Sunday, August 21, 2011

सत्तर वर्षाचा तरुण


साधारणपणे 18 ते 35 हा वयोगट तरुण मानला जातो. अठराव्या वर्षी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळतो तर पस्तीशी हा तारुण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. या अर्थाने 1960 ते 80 हा डॉ. कुमार सप्तर्षी यांचा बहराचा काळ मानता येईल तर 65 ते 80 या काळाला ख-या अर्थाने ‘सप्तर्षी पर्व’ म्हणता येईल. वयाच्या 18 ते 25 या काळात प्रत्येकाची वैचारिक जडणघडण होते. या काळात आपल्यावर परिणाम करणारे घटक आपली आयुष्याबद्दलची एकंदर भूमिका ठरवत असतात.
 
सप्तर्षी अहमदनगर जिल्ह्यातील राशीन या दुष्काळी खेडेगावातून साठच्या सुमारास पुण्यात आले, तेव्हा 21 वर्षाचे होते. नगरच्या वास्तव्यात त्यांना राजकीय पक्ष, पुढाऱ्यांच्या सभा, मोर्चे, आंदोलने यांचा चस्का लागला होता. तो पुण्यात आल्यावरही कायम राहिला.
 
याच वेळी देशपातळीवर बरेच काही घडत होते. डॉ. श्रीराम लागू यांनी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘गाफिल पिढी’ असे केले आहे, तर सप्तर्षी स्वत:च्या पिढीचे वर्णन ‘आयडेंटीटी क्रायसिसमध्ये वाढलेली पिढी’ असे करतात. कारण 1962 साली भारताचे चीनबरोबर युद्ध झाले. या पराभवाने त्या वेळच्या तरुण पिढीमध्ये मोठे नैराश्य निर्माण झाले. त्यानंतर दोनच वर्षानी नेहरूंचा मृत्यू झाला. नंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. लगेच पाकबरोबर युद्ध झाले. ताश्कंदला असताना शास्त्रींचे आकस्मिक निधन झाले. 1967 निवडणुकांमध्ये काँग्रेसची एकाधिकारशाही उद्ध्वस्त झाली. राम मनोहर लोहिया यांनी ‘अँटी काँग्रेस’ची चळवळ सुरू केली. 67-68 या काळामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले. ही झाली त्यावेळची भारतातली परिस्थिती. साधारपणे याच काळात अमेरिकेत हिप्पी संस्कृतीचा उदय झाला होता. क्रुश्चेव्ह, चे गव्हेरा हे तरुणाइचे हिरो म्हणून पुढे येत होते. शेजाराच्या पाकिस्तानमध्ये आर्मीचे वर्चस्व वाढत होते तर बांगलादेशामध्ये बरेच अराजक माजले होते. म्हणजे भारतात आणि भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर अस्वस्थता होती. या परिस्थितीचा त्या वेळच्या तरुणाईवर मोठा परिणाम झाला. या साऱ्या घुसळणीतून ती तावूनसुलाखून निघाली. सप्तर्षी या काळाचंच अपत्य आहेत, हे नीट ध्यानात घेतल्याशिवाय त्यांचे योगदान नीटपणे समजून घेता येत नाही आणि त्यांचे विश्लेषणही करता येत नाही.
 
त्यातही सप्तर्षीचे वेगळेपण असे की, ते एका सामान्य खेडय़ातून आलेले होते. त्यांचे वडील त्या भागातले पहिले सरकारी डॉक्टर होते. अशा सुखवस्तू घरातला लाडका पण अभ्यासू मुलगा पुण्यात आल्यावर त्याला पंख फुटणे स्वाभाविक होते. एस. पी. कॉलजेनंतर ते वैद्यकीय शिक्षणासाठी बी. जे. मेडिकलला गेले. तिथे असताना सप्तर्षीनी तत्त्वज्ञानावरची पुस्तके आणि टॉलस्टॉय, गांधी, लेनिन, माओ यांच्या पुस्तकांची पारायणे केली. त्या वेळी बी. जे.तले डॉक्टर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे चांगल्या प्रकारे समाजजीवनाशी निगडीत होते. डॉ. अनिल अवचट,   डॉ. अनिल लिमये, डॉ. जब्बार पटेल, डॉ. सतीश आळेकर ही काही नावे वानगीदाखल सांगता येतील. तर पुण्यात राजकीय-समाजिक-सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवनव्या घडामोडी घडत होत्या. एसेम जोशी, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, ग. प्र. प्रधान, नानासाहेब गोरे या समाजवादी नेत्यांकडे ही तरुण मंडळी आकर्षित होऊ लागली. समाजवादी, संघपरिवार यांच्या संस्था-संघटनांनी चांगली घुसळण चालवली होती. त्यामुळे त्या वेळच्या तरुण पिढीला आपण काहीतरी करावे असे वाटत होते.
 
