Sunday, January 10, 2016

नवे ‘यादव’, नवे ‘वार’करी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी स्वरूपाची भाषा वापरून वादग्रस्त विधाने केल्यामुळे गेले काही दिवस ८९व्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस वादाच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. भाजपेयींसाठी मोदी हे प्रात:स्मरणीय दैवत असल्यामुळे त्यांनी सबनीस यांच्यावर रोज वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे, दुसरीकडे सबनीस यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. सबनीस यांनी निखालसपणे केलेल्या औचित्यभंगाबद्दल साधी दिलगिरीही व्यक्त न करता अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे असहिष्णुतेत मुळातच अव्वल असलेल्या भाजपेयींना आणखी चेव आला आहे. सबनीसांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यापासून ‘माफी मागितल्याशिवाय त्यांना संमेलनाच्या व्यासपीठाची पायरीही चढू देणार नाही’, अशी दर्पोक्ती करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. संमेलनाध्यपदी निवड झाल्यापासून सबनीस यांनी केलेली बहुतांश विधाने ही बेताल आणि बेमुर्वतखोर म्हणावी अशीच आहेत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचे काहीच कारण नाही. शिवाय कालच्या ‘मी मराठी Live’मधील बातमीनुसार, साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेमध्येही गैरप्रकार झाले असल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार हे सबनीसांचा बोलविता धनी आहेत, यावर आम्ही १० नोव्हेंबर रोजी ‘पवार-पुरस्कृत संमेलनाध्यक्ष’ या अग्रलेखातून लिहिले होतेच. पवारांच्या पाठिंब्यामुळेच सबनीस साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले, ही वस्तुस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी पवारांनी असाच ‘सांस्कृतिक इंजिनीअरिंग’चा प्रयोग करून फ. मुं. शिंदे यांच्या गळ्यात संमेलनाध्यक्षपदाची माळ घातली होती. अलीकडच्या काळात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही पवारांनी केलेले अनेक प्रयोग अंगलट आले आहेत. त्यातून बोध न घेता पवारांनी यंदाच्या संमेलनात पुन्हा रस घेतला आहे. गेल्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून निर्माण झालेल्या कलुषित वातावरणावर उतारा म्हणून पवारांनी पुन्हा ‘सांस्कृतिक इंजिनीअरिंग’चा प्रयोग करून सबनीस यांना निवडून आणल्याचे सांगितले जाते. पण ‘लोक माझे सांगाती’ असे उच्चरवाने सांगणाऱ्या आणि सामान्य खेडेगावातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचीही जन्मकुंडली माहीत असलेल्या पवारांचा सबनीसांविषयीचा अंदाज सपशेल चुकलेला दिसतो. सबनीसांच्या ब्राह्मण असण्याला प्राधान्य देऊन त्यांचे साहित्यिक योगदान लक्षात न घेणाऱ्या पवारांची निवड किती चुकीची होती, हे सबनीसांनी गेल्या काही दिवसांत सिद्ध करून दाखवले आहे. संमेलनाध्यक्षासारखे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अॅम्बेसेडरचे पद सबनीसांना वर्षभरासाठी मिळाले आहे. पण त्या उच्चासनाचे गांभीर्य समजण्याइतकी शहाणीव त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी त्या उच्चासनाची उंची खुजी केली आहे. त्यामुळे सध्या देशभर उद्दाम झालेल्या भाजपेयींचे चांगलेच फावले आहे. महाराष्ट्रातील जनमानस शहाणे होण्याऐवजी दिवसेंदिवस कलुषित होत चालले आहे. त्याचा सध्या देशात आणि राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार जोरकसपणे फायदा करून घेत आहे. राज्यात सामाजिक-जातीय-राजकीय आणि सांस्कृतिक ध्रुवीकरणाला सुगीचे दिवस आले आहेत. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन राजकीय पक्षांच्या कृपाशीर्वादाने अनेक व्यक्ती-संस्था-संघटना एकमेकांविरुद्ध दंड थोपटत मुजोर प्रवृत्तीचे दर्शन घडवत आहेत. सबनीसांच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात जे काही भयकारी चित्र आकाराला येत आहे, ते पाहून, २००९ सालच्या साहित्य संमेलनाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हाचे संमेलनाध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरून वाद उकरून काढून अनेक व्यक्ती-संस्था-संघटनांनी असेच आपापले उखळ पांढरे करून घेतले होते. त्यात यादवांचा बळी गेला. त्यांना संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा तुकोबांच्या चरणी वाहावा लागला आणि त्यांच्या शिवाय त्या वर्षीचे साहित्य संमेलन महामंडळाने पार पाडले. तेव्हाच्या आततायी वारकरी संघटनांची जागा आता त्यांच्याहून आततायी भाजपेयींनी घेतली आहे आणि आनंद यादवांइतक्याच बेजबादार भूमिकेत आता सबनीस आहेत. नेपथ्याला असलेले साहित्य महामंडळही त्या वेळेप्रमाणेच बोटचेप्या लाचारीची भूमिका पुन्हा पार पाडताना दिसत आहे. हा सारा प्रकार कमालीचा निषेधार्ह आहे. सबनीसांविषयी आधी कोणाला फारशी माहिती नव्हती आणि आता मराठी साहित्यिकांमध्ये किंवा जनमानसामध्ये थोडीही सहानुभूती नसल्याचे दिसते आहेच. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने म्हणूनही त्यांचे समर्थन कोणी करू नये असा भीमपराक्रम त्यांनी करून ठेवला आहे. सबनीसांच्या धमक्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने चिंता व्यक्त केली असली तरी, उद्या सबनीसांचा ‘आनंद यादव’ केला गेला, तर साहित्य संमेलनाची प्रतिष्ठा पुन्हा एकदा मातीमोल करण्याचे पातक त्यांच्याच माथी येणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

No comments:

Post a Comment