Sunday, December 8, 2013

बाजारू पुरस्कार संस्कृती

Published in Loksatta: Sunday, December 8, 2013
वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा दीड-दोन महिन्यांचा काळ मराठी साहित्यासाठी नवी उभारी देणारा, चतन्याचा, कुतूहलाचा आणि उत्साहाचा असतो. कारण या काळात भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाऊंडेशन, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, पद्म सन्मान इत्यादी महत्त्वाच्या पुरस्कारांसह राज्यपातळीवरील अनेक छोटे-मोठे पुरस्कार जाहीर होतात. त्यामुळे या काळात मराठी साहित्यविश्व एका अनावर ओढीने भारलेले असते. जसजसे पुरस्कार जाहीर होत जातात, तसतशी काहींच्या आनंदात भर, तर काहींच्या आनंदावर विरजण पडते. मग दबक्या आवाजात, खाजगी गप्पांमध्ये आपल्याला कसे डावलले गेले आणि अमक्याने कशी वशिलेबाजी करून आपली वर्णी लावून घेतली असे चर्वितचर्वण सुरू होते.
एखाद्या व्यक्तीला वा पुस्तकाला पुरस्कार मिळतो, याचा अर्थच असा असतो की, त्या व्यक्तीचा वा पुस्तकाचा विचार हा अनुकरणीय आहे, समाजाला पुढे नेणारा, निदानपक्षी विचारप्रवृत्त करणारा आहे. पण आपल्यालाच पुरस्कार मिळावा यासाठी मराठी लेखकच मोठय़ा प्रमाणावर लॉबिंग करताना दिसतात.
महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार निवड समितीवर मराठवाडय़ातले संतसाहित्याचे एक अभ्यासक होते. त्यांची इच्छा होती की, हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा. तसे त्यांनी जाहीरपणे समितीतल्या सदस्यांना बोलूनही दाखवले. आणि त्यांचे वय पाहता त्याविषयी कुणी ब्र उच्चारला नाही. परिणामी निवड समितीच्या शेवटच्या बैठकीत हा पुरस्कार 'त्या' सन्माननीय सदस्यालाच दिला गेला.
असेच दुसरे एक मराठवाडय़ातलेच उदाहरण देता येईल. हेही वयोवृद्ध साहित्यिक. त्यांनी अलीकडेच महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांना स्वत:च फोन करून सांगितले की, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार तुम्ही इतक्या साहित्यिकांना दिला आहे, पण अजून मला दिलेला नाही.
एक तरुण कवी राज्य सरकारचे पुरस्कार जाहीर झाले की, आपल्या कवितेची मुद्दाम दखल न घेता आपल्याला कसे डावलले गेले, याची शोककहाणी ऐकवीत असे.
दोनेक वर्षांपूर्वी ज्ञानपीठ पुरस्कारासाठी मराठीतील नावे सुचवण्यासाठीचे पत्र एका मान्यवर साहित्यिकाकडे आल्यावर त्यांनी इतरांचे नाव सुचवण्याऐवजी 'या पुरस्कारासाठी काय करावे लागते?,' याचीच विचारणा इतरांकडे करायला सुरुवात केली होती.
'माझे आता शेवटचे दिवस आहेत. निदान या काळात तरी मला हा पुरस्कार मिळावा,' असे बोलून दाखवणारे साहित्यिक आणि 'अमुक लेखक आता उतारवयात आहेत, त्यामुळे त्यांचा प्राध्यान्यक्रमाने विचारू करू, अमुक लेखक अजून तरुण आहेत, त्यांचा नंतरही विचार करता येईल,' अशी अनुकंपा दाखवणाऱ्या पुरस्कार निवड समित्या अशा दोहोंची वाढती संख्या पुरस्कारांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी आणि त्यांची प्रतिष्ठा कमी करणारी आहे. हे प्रकार मराठी साहित्यातल्या अनेक पुरस्कारांबाबत नियमितपणे घडत आहेत. तशी आर्जवे करणाऱ्या साहित्यिकांना आणि पुरस्कार देणाऱ्या संस्थांना याचे काहीही सोयरसुतक वाटत नाही.
पुरस्कारासाठी खटपटी-लटपटी करणाऱ्या साहित्यिकांची ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात काही सन्माननीय अपवाद नक्कीच आहेत. त्यामुळे या लेखातील चर्चा अन्य बहुतांविषयीची आहे. पण असे म्हटले की काहीजण सोयीस्करपणे स्वत:चा 'सन्माननीय अपवादा'त समावेश करून घेतात. नुकत्याच पद्म पुरस्कारासाठी लता मंगेशकर यांनी उषा मंगेशकर यांची, तर अमजद अली खॉं यांनी त्यांच्या मुलाचीच शिफारस केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठीतल्या अनेक लेखकांकडून असे प्रयत्न केले जातात. किंवा त्यांच्या वतीने त्यांचे मित्र-आप्त ते करतात. अनेक पुरस्कार हे कुणाला तरी खूश करण्यासाठी, त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी किंवा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठीच सुरू झाले आहेत की काय असे वाटते. (कै.) रवींद्र पिंगे यांनी काही वर्षांपूर्वी एक आठवण सांगितली होती. प्रकाश नारायण संत यांच्या एका पुस्तकाला एक पुरस्कार जाहीर झाला होता. त्या पुरस्कार निवड समितीत स्वत: पिंगेच होते. नंतर काही महिन्यांनी पिंगे कऱ्हाडला गेले असता त्यांनी संत यांचे पुरस्कारासाठी अभिनंदन करून आपणच त्या निवड समितीत होतो असे सांगितले. पिंग्यांची अपेक्षा होती की, संत खूश होऊन निदानपक्षी आपल्याला धन्यवाद देतील. पण संतांनी शांतपणे 'बरं' एवढेच उत्तर देऊन त्यांना वाटेला लावले. पण अशी उदाहरणे कमी.
ही परिस्थिती केवळ राज्यस्तरीय पुरस्कारांबाबतच आहे असे नाही, तर राष्ट्रीय पुरस्कारांबाबतही कमी-अधिक फरकाने हेच प्रकार घडताना दिसतात. यासंदर्भात साहित्य अकादमी पुरस्कारांचे उदाहरण देता येईल. साहित्य अकादमीचे पुरस्कार हे २४ भारतीय भाषांतील लेखकांना दिले जातात. या पुरस्कारांसाठी अलीकडच्या काळात कथा, कविता, कादंबरी या लेखनप्रकारांचाच प्रामुख्याने विचार केला जातो आहे की काय असा प्रश्न पडतो. २००० नंतरच्या मराठीला मिळालेल्या अकादमी पुरस्कारांवर नजर टाकली तर असे दिसते की, गेल्या बारा वर्षांत तीन कवितासंग्रह, पाच कादंबऱ्या, एक नाटक, एक चरित्र, एक समीक्षा आणि एक  लघुनिबंध यांना हे पुरस्कार दिले गेले आहेत. याचा एक अर्थ असा होतो की, या बारा वर्षांच्या काळात मराठीत एकही चांगले वैचारिक पुस्तक लिहिले गेले नाही आणि एकही चांगले आत्मचरित्र लिहिले गेले नाही. खरेच अशी स्थिती आहे का? मराठीमध्ये वैचारिक लेखन होतच नाही, की जे होते ते पुरस्काराच्या गुणवत्तेचे नसते? (अर्थात हेही तितकेच खरे आहे की, अलीकडच्या काळात वैचारिक लेखन म्हणजे गांधी, आंबेडकर, फुले, शाहू, टिळक, भांडवलवाद, समाजवाद, जातिवास्तव याच विषयावरील लेखन असा समज अनेकांनी करून घेतला आहे. म्हणजे भूतकाळाचेच पुनर्मूल्यांकन करण्यात सारी ऊर्जा खर्च केली जाते. आजच्या समाजवास्तवाचा वेध घेणारी,  समस्या-प्रश्नांची उकल करणारी पुस्तके मराठीत फारशी लिहिली जात नाहीत. पण तो स्वतंत्र विषय आहे.) 

या ज्या बारा पुस्तकांना साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळाले आहेत, त्यातील सर्वच्या सर्व पुस्तके निर्विवादपणे चांगली म्हणावीत अशी आहेत का? ज्या पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो, त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल अशीच स्थिती असते. पण तसे कुणी करत नाही. २०११ चा पुरस्कार कवी ग्रेस यांना त्यांच्या 'वाऱ्याने हलते रान' या पुस्तकासाठी देण्यात आला. एरवी आपल्या बाणेदार वक्तव्यासाठी आणि विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध असलेले ग्रेस तेव्हा शारीरिकदृष्टय़ा खूपच विकल झालेले होते. किंबहुना म्हणूनच त्यांना हा पुरस्कार दिला गेला असावा. अन्यथा 'वाऱ्याने हलते रान' हे त्यांचे ललितलेखांचे पुस्तक त्यामानाने खूपच सामान्य दर्जाचे म्हणावे लागेल. पण त्याविषयी उघडपणे बोलणार कोण? दुसरे असे की, अकादमीच्या निवड समितीवर बहुतांशी सर्जनशील लेखक असल्याने ते इतर लेखनप्रकार विचारतच घेत नसावेत. निदान तसे चित्र तरी निर्माण होते आहे.
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारांचीही काहीशी अशीच तऱ्हा आहे. अलीकडच्या काळात फाऊंडेशनचे पुरस्कार ज्या पुस्तकांना दिले जातात, ती पाहून, वाचून काहीशी निराशा होते. कारण त्यातल्या बहुतांशी पुरस्कारप्राप्त लेखकांची मनोगते आणि त्यांची पुस्तके नकारात्मक असतात. (या पुरस्कारांच्या निमित्ताने जी स्मरणिका काढली जाते. त्यातही दोन वर्षांपूर्वीच्या संपादकीयात याचा उल्लेख केलेला आहे.) त्यातून व्यवस्थेविषयी आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयी जरा जास्तच निराशाजनक चित्र रंगवताना ते दिसतात. परिस्थिती आहे त्यापेक्षा जास्तच फुगवून सांगण्याचा प्रकार आणि समस्यांचा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केलेला असतो. सध्याच्या व्यामिश्र वास्तवाचे योग्य ते आकलन करून घेता येत नाही म्हणून काहींनी पुनरुज्जीवनवादाची वाट धरली आहे. 'आमच्या काळी असं होतं' वा 'अमुक काळी असं होतं' हा ज्येष्ठांचा शिरस्ताच असतो. पण चाळिशी न उलटलेले साहित्यिकही जेव्हा वर्तमानाविषयी नकारात्मक होऊन आजच्या काळाकडेही जुन्या चष्म्यातूनच पाहू लागतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटते. ज्यांचे समाजाविषयीचे, राजकारणाविषयीचे आणि लोकशाहीविषयीचे आकलन अगदीच तोकडे म्हणावे असे आहे, असेच लोक त्याविषयी बेधडक विधाने करताना दिसतात. यात अलीकडच्या काळात मराठीतल्या सर्जनशील साहित्यिकांची संख्या सर्वाधिक आहे.
इथे साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे उदाहरण दिले असले तरी मराठीतल्या बहुतांश पुरस्कार निवड समित्यांवर सर्जनशील साहित्यिक किंवा दुय्यम दर्जाचे समीक्षकच असतात. सर्जनशील लेखकांचा अहम् इतरांपेक्षा जरा जास्तच मोठा असतो. आपल्यापेक्षा इतर कुणी चांगले लिहीत नाही, अशी त्यातल्या काहींची धारणा असते. (यातूनच काही वर्षांपूर्वी एका मान्यवर कवीने ते साहित्य अकादमीच्या निवड समितीवर होते तोवर कुणाही कवीला हा पुरस्कार मिळू दिला नव्हता.) आणि त्यांचे राग-लोभही तीव्र असल्याने आपल्या विरोधकांना डावलण्याची संधी ते सोडत नाहीत. या सर्जनशील लेखकांच्या बरोबरीनेच अशाच प्रवृत्तीच्या दुय्यम दर्जाच्या समीक्षकांचा नंबर लागतो. दुय्यम दर्जाचे लोक प्रथम दर्जाची निवड करू शकत नाहीत, असे गृहीत धरले तरी त्यांनी किमान दुय्यम दर्जाची निवड करणे अपेक्षित आहे. पण तेही होताना दिसत नाही. त्यांचा सरळसोट हिशोब असतो- आपल्याला मानणारा, भविष्यात आपल्या कामी येणारा आणि आपल्या फायद्याचा माणूस हा त्यांचा प्राधान्यक्रम असतो. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे सर्जनशील लेखकांच्या आणि समीक्षकांच्या निवड समितीने स्वत: वाचलेल्या, प्रत्यक्ष पाहिलेल्या आणि त्यांना माहीत असलेल्या पुस्तकांची संख्या खूपच कमी असते. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी पुरस्काराच्या निर्धारित कालातील किमान महत्त्वाची सर्व पुस्तके पाहिलेली असतात असेही नाही. आणि तशी गरजही त्यातल्या अनेकांना वाटत नाही. त्यामुळे सामान्य पुस्तकांचा उदोउदो होतो.
समाजातील विशिष्ट वास्तवाला भिडणाऱ्या साहित्यिकांकडे किमान काही विचार असावा आणि किमान काही कृती असावी- जी उल्लेखनीय म्हणावी अशी आहे, अशी अपेक्षा असते. पण अनेक मराठी साहित्यिकांकडे नेमका कोणता विचार आहे, हे त्यांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांमधूनही दिसत नाही आणि त्यांच्या बोलण्यातूनही दिसत नाही. आणि तरीही अशा लोकांच्या वाटय़ाला पुरस्कार, मानसन्मान येत असतील तर ते एकंदरच सामाजिक अनारोग्याचेच लक्षण नव्हे काय?
आपल्या आई-वडिलांच्या नावे साहित्य पुरस्कार सुरू करण्याची टूमही अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. असे पुरस्कार सुरू करून केवळ पैशाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणे आणि साहित्यिकांना उपकृत करणे, हा काहींचा व्यवसाय झाला आहे. त्याला मराठी साहित्यिक मोठय़ा प्रमाणावर बळी पडत आहेत. शिवाय या पुरस्कारांच्या रकमा बऱ्यापैकी घसघशीत असतात. एका पुस्तकाच्या आवृत्तीतून चार-दोन वर्षांनी जेवढे मानधन मिळते तेवढे पैसे असे पुरस्कार एकरकमी देतात. त्यामुळे या 'रमण्या'चा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात.
पुरस्कारांची दरवर्षी नित्यनेमाने खिरापत वाटणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्था किती पारदर्शक व्यवहार करतात, हाही प्रश्नच आहे. यासंदर्भात इंग्रजीतील पुरस्कारांचे एक उदाहरण पाहता येईल. इंग्रजीतील अनेक पुरस्कार देणाऱ्या संस्था त्यांनी पहिल्या व दुसऱ्या फेरीत निवडलेल्या पुस्तकांच्या शॉर्ट-लिस्ट जाहीर करतात आणि मग त्यातून अंतिम पुरस्कारांची निवड करतात. या पारदर्शकतेमुळे पुरस्कारांसाठी निवडलेल्या पुस्तकांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचून कुठली पुस्तके स्पर्धेत होती, त्यातून अंतिमत: कुठल्या पुस्तकाला पुरस्कार दिला गेला, याची त्यांना कल्पना येते. शिवाय या पारदर्शकतेमुळे परीक्षकांवरचे दडपणही आपोआप वाढते. त्यामुळे चांगल्या पुस्तकावर अन्याय होण्याची शक्यता कमी होते. इतरांनाही फार आरोप करता येत नाहीत. हा 'लोकशाही मार्ग' मराठीतल्या पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी अवलंबला तर त्यांच्या विश्वसार्हतेला अधिक बळकटी येईल.
कुठल्यातरी प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्याची बातमी दस्तुरखुद्द लेखकानेच अनेकांना फोन करून सांगणे, पुन: पुन्हा मेलवरून पाठवणे, फेसबुकवर टाकणे, कुणालातरी त्यानिमित्ताने आपल्यावर लेख लिहायला सांगणे, या गोष्टी जेवढय़ा उत्साहाने केल्या जातात, तेवढय़ाच उत्साहाने पुरस्कार देणाऱ्या संस्थेची विश्वासार्हता, त्यांचे पुरस्कारासाठीचे निकष व हेतू आणि आपली निवड निव्वळ गुणवत्तेवरच झाली आहे ना, याची शहानिशा करावीशी वाटते का? गेल्या २०-२२ वर्षांत पुरस्कार देणाऱ्या संस्था-प्रतिष्ठाने यांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झाला आहे. त्यांच्या हेतूंची खातरजमा न करता केवळ आपल्याला पुरस्कार मिळतोय तर घ्या, एवढाच विचार केला जात असेल तर ते ढोंगाला आमंत्रण देण्यासारखेच नाही काय?
सत्याचे आकलन करून घेण्यासाठी 'सत्यनिष्ठ' असणे ही पूर्वअट असते. पण सत्याची व्याख्याच व्यक्तिसापेक्ष असेल तर कोणताही उपाय चालत नाही. सत्याचा संबंध मूल्यांशी, नीतिमत्तेशी असतो. पण मराठीतल्या सर्जनशील लेखकांची सत्यनिष्ठा, नीतिमत्ता आणि मूल्यव्यवस्था कायमच संशयास्पद राहिलेली आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लोकशाही, शासनव्यवस्था याविषयीचे त्यांचे आकलन तोकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांच्याकडून सत्याचा अपलाप, मूल्यांची धरसोड, तारतम्यपूर्ण विवेकाशी फारकत, नीतिमत्तेला तिलांजली हे अपराध कमी-अधिक प्रमाणात सतत घडत आले आहेत.
अशा सोंगढोंगाच्या दुनियेत बजबजपुरीच माजते. ही बजबजपुरी साहित्यबाह्य़ अवगुणांना जन्म देते. लिहिणारे उदंड, समीक्षा करणारे उदंड, पुरस्कार देणाऱ्या संस्था उदंड अशा कोलाहलात कोणतेच तारतम्य राहत नाही. परिणामी विवेकहीन, पण खोटय़ा प्रतिष्ठेला महत्त्व येते. अशा परिस्थितीत कंपूबाजी, वशिलेबाजी, नातीगोती एवढीच अनेकांच्या आकलनाची आणि सर्जनशीलतेचीही उंची होते. महाराष्ट्रातल्या अनेक पुरस्कारांची, ती देणाऱ्या संस्थांची, घेणाऱ्या साहित्यिकांची अवस्था सध्या अशीच झालेली आहे आणि या बाजारू पुरस्कार संस्कृतीमुळे  दिवसेंदिवस सामाजिक-सांस्कृतिक अनारोग्यात वाढ होत आहे.

