Tuesday, January 5, 2016

झपाटलेला झंझावात

शरद जोशी हे एक वादळ होते. झपाटून टाकणारा झंझावात होता. त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये एक लढाऊ ऊर्जा निर्माण केली. स्वित्झर्लंडमधील सुखासीन आयुष्याची हमी देणारी मोठ्या पदाची नोकरी सोडून जोशी कोरडवाहू शेती करण्यासाठी १९७७ मध्ये भारतात परतले. सुरुवातीचे दोनेक प्रयोग फसल्यानंतर त्यांनी शेती का परवडत नाही, याचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र हे कंगालांचे अर्थशास्त्र आहे. शासन, धनदांडगे शेतकऱ्याची लूट करत आहेत. मग त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एकजूट करण्यासाठी १९८९मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. आणीबाणीनंतरचा काळ त्यांच्या प्रयत्नांना पूरक ठरला. ऐंशीच्या दशकात त्यांनी केवळ महाराष्ट्रच नाही, तर अख्खा देश शेतकरी आंदोलनाने दणाणून सोडला होता. १९८० ते ९५ ही पंधरा वर्षे शेतकरी आंदोलनाचा सुवर्णकाळ होता. पत्रकार, मध्यमवर्गीय, राज्यकर्ते, प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ अशा सर्वांनाच शेतीचे अर्थशास्त्र, शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय समजावून सांगितले. शेतकऱ्यांनाही शेतीचा आतबट्ट्याचा व्यवहार समजावून दिला. त्यातून शेतकऱ्यांचा एल्गार चेतवून राष्ट्रव्यापी चेतना निर्माण झाली. पाहता पाहता लाखो शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले. त्यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या अंगावर झेलल्या. मग तो १९८६ मध्ये चांदवडचा अभूतपूर्व महिला मेळावा असो की, लासलगावचे कांदा आंदोलन असो. त्यांनी कांद्याच्या भावासाठी चाकणला बाजर यशस्वीरित्या बंद करून दाखवला. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-निफाड भागात कांदा आणि ऊस या पिकांच्या भावासाठी मोठे लढे उभारले, आंदोलने केली, रास्ता रोको-रेल रोको केले. मुंबई-आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवस रोखून धरला. शरद जोशींनी नेमकी हेरून शेतकरी समाजातील माणसे उभी केली, त्यांना घडवण्याचे काम केले. खेड्यापाड्यातल्या माणसांना घेऊन चळवळ उभी करणे हे सोपे काम नसते. शेतकी, शेतकरी, शेतमालाचा भाव या प्रश्नांना ऐरणीवर आणून त्याची राज्यकर्त्यांना दखल घ्यायला लावली. शेती हा व्यवसाय आहे, जीवनपद्धती नाही, असे क्रांतिकारी वाटणारे पण थेट वास्तवाला भिडणारे विचार मांडून जोशींनी लढे उभारले. राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात आणि त्यांच्या सरकारी भूमिकांमध्ये या प्रश्नांना स्थान मिळाले. राष्ट्रीय पातळीवर शेतकऱ्यांचे राहणीमान, जीवन, शेतीचा उत्पादन खर्च पोहोचवण्याचे ऐतिहासिक काम जोशी यांनी केले. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या संकल्पनेची मांडणी केली. त्यांची शेतीप्रश्नाची मांडणी क्रांतिकारी होती आणि आंदोलनाची व्यूहरचना अतिशय अभिनव होती. शेतकऱ्याच्या शोषणावरच भांडवलाची निर्मिती करणे हे सरकारचे अधिकृत धोरण आहे, हा नवा विचार त्यांनी मांडला. केवळ वैचारिक मांडणी, आर्थिक विश्लेषण करून जोशी थांबले नाहीत. त्याला त्यांनी संघटनेची, व्यूहात्मक आंदोलनाची जोड दिली. लाख लाख शेतकऱ्यांच्या सभा आणि आंदोलने त्यातून उभी राहिली. उत्पादन खर्चावर आधारित भावासाठी अशी आंदोलने तोवर महाराष्ट्राने पाहिली नव्हती. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर ग्रामीण भागात सर्वात मोठी कुठली चळवळ उभी राहिली असेल तर ती शरद जोशींच्या शेतकऱ्यांची. जोशी यांचे वक्तृत्व, भाषा, व्यासंग, प्रेरणा विविधांगी होती. त्यांचे इंग्रजी-मराठी भाषेवरचे प्रभुत्व भुरळ घालणारे होते. जागतिक अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असलेल्या आणि नंतर भारतातील शेतीच्या अर्थशास्त्राची सैद्धांतिक मांडणी करणाऱ्या जोशींचे नाव त्यांच्या आंदोलनाने केवळ देशातच नाही, तर जगभरात पोहोचवले. भारतीय शेतीच्या दारिद्र्याचे नवे आणि वास्तवाधारित विश्लेषण महात्मा फुले यांच्यानंतर आक्रमकपणे मांडण्याचे काम कोणी केले असेल तर ते जोशी यांनीच. ‘मी मतं मागायला आलो तर जोड्याने मारा’ म्हणणाऱ्या जोशी यांनी १९९४ मध्ये ‘स्वतंत्र भारत’ या नावाने पक्ष काढला. निवडणुका लढवल्या. सुरुवातीची दहा वर्षे ज्या काँग्रेसचे ते तिखट टीकाकार होते, तिच्याच कह्यात ते गेले. नंतर तर त्यांची गाडी भाजपच्याही सावलीतही थांबली. त्यांची राजकीय तटस्थता खिळखिळी झाली, तसे वैचारिक बांधिलकीलाही तडे गेले. पण, थेट शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेणे, हा जोशी यांचा विशेष होता. त्यात त्यांनी कधीही मध्यस्थ निर्माण होऊ दिले नाहीत. ते जोशी आणि त्यांच्या संघटनेचे सर्वात मोठे यश होते आणि चारित्र्यही. या चारित्र्याची जपणूक संघटनेच्या काही नेत्यांनी केली नाही, तशी जोशींनीही केली नाही. त्यामुळे ९०नंतर ती निष्प्रभ होत गेली. संघटना अपयशी ठरली असली तरी शेतीच्या दारिद्र्याचे त्यांनी मांडलेले वास्तव, शेतीच्या अवनीतीची त्यांनी केलेली कारणमीमांसा आणि त्यावर सुचवलेल्या उपाययोजना यांचे महत्त्व मात्र कधीही कमी झाले नाही. शेती आहे, तोवर ते कमी होणारही नाही, हीच मिळकत घेऊन हा योद्धा अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे.

No comments:

Post a Comment