्या म्हणाव्यात अशा. 

हे पुस्तक चाळताना त्यातले पुस्तकांवरचे एक-दोन अभिप्राय वाचून सुनीताबाईंची वाचक म्हणून प्रगल्भता चांगली वाटली, म्हणून पुस्तक तत्परतेनं विकत घेतलं. वर वाचायचे कष्टही घेतले. पण निराशा झाली. मग ते ठेवून ज्यॉ पॉल सात्र्चं ‘वर्ड’ हे आत्मचरित्र वाचायला घेतलं. त्यातील ‘रीडिंग’ या पहिल्या प्रकरणातील 20-30 पानं वाचली. नंतर ‘उत्तम पुस्तक वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत’ हा विश्वास पाटील यांचा ‘ललित’च्या 2000सालच्या दिवाळी अंकातील लेख वाचायला घेतला. पाटील यांनी अतिशय चांगला लेख लिहिला आहे. पण तो पहिल्या चार पानांतच संपवायला हवा होता. नंतरचा मजकूरही सुरेख आहे खरा, पण तो आधीच्या मजकुराशी विसंगत वाटतो. कारण नंतर वाचनसंस्कृतीवरील चर्चा एकदम धर्माच्या प्रश्नाकडे वळते. पाटील लिहितात, ‘‘थोडक्यात बरेच काही सांगता येते. तो कौशल्याचा आणि तुमच्या भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण मराठीतल्या साहित्य शारदेच्या वारसदारांना आणि मराठी प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून, बोलण्यातून मिळत राहतात.’’ याच लेखात पाटील यांनी ‘क्रिटिक ऑफ रिलिजन अँड फिलॉसफी’ या पुस्तकाचा आणि त्याचा लेखक वॉल्टर कॉफमान याचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. कॉफमान लिहितो, ‘‘एका परिच्छेदात सांगून होईल ते सांगण्यासाठी पानंच्या पानं व पाच-दहा पानांत सांगून होईल त्याच्यासाठी पुस्तकच्या पुस्तक खर्ची घालणा-या लेखकांपासून शहाण्या वाचकानं दूर राहावं.’’
..................................................
आज रविवार असल्याने दिवसभर सुट्टी होती. त्यामुळे एका ग्रंथप्रेमी मित्राचा ग्रंथसंग्रह पाहायला त्याच्या घरी जायचं होतं. निघायला थोडासा वेळ होता म्हणून प्रा. रा. ग. जाधव यांचा एक चरित्र-वाङ्मयाविषयीचा लेख वाचायला घेतला. त्यात त्यांनी एके ठिकाणी व्हॉल्टेअरचं एक चिंतनीय वचन उद्धृत केलं आहे. ते असं - We owe consideration to the living; to the dead we owe truth only.  म्हणजे, जे जे गतकालीन आहे, गतार्थ आहे, केवळ इतिहास, परंपरा किंवा स्मृती यांच्या रूपानेच अवशिष्ट आहे; त्या त्या सर्वाबद्दल सत्य जाणून घेणं हीच आपली जबाबदारी आहे. उलट जे जे विद्यमान आहे, जिवंत व जगत आहे, वर्तमानकालीन आहे, त्याबाबत सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं, ही आपली जबाबदारी आहे.’ श्रेष्ठ लेखक एका वाक्यात किती मोठा आशय आणि किती महत्त्वाचं सांगून जातो नाही? वॉल्टर कॉफमान म्हणतो ते खरंच आहे.

Tuesday, August 21, 2012

बंडखोर लेखिकेची पन्नाशी!

