Saturday, November 22, 2014

एका पुस्तकापायी...

गोष्ट आहे ८० वर्षांपूर्वीची. उर्दूमध्ये १९३२ साली नऊ कथा आणि एका एकांकिकेचा संग्रह 'अंगारे' या नावानं प्रकाशित झाला. भारतीय मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रतिगामीपणाचा बुरखा फाडणारं हे लेखन सज़्‍जाद ज़्‍ाहीर, अहमद अली, रशीद जहाँ आणि महमूद-उझ-ज़्‍ाफर या पंचविशीच्या आतल्या चार लेखकांनी केलं होतं. यात ज़्‍ाहीर यांच्या पाच कथा, अली यांच्या दोन, जहाँ यांची एक कथा व एक एकांकिका आणि ज़्‍ाफर यांची एक कथा यांचा समावेश होता. नोव्हेंबर १९३२ मध्ये लखनौमधून या संग्रहाचं प्रकाशन करण्यात आले. त्याच्या एक हजार प्रती छापण्यात आल्या. किंमत होती चार आणे. एवढुसं पुस्तक पण ते प्रकाशित झालं आणि उत्तर भारतात हलकल्लोळ माजला. इस्लाम आणि मुसलमानांच्या विरोधात पाश्चात्त्य शिक्षणाने डोकं फिरलेल्या उन्मादी तरुणांचं हे षड्यंत्र आहे, हा इस्लाम आणि मुसलमानांना बदनाम करण्याचा डाव आहे, अशी भूमिका काही समाजकंटकांनी घेतली. धार्मिक संघटनांनी या पुस्तकाच्या विक्रीवर बंदी घालण्याची आणि लेखकांना शिक्षा करण्याची मागणी केली. काही लोकांनी या पुस्तकाच्या लेखकांवर कारवाई करण्यासाठी फंड गोळा केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या शिया परिषदेमध्ये लेखिका डॉ. रशीद जहाँ यांच्यावर ठपका ठेवला गेला. एक मुस्लीम स्त्री धर्माच्या आणि मुस्लिमांच्या श्रद्धास्थांनांच्या विरोधात लिहिते ही गोष्ट तत्कालीन समाजाच्या पचनी पडण्यासारखी नव्हती. 'अंगारेवाली रशीद जहाँ' असं त्यांचं नावच पडलं.
शेवटी ब्रिटिश सरकारने १५ मार्च ३३ रोजी आय.पी.सी. कलम २९५ ए अंतर्गत पुस्तक जप्त करण्याचे आदेश दिले. सरकारी रेकॉर्डसाठी पाच प्रती ठेवून बाकी साऱ्या प्रती जाळून टाकण्यात आल्या. म्हणजे नोव्हेंबर १९३२ मध्ये हा संग्रह प्रकाशित झाला आणि मार्च १९३३ मध्ये -म्हणजे अवघ्या चार महिन्यांनी- त्यावर बंदी आली. याशिवाय पुस्तक लेखकांना सामाजिक बहिष्काराला, धार्मिक-उग्र संघटना यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पण चारही लेखकांनी कुठल्याही प्रकारे माफी मागायला विरोध केला. ते आपल्या मतावर शेवटपर्यंत ठाम राहिले.
या पुस्तकानं उर्दू साहित्यात क्रांती केली. कथालेखनाला नवी दिशा दिली. एवढंच नव्हे तर सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, कैफ़ी आज़्‍ामी, हसन असकरी यांसारख्या अनेक लेखकांना प्रेरणा दिली. उर्दूमध्ये धार्मिक- सामाजिक रूढींबद्दल आणि स्त्री-पुरुष संबंधांबद्दल मोकळेपणानं लिहिण्याची परंपरा याच पुस्तकानं सुरू केली. या पुस्तकाचा प्रभाव हिंदी कथालेखनावरही पडला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या लेखनाचा प्रसार-प्रचार करण्याच्या हेतूनं एप्रिल १९३६ मध्ये प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात या पुस्तकाचे लेखक आघाडीवर होते. त्यांच्या पहिल्या संमेलनाला प्रेमचंद यांना बोलावण्यात आलं... ते आलेही.
थोडक्यात धार्मिक उन्माद आणि कर्मठ सामाजिक रूढींच्या विरोधात ब्र उच्चारण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक. पण दुर्दैवानं त्यानंतर या संग्रहाचं बराच काळ उर्दूमध्ये पुनर्प्रकाशन होऊ शकलं नाही आणि त्याचा इतर भाषांमध्येही अनुवाद होऊ शकला नाही. १९९५ साली प्रोग्रेसिव्ह रायटर्स
असोसिएशननं त्याचं पुनर्प्रकाशन  केलं, तर १९९० मध्ये शकील सिद्दिकी यांनी त्याचा हिंदी अनुवाद केला.
 


