Thursday, November 29, 2012

‘अजातशत्रू’ प्राध्यापक!

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही ‘समाजमान्यते’ची ठळक खूण मानली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही समाजमान्यता शिक्षक, प्राध्यापक यांना होती, तशीच साहित्यिकांनाही होती. मराठीतले बहुतांश लेखक हे प्राध्यापक (मराठी व इंग्रजीचे ) आहेत. या प्राध्यापक मंडळींनीच मराठी साहित्याची बहुतांश निर्मिती केली आहे. त्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळाला, यातून त्यांची ‘समाजमान्यता’ सिद्ध होते

कोत्तापल्ले गेली चाळीस-बेचाळीस वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. नांदेड जिह्यातील खेडय़ात जन्मलेल्या कोत्तापल्ले यांचा आजवरचा संघर्ष कौतुकास्पद आहे. मराठीचे अध्यापन, विद्यापीठीय संशोधन आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील त्यांचा वावर जिनिअस म्हणावा असाच आहे. ‘अजातशत्रू’ असेच त्यांचे वर्णन केले जाते, कारण आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीत सामील करून घेत, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत आणि गुणीजणांना प्रोत्साहन देण्याबाबत कोत्तापल्ले यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. त्यामुळेच सर्व गटातटाच्या आणि संस्थांच्या लोकांमध्ये कोत्तापल्ले सहजपणे सामील होतात, त्यांना सामील करून घेतलंही जातं. अशा व्यक्ती अलीकडच्या काळात भिंग घेऊन शोधायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातल्या उच्चशिक्षणाचा दर्जा आणि प्राध्यापकांचा वकूब दिवसेंदिवस घसरतोच आहे. 'प्राध्यापक' या शब्दाला हल्ली फारशी प्रतिष्ठा राहिली नाही त्याचे कारणही हेच आहे. किंबहुना हा शब्द आता 'मध्यमवर्गीय' या शब्दासारखा हेटाळणीसाठी वापरला जाऊ लागला आहे.
हा बदल गेल्या वीस वर्षांत झाला आहे. कारण या काळात प्राध्यापक आणि साहित्यिक यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक आणि लेखक यांच्याविषयी समाजात मोठा आदर होता. त्यांच्या शब्दांना किंमत होती. ती अलीकडच्या काळात राहिली नाही. पूर्वी शिक्षक-प्राध्यापक मंडळी खाजगी टयूशनचा जोड धंदा करायची, आता ती  नियतकालिके (आयएसएसएन क्रमांक असलेली ) आणि प्रकाशन संस्था  यांचा जोड धंदा करू लागली आहेत. शासनाने आपल्याला भरपूर पगार, अनेक सवलती आणि कामाचे कमी तास दिले आहेत, ते आपण जो विषय शिकवणार आहोत, त्याची पूर्व तयारी-अभ्यास करण्यासाठी, हे समजून घेण्याएवढा  ज्यांचा वकूब नाही, त्यांच्याविषयी विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना कसा आदर राहील?
अशा परिस्थितीत प्राध्यापक म्हणून नैतिकता, चारित्र्य आणि विद्वता यासाठी महाराष्ट्रात जी थोडी नावं घेतली जातात, त्यात नागनाथ कोत्तापल्ले यांचा प्राधान्याने समावेश केला जातो. ते निर्विवाद उत्तम शिक्षक आहेत. चांगल्या साहित्यिकाला जमणार नाही असे, विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवण्याचे काम त्यांनी इमाने-इतबारे केले आहे. ज्येष्ठ समीक्षक वा. . कुळकर्णी, सुधीर रसाळ, यु. . पठाण यांच्या संस्कारात वाढलेल्या कोत्तापल्ले यांनी तो वारसा अध्यापनातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मौलिक काम केले आहेदासू वैद्य, इंद्रजीत भालेराव, कृष्णा किंबहुने हे त्यांचे विद्यार्थी मराठी साहित्यात नाव मिळवून आहेत.
वाङ्मयाची उत्तम जाण आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हा कोत्तापल्ले यांचा आजवरचा विशेष राहिला आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ते अशाच पद्धतीने, किंबहुना याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करतील असा भरवसा वाटतो. कोत्तापल्ले यांच्या काळात पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग चैतन्याने आणि साहित्यमय वातावरणाने भारलेला होता. आपल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, प्रशासन आणि उपक्रम  यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. प्रसंगी आपल्या भूमिकाही बाजूला ठेवल्या. तोच अनुभव ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असतानाही आला. स्पष्टवक्तपणाचे अनुचित प्रयोग न करता सर्वाना सांभाळून घेत, त्यांचा विश्वास जिंकत, त्यांना पेलेल अशीच जबाबदारी देत काम करून घेण्याची नामी हातोटी कोत्तापल्ले यांच्याकडे आहे. हे कौशल्य त्यांना आता संमेलनाध्यक्ष म्हणून काम करताना अधिक उपयोगी ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या साहित्य वातावरणात उत्साह येईल आणि साहित्य संस्थांचा कारभार काही प्रमाणात तरी सुधारेल अशी आशा करायला हरकत नाही. साहित्य संस्था आणि त्यांची शिखर संस्था असलेले महामंडळ हा हल्ली वावदूकपणाचा आणि पोरकटपणाचा नमुना झाले आहे. या संस्थांत काम करणाऱ्या मुखंडांच्या जिभेला लगाम व हाताला काम मिळेल, अशी तजवीज कोत्तापल्ले नक्कीच करू शकतात. 