आपल्या लेखनाची सर्वाधिक किंमत चुकती करावी लागणं, त्यासाठी आपलं आयुष्यच पणाला लावावं लागणं, हे कुठल्याही काळात लेखकासाठी वेदनादायकच असतं. त्यातही धार्मिक कट्टरतावाद्यांविरुद्धचा लढा तर खूपच बिकट असतो. पण तो प्राणपणाने लढत जगातल्या असंख्य मुस्लीम आणि इतर स्त्रियांना आपल्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध बोलण्याची-लढण्याची प्रेरणा देणा-यांमध्ये तस्लिमा नासरीन यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख......
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तस्लिमा नासरीन येत्या 25 ऑगस्टला वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. पन्नाशी हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणून त्यांच्या आजवरच्या लेखकीय कारकीर्दीचा आढावा घेणं सयुक्तिक ठरतं. 
“(Most of the) Publishers are afraid to publish her books. Book sellers are afraid to sell her books. Supporters afraid to support her publicly. Secularists are afraid to defend her when she is attacked by the religious fundamentalists.”
असं तस्लिमाच्या अधिकृत वेबसाइटवर एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. 
तस्लिमाची आजवर 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांचं विषयवार वर्गीकरण केलं तर काय दिसतं? 1986 ते 2008 या काळात 13 कवितासंग्रह, 1990 ते 2007 या काळात 5 निबंधसंग्रह, 1991 ते 2009 या काळात 8 कादंब-या, 1994 ते 2007 या काळात 2 लघुकथासंग्रह आणि 1999 ते 2012 या काळात 7 आत्मचरित्रविषयक पुस्तकं अशी तस्लिमाची एकंदर ग्रंथसंपदा आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तस्लिमानी लिहायला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी (1986 साली) त्यांचा ‘शिकोरे बिपुल खुधा’ (Hunger in the Roots) हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. 1990 पर्यंत आणखी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. 1990 मध्ये तस्लिमाच्या पहिल्या निबंधसंग्रहाचं प्रकाशन झालं. 1992 साली पहिली कादंबरी प्रकाशित झाली, तर 1999 साली पहिलं आत्मचरित्रविषयक पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 2008 नंतर तस्लिमा पूर्णपणे कादंब-या आणि आत्मचरित्रविषयक लेखनाकडे वळल्या आहेत. 

तस्लिमाच्या ‘लज्जा’, ‘उतल हवा’, ‘नष्ट मेयेर-नष्ट गद्य’, ‘फरासी प्रेमिक’, ‘आमार मेयेबला’ या पुस्तकांचे आजवर मराठी अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये या अनुवादित पुस्तकांवर कुठलेही वाद झालेले नाहीत, हे विशेष. या पुस्तकांचा खपही चांगला झालेला आहे. तस्लिमाच्या ‘फेरा’ या कादंबरीचा ‘फिट्टमफाट’ या नावानं अशोक शहाणे यांनी अनुवाद केला असून तो मुंबईतील ‘अक्षर प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेला आहे. बाकी सर्व पुस्तकांचे अनुवाद पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले आहेत. त्यामुळे मराठी वाचकांनाही त्यांची जवळून ओळख आहे. 

19990 पासूनच बांगलादेशातील मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. 1993 पासून 2004 पर्यंत तस्लिमा यांच्या एकंदर पाच पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ‘लज्जा’, ‘आमार मेयेबला’, ‘उतल हवा’, ‘को’, ‘सेई सोब ओन्ढोकार’ ही ती पाच पुस्तकं. तर ‘द्विखंडितो’ या पुस्तकावर प. बंगाल सरकारने 2003 साली बंदी घातली. मात्र सप्टेंबर 2005 मध्ये प. बंगालच्या उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतभर मोठय़ा प्रमाणावर दंगली, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. याचीच प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. 

1994 साली तस्लिमा यांना बांगलादेश सोडावा लागला. त्यानंतर त्या 10 वर्षे पाश्चात्य देशांमध्ये राहात होत्या. 2004 साली त्या कोलकात्यात परत आल्या. तिथे 2007 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राहिल्या. 2008 मध्ये त्या स्वीडनला रवाना झाल्या. 2007मध्ये काही काळ दिल्लीमध्ये त्या राहत्या घरी स्थानबद्ध होत्या. तस्लिमा यांनी 2005  साली आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळावं, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली होती. शिवराज पाटील तेव्हा गृहमंत्री होते. पण भारतातील प्रादेशिक विविधता आणि मुस्लीम समाजाची लक्षणीय संख्या विचारता घेता ताणतणाव निर्माण होण्याच्या खबरदारीतून त्यावर गृहमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही. 

पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेले देश आहेत. तेथील धार्मिक कट्टरता आणि त्याच्या दुष्परिणामांच्या बातम्या सतत अधूनमधून येत असतात. मात्र अशा बातम्या भारतामध्ये क्वचित म्हणाव्या अशा संख्येने घडतात. भारतात मुस्लिमांची संख्या तशी लक्षणीय आहे. तरीही भारतीय मुसलमान हा सर्वसामान्यत: सहिष्णू मानला जाई. त्याला बाबरी मशिदीच्या पतनानंतर ब-याच प्रमाणात तडे गेले. गेल्या वर्षी जयपूरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सलमान रश्दी यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण होऊन त्यांना भारतातच येऊ न देण्याचा पण काही मुस्लीम संघटनांनी केला. असाच प्रकार तस्लिमा यांच्याबाबतीत प. बंगालमध्येही झाला होता. त्यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नासरीन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

सलमान रश्दी आणि तस्लिमा यांची नेहमी तुलना केली जाते, परंतु त्यांच्या लेखनामध्ये एक मूलभूत म्हणावा असा फरक आहे. रश्दींचं संपूर्ण लेखन हे इंग्रजीमध्ये आहे तर तस्लिमा या आपलं लेखन मुख्यत: बंगालीमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये करतात. त्यानंतर त्याचे इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद होतात. रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळे 14 फेब्रुवारी 1989 रोजी इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा काढला. त्यानंतर बराच काळ रश्दी यांना भूमिगत राहून काळ काढावा लागला. या उलट तस्लिमा यांना त्यांच्या पुस्तकांमुळे बांगलादेश सोडावा लागला. त्यांच्यावर भारतात काही ठिकाणी हल्ले झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आली. पण त्यांना रश्दींसारखं फार काळ भूमिगत राहावं लागलं नाही. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमाची हत्या करणा-याला दोन हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण या फतव्याचंही काहीसं सलमान रश्दींसारखंच झालं आहे. तो आता अघोषितपणे मागे घेतल्यातच जमा आहे. 

रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने पाश्चात्य देशातील मुस्लीम लेखकांना इस्लाम आणि कुराण यांची चिकित्सा करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अशी पुस्तकं मोठय़ा संख्येनं लिहिली जाऊ लागली. अजूनही लिहिली जात आहेत. त्यात कथा-कादंब-या आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यातील अमेरिकास्थित लेखिका इरशाद मंजी यांच्या एका पुस्तकाचा गेल्या वर्षीच ‘तिढा आजच्या इस्लामचा!’ या नावानं मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनीही तस्लिमा यांच्याप्रमाणेच इस्लाम धर्मातील आणि कुराणातील अनेक विसंगतींवर टीका केली आहे. इस्लाम आणि कुराणमध्ये स्त्रियांविषयी जी प्रतिकूलता आहे, त्यावर त्या वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीनं झोड उठवतात. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हे त्यांना मान्य नाही. म्हणजे मंजी या मध्यममार्गी आहेत, तशा तस्लिमा नाहीत. त्यांना इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं वाटतं. अशी काही त्यांची मतं टोकाची म्हणावीत इतकी एकारलेली असतात. त्यांची ही धारणा टोकाच्या फँटसीसारखी आहे. या कारणांमुळे तस्लिमा यांच्या अलीकडच्या लेखनात आक्रस्ताळेपणाही वाढताना दिसतो आहे. ‘सारे जण आपल्याविरुद्ध कट करत आहेत’, अशाच भूमिकेतून त्यांचं लेखन आणि वागणं-बोलणं असतं. एकटया-दुकटया व्यक्तींच्या प्रतिक्रिया फार गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, पण तस्लिमा ब-याचदा त्या प्रतिक्रियांनाच सामाजिक सिद्धान्त मानून लिहितात-बोलतात. हल्ली तस्लिमा जागतिक सेलेब्रिटी झाल्या आहेत. त्यामुळे त्या काय बोलतात, याकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. अशा वेळी तस्लिमा यांच्याकडून अधिक जबाबदारपणाची आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. पण ती त्या नेहमीच धुडकावून लावतात आणि अतिशय सवंग विधानं करतात. नुकत्याच अमेरिकेत गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची प्रतिक्रिया अशाच स्वरूपाची आहे.

