Sunday, September 19, 2010

मराठीतला भारतीय दिग्दर्शक


सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत प्रभावीपणे काम करणारा आणि तरीही, ‘मला मराठी सिनेमा करायचाच आहे.. पण मी मराठीत भारतीय सिनेमा करतो आहे’ असं बजावून सांगणा-या आजच्या पिढीचा दिग्दर्शक सचिन कुंडलकरविषयी..।

............................................................

‘‘मला एकदा शनिवारवाडय़ावर सभा घेऊन सूज्ञ प्रेक्षकांना हे सांगायचे आहे की, प्रायोगिक नाटके हीच खरी जिवंत नाटके आहेत. त्यांच्यात खरे रसरशीत नाटक अनुभवायला मिळते. व्यावसायिक मराठी नाटके ही तिकिटाबरोबर दोन रुपयांची कुल्फी मोफत देऊन बालबुद्धीच्या प्रेक्षकांनी बघावीत इतकी कंटाळवाणी असतात. दुसरं म्हणजे ‘आर्ट फिल्म’चा काळ 1980 मध्ये संपला आहे. सिनेमा ही व्यावसायिक कला आहे आणि कुणाकडेही सध्या आर्ट फिल्मस् बनवत बसायला वेळ नाही. त्यामुळे अर्धशिक्षित प्रेक्षकांनी स्वत:ला न समजणाऱ्या चित्रपटांना आर्ट फिल्मस् म्हणणे कृपया बंद करावे आणि टीव्ही बघत उर्वरित आयुष्य घालवावे. स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) आणि उपभोगवाद या दोन आजारांनी हळूहळू भ्रष्ट होत चाललेल्या मराठी प्रेक्षकाने समंजसपणे स्वत:कडे पाहिले, तर अजूनही वेळ गेलेली नाही. टीव्हीवरच्या गवईशोध स्पर्धा आणि मतिमंद पात्रांच्या मालिका बघण्यापेक्षा स्वच्छ, ताजेतवाने होऊन नाटय़गृहात वा चित्रपटगृहात जाऊन नवे, ताजे व खऱ्या अर्थाने मनोरंजक असे काही बघितलंत तर तुमच्याच मनाला बरे वाटेल. तुम्ही जे जगता आहात ते जगणे मांडणारी ही नाटके आणि चित्रपट आहेत. तुमच्यासाठीच हे बनवले आहे. स्वत:मधल्या प्रेक्षकाला अधिकाधिक जाणकार व समृद्ध केल्याने आयुष्य जगायला एक नवे परिमाण मिळते हा माझा अनुभव आहे.’’
सचिन कुंडलकरने 2008 मध्ये ‘प्रेक्षकहो’ या नावाने लिहिलेल्या लेखातील हा उतारा. मराठी प्रेक्षकांना इतकं खणखणीत आवाहन करणा-या प्रशिक्षित रंगकर्मीची एक अख्खी पिढीच अलीकडच्या काळात उदयाला आली आहे. आज 30 वर्षाचा असणा-या सचिन कुंडलकरखेरीज संदेश कुलकर्णी, किरण यज्ञोपवित, शशांक शेंडे, मोहित टाकळकर, विवेक बेळे, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, अद्वैत दादरकर, सतीश मनवर अशा अनेकांचा त्यात समावेश आहे. ही पिढी स्वत:ला अतिशय जोरकसपणे आणि ठोसपणे व्यक्त करू पाहत आहे. या सर्वाची नाटके स्वत:ला पडलेले प्रश्न आणि समस्या मांडताना दिसतात. आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करणारी ही पिढी आजूबाजूच्या परिस्थितीतून आलेलं गोंधळलेपण, त्यांची संभ्रमावस्था, त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आपल्या नाटकांतून मांडताना दिसतात. सचिन कुंडलकर हा त्यातला आघाडीचा दिग्दर्शक आणि नाटककार. शाळेत असतानाच सचिनचं आपण सिनेमाच करायचा हे ठरलं होतं. आशुतोष गोवारीकर हे त्याचे फॅमिली फ्रेंड. आशुतोष त्या वेळी ‘नशा’ हा त्याचा पहिला चित्रपट करत होते. सचिन त्यांच्याकडे गेला. तेव्हा आशुतोषने त्याला चांगला सल्ला दिला, ते म्हणाले, ‘‘तू आधी तुझं बेसिक शिक्षण पूर्ण कर. काम आपलंच आहे, तू येऊन कधीही जॉइन हो.’’ पण त्यानंतर सचिनचं मन शाळेत लागेना. तरीही त्यानं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि तो सुमित्रा भावेंकडे गेला. पुढची आठेक वर्षे सचिननं त्यांच्याबरोबर काम केलं. त्याविषयी तो म्हणतो, ‘‘सुमित्रा भावेंबरोबर अनेक ठिकाणी फिरलो, प्रवास केला; चित्रपट महोत्सव पाहिले. 1999 साली पॅरिसला जाईपर्यंत मी त्यांच्यासोबत काम करत होतो. परत आल्यावरही त्यांच्याकडे एक वर्षे काम केलं. त्यामुळे त्यांचा माझ्यावर थेट प्रभाव नसला तरी मी त्यांच्यासारखा विचार करतो. आमची कामं वेगळी आहेत पण ती एका विचाराची वाटतात, त्याचं हे कारण आहे.’’
सचिनच्या चित्रपटांचे विषय, त्यांची मांडणी भाव्यांच्या चित्रपटांसारखी बांधेसूद वाटते, असं जाणकार सांगतात. आपला विषय आपल्याच पद्धतीनं मांडणं, मुख्य म्हणजे त्याचा व्हिज्युअली विचार करणं या गोष्टी सचिनच्या सिनेमा आणि लघुपटात प्रकर्षाने जाणवतात. तो म्हणतो, ‘‘माझ्या दृष्टीनं सिनेमा म्हणजे नक्कल नसून आपल्या संस्कृतीतलं आणि वातावरणातलं ताकदीनं मांडणं आहे. माझ्या आयुष्यातलं आणि आजूबाजूचं मी माझ्या सिनेमांतून मांडत असतो. सामाजिक, राजकीय चित्रपट मला बनवता येत नाहीत. दहा माणसं एकत्र आली तर मला त्यांचं काय करावं ते समजत नाही. पात्र हे माझा विचार सांगण्याचं माध्यम आहे असं मला वाटतं, म्हणूनच माझा एकल माध्यमावर जास्त भर असतो.’’ सचिनचे ‘रेस्टारंट’, ‘गंध’, ‘निरोप’ हे चित्रपट काय किंवा ‘द बाथ’, ‘आऊट ऑफ बॉक्स’, ‘शुभ्र काही’ हे लघुपट काय, या सर्वामध्ये जाणवते ती माणसांमधल्या नात्यांबद्दलची अतीव ओढ. माणसांमाणसांमधील नाती, त्यातील ताणतणाव यांचा सचिन अनेक अंगानं शोध घेताना दिसतो. सचिननं ‘छोटय़ाशा सुटीत’, ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’, ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ ही नाटकंही लिहिली आहेत. त्यातही हेच जाणवतं. ‘छोटय़ाशा सुटीत’ हे सचिनचं नाटक दोन पुरुषांच्या समलिंगी संबंधाविषयीचं आहे. त्याचबरोबर त्यात आपल्या लग्नसंस्थेवर आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वरही मार्मिक भाष्य आहे. ‘फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’मध्ये माणसाच्या एकाकीपणाची, एकारलेपणाची सहन न करत येणारी तडफड अ‍ॅब्सर्ड पद्धतीनं मांडली आहे, तर ‘चंद्रलोक कॉम्प्लेक्स’मध्ये विकासाच्या अटळतेतून होणारं शहरीकरण, माणसांचं मोठय़ा प्रमाणावर होणारं स्थलांतरण, त्यातून निर्माण होणारे प्रश्न यातील ताणतणावांचा आलेख मांडला आहे. पण हे एकटय़ा सचिनमध्ये नाही तर त्याच्या पिढीतल्या इतर नाटककार-दिग्दर्शकांमध्येही हेच जाणवतं. मनस्विनी लता रवींद्रच्या ‘सिगारेटस्’ आणि ‘अलविदा’ या नाटकात आजच्या युवापिढीचं जगणं, त्यांना पडणारे लैंगिकतेविषयीचे प्रश्न यांची रोखठोख मांडणी आहे, तर हेमंत ढोकेच्या ‘लूज कंट्रोल’मध्ये वयात येणाऱ्या मुलांना भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची चर्चा आहे. म्हणजे ही पिढी किती एकसारखा, आपल्या वयाशी आणि जीवनाशी सुसंगत विचार करते!
