Tuesday, August 20, 2013

आगरकरांचा वारसदार

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून ही नोंद करायला उशीर होत आहे.  दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरु झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्ष मागे नेऊन ठेवले.  दाभोलकर यांच्या हत्त्येने कोणा एका समाजाचे नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती. 

देवावर दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक  आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेने दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खर तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

दाभोलकर यांच्या हत्त्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण ऑरवेलने म्हटले आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मुर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मुर्ख बनवता येत नाही.       
  

26 aug
दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फारतर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी कालच्या लोकसत्ता मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वाश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वात जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरु होते. 

दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

....

दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबणार नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.  दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.   

Tuesday, August 13, 2013

गोष्टींच्या गोष्टींची गोष्ट

Published in LOksatta : Saturday, August 10, 2013

कवी, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक, अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या गुलज़ार यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आणि ही गोष्ट ज्याला कळते त्याला गुलज़ारांच्या लेखणीच्या गुणवत्तेविषयीही सांगण्याची गरज नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळी.
तेव्हा थेट सुरुवात करू. गुलज़ार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचे हे पुस्तक, ‘बोस्कीज पंचतंत्र’. खरं तर हे विधान थोडं दुरुस्त करून असं म्हणावं लागेल की, गुलज़ारांची एकुलती एक मुलगी, मेघना हिच्यासाठी त्यांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना दिलेलं हे नवं रूप आहे. मेघनाला गुलज़ारांनी लाडानं ‘बोस्की’ असं नाव ठेवलं, कारण तिचा पहिला स्पर्श मुलायम वस्त्रासारखा होता. आपल्या मुलांना कुणी वस्त्राचं नाव ठेवत नाही, पण गुलज़ारांसारख्या अलवार प्रतिभेच्या कवीनं ठेवलं!
बोस्की लहान असताना तिची आई, प्रसिद्ध अभिनेत्री राखी, तिला बंगाली बडबडगीते म्हणून दाखवत असे. आईची गीतं संपल्यावर बाबाची पाळी आली. बोस्कीला गोष्टी हव्या असत. गुलज़ार नवनव्या गोष्टी बनवून तिला सांगत, पण रोज मुलीला नवी गोष्ट देणार कुठून?  मग गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना नवं रूप देऊन त्या सांगायला सुरुवात केली. म्हणजे गोष्टी पंचतंत्रातल्या पण गुलज़ारांनी सांगितलेल्या. त्यामुळे त्या काव्यमय झाल्या. मोठय़ाने वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा आनंदही घेता येऊ लागला. शिवाय त्यात आजच्या काळानुसार बदल केल्याने त्यांची खुमारीही वाढली. म्हणून हे गुलज़ारनिर्मित बोस्कीसाठीचं पंचतंत्र आहे. म्हणजे लहानग्यांसाठीचं.