Friday, December 6, 2013

वर्ष दोन, आवृत्त्या चार

गिरीश सहस्रबुद्धे यांचे नवे मुखपृष्ट
आमच्या 'मराठा समाज- वास्तव आणि अपेक्षा'  पुस्तकाची चौथी आवृत्ती लवकरच नव्या मुखपृष्ठासह राजहंस प्रकाशन बाजारात आणत आहे. गिरीश सहस्रबुद्धे यांचे नवे मुखपृष्ट वाचकांना आवडेल असे वाटते. सप्टेंबर २०१ मध्ये पहिली आवृत्ती प्रकाशित झाली आणि गेल्या तीन वर्षांत तीन आवृत्त्या संपल्या. आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद वाचकांनी दिला. आता या पुस्तकाचा दुसरा भाग आम्ही संपादित करत आहोत. तो लवकरच बाजारात येईल असा प्रयत्न आहे.  
आधीचे कमल शेडगे यांचे मुखपृष्ट

Wednesday, November 27, 2013

सयाजीराव आणि यशवंतराव

Published in Loksatta- Saturday, March 9, 2013.
११ मार्च रोजी बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या १५०व्या जयंती वर्षांची, तर १३ मार्च रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने आधुनिक भारताच्या इतिहासात असामान्य कर्तृत्व गाजवलेल्या या दोन समाजपुरुषांचं स्मरण करणं समयोचित आणि न्यायोचित ठरेल. एक 'न्यायी राजा' मानला गेला, तर दुसरा 'जनतेचा राजा' मानला गेला. दोघंही सामान्य कुटुंबातून पुढे आलेले. सयाजीराव गुराख्याचं पोर, तर यशवंतराव शेतकऱ्याचं पोर. सयाजीराव बडोदा संस्थानचे राजे झाले, तर यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. एकाचा काळ स्वातंत्र्यपूर्व, तर दुसऱ्याचा स्वातंत्र्योत्तर. एकाचा नियंत्रक ब्रिटिश, तर दुसऱ्याचा हायकमांड. पण दोघांनीही आपल्या कुशल नेतृत्वाने, बहुजनवादी राजकारणाने, संघटन कौशल्याने कालच्या-आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांसाठी आदर्शाचे मानदंड उभे करून ठेवले आहेत.
या दोघांनाही तळागाळातल्या जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण होती. बहुजन समाजाला बरोबर घेत, अभिजनांचा आदर करत केवळ बेरजेचंच राजकारण करण्यावर त्यांनी भर दिला. यशवंतरावांचं राजकारण सयाजीरावांसारखंच बहुजनवादी होतं. असं राजकारण करण्यासाठी आयडिऑलॉजी असावी लागते. सयाजीरावांची लोकशाहीवर अढळ निष्ठा होती, तर यशवंतराव रॉयिस्ट होते.
विचारवंत, कलावंत, लेखक, शास्त्रज्ञ व संशोधक यांचा योग्य मानसन्मान करण्याचं, त्यांची कदर करण्याचं सांस्कृतिक भान दोघांकडेही होतं. 'राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे' अशी यशवंतरावांची तळमळ होती आणि सयाजीरावांचं तर ते जणू ब्रीदवाक्यच होतं. राजकारण हा समाजकारणाचाच भाग असतो. सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि समाजभान यांची चांगली जाण असावी लागते. त्याचा प्रत्ययही या दोघांमध्ये येतोच.
आपल्याला आखून दिलेल्या चौकटीतही चांगलं काम करता येतं. एवढंच नव्हे तर आतून ढकलून ढकलून ती चौकट रुंदावताही येते, याचं उत्तम उदाहरण म्हणूनही सयाजीराव आणि यशवंतराव यांच्याकडे पाहता येतं. सयाजीरावांनी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा यांची पायाभरणी केली, तर यशवंतरावांनी साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ यांसारख्या संस्थांची निर्मिती केली. पण नुसत्या चांगल्या संस्था उभारून भागत नाही. त्या योग्य माणसांच्या हातीही सोपवाव्या लागतात. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य द्यावं लागतं. सयाजीराव आणि यशवंतराव यांनी अनुक्रमे दामोधर सावळाराम यंदे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची निवड केली, त्यांनीही त्या संस्थांना लौकिक मिळवून दिला. सयाजीरावांनी हरहुन्नरी व कल्पक यंदे यांना महाराष्ट्रातून बडोद्याला बोलावून घेऊन त्यांना छापखाना व प्रकाशन संस्था सुरू करण्यास सांगितली. यंदे यांनी 'सयाजी विजय' हे वर्तमानपत्र चालवलं, 'ग्रंथमाला', 'श्रीसयाजी साहित्यमाला', 'श्रीसयाजी-बालज्ञानमाला' प्रकाशित करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथांची, 'व्यायामकोशा'सारख्या कोशांची निर्मिती केली. 'श्यामची आई' हे आज अभिजात मानलं जाणारं साने गुरुजी यांचं पुस्तक यशवंतरावांच्या शिफारशीमुळेच 'इंद्रायणी साहित्य'कडून प्रकाशित होऊ शकलं. सयाजीरावांमुळे डॉ. आंबेडकर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ शकले. स्वत: त्यांनीही इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, आफ्रिका या देशांचे दौरे करून तेथील आधुनिक बदल समजावून घेतले. सयाजीरावांनी १९३२ साली कोल्हापूरमध्ये भरलेल्या अ.भा.म.साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं, तसंच १९३३ साली शिकागो इथं झालेल्या दुसऱ्या  जागतिक धर्म परिषदेचं उद्घाटनही केलं. यशवंतरावांनी १९६५च्या हैदराबादमधील साहित्य संमेलनाचं उद्घाटकपद तर १९७५च्या कराडमधील साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद भूषवलं. कराडच्या साहित्य संमेलनात सरकारचा प्रतिनिधी म्हणून दुर्गा भागवत या नैतिक तोफखान्यापुढे आपल्यावर नामुष्की ओढवली जाणार, याची पूर्ण कल्पना असतानाही यशवंतराव त्या प्रसंगाला सामोरे गेले आणि ती परिस्थिती सावरून घेऊन त्यांनी संमेलन निर्विघ्न पार पडू देण्याचा उमदेपणाही दाखवला!
यशवंतराव अनेक साहित्य संमेलनांना हजर राहत. व्यासपीठावर जाऊन स्वत:चाच सत्कार-समारंभ घडवून आणण्याऐवजी श्रोत्यांत बसून संमेलनाचा आस्वाद घेत. स्वत:च्या अंगावरची सत्तेची झूल अशी सहजतेनं उतरवता येणं, हे सयाजीराव-यशवंतरावांना जमायचं. सयाजीरावांनी बडोदा संस्थानात वस्त्रोद्योगाची स्थापना केली. बालविवाह बंदी, अस्पृश्यता निर्मूलन, घटस्फोट याविषयीचे कायदे केले. ग्रंथालयं काढली, शाळा-कॉलेजेस काढली. विद्यापीठाची स्थापना केली. तर यशवंतरावांनी सहकार उद्योगाची पायाभरणी करतानाच त्याची सत्ता एकवटू नये यासाठी त्याच्या  विकेंद्रीकरणावर भर दिला.  सयाजीरावांचं वैभव आणि राजेपण यामुळे सामान्य जनता त्यांच्याकडे आकर्षित व्हायची, तर यशवंतरावांना तळगाळातल्या प्रश्नांची कल्पना असल्याने ते कुणाशीही सहजतेनं संवाद करू शकायचे. लोकांनाही त्यांच्याबद्दल आपलेपणा आणि विश्वास वाटायचा. संवदेनक्षम मन आणि मनमिळाऊ स्वभाव ही दोघांचीही वैशिष्टय़ं होती. त्यामुळेच त्यांच्या वाटय़ाला आलेलं जनतेचं प्रेम, विलोभनीय होतं.
गेल्या वर्षी दोघांवरही दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या, त्या सामान्य वकुबाच्या आहेत ही गोष्ट वेगळी. दोघांच्याही भाषणांचे-लेखांचे संग्रह प्रकाशित झाले. याआधीही सयाजीरावांना केवळ ब्रिटिशांचे मांडलिक ठरवणारं आणि त्यांचा भाबडेपणाने उदो उदो करणारं लेखनही झालं आहे, तसंच यशवंतरावांविषयीही अभिनंदन, गौरवपर लेखन जसं कमी नाही, तसंच अकारण अभिनिवेशी आणि पूर्वग्रहदूषित लेखनही कमी नाही. पण दोघांचीही चिकित्सक, सत्यान्वेषी आणि तटस्थ पण सविस्तर चरित्रं मात्र अजून प्रकाशित होऊ शकलेली नाहीत. सयाजीराव-यशवंतराव यांच्यासारख्या समाजपुरुषांची पुन:पुन्हा चरित्रं लिहिली जाणं, त्यांच्या कामाचं पुन:पुन्हा मूल्यमापन  होणं, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यथायोग्य मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं असतं. आणि भावी पिढय़ांसाठीही. पण तसे समर्थ चरित्रकार अजूनपर्यंत या दोघांनाही मिळालेले नाहीत. यापुढच्या काळात तरी मिळावेत आणि आपला बौद्धिक आळसही संपावा, अशी आशा करू या. 'विचारांची, माणसांच्या मनांची मशागत करणे आणि त्याचे आदर्श परिणाम घडवून आणणे या नेतृत्वाच्या कसोटय़ा असतात' असं यशवंतरावांनी म्हटलं आहे. ते या दोघांनाही लागू पडतं.