इथे गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, कोत्तापले यांच्याविषयीची साहित्यिक म्हणून - अगदी साहित्य रसिकांचीही - समाजाची पाटी कोरी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी जवळपास तीसेएक पुस्तकांचे लेखन केले असले तरी! त्यांनी कथा, कविता, कादंबरी, संपादन, अनुवाद अशा विविध प्रकारांत लेखन केले असले तरी त्यांची मुख्य ओळख समीक्षक अशीच आहे. ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘ग्रामीण साहित्य-स्वरूप आणि शोध’,‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता- आकलन आणि आस्वाद’ अशी पुस्तके लिहिणारा समीक्षक कधीच लोकप्रिय असत नाही. पण कोत्तापल्ले यांनी लक्षणीय कथालेखनही केले. त्यांच्या कथा संवेदशीलतेने सामाजिक वास्तव टिपतात. म्हणूनच के. . पुरोहित यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकालाही त्या मोलाच्या वाटतात. महात्मा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा असूड’ आणि ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ यांच्या सुधारित आवृत्त्यांचे संपादनही त्यांचे आहे

कोत्तापल्लेंसारख्या उत्तम प्राध्यापकाची समाजाला जास्त गरज आहे. कारण अशी व्यक्तीच समाजाचे सांस्कृतिक नेतृत्व अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. हल्ली योग्य माणसाकडे योग्य पदे सोपवली जात नाहीत अशी ओरड होत असते, पण बऱ्याचदा योग्य पदासाठी योग्य माणसे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. कोत्तापले यां ना आध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला, याचा अर्थ असा होतो की, योग्य माणसाकडे योग्य पद सोपवले गेले आहे. ती जबाबदारी त्यांना उत्तम प्रकारे पार पडता  यासाठी शुभेच्छा!


Saturday, November 24, 2012

निर्मळ, प्रांजळ पण पसरट आत्मचरित्र

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 'चार नगरांतले माझे विश्व' हे आत्मचरित्र मराठीतलं एक वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे, असं म्हणावं लागेल. निदान अलीकडच्या काळातलं तरी. केवळ मराठीतच नाहीतर जगभरच साहित्यातले सर्वाधिक वाद आत्मचरित्राच्या संदर्भातच होताना दिसतात. कारण बहुतांश वेळा आत्मचरित्र लिहिताना सोयीस्कर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आत्मसमर्थन वा कबुलीजबाब दिला जातो. सत्य-असत्याची आणि प्रसंगी कल्पितांची सरमिसळ केली जात असल्यानं आत्मचरित्राच्या सत्यतेबाबत बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाय 'सत्य' या संज्ञेचे अर्थही वेगवेगळे असतात, असं एका नोबेलविजेत्या शास्त्रज्ञानं म्हटलं आहे. कारण ते कुठल्या विषयाच्या संदर्भात आहे, यावर त्या सत्याची सत्यता अवलंबून असते. 

नारळीकरांच्या आत्मचरित्राबाबत असा काही वाद होण्याचं कारण नाही. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व आणि कमालीचा सज्जनपणा त्यांच्या या लेखनातही पुरेपूर उतरला आहे. शिवाय कटुतेचे प्रसंग त्यांनी कटाक्षानं टाळले आहेत. त्यामुळे सगळंच काही सांगणार नाही, पण सांगेन ते सत्य सांगेन, या न्यायानं नारळीकरांनी हे लेखन केलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यातून त्यांची नम्रता, गुणग्राहकता, बुद्धिमत्ता यांचा प्रत्यय सतत येत राहतो. पण हेही खरंच की, नारळीकरांना स्वतच्या आयुष्याकडे फार तटस्थपणे पाहता आलेलं नाही. इतर व्यक्तींबाबतही हा तटस्थपणा त्यांनी फारसा दाखवलेला नाही. त्याला त्यांची ऋजुता आड आली असावी.


केंब्रिज आणि आयुका हा नारळीकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि क्रिएटिव्ह असा कालखंड होता. एका बाजूला संशोधन आणि दुसऱ्या बाजूला संस्थात्मक निर्मिती या दोन्ही आघाडय़ांवर नारळीकरांनी केलेलं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावलेलं आहे. त्यातून आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांना शिकण्यासारखं खूप काही आहे. 


नारळीकरांनी या आत्मकथनाला अवघं दोन पानांचं प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यात त्यांनी तीन महत्त्वाची विधानं केली आहेत-
- माझे आजवरचे आयुष्य मुख्यत्वेकरून चार नगरांत गेले - बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे. प्रत्येक संक्रमणाच्या वेळी आपण एक धाडस करतो आहोत असे वाटायचे.
- आत्मचरित्र कसे लिहावे याचे काही दंडक असले तर ते मला माहीत नाहीत. मला माझी गोष्ट जशी सांगाविशी वाटली तशी मी सांगितली आहे.
 - माझ्यावरील लेख, माझ्या सार्वजनिक मुलाखती वगैरेंतून माझ्याबद्दल पुष्कळ माहिती आता 'पब्लिक डोमेन'मध्ये आहे. तरी पण 'सांगण्याजोगी' नवी माहिती वाचकांना ह्य़ा आत्मकथनात मिळेल असे मला तरी वाटते.
'लोकांना माहीत नाही असं तुमच्या चरित्रात सांगण्याजोगं काही उरलं आहे काय?' या सुनीताबाई देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला नारळीकरांनी दिलेलं उत्तर म्हणजे त्यांचं वरील तिसरं विधान. त्याचा मात्र पुरेपूर प्रत्यय या आत्मकथनामध्ये येत राहतो.


असं म्हणतात की, आत्मचरित्र हे लेखकानं स्वतकडे त्रयस्थपणे पाहून लिहिलेलं स्वतचंच चरित्र असतं. त्यामुळे त्यातून 'मी कसा झालो -घडलो?' याची कहाणी सांगायची असते. रूढार्थानं हे आत्मचरित्रही त्याला अपवाद नाही. नारळीकर नावाचा सुखवस्तू मध्यमवर्गातला बुद्धिमान मुलगा बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये कसा घडला आणि आपल्या अफाट बुद्धिमत्तेनं त्यानं यशाची शिखरं कशी पादाक्रांत केली, याची ही उत्कंठावर्धक व प्रेरणादायी कहाणी  आहे.
नारळीकरांनी या आत्मकथनाचे एकंदर चार भाग केले आहेत. त्यानुसार बनारससाठी ८५ पानं, केंब्रिजसाठी २६० पानं, मुंबईसाठी १०६ आणि पुण्यासाठी ८१ पानं खर्च केली आहेत. 