त्यानंतर आता या पुस्तकाचे एकाच वेळी दोन इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही अनुवाद थेट उर्दूमधून केले आहेत. पहिला अनुवाद विभा चौहान व खालीद अली यांनी केला असून तो 'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले' या नावाने प्रकाशित झाला आहे, तर दुसरा अनुवाद स्नेहल सिंघवी यांनी केला असून तो 'अंगारे' या नावाने प्रकाशित झाला आहे. त्याच्या मुखपृष्ठावर 'द फर्स्ट- एव्हर इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ द बॅन्ड शॉर्ट-स्टोरी कलेक्शन' असं छापलं आहे. दोन्हींचे प्रकाशक वेगवेगळे आहेत. 

सज़्‍जाद ज़्‍ाहीर यांची मुलगी नादिरा बब्बर यांनी 'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले'ला प्रस्तावना लिहिली आहे. तर खालिद अली यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून त्यात त्यांनी संग्रहातील चारही लेखकांचा परिचय, पुस्तकावरून उठलेलं वादळ, त्याविषयी उर्दू वर्तमानपत्रांमध्ये लिहिले गेलेले लेख आणि अनुवाद करण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक पेपरबॅक या प्रकारातलं असल्यानं त्याची किंमत माफक म्हणावी अशी आहे.
याउलट स्नेहल सिंघवी यांचा अनुवाद हार्ड बाऊंड असल्यानं तो जरा महाग आहे. त्यांनीही आपल्या मनोगतात या पुस्तकानंतरच्या वादळाचा थोडक्यात इतिहास दिला आहे. याशिवाय मूळ उर्दू पुस्तकाचं मुखपृष्ठ दिलं आहे. अनुवाद करताना त्यांनी मूळ पुस्तकाची शैली सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. परिशिष्टामध्ये तत्कालीन पोलिसांचं तक्रारपत्र, सेक्रेटरीचं पत्र आणि ज़्‍ाफर यांनी इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख दिला आहे. दोन्हींची मुखपृष्ठं वेगळी आहेत. दोन्ही पुस्तकांच्या अनुवादकांनी मूळ वादाविषयी लिहिलं असलं तरी त्याची पुनरावृत्ती फारशी झालेली नाही. 
प्रश्न निर्माण होतो की,  वाचक म्हणून यापैकी कुठलं पुस्तक घ्यावं? तुम्ही हिंदी-उर्दूशी थोडेफार परिचित असाल तर आणि भारतीय इंग्रजी वाचणं एन्जॉय करू शकत असाल तर  'अंगारे- ९ स्टोरीज अ‍ॅण्ड अ प्ले' हे पुस्तक घ्यायला हरकत नाही. पण तुमचं प्राधान्य चांगला अनुवाद, चांगली इंग्रजी भाषा यांना असेल तर मात्र तुम्ही स्नेहल सिंघवी यांचं -थोडं महाग असलं तरी- पुस्तक घ्यावं.
एकच पुस्तक दोन वेगवेगळ्या लेखकांनी एकाच भाषेत एका वेळी अनुवादित करण्यामागं नेमकं काय कारण असावं? सध्या भारतात पुस्तकांवरील सेन्सॉरशिप वाढते आहे. दिनानाथ बात्रा हे त्यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव आहे. पण केवळ 'बात्रांचाच खतरा' आहे, असं नाही. आपल्या श्रद्धेय विषयावरील टीकात्मक लेखन स्वीकारण्याची भारतीय समाजाची मानसिकताच संकुचित होत चालली आहे. आणि त्याला हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, असा कुठलाही धर्म वा त्यांतील समाजगट अपवाद नाहीत. या पाश्र्वभूमीवर आपल्या लेखनाचा निडरपणे पुरस्कार करणाऱ्या, त्यावर ठाम राहणाऱ्या आणि कुठल्याही दबावाला बळी न पडणाऱ्या लेखकांचं 'अंगारे' हे पुस्तक महत्त्वाचं ठरतं. उर्दू साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या या पुस्तकापासून लेखकांना धैर्याची प्रेरणा मिळो आणि समाजकंटकांना सद्बुद्धी सुचो.
--------------------------
अंगारे  : अनुवाद - स्नेहल सिंघवी, पेंग्विन बुक्स, गुरगाव, पाने : १६७, किंमत : ४९९ रुपये.