Thursday, October 31, 2013

काय करावं आणि कसं पाहावं?

मूर्ती यांनी प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. त्यामुळे या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवे, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरे.

हे पुस्तक म्हणजे इन्फोसिसचे एक संस्थापक एन. नारायण मूर्ती यांनी वेळोवेळी दिलेल्या भाषणांचा आणि लिहिलेल्या काही नैमित्तिक लेखांचा संग्रह आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर या संग्रहाविषयी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा अभिप्राय छापला आहे. तो असा- ‘‘लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासामोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहर्‍याचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणा-या पिढय़ांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे.’’

त्याखाली मायक्रोसॉफ्ट कॉपरेरेशनच्या बिल गेट्स यांचा अभिप्राय आहे- ‘‘नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली आहे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायामधील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं आहे.’’

खरं तर या दोन्ही प्रतिक्रियांमधून या पुस्तकाचं स्वरूप पुरेसं स्पष्ट होतं. या पुस्तकाकडे कसं आणि कोणत्या अपेक्षेनं पाहायला हवं याचंही सूचन या प्रतिक्रियांमध्ये आहे. नारायण मूर्ती यांनी आपल्या अतिशय साध्या घरातून सुरू केलेली ‘इन्फोसिस’ ही कंपनी आज जगातील सॉफ्टवेअर क्षेत्रातील एक नामांकित कंपनी आहे. तिचा इथपर्यंतचा प्रवास हा सचोटी, मेहनत, सक्षम नेतृत्व, मूल्यं आणि सामाजिक बांधीलकी या पायावर उभा राहिला आहे. पण हे सगळं कसं जुळून आलं, हा वारसा कसा आणि कुठे मिळाला, याची स्पष्टीकरणं या संग्रहातील भाषणं आणि लेखांमध्ये सापडतात.

वाचकांच्या सोयीसाठी पुस्तकाचे एकंदर दहा भाग केले आहेत. विद्यार्थ्यांना संदेश, मूल्ये, महत्त्वाचे राष्ट्रीय मुद्दे, शिक्षण, नेतृत्वासमोरील आव्हानं, कॉपरेरेट आणि सार्वजनिक व्यवस्थापन, औद्योगिक सामाजिक जबाबदारी आणि समाजसेवा, उद्योजकता, जागतिकीकरण आणि इन्फोसिस या दहा विभागांमध्ये 38 भाषणं व लेखांचा समावेश आहे. ‘विद्यार्थ्यांना संदेश’ या पहिल्याच विभागात आठ भाषणं आहेत. तेवढे लेख वा भाषणं इतर कुठल्याच विभागात नाहीत. हे कदाचित जाणीवपूर्वक केलं आहे का, हे माहीत नाही! मात्र ही सर्वच भाषणं देशात आणि जगातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभात केलेली भाषणं आहेत, हेही नोंद घेण्यासारखं आहे.

ही भाषणं फार चमकदार नाहीत की फारशी प्रभावित करणारीही नाहीत. पण साध्या साध्या प्रसंगांतून मूर्ती यांनी ज्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं बदललं याचा प्रत्यय येतो. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षण संपवून बाहेरच्या जगात पाऊल ठेवताना ते जग नेमकं कसं आहे, हे समजावून घेतलं पाहिजे, स्पर्धेची-कष्टाची-गुणवत्तेची नेहमी तयारी ठेवली पाहिजे, हे मूर्ती थोडाफार बदल करत परत परत सांगतात, तेव्हा त्यांची जडणघडण कोणत्या मूल्यांच्या पायावर झाली आहे, हे स्पष्ट होत जातं.

म्हणजे या पुस्तकातून मूर्ती यांच्या अभ्यासाचे विषय कोणते आहेत, त्यांचा व्यासंग कसा आहे, त्यांनी कोणापासून प्रेरणा घेतली आणि भारताबद्दलची त्यांची व्हिजन काय आहे, यापेक्षा मूर्ती यांची जडणघडण कशी झाली, इन्फोसिसचा प्रवास कसा झाला आणि तिला प्रचंड यश कसं मिळालं, याची गुपितं समजावून घेता येतात.

‘जागतिकीकरण’ या भागात मूर्ती सरळ सरळ जागतिकीकरणाचा पुरस्कार करतात. त्यावर मूर्ती मोठय़ा कंपनीचे मालक असल्याने ते तसं करणारच, असा प्रश्न बहुधा हे पुस्तक वाचणारा तरी उपस्थित करणार नाही. कारण जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि त्याचं वस्तुनिष्ठ विश्लेषण मूर्तीनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सेवा-उद्योगात जागतिकीकरणाने जी क्रांती केली आहे, त्याचाही आढावा त्यांनी घेतला आहे.

परंतु यातील काही भाषणं वा लेख फारच त्रोटक आहेत. उदाहरणार्थ ‘मी माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक असतो तर..’, ‘चक दे इंडिया’ इत्यादी. ते लेख वगळायला हवे होते असं वाटतं. त्यामुळे पुस्तक आणखी सुटसुटीत झालं असतं.

पश्चिमेकडून भारतानं काय शिकायला हवं आणि भारताकडून पश्चिमेनं काय शिकायला हवं, याविषयी मूर्ती बोलले आहेत, तसंच देशातील भ्रष्टाचार कसा थांबवता येईल याविषयी त्यांनी एक भाषण दिलं आहे. शहरनियोजन, धर्मनिरपेक्षतेचं महत्त्व, कॉपरेरेट गव्हर्नन्स, भांडवलवाद, उद्योजकता या विषयांवरही मूर्ती बोलले आहेत किंवा त्यांनी लिहिलं आहे.

एखादी व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचते, तेव्हा समाज तिच्याकडून वेगवेगळ्या अपेक्षा करायला लागतो. ‘तुम्ही यावर बोललं पाहिजे’, ‘त्याविषयी बोललं पाहिजे’, ‘अमुक अमुकवर तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे’ असे आग्रह केले जातात. त्याचं प्रतिबिंब यातील काही भाषणांमध्ये आणि लेखांमध्येही पाहायला मिळतं. पण ‘आपण त्याविषयातले तज्ज्ञ अभ्यासक नाही आहोत’, हे लक्षात घेऊन मूर्ती यांनी चतुरपणे प्रत्येक विषयाला स्वानुभवाकडे तरी वळवलं आहे किंवा स्वानुभवाकडून तरी ते विषयाकडे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्या-लिहिण्यात सच्चेपणा आहे, कळकळ आहे आणि बांधीलकीही. म्हणून या पुस्तकातून काय करायला हवं आणि कसं पाहायला हवं, याबाबतचा दृष्टिकोन मिळू शकतो. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, हेही खरं.

मात्र हे पुस्तक वाचून कुणी फार झपाटून जाणार नाही. हे सेल्फ हेल्प वर्गातलं पुस्तक नाही. त्यामुळे ते वाचून मूर्तीसारखं यश आपल्याला मिळवता येईल, असा दृष्टिकोन असणा-यांसाठीही हे पुस्तक नाही. तर मूर्ती यांनी इन्फोसिस कोणत्या मानदंडावर उभा केला. ते मानदंड उभारले कसे आणि त्यांचं संवर्धन कसं केलं, हे समजावून देणारं हे पुस्तक आहे. ते त्यासाठीच वाचायला हवं.

अ बेटर इंडिया, अ बेटर वर्ल्ड : एन. नारायण मूर्ती, मराठी अनुवाद : चित्रा वाळिंबे, मेहता पब्लिशिंग हाऊस.

Sunday, October 27, 2013

(मराठी साहित्याची) कत्तल करणारा माणूस!

Published in Loksatta, Sunday, October 27, 2013
पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी अशोक शहाणे यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्य व साहित्यिकांवर अक्षरश: बॉम्बगोळा टाकला होता. या घटनेच्या र्अधशतकपूर्तीनिमित्ताने या मूळ लेखाचा परामर्श....
वसंत सरवटे यांनी ठणठणपाळसाठी काढलेले मार्मिक चित्र, ललित, जानेवारी १९६४. 
-----------------------------------------------------------------------
अशोक शहाणे यांचं आत्ताचं वय वर्षे ७८ आहे. पन्नास वर्षांपूर्वी- १९६३ साली, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांनी 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'- किरण' या शीर्षकाचा घणाघाती लेख लिहून मराठी साहित्यावर तेव्हा अक्षरश: आणि शब्दश: बॉम्बगोळा टाकला होता. हा मूळ लेख त्यांनी पुण्यात 'काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम' या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादासाठी लिहिला होता. खरं तर तेव्हा शहाणे यांचं मराठी साहित्यात विशेष काही नाव नव्हतं. बंगाली साहित्यिक मोती नंदी यांच्या काही कथांचा त्यांनी मराठी अनुवाद केला होता, तेवढाच. तेव्हा शहाणे पुण्याचं साहित्यपीठ मानल्या जाणाऱ्या मराठी साहित्य परिषदेपासून दहाएक मिनिटांच्या अंतरावर एक खोली भाडय़ानं घेऊन राहत होते. मधू साबणे, भालचंद्र नेमाडे हे त्यांचे त्यावेळचे मित्र.
त्यांच्या या लेखाचं इंग्रजी नाव 'लिटरेचर अँड कमिटमेंट' असं होतं. हा लेख त्यांनी मासिक 'मनोहर'ला पाठवला. त्याच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या अंकात हा लेख दोन भागांत 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर 'क्ष'-किरण' या नावानं छापून आला आणि मराठी साहित्यात एकच खळबळ उडाली. शहाणे यांनी एक प्रकारे मराठी साहित्याचा एक्स-रे काढून त्याचं चारित्र्यहनन केलं होतं. दुसरी गोष्ट अशी झाली की, 'मनोहर' हे मासिकही या लेखामुळे चर्चेत आलं. तोवर या मासिकाकडे साहित्यजगताचं विशेष लक्ष नव्हतं.
''क्ष'-किरण' छापून आल्यावर पुण्यातील मराठी साहित्यविश्वात मोठीच धांदल उडाली. पुढच्या दोन-चार दिवसांत या लेखाचा निषेध करण्यासाठी मसापमध्ये निषेध सभा बोलावण्यात आली. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके होते. ते या लेखानं खूपच चिडले होते. त्यांचं अध्यक्षीय भाषण खूपच आवेशपूर्ण आणि भडकवणारं होतं. त्यांनी- ''जो हात हे लिखाण करू शकला व ज्या हाताने हे प्रसिद्धीसाठी स्वीकारले, ते हात कलम झाले पाहिजेत,'' असे संतप्त उद्गार काढले.
फडके यांच्या या विधानावरून पुण्यातली साहित्यजगतातली परिस्थिती किती स्फोटक बनली होती याची कल्पना येते. जो- तो या लेखावर तावातावानं बोलू लागला.
जानेवारी १९६४ च्या 'ललित'मध्ये ठणठणपाळ यांनी शहाणे यांच्या लेखावर मल्लिनाथी करणारा 'वाङ्मय आणि बांधिलकी' हा लेख लिहिला. ''अलीकडे मराठी साहित्यात, विशेषत: टीकाक्षेत्रात भोंगळपणा खूपच निर्माण झाला आहे. एखाद्या साहित्यकृतीविषयी टीकाकाराकडून स्पष्ट मत मिळणेच दुरापास्त होते. एखादी कृती बरी वाटावी, त्यातल्या त्यात उजवी ठरावी, अशी चमत्कारिक पद्धत रूढ झाली होती. पण अशा अनिश्चित भाषेला मूठमाती देणारा नवा टीकाकार उदयाला आला आहे! 'उदयाला आला' असे म्हणण्यापेक्षा तो 'चक्क डोक्यावर आला' असे म्हणणेच योग्य ठरावे! (तरीही ठरावेच!) हा नवा टीकाकार म्हणजे अशोक शहाणे ( 'मोती नंदी'फेम!). तसे म्हटले तर स्वारीने फारसे काही लिहिलेले नाही. अधिकतर मोती नंदी या बंगाली लेखकाच्या काही कथा त्यांनी भाषांतरित केल्या आहेत. पण स्वारी उपजत टीकाकार (टीकाखोरच!) आहे..'' अशी लेखाची सुरुवात करून ठणठणपाळने पुढे शहाण्यांनी वाङ्मयाची 'जे जे लिहिले गेले ते वाङ्मय' अशी सर्वसमावेशक व्याख्या कशी केली आहे, याचा उल्लेख केला आहे.
''लोकहितवादी चिपळूणकर, आगरकर, टिळक, केतकर वगैरे श्रेष्ठ, ज्येष्ठ विभूतींना त्यांनी एका परिच्छेदात गाडून टाकले आहे. हरी नारायण आपटे हे मोठे कादंबरीकार असे मराठी लोक अभिमानाने म्हणतात.. पण शहाण्यांच्या मते, हरीभाऊंनी स्कॉट आणि डिकन्स यांच्या कादंबऱ्या समोर ठेवून आपले लेखन केले. वा. म. जोशी, खांडेकर आणि विभावरी शिरूरकर ही मंडळी शहाण्यांचे दोन-चार फटके खाऊन जिवानिशी बचावली.. मर्ढेकर हे किमान एक महत्त्वाचेसुद्धा कवी नाहीत; कारण त्यांनी चार-दोन बऱ्या कविता लिहिल्या आणि बाकी जुळवाजुळव केली. 'एवढे कुणीही करतो'असे शहाणे यांचे मत. 'मीच कथा लिहावी' असा गर्व गंगाधर गाडगीळ यांनी आजवर वाहिला. पण फुकट! शहाणे यांनी त्यांना 'खुजे मर्ढेकर' म्हणून चक्क खाली बसवले आहे. (गर्वाचे घर खाली म्हणतात ते हे असे!) आणि ते नवकवी- विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट (चोर लेकाचे!) स्वत:ला नवकवी म्हणवून 'सत्यकथे'त कविता छापून घेत होते. बरे झाले त्यांची खोड मोडली ती! शहाणे यांनी त्यांना टपल्या मारून चक्क रविकिरण मंडळात बसवले आहे..'' असे शहाण्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर बॉम्बगोळे टाकले होते, त्यांच्या त्यांच्या नावानं परत ठणठणपाळनं ठणाणा केला.
शहाणे यांच्या मते, आधुनिक मराठी साहित्यात गोडसे भटजी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चिं. वि. जोशी, जी. ए. कुलकर्णी, आचार्य अत्रे, काकासाहेब गाडगीळ, पु. शि. रेगे हे मोजून सात लेखक. शहाण्यांना आठवं बोट काही मोडावं लागलं नाही. ए. वि. जोशी, विंदा करंदीकर हे लोक शहाणे यांच्या मते ठीक म्हणावेत असे. शहाणे यांनी विनोबा भावे यांना 'मराठीतला हा एकमात्र समग्र माणूस' असे म्हटले होते, तर बालकवींना 'अलीकडच्या काळात अस्सल कविता लिहिणारा हा एकमेव अस्सल कवी' असे या लेखात म्हटले होते.
शहाण्यांच्या मते, मराठीत थोर कलाकृती किती आहेत? मोजून तीन.
१) माझा प्रवास, २) स्मृतिचित्रे आणि ३) रणांगण.
झालं! यापल्याड शहाणे यांनी मराठी साहित्यात इतर कुणाचीही गणती केलेली नाही. निदान तेव्हा केली नव्हती, असं म्हणू या.
हा घणाघाती लेख पुस्तकरूपाने प्रकाशित व्हायला बराच काळ जावा लागला. शहाणे यांच्या 'नपेक्षा' (२००५) या एकुलत्या एक पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. छापील २७ पाने भरेल एवढा हा लेख आहे. यात मराठी साहित्यिक आणि साहित्याचं टीकावस्त्रहरण करणारा मजकूर तसा तुलनेनं दहा पानांचाच आहे. बाकी लेखात साहित्याच्या संदर्भात बांधीलकी, साहित्यातली 'बीट' पिढी आणि स्वत:ची पिढी याविषयी लिहिलं आहे. आणि त्यात कुठेही शेरेबाजी नाही. विशेषत: त्यांनी स्वत:च्या पिढीचाही उद्धार केला आहे. 'आमची पिढी ही षंढांची पिढी आहे, असे आम्ही पूर्वीच जाहीर केले आहे,' असंही त्यांनी सांगून टाकलंय. त्याआधी शहाणे यांनी 'षंढांची पिढी' या नावानं एक कविता लिहिली होती. त्याचा हा संदर्भ आहे.

