Monday, March 24, 2014

गो. पु. देशपांडे यांच्याविषयी..

2 August1938 – 16 October 2013
 गो. पु. यांचे निधन झाल्यावर हा लेख लिहिला होता. तो तेव्हा अप्रकाशित राहिला. आता इथे देतो आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आत्ताआत्तापर्यंत पुण्यातल्या निवडक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसत. त्यामुळे त्यांचं जाणं तसं अनपेक्षितच म्हणायला हवं. २ ऑगस्ट रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होणार होती. पण ते आता होणे नाही. असो. त्यांची महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वर्तुळात ओळख आहे ती, ‘गोपु’ या नावाने तर दिल्लीच्या बुद्धिजीवी वर्तुळात त्यांना ‘जीपीडी’ या नावाने संबोधले जाई.
गोपु मराठीतले एकमेव राजकीय नाटककार होते, याबाबत कुणाचंही दुमत व्हायचं कारण नाही. मराठी नाटकाच्या सीमारेषा कौटुंबिक-सामाजिक या विषयाच्या मर्यादा उल्लंघून पुढे वा आजूबाजूला जाताना फारशा दिसत नाहीत. अशा काहीशा एकारलेल्या परिस्थितीत जाणीवपूर्वक राजकीय नाटक पुढे आणण्याचं काम गोपुंनी केलं. नाटककार म्हटला की, तो प्रमाणापेक्षा जास्त सर्जनशील असायचाच, असा आपल्याकडे परिपाठ असतो. त्यामुळे अशा नाटककारांच्या नाटकामध्ये प्रखर सामाजिक वास्तव असलं तरी त्यात फिक्शनचाच भाग अधिक असतो. शिवाय मराठी नाटककार हे मराठी कथा-कादंबरीकारांसारखेच राजकीय-सामाजिकदृष्ट्या बधिर असतात. त्यांचं या विषयांचं वाचन आणि आकलन फारच वरवरचं असतं. आणि तरीही आपल्याला वाटतं वा दिसतं तेवढंच सत्य असा त्यांचा आविर्भाव असतो. गोपुंच्या नाटकात हे दिसत नाही. त्याचं कारण त्यांची राजकारणाची समज अतिशय चांगली होती. किंवा असं म्हणू या की, इतर मराठी नाटककारांपेक्षा कितीतरी जास्त होती. अनेक वर्षे दिल्लीत राहिल्यामुळे, जवाहरलाल विद्याापीठासारख्या डाव्या विचारसरणीचं प्राबल्य असलेल्या ठिकाणी अध्यापन करत असल्यामुळे त्यांचा राजकारणाचा चांगला परिचय आणि अभ्यास होता.
वर्ग हा गोपुंचा आवडता शब्द. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर, वसंत कानेटकर यांचा कौटुंबिक रोमँटिसिझम आणि विजय तेंडुलकरांचा कौटुंबिक हिंसाचार ही मराठी नाटकातली दोन स्कूल्स. या दोन्हींच्या मध्ये मराठी नाटकांची लांबीरुंदी संपून जाते. या दोन्ही स्कूल्सपेक्षा आणि एकंदरच मराठी नाटकांमध्ये गोपुंची नाटकं त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरतात. कारण ती पूर्णपणे राजकीय नाटकं आहेत. त्याहीपेक्षा विचारसरणीची नाटकं आहेत. गोपुंची वैचारिक बांधीलकी डाव्या विचारसरणीशी होती. डावे लोक आपले तत्त्वज्ञान प्राणपणाने जपायचा प्रयत्न करतात. जगण्यासाठी विचारसरणी ही नितांत निकडीची गोष्ट असते त्यांच्यासाठी. पण मानवी व्यवहार केवळ वैचारिक तर्कप्रामाण्यावर चालत नाही. आणि हेच नेमके डावे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची फरपट होते. अर्थात केवळ आपलीच विचारसरणी प्रमाण मानणाºया आणि तिला चिकटून बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत, ते होतंच. म्हणजे विशिष्ट ध्येयवादातून प्रेरित होऊन काम करणाºयांची शोकांतिका होते. हा विचारव्यूह मांडायचा प्रयत्न गोपुंनी आपल्या नाटकांमधून केला. त्यांचं पहिलं नाटक, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ ते ‘शेवटचा दिस’पर्यंत हेच दिसतं. प्रखर सामाजिक जाणिवांना विचारसरणीची जोड असेल तर माणसांचं काय होतं, हे गोपुंच्या नाटकातून जाणून घेता येतं.
गोपुंच्या आधीही राजकीय विचारसरणीची नाटकं लिहिण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार म. फुले यांनी तो प्रयत्न १८८५ साली ‘तृतीय रत्न’सारखं नाटक लिहून केला होता. पण त्याचे प्रयोगच तेव्हा होऊ शकले नाहीत. १९७२ साली प्रकाशित झालेल्या गोपुंच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या पहिल्याच नाटकाचं दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकानं केलं, तर त्यातील श्रीधर विश्वनाथ ही प्रमुख व्यक्तिरेखा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. तीही ‘हे आपण केलेच पाहिजे’ उत्कट तीव्रतेतून. या नाटकाने त्यांनी चकित केलं होतं.