नारळीकरांचं बालपण, माध्यमिक-महाविद्यालयीन शिक्षण बनारसमध्ये गेलं. म्हणजे बनारस विद्यापीठामध्ये. बनारसमध्ये आणि उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कोल्हापूरमध्ये घालवलेले दिवस, हा त्यांच्या आयुष्यातील रम्य बालपणाचा काळ होता. त्याविषयी त्यांनी समरसून लिहिलं आहे.  


या आत्मचरित्रातील सर्वाधिक भाग नारळीकरांच्या केंब्रिजमधील वास्तव्यानं व्यापला आहे. ते साहजिकही आहे. पदवीनंतर त्यांनी केंब्रिजला प्रयाण केलं. तेथील शैक्षणिक वातावरणाविषयी नारळीकरांनी अतिशय सविस्तरपणे लिहिलं आहे. नारळीकरांनी या भागात केंब्रिज-ऑक्सफर्डमधील सुप्त स्पर्धा, सुट्टय़ांच्या काळात युरोप आणि युरोपबाहेर केलेले प्रवास, रँगलरीचे दिवस, फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले पीएच.डी.चे संशोधन, किंग्स कॉलेज फेलो, ई. एम. फोर्स्टर ('पॅसेज टू इंडिया'वाले) यांच्याशी झालेला स्नेह, मंगला राजवाडे यांच्याशी विवाह आणि संसाराची सुरुवातीची काही र्वष याविषयी लिहिलं आहे. त्यांच्या जगभर मान्यता पावलेल्या संशोधनाविषयी लिहिताना ते नेमकं काय आहे, हे सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं नारळीकरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केंब्रिजमधील विद्यापीठीय पातळीवरील शैक्षणिक वातावरण आणि संशोधनासाठीची अनुकूलता या गोष्टी या भागातून चांगल्या प्रकारे जाणून घेता येतात. यात नारळीकरांनी केंब्रिजची आपल्याकडील विद्यापीठीय शिक्षणाशी तुलना केलेली नाही, पण त्यांनी दिलेले तपशीलच इतके परिणामकारक आहेत की, तशी तुलना वाचकाच्या मनात साकारू लागते.


केंब्रिजमध्ये असतानाच नारळीकरांच्या बुद्धिमत्तेची चुणूक खगोलशास्त्रज्ञांना जाणवू लागली होती. त्यांची गांभीर्यानं दखलं घेतली जाऊ लागली. थोडक्यात केंब्रिजमध्ये नारळीकरांचा भविष्यकाळ उज्ज्वल होता, पण त्यांनी केंब्रिजच्या वैभवाचा त्याग करून, भारतात परतायचा निर्णय घेतला. मुंबईला टीआयएफआरमध्ये क्वांटम कॉस्मॉलजीवर संशोधनाला सुरुवात केली. पुढे नेहरू तारांगणची निर्मितीही त्यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून झाली. त्याची राजकीय कहाणी वाचनीय आहे. या भागात नारळीकरांनी टीआयएफआरमधील वातावरण, संचालक आणि सहकारी, संशोधनाची पद्धत आणि राजकारण याविषयीही थोडक्यात लिहिलं आहे.


टीआयएफआरमधून बाहेर पडल्यावर वर्षभरातच नारळीकरांनी युजीसीच्या साहाय्यानं पुणे विद्यापीठाच्या आवारात आयुकाची निर्मिती करायला सुरुवात केली. चार्लस कोरिया यांच्या कल्पनेतून आयुकाची वास्तू साकारली. हा निर्मितीप्रक्रियेचा इतिहास रंजक आहे. आयुका ही भारतातली पहिलीवहिली वैज्ञानिक संशोधन संस्था, जी विज्ञानप्रसार व शालेय विद्यार्थ्यांत विज्ञान रुजवणं यासाठी सुरुवातीपासून काम करते आहे. जिचा प्रदीर्घ काळ संचालक म्हणून काम करताना नारळीकरांनी तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून दिला. या काळात त्यांनी सरकारी अनास्था, लहरीपणा आणि राजकारण यांचाही अनुभव घेतला. पूर्णपणे आपल्या संशोधनाला वाहून घेतलेल्या शास्त्रज्ञांना जेव्हा प्रशासकीय काम करावं लागतं, त्यातील राजकारणाचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याचा सराव नसल्यानं ते वैतागतात आणि काहीसं नकारात्मक चित्र रंगवतात की काय असं वाटतं. नारळीकरांबाबतही याचा प्रत्यय येतो. त्यांची बहुतांश निरीक्षणं बरोबरच आहेत, पण निष्कर्ष काढताना मात्र त्यांनी काही ठिकाणी घाई केली आहे असं वाटतं.
'मागे वळून पाहताना' या शेवटच्या प्रकरणात नारळीकरांनी थोडंसं भाष्य, काही निरीक्षणं आणि काही खंत व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी सुरुवातीला आपल्या पाच स्फूर्तिस्थानांविषयी लिहिलं आहे. त्यात आई-वडील, शिक्षक, फ्रेड हॉएल, इ. एम. फॉर्स्टर आणि बाळासाहेब राजवाडे या पाच व्यक्तींचा समावेश आहे.  पण ही टिपणं फारच छोटी असल्यानं त्या त्या व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्टय़ आणि गुण सांगण्यापलीकडे ती जात नाहीत.


त्यानंतर विश्वरचनाशास्त्राबाबत अतिशय नेमकी पण कळीचा मुद्दा माडंणारी टिपणी केली आहे. ते लिहितात, 'संशोधनाला उपलब्ध मुबलक पैसा. पैशापाठोपाठ संशोधनाच्या सुखसोयी, आणि त्यांच्याशी जोडलेला अधिकार. हे टिकवून धरायला तुमचे सिद्धान्त बरोबर आहेत हे पैसा पुरवणाऱ्यांना (बहुतांशी सरकारी समित्यांना) पटले पाहिजे. त्या 'मोहा'पायी आहे तो सिद्धान्त टिकवण्याचे प्रयत्न असतात.' पुढे नारळीकर लिहितात, 'विश्वरचनाशास्त्र हा विषय आज वैज्ञानिक राहिला नसून त्यांत अवैज्ञानिक अटकळबाजी वाढत चालली आहे.' 


