Sunday, November 27, 2011

साहित्यशिक्षक

रवींद्र पिंगे यांना जाऊन आता तीन वर्षे झाली. पिंगे हयात असते तर आता 85 वर्षाचे झाले असते. पिंग्यांची आठवण मुद्दामहून कुणी करण्याचं कारण नाही. मागच्या आठवडय़ात मुंबईत एक छोटासा कार्यक्रम झाला खरा. पिंग्यांच्या पहिल्या स्मृतिदिनीही त्यांचं एक पुस्तक त्यांच्या मुलानं प्रकाशित केलं. पिंग्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या वाटेला आलेल्या एवढय़ाच दोन गोष्टी. त्याबद्दल खंत करण्याचं कारण नाही. खुद्द पिंग्यांनीही ती केली नसती. त्यांनी 2006 वा 2007च्या ललितमध्ये लिहिलंच होतं की, माझी आठवण कुणी करणार नाही. माझा वाढदिवसही कुणाला आठवणार नाही. पण माझ्या नातवाचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे. त्यामुळे नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना माझी आठवण निघेल. पिंग्यांना स्वत:बद्दल किती अचूक अंदाज होता, याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल.
  

पिंग्यांनी तीसेक पुस्तके लिहिली. परशुरामाची सावली’ (कादंबरी) हे त्यांचं पहिलं पुस्तक. त्याला पु. ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात पुलंनी म्हटलं आहे की, दरवर्षी चार-दोन दिवाळी अंकांच्या संपादकांना पिंग्यांची आठवण यावी इतका पैस त्यांनी तयार केला आहे. आणि खरोखरच पिंग्यांनी या पैसची व्यवस्थित जपणूक केली. त्याचं आपल्या परीनं जतन-संवर्धनही केलं. म्हणजे पिंग्यांना आपलं लेखनकर्तृत्व चांगलंच ठाऊक होतं. शेवटच्या काळात ते आपल्या लेखनाची नीट दखल घेतली नाही, आपल्या पुस्तकांची नीट समीक्षा झाली नाही अशी तक्रार थोडय़ा नाराजीच्या सुरात करत. पण तीही क्वचितच. त्यामुळे त्यांना वैफल्य वा नैराश्य आलं नव्हतं हेही खरं. पिंग्यांचा स्वत:च्या लेखनकर्तृत्वाचा एकंदर अदमास हे मराठी साहित्यविश्वातलं एक दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल. उतारवयात हा साक्षेप भल्याभल्यांकडे राहत नाही. निदान मराठीत तरी!
 
सुखसंगत, रिमझिम पाऊस, देवाघरचा पाऊस, पश्चिमेची धनदौलत, पश्चिमप्रभा, समाधानाचे सरोवर, तुषार आणि तारे, सुखाचं फूल, पश्चिमेचे पुत्र, प्राजक्ताची फांदी, पिंपळपान, हिरवीगार पानं, अत्तर आणि गुलाबपाणी ही पिंग्यांच्या पुस्तकांची नामावली. पिंग्यांनी साप्ताहिक माणूसमध्ये ओळीने 200 लेख लिहिले. त्यातील निवडक लेखनाचा संग्रह पुढे शतपावलीया नावाने राजहंसनेच काढला. 2007 साली राजहंस प्रकाशनानं सर्वोत्तम पिंगेहा त्यांच्या निवडक लेखांचा देखणा संग्रह काढला. त्याची बातमी सांगायला ते तीन मजले चढून आले होते. मी एकदा चुकून म्हणालो, तुमचा तो उत्तम पिंगेसंग्रह येतोय ना?’ पिंगे तत्परतेने म्हणाले, ‘सर्वोत्तम, सवरेत्तम िपगे!’ 

खरंच होतं ते! तो संग्रह सर्वोत्तम म्हणावा असाच आहे. कारण पिंग्यांनी लिहिलं खूप. परदेशी लेखकांवर लिहिलं, तसंच आशयघन ललितलेखनही केलं. त्या सर्वाचा मसावि त्यांच्या या पुस्तकात एकवटला आहे.
 
