Thursday, January 10, 2013

वाचावे असे काही...

सत्यापेक्षा तारतम्यविवेक
एकंदर भारतीय समाज इतिहासाविषयी इतका हळवा आणि भावनाशील असतो की, आपल्याकडे सर्वात जास्त वाद हे इतिहासाच्या बाबतीत होत असावेत. समतोल पद्धतीने, नीरक्षीरविवेकाने आणि सत्यच सांगायचे, पण सभ्य शब्दांत, अशा पद्धतीने इतिहास लिहिणारा कुणी हल्ली फार लोकप्रिय होऊ शकेल का, याविषयी जरा शंकाच वाटते. त्यातही 'आय अ‍ॅम अ हिस्टोरियन हू युजेस द पास्ट टू इल्युमिनेट द प्रेझेंट. आय डोंट गिव्ह सोल्यूशन्स..दॅट्स नॉट माय जॉब' असं स्पष्टपणे सांगणाऱ्या रामचंद्र गुहा यांची 'इतिहासकार' म्हणून असलेली लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आहे. 'इंडिया आफ्टर गांधी' हे गुहा यांचे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास सांगणारे पुस्तक प्रचंड गाजले. त्यानंतर गुहा नवीन काय लिहिताहेत, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. आता नुकताच त्यांचा Patriots and Partisans हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. यामध्ये त्यांनी २००५ ते २०११ या काळात लिहिलेल्या निबंधांचा समावेश आहे. काँग्रेस, हिंदूत्ववादी भाजप, डावे यांच्याविषयीचे निबंध ही गुहा यांच्या उदारमतवादीपणाची साक्ष देणारे आहेत. गांधी-नेहरू हा तर गुहा यांचा फारच हळवा कोपरा आहे, त्यामुळे त्यांच्यावरील लेखाचाही पुस्तकाच्या पहिल्या भागात समावेश आहे. दुसऱ्या भागातील लेख मात्र काहीसे हलकेफुलके आहेत. भारतातील द्वैभाषिक विद्वानांचा ऱ्हास का होतोय याविषयीचा सुंदर लेख आहे. याशिवाय नियतकालिकांचे संपादक, पुस्तक विक्रेते, प्रकाशन संस्था यांच्यावरील लेखांचाही समावेश आहे. वर्तमानकाळाविषयी सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं ही आपली जबाबदारी असते, असं व्हाल्तेअर म्हणतो. रामचंद्र गुहा यांचं प्रस्तुत पुस्तक त्याचा चांगला नमुना आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