यानंतर इंग्रजी आणि मराठी या भाषांविषयी म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाविषयी आणि मराठीच्या भवितव्याविषयी काही विधानं केली आहेत. त्यात कुठलाही ठोस युक्तिवाद नारळीकरांनी केलेला नाही. इंग्रजीचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि ती यापुढच्या काळात अनिवार्य भाषा होणार आहे, हे निर्विवाद म्हणावं इतकं स्वयंस्पष्ट आहे. पण मराठी टिकायची असेल तर केवळ उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होत राहिली पाहिजे, हे नारळीकरांचं मत रास्त असलं तरी पुरेसं आणि पर्याप्त वाटत नाही. तुमचा देवावर विश्वास आहे का, या अनेकवार विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरही नारळीकरांनी सावधपणेच दिलं आहे. त्यात त्यांचा चतुरपणाच जास्त दिसतो. 


या आत्मकथनातून नारळीकरांचा जीवनविषयक दृष्टिकोन फारसा समोर येत नाही, त्यांच्या जगण्याविषयीच्या धारणाही पुरेशा स्पष्ट होत नाहीत. वाचकांना त्यांच्याविषयी नसलेली काही नवी माहिती सांगणं, (बहुधा एवढाच) हेतू असल्यानं हे आत्मचरित्र फार पसरट, पाल्हाळिक झालं आहे. या आत्मकथनाचं शीर्षकही अतिशय अनाकर्षक आहे.
या पुस्तकावर काटेकोरपणे संपादकीय संस्कार झाले असते तर हे टाळता येणं शक्य होतं. त्यामुळे पृष्ठसंख्या बरीच कमी होऊन ते अधिक सुटसुटीत झालं असतं. आशयही अधिक नेमकेपणानं वाचकांना भिडला असता. परिणामी वाचनीयता वाढली असती. पण संपादनाच्या पातळीवर जी साक्षेपी मेहनत घेतली जायला हवी होती, ती घेतली गेली नसावी असं वाटतं. 


नारळीकरांच्या या आत्मकथनाची पहिली आवृत्ती २६ जानेवारी रोजी प्रकाशित झाली. सुमारे पाचशेहून अधिक पानं, तेवढीच किंमत असलेल्या या पुस्तकाची २ ऑक्टोबर रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. यातून नारळीकरांविषयीचं महाराष्ट्रीयांचं कुतूहल आणि आस्था व्यक्त होते, हेही तितकंच खरं.


हे आत्मचरित्र वाचलंच पाहिजे, असं आहे. यात प्रेरणा घ्यावी अशा अनेक गोष्टी, प्रसंग आहेत. शिवाय हे नारळीकरांचं आत्मचरित्र असलं तरी एका अर्थानं काही प्रमाणात केंब्रिज, टीआयएफआर आणि आयुका यांचं चरित्रही आहे. ही चरित्रकथा जाणून घ्यावी अशीच आहे. त्यातून प्रत्येकाला काही ना काही नक्की मिळू शकतं. शास्त्रज्ञ आणि माणूस म्हणून नारळीकरांना काही प्रमाणात जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन नक्कीच मदत करू शकतं. सुनीताबाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा उत्तरार्ध बरोबर होता, पण त्याचा पूर्वार्ध मात्र अपूर्ण होता, याची खात्री हे आत्मकथन वाचताना पटते. पण नारळीकरांसारखी माणसं इतकी अफाट आहेत, की त्यांच्याविषयी अशा एखाद्या पुस्तकातून पूर्णपणे जाणून घेता येणं शक्य होत नाही, हेही तितकंच खरं.


चार नगरांतले माझे विश्व - जयंत विष्णु नारळीकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई 
 
पृष्ठे - ५४६, मूल्य - ५०० रुपये.

Wednesday, November 21, 2012

लेखक अर्धाच पूल बांधू शकतो...

LOKSATTA, Sunday, November 11, 2012
कादंबरीकार- नाटककार किरण नगरकर यांच्याशी बोलणं हा एक सुंदर अनुभव असतो. आपण सेलिब्रेटी लेखक आहोत, याचा जराही अहंकार त्यांच्या बोलण्यामध्ये डोकावत नाही. उलट, स्वतकडे कमीपणा घेऊन ते आपल्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, त्यामागच्या प्रेरणांबद्दल बोलतात. त्यांच्या 'रावण अँड एडी', 'गॉड्स लिटिल सोल्जर', 'ककल्ड' आणि 'द एक्स्ट्राज' या कादंबऱ्यांनी इंग्रजीमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. एक मराठी माणूस इंग्रजीमध्ये 'हायली रिडेबल' आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मराठीविषयी त्यांना कमालीचं प्रेम आहे.
पण मराठीतल्या साहित्यिक राजकारणाचा, गटबाजीचा आणि पूर्वग्रहांचा त्यांना भयंकर तिटकारा आहे. त्याविषयी बोलताना ते कळवळतात. नगरकरांना नुकताच जर्मन सरकारनं नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यानिमित्तानं दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या लेखकाशी राम जगताप यांनी मारलेल्या या गप्पा...


