Saturday, September 12, 2015

उन्मादखोर आणि अराजकवादी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांनी सबंध भारतीय साहित्यविश्व, विचारविश्व आणि सामाजिक चळवळी हादरून गेल्या आहेत. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर लगेच कन्नडमधील के. एस. भगवान यांना ‘...आता तुमचा नंबर’ असं सांगितलं गेलं. नुकतंच त्यांना धमकीचं पत्रही पाठवलं गेलं. महाराष्ट्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनाही धमकीचं पत्र आल्याने त्यांनाही संरक्षण पुरवलं गेलं आहे. या साऱ्या प्रकारांमुळे एकंदर भारतीय साहित्यजगतात मोठ्या प्रमाणावर हताशा, उद्वेग आणि निराशा पसरली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारेही याबाबतीत फारशी जागरूक आहेत, असं दिसत नाही. तर दुसरीकडे सांप्रदायिक संघटनांची अरेरावी, मुजोरी आणि अघोरी कृत्यं वाढतच चालली आहेत. या साऱ्या प्रकारानं उद्विग्न होऊन हिंदीतील स्टार कथा-कादंबरीकार उदय प्रकाश यांनी मागच्या आठवड्यात साहित्य अकादमीने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचं आपल्या फेसबुक वॉलवर जाहीर केलं. ते असं-
“पिछले समय से हमारे देश में लेखकों, कलाकारों, चिंतकों और बौद्धिकों के प्रति जिस तरह का हिंसक, अपमानजनक, अवमानना पूर्ण व्यवहार लगातार हो रहा है, जिसकी ताज़ा कड़ी प्रख्यात लेखक और विचारक तथा साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित कन्नड़ साहित्यकार श्री कलबुर्गी की मतांध हिंदुत्ववादी अपराधियों द्वारा की गई कायराना और दहशतनाक हत्या है, उसने मेरे जैसे अकेले लेखक को भीतर से हिला दिया है।
अब यह चुप रहने का और मुँह सिल कर सुरक्षित कहीं छुप जाने का पल नहीं है। वर्ना ये ख़तरे बढ़ते जायेंगे।
मैं साहित्यकार कुलबर्गी जी की हत्या के विरोध में ‘मोहन दास’ नामक कृति पर २०१०-११ में प्रदान किये गये साहित्य अकादमी पुरस्कार को विनम्रता लेकिन सुचिंतित दृढ़ता के साथ लौटाता हूँ।
अभी गाँव में हूँ। ७-८ सितंबर तक दिल्ली पहुँचते ही इस संदर्भ में औपचारिक पत्र और राशि भेज दूँगा।
मैं उस निर्णायक मंडल के सदस्य, जिनके कारण ‘मोहन दास’ को यह पुरस्कार मिला, अशोक वाजपेयी और चित्रा मुद्गल के प्रति आभार व्यक्त करते हुए, यह पुरस्कार वापस करता हूँ।
आप सभी दोस्तों से अपेक्षा है कि आप मेरे इस निर्णय में मेरे साथ बने रहेंगे, पहले की ही तरह।”

एरवी भारतीय लेखक भूमिका घेत नाहीत, अशी बोंब अनेक तथाकथित विद्वान ठोकत असतात. पण एखाद्या लेखकाने भूमिका घेतलीच तर हेच महानुभाव त्याचा कसा सोयीस्कर अर्थ लावून आपले जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतात, याचा उत्तम नमुना यानिमित्ताने सध्या हिंदीमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात हिंदी साहित्यजगतातील काही साहित्यिकांनी उदय प्रकाश यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जेव्हा टीकेमागील हेतू केवळ आणि केवळ समोरच्या व्यक्तीची खिल्ली उडवणं हाच असतो, तेव्हा उघड आहे की, अशा प्रकारची टीका हे विशिष्ट हेतूने प्रेरित असते. उदय प्रकाश यांच्यावर टीका करणारे त्याच मानसिकतेतून टीका करत आहेत. बरे हे कुणी सामान्य लेखक