--------------------------
अंगारे  : अनुवाद - विभा एस. चौहान, खालीद अल्वी, रूपा पब्लिकेशन्स, नवी दिल्ली,
पाने : १०५, किंमत: १९५ रुपये.

Sunday, November 9, 2014

कादंबऱ्यांतली बर्लिन भिंत

९ नोव्हेंबरला बर्लिन भिंत पाडायला सुरुवात केल्याच्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बर्लिनमध्ये वेगवेगळ्या सफरी, व्याख्याने, चित्रपटांचे खेळ असे बरेच कार्यक्रम होत आहेत. याच आठवडय़ात ब्रिटिश कादंबरीकार केन फॉलेट यांची 'हॅपी कोइन्सिडन्स' ही कादंबरी जर्मनीत प्रकाशित झाली असून ती लोकप्रिय ठरली आहे. शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर घडणाऱ्या या कादंबरीमध्ये बर्लिन भिंतीच्या कोसळण्याचा बराच इतिहास आहे. सत्यकथा, फोटोंतून उलगडणारा इतिहास आणि ग्राफिक नॉव्हेल अशी वैशिष्टय़ं असणारी ही कादंबरी सध्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यानिमित्ताने बर्लिन भिंतीला मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या इतर काही कादंबऱ्यांची संक्षिप्त ओळख करून घेणं रोचक ठरेल.

प्रसिद्ध ब्रिटिश गुप्तचर कादंबरीकार जॉन ले कॅरे यांच्या 'द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड' या १९६३ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीला त्या वर्षीचा 'बेस्ट क्राइम नॉव्हेल' हा पुरस्कार मिळाला, तसेच १९६५ साली या कादंबरीवर चित्रपटही आला- ज्यात रिचर्ड बर्टन यांनी नायकाची भूमिका केली आहे. शीतयुद्धाच्या भराचा काळ. पूर्व-पश्चिम जर्मनीच्या मध्ये बर्लिन भिंत उभी आहे. अशा वेळी ब्रिटिश गुप्तचर अलेक लीमास काही गोपनीय माहिती मिळविण्यासाठी पूर्व जर्मनीत येतो; पण त्याची ही पहिली मोहीम फसते. त्याचे सहकारी मारले जातात; पण त्याला पुन्हा दुसऱ्या कामगिरीवर बर्लिनमध्येच पाठवलं जातं. तिथे त्याला जर्मन गुप्तचर पकडतात. एका अधिकाऱ्याला आपला वरिष्ठ हा ब्रिटिशांचा एजंट आहे, हे त्याच्याकडून सिद्ध करून घ्यायचं असतं, तर दुसऱ्याला ब्रिटिशांची गुप्तचर यंत्रणेतील काही महत्त्वाची माहिती हवी असते. कॅरे यांची विलक्षण हातोटी, गुंतागुंतीचं कथानक आणि रहस्यमयता यांनी भरलेली ही कादंबरी खूप खपली आणि वाचलीही गेली आहे.


ब्रिटिश कादंबरीकार लेन डेग्टन यांची 'बर्लिन गेम' ही गुप्तचर कादंबरी 'गेम' आणि 'सेट अ‍ॅण्ड मॅच' या त्रि-कादंबरीधारेतली पहिली कादंबरी १९८३ साली प्रकाशित झाली. पूर्व जर्मनीतील एका ब्रिटिश गुप्तचर एजंटला पश्चिम जर्मनीत जायचं असतं. त्याला मदत करण्यासाठी नायक बर्नार्ड सॅम्पसनची नेमणूक केली जाते. खरं तर तो पाच वर्षांपूर्वीच नोकरीतून निवृत्त झालेला असतो; पण ही कामगिरी त्याच्यावर सोपवली जाते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, कुणी तरी त्याच्या मागावर आहे. तो त्याचा शोध घेतो आणि शेवटी ठरल्याप्रमाणे आपली कामगिरी फत्ते करतो.


