Sunday, February 1, 2015

गज्वी पोचले इंग्रजीत!

प्रेमानंद गज्वी हे मराठीतील सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणारे नाटककार आहेत. त्यांच्या 'घोटभर पाणी', 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' या तिन्ही नाटकांनी- अगदी बिनचूक शब्दांत सांगायचे तर पहिल्या एकांकिकेने आणि नंतरच्या दोन नाटकांनी- मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता ही तिन्ही नाटके रूपांतराच्या निमित्ताने इंग्रजीमध्ये दाखल झाली आहेत. त्या रंगभूमीवर ती प्रयोगक्षम ठरतात की नाही हे येत्या काळात कळेलच. 'घोटभर पाणी'चे मराठीमध्ये तीन हजार प्रयोग झाले. या एकांकिकेत अस्पृश्यतेच्या शापामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्याची वेदना मांडली आहे. त्यानिमित्ताने गज्वी यांनी भारतीय संस्कृतीतील दांभिकतेचे वाभाडे काढले आहेत. 'किरवंत' या नाटकाची प्रशंसा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. या नाटकात ब्राह्मण 'किरवंत'ला (अंत्यविधीची क्रियाकर्मे करणारी व्यक्ती) कशा प्रकारची वागणूक देतो, याचे भेदक आणि वास्तव चित्रण केले आहे. 'जो ब्राह्मण समाज स्वत:च्याच समाजाला न्याय देऊ  शकत नाही, तो इतर समाजाला काय न्याय देणार आणि सन्मानाने वागवणार,' असा जळजळीत प्रश्न या नाटकातून गज्वी यांनी उपस्थित केला आहे. 'गांधी-आंबेडकर' हे नाटक म. गांधी आणि डॉ. आंबेडकर यांच्यातील संघर्षांची मांडणी करते. १९३१ सालच्या पहिल्या गांधी-आंबेडकर भेटीने हे नाटक सुरू होते आणि गांधी हत्येनंतर आंबेडकरांच्या स्वगताने संपते. गांधी-आंबेडकर यांचे संबंध सुरुवातीपासून तणावाचेच राहिले. त्याविषयी त्यांच्या हयातीपासून बोलले जातेच आहे. हे नाटकही त्याचाच एक भाग म्हणून अवतरले.
'घोटभर पाणी'चा इंग्रजी अनुवाद शांता गोखले यांनी तर 'किरवंत' आणि 'गांधी-आंबेडकर' यांचा अनुवाद म. द. हातकणंगलेकर यांनी केला आहे. पहिल्या दोन्ही नाटकांत महाराष्ट्रीय समाजातील भेदक वास्तव तर तिसऱ्या नाटकांत हिंदू आणि दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन भारतीय समाजपुरुषांमधील संघर्ष रेखाटला आहे. मराठीमध्ये ही तिन्ही नाटके नावाजली गेली, वाखाणलीही गेली. महत्त्वाचीही मानली गेली. कारण महाराष्ट्रात त्यांना मोठा इतिहास आहे. तसे इंग्रजीत होईलच असे नाही.
द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स : प्रेमानंद गज्वी,
अनुवाद- शांता गोखले, म. द. हातकणंगलेकर,
नवयान पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली,
पाने : १५५, किंमत : २५० रुपये.

No comments:

Post a Comment