पिंग्यांचा काळच ललित लेखनाला पोषक होता. शिवाय आकाशवाणीमध्ये अनेक वर्षे नोकरी केल्यामुळे दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, विजय तेंडुलकर अशा अनेक मान्यवरांचा स्नेह/सहवास त्यांना लाभला. त्यामुळे त्यांचं अनुभवविश्व समृद्ध झालं. तो त्यांचा खूप मोठा लाभ होता. एरवी या नामवंतांचा सहवासच काय पण भेट घ्यायलाही इतरांना फार यातायात करावी लागली असती. वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, बरंच काही सोसावंही लागतं. पण पिंग्यांना त्यासाठी फार काही करावं लागलं नाही. सारे त्यांच्याकडेच येत आणि आपल्या अनुभवाची श्रीमंती देत. त्यात पिंग्यांचं बालपण कोकणात गेलेलं. या दोन्हीमुळे पिंग्यांचं ललितलेखक होणं क्रमप्राप्तच होतं.
 
पिंग्यांना दोन व्यसनं होती. एक सतत फिरण्याचं आणि दुसरं, नव्यातल्या नव्या लेखकांचं वाचून त्याला प्रोत्साहन द्यायचं, मार्गदर्शन करायचं. नव्याबद्दल त्यांना फार कुतूहल असायचं. साहित्याच्या क्षेत्रात लुडबूड करू पाहणा-या तरुण मुलांच्या आजोबांची भूमिका करायला त्यांना फार आवडत असे. शिवाय त्याला वेगवेगळ्या साहित्यिकांचा परिचय करून देत. त्याविषयी भरभरून बोलत. त्याच्या वाकडय़ातिकडय़ा प्रश्नांना तर अक्षरक्ष: रात्री-अपरात्री कधीही उत्तरं देत, त्याचं समाधान करत. पिंग्यांना लेखक असण्याचा इगो नव्हता आणि ते भयंकर भ्रमनिरासापासून बचावलेले होते, ही थोरच गोष्ट होती. याचमुळेच त्यांची दृष्टी शेवटपर्यंत स्वच्छ आणि प्रसन्न राहिली.
 ग. प्र. प्रधान हे पिंग्यांचे समकालीन. प्रधानमास्तर ख-या अर्थाने समाजशिक्षक होते. तर पिंगे खऱ्या अर्थाने साहित्यशिक्षक होते असे म्हणावे लागेल. 

पिंगे अजातशत्रू होते. त्यांच्याबद्दल कुणीही वावगा शब्द कधी बोलल्याचं ऐकायलाही मिळालं नाही. आणि पिंगे तर कधीच कुणाविषयी वावदूक बोलत नसत. त्यांच्या लेखनात एक संथ लय आहे, पण कुठेही चढ-उतार नाहीत की चढा सूर नाही. पिंग्यांचा स्वभावही असाच होता. ज्याच्याशी पटत नाही, त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. संपला विषय!
 
पिंग्यांचं लेखन त्यांच्या काळातल्या मध्यमवर्गाला सुखावणारं होतं. त्यावेळचे अनंत काणेकरांसारखे काही लेखकही तसंच लेखन करत. तो मध्यमवर्गच आता राहिला नाही. त्यामुळे पिंग्यांच्या पुस्तकाबाबत आता बोललं जाणं दुरापास्तच आहे. आणि साहजिकही. त्यांचा काळ स्वातंत्र्य उपभोगायला मिळालेल्या पिढीचा काळ होता. त्यामुळे त्यांच्या पिढीत ध्येयवाद होता. ध्येयवादी माणसं भाबडी असतातच. पिंगेही होते. पण त्यांच्यातला साहित्यशिक्षक त्याहून मोठा होता. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची आठवण कुणाला राहिली नाही, कुणी ती वाचली नाहीत तरी पिंग्यांची आठवण करणं हे मराठी साहित्यक्षेत्राच्या निकोपपणाला सुदृढ करणारंच आहे यात शंका नाही. 