सचिनच्या ‘गंध’ या चित्रपटाला 2007 सालचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘गंध’मध्ये ‘लग्नाच्या वयाची मुलगी’, ‘औषधे घेणारा माणूस’ आणि ‘बाजूला बसलेली बाई’ अशा तीन स्वतंत्र कथा आहेत. या चित्रपटाची पहिली कथा सचिनच्या आईने ‘सुगंध’ या नावाने लिहिली होती. ती एकदा सचिनला कपाटात मिळाली. तेव्हा त्याला त्यावर शॉर्ट फिल्म करावीशी वाटली. दरम्यान त्याच्या पाहण्यात मल्याळम् दिग्दर्शक अडूर गोपाळकृष्णन यांचा ‘फोर विमेन’ हा चित्रपट आला. त्यात चार स्वतंत्र कथा होत्या. तो सिनेमा पाहिल्यावर सचिनला दुसरा एक अख्खा चित्रपटच सुचला आणि त्यातून ‘गंध’ तयार झाला. सचिन त्याच्या चित्रपटाविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल म्हणतो, ‘‘मी मराठी सिनेमा करत नाही तर भारतीय सिनेमा करतो. सिनेमाची भाषा प्रादेशिक वगैरे नसते. ती स्वतंत्र असते आणि ती सिनेमाचीच असते. त्यामुळे मी सिनेमाकडे सिनेमा म्हणून पाहतो.’’
सचिनच्या या भारतीय धारणेमुळेच त्याचे सिनेमे वेगळे ठरतात हे नक्की. सध्या मराठी चित्रपटांमध्येही नाटकांप्रमाणेच नव्या दिग्दर्शकांची फळी पुढे आली आहे. त्यामुळे मराठीत अलीकडच्या काळात नवनवे प्रयोग घडताना दिसतात. त्यावर सचिन म्हणतो, ‘‘मराठी चित्रपट नव्या जाणिवांना, प्रयोगांना प्रतिसाद द्यायला शिकला असला तरी, मराठी प्रेक्षक आणि वितरक हे मात्र पारंपरिक मानसिकतेचेच आहेत. त्यामुळे दिग्दर्शकांची नवी पिढी आली असली तरी त्यांना योग्य हातभार मिळत नाही. आणि तो लवकर मिळाला नाही तर ती एक छोटी लाट ठरेल आणि काही दिवसांनी ओसरून जाईल.’’
‘ड्रीम्ज् ऑफ तालीम’ हे सचिननं नुकतंच (आणि पहिलं) इंग्रजी नाटक लिहिलंय. सुनील शानभाग यांनी ते दिग्दर्शित केलं आहे. त्याचे सध्या मुंबईत आणि इतर ठिकाणी प्रयोग होत आहेत. या नाटकाची जानेवारी 2011 मध्ये होणा-या ‘भारतीय रंगमहोत्सवा’साठी निवड झाली आहे. चेतन दातार या आपल्या मित्राला आदरांजली म्हणून सचिननं हे नाटक लिहिलंय. चेतनच्या नाटकाची तालीम असं त्याचं स्वरूप आहे. सिनेमा, लघुपट आणि नाटक अशा माध्यमांत काम करत असल्याने सचिनचा सतत अनेक लोकांशी संपर्क येतो. शिवाय ही सर्वच कामं टीमवर्कची असल्याने लेखनासाठी सचिनला मुद्दामहून आणि ठरवून वेळ काढावा लागतो.