नाहीत, तर हिंदीतील मान्यवर साहित्यिक आहेत. उदा. विष्णु खरे हे हिंदीतील मान्यवर कवी-समीक्षक. त्यांनी उदय प्रकाश यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे, ‘साहित्य अकादमीकडे पुरस्कार परत घेण्याची तरतूदच नाही. त्यामुळे उदय प्रकाश यांची कृती केवळ एक नाटक ठरते. सरकार, न्यायालय, राष्ट्रपती यांच्यापर्यंत ही गोष्ट नेण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल. ते न करता अशा प्रकारच्या चतुर कृतीतून काहीच साध्य होऊ शकणार नाही.’ दुसरे मान्यवर साहित्यिक आहेत सुधीश पचौरी. त्यांचं म्हणणं आहे, ‘उदय प्रकाश ने ऐसा करके अपना ‘पाप प्रक्षालन’ किया है।’
अनंत विजय या पत्रकाराने लिहिलं आहे, ‘हा स्वस्त लोकप्रियतेचा प्रकार तर नाही? हत्येवर राजकारण केलं जाऊ नये. मारेकऱ्यांना पकडलं जावं, त्यांना जास्तीतजास्त शिक्षा केली जावी, अशी इच्छा असायला हवी.’ काही वर्षांपूर्वी उदय प्रकाश यांनी एक पुरस्कार स्वीकारला होता. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. तेव्हा त्यांचा आत्मसन्मान कुठे गेला होता, असाही प्रश्न या पत्रकाराने उपस्थित केला आहे.
सुदैवाने अशा टीकाकारांची संख्या कमी आहे. याउलट उदय प्रकाश यांच्या कृतीचं समर्थन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यापैकी अरुण महेश्वरी आणि प्रभात रंजन यांनी या टीकाकारांना  समर्पक उत्तरं देऊन त्याचा प्रतिवादही केला आहे.
पण मुद्दा आरोपाला प्रत्युत्तर करण्याचा नाही, तर उदय प्रकाश यांच्या या कृतीकडे कसं पाहावं हा आहे. पण नेमका त्याचाच अभाव आहे. समजा उदय प्रकाश यांनी पुरस्कार परत करण्याऐवजी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं असतं, तर किती लोक त्यात सामील झाले असते? फार फार तर एक हजार, दोन हजार, पाच हजार, दहा हजार, पन्नास हजार... पण सरकारला नमवण्यासाठी ते पुरेसं झालं असतं का? महाराष्ट्रात दाभोलकर यांची हत्या होऊन दोन वर्षं झाली आहेत आणि पानसरे यांची हत्या होऊन सहा महिने. या काळात महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळींनी काय कमी आंदोलने केली? त्यांनी काय लेख लिहिले नाहीत? मुख्यमंत्री, न्यायालय यांची दारे ठोठावली नाहीत? हे सर्व केल्याने सरकारवर थोडातरी वचक रािहला. तपास संथ गतीने का होईना चालू आहे. पण न्यायासाठी संघर्ष करण्याचा हा केवळ एक मार्ग झाला. दुसऱ्या मार्ग हा प्रतीकात्मक असतो. ज्यांच्याकडे कुठलीही संघटना नसते, चळवळ नसते असे लोक हे प्रतीकात्मक कृतीतूनच सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. उदय प्रकाश यांनी त्याची निवड केली तर त्यांचं काय चुकलं?
पण ते समजून घेण्याची दृष्टी या टीकाकारांकडे नाही. तशी ती कुठल्याच टीकाकारांकडे नसते. मराठीतही नुकताच असा प्रकार झाला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारावर भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्यांनी टीका केली, तेव्हा त्यांच्यावरही मराठीतल्या पचौरी-खरेनामक प्रवृत्तींनी अशाच प्रकारे टीका केली होती. हे सर्व लोक पुरंदरेसमर्थक होते असंही नाही. उलट त्यातले अनेकजण कुठल्याच बाजूचे नव्हते. पण तरीही त्यांना ती टीका समजून घेता आली नाही.