Sunday, November 20, 2011

जनसामान्यांचा पत्रकार

ज्येष्ठ पत्रकार वा. दा. रानडे हे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळात वावरलेले आणि मुख्य म्हणजे पत्रकारिता केलेले एक महत्त्वाचे पत्रकार होते. त्यांचं मंगळवारी पुण्यात वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. ही बातमी सर्वात अगोदर समजली ती फेसबुकवर. ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांनी त्याविषयीची पोस्ट अपलोड केली तेव्हा. पुण्यातील वर्तमानपत्रांनी रानडय़ांच्या निधनाची बातमी देणं सयुक्तिक होतं, पण मुंबईच्या कुठल्याच वर्तमानपत्रातमध्ये ती छापून आलेली दिसली नाही.
 
रानडे मूळचे नगर जिल्ह्यातील. त्यांचं कुटुंब स्वातंत्र्यपूर्व काळात1943 मध्ये पुण्यात स्थायिक झालं. त्या वेळी रानडे अकरा वर्षाचे होते. रमणबागेत त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. नंतर त्यांनी फग्र्युसन महाविद्यालयातून कलाशाखेची पदवी घेतली. मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांना रस होता. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, पां. वा. गाडगीळ यांची काँग्रेस भवनातील भाषणं ऐकण्यास ते आवर्जून जात. 1945 मध्ये ते विद्यार्थी चळवळीत काम करणा-या नॅशनॅलिस्ट ग्रुपमध्ये सहभागी झाले. याचवर्षी ते सकाळमध्ये रुजू झाले. तिथं त्यांनी वेगवेगळ्या पदांवर सलग 38 वर्षे पत्रकारिता केली. 1983 मध्ये निवृत्त झाले.
 
विद्यार्थिदशेतच राष्ट्रसेवा दलआणि नॅशनॅलिस्ट ग्रुपयांच्या संपर्कात आल्यानं रानडेंची वैचारिक जडणघडण होण्यास मदत झाली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळ, त्यामुळे राष्ट्रवादाचे ते पुरस्कर्ते झाले. पण रानडे अत्यंत मितभाषी होते. त्यामुळे कुठल्याच गोष्टीवर ते हिरिरीनं वाद घालत नसत. आपलं म्हणणं शांतपणे मांडत आणि समोरच्याचं तेवढय़ाच शांतपणे ऐकून घेत. आपण पत्रकारितेत दीर्घकाळ काम केलं आहे, ‘सकाळया आघाडीच्या दैनिकाचे काही काळ संपादकही होतो, याचा बडेजाव त्यांनी इतरांसमोर तर सोडाच स्वत:शी तरी कधी मिरवला असेल की नाही, याचीही शंकाच वाटते. पत्रकारितेत थोडंफार जरी काम केलं तरी अनेकांना चांगल्या गुणापेक्षा दुर्गुण जास्त चिकटतात. स्वत:ला ते इतरांपेक्षा आणि सर्वसामान्यांपेक्षा वेगळं समजायला लागतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात दर्प जाणवायला लागतो. पुण्यातलं पत्रकारितेचं पर्यावरण तसं सदाशिवपेठी असल्यामुळे तिथं हे प्रकर्षानं जाणवतं. त्याला काही अपवाद आहेत, नाही असं नाही. त्यातल्या आधीच्या पिढीतल्या अपवादांत्मक नावांपैकी पुणे पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गोपाळराव पटवर्धन, रामभाऊ जोशी आणि वा. दा. रानडे. आता तर तिघेही नाहीत. पण तिघांमध्येही बरंच साम्य होतं. वागण्या-बोलण्यातील ऋजुता, तरुण पत्रकारांविषयीची आस्था आणि मध्यममार्गी भूमिका या गोष्टी या तिघांनीही कधी कुणाला शिकवल्या नाहीत. त्यांच्या संपर्कात येणा-याला त्या आपोआप उमगत, समजत आणि त्यांचा गांभीर्यानं विचार करावा लागे.