नुकतीच अनुराग कश्यप या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्दर्शकाने सचिनला आणि राही अनिल बर्वेला त्याच्यासाठी सिनेमे करण्याची ऑफर दिली आहे. त्या दोघांसाठीही ही मोठी संधी आहे. सचिनचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असेल. त्याविषयी सचिन सांगतो, ‘‘अनुराग कश्यप हा माझा खूप आवडता दिग्दर्शक आहे. त्याने माझी ‘गंध’ ही फिल्म पाहिली होती. तिचा पहिला शो पाहायला मुंबईत जे मोजके लोक आले होते, त्याला अनुरागही आला होता. त्याला ती आवडली असावी. त्यानंतर त्याने मला हिंदी सिनेमाविषयी विचारलं. अनुरागबरोबरची ही फिल्म रोमँटिक कॉमेडी आहे. आम्ही दोघांनीही कधी केली नसेल अशी ती फिल्म आहे. 2011 च्या मे मध्ये तिचं शूटिंग सुरू होईल.’’ या सिनेमाचंही स्टोरी-स्क्रीन प्ले-डायलॉग असं सर्व नेहमीप्रमाणे सचिनचंच आहे. म्हणजे हीदेखील सबकुछ सचिन कुंडलकर फिल्म आहे का, असं विचारल्यावर तो पटकन म्हणतो, ‘नाही, कश्यप-कुंडलकर.’
पण हिंदी चित्रपट करतोय तसा सचिन एक इंग्लिश-फ्रेंच सिनेमाही करतो आहे. त्याचं काम दोन वर्षानी- 2012 मध्ये सुरू होणार आहे. त्याविषयी तो सांगतो, ‘‘माझा हा सिनेमा महाराष्ट्रात आणि पॅरिसमध्ये घडतो. त्या अर्थाने तो बहुसांस्कृतिक आहे. पुढचा अख्खा महिना मी त्यासाठी फ्रान्सला जाणार आहे. मला हे करता येतं कारण मी कुठल्याही भाषेला, संस्कृतीला बांधून घेतलेलं नाही. मला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या चारही भाषा बोलता येतात. या सगळ्या भाषांमध्ये विचार करता येतो.’’ पण मग मराठी सिनेमाचं काय? त्यावर सचिन तत्परतेनं म्हणतो, ‘‘एका मराठी सिनेमाचं स्क्रिप्ट लिहून तयार आहे. मला मराठी सिनेमा करायचाच आहे.’’ दृश्यात्मकतेची उत्तम जाण, अन्य कलांमधला संचार आणि त्या त्या माध्यमांतल्या चांगल्या गोष्टींचा योग्य वापर करून घेण्याची हातोटी यामुळे सचिनचे सिनेमे, लघुपट आणि नाटकंही वेगळी ठरत आली आहेत. शिवाय आपण जे काही करतो त्याबद्दलचं उत्तम भान आणि जाण त्याला आहे. त्याची मतं ठाम आणि प्रगल्भ असतात, त्याचं कारणही पुन्हा हेच आहे.