आपण ज्यांचे समर्थक आहोत किंवा ज्या विचारसरणीचा पुरस्कार करतो, त्यांच्याविषयी इतर कुणी टीका केली आणि ती कितीही सभ्य असली तरी त्याचा प्रतिवाद असभ्य भाषेतच केला जातो. कुठल्या तरी विचाराच्या दावणीला बांधून घेतल्याने माणसाच्या समग्र आकलनाला मर्यादा पडतात. त्यामुळेे ते एक वेळ क्षम्यही मानता येईल. पण तसे नसलेल्यांकडेही टीका समजून घेण्याइतपत मनाचा मोकळेपणा का नसतो? ते इतके असमंजसपणे का व्यक्त होतात? कारण या किंवा त्या बाजूचे नसलेल्यांकडे तारतम्य, विवेकबुद्धी असलेच असे नाही. उलट त्यांच्याकडेही ‘लव्ह अँड हेट’ असाच चष्मा असतो, हे आजच्या धार्मिक उन्मादाच्या काळात वारंवार सिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे खेदानं असं म्हणावं लागतं की, सांप्रदायिक उन्मादखोरांमध्ये आणि या हल्लेखोरांंमध्ये व्यक्त होण्याच्या बाबतीत तरी फारसा फरक नाही. अगदी अचूक शब्द वापरायचा झाला तर हे हल्लेखोर स्थूल अर्थाने अराजकवादी असतात. म्हणून ते अशा प्रकारे व्यक्त होतात.

Monday, September 7, 2015

सत्यान्वेषी विचारवंत

५ आणि ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे विश्वसाहित्य संमेलन पार पडले. त्याचे अध्यक्षस्थान भूषवणारे शेषराव मोरे हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. ते राष्ट्रवादी लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल भयानक आणि अगणित गैरसमज आहेत. पण कुठल्याच विचारसरणीत ते बसू शकत नाहीत. प्रचंड अभ्यास, संशोधन आणि सत्यान्वेष हाच त्यांचा ध्यास आहे.
................................................
साहित्य महामंडळ या महाराष्ट्रातल्या साहित्यातील शिखर संस्थेकडून कधीच कुणाच्याच फारशा अपेक्षा नसतात. आणि तशाही किमान तारतम्यपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्याबाबत या मंडळातील कुणाचाच लौकिक नाही.  हा डाग आपल्याकडून कधीतरी धुतला जावा, किमान नव्या डागाचे आपण धनी तरी होऊ नये, इतकी पोचही या मंडळींना नसते. अर्थात हेही तितकेच खरे की, दुय्यम दर्जाच्या लोकांकडून पहिल्या दर्जाच्या कामगिरीची अपेक्षा करणे हाच मुळी वेडपटपणा असतो. साहित्य महामंडळ हे तर सुमार वकुब असलेल्या न-साहित्यिकांचेच कुरण आहे.
 विश्वसाहित्य संमेलन हा त्याचाच उत्तम पुरावा आहे. पण तरीही उद्यापासून अंदमान येथे सुरू होत असलेल्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाबाबत एक चांगली गोष्ट घडली आहे. त्याच्या अध्यक्षपदी महामंडळाने डॉ. शेषराव मोरे यांची निवड केली आहे. त्यासाठी महामंडळातील तमाम न-साहित्यिक अभिनंदनास पात्र आहेत. कधी कधी फारसे भरवशाचे नसलेले खेळाडू एखादा षटकार सुरेख पद्धतीने मारतात, त्यातला हा प्रकार आहे. हे अध्यक्षपद शेषराव समर्थपणे निभावतील यात काही शंका नाही. हे विश्वसाहित्य संमेलन सावरकरांच्या चरणी अर्पण केले गेले असले तरी त्याची धुरा शेषराव यांच्यासारख्या सच्चा सावरकरांच्या भाष्यकाराकडे सोपवलेली असल्याने फारशी काळजी करण्याचे कारण नाही.
