Tuesday, August 20, 2013

आगरकरांचा वारसदार

नरेंद्र दाभोलकर यांची आज सकाळी पुण्यात गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली, या धक्यातून बाहेर यायला जर वेळ लागला म्हणून ही नोंद करायला उशीर होत आहे.  दाभोलकरांच्या जाण्याचे भयावह परिणाम महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी-आंदोलने यांच्यावर होणार आहेत. पुरोगामी महाराष्ट्र या एका घटनेने १०० वर्ष मागे गेला आहे. विचारांचा सामना विचारांनी करायचा असतो. लोकशाहीत सतत वाद-संवाद करणारी माणसं असतील तरच लोकशाही अधिकाधिक रुजायला, जीवनप्रणाली म्हणून स्वीकारली जायला मदत होते. कारण आमचे मित्र विनय हर्डीकर म्हणतात त्याप्रमाणे 'शंभरातील एक टक्का लोक विचार करतात, नऊ टक्के लोक आपण विचार करतो असा विचार करतात आणि उरलेले ९० टक्के एक वेळ जीव देतील पण विचार करणार नाहीत, हे लोकशाहीचं दारूण वास्तव असतं. ' त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त ही या एक टक्का लोकांवरच असते. समाजावरील बरे-वाईट परिणाम, रूढ संकेतांना धक्के देणे, नव्या दिशेने, विवेकपूर्ण बुद्धीने विचार करायला लावणे, हे या एक टक्का लोकांचे काम असते. आजघडीला महाराष्ट्रात दाभोलकर यांच्या इतका सहिष्णू, उदारमतवादी आणि बुद्धिनिष्ठ सामाजिक कार्यकर्ता दुसरा दाखवता येत नाही. 'बांधव हो विचारकलहाला का भिता?' या 'सुधारक'कार आगरकर यांची उक्ती प्रमाण मानून महिन्याचे २५-२७ दिवस महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून समाज प्रबोधनाचे काम करत होते. निखळ वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टीकोन बाळगत धार्मिक अनाचार, फाजील कर्मकांडे, बुवाबाजी, जादूटोणा यासारख्या गोष्टींविरोधात रणशिंग फुंकत फिरणारे दाभोलकर अफाट आणि अचाट उर्जेने काम करत. त्यांच्या उत्साहाकडे पाहून आम्हा तरुणांनाही लाज वाटत असे. 'हे सर्व कोठून येते?' हा प्रश्नाचे दाभोलकर यांच्यापुरते असे होते कि, समाज कळकळीची आच असल्यावर हे सर्व होते.   

२००४ साली संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला करून तेथील दुर्मिळ कागदपत्रांची नासधूस केली. या घटनेने महाराष्ट्रातील बुद्धिवंत बुचकळ्यात पडले आणि त्यांनी मराठा समाजाविषयी बोलणेच थांबवले. परिणामी मराठा समाजाची सरंजामी वृत्ती पुन्हा उफाळून आली. राजकीय हेतूंनी प्रेरित असणाऱ्यांनी याचा फायदा उठवत आरक्षण नामक अफूचे गाजर दाखवायला सुरुवात केली. आणि मग आक्रमक मराठ्यांच्या २२ संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या. आणि या संघटनांनी मराठा समाजाला, त्यातही सुशिक्षित तरुणांना मागे खेचायला सुरुवात केली. जातीय विद्वेषाचे विष त्यांच्या मनात पेरायला सुरुवात केली. पण सगळेच संधिसाधू असल्याने त्यांच्यात आता श्रेयाची चढाओढ सुरु झाली आहे. आता या संघटनांचा प्रवास एकमेका नामशेष करू या दिशेने होऊ घातलाय. आणि तसेच होणार होते. यात नुकसान झाले ते सुशिक्षित मराठा तरुणांचे. त्यांना या लोकांनी १०० वर्ष मागे नेऊन ठेवले.  दाभोलकर यांच्या हत्त्येने कोणा एका समाजाचे नुकसान होणार नसून सबंध महाराष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे.  