तुमच्या जवळपास सर्व पुस्तकांचे अनुवाद जर्मनमध्ये झाले आहेत. या लेखनामुळे जर्मनी-भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक अनुबंध निर्माण झाला. त्यासाठी नुकतंच तुम्हाला जर्मन सरकारतर्फे 'ऑर्डर ऑफ मेरिट' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जर्मनी हा भारताचा जुना मित्र आहे. नेहरूंच्या काळापासून जर्मनीशी भारताचे अतिशय सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्याला तुमच्या सन्मानानं एक वेगळा आयाम मिळाला आहे. लेखन हीच लेखकाची कृती असते असं म्हणतात. त्यामुळे हा पुरस्कार विशेष मोलाचा वाटतो. तुमच्या काय भावना आहेत या पुरस्काराविषयी?
- आजच्या जमान्यात लेखनाला महत्त्व देणं दुर्मीळ आहे. त्यामुळे या पुरस्काराचा मला नक्कीच आनंद आहे, प्रश्नच नाही. मी जर्मनीत अनेक ठिकाणी बोलतो.. बोलत आलेलो आहे. मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. अहो, ते वाचताहेत हो चक्क! कठीण पुस्तकंही ते वाचतात. अमेरिकेतही पुस्तकं भरपूर आहेत; पण जर्मनांचं प्रेम औरच. जर्मन लोक मला नेहमी सांगतात की, आमच्याकडे किती कमी अनुवाद होतात. जागतिक पातळीवर पाहता ३.५ टक्के अनुवाद फक्त जर्मनीत होतात. मला वाटतं अमेरिकेत ०.३ टक्के पण होत नाहीत. त्यामुळे ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे, की त्यांना अजूनही वाचनाचा नाद आहे. आपल्याकडे मी नेहमी स्वत:ची थट्टा करतो की, माझ्या पुस्तकाचं जेव्हा अभिवाचन असतं, तेव्हा मला लोकांना पैसे देऊन बोलवावं लागतं. याउलट जर्मनीमध्ये लेखक अभिवाचन करायला आला की ते पैसे देऊन ते ऐकायला येतात. हे तुम्हाला कुठे मिळणार आहे? अहो, इथं महाराष्ट्रात माझं नाव कुणी ऐकलंय का?


वाङ्मयीन संस्कृती आणि वाङ्मयीन लोकशाही याविषयी जर्मनीकडून आपण बरंच शिकण्यासारखं आहे..?
- जर्मनीच्या बाजूनं बोलावं तेवढं कमीच. पहिली गोष्ट तर कधी विसरता येत नाही, की नाझींचा ज्यूसंहार कधीच विसरता येत नाही. सहा मिलियन ज्यूंना त्यांनी मारलं. त्याविषयीचा गिल्ट त्यांच्या लेखनात, कलेत सतत येत राहतो. याउलट आपण! आपल्याकडे 'ओलावा' नावाचा शब्द आहे. त्यामुळे आपण सगळं भावनिक करून टाकतो आणि नाकारतोही. आपल्या देशात काही थोर लोक होऊन गेले आहेत, त्यांनीपण काही भयाण गोष्टी केलेल्या आहेत. त्याविषयी आपण बोलू शकतो का? सुभाषचंद्र बोसांबद्दल कठोर सत्य बोलता येतं का? 

म्हणजे वाचकाकडून लेखकाला ज्या प्रकारचा प्रतिसाद हवा असतो, ज्याचा लेखक भुकेला असतो.. वाचक म्हणून लेखनाला न्याय देण्याचं काम जर्मनमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं असं तुम्हाला म्हणायचंय का?
- मला तरी तसं वाटतं. मी जेव्हा 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलं, तेव्हा त्यांनी ते ताबडतोब अनुवादित केलं. 'गॉड्स..'मधील एक अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा शेवटच्या पन्नास पानांत येते. त्याविषयी लिहिताना एका जर्मन समीक्षकानं असा प्रश्न विचारला की, ६००-७०० पानांचं पुस्तक लिहावं, तरीही अतिशय तुफान गती असावी. मात्र, इतका महत्त्वाचा विषय गंभीरपणे हाताळणं, हे जमू शकतं का? पुढे त्यानं लिहिलंय की, शेवटच्या पानांत महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख करून द्यायची, हा मॅडनेस आहे. थोडक्यात- ते बारकाईनं वाचतात.
आणखी एक : 'गॉड्स लिटिल सोल्जर'चा विषय आहे जहालमतवाद आणि दहशतवाद. हा आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईवर इतक्या वेळा हल्ला झालेला आहे! मुस्लीम राष्ट्र नसलेलं असं दुसरं कुठलंही शहर जगात नसेल. पण याविषयी आपल्या समाजामध्ये कधी बोलणं होतं का हो? त्याविषयी आपण सार्वजनिक चर्चा करतो का? कशामुळे हे होतंय? या हल्ल्यासाठी नेहमी मुस्लीम समाजाला दोषी ठरवलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्यायलाच पाहिजे. आपण 'ब्लॅक फ्रायडे' पाहतो तेव्हा ती बरोबर कळते.. मुस्लीम समाज पण किती दु:खी आहे! मुंबईत दंगली झाल्या तेव्हा आपण त्यांची काय वाट लावली! 'मॅक्झिम सिटी'मध्ये सुकेतू मेहतानं एकाचं अवतरण दिलंय. तो माणूस म्हणतो- आग लागली ना, मग तेल बाहेर येतं!
व्ही.टी. - ताज- ओबेरॉयवर हल्ला झाला तेव्हा मी जर्मनीत होतो. ते मला विचारत होते- यू आर द एक्स्पर्ट ऑन धिस. मी त्यांना परत परत सांगत होतो की, मी कसला एक्स्पर्ट? बॉम्बहल्ला झाला की मला पहिल्यांदा वाटतं- मला काय समजलं यातून? हे कधीच थांबणार नाही का? कोणाला तरी मारायचं, यामागे काही एकच प्रेरणा असत नाही; कित्येक प्रेरणा असतात. मी फक्त एक प्रेरणा घेऊन 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलंय. याविषयी आणखी १०० लोकांनी लिहिलं तर उत्तम होईल. 


भारतीय मुस्लिमांचं चुकीचं आणि विपर्यस्त चित्रण केल्याबद्दल नुकत्याच मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी नोबेलविजेते व्ही. एस. नायपॉल यांच्यावर जाहीर टीका केली. या विपर्यस्त लेखनामुळेच नायपॉल यांना नोबेल मिळालं असावं, असं कार्नाड यांनी उपहासानं म्हटलं आहे.
- कार्नाडांचा मुद्दा अतिशय चांगला आणि ठळक आहे! कार्नाड हा अतिशय शांत प्रकृतीचा माणूस आहे. त्यामुळे त्यांना तीव्रपणे तसं वाटलं असणार, तेव्हाच ते हे बोलले असतील. 