शेषराव मूळचे मराठवाड्यातील. नांदेडचे. त्यांचा जन्म परंपरागत मराठा कुटुंबात झाला. वडील वतनदार पोलिस पाटील. लहानमोठ्या चुकांसाठी वडिलांकडून त्यांना बेदम मार मिळे. वडिलांच्या धाकाला आणि माराला कंटाळून ते दहावीत असताना घरातून पळून गेले. पुढचे शिक्षण त्यांनी काही शिक्षकांच्या मदतीने पूर्ण केले. शाळेत असताना वैजनाथ उप्पे यांच्यामुळे त्यांना इतिहास आणि राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचनाची गोडी लागली होती. महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत त्यांचा महाराष्ट्रातील बहुतेक राष्ट्रपुरुषांचा अभ्यास झाला होता. यावरून त्यांच्या वाचनाचा झपाटा आणि आवाका लक्षात यावा. शेषराव पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक झाले, पण या नोकरीत ते कधी रमले नाहीत. कारण त्यामुळे त्यांना सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करता येत नव्हता. शेवटी वीस वर्षे पूर्ण होताच त्यांनी १९९४मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तेव्हापासून ते पूर्णवेळ लेखन-वाचन करतात.
शेषरावांची महाराष्ट्राला पहिली ओळख झाली ती त्यांच्या सावरकरांवरील पुस्तकांमुळे. प्रत्येक महापुरुषाचा पराभव हे त्याचे अनुयायीच करत असतात, असे म्हणतात. सावरकरांचा पराभवही त्यांच्याच अंध अनुयायांनीच केला आहे. हिंदुत्ववाद्यांनी त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी सावरकरांच्या बौद्धिक दृष्टिकोन, त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचा बुद्धिवाद हा हिंदुत्ववाद्यांना झेपणारा नव्हता, नाही. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी सावरकरांचे आपल्याला सोयीचे तेवढेच उदात्तीकरण केले. त्यातून सावरकरांविषयी अनेकांच्या मनात नाहक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या विपर्यस्त चौकटीतून सावरकरांना बाहेर काढून त्यांचे अतिशय ठोस पुनर्मूल्यांकन करण्याचे काम पहिल्यांदा कुणी केले असेल तर ते शेषराव मोरे यांनी. ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’ आणि ‘सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’ या दोन पुस्तकांतून शेषराव यांनी सावरकरांची जी मांडणी केली आहे, ती हिंदुत्ववाद्यांनाच नव्हे, तर इतरांनाही तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. मुळात ही दोन्ही पुस्तके शेषरावांनी दीर्घ स्वरूपात लिहिली होती. ‘सावरकरांचा बुद्धिवाद - एक चिकित्सक अभ्यास’ या मूळ पुस्तकाची ‘सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद’ ही, तर ‘सावरकरांचे समाजकारण - सत्य आणि विपर्यास’ या मूळ पुस्तकाची ‘सावरकरांच्या सामाजक्रांतीचे अंतरंग’ ही संक्षिप्त आवृत्ती आहे. या दोन्ही मूळ पुस्तकांत सावरकरांकडे नव्याने पाहताना शेषराव यांनी आधी ज्यांनी ज्यांनी सावरकरांविषयी लेखन केले आहे, त्यांच्या उणिवाही दाखवून दिल्या होत्या. या पुस्तकांविषयी यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे- “...अशी तार्किक मांडणी क्वचितच कोणी केली असेल. मांडणी सज्जड पुराव्यांच्या आधारे अशी केली आहे की, ती सहसा खोडून काढता येणार नाही आणि त्यामुळे त्यांच्या भक्तांची आणि विरोधकांची मोठी पंचाईत झाली आहे...” तर प्रसिद्ध चरित्रकार डॉ. द. न. गोखले यांनी म्हटले आहे - “...सावरकरांकडे इतक्या बुद्धिपूर्वक पूर्वी कोणी पाहिले नसेल. फार दिवसांनी सावरकरांना एक तोलामोलाचा समीक्षक लाभला...” हिंदुत्ववाद्यांच्या अपप्रचारामुळे सावरकरांविषयी महाराष्ट्रात कसे वातावरण होते, याविषयी शेषराव यांनी वीसेक वर्षांपूर्वी ‘सावरकरांच्या नादी लागून वाया गेलो त्याची गोष्ट’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता.