या कवितेचा एक किस्सा आहे. ही कविता ग. दि. माडगूळकर यांच्या वाचनात आली. तेव्हा भाऊ पाध्ये यांच्या पुस्तकावरून सेन्सॉर बोर्डाचा वाद चालू होता आणि गदिमा त्या बोर्डावर होते. डेक्कनला मित्रासोबत फिरत असताना ते सहज म्हणून गदिमांना भेटायला गेले. मित्रानं शहाणे यांची ओळख करून देताच गदिमा म्हणाले, ''अरे, याचं कुणीतरी लग्न लावून द्या रे! म्हणजे हा पुन्हा असं काही लिहिणार नाही.'' तर ते असो.
''क्ष' किरण'मध्ये टिळक, आगरकर, मर्ढेकर, गाडगीळ, बापट, करंदीकर, पु. ल. देशपांडे या आदरणीय आणि प्रात:स्मरणीय व्यक्तिमत्त्वांबद्दल शेरेबाजीवजा विधाने केल्यामुळे खळबळ उडणं साहजिकच होतं.
आधुनिक मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड गेली ३०-४० वर्षे मसाप प्रकाशित करीत आहे. पण तो अजूनही पूर्ण व्हायला तयार नाही. शहाणे यांनी मात्र पन्नास वर्षांपूर्वीच तो अवघ्या छापील २७ पानांमध्ये मांडून दाखवला आणि त्याशिवायही बरंच काही सांगितलं.
तत्कालीन मराठी साहित्यिक आणि साहित्याची अशी कत्तल केल्यावर शहाणे यांनी गप्प बसावं ना! पण गप्प बसतील तर ते शहाणे कुठले! त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'आपल्याकडे नाही तरी म्हणायची पद्धतच आहे- गप्प बसायचं काय घेतो? पण मी काही गप्प बसणार नाही. अजून बरंच काम बाकी आहे.' क्ष-किरण टाकल्यापासून शहाणे यांचं मराठी साहित्याचं शल्यचिकित्सा करण्याचं काम चालूच आहे. ते लिहितात कमी; पण बोलतात खूप. जगणं थोर आणि लिहिणं कमअस्सल- अशी त्यांची धारणा तेव्हा होती आणि आजही आहे. ते एका दृष्टीनं चांगलंच आहे. एरवी त्यांच्या साध्या बोलण्यातही चार-दोन साहित्यिकांचे खून पडतातच.
त्यामुळे जरा सावध राहा.

Monday, October 14, 2013

परवानगी आणि श्रेयाचा हक्क


First Published in Loksatta, 13 Oct.2013
अरुण कोलटकरांच्या 'परंपरा' या कवितेच्या स्वामित्व हक्काबाबत (कॉपीराइट) न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयामुळे मराठी साहित्यविश्वात नाही म्हटलं तरी थोडीशी खळबळ निर्माण झाली. सकृद्दर्शनी हा निकाल अनेकांना चक्रावून टाकणारा वाटतो आहे. केवळ परवानगी घेतली नाही म्हणून संबंधिताला न्यायालयात खेचणे आणि न्यायालयाने अशी शिक्षा सुनावणे, हे साहित्य क्षेत्रातील अनेकांना गोंधळात टाकणारे वाटते. खरे तर यात काहीही बुचकळ्यात टाकणारे वा गोंधळात पाडणारे नाही. हे सर्व कॉपीराइट कायद्याला धरून आहे.
    
१९१४ साली 'इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट' कायदा प्रथम अस्तित्वात आला. १९५७मध्ये 'द कॉपीराइट अ‍ॅक्ट १९५७' असे त्याचे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून १९९४पर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोणतीही स्वतंत्र निर्मिती -म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत इ. तयार केल्यावर त्याचा स्वामित्व हक्क(कॉपीराइट) त्याच्या कर्त्यांला मिळतो. त्यासाठी लेखी करारच केला पाहिजे असे बंधन नाही. पुस्तकावर लेखक, प्रकाशक यांचे नाव असेल तरी त्यांना हा हक्कनिसर्गत: मिळतो. छापील माध्यम नसेल तेव्हा त्याचा करार करून घ्यायला हवा. स्वतंत्र बौद्धिक प्रयत्नातून जे काही निर्माण होते, त्याचा स्वामित्व हक्क त्याच्या कर्त्यांकडेच असतो. त्याने इतर कुणाला लेखी कराराद्वारे वा इतर मार्गाने तो दिला असला, त्याचा योग्य तो मोबदला घेतला असला तरी त्याचा निर्मितीकर्त्यांचा मूळ हक्क कायम राहतो. म्हणजे मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसानभरपाईही मागू शकतो. मूळ कर्त्यांच्या निधनानंतर त्याचे वारसदारही हा हक्कबजावू शकतात. लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी त्याचा वा त्याच्या वारसदारांचा त्या पुस्तकावरील हक्क संपुष्टात येत असला तरी वरील हक्कशाबूत राहतो. 
                    
थोडक्यात कॉपीराइट कायदा हा मूळ लेखकाच्या वा कर्त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा आहे. त्यामुळे इतर कुणालाही परवानगीशिवाय त्याचा वापर वा गैरवापर करता येत नाही. त्याचा भंग केल्यास दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई करता येते. तो सिद्ध झाल्यास सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा ५० हजार ते दोन लाख रुपये दंड होऊ शकतो.
बौद्धिक संपदा ही लेखक, गीतकार, संगीतकार यांची वैयक्तिक संपत्ती असते. तो त्याचा एकमेव हक्कदार असतात. त्यांनी त्यांचे हक्क इतर कुणाला दिले तरीसुद्धा त्याचा पूर्णत: वा अंशत: वापर करण्यासाठी मूळ कर्त्यांची आणि ज्याच्याकडे सध्या त्याचे मुखत्यारपत्र असेल त्यांची परवानगी अनिवार्य असते.   


याचा अर्थ असा नाही की, संशोधन वा इतर प्रकारच्या लेखनासाठी इतरांच्या लेखनातील उद्धृते, उतारे वा काही भाग वापरताच येत नाही. मर्यादित उद्दिष्टांसाठी आणि योग्य कारणासाठी असा वापर अवश्य करता येतो, पण ते कसे वा किती प्रमाणात वापरायचे हे समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा आपल्याकडून व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात नाही ना, हेही पाहिले पाहिजे. विद्यापीठीय पातळीवरील एम.फिल, पीएच.डी. यांसारखे वा तत्सम संशोधन हे जोपर्यंत काही निवडक लोकांपुरतेच मर्यादित असते, त्याचा व्यावसायिक वापर (पुस्तकरूप वा इतर मार्गाने सार्वत्रिक करणे) केला जात नाही, तोपर्यंत ते कायद्याच्या कक्षेत येत नाही. पण जेव्हा ते पुस्तकरूपाने प्रकाशित करावयाचे असते तेव्हा त्यासाठी संबंधित लेखकांच्या लेखी परवानग्या घेणे बंधनकारक असते. संशोधन प्रकल्प वा प्रबंधांसाठीही संबंधितांची परवानगी घेणे गरजेचे असते. निदान मराठीमध्ये तरी अशा प्रकारच्या परवानगीसाठी कुणीही लेखक, त्यांचे वारसदार आणि प्रकाशक अडवणूक करत नाहीत आणि आर्थिक मोबदल्याचीही अपेक्षा करत नाहीत. एखाद्या नाटककाराच्या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते आणि दर प्रयोगाचे मानधनही द्यावे लागते. तशा प्रकारच्या सूचना पूर्वी आणि आताही नाटकांच्या पुस्तकात स्पष्टपणे छापलेल्या असतात.


मर्यादित उद्दिष्ट आणि योग्य कारण म्हणजे नेमके काय याबाबत भारतीय कॉपीराइट कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही. परंतु युरोप-अमेरिकेतील कॉपीराइट कायद्यांमध्ये काही संकेत दिलेले आहेत आणि ते तिकडे यथायोग्य रीतीने पाळलेही जातात. त्यासाठी तिकडील लेखक-प्रकाशकांच्या संघटना पुरेशा सजग आणि सतर्क आहेत. इतर लेखकांच्या लेखनातील भाग वापरताना तो संबंधित पुस्तकाच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त असू नये वा त्या पुस्तकातील एकच अवतरण वापरायचे असेल तर ते ४०० शब्दांपेक्षा मोठे असू नये. आपल्याकडे असे संकेत निदान अजून तरी तयार केले गेलेले नाहीत. भारतातील सर्व प्रकाशकांची शिखर संघटना असलेल्या 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने याबाबतीत पुढाकार घेऊन ते तयार केले तर संशोधक, अभ्यासक आणि इतरांना त्याचा फायदा होऊ शकेल. मात्र ते संकेत आता नाहीत म्हणून इतरांच्या लेखनाचा आपल्याला हवा तसा वापर करता येत नाही, हे लक्षात घ्यायलाच हवे.

भारतात स्वामित्व हक्काविषयीचे अज्ञान आणि बेजबाबदारपणा यातून अनेक प्रमाद घडतात. उदा. आपल्याकडे पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींचा मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होतो. इंग्रजी पुस्तकांबाबत तो जास्त होत असला तरी आता मराठी पुस्तकांबाबतही हे प्रकार होऊ लागले आहेत. 'अग्निपंख', 'मृत्युजंय', 'छावा', 'ययाती' अशा काही पुस्तकांबाबत हे प्रकार अलीकडच्या काळात घडले आहेत. 'फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स'ने २००६ साली प्रकाशित केलेल्या 'अण्डरस्टॅण्डिंग कॉपीराइट लॉ' या पुस्तकानुसार पायरसीमुळे दरवर्षी ब्रिटनमध्ये ८०० कोटी, अमेरिकेत २५०० कोटी तर भारतात ४०० कोटी रुपयांचे संबंधित लेखक-प्रकाशकांचे नुकसान होते.


शिवाय रंगमंचीय, चित्रपटीय आविष्कार, रूपांतर, अनुवाद, या आणि अशा प्रकाराबाबतही पुरेशी सजगता नसल्यामुळे त्यायोगेही होणाऱ्या गैरवापराचे प्रमाणही बरेच आहे. संबंधित लेखकाच्या, प्रकाशकाच्या परवानगीशिवाय त्याच्या लेखनाचे अंश, संक्षिप्त भाग वा उद्धृते बिनदिक्कतपणे वापरली जातात. संबंधितांना कळवण्याचे सौजन्य न दाखवता आणि परवानगी न घेता 'सब कुछ चलता है' या न्यायाने सारे दडपून नेण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व गैरप्रकार थांबवायचे असतील तर लेखक-प्रकाशकांनी वा त्यांच्या वारसदारांनी स्वामित्व हक्क कायदा नीट समजावून घेतला पाहिजे. तो घेतला तर योग्य ती दाद मागता येते. आपले आर्थिक नुकसान आणि गैरवापर या दोन्ही गोष्टी टाळता येतात. 

 सत्य हा बचाव होऊ शकत नाही तसेच अज्ञान हाही बचाव होऊ शकत नाही. त्यामुळे मूळ लेखकाबरोबरच संबंधित प्रकाशकालाही कारवाईला सामोरे जावे लागते. पण लेखक-प्रकाशक सजग असतील तर असे बेजबाबदार प्रकार पूर्णपणे थांबवता येतात, याचे उदाहरण म्हणून शहाणे-सकाळ या खटल्याकडे पाहायला हवे. आपल्या न्याय हक्कासाठी कोर्टाची पायरी चढायला काहीच हरकत नाही, हा धडा या प्रकरणातून लेखक आणि प्रकाशकांनी घ्यायला  हवा.