‘युक्रांद’ची स्थापना म्हणजे पुण्यातले बौद्धिक वातावरण, राष्ट्रीय अस्वस्थता आणि घरचे टिपिकल ब्राम्हणी वातावरण यातून सप्तर्षीमधल्या तरुणाची जडणघडण झाली आहे. 1965 साली सप्तर्षीनी ‘यूथ ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या वेळी ते 26 वर्षाचे होते. या त्यांच्या संघटनेने विद्यार्थ्यांची अनेक आंदोलने केली. पूनम हॉटेलमध्ये वेटरची कामे करून, बूटपॉलिश करून बिहारमधील दुष्काळग्रस्तांसाठी 26,000 रुपयांचा निधी पाठवला. शिवाय 67च्या मे महिन्यात गया जिल्ह्यातील रजौली गावी (आता नवादा जिल्हा) अनिल अवचट आणि सप्तर्षीनी दोन महिने दवाखाना, कार्यकर्त्यांसाठी खाणावळ चालवली. बिहारहून आल्यावर, काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणांनी ‘युक्रांद’ची स्थापना केली. या दलाचे मार्गदर्शक होते, प्रा. राम बापट, गं. बा. सरदार आणि दि. के. बेडेकर. या मान्यवरांना तरुण पिढीकडून चांगल्या अपेक्षा होत्या. भारत स्वतंत्र झाला असला तरी सामाजिक-राजकीय पातळीवर आमूलाग्र बदलाची गरज त्यांनी जाणवत होती, त्यामुळे ते तरुणाईवर भिस्त ठेवून होते. 

 ‘युक्रांद’ची स्थापना सिंहगडावरील लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात झाली. त्या वेळी 40 तरुणी आणि 60 तरुण, असा 100 युवकांचा गट सप्तर्षि-अवचट यांनी तयार केला होता. क्रांती झाल्याशिवाय भारत सामर्थ्यशाली होणार नाही, म्हणून क्रांती करायची. पण कशी, तर आधी वैचारिक क्रांती, नंतर सामाजिक सुधारणा आणि मग सर्वागीण क्रांती असे त्यांचे तीन टप्पे होते. त्यावर सप्तर्षीचा आजही विश्वास आहे. या त्रिसूत्रीपासून ते आजही ढळलेले नाहीत. ‘आम्ही विद्यार्थी आणि आमच्या दंगली’ ही त्यांची पुस्तिका तेव्हा प्रकाशित झाली. ती वाचून पु. ल. देशपांडे, एसेम जोशी यांनी त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ‘माणूस’च्या माजगावकरांनी ती आपल्या अंकात छापली. ‘आम्ही विद्यार्थी दंगली करणार. का करू नयेत?’ अशी भूमिका सप्तर्षीनी या पुस्तिकेमध्ये मांडली होती.
 