सध्या लेखनावर केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर घोषित-अघोषित आणि सरकारबाह्य़ सेन्सॉरशिप लादल्या जात आहेत. त्यांचं प्रमाण वाढत आहे. जर्मनीत काय स्थिती आहे?
- तिथे अशा सेन्सॉरशिप बिलकुल नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे विद्यापीठांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. वेगवेगळी मतं, दृष्टिकोन मांडण्याचं स्वातंत्र्य जर्मनीमध्ये निश्चित आहे; तितकं अमेरिका-युरोपमध्येही नसेल.


'रावण अ‍ॅण्ड एडी' आल्यावर काही समीक्षकांनी तुमच्याविषयी म्हटलं होतं, ''Wow, you must have been born in the toilets of chawl'' आता त्याचा दुसरा भाग 'द एक्स्ट्राज' आल्यावर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत?

- ''रावण अ‍ॅण्ड एडी' इज लास्ट वर्ड ऑन बॉम्बे!' असं एकानं लिहिलं होतं. तेव्हा त्याला मी सांगितलं- धिस इज नॉट फायनल बुक ऑन बॉम्बे. कितीतरी लोकांनी लिहिलं आहे. तो खूप प्रामाणिक होता. त्यानं म्हटलं की, नगरकर माझ्याशी बिलकुल सहमत नाहीत. असो.
'द एक्स्ट्राज'मध्ये व्हेरी व्हेरी फनी सेक्स आहे. आपल्याकडच्या शिल्पांमध्ये, मंदिरांमध्ये सेक्स आहेच की! पण आपल्याला शरम कसली? कपडे काढल्याची! 'द एक्स्ट्राज'मध्ये गंभीर विनोद आहे, पण त्यात भरपूर मजा आहे. मला तमाशा फार आवडतो. आपल्या लोककलांमध्ये सेक्सबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. स्त्री-पुरुष देवांची छानपैकी टर उडवतात. फॅन्टॅस्टिक खरं बोलतात. हे आपल्या रक्तामध्येच आहे. त्यामुळे ते माझ्या पुस्तकामध्येही येतं. पण 'द एक्स्ट्राज'मधल्या मुंबईविषयी, बॉलीवूडविषयीच बोललं जातं. हे पुस्तक खदाखदा हसवतं, याच्याकडे कुणी लक्षच द्यायला तयार नाही.


आपल्या लोककलांमध्ये हा जो निरागस, स्वच्छंदी मनमोकळेपणा आहे, तो साहित्यातून व्यक्त झाला की आपल्याला पचवणं कठीण जातं..?
- तुम्ही अगदी बरोबर बोललात. पचवणं कठीण जातं! मग आमच्यातली दांभिकता बाहेर येते. आमचा समाज असा नाही. आम्ही सभ्य लोक आहोत. मला वाटतं, देवांना २४ हात असतील, पण आपल्याकडच्या लोकांना कमीत कमी दहा करोड हात आहेत. जेवढे पैसे खिशात भरता येतील तेवढे भरायचे आणि वर चांगुलपणाचा आव आणायचा.


'सात सक्कं त्रेचाळीस' या माझ्या पुस्तकाच्या २७ वर्षांत फक्त एक हजार प्रती विकल्या जात असतील तर मराठीत लिहू कशाला?', असा प्रश्न तुम्ही याआधीही उपस्थित केला आहे. ही तुमची खंत काहीशी अस्वस्थ करणारी आहे. पण ती तितकीशी बरोबर नाही असं वाटतं. एक म्हणजे तुमची ही कादंबरी साठोत्तरी काळातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते. दुसरं म्हणजे खप आणि वाचकप्रियता म्हणाल तर या दोन्ही गोष्टी एका मर्यादेनंतर मार्केटिंग, जाहिरात, वितरण यावरच अवलंबून असतात ना..
- तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. 'सात सक्कं त्रेचाळीस' प्रकाशित झाली त्या काळात एवढं मार्केटिंग नव्हतं. पण मी तुम्हाला एक सांगू का, ज्याविषयी मराठी वर्तमानपत्रं वा मासिकं कधी बोलत नाहीत- मी मराठीमध्ये लिहायला कसा लागलो? फक्त चौथीपर्यंत माझं शिक्षण मराठीतून झालं, त्यानंतर माझा मराठीशी संबंध पूर्णपणे तुटला. इंग्रजीशिवाय मला इतर कुठलीही भाषा येत नव्हती. कर्मधर्मसंयोगानं मी मराठी लिहायला लागलो. माझं मराठीला जे देणं आहे, ते मला कधीच फेडता येणार नाही.. आणि फेडायचंही नाही मला. भाषेचं ऋण कशाला फेडायचं? भाषेचं म्हणणं एवढंच- माझा आदर करा. भाषेतले शब्द म्हणजे गोल्ड कॉइन. २४ कॅरेट. ते सांभाळून वापरावेत. आजकाल कुठलंही पुस्तक 'फॅन्टॅस्टिक', कशालाही 'ग्रेट'! अरे, आहे काय? 'न्यूयॉर्कर'च्या पहिल्या संपादकानं असा कायदाच केला होता की, 'ग्रेट' हा शब्द वापरायचा नाही. कारण लोक त्याचा फार गैरवापर करतात. आता तर 'ग्रेट' हा शब्द मराठीच झालेला आहे. अहो, टॉलस्टॉय, शेक्सपीअर, कबीर हे लोक 'ग्रेट' असतील तर बाकीचे लोक 'ग्रेट' होऊ शकत नाहीत. त्यांना खालीच ठेवायला लागतं.