Thursday, September 19, 2013

वीस सुरस व चमत्कारिक गोष्टी

Published: Loksatta, Saturday, April 20, 2013.

उदारीकरणाच्या गेल्या वीस वर्षांत दळणवळणाची, संपर्काची आणि सोयीसुविधांची साधने इतक्या प्रमाणात वाढली, तंत्रज्ञान इतक्या मोठय़ा प्रमाणावर बदलले की आता पूर्व उदारीकरण आणि उत्तर उदारीकरण अशीच मांडणी करावी लागेल. या प्रकारची मांडणी करणारे लेखन मराठीमध्ये क्वचितच होत असले तरी इंग्रजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर होऊ लागले आहे.

गेल्या तीस-चाळीस वर्षांत - विशेषत: वीस - जग ज्या गतीने आणि पद्धतीने बदलले आहे, त्यात सर्वात जास्त उत्क्रांत कोण होत गेले असेल तर मध्यमवर्ग. उदारीकरणपर्वाचा सर्वात जास्त उपभोक्ता वर्ग कोणता असेल तर तोही मध्यमवर्गच. संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची साधने, सेवा-सुविधा यांचा सर्वाधिक उपभोग घेणारा वर्ग कोणता तर तोही हाच. राजकारण, समाजकारण, प्रसारमाध्यमे यांवर सर्वाधिक याच वर्गाचा प्रभाव पडत आहे. 


पण अशा या मध्यमवर्गाची उत्क्रांतीची साधने कोणती, तर या पुस्तकातली. (याशिवायही आणखी काही आहेत म्हणा.) त्याला या पुस्तकाचे लेखक आनंद हळवे ‘डार्विन्स ब्रँड्स’ म्हणतात. या मध्यमवर्गाचं मानसशास्त्र वेगवेगळ्या ब्रँड्सनी कसं आपल्या बँडच्या तालावर नाचवलं आहे, त्याच्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळतात. 


‘अपवर्डली मोबाइल’ असा एक शब्द हल्ली निम्नवर्गासाठी वापरला जातो. त्यात थोडं कौतुक, थोडा उपहास असतो. पण समाजातले सर्वच गट आणि थर हे नेहमीच ‘अपवर्डली मोबाइल’ असतात. सरकारी नोकरी करणाऱ्या मूठभर वर्गाला एकेकाळी ‘पांढरपेशा’ म्हटले जायचे आणि तोच मध्यमवर्ग मानला जायचा. आता तो मध्यमवर्ग राहिला नाही. उच्च, मध्यम आणि निम्न असे मध्यमवर्गाचे तीन थर झाले आहेत. आणि ते तीनही ‘अपवर्डली मोबाइल’ आहेत. त्यांची आयुधे कोणती, साधने कोणती याची काही उत्तरे या पुस्तकात सापडतील.


कासवछाप अगरबत्तीच्या दिवाळी अंकातील वैविध्यपूर्ण जाहिराती वा सुरुवातीच्या काळातील टीव्हीवरील जाहिराती या प्रचंड कुतूहलाचा विषय असायच्या. पण गेल्या काही वर्षांत कितीतरी वेगवेगळ्या जाहिरातींनी, त्यांच्या कॅम्पेननी लोकांच्या- खरं तर ग्राहकांच्या मनाचा कब्जा घेतला आहे. एकीकडे मध्यमवर्गाच्या पगाराचे आकडे फुगत गेले तर दुसरीकडे त्यांचा खिसा खाली करणारी अनेक उत्पादने बाजारात आली. हा निव्वळ योगायोग नव्हता आणि नाही. या उत्पादनांच्या गुणवैशिष्टय़ांचा मारा टीव्हीवरून आणि इतर ठिकाणांहून होत गेला. आणि मध्यमवर्गीय ग्राहकांनी त्यांचा लाभ घ्यायला सुरुवात केली. 


त्यामुळे दोन गोष्टी घडल्या. एक मध्यमवर्गाचे ‘
लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड’ बदलले आणि या छोटय़ामोठय़ा कंपन्याही बलाढय़ होत गेल्या. उत्पादनांपेक्षा आकर्षक व कल्पक जाहिरात प्रमाण मानली जाऊ लागली. तिला प्रतिसाद मिळू लागला.

या पुस्तकात थम्स अप, कॅडबरी, सफोला, मॅगी, अमूल, लाइफबॉय, टायटन, एशियन पेंट्स, हिरो होंडा, मारुती, फेमिना, एअरटेल अशाच बारा ब्रँडविषयी हळवे यांनी लिहिले आहे. या नावावरून सहज नजर टाकल्यावर पहिल्यांदा काय लक्षात येत असेल तर हे सर्व ब्रँड मध्यमवर्गीय आहेत, हे.


‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ किंवा ‘व्हॉट अॅन आयडिया, सर’ हे साधं वाक्य असत नाही. ती ग्राहकांचा खिसा खाली करणारी यंत्रणा असते. हा सारा प्रवास या पद्धतीने हळवे यांनी सांगितलेला नाही. पण त्यातून हे चित्र स्पष्ट होतं. अॅड स्लोगन, त्यातील सेलिब्रिटी आणि क्रमाने उत्क्रांत होत गेलेले ब्रँड्स यांची सविस्तर माहिती प्रत्येक लेखात वाचायला मिळते. त्याच्या जोडीला भरपूर छायाचित्रांचा केलेला समावेश त्या त्या अॅड कॅम्पेनच्या आपल्या स्मृती चाळवत जातात. उदा. थम्स अप १९७७ साली बाजारात केवळ एक शीतपेय म्हणून दाखल झाले, तेव्हा बाजारातली इतर शीतपेये कोणती होती, त्या वेळची एकंदर बाजारपेठ कशी होती, कोकाकोला कधी आले त्याची आणि थम्स अपची अॅड कॅम्पेन कशी केली गेली, दोघांनी एकमेकांवर कुरघोडी  करायचा कसा प्रयत्न केला, त्यात त्यांना कसे यश आले, त्यातून त्यांची वार्षिक उलाढाल कशी वाढली, असा आलेख काढत हळवे आपली मांडणी करतात.


या प्रत्येक ब्रँडची सुरुवातीची जाहिरात, त्याला मिळालेले यश, मग त्यात ठरावीक टप्प्याने होत गेलेला बदल, त्याचे फायदे यातून या उत्पादनांची आणि त्यांच्या कंपन्यांची व्यूहरचना कळत जाते. 


यातल्या प्रत्येक उत्पादनाच्या कल्पक जाहिरातींसाठी अनेक सर्जनशील मंडळींनी अहोरात्र मेहनत घेतली, वेगवेगळ्या सेलिब्रिटींचा कल्पक वापर केला आणि त्यातून लोकांच्या मानसिकतेवर पकड मिळवली. आपला ब्रँड यशस्वी करताना, त्यासाठी ग्राहकांना खिसा रिकामा करायला लावताना आणि त्यावर मित्रमंडळी, घरीदारी चर्चा करायला लावताना, काय काय आणि कसकसे प्रयत्न केले, याचीही कहाणी उलगडत जाते.


हे पुस्तक लिहिले गेले आहे ते मुख्यत: ब्रँडनिर्मिती करणारे लोक व संस्था, जाहिरात विषयाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, ब्रँड स्ट्रॅटेजी आणि त्याचा अॅक्शन प्लॅन तयार करणारे लोक यांच्यासाठी. पण ब्रँड्सविषयी उत्सुकता वाटणाऱ्या, त्याविषयीचे कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. सातत्याने चैतन्यशील होत गेलेली भारतीय बाजारपेठ, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि त्या पुरवण्यासाठी बाजारात उतरलेली उत्पादने..आणि त्यांनी ही दुनिया आपल्या मुठीत कशी केली, याच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक गोष्टी यातून जाणून घेता येतात.

Darwin's Brands - Anand Halve, SAGE Publication, New Delhi, Paages -168, Price - 395. 

दीर्घकवितेचं ‘पोलिटिकल स्टेटमेंट’!

Published: Loksatta, Sunday, February 24, 2013.
या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. शिवाय कोकणापुरतेच भाष्य नसून व्यापक प्रयत्न आहे.

नव्वदोत्तर काळात लिहू लागलेल्या तरुण कवींमध्ये अजय कांडर हे एक लक्षणीय नाव आहे. कोकणासारख्या निसर्गसमृद्ध प्रदेशात वास्तव्याला असलेल्या कांडर यांचं आपल्या तांबडय़ा मातीशी आणि संस्कृतीशी असलेलं नातं अगदी घट्ट स्वरूपाचं आहे. त्यातूनच त्यांची कविता आकाराला आली आहे. सात वर्षांपूर्वी आलेला त्यांचा ‘आवानओल’ हा पहिला कवितासंग्रह त्यांच्या कवितेतील वेगळेपणाची साक्ष देणारा होता. त्यानंतरही कांडर यांचं कवितालेखन सुरूच होतं. पण या कविता संग्रहरूपात यायला मात्र बराच काळ जावा लागला. अलीकडेच त्यांचा नवा संग्रह ‘हत्ती इलो’ प्रकाशित झाला आहे. ही एक दीर्घकविता आहे. अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दीर्घकविता प्रकाराला नव्वदोत्तर  काळातील काही कवींनी पुन्हा हात घातला आहे. छंदाकडून मुक्तछंदाकडे आणि मुक्तछंदाकडून पुन्हा दीर्घकवितेकडचा हा प्रवास नव्वदोत्तर कवींचा एक विशेष म्हणून सांगता येण्यासारखा आहे. कविता ही मुळातच एक सर्जनात्मक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती कधी कुठले रूप घेऊन जन्माला येईल, याबाबत बऱ्याचदा स्वत: कवीलाही सांगता येत नाही. आणि कवितेचा प्रकार कुठला आहे, यापेक्षा ती कोणत्या प्रकारे अभिव्यक्त होते, हे जास्त महत्त्वाचे ठरते.


कवी आपल्या भोवतालातूनच घटना निवडून कविता लिहीत असतो. पाहणे, ऐकणे, बोलणे आणि वाचणे या प्रक्रियेतून त्याच्या हाताशी समाजव्यवहारातल्या काही घटनांचे धागेदोरे लागत असतात. त्यामुळे तेथील कला, संस्कृती, रूढी-परंपरा, लोककथा, लोकसंगीत, आख्यायिका, मौखिक-अमौखिक इतिहास यांचा तपशील त्याच्या लेखनातून येत राहतो. त्यातूनच त्याची अभिव्यक्ती आविष्कृत होते. कांडरही याला अपवाद नाहीत. ‘हत्ती इलो’ ही त्यांची दीर्घकविता याचेच उदाहरण म्हणून सांगता येईल. 


खेडी आणि शहरे यांतील व्यस्त होत चाललेले जगणे, शहरांची होणारी भरभराट आणि खेडय़ांची ‘जैसे थे’ स्थिती यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातून ग्रामीण जगण्याची फरपट अधिकाधिक दयनीय होत आहे. विकास आणि सामान्यजनांचे जीवन हे बऱ्याचदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत असल्याचे सांगितले जाते. किंबहुना, जनजीवन न विस्कटता विकासाला गती देता येऊ शकते, याचा फारसा विचार राजकीय पातळीवर होत नसल्याने खेडय़ांच्या नशिबाचे भोग वाढत चालले आहेत, अशी मांडणी पुन:पुन्हा केली जाते आहे. या सर्वामुळे लोकजीवनच नष्ट होत असल्याचा तीव्र सल अजय कांडर यांनी या दीर्घकवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना, तोच या कवितेचा प्रधान विशेष आहे. हे सर्व ज्या राजकीय धोरणांमुळे होत आहे असे त्यांना वाटते, त्यावरही कांडर थेट भाष्य करण्याचा प्रयत्न या दीर्घकाव्यात करतात. 


मध्यंतरी दक्षिण कोकणातील काही भागांत हत्तींच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले होते. रात्री-अपरात्री शेतांत घुसून हत्तींनी पिकांच्या भयंकर नासधूस केली होती. या हत्तीलाच रूपक बनवून कांडर यांनी आपल्या कवितेत आणले आहे. हत्तीसारखे बलदंड रूपक वापरल्याने साहजिकच राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक- पर्यावरणीय बाजूही अपरिहार्य ठरतात. त्यामुळे कांडर कवितेतून तिकडेही वळतात.


कांडर यांनी या कवितेची निर्मितीप्रेरणा सांगितली आहे ती काहीशी मजेशीर आहे. प्रयोगशील रंगकर्मी अतुल पेठे कणकवलीमध्ये नाटक बसवण्यासाठी गेले असता त्यांनी कांडर यांना कोकणाच्या बदलत्या राजकीय-सामाजिक पाश्र्वभूमीवर नाटक लिहायला सांगितले. पण मूळ प्रकृती कवीची असलेल्या कांडर यांच्याकडे नाटय़धर्माची नव्हे, तर नाटय़प्रेमाची जोड होती. ते चिंतनाला प्रवृत्त झाले आणि त्यातून  नाटक तयार होण्याऐवजी ही दीर्घकविता आकाराला आली. कवी कविता जगतो असं म्हणतात, पण तो कायम कवितेच्या अंगानेच भोवतालाकडे पाहतो. त्यामुळे त्याची परिणती काव्यरूप घेऊनच जन्माला येते. 