आचार्य विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या गोष्टी ‘पंचतंत्र’ या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टींचे पाच आहेत, म्हणून त्यांना ‘पंचतंत्र’ असे म्हटले जाते. एका राजाची तिन्ही मुलं आळशी असतात. नादान आणि बेजबाबदार मुलांमुळे राजा चिंतेत असतो. एके दिवशी राजाकडे विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण जातो. तो या तीन मुलांना सुधारण्यासाठी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याच या गोष्टी.
भारतीय साहित्यातील नीतिकथा या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या आहेत. त्यात पंचतंत्राचा समावेश केला जातो. अकराव्या शतकापर्यंत पंचतंत्र पाश्चात्त्य जगात पोहोचले. तिथेही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती आजही टिकून आहे. मठ्ठपणा आणि हुशारी, खोडकरपणा आणि शहाणपण, चातुर्य आणि कपट या मानवी नीतिमूल्यांची ओळख प्राण्यांच्या पात्रांद्वारे करून देण्याची कल्पकता अभिनव म्हणावी अशी आहे.
मानवी वृत्ती-प्रवृत्तींचं यथार्थ दर्शन घडवणाऱ्या पंचतंत्राच्या गोष्टी मुख्यत: मुलांसाठी लिहिलेल्या असल्या तरी त्या सर्व वयोगटातल्यांना आवडतात. बोलणारे प्राणी आणि लहान्यांची मोठय़ांवर मात, हा मुलांच्या जास्त कुतूहलाचा आणि आवडीचा विषय असल्यामुळे, त्यांना त्या जास्त आवडतात एवढंच.
पंचतंत्रातल्या गोष्टी लिहिल्या गेल्या तेव्हापासूनच म्हणजे तिसऱ्या शतकापासूनच समकालीन आणि सार्वकालिक ठरत आल्या आहेत. आजही त्या तितक्याच आवडीने वाचल्या जातात. मूळ गोष्टींमध्ये नंतरच्या काळात अनेकांनी आपापल्या परीने भर घातली. आता गुलज़ार यांनी त्याच कथा आपल्या प्रतिभेने नव्याने लिहिल्या आहेत. हा या गोष्टींचा गुलज़ारकृत नवा अवतार नितांतसुंदर आणि मनोरम आहे.
गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या निवडलेल्या गोष्टी आणि त्यांना चढवलेला साज, यामुळे हे पुस्तक वाचणं, पाहणं, चाळणं आणि इतरांना वाचून दाखवणं या सर्वच दृष्टींनी उत्तम म्हणावं असं झालं आहे.
या पुस्तकात एकंदर तेरा गोष्टी आहेत. उंदराशी आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देणारा बाप, बलाढय़ सिंहाला फसवणारा चिमुकला उंदीर, पाहुण्यांचा कडकडून चावा घेणारा डास, गायचं न थांबणारं गाढव, स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवणारं मुंगूस, हलव्याचं भाडं मिळाल्यावर स्वप्नरंजनात अडकलेला मूर्ख पंडित.. खरं तर या पुस्तकातल्या सर्वच गोष्टी अनेकांना ऐकून, वाचून माहीत असतीलच. पण त्या पुन्हा वाचायला, वाचून दाखवायलाही आवडतील, कारण पुन:पुन्हा वाचाव्या अशाच त्या आहेत.
या पुस्तकाची अर्पणपत्रिकाही गमतीशीर आहे. गुलज़ारांनी हे पुस्तक त्यांच्या सूर, ताल आणि लय यांना अर्पण केले आहे. सूर म्हणजे त्यांचा नातू समय, ताल म्हणजे जावई गोविंद आणि लय म्हणजे मुलगी बोस्की (मेघना). तुम्हीही तुमच्या मुलांना, नातवंडांना या गोष्टी वाचवून दाखवू शकता. आणि गाऊनसुद्धा! हो, गाऊनच. कारण या गोष्टी काव्यमय आहेत. गाणं गुणगुणावं तशा या गुणगुणता येतात. लयीत वाचता येतात आणि त्यांच्याशी तालही मिळवता येतो.
रोहिणी चौधरी यांनी या मूळ हिंदीतल्या गोष्टींचा सुरेख इंग्रजी अनुवाद केला आहे, तर राजीव इपे यांनी त्यांना साजेशी चित्रं काढून त्यांच्या देखणेपणात भर घातली आहे.
अरेबियन नाइट्सबाबत अनेक वर्षे गैरसमज होता की, त्या लहान मुलांच्या गोष्टी नाहीत. त्या फार अश्लील आहेत वगैरे वगैरे. तशाच काहीसा गैरसमज पंचतंत्राविषयीही आहे की, या फक्त मुलांच्या गोष्टी आहेत. कुठलेही अभिजात पुस्तक हे फक्त अमुकांसाठी असे नसते, ते सर्वासाठी असते. पंचतंत्रातल्या गोष्टी वाचून मुलांना आनंद मिळतो, तर मोठय़ांना त्यातून शहाणपण मिळते आणि जगण्याचं इंगित नीट समजूनही घेता येतं. गुलज़ारांच्या लेखणीतून उतरलेल्या या पंचतंत्रीय गोष्टीही त्याला अपवाद नाहीत. त्यांचं पुनर्वाचन सर्वासाठी आनंददायी ठरेल, यात शंका नाही.

बोस्कीज पंचतंत्र : गुलज़ार,
प्रकाशक : रुपा-रेड टर्टल, नवी दिल्ली,
पाने : १०७, किंमत : १९५ रुपये.