‘युक्रांद’ची चार सूत्रे होती- 1) स्त्री-पुरुष समानता, 2) जातीपातीला विरोध, 3) धर्मनिरपेक्षता आणि 4) ग्रामीण-शहरी भागातली दरी मिटवणे. या चारही संस्कारांनी त्या वेळचा प्रत्येक युक्रांदी आणि युक्रांदच्या संपर्कातला तरुण झपाटून गेला होता. या चार संस्कारांनी त्या वेळच्या अनेक तरुणांना घडवले. नंतर काही कारणांनी युक्रांदमधून बाहेर पडलेल्यांनीही स्त्री-पुरुष समानतेबाबत आपल्यापरीने प्रयत्न केले. त्याची सुरुवात स्वत:पासून केली. जातीपातीला विरोध करण्यासाठी जाणीवपूर्वक आंतरजातीय लग्ने केली. धर्मनिरपेक्षतेचा लढा हा संघाच्या जातीयवादी प्रचाराला टक्कर देण्यासाठी उभारलेला लढा होता. त्या वेळची तरुण पिढी ही आता साठी-सत्तरीची आहे. आणि ती सर्व आजही ‘युक्रांद’चे योगदान मान्य करते. त्यात मुकुंद टाकसाळे, नरेंद्र दाभोळकर, नीलम गोऱ्हे, आनंद करंदीकर, प्रभाकर करंदीकर, सुरेश खोपडे, बबनराव पाचपुते, शांताराम पंदेरे, विलास भोंगाडे अशा अनेकांचा समावेश आहे. 77 साली युक्रांदमध्ये मतभेद झाल्यावर सप्तर्षी बाहेर पडले, तेव्हा ते पस्तीशीचे होते. मात्र 67 ते 77 या दहा वर्षाच्या काळात तत्कालीन तरुण पिढीला सुसंस्कारित करण्यात सप्तर्षी यांचा फार मोठा वाटा आहे.
 
आणीबाणी 1975 ला आली, त्याआधीच जेपींचे भ्रष्टाचारविरोधी देशव्यापी आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे इंदिरा गांधींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना झाली. ते सत्तेवर आले, पण त्यांचे सरकार जेमतेम अडीच वर्षेही टिकले नाही. या काळात सप्तर्षी महाराष्ट्रात होते. 80 नंतर तर जनता पक्ष पूर्णपणे भरकटला. भाजपने वेगळा मार्ग आखला, समाजवाद्यांचे पूर्ण विघटन होऊन अनेक समाजवादी राजकीय परिघाबाहेर- एनजीओंमध्ये गेले. क्रांतीची स्वप्ने पाहणा-या सप्तर्षीसारख्यांना या उलथापालथीने काहीसे निराश केले.
 
1967 ते 83 या काळात आजवर सप्तर्षीना एकंदर पस्तीस वेळा तुरुंगवास झाला आहे. 1973 साली सप्तर्षीनी पुण्यात पुरीच्या शंकराचार्याबरोबर जाहीर वादविवाद केला. 1967 मध्ये पुण्यातील महाविद्यालयांनी केलेल्या फीवाढ विरोधी आंदोलनापासून ते 83 मध्ये राहुरीच्या कृषी विद्यापीठाच्या ‘कुलगुरू हटाव’ मोहिमेपर्यंतची सप्तर्षीची सर्व आंदोलने ही विद्यार्थ्यांसाठीची आहेत. त्यांचा परीघ पुण्यापुरता मर्यादित नाही तर तो महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. ऐंशीच्या दशकात सप्तर्षी महाराष्ट्रातल्या तरुणांचे हिरो होते, ते यामुळेच.
 
80-90 या दशकात सप्तर्षीनी वेगवेगळे प्रयोग केले. राशीनला शाळा-कॉलेज काढले, आसपासच्या गावांमध्ये शेतीचे प्रयोग केले. जनता दलाच्या तिकिटावर नगरमधून दोन वेळा खासदारकीची निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना यश आले नाही.
 
दुसरे पर्व
 
1991 साली सप्तर्षीचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यांनी ‘सत्याग्रही विचारधारा’ हे वैचारिक मासिक सुरू केले. त्या वेळी माध्यमांचे आजच्या इतके वैपुल्य नव्हते. त्यामुळे ‘सत्याग्रही विचारधारा’ वैचारिक मासिक म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांपर्यंत पोहचले. 2001 पर्यंतचा काळ सप्तर्षीचा संपादक म्हणून बहराचा काळ होता. 2001ला त्यांनी ‘युक्रांद’चे पुनरुज्जीवन केले.
 