Saturday, September 4, 2010

चळवळया रंगकर्मी


‘‘ये दिल माँगे गुरूजी, ये दिल माँगे मोअर
माँगे मथुरा माँगे काशी, माँगे ताजमहल
काबा मंदिर हो तो गुरूजी तंटे हो सब हाल
पंगे माँगे मोअर गुरूजी, दंगे माँगे मोअर
ये दिल माँगे गुरूजी’’

हा संवाद आहे ‘जन नाट्य मंच’च्या ‘ये दिल माँगे मोअर गुरूजी’ या नाटकातील. या नाटकात सुधन्वा देशपांडे यांनी काम केले आहे. जून 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर‘जन नाट्य मंच’ने हिंदुत्ववादी विचारसरणीची खिल्ली उडवणारे हे पथनाट्य केले होते. तात्कालिक आणि निकडीच्या सामाजिक प्रश्नांवर पथनाटय़ांच्या माध्यमातून प्रहार करण्याचे काम ‘जन नाट्य मंच’ ही दिल्लीस्थित संस्था 1973पासून करते आहे. अतिशय रोखठोक आणि प्रसंगी जहाल वाटावी अशी ही नाटकं असतात. त्यामुळेच या संस्थेचे संस्थापक सफदर हाश्मी यांची 1989मध्ये हत्या झाली. पण म्हणून ही संस्था बंद झालेली नाही आणि पथनाटय़ंही थांबलेली नाहीत. हाश्मी यांच्या पत्नी मौलश्री व सुधन्वा देशपांडे त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत.
पण हाश्मींच्या निधनामुळे संस्थेचं नुकसान झालंच. एक धगधगता अंगार अचानक विझला. हाश्मींच्या आठवणीने सुधन्वा आजही व्याकूळ होतो, म्हणतो, ‘सफदरसारखा अतिशय प्रतिभावान, नाट्यकर्मी, नेता जातो तेव्हा नुकसान तर होतंच. विशेषत: ग्रूप छोटा असतो तेव्हा ते अधिकच जाणवतं. सफदरचा खून झाला तेव्हा तो 34 वर्षाचा होता. पण त्यानं जे फाउंडेशन केलं होतं ते एकदम सॉलिड होतं. सफदरच्या खूनानंतर ग्रुपला एकत्र ठेवणं, त्याला धीर देणं यात मौलश्रीचा फार मोठा वाटा होता. सफदर अतिशय चांगला ऑर्गनायझर होता. तो नाटकं लिहायचा, गाणी लिहायचा, लहान मुलांकरता कविता लिहायचा आणि संस्कृती-कलेवरही लिहायचा. तो खूप देखणा होता. मला तरी आठवत नाही की, एखादा त्याच्या संपर्कात आला आणि त्याच्या प्रेमात पडला नाही, असं झालेलं. अनेक लोक म्हणतात- सफदरने किती त्याग केला! त्यानं ठरवलं असतं तर तो मोठय़ा कंपनीत नोकरीला लागला असता वगैरे.. पण मला तरी यात काही त्याग वाटत नाही. कारण सफदर जे करत होता, त्यात तो समाधानी होता. त्यानं कमिट केलं, पण त्याग केला नाही. मी अमूक सोडून हे करतोय असं त्याला कधीच वाटलं नसेल. वाटलं नाही, हे मला नक्की माहीत आहे. तो ते करायचा कारण त्याला खूप मजा यायची. ’ त्याग आणि कमिटमेंटबाबतच बोलायचं झालं तर ते सुधन्वाबद्दलही बोलता येईल. त्यानेही ठरवलं असतं, तर तो उत्तम करिअर करू शकला असता. मराठीतले प्रसिद्ध नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्त्यां कालिंदी देशपांडे यांचा मुलगा असणं हेही त्याचं अ‍ॅडिशनल क्वॉलिफिकेशन होऊ शकलं असतं. पण सुधन्वानेही यापैकी काहीच केलं नाही. उलट ‘आपण आजवर कुठलीच गोष्ट फार विचारपूर्वक केली नाही’ असे तो सांगतो, ‘ मी तरी विचार करून कधीच काही केलेलं नाही. मी कॉपोरेट क्षेत्रात गेलो असतो, तर तिथे टिकू शकलो असतो का? नाही. ती माझी टेंपरामेंटच नाही. कोणत्याही क्षणी आपल्यासमोर ऑप्शन असतात आणि खूपदा नसतातही. गोष्टी होतात त्या बाय चान्स. नंतर आपल्याला असं म्हणता येईल की मी हाच चॉइस केला होता, पण तो काही चॉइस नसतो. ती एक वस्तुस्थिती असते आपल्यासाठी.’’