Thursday, August 1, 2013

निरलस वैयाकरणी

(कृष्ण श्री. अर्जुनवाडकर-31 Oct. 1926-30 July 2013)

संस्कृत साहित्य, भारतीय तत्त्वज्ञान, साहित्यशास्त्र, मराठी व्याकरण, शुद्धलेखन अशा विषयांचा साक्षेपाने आणि शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा विद्वान कधीच लोकप्रिय असत नाही आणि अलीकडच्या महाराष्ट्रात तर अशा विद्वानांची महत्ता कळण्याचीही सोय नाही. त्यामुळे कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांच्याविषयी महाराष्ट्रातल्या बुद्धिवंतांचीही पाटी कोरी असण्याचाच संभव अधिक. 'मराठी-घटना, रचना, परंपरा'; 'अर्धमागधी- घटना, रचना, परंपरा'; 'मम्मटभटकृत काव्यप्रकाश'; मोरो केशव दामले यांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चे संपादन, 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद', 'मराठी व्याकरणाचा इतिहास' असे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिणारे अर्जुनवाडकर हे आयुष्यभर 'एकला चलो रे' या न्यायाने आपल्या संशोधनकार्यात मग्न राहिले. त्या न्यायाने भाषाशास्त्रज्ञ डॉ. अशोक केळकर, भाषातज्ज्ञ विश्वनाथ खैरे हेही त्यांच्या विद्वत्कुळातले. 'शास्त्रीय मराठी व्याकरण' या १९११ साली प्रकाशित झालेल्या दामले यांच्या ग्रंथाची अर्जुनवाडकर यांनी १९७० साली विस्तृत संदर्भटिपांसह नवी आवृत्ती संपादित केली. तिचा 'संपादनाचा आदर्श' या शब्दांत अभ्यासकांनी गौरव केला होता. व्याकरण हे भाषेचे शास्त्र असते, म्हणून त्याचा शास्त्रीय पद्धतीनेच विचार करायचा असतो. त्यामुळे त्यांनी इंग्रजी व संस्कृत व्याकरणाच्या बेडय़ा पायात अडकवलेल्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासकांना त्याकडे पाहण्याची शास्त्रीय दृष्टी दिली. त्यासाठी 'मराठी व्याकरण-वाद आणि प्रवाद' हा ग्रंथ लिहून त्यांनी मराठी व्याकरणाची शास्त्रीय मांडणी केली. अर्जुनवाडकर यांचे व्यक्तिमत्त्व निरलस आणि सालस होते. नवनव्या गोष्टी शिकण्याची त्यांना हौस होती. संगणकावर मजकूर जुळणीला सुरुवात झाल्यावर त्यांनी ते तंत्र केवळ आत्मसातच केले नाही तर आपल्याला सोयीस्कर असे फाँटही बनवून घेतले. काही काळ त्यांनी छायाचित्रणाचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर प्रकाशचित्रणाचा छंदही जोपासला. स्वा. वि. दा. सावरकर यांचे डावीकडे चेहरा करून विचारमग्न मुद्रा असलेले जे प्रकाशचित्र अनेक ठिकाणी वापरले जाते, ते अर्जुनवाडकरांनी टिपले होते! देशविदेशातल्या अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक, अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीपासून केंब्रिज विद्यापीठापर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत, योग, उपनिषदे, रससिद्धान्त या विषयांवर व्याख्याने दिली. संस्कृतमध्ये काव्य, विडंबन काव्ये लिहिली. पण त्यांच्या अपरिमित कष्टांची आणि बहुमोल कामाची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. पुण्यात राहून आयुष्यभर संशोधनात गढून गेलेला, शास्त्राभ्यासाच्या धुंदीत रमून गेलेला आणि अखंड संशोधनात बुडून गेलेला एक विद्वान वैयाकरणी आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. ज्यांना व्याकरणाचे महत्त्व मान्य नाही, त्यांना व्याकरणाचा शास्त्रीय अभ्यास वा त्याचा इतिहास जाणून घेण्यात कितीसा रस असणार? मराठीच्या प्राध्यापकांना अर्जुनवाडकर यांचे नाव माहीत असेल की नाही याचीही शंकाच आहे. रॉबर्ट ब्राउनिंग या ब्रिटिश कवीने त्याच्या देशातल्या वैयाकरणीच्या निधनावर 'अ ग्रॅमेरियन्स फ्युनरल' नावाने कविता लिहून आदरांजली व्यक्त केली होती, आपण निदान अर्जुनवाडकर नेमके कोण होते, हे तरी जाणून घेणार की नाही?