संपादक म्हणून सप्तर्षीनी जातीयवादी, धर्माध शक्ती आणि काँग्रेसची सरंजामशाही यांच्याबाबतची आपली भूमिका सातत्याने मांडली आहे. विश्व हिंदू परिषद, भाजप आणि महाराष्ट्रातल्या प्रांतीय संघटना या धर्माध शक्ती; शिवसेना, मराठा महासंघ, ब्राम्हणांच्या संघटना, दलितांच्या अस्मितेवर आधारित संस्था-संघटना हे जातीयवादी प्रवाह आणि काँग्रेसची संरजमाशाही या सर्वावर सप्तर्षीनी सडेतोड आणि अतिशय मुद्देसूद टीका केली आहे. याचबरोबर समाजवाद्यांमधील गट-तट आणि त्यांच्या भोंगळपणावरही ते टीका करत आले आहेत. हा त्यांचा पोलिटिकल करेक्टनेस हेच त्यांचे 90 नंतरचे महत्त्वाचे योगदान आहे, वैचारिक बलस्थान आहे. करेक्टिव्ह फॅक्टर म्हणून भूमिका बजावताना ते कुणाच्याही आहारी गेले नाहीत, त्यांनी कुणाचाही अनुनय केला नाही, हे त्यांचे वैचारिक मोठेपण.
 
व्यसन हेच टॉनिक
 
खाणे आणि गप्पा हे सप्तर्षीचे दोन महत्त्वाचे वीकपॉइंट्स आहेत. आजही त्यांच्याभोवती सतत तरुणांचा गराडा असतो. कुठल्याही तरुणाशी त्यांची पहिल्या पाच मिनिटांत मैत्री होते. कुठल्याही तरुणाला त्यांचे बोलणे दोन-तीन तास ऐकत राहावेसे वाटते. असे महाराष्ट्रात किती लोक आहेत? आजच्या तरुणाईबद्दल फारसे काही बरे बोलले जात नाही. पण सप्तर्षीना विचारले तर ते या तरुण पिढीचे गुणगानच करतील. ते तरुणाईबद्दल अजिबात निराश नाहीत आणि स्वत:च्या आजवरच्या यशापयशानेही त्यांना नैराश्य आलेले नाही. एवढा मोठा काळ पाहिलेल्या, त्यातही उमेदीच्या काळात सक्रिय राहिलेल्या माणसांना उतारवयात नैराश्य येते. ती फार नकारात्मक बोलतात, असा सार्वजनिक अनुभव आहे. पण सप्तर्षी तिथेही आपली विकेट काढतात. त्यांनी स्वत:ला भयंकर भयग्रस्ततेतून वाचवलेले आहे आणि आजच्या तरुणाईलाही आपल्या परीने वाचवायचा ते प्रयत्न करत आहेत.
 
तरुण मुले त्यांचे का ऐकतात? कारण ते तरुणाईच्या भाषेत बोलतात, त्यांना अपील होईल असे बोलतात. पोलिटिकली-सोशली-कल्चरली करेक्ट काय आहे, हे नेमकेपणाने सांगतात. त्यासाठी या माणसाकडे प्रचंड उत्साह आहे. तो सतत उत्साहाने फसफसलेला असतो. त्यामुळे तुम्ही कितीही प्रश्नांचे जंजाळ त्यांच्याकडे घेऊन गेलात तरी ते ऐकणाऱ्याचे समाधान होईपर्यंत खुलासेवार बोलतील, प्रश्नांशी भिडण्याची खिलाडूवृत्ती समजावून सांगतील. गप्पा मारायला ते सदैव तयार असतात. ते त्यांचे व्यसन इतके दांडगे आहे की, त्यालाच त्यांनी आपले टॉनिक बनवले आहे. त्यांच्या या गप्पांमध्ये कधीच म्हातारेकोतारे नसतात, तर लातूर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर-कोल्हापूर या जिल्ह्यांमधून आलेली तरुण मुले असतात. सतत तरुणांच्या गराडय़ात असलेल्या सप्तर्षीना चिरतरुणही म्हणवत नाही. ते तरुणच आहेत!
 त्यामुळे आज त्यांना त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणा-याला ते म्हणतील, ‘तू माझा शत्रू आहेस का? की माझ्या शत्रूने तुला पाठवलेय?’