'द डे बिफोर द बर्लिन वॉल- कुड वुइ हॅव स्टॉप्ड इट?' (२०१०) या अमेरिकन कादंबरीकार थॉमस एन्रिच एडवर्ड हिल यांच्या लांबलचक शीर्षकाच्या कादंबरीला 'अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री ऑफ कोल्ड वार एस्पिओनेज' असं उपशीर्षकही आहे. ही कादंबरी दंतकथेवर आधारित आहे आणि अर्थात गुप्तचरही.


बर्लिन भिंत पडत असताना अमेरिकेला कसा दोष दिला जातो, असं  कथानक असलेली अमेरिकन कादंबरीकार जॉन मार्क्‍स यांची 'द वॉल' (१९९९) हीसुद्धा गुप्तचर कादंबरीच आहे. 


'वेस्ट ऑफ द वॉल' (२००८) ही कादंबरी उत्तर अमेरिकेत 'टड्रीज प्रॉमिस' या नावानं प्रकाशित झाली आहे. भिंतीमुळे नवऱ्यापासून ताटातूट झालेल्या बायकोची आणि तिच्या मुलाची ही गोष्ट आहे. (कादंबरीकार मार्सिया प्रिस्टन हेही अमेरिकनच.)


पीटर श्नायडर (Peter Schneider) यांची १९८२ साली मूळ 'Der Mauerspringer' या नावाने जर्मनमध्ये आणि १९८४ साली 'द वॉल जम्पर' या नावाने इंग्रजीत अनुवादित झालेल्या या कादंबरीतली मध्यवर्ती व्यक्तिरेखाच बर्लिन भिंत आहे. शारीरिक विभागणीपेक्षा मानसिक पातळीवरील फरकांना अधोरेखित करणारी ही कादंबरी भिंत ओलांडून जाणाऱ्या अनेकांच्या कहाण्या सांगते.


जर्मन कादंबरीकार थॉमस ब्रुसेग यांची 'हेल्डन वीइ वुइर' ही कादंबरी जर्मनीत १९९५ साली प्रकाशित झाली. तिचा इंग्रजी अनुवाद 'हीरोज लाइक अस' या नावानं १९९७ साली प्रकाशित झाला. पूर्णपणे राजकीय असलेली ही कादंबरी तिच्यातील उपहासात्मक शैलीमुळे वाखाणली गेली. या कादंबरीचा न-नायक हा नोबेल पारितोषिकापासून वंचित राहिलेला लेखक असतो. यातून दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि बर्लिन भिंत पाडण्याचं कारस्थान यांच्यातील धागेदोरे स्पष्ट केले आहेत. पूर्व जर्मनीतील कम्युनिझमचा पाडाव रेखाटणारी ही कादंबरी समीक्षकांनी गौरवली आहे. 


'फ्रेया ऑन द वॉल' (१९९७) ही जर्मन कादंबरीकार टी. डिजेन्स यांची कादंबरी वैयक्तिक आणि राजकीय इतिहासाची तपासणी करते. मोठय़ा प्रमाणावर प्रतीकात्मकता असलेल्या या कादंबरीची नायिका एक किशोरवयीन मुलगी असून तिचे नातेवाईक पूर्व-पश्चिम जर्मनीत असतात. बर्लिनची भिंत कोसळायच्या आधीची ही कादंबरी त्या वेळची सारी गुंतागुंत उलगडून दाखवते. 


'स्लम्बरलॅण्ड' ही आफ्रिकन-अमेरिकन कादंबरीकार पॉल बिटी यांची कादंबरी २००८ साली प्रकाशित झाली. क्रूर, अवडंबरपूर्ण आणि तरीही उल्हसित करणारी ही कादंबरी आहे. डी जे डार्की हा या कादंबरीचा नायक जॅझचा बादशहा चार्ल्स स्टोनचा शोध घेत बर्लिनला येतो. जिथे एक गोरी बाई हद्दपार केलेल्या काळ्या आणि आफ्रिकन कामगारांना राबवून घेत असते. काळ्यांच्या ओळखीचा शोध घेणारी ही कादंबरी बर्लिन भिंतीच्या साक्षीनं घडते.