इस्लाम धर्म आणि मुस्लिमांची मानसिकता यावरून महाराष्ट्रात आणि भारतात गेली अनेक वर्षे खडाजंगी होत आली आहे, पण अभ्यासाच्या पातळीवर कुणी या विषयाला मुळातून भिडले नव्हते. शेषराव यांनी ते आव्हान पेलून ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. तोवर निदान मराठीत तरी एखाद्या बिगर-मुस्लिमाने या विषयावर पुस्तक लिहिलेले नव्हते. त्यामुळे शेषराव यांनी आधी त्याची निवडक प्रतींची ‘अभिप्राय आवृत्ती’ काढली. ती आवृत्ती त्यांनी मुस्लिम अभ्यासकांना आणि संघटनांना वाचायला देऊन त्यावर त्यांची मते मागवली. त्यातील बहुतांश अभिप्राय हे समाधानकारक होते. जे वादाचे मुद्दे होते, त्यातील पटले त्यानुसार पुनर्लेखन करून त्याची नियमित आवृत्ती काढली. त्यानंतर त्यांनी २००६मध्ये ‘प्रेषितानंतरचे चार आदर्श खलिफा’ हे पुस्तकही लिहिले. प्रेषित पैगंबराविषयी आपण निदान ऐकून तरी असतो, पण त्यांच्यानंतरही मुस्लिम धर्मात चार आदर्श व्यक्ती होऊन गेल्या हे महाराष्ट्राला विदित झाले ते या पुस्तकामुळे. आजही त्यांचा इस्लामचा अभ्यास चालू आहे. इस्लाम धर्माचा संपूर्ण करायला ४० वर्षेही पुरणार नाहीत, असे शेषराव मोरे म्हणतात.
दोनेक वर्षांपूर्वी शेषरावांचे ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. “गांधीजींनी हिंदूंना फाळणी स्वीकारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही, म्हणून ४२च्या लढ्याची हूल उठवली. कारण त्यामुळे ब्रिटिशांशी वाटाघाटी करायच्या आणि त्यावेळी हिंदू आणि काँग्रेसला फाळणीशिवाय स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असे पटवून द्यायचे अशी गांधीजींची रणनीती होती”, अशी मांडणी शेषराव यांनी या पुस्तकात केली आहे. भारत-पाक फाळणीची नव्याने मांडणी करणारे हे पुस्तक वादग्रस्त होणार याची अटकळ लेखक-प्रकाशक यांना आधीपासूनच होती. त्यामुळे शेषरावांचे प्रकाशक असलेल्या ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकरांनी महाराष्ट्रातील काही मान्यवर लेखकांना या पुस्तकावर लिहायला सांगून आणि त्यातील आक्षेपांवर शेषराव यांनाही लिहायला सांगून ‘प्रतिवाद’ हे पुस्तक प्रकाशित केले. हा मराठीतला अभिनव असा प्रयोग आहे. असा प्रकार यापूर्वी मराठीत कधी झाला नसावा. 
‘काश्मीर - एक शापित नंदनवन’,  ‘डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण-एक अभ्यास’, ‘शासनपुरस्कृत मनुवादी - पांडुरंगशास्त्री आठवले’, ‘१८५७चा जिहाद’, ‘विचारकलह-भाग १’, ‘विचारकलह-भाग  २’, ‘अप्रिय पण...भाग १’, ‘अप्रिय पण...भाग २’ ही पुस्तकेही शेषरावांच्या अभ्यासूपणाची द्योतक आहेत. आंबेडकरांवर मराठीत कितीतरी पुस्तके लिहिली गेली आहेत, आजही जात आहेत, पण त्यांच्या सामाजिक धोरणांचे शेषरावांनी केलेले विश्लेषण वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे आहे.