तस्लिमाचा लढा जगातल्या सर्वाधिक धार्मिक पगडा असलेल्या समाजातील मुल्ला-मौलवींविरोधात आहे. तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पातळीवर जाऊन वाद-विवाद करण्याची गरज नसते. तस्लिमा यांच्या लेखनात ते भान ब-यापैकी पाळलंही जातं. पण त्यांची वक्तव्यं आणि विधानं यात मात्र त्या या गोष्टींना ब-याचदा हरताळ फासतात. टोकाची मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना टोकाचा विरोध होतो, आणि म्हणून मोठय़ा प्रमाणावर बुद्धिमंतांचा पाठिंबाही मिळत नाही. त्यासाठी अधिक संयमितपणे व्यक्त व्हावं लागतं. विचारांची लढाई विचारांच्या पातळीवरच लढावी लागते. पाश्चात्य देशातील कितीतरी मुस्लीम लेखिका आणि लेखक अभ्यासावर आधारलेले आणि सज्जड पुरावे देणारं लेखन करत आहेत. त्यांचा प्रतिवाद मुस्लीम धर्माधांना सहजासहजी करता येत नाही. अशा लेखनाचा इष्ट परिणाम होऊन तो तळागाळातल्या समाजापर्यंत झिरपायला वेळ लागतो. कुठलाही सामाजिक बदल एकाएकी होत नाही. त्यासाठी मोठा काळ उलटावा लागतो. आणि त्या काळात आपल्या उद्दिष्टांसाठी अविरत काम करत राहणारी फौजही तयार करावी लागते. ती केली तरच या बदलाची गाडी सुरळीत राहते. कारण दीर्घकालीन समस्या या जटिल असतात, त्यामुळे त्यांच्यावरची उपाययोजनाही दीर्घकालीनच असावी लागते. असे प्रश्न शॉर्टकटने कधीही सुटत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे सारेच प्रश्न जसे कायद्याने सुटत नाहीत, तसे मोर्चे-आंदोलने आणि लेखन यातूनही सुटत नाहीत. या सा-यांचा एकसमयावच्छेदेकरून व्हावा लागतो. सध्याची परिस्थिती त्या दिशेनेच प्रवास करत आहे. त्यामुळे काळही तस्लिमा यांच्या बाजूने आहे. फक्त गरज आहे ती मर्मदृष्टीची. 20-30 हे तारुण्याचं आणि बंडखोरीचं वय असतं. 40-50 हा आयुष्याच्या प्रगल्भतेचा टप्पा असतो. तस्लिमा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडून तशा प्रगल्भ व संयत लेखनाची-वर्तनाची अपेक्षा करणं, नक्कीच अनाठायी ठरणार नाही.

Monday, August 13, 2012

ज्ञान ते सांगतो पुन्हा!