कांडर हे पेशाने पत्रकार आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात कोकणातल्या बदलत्या राजकारणाशी त्यांचा या ना त्या कारणाने नित्य संबंध येतो. एरवी शांत असणाऱ्या आणि शांतपणे जगणाऱ्या कोकणवासीयांच्या आयुष्यात या बदलत्या राजकारणाने उलथापालथ घडवायला सुरुवात केली आहे, माणसा-माणसांमध्ये वितुष्ट निर्माण केले जात आहे, असा कांडर यांचा अनुभव आहे. म्हणूनच ते लिहितात, ‘माणूस माणसापासून पारखा झालाच, परंतु कधी नव्हे एवढी राडा संस्कृती इथे बळावली. दर निवडणुकीच्या वेळी माणसाचाच बळी दिला जाऊ लागला.’ पुढे ते म्हणतात, याला कुठलाही एक पक्ष कारणीभूत नसून सर्वच पक्ष जबाबदार आहेत. या राजकारणामुळे कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागाची मन:शांती ढळू लागली आहे. माणसंच माणसांच्या विरोधात उभी ठाकत आहेत. त्यातून कांडर यांना ‘हत्ती’ हे रूपक सुचले; जे एकाच वेळी व्यक्ती, समाज आणि व्यवस्था यांचे प्रतिनिधित्व करते. हत्तींनी कोकणात उपद्रव द्यायला सुरुवात केली तेव्हाच त्याला काहीही इजा न करता त्यांचं संरक्षण करण्यासाठीही काही लोक पुढे सरसावले. ते म्हणजे तथाकथित पर्यावरणवादी. भ्रष्टाचार करणाऱ्याच्याच पाठीशी उभे राहावे तसा हा प्रकार कांडर यांना वाटला आणि या दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्यही त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी शोषण करणाऱ्या हत्तीलाच पोसायला निघालेल्या वृत्तीचा माग घेण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. 


या दीर्घकवितेत कोकणातील राजकीय-सामाजिक संघर्ष आहे, जनजीवन आहे, मालवणी बोलीच्या अक्कडबाज आणि ठाशीव शब्दांची पखरण आहे. कविता दीर्घ असल्याने तिला आख्यानाची गती आहे. त्यात उपहास, उपरोध, राग, संताप आहे. तिला लोककथेचाही बाज आहे. आणि विशेष म्हणजे कांडर कोकणापुरतेच भाष्य करत नसून त्याहून व्यापक विधाने करायचाही प्रयत्न करतात. 
संग्रहाच्या सुरुवातीला कांडर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे सविस्तर निवेदन लिहिले आहे. त्याला त्यांनी ‘राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अध:पतन’ असे शीर्षक दिले आहे. म्हणजे या दीर्घकवितेच्या माध्यमातून कांडर ‘पोलिटिकल स्टेटमेंट’ करून पाहत आहेत. अशी ‘स्टेटमेंट्स’ करू पाहण्याचं धाडस नव्वदोत्तरीतले बरेच कवी करत आहेत. पण ते करण्याआधी आणि केल्यानंतर त्याचा अनुक्रमे पूर्वविचार आणि उत्तरविचार मात्र फारसा केला जात नाही असे दिसते. निदान त्याची ग्वाही तरी संबंधित लेखनातून मिळत नाही. सर्जनशील साहित्यातून फार ठाम विधाने करता येत नसतात, पण अलीकडच्या काळात सर्जनशील साहित्याच्या माध्यमातून ठाम विधाने करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण साहित्यिकांनी यात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते. 


कवितेचा योग्य आणि सर्वमान्य होईल असा अन्वयार्थ लावणे ही तशी कठीणच गोष्ट असते. कारण खुद्द कवीला त्याच्या कवितेतून अभिप्रेत असलेला अर्थ, त्याचा इतरांनी लावलेला अन्वयार्थ आणि खुद्द कवीला जे सांगायचे आहे ते त्याने नेमक्या शब्दांतून मांडलेले असणे- या तिन्हींची सांगड घालता येत नाही. ही दीर्घकविताही त्याला अपवाद नाही. पण हत्ती या भारतीय संस्कृतीत आदरणीय मानल्या गेलेल्या प्राण्याची नव्या रूपकात मांडणी करणारी ही कविता वाचनीय मात्र नक्कीच आहे एवढे खात्रीने म्हणता येईल.
‘हत्ती इलो’ - अजय कांडर, शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृष्ठे - ७१, मूल्य- १०० रुपये.

Tuesday, August 20, 2013

आगरकरांचा वारसदार

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून ही नोंद करायला उशीर होत आहे.  दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरु झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्ष मागे नेऊन ठेवले.  दाभोलकर यांच्या हत्त्येने कोणा एका समाजाचे नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती. 

देवावर दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक  आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेने दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खर तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

दाभोलकर यांच्या हत्त्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण ऑरवेलने म्हटले आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मुर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मुर्ख बनवता येत नाही.       
  

26 aug
दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फारतर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी कालच्या लोकसत्ता मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वाश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वात जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरु होते. 

दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

....

दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबणार नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.  दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.   

Tuesday, August 13, 2013

गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट

Published in LOksatta : Saturday, August 10, 2013

कवी, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक, अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या गुलज़ार यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आणि ही गोष्ट ज्याला कळते त्याला गुलज़ारांच्या लेखणीच्या गुणवत्तेविषयीही सांगण्याची गरज नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळी.
तेव्हा थेट सुरुवात करू. गुलज़ार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचे हे पुस्तक, ‘बोस्कीज पंचतंत्र’. खरं तर हे विधान थोडं दुरुस्त करून असं म्हणावं लागेल की, गुलज़ारांची एकुलती एक मुलगी, मेघना हिच्यासाठी त्यांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना दिलेलं हे नवं रूप आहे. मेघनाला गुलज़ारांनी लाडानं ‘बोस्की’ असं नाव ठेवलं, कारण तिचा पहिला स्पर्श मुलायम वस्त्रासारखा होता. आपल्या मुलांना कुणी वस्त्राचं नाव ठेवत नाही, पण गुलज़ारांसारख्या अलवार प्रतिभेच्या कवीनं ठेवलं!
बोस्की लहान असताना तिची आई, प्रसिद्ध अभिनेत्री राखी, तिला बंगाली बडबडगीते म्हणून दाखवत असे. आईची गीतं संपल्यावर बाबाची पाळी आली. बोस्कीला गोष्टी हव्या असत. गुलज़ार नवनव्या गोष्टी बनवून तिला सांगत, पण रोज मुलीला नवी गोष्ट देणार कुठून?  मग गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना नवं रूप देऊन त्या सांगायला सुरुवात केली. म्हणजे गोष्टी पंचतंत्रातल्या पण गुलज़ारांनी सांगितलेल्या. त्यामुळे त्या काव्यमय झाल्या. मोठय़ाने वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा आनंदही घेता येऊ लागला. शिवाय त्यात आजच्या काळानुसार बदल केल्याने त्यांची खुमारीही वाढली. म्हणून हे गुलज़ारनिर्मित बोस्कीसाठीचं पंचतंत्र आहे. म्हणजे लहानग्यांसाठीचं.
आचार्य विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या गोष्टी ‘पंचतंत्र’ या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टींचे पाच आहेत, म्हणून त्यांना ‘पंचतंत्र’ असे म्हटले जाते. एका राजाची तिन्ही मुलं आळशी असतात. नादान आणि बेजबाबदार मुलांमुळे राजा चिंतेत असतो. एके दिवशी राजाकडे विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण जातो. तो या तीन मुलांना सुधारण्यासाठी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याच या गोष्टी.
भारतीय साहित्यातील नीतिकथा या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या आहेत. त्यात पंचतंत्राचा समावेश केला जातो. अकराव्या शतकापर्यंत पंचतंत्र पाश्चात्त्य जगात पोहोचले. तिथेही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती आजही टिकून आहे. मठ्ठपणा आणि हुशारी, खोडकरपणा आणि शहाणपण, चातुर्य आणि कपट या मानवी नीतिमूल्यांची ओळख प्राण्यांच्या पात्रांद्वारे करून देण्याची कल्पकता अभिनव म्हणावी अशी आहे.
मानवी वृत्ती-प्रवृत्तींचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या पंचतंत्राच्या गोष्टी मुख्यत: मुलांसाठी लिहिलेल्या असल्या तरी त्या सर्व वयोगटातल्यांना आवडतात. बोलणारे प्राणी आणि लहान्यांची मोठय़ांवर मात, हा मुलांच्या जास्त कुतूहलाचा आणि आवडीचा विषय असल्यामुळे, त्यांना त्या जास्त आवडतात एवढंच.
पंचतंत्रातल्या गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हापासूनच म्हणजे तिसऱ्या शतकापासूनच समकालीन आणि सार्वकालिक ठरत आल्या आहेत. आजही त्या तितक्याच आवडीने वाचल्या जातात. मूळ गोष्टींमध्ये नंतरच्या काळात अनेकांनी आपापल्या परीने भर घातली. आता गुलज़ार यांनी त्याच कथा आपल्या प्रतिभेने नव्याने लिहिल्या आहेत. हा या गोष्टींचा गुलज़ारकृत नवा अवतार नितांतसुंदर आणि मनोरम आहे.
गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या निवडलेल्या गोष्टी आणि त्यांना चढवलेला साज, यामुळे हे पुस्तक वाचणं, पाहणं, चाळणं आणि इतरांना वाचून दाखवणं या सर्वच दृष्टींनी उत्तम म्हणावं असं झालं आहे.
या पुस्तकात एकंदर तेरा गोष्टी आहेत. उंदराशी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देणारा बाप, बलाढय़ सिंहाला फसवणारा चिमुकला उंदीर, पाहुण्यांचा कडकडून चावा घेणारा डास, गायचं न थांबणारं गाढव, स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणारं मुंगूस, हलव्याचं भाडं मिळाल्यावर स्वप्नरंजनात अडकलेला मूर्ख पंडित.. खरं तर या पुस्तकातल्या सर्वच गोष्टी अनेकांना ऐकून, वाचून माहीत असतीलच. पण त्या पुन्हा वाचायला, वाचून दाखवायलाही आवडतील, कारण पुन:पुन्हा वाचाव्या अशाच त्या आहेत.
या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही गमतीशीर आहे. गुलज़ारांनी हे पुस्तक त्यांच्या सूर, ताल आणि लय यांना अर्पण केले आहे. सूर म्हणजे त्यांचा नातू समय, ताल म्हणजे जावई गोविंद आणि लय म्हणजे मुलगी बोस्की (मेघना). तुम्हीही तुमच्या मुलांना, नातवंडांना या गोष्टी वाचवून दाखवू शकता. आणि गाऊनसुद्धा! हो, गाऊनच. कारण या गोष्टी काव्यमय आहेत. गाणं गुणगुणावं तशा या गुणगुणता येतात. लयीत वाचता येतात आणि त्यांच्याशी तालही मिळवता येतो.
रोहिणी चौधरी यांनी या मूळ हिंदीतल्या गोष्टींचा सुरेख इंग्रजी अनुवाद केला आहे, तर राजीव इपे यांनी त्यांना साजेशी चित्रं काढून त्यांच्या देखणेपणात भर घातली आहे.
अरेबियन नाइट्सबाबत अनेक वर्षे गैरसमज होता की, त्या लहान मुलांच्या गोष्टी नाहीत. त्या फार अश्लील आहेत वगैरे वगैरे. तशाच काहीसा गैरसमज पंचतंत्राविषयीही आहे की, या फक्त मुलांच्या गोष्टी आहेत. कुठलेही अभिजात पुस्तक हे फक्त अमुकांसाठी असे नसते, ते सर्वासाठी असते. पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून मुलांना आनंद मिळतो, तर मोठय़ांना त्यातून शहाणपण मिळते आणि जगण्याचं इंगित नीट समजूनही घेता येतं. गुलज़ारांच्या लेखणीतून उतरलेल्या या पंचतंत्रीय गोष्टीही त्याला अपवाद नाहीत. त्यांचं पुनर्वाचन सर्वासाठी आनंददायी ठरेल, यात शंका नाही.

बोस्कीज पंचतंत्र : गुलज़ार,
प्रकाशक : रुपा-रेड टर्टल, नवी दिल्ली,
पाने : १०७, किंमत : १९५ रुपये.

Thursday, August 1, 2013

निरलस वैयाकरणी

(कृष्ण श्री. अर्जुनवाडकर-31 Oct. 1926-30 July 2013)

संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण, शुद्धलेखन अशा विषयांचा साक्षेपाने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा विद्वान कधीच लोकप्रिय असत नाही आणि अलीकडच्या महाराष्ट्रात तर अशा विद्वानांची महत्ता कळण्याचीही सोय नाही. त्यामुळे कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांचीही पाटी कोरी असण्याचाच संभव अधिक. 'मराठी-घटना, रचना, परंपरा'; 'अर्धमागधी- घटना, रचना, परंपरा'; 'मम्मटभटकृत काव्यप्रकाश'; मोरो केशव दामले यांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चे संपादन, 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद', 'मराठी व्याकरणाचा इतिहास' असे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे अर्जुनवाडकर हे आयुष्यभर 'एकला चलो रे' या न्यायाने आपल्या संशोधनकार्यात मग्न राहिले. त्या न्यायाने भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर, भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे हेही त्यांच्या विद्वत्कुळातले. 'शास्त्रीय मराठी व्याकरण' या १९११ साली प्रकाशित झालेल्या दामले यांच्या ग्रंथाची अर्जुनवाडकर यांनी १९७० साली विस्तृत संदर्भटिपांसह नवी आवृत्ती संपादित केली. तिचा 'संपादनाचा आदर्श' या शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता. व्याकरण हे भाषेचे शास्त्र असते, म्हणून त्याचा शास्त्रीय पद्धतीनेच विचार करायचा असतो. त्यामुळे त्यांनी इंग्रजी व संस्कृत व्याकरणाच्या बेडय़ा पायात अडकवलेल्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना त्याकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी दिली. त्यासाठी 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद' हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी व्याकरणाची शास्त्रीय मांडणी केली. अर्जुनवाडकर यांचे व्यक्तिमत्त्व निरलस आणि सालस होते. नवनव्या गोष्टी शिकण्याची त्यांना हौस होती. संगणकावर मजकूर जुळणीला सुरुवात झाल्यावर त्यांनी ते तंत्र केवळ आत्मसातच केले नाही तर आपल्याला सोयीस्कर असे फाँटही बनवून घेतले. काही काळ त्यांनी छायाचित्रणाचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर प्रकाशचित्रणाचा छंदही जोपासला. स्वा. वि. दा. सावरकर यांचे डावीकडे चेहरा करून विचारमग्न मुद्रा असलेले जे प्रकाशचित्र अनेक ठिकाणी वापरले जाते, ते अर्जुनवाडकरांनी टिपले होते! देशविदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक, अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत, योग, उपनिषदे, रससिद्धान्त या विषयांवर व्याख्याने दिली. संस्कृतमध्ये काव्य, विडंबन काव्ये लिहिली. पण त्यांच्या अपरिमित कष्टांची आणि बहुमोल कामाची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. पुण्यात राहून आयुष्यभर संशोधनात गढून गेलेला, शास्त्राभ्यासाच्या धुंदीत रमून गेलेला आणि अखंड संशोधनात बुडून गेलेला एक विद्वान वैयाकरणी आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. ज्यांना व्याकरणाचे महत्त्व मान्य नाही, त्यांना व्याकरणाचा शास्त्रीय अभ्यास वा त्याचा इतिहास जाणून घेण्यात कितीसा रस असणार? मराठीच्या प्राध्यापकांना अर्जुनवाडकर यांचे नाव माहीत असेल की नाही याचीही शंकाच आहे. रॉबर्ट ब्राउनिंग या ब्रिटिश कवीने त्याच्या देशातल्या वैयाकरणीच्या निधनावर 'अ ग्रॅमेरियन्स फ्युनरल' नावाने कविता लिहून आदरांजली व्यक्त केली होती, आपण निदान अर्जुनवाडकर नेमके कोण होते, हे तरी जाणून घेणार की नाही?