तुमची 'ककल्ड' कादंबरी भक्ती-परंपरेविषयी, 'रावण अ‍ॅण्ड एडी' ही मुंबईतल्या चाळसंस्कृतीविषयी, 'गॉड्स लिटिल सोल्जर' दहशतवादाविषयी.. टोकाचे म्हणता येतील असे हे विषय आहेत.. कुठल्याच कादंबरीचं एकमेकीशी साम्य नाही. हे कसं जमतं तुम्हाला?
- काही नाही, देवाची कृपा. आणि देवकृपेनं ते तसंच राहावं. आय डोन्ट वॉण्ट टु रिपीट मायसेल्फ. आपण कुणी खास आहोत असं प्रत्येकाला स्वत:बद्दल वाटत असतं. पण मला तसं वाटत नाही. 'सात सक्कं त्रेचाळीस'ची वेगळी शैली होती. तेव्हा ती काहींना आवडलीही होती. पण अमुक एक गोष्ट सक्सेसफुल झाली म्हणून परत परत तेच करत बसणं मला नाही पटत. नवे नवे फॉर्म शोधावेसे वाटतात. मला ओरिजिनल असण्याचा काहीही अभिमान नाही. कोण ओरिजनल बनणार आहे? महाभारतानं सगळं करून ठेवलेलं आहेत. इलियट-ओडिसीनं सगळं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनलच्या पाठीमागे जे लागतात ना, ते खरोखरच धन्य आहेत. मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण मला काही ते जमायचं नाही बुवा. माझी इच्छाही नाही. मला फक्त वेगवेगळ्या विषयांवर लिहायचंय, माझ्या परीनं.


तुम्ही 'ककल्ड' ही मीराबाईविषयीची कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पण तुम्हाला तर मीरेवर लिहायचं नव्हतं..?
- बिलकुल हात लावायचा नव्हता. 


म्हणजे मीरेनं तुम्हाला तुमचे शब्द मागे घ्यायला लावले..?
- अहो, तिनं माझ्या थोबाडीत मारली. माझे शब्द माझ्याच घशात घातले. मी लहानपणापासून पोस्टरवरील किंवा कॅलेंडरवरील मीरेचा फोटा पाहत आलो होतो. म्हणून मला तिच्यावर लिहायचं नव्हतं. पण तो माझा मूर्खपणा होता. आपल्या हिंदी चित्रपटांनीसुद्धा तेच केलेलं आहे. परत परत तोच क्लिशे पुढे आणला जातो. पण मीरा क्लिशे नाही, ती बंडखोर आहे. शी इज वन ऑफ द फर्स्ट रिव्होल्यूशनरी. शी इज ऑल्सो फर्स्ट फेमिनन.
दुसरं इतिहास आणि भक्ती हे विषय 'ककल्ड'मध्ये ज्या पद्धतीनं मी हाताळले आहेत, तसे फार क्वचित कुणी हाताळले असतील. महाराजा कुमार मीरेशी लग्न करतो, पण ती त्याला सांगते- 'सॉरी, माझं कुणावर तरी प्रेम आहे!' तिचा प्रियकर हा कुणी साधासुधा माणूस नाही, तर तो साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहे. हा जो प्रेमाचा त्रिकोण आहे, तो अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. आणि तो भक्तीचा त्रिकोण आहे. पण यात आणखी एक गंमत आहे. महाराजा कुमारचा रोल मॉडेल आहे कृष्ण. गोपींबरोबर फिरणारा नाही, तर 'गीता'कर्ता कृष्ण! तो सगळं काही कृष्णाकडून शिकलेला आहे. तो त्याचा सखा, त्याचा देव साक्षात् त्याच्याच बायकोचा प्रियकर आहे. ही फार विचित्र परिस्थिती आहे. महाराजा कुमार तिचा खून करायचाही प्रयत्न करतो. पण त्याला शेवटी समजतं की, मीरेचं कुणावरच प्रेम नाही, तिचं फक्त कृष्णावरच प्रेम आहे. ही जी या कादंबरीतली गुंतागुंत आणि तणाव आहेत, ते या पुस्तकाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. मी 'ककल्ड' लिहायला घेतली तेव्हा आपण काय लिहिणार आहोत, याची मला काहीही कल्पना नव्हती. मला फक्त इतकंच माहीत होतं की, कुठल्यातरी एका क्षणी महाराजा कुमार स्वतला निळा बनवणार आहे.


मघाशी तुम्ही 'देवाची कृपा आहे,' असं म्हणालात म्हणून विचारतो- देवावर तुमचा विश्वास आहे?
- जेव्हा भक्तीचा संबंध येतो ना, तेव्हा! नारायणराव व्यास म्हणून एक गाणारे होते. एरवी कृष्णाची प्रेमगीतं मला सहन होत नाहीत अगदी. पण नारायणराव ती गीतं गातात तेव्हा मी त्यांचे पाय धरतो. तेव्हा मला कृष्ण खरा वाटतो.


भक्तीपरंपरेबद्दलची ही तुमची ओढ कुणामुळे निर्माण झाली? अरुण कोलटकरांमुळे?
- कोलटकर तुफान माणूस. हसून पोट दुखायचं. त्याचा सेन्स ऑफ ह्य़ूमर जबरदस्त होता. वाचन अगाध. समज बेफाम. दुसरं- माझ्या घरचे लोक प्रार्थना-समाजी. त्यामुळे आमच्याकडे ते होतंच. संतांचं तर आमच्याकडे फार कौतुक.


लेखकानं नैतिकता आणि न्याय यांच्यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमातून हस्तक्षेप करायचा असतो असं मानलं जातं. तसा हस्तक्षेप तुम्ही करत आला आहात. तुम्हाला मराठीमध्ये नैतिकता व न्यायासाठी झगडावं लागतं आहे का?
- कोलटकर, कधी कधी चित्रे यांनाही झगडावं लागलंच की! कोलटकरांचं तर बघायलाच नको. मला एकच वाईट वाटतं- हे लोक कसे गट करतात हो! जिथे कुठे चांगलं साहित्य असेल, तर तो एकच गट असायला हवा ना? मग एवढे गट कशासाठी करायचे, मला हे समजत नाही. 