2004 चा सुमार असेल. मी प्रभातमध्ये काम करत होतो. रविवार पुरवणीची जबाबदारी होती. एके दिवशी संपादकांनी बोलावून घेतलं आणि हे वा. दा. रानडेअशी समोरच्या वयोवृद्ध गृहस्थांची ओळख करून दिली. त्यांचं सदर सुरू करत असल्याचंही सांगितलं. ते रोजच्या अंकात संपादकीय पानावर होतं. तेही पान मीच पाहात असल्यानं मग माझा रानडय़ांशी नियमित संपर्क येऊ लागला. ते आठवडय़ातून दोन वेळा लिहीत. त्यांचं अक्षर अतिशय बारीक आणि गिचमिडं होतं. डीटीपी ऑपरेटरांना तर ते लागतच नसे. मग मला त्यांच्याशेजारी बसून तो मजकूर त्यांना सांगावा लागे, पण त्याचा सराव होईपर्यंत पंचाइतच व्हायची.
 
रानडे सिंहगड रोडला कुठेतरी राहायचे. प्रभातचं ऑफिस लक्ष्मी रोडला विजय टॉकिज शेजारी. पण लेख मात्र ते स्वत: आणून द्यायचे. दोन मजले चढत वर यायचे. खाली आल्यावर निरोप द्या, मी खाली येत जाईनअसं त्यांना अनेक वेळा सांगून पाहिलं, पण पुढच्या वेळी तसं करूम्हणून ते निघून जात. आणि पुन्हा तसंच करत. खरं तर या वयात त्यांनी इतका आटापिटा का करावा, असा प्रश्न पडे. पण त्यांच्याशी बोलण्यातून कळलं की, त्यांची आर्थिक परिस्थिती समाधानकारक नाही. शिवाय ते फक्त प्रभातमध्ये लिहीत असंही नाही. पुण्यातल्या अद्वैत फीचर्स या वृत्तसंस्थेसाठीही ते बरंच लिहीत. साप्ताहिक साधनामध्येही त्यांचे लेख अधूनमधून येत असत. लेखनाचे सर्व विषयही भारताचे शेजारी देश किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण.
 
आता विषय इतके महत्त्वाचे असल्यामुळे त्यांचं लेखन छापलं जात असेच. पण त्यांच्या लेखनाला अजिबात शैली नव्हती. शिवाय त्यातली माहितीही तशी सामान्य असे. कानकून परिषद अनिर्णित’, ‘एका भिंतीच्या निमित्ताने पुन्हा इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष’, ‘राजकीय मुत्सद्देगिरीतून आर्थिक विकास’, ‘संरक्षणाचे धोरण प्रोअ‍ॅक्टिव्ह हवे’, ‘दुस-या मंदीची भीती’, ‘दहशतवाद्यांशी समझोत्याची संभाव्य दिशाअशी काही त्यांच्या लेखांची शीर्षकं. प्रांतरचना व महाराष्ट्र’ (1956), ‘भारताचे लोकमत’ (1962), ‘माओचा चीन’ (1967), ‘बंगला देस’ (1972), ‘निवडणुका कोणासाठी, कशासाठी?’ आणि समाजवादी चळवळीची वाटचाल’ (2010) अशी काही पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत.
 