Sunday, August 14, 2011

सर्वव्यापी, सर्वज्ञानी जनलोकपाल!

 
‘मनुष्यघडणीमध्ये शारीरिक कष्टांचं महत्त्व कुणी नाकारत नाही पण मेंदू बिथरलेला असेल आणि अकलेचं भांडं लहान असेल तर कष्टातून तरी कोण काय शिकेल? इतरांना  देण्यासारखं त्याच्याकडे काय उरेल? आजही हा सत्प्रवृत्त पण अडाणी गोंधळ संपलेला नाही. अण्णा हजारे यांना ते केवळ निर्भय आणि तळमळीचे आहेत एवढय़ा एकाच कारणासाठी गुरू मानणारे अपराधी सुशिक्षित काही थोडे नाहीत.’’ 
-विनय हर्डीकर, विठोबाची आंगी, 2005 
 
‘‘सामाजिक प्रश्न प्रदर्शनात्मक मार्गाने सुटू शकतील का, हा विचार या आत्मिक व नैतिक सामर्थ्य लाभलेल्या अत्यल्पसंख्य व्यक्तींनी करणे आवश्यक आहे. बहुसंख्य नागरिक स्वेच्छेने वा अपरिहार्यपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असताना, हे होणे शक्य नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी सामाजिक नीतिमत्ता बदलली पाहिजे.’’
- अरुण टिकेकर, तारतम्य, 1994
 
भ्रष्टाचाराच्या विरोधात गेली 10-12 वर्षे सातत्याने आवाज उठवणा-या अण्णा हजारे यांनी गेले काही महिने ‘जनलोकपाल विधेयका’च्या निमित्ताने पुन्हा एकदा या देशातल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कंबर कसली आहे. दिल्लीमध्ये 16 ऑगस्टपासून सुरू होणारे त्यांचे बेमुदत उपोषण या आंदोलनाचा एक उत्कर्ष बिंदू ठरण्याची शक्यता आहे. अण्णांच्या या आंदोलनाच्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. 


भ्रष्टाचाराविरोधात इतकी वर्षे लढा देऊनही अण्णांचे नेतृत्व वा आंदोलन महाराष्ट्राच्या सीमेबाहेर फारसे गेले नव्हते. ते ‘जनलोकपाल’च्या निमित्ताने एकदम राष्ट्रीय पातळीवर गेले. अगदी टीव्हीच्या माध्यमातून अण्णा देशभरात, घरोघरी पोहोचले. सध्या अण्णांवर प्रसिद्धीचा मोठा झोत आहे. होऊ घातलेल्या उपोषणाकडे संबंध देशातल्या जनतेचेच नव्हे तर जगातल्याही अनेक देशांचे लक्ष लागलेले आहे. पण राष्ट्रीय स्तरावर जाऊनही अण्णांच्या आंदोलनाचा फॉर्म्युला काही बदललेला दिसत नाही.
 
अण्णांचा भ्रष्टाचाराबाबतचा निर्धार स्तुत्य असाच आहे, पण तो व्यवहार्य आहे का, हा कळीचा आणि मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आहे. दुसरे, अण्णांचा प्रामाणिकपणा आणि सचोटीबद्दल शंका घेण्याचे धाडस कुणीच करणार नाही, इतक्या या गोष्टी वादातीत आहेत. पण टीम अण्णांच्या ‘जनलोकपाल विधेयका’बाबत आणि त्यांच्या त्याबाबतच्या टोकाच्या आग्रहाबाबत शंका घ्यावी, असाच प्रकार आहे!
 
सुरुवातीला टीम अण्णांच्या केंद्र सरकारबरोबर लोकपाल मसुद्याबाबत चर्चेच्या फे-या होत असताना शांती भूषण यांनी ‘आपण नवी घटना बनवत आहोत’ असे सरकारी समितीतील सदस्यांना सुनावले होते, तेव्हाचे कायदामंत्री विरप्पा मोइली यांनी त्यांना तत्काळ अडवून, ‘तो कौल आपल्याला अजून जनतेने दिलेला नाही’ असे ऐकवले होते. पण टीम अण्णा त्या गैरसमजातून अजूनही बाहेर आलेले नाहीत, याचे मूर्तिमंत प्रतिबिंब त्यांच्या जनलोकपालाच्या मसुद्यामध्ये पडलेले आहे. अनेक परस्परविसंगती, हेकेखोरपणा, अल्पसमज, काही वेळा बोलवांवर विश्वास आणि अपुऱ्या आकलनातून त्यांचे निकर्ष आलेले आहेत, अशी खात्री त्यांचा मसुदा वाचल्यानंतर कुणाही सुबुद्ध माणसाची होईल.
 