नाटक हा सुधन्वाचा वीक पॉइंट आहे. तो अगदी लहानपणापासून नाटकात काम करतो आहे. त्याची पहिली आठवणही नाटकाविषयीचीच आहे. कॉलेजात असताना तो नाटकाकडे गांभीर्याने पाहायला लागला. गो. पु. त्या वेळी दिल्लीच्या ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठा’त होते. सुधन्वाची आई कालिंदीताई महिला चळवळीत, तर मोठी बहीण अश्विनी विद्यार्थी चळवळीत काम करत होती. त्यांच्यामुळे सुधन्वाने 1985-87 या काळात ‘जन नाट्य मंच’ची खूप नाटकं पाहिली. त्यातून त्याची सफदर हाश्मी यांच्याबरोबर यारी झाली. हाश्मींनी त्याला ‘काय रे तू नाटकं करतोस. मग आमच्याबरोबर का नाही करत?’ असा सवाल करून त्याला आपल्या संस्थेत बोलावून घेतलं. ते वर्ष होतं 1987 आणि सुधन्वा होता 18 वर्षाचा. तेव्हापासून सुधन्वा ‘जन नाट्य मंच’बरोबर काम करतोय. हाश्मींबरोबर सुधन्वाला जेमतेम तीनेक वर्षच काम करायला मिळालं. पण तो त्याच्यासाठी समृद्ध करणारा अनुभव होता. कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळणार नाहीत, इतक्या गोष्टी या काळात तो शिकला.
‘‘सफदर मस्त माणूस होता. मुख्य म्हणजे तो हसमुख होता. तो डायनॅमिक होता, आणि त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता. दुसरी गोष्ट म्हणजे, तो हायरार्कल नव्हता. त्यामुळे तरुण मुलांबरोबर त्याला मैत्री करायला कधीच प्राब्लेम नसायचा. त्याच्याभोवती नेहमी त्याच्यापेक्षा दहा-पंधरा वर्षानी लहान अशी पोरं असायची. पण ती फक्त हिरोवर्शिप नाही करायची. सफदर आमचा हिरो होता, पण तो फक्त हिरो नव्हता; ही गोष्ट पण खरी आहे. त्याच्याबरोबर आम्ही खूपदा वादही घालायचो. तशी स्पेस होती. सफदरने एखादा सीन लिहिलाय आणि तो एखाद्याला आवडला नाही, तर अशा गोष्टींना सफदर नेहमी पॉझिटिव्ह प्रतिसाद द्यायचा. त्यामुळे सफदरसमोर आपल्याला काही बोलता येणार नाही, आपला विकास होणार नाही, आपली ग्रोथ होणार नाही असं कधीच वाटलं नाही.’’
सुधन्वानेही हाश्मींबरोबर असा वाद घालून ‘चक्काजाम’ या नाटकात त्यांना बदल करायला लावला होता. ‘चक्काजाम’चा काही भाग सुधन्वाला पटला नाही. पण तोवर सुधन्वाला लेखनाचा काहीच अनुभव नव्हता. मात्र एके दिवशी अचानक त्याला स्फूर्ती झाली अन् त्याने मजा म्हणून पूर्णपणे वेगळा असा सीन लिहिला. तो घेऊन सुधन्वा रिहर्सलला गेला. तो सीन हाश्मींना एवढा आवडला की, त्यांनी त्याला मिठी मारली आणि तो सीन घेऊन ते नाटक नव्यानं लिहिलं. या नाटकाची पुढे हाश्मींनी आणखी एक आवृत्ती केली, त्याचं नाव होतं ‘हल्लाबोल’. या नाटकातही सुधन्वाचा सीन होता.