Monday, July 8, 2013

पुस्तके आणि समृद्धी



''पुस्तके पूर्णपणे वाचून ती वाईट, असे जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा तुमची समृद्धी वाढलेली असते.'' - स्वामी रामानंद तीर्थ 

Sunday, June 23, 2013

उदारमतवादी समीक्षकाच्या गुजगोष्टी

LOKSATTA, Published: Sunday, June 23, 2013


प्रा. रा. ग. जाधव हे साठच्या दशकातले एक मान्यवर समीक्षक. दहा वर्षे एस.टी.त कारकुनी, दहा वर्षे प्राध्यापकी आणि वीस वर्षे मराठी विश्वकोशात मानव्य विद्यांचा प्रमुख संपादक, अशी रा.गं.ची व्यावसायिक कारकीर्द. त्यांनी थोडंफार कवितालेखनही केलं आहे, अलीकडे ललित लेखनही केलं आहे. पण त्यांची मुख्य ओळख आहे ती समीक्षक म्हणूनच. मराठी साहित्य-समीक्षेच्या क्षेत्रात त्यांचा अतिशय आदरपूर्वक आणि कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या रा. गं.च्या निवडक लेखाचे हे पुस्तक, 'संध्यासमयीच्या गुजगोष्टी'. त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आणि सूचक आहे. रा. ग. हे वृत्तीने समीक्षक आहेत आणि स्वभावाने निरागस. त्यामुळे त्यांच्या लेखनात आणि जगण्यात एक अलवार हळुवारपण असते. याचा अर्थ असा नव्हे की, त्यात ठामपणा नसतो. तो तर असतोच. पण सर्जनशील साहित्याविषयी एका मर्यादेनंतर फार ठाम विधानं करता येत नाहीत, याची स्पष्ट जाणीव असते. आणि रा. ग. पुस्तकाला एक सेंद्रिय कलाकृती मानतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे 'साहित्याचे परिस्थितीविज्ञान' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. वय वर्षे ऐंशीच्या सांजपर्वात त्यांची लेखणी धीम्या गतीने चालूच आहे, नव्हे ती नवा काहीतरी विचार मांडू पाहते आहे, याची चुणूक त्यांनी 'इकॉलॉजी ऑफ लिटरेचर' ही संकल्पना मांडून दाखवली आहे. त्याची मराठी साहित्यविश्व कितपत दखल घेईल माहीत नाही. रा. गं.नाही त्याची खात्री नाहीच. माझे पुस्तक कोणी वाचणार नाही, असे त्यांनाही वाटते. असो.

प्रस्तुत पुस्तक मात्र रा. गं.च्या इतर पुस्तकांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. यात साहित्यविषयक लेख आहेत, पण हे रूढार्थाने समीक्षेचे पुस्तक नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर या गुजगोष्टी आहेत. मुख्य म्हणजे त्या सांजपर्वातील आहेत. म्हातारपण हे दुसरे बालपण असते, असे गमतीने(च) म्हटले जाते. पण रा. गं.बाबत ते गमतीने म्हणण्याचीही सोय नाही. कारण ते म्हणतात, ''सांजपर्व माणसाला मीविषयी बोलायला प्रवृत्त करते, खरे तर संधीच देते. पूर्वी हिरीरीने मांडलेल्या विचारांना परिपक्व सहिष्णुता देते. स्वत:कडे व स्वत:च्या सर्व पूर्ण संचिताकडे हळुवार तटस्थपणे पाहण्याची दृष्टी देते. सांजपर्वाच्या छायेत म्हणून संकीर्णतेचे रंगरूप ल्यालेल्या गुजगोष्टी सुचू लागतात.''


थोडक्यात सांजपर्व हे स्वत:कडेच नव्याने पाहायला लावणारे, स्वत:चा शोध घ्यायला लावणारे वय असते. त्यात रा. ग. समीक्षक. त्यामुळे ते स्वत:कडेही समीक्षकाच्याच नजरेतून पाहतात, आणि स्वत:ला अजिबात झुकते माप देत नाहीत.  'उदारमतवादी समीक्षक' अशी रा. गं.ची मराठी साहित्यविश्वात ओळख असली तरी ते स्वत:बाबत मात्र तितकेसे उदार नाहीत, असे दिसते. यातले काही लेख इतर लेखकांविषयीही लिहिलेले आहेत. त्यांना आदरांजली म्हणून किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. त्या सर्वामध्ये मननीयता आणि सात्त्विक स्वीकारशीलता आहे. हळुवार परिपक्वता या पुस्तकातील सर्वच लेखांमधून जाणवते.


या पुस्तकात एकंदर अठ्ठावीस लेख असून ते चार भागांत विभागले आहेत. पहिल्या विभागातील नऊ लेख हे स्वत:विषयी आहेत. त्यातून रा. गं.च्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू जाणून घेता येतील. एरवी कमालीचे संकोची, भिडस्त असणाऱ्या रा. गं.नी या विभागात स्वत:च्या मनीचे काही गुज सांगितले आहे. पण तरीही ते लिहितात, 'काही जण मला आत्मचरित्र लिहायचा आग्रह करतात. आत्मचरित्र म्हणजे सत्याचे प्रयोग. आहे का धाडस? मग कशाला लिहा? त्या वाटेनं मी जाणार नाही. आत्मप्रौढी करण्यासाठी आत्मचरित्र लिहू नये.'


'सध्या थोर लेखकांची अनुपस्थिती आहे, आव्हानात्मक साहित्यकृतीही निर्माण होत नाहीत, प्रयोगशीलताही कमीच दिसते. या अंधाऱ्या पोकळीत समीक्षेचे अभ्यासकच प्रकाशाचे दीप उजळतील, असे मला वाटते.' असा विश्वास रा. ग. दाखवतात. 'दलित लेखकांनी गांधीजींचं 'माय एक्स्परिमेंट विथ ट्रथ' वाचावं..मराठीखेरीज अन्य भारतीय भाषांतील दलित वाङ्मयात आयडियॉलॉजी कमी आणि वाङ्मय अधिक आहे. आपल्याकडे उलट आहे.', 'मनमोहन आणि ग्रेस यांच्या कवितेत फँटसी आणि इमॅजिनेशनचा संगम आहे', 'प्रत्यक्ष जगण्याच्या परीक्षेत बहुतेक लोक नापासाच! कारण जगातील सर्वात अप्रिय सत्य हे 'मी'विषयीच असते' असे काही चांगले तुकडे वा ओळी या पुस्तकातील लेखांत सापडतात. आणि त्या आपल्याला थोडय़ाशा चमकावून जातात. रा. गं.नी त्या फार साधेपणाने सांगितल्या आहेत, पण त्या तशा नाहीत.


दुसऱ्या विभागात साहित्यसंस्कृती, भाषा, साहित्य संमेलनाचे औचित्य, साहित्यातील बाप, लेखक-वाचक यांच्यातील अंतर, परिभाषा, सार्वजनिक ग्रंथालय, प्रादेशिक साहित्य या विषयांवरील एकंदर नऊ लेख आहेत. तिसऱ्या विभागातील 'बन्सीधर, तू आता कुठे रे जाशील?' आणि 'अद्भुताचे ब्रह्मांड' हे दोन्ही लेख, एकंदर जीवनाविषयी रा. गं.ना काय वाटतं, याविषयी आहेत. मात्र जीवनाकडे पाहण्याची रा. गं.ची या दोन्ही लेखांतील दृष्टी ही समीक्षकाची नसून ललित लेखकाची आहे. चौथ्या विभागातील आठही लेख तसे पाहिले तर समीक्षकीय दृष्टीचे, पण टिपणवजा आहेत. त्यातून फारसं काही नवीन हाती लागत नाही. पण तरीही काही निरीक्षणे, मुद्दे जाणून घेता येतातच. 'श्यामची आई', 'स्वामी', 'कोसला' या तीन कादंबऱ्या, नारायण सुर्वे, जी. ए. कुलकर्णी, वसंत आबाजी डहाके यांच्यावरील लेख हे प्रासंगिक असले तरी त्यातून रा. ग. 'कसं पाहतात?' हे जाणून घेता येतं. पण या लेखांची लांबी-रुंदी छोटी असल्याने त्यातून त्यांनी फार मोठा व्यूह मांडलेला नाही. 'आधुनिक मराठी विनोद-परंपरा'हा शेवटचा लेख मराठीतील विनोदी लेखनाचा धावता आढावा घेणारा आहे. 


दोनेक वर्षांपूर्वी ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर यांचे 'ओथांबे' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. (ओथांबे म्हणजे ओथंबून आलेले दवबिंदू) केळेकर यांचे विविध विषयांवरील विचार त्यात एकत्र केले आहेत. रा. गं.चे हे पुस्तक काही तसे नाही. 'माझे चिंतन' हे त्यांचे पुस्तक त्यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने प्रकाशित झाले आहे, त्यातून त्यांच्या विचारांचा गाभा चांगल्या प्रकारे समजावून घेता येतो. त्या तुलनेत प्रस्तुत पुस्तकात चिंतन फारसं नाही, पण मननीयता आणि एकंदरच जगणं, मराठी साहित्य याविषयीची स्वीकारशीलता आहे.

 
यातील सर्वच लेख हे आठ-दहा पानांचेच आहेत. शिवाय हे समीक्षक रा. गं.नी गप्पा माराव्या तसं लिहिलेलं 
पुस्तक आहे, हेही वैशिष्टय़च की! त्यामुळे त्यात समीक्षकीय परिभाषा फारशी नाही. अनौपचारिक शैली, साधीसोपी भाषा आणि काहीशी काव्यमय लय, ही काही यातील लेखांची वैशिष्टय़े आहेत. 'खेळीमेळी', 'वासंतिक पर्व' हे रा. गं.चे दोन ललित लेखसंग्रह अनुक्रमे २००८ व २००९ साली प्रकाशित झाले. त्यानंतरचा हा तिसरा. शिवाय सांजपर्वातला. त्यामुळे यातलं मार्दव व लालित्य मनमोकळं आणि दिलखुलास म्हणावं असं आहे. 


एका परीने हे बहुधा रा. गं.चं शेवटचं पुस्तक असण्याची दाट शक्यता आहे. कारण उरलंसुरलं असं या पुस्तकाचं पुस्तक आहे. वय वर्षे ऐंशीमध्येही रा. गं.ना नव्या पुस्तकाचं अप्रूप वाटतं. त्याचा पहिला पहिला नवाकोरा वास सुखावतो. गेली ४०-५० पन्नास वर्षे सातत्याने, निरलस वृत्तीने लेखन करणाऱ्या एका उदारमतवादी समीक्षकाच्या या पुस्तकाचं वाचकांनाही अप्रूप वाटावं आणि त्याच्या वाचनानं तेही सुखावेत. कारण गेली पन्नासहून अधिक वर्षे केवळ मराठी साहित्याचं चिंतन-मनन करणयात घालवलेल्या एका व्रतस्थ समीक्षकाचं हे लेखन आहे. जगाकडे, जीवनाकडे आणि मराठी साहित्याकडे सतत कुतूहलाने पाहात राहिल्याने रा. गं.कडे चार वेगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या आहेत..आणि त्या या पुस्तकात उतरल्या आहेत. त्यातून निदान काही जणांना तरी काही नव्याने सापडू शकेल.


'संध्यासमयीच्या गुजगोष्टी' - प्रा. रा. ग. जाधव, 

साधना प्रकाशन, पुणे, 
पृष्ठे - १७२, मूल्य - १२५ रुपये.

Monday, June 17, 2013

सावध ऐका पुढल्या हाका...