मुळात मतभिन्नता आहे ती, लोकपाल विधेयकाबाबत सरकारच्या आणि टीम अण्णांच्या दृष्टिकोनात. सरकारला लोकपाल ही यंत्रणा आहे त्या व्यवस्थेत आणि मर्यादेत राहून करावी अशी माहितीचा अधिकार कायद्यासारखी, पण त्यापेक्षा सक्षम असावी असे वाटते. माहिती अधिकार कायद्याची परिणामकारकता पाहिली तर, आहे त्या व्यवस्थेतही शासनव्यवस्थेला, गैरकारभारांना कसा आळा घालता येतो, याची काही प्रमाणात तरी खात्री पटते. गंमत म्हणजे या कायद्याबाबत अण्णा हजारे यांचाच पुढाकार होता. महाराष्ट्रात हा कायदा पहिल्यांदा लागू करण्यात अण्णांचेच योगदान आहे. हा कायदा न्याय्य आणि संसदीय परंपरेचे भान ठेवणारा आहे. प्रत्यक्ष शिक्षा करण्याचा कुठलाही अधिकार नसताना तो आपल्या मर्यादेतही चांगले काम करत आहे हे अण्णा स्वत:ही कबूल करतील. गेल्या दोन-अडीच वर्षात भारतभरात आठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्त्या झाल्या, हे निषेधार्ह आहेच, पण यातून या कायद्याचा वचकही सिद्ध होत नाही काय? त्याबाबत कोणत्याही प्रकारचा विचार न करता, नव्या कायद्यासाठी सर्वाना वेठीला धरायचं हा दुराग्रह ठरेल.
 
एकदा म्हणायचे या देशातली न्यायव्यवस्था ब-यापैकी निर्दोष आहे, गेल्या 54 वर्षात भारतात लोकशाही रुजवण्यात न्यायव्यवस्थेचा मोठा वाटा आहे.. नंतर म्हणायचे न्याययंत्रणाही लोकपालाच्या कक्षेत हवी. त्यात सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांचाही समावेश हवाच. कारण का, तर ‘काही न्यायाधीशांच्या संशयास्पद व्यवहाराच्या बातम्या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्याचे ऐकण्यात येते.’- अशी मोघम विधाने ‘जनलोकपाल’च्या प्रचारापत्रकांत छापली जाताहेत.
 
‘जनतेसमोर खटल्याचा निवाडा होईल म्हणजे पारदर्शकता येईल’ हा टीम अण्णांचा सल्ला फार आकर्षक आणि गोंडस असला तरी तो अजिबात व्यवहार्य नाही. शिवाय ही जनता नेमकी कोण आणि किती असेल हेही या विधेयकात स्पष्ट नाही. यामुळेच तर टीम अण्णांचे विधेयक केंद्र सरकारला आणि देशातल्या बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मान्य नाही.

 दीर्घकालीन आणि अतिशय जटिल स्वरूपाच्या समस्येवरची उपाययोजनाही तितकीच दीर्घकालीन आणि जबाबदार स्वरूपाची असावी लागते. त्यासाठी प्रत्येक वेळी नव्या व्यवस्थेचा पर्याय असू शकत नाही. आहे त्या यंत्रणांचा सक्षमपणे वापर केला तरी खूप काही करता येऊ शकते. मात्र या यंत्रणा सक्षम करण्यासाठी काहीच प्रयत्न करायचे नाहीत, तशा शक्यताही गृहीत धरायच्या नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, प्रश्नांची गुंतागुंत टीम अण्णांना समजून घ्यायची नसावी वा ती त्यांना समजलेली नसावी. त्यांच्या आग्रहातून तरी तसेच चित्र निर्माण होत आहे. टीम अण्णा फक्त समस्येचे सुलभीकरण करण्याच्या नि झटपट तोडगा काढण्याच्या मागे आहे. त्यामुळे टीम अण्णांना लोकशाही शासनव्यवस्था तरी नीट कळली आहे का, याचीही शंका येते. 
  