सुधन्वाचा सफदर हाश्मींसोबत काम करण्याचा अनुभव जसा त्याला समृद्ध करणारा होता, तसाच तो हबीब तन्वीर यांच्याबरोबरचाही. गंमतीचा भाग म्हणजे ‘जन नाट्य मंच’ सुरू झालं, तेच मुळी ‘इप्टा’पासून प्रेरणा घेऊन आणि तन्वीरांच्या नाटकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, तीही मुंबईतल्या ‘इप्टा’तच. 1988मध्ये तन्वीर यांनी ‘जन नाट्य मंच’साठी ‘मोटेराम का सत्याग्रह’ हे नाटक दिग्दर्शित केलं होतं. त्या वेळी सुधन्वाचा त्यांच्याशी परिचय झाला, मग दोस्ती झाली. त्यांचा स्वभावही हाश्मींप्रमाणेच असल्याने सुधन्वाचं त्यांच्याशीही जमून गेलं. सुधन्वानं हबीब तन्वीर आणि त्यांच्या ‘नया थिएटर’वर 2005 साली संजय महारिषी यांच्यासोबत ‘गाँव का नाम थिएटर, मेरा नाम हबीब’ हा लघुपटही केला आहे. ‘विसर्जन’ या टागोरांच्या कथेवर आधारित नाटकावरचा सुधन्वाचा सविस्तर अभिप्राय ऐकून तन्वीरांनीही ते नाटक बदललं होतं.
पण हे सगळं झालं नाटकाविषयी. सुधन्वा याशिवायही खूप गोष्टी करतो. तो ‘लेफ्टवर्ड’ या प्रकाशन संस्थेचा व्यवस्थापकीय संपादक आहे. सुधन्वा प्रकाशन व्यवसायात आला तोही बाय चान्स. त्याआधी तो अहमदाबादच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन’मध्ये लेक्चरर म्हणून काम करत होता. समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून सुधन्वा तिथे वयाच्या चोविसाव्या वर्षी जॉइन झाला. एक-दीड वर्ष त्याने शिकवलंही. तो सांगतो, ‘‘तिथे मी शिकवलं कमी, स्वत:च जास्त शिकलो. पण ‘जन नाटय़ मंच’चं काम माझ्यासाठी तितकंच महत्त्वाचं होतं. ती नोकरी मला आवडत होती, पण ‘जन नाटय़ मंच’कडे पाहणं त्यामुळे शक्य होत नव्हतं. मग मी ते सोडून परत आलो.’’
परत दिल्लीला आल्यावर त्याला काही मित्रांनी सुचवलं की, ‘तुझं इंग्रजी चांगलं आहे. तू लिहितोस चांगलं. इतिहास तुझा अभ्यासाचा विषय आहे. मग तू प्रकाशन संस्थांमध्ये का नाही प्रयत्न करत?’ तेव्हा खरं तर सुधन्वाला संपादनाबद्दल काही म्हणजे काही माहिती नव्हती. पण तरीही त्यानं ‘ओरिएंट लाँगमन’ या प्रख्यात संस्थेत अप्लाय केला आणि त्याला तिथे नोकरीही लागली. पण सुधन्वा तिथे नोकरी करतोय हे समजल्यावर त्याच्या आई-बाबांची मैत्रीण आणि ‘तुलिका प्रकाशन’संस्थेची मुख्य संपादक इंदर चंद्रशेखर सुधन्वावर रागावली. म्हणाली, ‘तू तिथे का काम करतोयस? माझ्याकडे येऊन काम कर.’ सुधन्वा त्यांच्याकडे गेला आणि तिथे रमलाही. पाच-सहा वर्षे त्याने तिथे राजकारण, समाजकारण, इतिहास, समाजशास्त्र अशा अनेकविध विषयावरील पुस्तकांचं संपादन केलं. पण या कामाचाही कंटाळा आल्यावर सुधन्वानं ठरवलं की,आता आपण फुलटाईम अ‍ॅक्टिव्हिस्ट होऊ. पण त्यांच्या मित्रांनी स्वत:च प्रकाशन संस्था काढायची ठरवलं आणि त्यात काही दिवसांपुरतं म्हणून सुधन्वाला अडकवलं. त्यालाही आता अकरा वर्षे झाली. त्याविषयी सुधन्वा म्हणतो, ‘अजून दुसरी काही ऑफरही आली नाही आणि या कामात मला मजा येतेय. यात ‘डिप सॅटीसफॅक्शन ऑफ सेन्स’ आहे, म्हणून मी हे करतोय.’’
