Sunday, June 5, 2011

‘श्यामची आई’ची जन्मकथा!





1935 नाही, 36!
‘श्यामची आई’च्या पहिल्या आवृत्तीवर दासनवमी शके 1857 असे छापलेले असल्याने ही आवृत्ती 1935 सालीच प्रकाशित झाली, असा ढोबळ अंदाज केला जातो आणि तोच गृहीत धरला जातो. अनाथ विद्यार्थी गृह (सध्याचे पुणे विद्यार्थी गृह) यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केल्यावर पहिल्या आवृत्तीचे साल 1935 असेच छापले. ते अजूनही तसेच छापले जाते. खरी गोष्ट अशी आहे की, शके आणि इसवीसन या दोन कालगणनांमध्ये 78 वर्षाचा फरक असतो. पण शके ही भारतीय कालगणना असल्याने त्याच्या वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे इंग्रजी महिन्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये होते. त्यामुळे शकेच्या सालामध्ये इंग्रजी महिन्यांचा मार्च-एप्रिल ते मार्च-एप्रिल हा काळ येतो. मग दासनवमी शके 1857 चे इसवीसनामध्ये अचूक वार, तारीख, महिना आणि साल काय येईल, याचा साने गुरुजींची पुतणी सुधा बोडा यांनी बराच शोध घेतला. त्यांनी जुन्या पंचांग तज्ज्ञांकडून सारे पडताळून घेतले, तेव्हा ‘श्यामची आई’ची अचूक तारीख 16 फेब्रुवारी 1936 आहे, हे सिद्ध झाले. त्यामुळे चालू वर्ष ‘श्यामची आई’चे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.




‘पुस्तक म्हणजे ज्यातून स्वत:ला साठवावे, आठवावे आणि वाटावेही’ अशी साने गुरुजींनी चांगल्या पुस्तकाची व्याख्या केली आहे. ती त्यांच्या सर्वच लेखनाला लागू पडते. त्यातही गुरुजींचे सर्वात आवडते पुस्तक आहे, ‘श्यामची आई’. या पुस्तकाला तर ही व्याख्या अगदीच समर्पक आणि यथायोग्य वाटते.
साने गुरुजींनी आपल्या उत्तर आयुष्यातील 1930 ते 1950 या वीस वर्षापैकी तब्बल सहा वर्ष सहा महिने हा काळ धुळे, नाशिक, जळगाव आणि येरवडा येथील तुरुंगात काढला. याच काळात त्यांनी बरेचसे लेखन केले. 17 जानेवारी 1932 ते ऑक्टोबर 33 हे एकवीस महिने गुरुजी नाशिकच्या तुरुंगात होते. तिथेच त्यांनी दररोज रात्री आपल्या सहका-यांना आधी आईच्या आठवणी सांगितल्या. मग त्यांच्या आग्रहावरून त्या लिहून काढल्या. ते पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई’. या पुस्तकातील 36 रात्री साने गुरुजींनी 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी 1933 या पाच दिवसांतल्या चार रात्रींत लिहून काढल्या. उरलेल्या नऊ रात्री मात्र त्यांनी तुरुंगातून सुटका झाल्यावर लिहिल्या. मात्र पुस्तक करताना त्यातील तीन रात्री त्यांनी वगळून फक्त 42 रात्रींचेच पुस्तक केले. त्या तीन रात्रींमध्ये कोणत्या आठवणी होत्या, हा प्रश्न कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा आहे. पण त्याविषयी गुरुजींनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आणि इतरत्रही काहीही खुलासा केलेला नाही.






साने गुरुजींचे नाव पांडुरंग असले तरी त्यांचे घरगुती नाव पंढरीनाथ होते. पण त्यांना स्वत:ला मात्र ‘राम’ हे नाव अधिक आवडत असे. पुढे ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिताना गुरुजींनी ‘श्याम’ हे नाव घेतले. कारण त्यांच्या आईचे नाव ‘यशोदा’ होते. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव यांनी याविषयी एके ठिकाणी नमूद केले आहे. पुढे ‘श्याम’ या नावानेच गुरुजींनी इतरही काही लेखन केले.






‘श्यामची आई’चे हस्तलिखित साठ-सत्तर लोकांनी वाचले, ऐकले, असे साने गुरुजींनीच लिहिले आहे. त्यातले एक होते यशवंतराव चव्हाण. दयार्णव कोपर्डेकर यांचा गुरुजींशी चांगला परिचय होता. साने गुरुजींनीच कोपर्डेकरांचे लग्न ठरवले होते. हे कोपर्डेकर आणि यशवंतराव चव्हाण शालेय मित्र. चव्हाणांची कोपर्डेकरांनी साने गुरुजींशी ओळख करून दिली होती. दयार्णव कोपर्डेकर ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’च्या प्रचारासाठी फिरते विक्रेते म्हणून काम करत होते. जळगाव, इंदूर, देवास, उज्जन, रतलाम, बडोदे, सोलापूर, अकोला, अमरावती अशा अनेक ठिकाणी फिरून त्यांनी पुस्तकांची विक्री केली होती. कोपर्डेकरांनी आपले ‘श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशित करावे, अशी साने गुरुजींची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हस्तलिखिताच्या वह्या कोपर्डेकरांकडे दिल्या. त्या त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना ‘हे पुस्तक प्रकाशित करावे का?’ यासाठी वाचायला दिल्या. त्याविषयी चव्हाणांनी लिहिले आहे, ‘‘श्यामची आई वाचत असताना अनेक वेळा माझे डोळे पाणावून आले.. साने गुरुजींचे प्रत्येक वाक्य भावनेने ओथंबून गेलेले व आईच्या प्रेमाने ओसंडून चाललेले होते.’’ चव्हाणांनी कोपर्डेकरांना हे पुस्तक त्वरेने प्रकाशित करण्याची सूचना केली, पण काही कारणाने कोपर्डेकरांना ते शक्य झाले नाही.






