दुबेंचा जन्म मध्य प्रदेशातील बिलासपूरचा. तिथल्या म्युनिसिपल शाळेत त्यांचं शिक्षण झालं. ते पाच वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली. मग वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी नागपूरला पाठवलं. तिथं ते अँग्लो-इंडियन कुटुंबात राहिले. पण काही दिवसांनी परत बिलासपूरला गेले. तिथे शाळेत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला. त्यांच्याशी ते जोडले गेले. वयाच्या बावीसाव्या वर्षी इंटर झालं आणि दुबेंनी मुंबईला प्रस्थान ठेवलं. त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं! झेविअर्स कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये त्यांची निवडही झाली. याच कॉलेजात दुबेंना विजय आनंद भेटला आणि दुबे नावाच्या स्कूलची पावलं नाटकाच्या दिशेनं पडायला लागली. विजय आनंदनं त्यांना स्वत:बरोबर न्यायला सुरुवात केली. बदली नट म्हणून कामंही मिळू लागली. मुंबईत तेव्हा भांगवाडीमध्ये गुजराती नाटकांची चळवळ मोठय़ा जोमात होती. तिथेही दुबे जायला लागले. तिथेच त्यांना पार्श्वनाथ आळतेकर भेटले. ते दुबेंचे नाटय़क्षेत्रातले पहिले गुरू. दुबेंचा तोतरेपणा आळतेकरांनी घालवला. एक दिवस विजय आनंद दुबेंना ‘थिएटर युनिट’मध्ये घेऊन गेले. तिथं तेव्हा इब्राहीम अल्काझी आणि पी. डी. शेणॉय हे दोन स्टॉलवर्ट होते. दुबेंनी अल्काझींकडून नाटकाच्या कोरिओग्राफीचे धडे गिरवले.
नाटकाच्या अक्षांश-रेखांशमध्ये जे जे काही करता येणं शक्य आहे, आणि त्याच्या जेवढय़ा म्हणून शक्यता आहेत, त्या पणाला लावून पाहणारा दुबे हा दिग्दर्शक होता. मग ते सात्र्चं ‘नो एक्झिट’ असेल, धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ असेल, बादल सरकारांचं ‘वल्लभपूरची दंतकथा’, महेश एलकुंचवारांचं ‘गाबरे’, ज्याँ अनुईचं ‘अँटिगनी’, मोहन राकेश यांचं ‘आधे अधुरे’ असेल किंवा विजय तेंडुलकरांचं ‘खामोश! अदालत जारी है’.. दुबेंनी केलेल्या प्रत्येक नाटकात हे दिसेल. श्याम मनोहर हे कादंबरीचे अक्षांश-रेखांश पणाला लावू पाहणारे कादंबरीकार. त्यांची नाटककार अशी ओळख दुबेंमुळेच झाली. दुबे ‘साहित्य सहवास’मध्ये राहत. एकदा त्यांची कवी दिलीप चित्रे यांच्याशी ओळख झाली. चित्रेंनी त्यांना मनोहरांचं नाटक सुचवलं. पण ते वाचल्यावर दुबे म्हणाले, ‘कशासाठी करायचं मी हे?’ चित्रेही तेवढेच खटनट. ते दुबेंना म्हणाले, ‘यू स्टार्ट फ्रॉम एंड.’ चित्र्यांच्या नावावर एवढा एकच विध्वंस जमा असला तरी दुबेंच्या नावे मात्र असे कैक विध्वंस जमा आहेत. नाटककाराच्या नाटकाची वासलात कशी लावायची हे दुबे पूरेपूर जाणत आणि आपल्या पद्धतीने ते त्याची ‘स्टार्ट फ्रॉम दि एंड’ किंवा ‘स्टार्ट फ्रॉम इन बिट्वीन’ अशी कशीही मांडणी करू शकत, नव्हे करतच. त्यासाठी नाटककाराशी भांडत. वर सांगत, ‘नाटककाराचं नाटक त्याच्यापेक्षा मला जास्त समजतं.’ आणि दुबेंचं हे म्हणणं खरंच होतं. नाटकाचा प्रयोगाच्या दृष्टीनं विचार दुबे ज्या शक्यतांनिशी करत, तो तेच करू जाणोत! याबाबतीत (तेंडुलकरांनंतर) ते कमालीचे वाकबगार होते.
दुबे हा माणूस स्टॉलवर्ट होता. त्यामुळे त्यांनी नाटकंही स्टॉलवर्ट लोकांचीच केली. धर्मवीर भारती, विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, बादल सरकार, मोहन राकेश, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार हे त्यांचे नाटककार; तर डॉ. श्रीराम लागू, अमरिश पुरी, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक, भक्ती बर्वे, सुलभा देशपांडे, विहंग नायक, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी हे त्यांचे नट. पण दुबे विशी-पंचविशीतल्या मुला-मुलींबरोबरही तेवढय़ाच तन्मयेतनं नाटक करत. तरुणांचा त्यांच्या भोवती कायम गराडा असे, विशेषत: मुलींचा.