थोडक्यात, विचारसरणीशी प्रामाणिक बांधीलकी मानून सातत्याने गंभीर राजकीय नाटक लिहिणारे निदान मराठीमध्ये तरी गोपुंशिवाय दुसरं नाव घेता येत नाही. नंतरच्या काळात दलित लेखकांनी सामाजिक जाणीवेची नाटकं लिहिली. पण त्यात विद्रोह आणि चीड यांचं पारडं जास्त भरतं. गोपुंचा भारतीय विचारांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांमध्ये गांभीर्य आणि मोठा विचारव्यूह पाहायला मिळतो.
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’चा त्या काळी खूप गाजावाजा झाला असला तरी त्यांच्या इतर नाटकांचं तसं झालं नाही. खरं तर त्यांची नाटकं दिग्दर्शक आणि प्रेक्षक या दोघांनाही सहजासहजी पेलता येतील, अशीच कधीच नव्हती. नाटक हा गंभीर कलाप्रकार आहे, ही डॉ. लागूंची धारणा असली तरी ती बºयाच मराठी दिग्दर्शकांची आणि प्रेक्षकांची नाही. त्यांच्यासाठी तो व्यवसायाचा आणि करमणुकीचाच भाग आहे. अशा परिस्थितीत गोपुंच्या नाटकाचे प्रयोग होणं शक्य नव्हतंच. पण त्यांनी म. फुले यांच्यावर लिहिलेल्या ‘सत्यशोधक’ या चरित्रनाटकाचे मागील दीड-दोन वर्षांत महाराष्ट्रभर १०० प्रयोग झाले. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी पुणे महानगरपालिकेतील कामगारांना घेऊन हे नाटक केलं. त्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटकही राजकीय नाटकच मानलं जातं. मानलं जायला हवं. कारण सार्वकालीनत्व आणि समकालीनता असल्याशिवाय असं घडू शकत नाही.
गोपु हे वैचारिक शिस्त मानणारे आणि अ‍ॅकॅडेमिक प्रवृत्तीचे अभ्यासक होते. शिवाय लिहिणार ते गंभीर विषयावर. ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या प्रतिष्ठित साप्ताहिकात त्यांनी वीस-पंचवीस वर्षे सदरलेखन केले. मुंबईतून प्रकाशित होणाºया या साप्ताहिकाचा भारतातील बुद्धिजीवींच्यावर्तुळात चांगलाच दबदबा आहे. याशिवाय त्यांनी ‘निबंध’ हा विस्मृतीत जात असलेला वाङ्मयप्रकार टिकून राहावा म्हणून ‘चर्चक निबंध’ हे दोन खंडी पुस्तकही लिहिले. हा त्यांचा अतिशय आवडता साहित्यप्रकार. निबंधातून वैचारिक मांडणी चांगल्या प्रकारे करता येते. विचारांचा व्यापक पट मांडता येतो. पण तसं लेखन मराठीमध्येच होत नसल्याने ‘निबंधा’च्या वाट्याला फारसं कुणी जाताना दिसत नाही. कारण त्यासाठी वैचारिक शिस्त असावी लागते. आणि चांगल्या प्रकारे विचारही करता यावा लागतो. निबंधाच्या -हासाविषयी त्यांना सतत खंत वाटत असे.
गोपु काही विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवणारे नव्हते. पण वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीच्या (१९९८) निमित्ताने दिल्लीत झालेल्या परिसंवादात गोपुंनी त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यावर तेव्हा मोठं वादंग माजलं होतं. गोपुंनी महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा वल्गना खांडेकरप्रेमींनी केल्या होत्या. विचारांच्या लढाया विचारांनीच लढायच्या असतात. त्यात आततायीपणा आणि भाबडेपणा आणायचा नसतो, याचं भान आपल्याला अजूनही फारसं आलेलं नाही. त्यामुळे अशा प्रतिक्रिया दुर्दैवी असल्या तरी अनपेक्षित म्हणता येत नाहीत. पण योग्य वेळी आणि योग्य जागी केलेले औचित्यभंग स्वागतार्हच असतात. मात्र याबाबतीतही आपण निदान साक्षर व्हायलाही तयार नाही. तर ते असो.
गोपुंच्या नाटकांची यथायोग्य समीक्षा गेल्या तीस-चाळीस वर्षांत तरी झाली नाही. कारण त्यांची नाटकं समजण्याएवढं राजकीय आकलन मराठी नाट्यसमीक्षकांकडे नाही. त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणारच आहे. पण खरी भीती आहे, ती ही की, गोपुंनंतर राजकीय नाटक मराठीमध्ये लिहिलं जाणार की नाही? याचं उत्तरही आता देता येण्यासारखं नाही. त्यामुळे त्यांचा राजकीय नाटकांचा वारसा पेलायला कोण पुढे येणार हा प्रश्न आहे.
गोपु हे तसे बुद्धिजीवींच्या वर्तुळातले. त्यामुळे त्यांचा गोतावळाही त्याच वर्गातला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही. पण त्यांचा खराखुरा जिवलग मित्र होते, प्रा. राम बापट. गतवर्षी याच महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बापट यांचं निधन झालं. तर आता गोपुंचं. बापट लोकाभिमुख विचारवंत तर गोपु अ‍ॅकॅडेमिक. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राचं वैभव होती. आता ती दोन्ही नाहीत. आणि रूढ शब्द वापरायचा तर त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही.

No comments:

Post a Comment