रानडय़ांच्या एकंदर लेखनाकडे कसं पाहावं हे लक्षात यायला बराच काळ जावा लागला. त्यांचं लेखन सक्तीनं वाचावंच लागत असल्यानं हळूहळू लक्षात येतं गेलं की, रानडे वर्तमानपत्रांचा सरासरी वाचक ज्या पद्धतीच्या लेखनाची अपेक्षा करतो, त्या पद्धतीचं लिहीत. त्यांचे लेखनाचे विषयच मुळी तसे अपरिचित, त्यामुळे त्यात फार सखोल विश्लेषणावरच भर दिला तर ते लेखन सामान्य वाचकांसाठी राहणार नाही. चाळीसेक वर्षे पत्रकारितेत काम करणा-या रानडय़ांना तसं लेखन करायचंच नव्हतं. कारण ज्यांना सखोल विश्लेषण जाणून घ्यायचं, त्यांच्यासाठी इतर अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांचा वापर करावा. सामान्य वाचकांना अपरिचित विषयावरची परिचित म्हणजे सामान्य माहिती देणं, हाच रानडय़ांच्या लेखनाचा मुख्य पैलू होता. आणि तो महत्त्वाचाही होता. अशा पद्धतीच्या लेखनाची गरज काल होती, आजही आहे आणि उद्याही राहणारच. कारण शेवटच्या माणसाचं हित पाहणं हे लोकशाहीचं काम असतं. तिचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेचंही तेच काम असतं. त्या शेवटच्या माणसाला आंतरराष्ट्रीय घडामोंडीविषयी किमान साक्षर करावं, या व्रतानं रानडे शेवटच्या काळापर्यंत लेखन करत राहिले. त्यात त्यांची आर्थिक नड ही अपरिहार्यता होतीच, पण तरीही त्यांचं लेखन याच निकषावर तोललं जायला हवं.

 पण हेही महत्त्वाचं होतं की, रानडे काही इंटरनेटवर बसून आंतरराष्ट्रीय राजकारणावरील लेख पाडत नसत. ते रितसर ग्रंथालयात बसून, देशी-विदेशी वर्तमानपत्रं, पुस्तकं वाचून लिहीत. त्यासाठी त्यांना सतत अपडेट राहावं लागे. ते राहतही. त्यामुळेच आम्ही अमेरिकेला ठणकावून सांगतोअशी भाषा त्यांच्या लेखनात कधीच नसायची. म्हणूनच इंटरनेटचा काडीइतकाही आधार न घेता लेखन करणा-या रानडय़ांना सलाम करायलाच हवा.

Saturday, November 5, 2011

हजारेशाहीचे रंगरूप

हा लेख गोविंद तळवलकर यांनी दिव्य मराठीमध्ये  ३० ऑक्टोंबर २०११ रोजी लिहिला आहे.


भारताची राजकीय व्यवस्था, निवडणूक पद्धती इत्यादी पूर्णपणे बदलण्याचा विडा अण्णा हजारे यांनी उचलला आहे. तथापि राळेगणसिद्धी या त्यांच्या गावाचा एकंदर कारभार आणि तेथील लोकांचे जीवन कसे चालते हे पाहणे जरुरीचे आहे. याबाबतीत मुकुल शर्मा यांनी तेथे जाऊन कोणते अनुभव घेतले त्याची माहिती येथे देत आहे. शर्मा हे सामाजिक प्रश्न, पर्यावरण, ग्रामीण विकास यासंबंधी लिहितात. त्यांनी राळेगणसिद्धीवरही लिहिले आहे. त्यांचा एक लेख वेबवर 14 एप्रिल रोजी वाचला. त्यात जे काही लिहिले होते त्याची शहानिशा करण्यास राळेगणसिद्धीजवळील एकास सांगितले. तेव्हा त्याने शर्मा यांची निरीक्षणे चूक आहेत असे कळवले. मी शर्मा यांना पत्र लिहून त्यांनी राळेगणसिद्धीसंबंधात केलेल्या मतप्रदर्शनाच्या विरुद्ध मिळालेली माहिती नमूद केली.