समजा टीम अण्णांच्या जनलोकपालातील तरतुदीनुसार एक समांतर न्यायव्यवस्था निर्माण केली तरी त्यासाठीची प्रामाणिक, स्वच्छ चारित्र्याची आणि कर्तव्यदक्ष माणसे आणणार कुठून? कारण ‘भ्रष्टाचाराने संपूर्ण देशात थैमान घातले आहे, सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य झालेले आहे, कुठेही गेले तरी पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही’ असे निदान टीम अण्णाच करत आहे. शिवाय जनलोकपालाच्या चौकशीची पद्धत भारतीय राज्यघटनेतल्या फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारच असेल असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे प्राथमिक चौकशीनंतर फिर्याद दाखल केली जाईल. नंतर तपास होईल व न्यायालयात खटला दाखल केला जाईल. या प्रक्रियेनुसारच खटल्यांचा न्यायनिवाडा करण्यासाठी तालुका स्तरापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत एक मोठी यंत्रणा देशात कार्यरत आहे. तिथे दाखल होणारे खटले, त्यांचा तपास, साक्षी-पुरावे यात एवढा वेळ जातो की, काही काही खटल्यांचा निकाल लागायला पंचवीस-तीस वर्षे लागतात. शिवाय शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे भारतीय न्यायव्यवस्थेचे मूलभूत तत्त्व आहे. त्यानुसार आरोपीला त्याच्या बचावाची पूर्ण संधी दिली जाते. न्यायालयात पुरावे सिद्ध करणे किती अवघड असते हे टीम अण्णांनाही चांगले माहीत असावे. तेव्हा जनलोकपालांची यंत्रणाही न्यायव्यवस्थेप्रमाणे काम करणार असेल, ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते पंतप्रधानांपर्यंत सर्वाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असेल, तर त्यांचाही प्रत्येक खटल्याचे साक्षी-पुरावे तपासण्यामध्ये वेळ जाईल की नाही? की खटला समोर आल्या-आल्या ‘छू मंतर’ करून त्याचा निकाल दिला जाईल?
 
म्हणजे अण्णांचे लोकपाल आणि लोकायुक्त सर्वज्ञानी, सर्वव्यापी परमेश्वरच असावे लागतील. इतक्या जादुई वेगाने काम करणे कुठल्याही मनुष्यप्राण्याला शक्य होईल असे वाटत नाही. त्यामुळे असा प्रकार एखाद्या कथा-कादंबरीतल्या फँटसीमध्येच घडू शकतो. थोडक्यात टीम अण्णा एका अवास्तव ‘युटोपिया’मध्ये वावरत आहे.
 
एका मर्यादित अर्थाने अरुण भाटिया, गो. रा. खैरनार आणि टी. एन. शेषन यांच्याशी टीम अण्णांचे साम्य दिसते. निर्भीड आणि स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्ती या भाषणातल्या मिनिटामिनिटाला टाळी घेणाऱ्या वाक्यासारख्या असतात! त्यात वास्तवाची आणि भाकितांची अद्भुत सरमिसळ असते. म्हणून त्या हिरो होतात. समाज त्यांना डोक्यावर घेतो. या कारणांमुळे प्रशासनातला भ्रष्टाचार, गैरव्यवहार निपटून काढण्याचा प्रयत्न करणारे सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातले ताईत होतात. त्यांची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ होते. ते स्वत:ही तिच्या मोहात पडतात आणि आपण आधी प्रशासकीय अधिकारी आहोत, जबाबदार नागरिक आहोत हे विसरून जातात. त्याचे पर्यवसान स्वत:च्याच कारकिर्दीचा आत्मघात करून घेण्यात होतो. देशातला सर्व भ्रष्टाचार निपटून काढण्याचे उत्तरदायित्व आपल्याकडेच आहे आणि आपणच ते करू शकतो, या चढेल अहंकारानेच प्रशासनाचे आणि पर्यायाने समाजाचेही नुकसान होते. त्यातून प्रशासन सुधारत नाही अन् समाजालाही दुसरे भाटिया-खैरनार-शेषन घडवण्याच्या शक्यता दिसत नाहीत.
 