अथातो ज्ञानजिज्ञासा हे यशवंत रायकर यांचे पुस्तक ज्ञान संकल्पनांची ओळख करून देणारे आहे. या पुस्तकाचा पहिला भाग 2010 मध्ये प्रकाशित झाला, तर दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. भाग दोन प्राधान्याने तत्त्वज्ञ, त्यांच्या संकल्पना यांची ओळख करून देणारा आहे. यातील बहुतेक तत्त्वज्ञ, विचारवंत विदेशी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात शंकराचार्य यांच्यानंतर नवा कोणताही तत्त्वविचार मांडला गेला नाही, अशी मांडणी सुरेश द्वादशीवार यांनी अलीकडेच लिहिलेल्या त्यांच्या मन्वंतरया पुस्तकात केली आहे. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान शंकराचार्य यांच्याबरोबरच थांबलं, त्यानंतर त्यात नवी भर कुणीच टाकलेली नाही, असा या मांडणीचा स्वच्छ अर्थ होतो. असो. हा मुद्दा वेगळा आहे. पण अथातो ज्ञानजिज्ञासाअसे म्हणताना भारतीय तत्त्वविचारापलीकडे जगात काय काय आहे आणि ते कुणी कुणी मांडलं आहे, याचा परामर्ष घ्यावा लागतो. रायकरांचं हे पुस्तक (भाग एक व दोनसह) त्यासंबंधीचा एक प्रयत्न आहे.
‘प्रस्थापित ज्ञानाने काही शंकांचे निरसन न केल्याने जिज्ञासेची कांस धरावी लागणे’, ही प्रस्तुत पुस्तकामागची रायकरांची भूमिका आहे. इथं प्रस्थापित ज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असं रायकरांना अभिप्रेत असावं. भाग एकमध्ये ‘एका अभ्यासूने जिज्ञासूंशी साधलेले मुक्तसंवाद’ अशी रायकरांची भूमिका होती, ती या भाग दोनमध्ये ‘एका वाचकाने जिज्ञासूंशी साधलेला मुक्तसंवाद’ अशी झाली आहे. जगातील ज्ञान संकल्पनांच्या अफाटतेचा केवळ अंदाज आल्यावर, त्यातील काहींचा प्रत्यक्ष परिचय करून झाल्यावर अशी नम्र भूमिका होणं अपरिहार्य असतं.
पुस्तकाची सुरुवात सॉक्रेटिस-प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञ त्रयीपासून होते. मग गॅलिलिओ, व्हॉल्टेर, कांट, आँग्यूस्त काँत, चार्लस डार्विन, नित्शे, युनॅमुनो, ऑर्तेगा, बट्र्राड रसेल, सात्र्, कार्ल पॉपर, खलिल जिब्रान, जॉर्ज मिकेश अशा जवळपास तीसेक तत्त्वज्ञांचा समावेश आहे. त्यात विसाव्या शतकातील दोन प्रसिद्ध विचारवंतांचाही समावेश आहे. ते म्हणजे इसाया बर्लिन आणि एडवर्ड सैद. ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ विचारवंत’ असा बर्लिन यांचा सार्थ गौरव केला जातो. रायकरांनी त्यांचं ‘संकल्पनांचे इतिहासकार’ असं वर्णन केलं आहे. बर्लिन यांनी ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची नव्याने मांडणी केली. त्यावर गेली पन्नास-साठ वर्षे चर्चा चालू आहे, या एकाच गोष्टीतून बर्लिन यांचं महत्त्व अधोरेखित होतं. सैद यांना ‘दुर्दम्य विचारवंत’ असं रायकरांनी म्हटलं आहे, ते मात्र फारसं समर्पक वाटत नाही. सैद यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा त्याग या गोष्टी ते हयात असतानाही वरचढ होत्या आणि आहेत. ‘ओरिएण्टॅलिझम’ या 1979 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सैद यांनी पाश्चिमात्यांचा पौर्वात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा पूर्वग्रहदूषित आहे, याची सोदाहरण चिरफाड केली. या पुस्तकाने पाश्चिमात्यांच्या बौद्धिक एकाधिकारशाहीला पहिल्यांदाच इतक्या ठोसपणे तडाखे लगावले. याचबरोबर पॅलेस्टिनींची भरभक्कमपणे बाजू मांडण्याचं, इंडालॉजीचा पुरस्कार करण्याचं आणि सबाल्टर्न