एका कादंबरीची क्रांती



चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराच्या 'द पिकविक पेपर्स' या कादंबरीने युरोपातील प्रकाशनव्यवहाराचं स्वरूप पालटून टाकलं! ही कादंबरी मार्च १८३६ ते ऑक्टोबर १९३७ या १९ महिन्यांच्या काळात दर महिन्याला काही प्रकरणं अशी हप्त्याहप्त्यानं प्रकाशित झाली. तशी ती होत असतानाच तिला लंडन आणि त्याबाहेर मोठी प्रसिद्धी मिळू लागली. लोक दर महिन्याची मोठय़ा आतुरतेनं वाट पाहू लागले. त्यात सर्वसामान्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व थरांतील वाचकांचा समावेश होता. तेव्हा ही गोष्ट काहीशी आश्चर्यकारक आणि बरीचशी अद्भुत होती. या कादंबरीचा लेखक डिकन्स हा तेव्हा अवघा २४ वर्षांचा तरुण होता. तोवर त्याचे लंडनविषयीचे केवळ काही लेख प्रकाशित झाले होते. नुकतंच लेटरप्रेसचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. त्याचा फायदा उठवत ही कादंबरीमालिका डिकन्सने लिहायला सुरुवात केली. पिकविक हा या कादंबरीचा नायक. तो पिकविक क्लबचा अध्यक्ष असतो. तो आणि त्याचे इतर तीन साथीदार फिरायला निघतात आणि त्या प्रवासाचा वृतान्त इतर सदस्यांना कळवतात, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. कादंबरीचं मूळ नाव आहे, The Posthumous Papers of the Pickwick Club.. ही कादंबरी नंतर एक-दोन महिन्यांनी म्हणजे १९३७ च्या शेवटी शेवटी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. तोवर युरोपात प्रकाशनव्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं. पुस्तकविक्रेतेच जोडधंडा म्हणून पुस्तकं छापत असत. शिवाय खुद्द लेखकाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या खर्चाचा बराचसा भाग उचलावा लागत असे. पण 'द पिकविक पेपर्स'ला अफाट यश मिळत गेलं. तिचे हप्तेच विक्रमी पद्धतीने विकले गेले आणि पुस्तकही. त्यामुळे पुस्तकांचा स्वतंत्रपणे व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात, हे सिद्ध झालं. प्रकाशन हा जोड व्यवसाय नाही, तो स्वतंत्रच व्यवसाय आहे, याची प्रचीती युरोपला आली आणि नव्या लोकांनी स्वतंत्रपणे प्रकाशनाकडे वळायला सुरुवात झाली. त्यामुळे लेखकाकडून त्याच्याच पुस्तकासाठी पैसे घेण्याची पद्धतही बंद झाली. म्हणजे 'द पिकविक पेपर्स'ने युरोपातल्या प्रकाशनव्यवसायात एकप्रकारे क्रांतीच केली. गतवर्षी डिकन्सची जन्मद्विशताब्दी साजरी झाली आणि आता या कादंबरीला पावणेदोनशे वर्ष झाली आहेत. डिकन्स अजूनही वाचला जातोच आहे..
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

रफी..नाम ही काफ़ी!
वयाच्या एकोणिसाव्या वर्षी लग्न करून इंग्लंडला गेलेली आणि संसार-मुलं यामध्ये रमलेली एखादी व्यक्ती कधीकाळी केवढं धाडस करू शकते, याचं हे पुस्तक एक उदाहरण आहे. यास्मीन रफी ही ती व्यक्ती. यास्मीन सामान्य गृहिणी, तरी चित्रपट पाहणं आणि गाणी ऐकणं हा त्यांचा ध्यास होता. बरं, जुनी हिंदी गाणी ऐकणाऱ्याची लता-रफी या जोडगोळीपासून सुटका नसते. असे हे रफी यास्मीन यांचे सासरे.  यास्मीन मामंजींना 'अब्बा'च म्हणत.  अब्बांच्या गाण्यांनी नेहमीच भुरळ घातली. घरकाम करताना, मुलांचं कौडकौतुक करताना त्यांना पाश्र्वभूमीला अब्बांचा आवाज हवाच असायचा. रफी यांचं त्यांच्या आयुष्यातलं हे स्थान किती उत्कट आणि नादमय आहे, याची गुणगुण या चरित्रातून ऐकायला मिळते. रफी हे भारताचे नवे तानसेन आहेत, असं एकदा विख्यात संगीतकार नौशाद यांनी म्हटलं होतं. रफी यांनी त्यांच्या काळातील एस. डी. बर्मन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ. पी. नय्यर अशा अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. प्रेमगीतं, युगुलगीतं, कव्वाली, गज़्‍ाल, भजन, असे सर्व प्रकारांत त्यांनी गाणी गायली. त्यांना जाऊन आता तीस-बत्तीस र्वष झाली. आता इतक्या वर्षांनंतर यास्मीन या त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे.. तेही अपरिचित -घरगुती पैलूंवर भर देणारं! त्यांनी रफींचं एक व्यक्ती म्हणून रेखाटलेलं चित्र त्यांच्या आवाजासारखंच लोभस आहे. हे पुस्तक मूळ उर्दू- हिंदीत लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकासोबतच त्याचं इंग्रजी रूपांतरही प्रसिद्ध झालं. चरित्रलेखनाच्या फुटपट्टय़ा न लावता, केवळ आठवणी म्हणून हे पुस्तक वाचायचा प्रयत्न केला तर रफींच्या सुरासारखी लय साधता येईल. कारण रफ़ी.. नामही काफ़ी हैं!

No comments:

Post a Comment