शेषराव जसे सावरकरांना मानतात, तसेच ते नरहर कुरुंदकर यांनाही मानतात. अनेकांना हे चमत्कारिक वाटते. तसे ते आहेही. कुरुंदकर स्वतः ला कम्युनिस्ट मानत आणि समाजवादी त्यांना ‘आपला’ मानत, तसाच काहीसा हा प्रकार आहे. शेषराव आणि कुरुंदकर दोघेही नांदेडचे. शिवाय कुरुंदकर केवळ विद्यार्थीप्रियच नाही तर शिक्षक, प्राध्यापक आणि समस्त नांदेडकरांचे दैवत. कुरुंदकर तटस्थ वैचारिक बाण्याचे, कुणाचीही भीडभाड न बाळगणारे, ‘अभ्यासेनि प्रगटावे...’ या शिस्तीचे. त्यांचा हाच वारसा नेमका शेषराव यांनी घेतला. ‘तर्कशुद्ध विचारांती जे निष्कर्ष येतील ते निर्भीडपणे मांडण्याचा धीटपणा आम्ही कुरुंदकरांकडून शिकलो’ असे शेषराव म्हणतात.
पण हेही तितकेच खरे आहे की, शेषराव राष्ट्रवादी लेखक आहेत. राष्ट्रवाद ही एक मोठी भानगड होऊन बसली आहे. म्हणजे हा शब्द आपण बदनाम करून ठेवला आहे. प्रत्येक दहशतवादी हा जसा योगायोगाने मुस्लिमच असतो, तसा प्रत्येक राष्ट्रवादी हा हिंदुत्ववादी असतो. निदान तसे मानले जाते. त्यामुळे शेषरावांबद्दल भयानक आणि अगणित गैरसमज आहेत. समाजवादी, मार्क्सवादी आणि पुरोगामी यांना ते संघिस्ट वाटतात, तर त्यांच्या राष्ट्रवादी लेखनामुळे संघिस्टांना ते ‘आपले’ वाटतात. खरे म्हणजे शेषराव कुणाचेच, कोणत्याच विचारसरणीचे नाहीत. सखोल अभ्यास, सत्यकथन, मांडणीतील समतोलपणा हे शेषरावांच्या लेखनाचे विशेष आहेत, पण त्यांच्या लेखनाचे विषय मात्र राष्ट्रीय हिताचे असतात. जो विषय तसा नसेल, तो बहुसंख्य वाचकांच्या आवडीचा नसतो. त्यामुळे त्याच्या वाट्याला शेषराव जात नाहीत. दुर्दैवाने राष्ट्रहिताचा मक्ता हिंदुत्ववाद्यांनी घेतल्यामुळे शेषरावांना ते आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कालपर्यंत त्यांची महाराष्ट्राने बऱ्यापैकी उपेक्षा केल्यामुळे त्यात त्यांना यशही येत होते, पण आता शेषराव संमेलनाध्यक्ष झाले आहेत. साहित्यवर्तुळात मान्यता पावू लागले आहेत. त्यामुळे यापुढच्या काळात बहुदा तसे घडणार नाही, घडूही नये.
एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचा गाभा उकलून सांगण्याची परंपरा महाराष्ट्रात एकेकाळी जोरावर होती. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ती क्रमाक्रमाने क्षीण होत गेलेली दिसते. म्हणूनच “जगाला काही सांगण्याची मानसिकता आपल्या लेखकांकडे नाही. करिअर वा पोटापाण्यापुरता अभ्यास करणे, अशाच चौकटबंद मानसिकतेत आपला समाज गुरफटला आहे. सखोल अभ्यासाचा असा अभाव असल्यामुळेच आपली पीछेहाट होत आहे,” असे शेषराव सांगतात. आजघडीला तर शेषराव यांच्यासारखी अहोरात्र लेखन-वाचन-संशोधन यात गढून गेलेली माणसे भिंग लावून शोधायला लागतील.