समाजहितासाठी स्वता:चा स्वार्थ, अहंकार आणि आवडीनिवडी यांना कात्री लावावी लागते. दाभोलकर यांनी समाजहित हेच आपले जीवनकार्य मानले होते. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी स्वताला समाजाबरोबर आणून ठेवावे लागते. तो गुण दाभोलकर यांच्याकडे जन्मजात म्हणावा इतका सहज होता. अतिशय साधी राहणी, कुठलेही व्यसन नाही, बोलण्यात ऋजुता आणि वागण्यात आदाब, ही  त्यांची वैशिष्ट्ये होती. 

देवावर दाभोलकर यांचा विश्वास नव्हता. पण बुवाबाजी आणि कर्मकांड यांना मात्र प्रखर विरोध होता. आणि त्यासाठीचे वैज्ञानिक, तार्किक  आणि बौद्धिक युक्तिवाद त्यांच्याकडे होते. कोणतीही गोष्ट पुराव्याने सिद्ध करता आली पाहिजे आणि बुद्धीच्या कसोटीला उतरली पाहिजे, हा त्यांचा दृष्टीकोन होता. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या जगात हा दृष्टीकोनच सर्वात महत्त्वाचा आहे, या धारणेने दाभोलकर महाराष्ट्रभर अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत होते. अनेक बुवा-बाबांचा त्यांनी भांडाफोड केला, महाराजांना जाहीर चर्चेचे आव्हान देऊन त्यांना निरुत्तर केले आणि लेखन करून समाजप्रबोधन केले. पण त्यांचे हे काम काही सनातनी विचाराच्या मंडळींना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात होत्या. हल्ली भावना ही इतकी उथळ गोष्ट झाली आहे की ती कशाने दुखावेल याचा काही भरवसा राहिला नाही. भावना दुखावल्या म्हणणारी मंडळी खर तर कांगावखोर असतात. आणि त्यांच्या भावना सोयीस्कर असतात. आपली दुकानदारी राजरोसपणे चालू राहावी म्हणून त्यांनी अनेक सोंगे घेतलेली असतात आणि अनेक मतलबी भ्रमही तयार केलेले असतात. अशा लोकांना दाभोलकर यांचे काम पटणे शक्य नव्हतेच. ही मंडळी सतत त्यांच्याविषयी गरळ ओकत असत. पण ती या धराला जातील याची कल्पना कुणी केली नव्हती. 

दाभोलकर यांच्या हत्त्येने या तथाकथित लोकांची भोंदूगिरी निदान काही काळ चालू राहीलही, पण ती सर्व काळ चालू राहील अशा भ्रमात त्यांनी राहता कामा नये. कारण ऑरवेलने म्हटले आहे की, काही लोकांना काही काळ, सर्व लोकांना काही काळ मुर्ख बनवता येते, पण सर्व लोकांना सर्व काळ मुर्ख बनवता येत नाही.       
  

26 aug
दाभोलकर यांची हत्या होऊन आता पाच दिवस होत आलेत. पण अजूनही हल्लेखोरांचा शोध पोलिसांना लागलेला नाही. पोलिसांची अनेक पथके आपआपल्यापरीने शोध घेत आहेत, पण त्यांचा तपास अजून नीट दिशा पकडताना दिसत नाही. तर दुसरीकडे दाभोलकर यांच्यावर कुणी हल्ला केला असावा याचे अनेक तर्क पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोक लावत आहेत. प्रत्येक जन आपल्या कुवतीनुसार अंदाज व्यक्त करतो आहे. तर बुद्धिवंत महाराष्ट्र पुरोगामी कधी होता किंवा आज आहे कि नाही याची चर्चा करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची चर्चा अधूनमधून होतच आली आहे. त्यात नवीन काही नाही. एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक चळवळी, आंदोलने झाली. सामाजिक बदलांसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधन शतक होते. त्या काळातही महाराष्ट्र १०० टक्के पुरोगामी नव्हता, तर पुरोगामित्वाच्या दिशेने वाटचाल करत होता, असे फारतर म्हणता येऊ शकते. विश्वास दांडेकर यांनी कालच्या लोकसत्ता मधील लेखात म्हटले आहे, त्यानुसार पुरोगामी महाराष्ट्र हे मिथक आहे. आणि त्याकडे तसेच पाहायला हवे. 