LOKSATTA : Sunday, June 16, 2013


उदारीकरणाच्या गेल्या दोन दशकांमध्ये शेती, सेवा, उद्योग, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमं, चित्रपट, संगीत, साहित्य या क्षेत्रांमध्ये झपाटय़ानं अनेक स्थित्यंतरं झाली. यातल्या काही क्षेत्रांचा तर नव्या तंत्रज्ञानानं अगदी कायापालट करून टाकला आहे. तो केवळ स्तिमित करणारा आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर संगीताचं घेता येईल. एकेकाळी संगीताच्या तबकडय़ा होत्या. मग एल. पी. आल्या. नंतर कॅसेट निघाल्या. त्यानंतर सी.डी.चं आगमन झालं. आणि आता मोबाइल आणि आयपॉड आलेत. यातल्या प्रत्येक नव्या तंत्रानं आधीचं तंत्र मोडीत काढलं. पण या सर्व प्रवासात संगीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदतच झाली. पूर्वी संगीत ऐकण्यावर बऱ्याच मर्यादा होत्या आणि त्यामुळे ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. पण मोबाइल आणि आयपॉड या दोन्हींनी संगीताला फारच सोयीस्कर, सर्वगामी आणि सर्वसंचारी करून टाकलं. त्यामुळे संगीत ही कुठेही, केव्हाही ऐकण्याची गोष्ट झाली. लोकही त्याचा फायदा घेऊ लागले. लोकल, बस, शाळा-कॉलेज, ऑफिस, घरी, प्रवासात, अगदी टॉयलेटमध्ये असतानाही आता संगीत ऐकता येतं. लोक ते ऐकतातही. तंत्रज्ञानानं संगीताच्या बाबतीत ही जी काही उलथापालथ घडवली आहे, ती लोकांच्या संगीताविषयीच्या दबावामुळे घडली नसून त्या- त्या क्षेत्रातल्या शक्यता तपासण्याच्या महत्त्वाकांक्षेतून घडली आहे. या नवनव्या तंत्रांमुळे संगीताची उपयुक्तता वाढली आणि ते सहजसाध्य झालं, म्हणून त्याचा वापर वाढला. असे बदल इतरही काही क्षेत्रांमध्ये होत आहेत. त्यात मराठी प्रकाशन व्यवहाराचाही उल्लेख करावा लागेल. संगीताइतक्या पटीत नाही, पण तशा प्रकारे मराठी पुस्तकांबाबतही स्थित्यंतरं झाली आहेत, होत आहेत.

एकेकाळी पुस्तकं विकत घेणं ही खास मध्यमवर्गाची चैन होती. पण गेल्या वीस वर्षांच्या काळात मध्यमवर्गाचे उच्च, मध्यम आणि निम्न असे तीन वर्ग झाले असून त्यात फार मोठय़ा समाजसमूहाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आता पुस्तक विकत घेण्याविषयीची अनुकूलता कितीतरी पटींनी वाढली आहे. पूर्वी आवडही कमी आणि अनुकूलताही कमी होती. आता सेवासुविधांच्या साधनांमुळे, माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे आणि पैशाच्या खुळखुळण्यामुळे आवड आणि अनुकूलता या दोन्हींबाबत परिस्थिती खूपच सुधारली आहे. साहित्य संमेलनामध्ये तीन दिवसांत होणारी काही कोटींची पुस्तकविक्री, गावोगावी सातत्याने होणारी पुस्तक प्रदर्शने, ५० रुपयांत पुस्तकं मिळताहेत म्हटल्यावर तासन् तास रांगा लावून पुस्तकं विकत घेणारे लोक- ही काही उदाहरणं यासंदर्भात लक्षात घेण्यासारखी आहेत.


कथा-कादंबरी-कविता या सर्जनशील विषयांवरील पुस्तकांची संख्या 'जैसे थे' असताना उपयुक्ततावादी पुस्तकांची संख्या मात्र कमालीची वाढली आहे. त्यांना वाचकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे. पण या पुस्तकांना खुद्द काही प्रकाशकांकडून नाकं मुरडली जातात. वस्तुत: उपयुक्ततावादी पुस्तकं म्हणताना आपल्याला नेमकं काय अभिप्रेत आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. त्यात मानसिक आरोग्य, अध्यात्म, जीवनशैली, स्वास्थ्य, आहार, करिअरविषयक, संभाषणकौशल्य अशा पुस्तकांचा समावेश होईल. पण त्यातच अपारंपरिक प्रकारातल्या पुस्तकांना टाकून चालणार नाही. या प्रकारात खूप वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं प्रकाशित होत आहेत. आयुष्यभर तोंडी तलाकच्या विरोधात काम करणाऱ्या सय्यदभाई यांचे 'दगडावरची पेरणी', विठ्ठल कामत यांचे 'इडली, ऑर्किड आणि मी', शोभा बोंद्रे यांचे 'मुंबईचे डबेवाले', सुनील ठाणेदार यांचे 'ही तो श्रींची इच्छा', रमेश जोशी यांचे 'माझी कॉपरेरेट यात्रा' अशा अनेक पुस्तकांचा उल्लेख करता येईल. राजहंस, मनोविकास यासारख्या प्रकाशन संस्था अपारंपरिक पुस्तकं मोठय़ा प्रमाणावर प्रकाशित करत आहेत. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो आहे. या प्रकारच्या पुस्तकांचं वाढलेलं मार्केट ही खरं तर फार आश्वासक अशी संधी आहे मराठी प्रकाशकांसाठी.


इंटरनेट, ब्लॉग, इंग्रजी वर्तमानपत्रे यांच्यामुळे जगातील बेस्टसेलर आणि गाजलेल्या पुस्तकांची माहिती सहजासहजी वाचकांपर्यंत पोहोचू लागली आहे. त्यातून गाजलेली पुस्तकं, त्यांचे लेखक यांच्याविषयी उत्सुकता निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन आधी मेहता पब्लिशिंग हाऊस आणि नंतर साकेत प्रकाशन यांनी अनुवादित पुस्तकं प्रकाशित करायला सुरुवात केली. मेहताने तर कितीतरी विषयांवरील पुस्तके अनुवादित केली आहेत, करत आहेत. ही सर्व पुस्तकं बेस्टसेलर तरी आहेत किंवा गाजलेली तरी. त्यांच्याविषयी मराठी वाचक आता पुरेसा सजग झाल्यामुळे या पुस्तकांना बाजारात मागणी आहे. 


एकेकाळी वर्षांला किमान हजार-बाराशे पुस्तकं मराठीत प्रकाशित होत. ही संख्या गेल्या वीस वर्षांच्या काळात वाढून आता तीन हजारांच्याही पुढे गेली आहे. म्हणजे दर महिन्याला २५०-३०० नवी पुस्तकं बाजारात येतात. त्यांच्या प्रत्येकी एक हजार प्रती गृहीत धरल्या तर साधारणपणे तीन लाख पुस्तकांच्या प्रती छापल्या जातात. प्रत्येक पुस्तकाची किंमत ढोबळमानाने शंभर रुपये धरली तर किती कोटी रुपयांची उलाढाल होते, याचा अंदाज करता येईल. 


पण तरीही पुस्तकांच्या किमती हा अजूनही कळीचा मुद्दा ठरतो आहे. इंग्रजीमध्ये एकाच पुस्तकाच्या साधारणपणे हार्डबाऊंड आणि पेपरबॅक अशा दोन प्रकारांतल्या आवृत्त्या काढल्या जातात. काही वर्षांपूर्वी आधी फक्त हार्डबाऊंड आवृत्ती प्रकाशित केली जायची. मग त्यानंतर काही महिन्यांनी वा एखाद् दुसऱ्या वर्षांने पेपरबॅक आवृत्ती काढली जायची. आता इंग्रजी प्रकाशक तसे करत नाहीत. ते एकाच वेळी दोन्ही आवृत्त्या बाजारात आणू लागले आहेत. म्हणजे त्या पुस्तकाबद्दलची वाचकांची ओढ तीव्र असतानाच ते बाजारात येते आणि त्याची चांगली विक्री होते. मराठी प्रकाशकांनाही हा पर्याय स्वीकारता येण्यासारखा आहे. मध्यंतरी '५० रुपयांत एक पुस्तक' या योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यावरून याची खात्री पटायला हवी. तसे झाले तर पुस्तकांची विक्री कितीतरी पटींनी वाढेल. 


काळ बदलतो तशी वाचकांची अभिरुची बदलते. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, लेखक, संशोधक, शास्त्रज्ञ अशा बुद्धिजीवी लोकांपुरतीच पुस्तकं ही 'नडीव' गोष्ट होती. आता ती तशी राहिलेली नाही. तिचा परीघ कितीतरी पटींनी विस्तारला आहे. मात्र, त्या आसुसलेल्या, पुस्तकांची वाट पाहणाऱ्या वाचकांपर्यंत पोहोचण्यात मराठी प्रकाशकच कमी पडत आहेत. 


कुठलंही नवं माध्यम आलं की, त्याचे फायदे आणि तोटे सांगणारे लोक पुढे येत असतात. म्हणजे स्वागत करणारे आणि विरोध करणारे. ते मराठी प्रकाशन व्यवहारातही आहेत. ई-बुक रीडरमुळे छापील पुस्तकांचं भवितव्यच धोक्यात येणार असल्याची हाकाटी काहींनी सुरू केली आहे. छपाईचा शोध हा मानवाला लागलेला सर्वात महत्त्वाचा आणि मूलभूत स्वरूपाचा शोध आहे. म्हणजे असं की, छपाईचा शोध विजेच्या शोधासारखा आहे. वीज वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध होईल, तिचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येईल; पण तिला मोडीत काढून नवंच काहीतरी उभं राहणं हे जसं कठीण आहे, तसंच पुस्तक छपाईचंही आहे (सौरऊर्जा, बायोगॅस हे विजेला पर्याय म्हणून शोधले गेले असले तरी त्यामुळे विजेची अपरिहार्यता अजिबात कमी झालेली नाही!). त्यामुळे ई-बुक रीडरमुळे पुस्तकवाचनावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. शिवाय त्यांची संख्या जेमतेम दोन टक्के भरेल इतकीही नाही. पण नको त्या गोष्टीसाठी आरडाओरड करणं ही काही मराठी प्रकाशकांची फॅशन झाली आहे. 


इंटरनेटमुळे बातम्या, छायाचित्रं, लेख, पुस्तकं, कोश सहजासहजी उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे लोकांची माहितीची भूक वाढली आहे. कारण माहिती मिळवणं सोपं झालं. त्यामुळे लोक इंटरनेटवर बऱ्याच गोष्टींसाठी अवलंबून राहू लागले आहेत. त्यातून वाचनाच्या दिशा विस्तारायला मदतच झाली आहे. 


याचं चांगलं प्रत्यंतर येतं ते 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात. महाराष्ट्रभर फिरून पुस्तक प्रदर्शन करणाऱ्या या संस्थेने इंटरनेट आणि इतर ठिकाणांहून माहिती पोहोचून उत्सुकता चाळवलेल्या लोकांना आधी पुस्तकांपर्यंत आणण्याचं काम केलं. मग त्यांच्यापुढे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचे अगणित पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे केवळ पुस्तकं पाहण्यासाठी, कुणाला तरी भेट देण्यासाठी वा मुलांसाठी पुस्तकं विकत घ्यायला येणारा मध्यमवर्ग हळूहळू चाराऐवजी सहा आणि सहाऐवजी दहा पुस्तकं एकाच वेळी विकत घेऊ लागला. 'अक्षरधारा'च्या पुस्तक प्रदर्शनात येणारा बहुतांश ग्राहक हा पुस्तकांविषयी उत्सुकता असणारा, पण वाचनाविषयी तसा अनभिज्ञ असलेला असतो. 
उदारीकरणाचा काळ हा अधिक चांगल्या प्रकारे व्यावसायिकता अंगी बाळगण्याचा काळ आहे. त्या तुलनेत मराठी प्रकाशन व्यवहार मात्र अजून सुशेगात आहे. लेखकाचे मानधन, पुस्तकांची विक्री, जाहिरात, वितरण, प्रसिद्धी यांबाबत ते गाफील म्हणावे इतके मागे तरी आहेत किंवा रडके तरी आहेत. शिवाय जुनी नीतिमूल्यं उराशी कवटाळून बसलेले आहेत. स्वत:हून कुठलाही नवीन बदल स्वीकारायचा नाही; पण इतर कुणी करत असेल तर त्याला मात्र नावं ठेवायची! 


आजचं बदलतं समाजवास्तव टिपणाऱ्या, त्यांना भिडू पाहणाऱ्या विषयांचा शोध घेऊन त्यावर पुस्तकं लिहून देणाऱ्या लेखकांचा शोध घेणं आणि त्यांना लिहितं करण्याची गरज आहे. लेखकानं प्रकाशकाकडे हस्तलिखित आणून देणं आणि प्रकाशकाने ते प्रकाशित करणं, यापेक्षा आता प्रकाशकांनी नव्या विषयांचा आणि नव्या लेखकांचा शोध घेणं गरजेचं झालं आहे. साधना प्रकाशनाला फारसं मनुष्यबळ हाताशी नसताना, कुठलीही यंत्रणा नसताना जे शक्य होत आहे, ते ज्या प्रकारची पुस्तकं प्रकाशित करत आहेत, आणि त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यातून चार गोष्टी व्यावसायिक प्रकाशकांना शिकता येण्यासारख्या आहेत. नक्षलवाद ही आजची अतिशय ज्वलंत राष्ट्रीय समस्या आहे. त्यावरचं मराठीतलं पहिलं पुस्तक साधनानं प्रकाशित केलं. हे इतर कुठल्याही प्रकाशकाला सुचलं नाही. अजूनही या विषयावर मराठीत लेखन होण्याची नितांत गरज आहे. अशीच- बदलता ग्रामीण महाराष्ट्र, बदलती शहरं यांची स्पंदनं टिपणारं, त्यात होणाऱ्या बदलांना गवसणी घालू पाहणारी पुस्तकं येण्याचीही तेवढीच निकड आहे. उदारीकरणाचं समर्थन करणारं, त्याचं स्वागत करणारं लेखन मराठीत कुणीही करताना दिसत नाही. समर्थन न करू दे; पण होत असलेले बदल तरी आपण नीटपणे समजून घेणार आणि समजावून देणार आहोत की नाही, याचा मराठी प्रकाशकांनी गांभीर्याने विचार करायची गरज आहे.

  
थोडक्यात, उदारीकरणाच्या काळाने मराठी प्रकाशन व्यवहारात अनेक संधी निर्माण केल्या आहेत, तशी काही आव्हानेही उभी केली आहेत. या संधीचा मराठी प्रकाशक जितक्या चांगल्या प्रकारे लाभ उठवतील आणि आव्हानांना जेवढय़ा धीराने सामोरे जातील, तेवढं त्यांच्या आणि वाचकांच्याही फायद्याचंच आहे!