‘गिधाडे’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकानं एकेकाळी महाराष्ट्रात मोठी खळबळ माजवली होती. सेन्सॉर बोर्डानं या नाटकातल्या गर्भपाताच्या लाल डागावर आणि अन्यकाही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर डॉ. लागूंपासून नाटय़क्षेत्रातल्या संबंधितांनी सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात आघाडी उघडली होती. तेव्हा दुबेंनी डॉ. लागूंना सुचवलं की, नाटकाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना सूचना करायची - ‘आम्ही निळा डाग दाखवतो आहोत. तो लाल आहे असं प्रेक्षकांनी समजावं.’ त्यानुसार डॉ. लागूंनी ती सूचना देऊन नाटकाचे प्रयोग केले. कायद्याची लढाई कायद्यानंच लढली पाहिजे, पण ती लढतानाही आपल्या विरोधकांना सभ्यपणानं कसं हास्यास्पद ठरवता येतं, याचं इतकं उत्तम उदाहरण दुसरं कुठलं असणार!
‘दुबे हे तीन अंकी गुरुकुल आहे’, ‘दुबे हा स्कूल ऑफ थॉट आहे’, ‘दुबे इज अॅन इन्स्टिटय़ूशन’ असं काहीही म्हणण्यात अर्थ नाही. कारण दुबे आता आपल्यात नसले तरी ते जिथे कुठे असतील तिथून आपल्याला मूर्खात काढणार. कारण संस्था वा संस्थान म्हटलं की, फॅसिझमला सुरुवात होते असं त्यांचं म्हणणं होतं. दुबे आक्रमकपणे, चढेलपणे आणि कधी कधी विक्षिप्तपणे वागत असले तरी ते पूर्णपणे लोकशाहीवादी होते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. यावर त्यांच्या मित्रांचं, शिष्यांचं, समकालीनांचं आणि शत्रूंचंही एकमत होईल.
दुबेंनी हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी अशा चारही भाषांमध्ये नाटकांचं दिग्दर्शन केलं. अनेक नाटकांचे इंग्रजीतून अनुवाद केले. त्यांचे प्रयोग केले. चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आणि नाटकांमध्येही काम केलं. याचवर्षी नाटय़समीक्षक शांता गोखले यांनी ‘सत्यदेव दुबे : अ फिप्टी इअर जर्नी थ्रु थिएटर’ हे दुबेंवरील पुस्तक संपादित केलं आहे. त्यात प्रत्येक दशकानुसार विभाग करून दिग्दर्शक, अभिनेता, नाटय़शिक्षक, नाटककार अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरणा-या दुबेंचा सर्वागीण आणि तपशीलवार आढावा घेतला आहे. साठच्या दशकात दुबेंच्या नाटय़कारकिर्दीला सुरुवात झाली. साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी, बंगाली, कन्नड आणि मराठी रंगभूमीवर दुबेंनी उलथापालथ घडवली. दिग्दर्शक म्हणून नाटकाचा अतिशय सखोलपणे विचार करण्याची आणि नाटककाराच्याही लक्षात येणार नाहीत अशा संहितेतील अनेक शक्यता आजमावून पाहण्याची दृष्टी दुबेंकडे होती.
दुबेंनी मराठी नाटकातली अध्र्यापेक्षा जास्त माणसं घडवली. नाटय़लेखन कार्यशाळा/नाटय़शिबिरं घेऊन अनेक तरुण रंगकर्मीना घडवलं. त्यांच्या कारकिर्दीला दिशा दिली. त्यांच्यामध्ये रंगभूमीकडे आणि अभिनयाकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी रुजवली. सतत नवे नवे प्रयोग करून पाहिले. नाटककारांना स्फूर्ती दिली. त्यांच्यातील सामर्थ्ये त्यांनाच उलगडून दाखवली. म्हणून नाटकानं झपाटलेल्या दुबेंचं वर्णन एकाच शब्दात करायला हवं. ते म्हणजे, दुबे द कॅटलिस्ट. गेल्या पाच दशकांमध्ये भारतीय रंगभूमीवर जी काही उलथापालथ घडवून आली, जे काही प्रयोग झाले, जे काही तरुण नाटककार, तरुण नाटय़कर्मी पुढे आले, त्यातल्या बहुतेकांचे दुबे हे कॅटलिस्ट होते, उत्प्रेरक होते. विज्ञानात समीकरणं घडून यायला कॅटलिस्ट लागतो, तो नसेल तर ते घडून येत नाही. भारतीय रंगभूमीवर तीच भूमिका पं. सत्यदेव दुबे यांनी निभावली आहे.