या मिथकाला अलीकडच्या काळात बराच धक्का लागला आहे. बलात्कार, खून, अराजक सदृश घडामोडी यांची सातत्याने होत असलेली पुनरावृत्ती, या काही कारणामुळे महाराष्ट्राचे पुरोगामित्व पणाला लागले आहे. त्याची दिशा परत योग्य रीतीने जायची असेल तर सामाजिक चळवळी मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला हव्यात. पण गेल्या दोन दशकात तर सामाजिक चळवळी खूपच थंडावल्यात आणि दुसरीकडे अध्यात्माला चांगले दिवस आले आहेत. बुवा, बाबा, महाराज, साधू यांची लोकप्रियता, त्यांची संपत्ती आणि त्यांचे कारनामे यांची रसभरीत वर्णने सतत वाचायला, ऐकायला मिळतात. या दांभिक लोकांचा सुळसुळाट हा निर्बुद्ध समाजाच्या प्रवृतीचे निदर्शक आहे. झटपट श्रीमंती, मनशांती, सुख-समाधान, कुटुंब कलह अशा प्रश्नांची उत्तरं या बुवा, बाबा, महाराज, साधू यांच्याकडे मिळतील या आशेने लोक त्यांच्याकडे जातात, तसा या बुवा, बाबा, महाराज, साधू यांचा दावा असतो. त्याबदल्यात ते या पीडित लोकांचा ब्रेन वाश करून त्यांना आपल्या भजनी लावतात. आणि आपली दुकानदारी चालू करतात. अशा काळात विज्ञानवादी, विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी पद्धतीने जगणे, वागणे, विचार करणे यासाठी काम करणाऱ्या दाभोलकर यांच्यासारख्या व्यक्ती समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, तर हे बुवा, बाबा, महाराज, साधू समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करतात. पण समाजाला श्रेयस-प्रेयस काय याचे तारतम्य नसते. 

तर दुसरीकडे कर्मठ लोक आपल्या संघटना, संस्था चालू करून समाजात अनाचार माजवण्याचा प्रयत्न करतात. अशा आक्रमक आणि जातीयवादी संघटनांची संख्या अलीकडच्या काळात सतत वाढताना दिसते आहे. ब्राम्हण समाज, मराठा समाज आणि दलित समाज या तीन समाजात अशा संघटनांची संख्या सर्वात जास्त दिसते. या संघटना आधुनिक संपर्क साधनांचा वापर करून आपली दांडगटशाही पुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. यामुळे समाज चिकित्सा, समाज बदल, टाकाऊ सामाजिक रूढी या विषयी बोलण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी सामाजिक सहिष्णुता कमी होत चालली आहे, तर आक्रमकता वाढत चालली आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. सामाजिक अनारोग्य वाढत चालले की, समाजाची झपाट्याने घसरण सुरु होते. 

दाभोलकर यांच्यासारख्या लोकशाहीवादी कार्यकर्त्याची हत्त्या ही या चढेल आक्रमकपणातून घडली आहे. आणि प्रशासनाच्या पातळीवरही कार्यक्षमपणे काम करण्याची सवय हरवत चालल्यामुळे गुन्हेगारांचा छडा लावण्याची चुरस दिसत नाही. केवळ वरिष्ठांकडून आदेश आला म्हणून प्राथमिकता पूर्ण केली जाते आहे. यामुळे पोलीस नामक यंत्रणेचा धाक वाटेनासा होतो. आणि दाभोलकर यांच्यासारखे प्रामाणिक लोक गमावण्याची पाळी येते. 

हे असेच चालू राहिले तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असेही म्हणता येत नाही, कारण बिहारमध्येही हल्ली असे भीषण प्रकार घडत नाहीत.          

....

दाभोलकर यांच्या जाण्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे महाराष्ट्रभर पसरलेले काम थांबणार नाही, ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.  दाभोलकर यांनी आपल्या हयातीतच कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार केली आहे आणि ती समर्थपणे आपले काम करत आहे, राहणार आहे. देवा-धर्माच्या नावाने आपल्या तुंबड्या भरणाऱ्या बुवा-बाबांची दुकानदारी उद्धवस्त करण्याचे काम यापुढेही चालू राहणार आहेच. महाराष्ट्र सरकारनेही वटहुकूम काढून जादूटोणा विरोधी कायदा लागू केला आहे. त्याची सरकारकडून नीट अंमलबजावणी झाली तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि एकट्यादुकट्या व्यक्तींची फसवणूक करणाऱ्या बुवा-बाबांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवता येईल.   

No comments:

Post a Comment