स्टडीजला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही सैद यांनी केलं आहे. रायकरांनी सैद यांच्या या योगदानाचाही उल्लेख केला आहे. पण एक उल्लेख त्यांच्याकडून बहुधा अनावधानाने राहून गेला असावा. तो म्हणजे सैद हे विसाव्या शतकातल्या ‘विचारवंतांचे प्रतिनिधी’ होते-आहेत. ‘रिप्रझेंटेशन ऑफ इंटेलेक्च्युअल’ या पुस्तकात त्यांनी विचारवंत कोणाला म्हणावे आणि विचारवंतांची कर्तव्यं कोणती याची मांडणी करताना विचारवंतांनाही चार खडे बोल सुनावले आहेत. सैद यांनी ‘ओरिएण्टॅलिझम’मध्ये भारताचा समावेश केला नाही, अशी तक्रार केली आहे. ते मात्र तर्काला धरून नाही.
या विदेशी तत्त्वज्ञांनंतर टिळक, टागोर, इकबाल या भारतीयांचा तर पृथ्वी, मृत्यू, लोकसंख्या, शेतीची जन्मकथा, फलज्योतिष, बलात्कार अशा नऊ-दहा घटितांचाही समावेश आहे. या विषयसूचीवरून पुस्तकाचे सरळसरळ तीन भाग पडतात. रायकरांनी ते स्वतंत्रपणे नमूद केले नसले तरी ते लक्षात यावेत अशी उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे.
जागतिक पातळीवरील तत्त्वज्ञांनी मांडलेल्या ज्ञान संकल्पनाची थोडक्यात ओळख करून देत, त्या तत्त्वज्ञांचाही परिचय करून दिल्याने हे पुस्तक रोचक झाले आहे. तत्त्वज्ञान हाच मुळात काहीसा रुक्ष आणि अवघड विषय. त्यामुळे तो सर्वसामान्यांना कंटाळवाणा आणि दुबरेध वाटतो. हे लक्षात घेऊन रायकरांनी या पुस्तकाचं लेखन सर्वसामान्यांना रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने केलं आहे. पुस्तकभर या व्यवधानाचा प्रत्यय येत राहतो. बहुधा यातील सर्व लेख हे सदररूपाने वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी लिहिले असल्याचा हा परिणाम असावा.
‘ज्या वेळी जे मनाला भिडले त्याचा अमूक एक मर्यादेपर्यंत पाठपुरावा केला’ या विधानातून रायकरांनी स्वत:च एकप्रकारे या पुस्तकाची मर्यादाही सांगितली आहे. म्हणजे हा अभ्यास ज्ञानमार्गाच्या शिस्तीपेक्षा रायकरांच्या स्वत:च्या कुतूहलातून झाला आहे. दुसरं म्हणजे ही काही कथा-कादंबरी नव्हे. हे तत्त्वज्ञ आणि तत्त्वविचार यांची सांगड घालणारं पुस्तक आहे. ज्ञानाची आस काही सर्वानाच असत नाही आणि ज्यांना ती असते त्यांनाही ते पूर्णपणे समजावून घेता येतेच असं नाही. यातील पहिल्या प्रकारातल्या वाचकांना ज्ञानाकडे वळवण्याचं आणि दुस-या प्रकारातल्या लोकांना आश्वस्त करण्याचं काम, हे पुस्तक काही प्रमाणात निश्चित करू शकते.
रायकरांच्या भाषेला संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे ती सौष्ठवपूर्ण आणि आटोपशीर आहे. प्रगल्भ भाषा हा लेखकाच्या जमेचा भाग असतो, तेव्हा तो वाचकांच्या कसोटीचाही असतो. कारण लेखकाने जे लिहिले आहे ते आणि बिटविन द लाइन्स या दोन्ही गोष्टी समजावून घेत वाचकाला पुढे जावं लागतं.
‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ हा ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ असा स्वत:ला आकळलेलं इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ज्ञानसंकल्पना आणि वाचक यांच्यामध्ये संवादाची भूमिका निभावू पाहणारं पुस्तक आहे. या पुस्तकातील तत्त्वज्ञांचा विचार समजावून घेऊन त्यांच्या मूळ पुस्तकांपर्यंत वाचकाने गेलं पाहिजे, तेव्हाच ती ज्ञानजिज्ञासा ‘अथातो’ ठरेल!
अथातो ज्ञानजिज्ञासा : यशवंत रायकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने : 171,
किंमत : 200 रुपये