सध्या सुधन्वा आणि त्याची ‘जन नाट्य मंच’ ही संस्था स्वत:च्या जागेसाठी प्रयत्नशील आहे. पण दिल्लीसारख्या ठिकाणी स्वत:ची जागा हवी म्हणजे किमान एक कोटी रुपये उभे करायला हवेत. ‘जनम’ सध्या ते पैसे उभे करण्याच्या कामात गुंतली आहे. त्यातील काही पैसे देणग्या आणि नाटय़ महोत्सवाच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात दिल्ली आणि मुंबईला आठ-आठ दिवसांचे नाटय़ महोत्सव ‘जनम’ करते आहे. या महोत्सवात शबाना आझमी, रजत कपूर आणि गुलजार यांची नाटकं असतील, ‘नया थिएटर’चं नाटक असेल. सुधन्वा म्हणतो,‘‘आम्हाला दोन कारणांसाठी हक्काची जागा हवी आहे. ‘जनम’चं मुख्यत: लेफ्ट- विंग रॅडीकल पोलिटीकल थिएटर अशा स्वरूपाचं काम आहे. लहान मुलं-तरुण यांची इच्छा खूप असते पण त्यांना काही जमत नाही. अशा लोकांसाठी एक सेंटर असेल, तर लोक तिथे येऊ शकतात, भाग घेऊ शकतात. दुसरं म्हणजे, समजा एक ग्रुप नाटक करतोय. त्याची रिहर्सल तो उघडय़ावर, पार्कमध्ये, गॅरेजमध्ये कुठेही करतो. ती केल्यावर ते नाटय़गृहात जाऊन प्रयोग करतात. यात काय होतं की, त्यांचा पहिला शो टेक्निकली अनरिहर्सल्ड असतो. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की, एक व्हिडिओ थिएटर काढावं. तिथे नाटकवाल्या मंडळींना फायनल शोच्या आधी दहा-पंधरा दिवस प्रयोग करता येतील.’’
सुधन्वा हा असा आहे. ज्या कामात मजा येतेय, समाधान मिळतंय तेच काम तो करतो. तो डाव्या विचारसरणीकडे वळला ते नाटकांमुळे आणि डाव्या प्रकाशनसंस्थेकडे वळला, तो नाटक करत करता येईल असं काम आहे म्हणून. शिवाय तो ‘द ड्रामा रिव्ह्यू’,‘क्रॉस कल्चरल पोएटिक्स’,‘द सीगल थिएटर क्वार्टली’ आणि ‘द इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकांत राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा अशा विषयावर लिहितोही. एवढे सगळे उद्योग करण्यासाठी वेळ तरी कसा मिळतो असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण तो त्याला पडत नाही. तो म्हणतो,‘‘यात खरं तर काही नवल नाही. खूप लोकं अशी काम करत असतात. माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत, जे एका वेळी तीन-चार कामं करत असतात. त्यांच्याकडे पाहून वाटतं, असं आपल्याला जमलं पाहिजे.’
अर्थात सुधन्वाला हे जमलेलं आहेच. तो एकाच वेळी अनेक गोष्टी यशस्वीपणे करत असतो. मात्र त्याविषयी तो फार आग्रही नसतो. कारण तो त्याचा स्वभाव नाही. तो म्हणतोच मुळी- ‘बेसिकली मी समाधानी प्रवृत्तीचा मनुष्य आहे. मी खूप महत्त्वाकांक्षी नाही.’
पण समाधानी आहे म्हणूनच सुधन्वा जे काही करतो, ते मूलगामी स्वरुपाचं असतं. चळवळीला बळ देणारं असतं।