तुम्ही अजूनही स्वतला कॉन्झर्वेटिव्ह (परंपरावादी) आणि अन्अ‍ॅडव्हेंचरस (अ-साहसी) मानता का?
- हो. जेवढी करामत करायला हवी होती, तेवढी मी केलेली नाही. त्यामुळे मी तसंच मानतो. प्रश्नच नाही. लोकांना ओरिजिनॅलिटीमध्ये अ‍ॅडव्हेंचर वाटतं. मला त्यात पडायचं नाही. मी गोष्टी सांगणारा माणूस. मला एका अत्यंत यशस्वी नाटककारानं सांगितलं होतं- तुला जमत नाही, तर तू कशाला लिहितोस? तू लिहायचं बंद कर. तेव्हा मी अर्थातच दुखावला गेलो होतो. त्यानंतर एक महिना, दोन महिने, तीन महिने गेले. मग मी स्वतला विचारलं, अरे बाबा, तू दुखावला गेलास त्याचं कौतुक आता पुरे. आता पुढे चल. 


आपल्याकडे गोष्ट रंगवून सांगण्याची बखरगद्याची परंपरा होती. ती आपण साहित्यातून फारशी पुढे आणली नाही. त्यामुळे मराठीचं नुकसान झालं असं म्हणता येईल का?
- हो, अगदी बरोबर. आपण ते समजून घ्यायला तयार नाही. सगळं काही आपल्याकडे आहे. शेक्सपीअर, टॉलस्टॉय, गार्सिया माक्र्वेझ मला पाहिजे; पण मला संतांशिवाय कधीच जगता येत नाही. काय म्हणून जगू मी? अहो, केवढी मोठी परंपरा आहे आपल्याकडे! चोखामेळा, नामदेव, बहिणाबाई.. तुफान. काय सेन्स ऑफ ह्य़ूमर बहिणाबाईचा! किती हलकंफुलकं, पण महत्त्वाचं बोलून जाते ती! मुक्ताबाई घ्या! ती आपल्या भावाला सांगते- दार उघड रे!


हल्ली मराठीच्या भवितव्याची चिंता मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होऊ लागली आहे. मराठीपुढे इंग्रजीचं संकट उभं राहिलं आहे असं सांगितलं जातं. त्याविषयी काय वाटतं?
- मला यात अत्यंत खोटेपणा वाटतो! पण आग्र्युमेन्ट इज अ‍ॅब्स्युलिट्ली राइट. अशी कुठलीही भाषा म्हणत नाही, की फक्त मलाच आपुलकी दाखवा. भारतात चार भाषा बोलणं हे आरामात जमायला पाहिजे. सगळ्या प्रादेशिक भाषा म्हणतात की, इंग्रजीनं आमची वाट लावली. पण या भाषांना परस्परांबद्दल आदर वाटतो का? तुम्ही कधी बघितलंय- कुणी मराठी माणूस तमिळमध्ये इंटरेस्टेड आहे? गुजराती माणूस कन्नडमध्ये इंटरेस्टेड आहे? नाही. हे फक्त बोलण्यासाठी! मराठी माझी मातृभाषा आहे. त्यामुळे मला मातृभाषा आणि इंग्रजी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेमच वाटत नाही. शरमेची गोष्ट एवढीच, की मी फक्त दोनच भाषा बोलू शकतो. त्याही बेताच्या; चांगल्या नाही.


आपल्याकडे जी भाषा, लिंग, धर्म, पंथ आदी विविधता आहे, आणि या विविधतेतही वेगळ्या प्रकारची एकता आहे, त्या परंपरेला अलीकडच्या काळात काही भारतीय लेखकांकडूनच तडे जायला सुरुवात झाली आहे. भाषेचं राजकारण केलं जाऊ लागलं आहे..
- अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो, भाषा म्हणजे आपली आई. केवळ गोंजारणारी आई नाही. अतिशय कठीण आणि कठोर बाई आहे ती. त्यामुळे भाषेचं राजकारण केलं जाणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मला याचा राग येतो की, काही लोक म्हणतात मराठीवर आमचं प्रेम आहे. मग तुमच्या पोरांना कामापुरतं बोलता-लिहिता येऊ नये मराठी? आपल्याकडची कुठली भाषा अप्रतिम नाही? हिंदी-बंगाली याही अप्रतिम भाषा आहेत. आपल्याकडे किती भाषा आहेत! केवढी मोठी संपत्ती आहे ही! ही संपत्ती जगात कुणाकडे आहे? आपण शिक्षणाच्या माध्यमात किमान चार भाषांचा का समावेश करत नाही?


मराठीमध्ये तुमचा म्हणून एक चाहतावर्ग आहे. तो संख्येनं छोटा असेल; पण आहे. पण त्यांच्यासाठी तुम्ही दुर्मीळ असता. लेखक दुर्मीळ असणं हे त्याच्या वाचकासाठी अन्यायकारक असतं..
- मराठी वाचकांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच ठरतील. लेखक फक्त अर्धा पूल बांधू शकतो; उरलेला अर्धा पूल त्याचे वाचक बांधत असतात. कुणीही मला कधीही सांगावं- नगरकर तुमचा अमुक एक दिवस आम्हाला हवा आहे.. आपण तुमच्या साहित्याचं वाचन आणि चर्चा करू. माझी कधीही तयारी आहे. माझ्या अपेक्षा फार कमी आहेत. आय नीड एन्टायर वर्ल्ड ऑफ माय रीडर. माझ्या वाचकांसाठी कुठलीही तडजोड करायला माझी हरकत नाही. नाहीतर लिहायचं कशासाठी? 


... किरण नगरकरांशी बोलताना जाणवते ती त्यांची कमालीची लेखननिष्ठा, त्यांचं लेखकपण. लेखक म्हणून जगणं नेमकं काय असतं, याचा सच्चा अनुभव घ्यायचा असेल तर नगरकरांना भेटलंच पाहिजे. कारण लेखनाशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या राजकारणापासून कटाक्षानं अलिप्त राहणारा हा मनस्वी कादंबरीकार 'निवडितो ते सत्त्व' या धारणेनं लिहीत आहे, जगत आहे...

प्रिय वाचक हो !

गेले काही दिवस मी ब्लॉग वर काहीच लिहिले नाही. पण आता लवकरच मी पुन्हा लिहायला सुरुवात करेन म्हणतो. मधल्या काळात बरेच वाचन केले आणि काही नवे अनुभवही घेतले, ते आपल्याशी शेअर  करायचे आहे. तेव्हा भेटूच लवकर.
राम जगताप