'स्टासीलॅण्ड' या ऑस्ट्रेलियन कादंबरीकार अ‍ॅना फंडर यांच्या कादंबरीचं 'स्टोरीज फ्रॉम बिहाइंड द बर्लिन वॉल' असं उपशीर्षक असून ती ग्रँटा मासिकाच्या प्रकाशन विभागानं २०११ साली प्रकाशित केली. पूर्व जर्मनीतील गुप्त पोलिसांना स्टासी म्हणत. अ‍ॅना यांनी वर्तमानपत्रात रीतसर जाहिरात देऊन गुप्त पोलीस म्हणून काम करणाऱ्या अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्याआधारे हिटलर आणि स्टॅलिन यांच्या एकाधिकारशाहीचं चित्र त्यांनी या कादंबरीत मांडलं आहे. जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'नाइन्टीन एटी फोर' या कादंबरीशी 'स्टासीलॅण्ड'ची तुलना समीक्षकांनी केली आहे.

Monday, November 3, 2014

मातीत रमणारा अभिनेता!

अनिल अवचट, निळू फुले आणि अमरापूरकर
सदाशिव अमरापूरकर यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग ग्रामीण जीवनानं व्यापला होता. जन्मगाव (नगर जिल्ह्य़ातील) शेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव अमरापूरकर पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील शेती करायचे. शेत नांगरणं, मोट चालवणं, बैलांना चारा घालणं, गाईचं दूध काढणं, जत्रेत बैल पळवणं या सगळ्या गोष्टी अमरापूरकरांनी लहानपणी केल्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम अमरापूरकर करत. शेत नांगरणं, शेतात खत टाकणं, ही कामंही ते करत.

त्यांची एक आत्या आळंदीला राहायची. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारीबरोबर पायी चालत जायची. अमरापूरकर तिच्यासोबत तीन-चार वेळा आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत गेले. आळंदीला संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सोनोपंत दांडेकर राहत. ते वारकरी संस्थेचे अध्यक्ष होते. ते कथा, प्रवचन करत, शिकवत. टाळ कसे वाजवायचे, कीर्तनाला उभं कसं राहायचं, कशी सुरुवात करायची, या गोष्टी अमरापूरकर त्यांच्याकडून शिकले.

अमरापूरकर यांना वाचनाची गोडी लागली ती त्यांच्या आजोळला, आष्टीला. त्यांना गोष्टी ऐकायला आवडायचं. मीना नावाची बहीण त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायची. तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्याचा त्यांना छंदच लागला होता. तिथं त्यांनी पहिलं पुस्तक ऐकलं ते 'शामची आई'. साने गुरुजींच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी लावली, ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्याकडे पाच ते सहा हजार पुस्तकं होती. ते रोज किमान तीन तास वाचन करत. मराठी-इंग्रजीतील नवनव्या पुस्तकांबाबतचं त्यांचं वाचन अतिशय अद्ययावत म्हणावं असं होतं. उदा. महाराष्ट्रात सेझचा प्रश्न गाजत होता, तेव्हा त्यावर एक कादंबरी आली होती. अमरापूरकरांनी ती लगेच मिळवून वाचली.

नगरलाच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी नावाची न्या. रानडे यांनी बांधलेली शाळा आहे. अमरापूरकर तिचे विद्यार्थी. शालेय वयात ते अत्यंत हूड विद्यार्थी होते, पण क्रिकेट चांगले खेळायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर क्रिकेट सुटलं आणि नाटक सुरू झालं. त्या दोन-चार वर्षांत मुंबईची प्रचंड नाटकं नगरला आली. त्या काळी मुलांना आठ आणे तिकीट होतं. अमरापूरकर प्रत्येक नाटक पाहायचे. त्या काळात त्यांनी प्रचंड नाटकं पाहिली.

महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नगर महाविद्यालयात गेले. भालचंद्र नेमाडे, मधुकर तोरडमल हे प्राध्यापक त्यांना शिकवायचे. त्या दरम्यान त्यांच्या मित्रानं एकांकिका करायला सुरुवात केली होती. त्यात अमरापूरकरांना नोकराचं काम मिळालं; पण आयत्या वेळेला हिरोचं काम करणारा मुलगा निघून गेला आणि ती भूमिका त्यांच्याकडे आली. त्या एकांकिकेला आणि अमरापूरकरांना उत्तेजनार्थ दहा रुपयांचं बक्षीस मिळालं. ती - 'पेटलेली अमावस्या' - त्यांची पहिली एकांकिका.
त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर 'छिन्न', 'हँडसअप', 'काही स्वप्नं विकायचीयत', 'हवा अंधारा कवडसा', 'ज्याचा त्याचा विठोबा' अशा विविध नाटकांत काम केलं. 


अमरापूरकर यांचे वडील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून निवडून गेलेले. शिवाय वडील एक अनाथ संस्था चालवत, शेतकी शाळा चालवत. मुलानं शिकून नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. तरीही सुरुवातीला मुलगा नाटक करतोय म्हटल्यावर त्यांनी उत्तेजन दिलं; पण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी अमरापूरकर नाटकच करत आहेत हे पाहिल्यावर मात्र त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. वडील अमरापूरकरांना 'नाच्या' म्हणत. तरीही वडिलांचा विरोध पत्करत त्यांनी नाटकं करणं चालूच ठेवलं. या काळात त्यांच्या पत्नी, सुनंदा यांनी त्यांना खूपच खंबीरपणे साथ दिली. पदवीधर झाल्यावर अमरापूरकरांनी परभणीला ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली, पण ते वातावरण त्यांना मानवलं नाही. शिवाय आणीबाणीचा काळ. त्या वातावरणातील मुस्कटदाबीला कंटाळून त्या नोकरीचा त्यांनी सहा महिन्यांत राजीनामा दिला. नंतर ते नोकरीसाठी जातो आहे, असे सांगून पुण्याला नाटक करायला आले. तेव्हा घरची आघाडी सांभाळून सुनंदाताईंनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांची उमेद वाढवण्याचं मोठं काम केलं.

  'अर्धसत्य'मुळे अमरापूरकरांच्या जीवनात मोठा बदल झाला. मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या 'सूर्य' या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन 'अर्धसत्य' हा चित्रपट १९८४ साली केला. त्यात रामा शेट्टीची छोटीशी भूमिका अमरापूरकर यांनी केली; पण त्यांच्या या छोटय़ा भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्या संदर्भातील दोन किस्से रंजक आहेत.
या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर अमरापूरकर गावी नगरला गेले. त्यांच्या मोठय़ा भावाला बाहेरगावी जायचं असल्याने वडिलांनी त्यांना तोपर्यंत किराणा मालाचं दुकान सांभाळायला सांगितलं. दरम्यान 'अर्धसत्य'च्या प्रीमिअरची तारीख जवळ आली. अमरापूरकरांनी त्याबाबत वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ''तो मुंबईत आहे ना, तू दुकान सांभाळ.'' त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अमरापूरकर नगरहून एसटीने निघून पहाटे दादर बस स्टॅण्डला उतरले. तोवर 'अर्धसत्य'मधील रामा शेट्टी मुंबईत सर्वाना माहीत झाला होता. त्यामुळे त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी त्यांच्याभोवती गलका केला. एकानं बळजबरीनं त्यांना टॅक्सीत बसवून त्यांच्याकडून पैसेही न घेता त्यांना घरी सोडलं.
'अर्धसत्य'च्या कथेचे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांनी या चित्रपटाविषयी 'शूटिंग' (१९८५) या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ओम पुरी आणि अमरापूरकर यांच्या समोरासमोरच्या दृश्याविषयी लिहिले आहे - ''इथं सदाशिव अमरापूरकरांचा रामा शेट्टी फार समजदारीनं संवादांतील सम खटकन पकडतो. हे सगळं दृश्य सदाशिव अमरापूरकर यांनी विनासायास अभिनयानं झक्कास तोलून धरलं. फिल्मी दुनियेत हे त्यांचं पदार्पण, पण 'वामना'च्या पहिल्या पावलासारखं नेमकं आणि भक्कम.''