अण्णा वृत्तवाहिन्यांच्या कार्यक्रमांमधून, जाहीर भाषणांतून ‘काळे इंग्रज, गोरे इंग्रज’, ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’, ‘लोकपाल नहीं तो, चले जाव’ अशा आकर्षक घोषणा देऊन जनतेला भावनिक आव्हानांच्या पेचात  पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. जनताही शासकीय अनास्था, दिरंगाई आणि अनागोंदीला, सततच्या महागाईला विटलेली असल्याने अण्णांच्या या प्रलोभनाला बळी पडत असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र सामाजिक नीतिमत्तेच्या आणि सार्वजनिक चारित्र्याच्या संकल्पनेत या गोष्टी बसत नाहीत, हे समजून घेण्याची गरज आहे. 

 अण्णांच्या या आग्रहाच्या दुराग्रहामुळेच त्यांच्या याआधीच्या आंदोलनांना सुरुवातीला समर्थन देणारे, जाहीर पाठिंबा देणारे आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षि, भाई वैद्य, सदाशिवराव तिनईकर, जे. एफ. रिबेरो, अविनाश धर्माधिकारी यांच्यासारखे अनेक लोक नंतर अण्णांपासून दुरावले. कारण आंदोलनाचा परीघ न्याय्य मार्गानी वाढवण्याऐवजी अण्णांमध्ये स्वत:लाच प्रत्येक वेळी मोठे करण्याची ‘नेकेड अ‍ॅम्बिशन’ निर्माण होत राहिली आहे. परिणामी अण्णांची आजवरची आंदोलने फारशी यशस्वी झाली नाहीत. परवाही मुंबईत अण्णा म्हणाले, ‘समाजासाठी काम करता यावं म्हणूनच मी लग्न केलं नाही.’ आपल्या निस्पृहतेचे पुरावे सतत देण्याची गरज भासणे, विशेषत: ते जनतेला माहीत असतानाही, याला जनतेची सुहानुभूती मिळवण्याचा खटाटोपच म्हणता येऊ शकते. 


त्याचे काही दुष्परिणाम आताच दिसू लागले आहेत. सुरुवातीला ठामपणे अण्णांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या, त्यांना वारेमाप प्रसिद्धी देणाऱ्या काही वृत्तवाहिन्या आणि  वृत्तपत्रांनीही अण्णांच्या आंदोलनाबाबतचा आपला प्राधान्यक्रम बदलायला सुरुवात केली आहे. समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचा हा कल टीम अण्णा समजून घेत नसेल, तर ती या टीमची आत्मवंचनाच ठरण्याची शक्यता आहे.
 
काही वर्षापूर्वी शरद पवारही ‘अण्णांना निस्पृहतेचा गर्व झाला आहे’ असे म्हणाले होते. त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. ‘निस्पृहतेचा गर्व’ ही चांगलीच गोष्ट आहे. पण ती समाजाच्या भल्यासाठी वापरली जाते की स्वत:च्या मागण्यांसाठी, हेही पाहायला हवे. सध्या असे चित्र दिसते आहे की, अण्णा सरकार आणि जनतेचेही इमोशनल ब्लॅकमेलिंग करत आहेत.
 
थोडक्यात टीम अण्णाही सध्या जनलोकपालाचे दिवास्वप्न दाखवून सिव्हिल सोसायटीकडून स्वत:चीच प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करून घेत आहे. मात्र हे करताना आपण देशाच्या लोकशाहीला, घटनात्मक सार्वभौमत्वालाच आव्हान देतोय, याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. ‘आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा’ या टोकाच्या हेकेखोरपणातून आपण हुकूमशाही प्रवृत्तीचेच दर्शन घडवत आहोत, याचे साधे भानही टीम अण्णांना राहिलेले नाही, ही शोचनीय बाब म्हणावी लागेल.