मग, ‘श्यामच्या आई’ची पहिली आवृत्ती अमळनेरच्या जगन्नाथ गोपाळ गोखले यांनी प्रकाशित केली. त्यावर दासनवमी शके 1857 असा उल्लेख आहे. किंमत आहे एक रुपया. या पुस्तकाचे मुखपृष्ठही गुरुजींच्या नागेश पिंगळे या विद्यार्थ्यांने तयार केले आहे. या पुस्तकावर मात्र पां. स. साने असा उल्लेख आहे. हे पुस्तक अमळनेरहून प्रकाशित झाले असले तरी त्याची छपाई मात्र पुण्यातल्या लोकसंग्रह छापखान्यात झाली. ‘श्यामची आई’ प्रकाशित झाल्यावर काही महिन्यांनीच गुरुजींच्या ‘पत्री’ या कवितासंग्रहावर इंग्रज सरकारने बंदी आणली. हा संग्रह पुण्याच्या अनाथ विद्यार्थी गृहाच्या मालकीच्या लोकसंग्रह छापखान्याने छापला होता. त्यामुळे त्यांच्याकडे इंग्रज सरकारने दोन हजार रुपयांचा जामीन मागितला, तो त्यांनी भरलाही. पण आपल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या संस्थेला नाहक भरुदड बसला, याचे साने गुरुजींना फार वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे सर्व हक्क 500 रुपयांमध्ये अनाथ विद्यार्थी गृहाला देऊन टाकण्याचा निर्णय घेतला.






16 ऑक्टोबर 1936 रोजी झालेला हा करार मोठा मजेशीर आहे. अनाथ विद्यार्थी गृहाने गुरुजींना पुस्तकावर दहा टक्के मानधन देण्याची तयारी दाखवली होती, पण ते त्यांना नको होते. म्हणून मग गुरुजींना कराराच्या आधी 50 रुपये आणि उरलेले 450 रुपये करार झाल्यानंतर दिले. पण त्याच वेळी संस्थेला देणगी म्हणून गुरुजींकडून 100 रुपये घेण्यात आले. म्हणजे त्यांच्या हातात अवघे 400 रुपयेच पडले. त्याबदल्यात गुरुजींनी ‘श्यामच्या आई’चे तहहयात हक्क देऊन टाकले. त्यात भाषांतराच्या हक्काचाही समावेश होता. हा करार करून गुरुजी घरी आले खरे पण त्यांना खूप वाईट वाटले. आपले अतिशय आवडते पुस्तक त्यांना नाइलाजास्तव विकावे लागल्याची निराशा त्यांना लपवता आली नाही. हताशपणे ते सहका-यांना म्हणाले, ‘आज मी माझ्या आईला विकून आलो’.




मराठीमधले रांगा लावून लोकांनी विकत घेतलेले पहिले पुस्तक म्हणजे लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’. ‘गीतारहस्य’ विक्रीसाठी तयार असल्याची जाहिरात 15 जून 1915 च्या ‘केसरी’च्या अंकात प्रकाशित झाली. ती वाचून सकाळपासूनच लोकांनी केसरी वाडय़ासमोर रांगा लावल्या. ‘गीतारहस्या’ची सहा महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. तेव्हापासून या ग्रंथाचे गेली 95 वर्षे सातत्याने पुनर्मुद्रण होत आहे.
विनोबा भावे यांनी 1930 मध्ये ‘गीताई’ लिहिले. ‘गीताई’च्या 1932 पासून आतापर्यंत 240 आवृत्त्या निघाल्या, सुमारे 40 लाख प्रती विकल्या गेल्या. विनोबांनीच 1932 मध्ये धुळ्याच्या तुरुंगात ‘गीता प्रवचने’ दिली, ती साने गुरुजींनी लिहून घेतली. त्याचे पुस्तक 1945 मध्ये प्रकाशित झाले. या पुस्तकाच्याही आत्तापर्यंत 40 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. शिवाय देशी-परदेशी मिळून 23 भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्या सर्वाचा विचार केला तर या पुस्तकाच्या सुमारे पंचविसेक लाख प्रती विकल्या गेल्या आहेत.




या तीन पुस्तकानंतर आवृत्त्या, विक्री आणि प्रभाव या तिन्ही बाबतींत ‘श्यामची आई’चा नंबर लागतो. आजवर ‘श्यामची आई’च्या 56 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचा हिंदी अनुवाद 1940 मध्येच झाला. त्यानंतर दोन इंग्रजी अनुवाद झाले. त्यातला एक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केला तर दुसरा भारतीय विद्या भवनने. याशिवाय कानडीमध्येही अनुवाद झाला. ‘चित्ररूप श्यामची आई’ ही कॉमिक्स आवृत्तीही प्रकाशित झाली. डॉ. मु. ब. शहा यांनी ‘संवादरूप श्यामची आई’ लिहिले तर प्रभाकर ठेंगडी यांनी ‘श्यामची आई’चे नाटय़रूपांतर केले.

4 comments:

  1. ” श्यामची आई ’या पुस्तकाचा प्रभाव लहानपणीच पडलेला. मात्र यामागे इतका इतिहास आहे हे ही पोस्ट वाचून समजले.धन्यवाद.

    ReplyDelete