त्या एवढय़ा भूमिकेवरून अमरापूरकरांना १८० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यांची तुलना अमरीश पुरीशी केली गेली.
त्यानंतर आजतागायत त्यांनी ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७०-८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया चित्रपटांमध्ये काम केलं. अमरापूरकरांनी अमान जलाल यांच्या मालिकेत लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रुपेरी कारकीर्द सुरू केली, तर 'राज से स्वराज तक' या मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'तील म. फुले आणि 'सडक', 'हुकूमत', 'ऐलान-ए-जंग' या चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका त्यांना स्वत:लाही आवडलेल्या होत्या, तर मराठीतील सुमित्रा भावे यांच्या 'वास्तुपुरुष'मधील भूमिका त्यांना सर्वात आव्हानात्मक वाटली होती.


अमरापूरकरांनी 'कन्यादान'सारख्या काही नाटकांचं दिग्दर्शनही केलं. त्याचबरोबर 'किमयागार' हे नाटकही लिहिलं. वयाच्या सहाव्या वर्षी, श्रवण-दृष्टी-वाचा हरवून बसलेल्या हेलन केलर या अमेरिकी मुलीला तिची शिक्षिका अ‍ॅनी सुलेवान यांच्या अथक प्रयत्नांनी भाषा सापडते आणि तिच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून येतं. त्या दोघींच्या आयुष्यावर पुढे याच नावानं एक नाटक अमेरिकन रंगभूमीवर आलं. त्याचं 'किमयागार' असं अगदी अचूक मराठीकरण वि. वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या लेखकद्वयांनी केलं. या दोघांचं नाव लेखक म्हणून या नाटकाला असलं तरी हे नाटक पूर्णपणे अमरापूरकरांनी लिहिलं आहे. शिरवाडकरांनी काही सुधारणा व थोडेफार बदल केले आहेत.
रिचर्ड बोलेस्लाव्हस्की यांच्या 'अ‍ॅक्टिंग - द फर्स्ट सिक्स लेसन्स' या पुस्तकावर आधारित सदाशिव अमरापूरकर आणि आनंद विनायक जातेगांवकर यांनी 'अभिनयाचे प्राथमिक सहा पाठ' हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकावर काहीशी टीका झाली असली तरी अशा प्रकारचं हे मराठीतील पहिलंच पुस्तक आहे. आनंद पटवर्धन यांच्या 'वॉर अ‍ॅण्ड पीस' या लघुपटावरील त्यांचा लेख बराच गाजला होता.


सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या संस्था-संघटनांशीही अमरापूरकर संबंधित होते. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी झालेल्या 'लग्नाच्या बेडी' या नाटक संचात ते होते. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वध्र्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध होते.


अमरापूरकरांना अनेक गोष्टींविषयी उत्सुकता असे. वाचन तर ते सततच करत; पण ते पेन्सिल स्केचिंगही चांगल्या प्रकारे करत. शूटिंगदरम्यानच्या काळात वेळ मिळेल तेव्हा ते वाचन किंवा पेन्सिल स्केचिंग करत असत. एकदा त्यांना जपानी लेखक मासानोबु फुकुयोका यांचं 'एका काडातून क्रांती' हे नैसर्गिक शेतीविषयीचं पुस्तक मिळालं. ते वाचून अमरापूरकर भारावून गेले. त्यांनी पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याजवळ अर्धा एकर शेत विकत घेतलं. तिथं नैसर्गिक पद्धतीची शेती करायचा प्रयत्न केला. त्या शेताच्या आजूबाजूला त्यांनी किती तरी झाडं लावली. सुरुवातीची तीन र्वष त्यांचं पीक जळून गेलं. एकदा त्यांनी भुईमूग पेरला. त्या वर्षी किती तरी पोती भुईमूग झाला. 


अमरापूरकरांनी खलनायकी भूमिका चित्रपटांतून केल्या असल्या तरी त्यांच्यातला माणूस अतिशय संवेदनशील, हळुवार होता. फिल्मी दुनियेत राहून ते तिथे कधी रमले नाहीत. ते रमायचे वाचनात, नाही तर शेतात.