शर्मा यांनी लिहिले की, ते काही वर्षांपूर्वी ‘नवभारत टाइम्स’मध्ये शिकाऊ पत्रकार असताना मला भेटायला आले होते. त्यांनी राळेगणसिद्धीला 1995, 1999 व 2002 या वर्षी भेट दिली. दर वेळी काही दिवस मुक्काम केला. 2002 नंतर ते राळेगणसिद्धीला गेलेले नाहीत. तथापि त्यांनी पत्रात लिहिले आहे की, यूएनआय-वार्ता या वृत्तसंस्थेच्या दिल्लीच्या एका वार्ताहराने 2004-05 या काळातील राळेगणसिद्धीसंबंधी लिहिलेल्या पुस्तिकेतील माहितीप्रमाणे या परिस्थितीत बदल झालेला नाही. शर्मा यांनी 21 मे 2006 रोजी ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल विकली’तही लेख लिहिला होता. त्याची प्रतही शर्मा यांनी मला धाडली. त्यांचा वेबवरचा लेख 2006 च्या लेखात भर घालून लिहिलेला आहे. शर्मा यांनी अशीही पुस्ती जोडली की त्यांनी हजारे यांचे लेख, पुस्तके तसेच त्यांच्या दोन ध्वनिमुद्रित केलेल्या दीर्घ मुलाखतींचा आधार लिखाण करताना घेतला होता. एप्रिलमधील लेखात शर्मा यांनी प्रारंभी राळेगणसिद्धीच्या विकासामागची मनोभूमिका काय आहे याचे विवेचन केले आहे. काही मतांबद्दल विविध प्रतिक्रिया होऊ शकतात. तसेच काही ऐतिहासिक संदर्भ बरोबर नाहीत. राळेगणसिद्धीमधील शेतीसुधारणा, जलसिंचनाची वाढती उपलब्धता, जमिनीखालील पाण्याची वाढलेली उंची, बरीच वृक्षराजी, शिक्षणाची सोय आणि त्या क्षेत्रातील शिस्त, गावातील स्वच्छता इत्यादींबाबत त्यांनी लेखात पुरेसे विवेचन करून कौतुक केले आहे. गावची वस्ती तेव्हा सव्वादोन हजार होती. मराठा बहुसंख्य, तर अनुसूचित जाती आणि जमातीचे अत्यंत थोडे. लोकांनी ही विकासकामे एकत्रपणे खपून केली आहेत. यात जमिनीची बांधबंदिस्ती, रस्ते, शाळा वगैरेंच्या इमारती इत्यादींचा समावेश होतो. विविध कार्यकारी संस्थांद्वारे लोकांनी अनेक क्षेत्रांत विकासाची यंत्रणा उभी केली आहे. नसबंदी, नशाबंदी, कुºहाडबंदी, चाराबंदी व श्रमदान हे पाच नियम गावात लागू आहेत. आपण ते पाळू, अशी शपथ सर्व गावक-यांना घ्यावी लागते. हजारे यांच्या विचारांवर धार्मिकतेचा पगडा असल्यामुळे ही शपथ देवळात घेतली जाते.

विकासकार्यात अडथळा येऊ नये आणि मतभेद होऊन गावातले वातावरण बिघडू नये म्हणून 2005 च्या आधी तीस वर्षे ग्रामपंचायतीच्या व सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत. निवडणूक ही कल्पनाच अण्णा हजारे यांना त्याज्य आहे. शर्मा यांना त्यांनी सांगितले की, सत्ता आणि राजकारण यामुळे भ्रष्टाचार माजतो. हजारे यांनी गावाचा विकास घडवून आणल्यामुळे त्यांचा प्रभाव इतका आहे की लोक त्यांच्या म्हणण्याबाहेर नाहीत आणि स्वतंत्रपणे ते निर्णय घेत नाहीत.

गणपत औटी हे काही काळ सरपंच होते. त्यांनी सांगितले की, अण्णा सांगतील तसे होत असते. लष्करी हुकूम पाळला जातो तसे आम्ही करत आलो. वर जे पाच नियम नमूद केले आहेत त्यांची अंमलबजावणी कशी होते? शर्मा यांनी हजारे यांची मते दिली आहेत. ती अशी की, सामाजिक बदलासाठी लोकांचे मन वळवावे लागते, परंतु दर वेळी लोक ऐकतीलच असे नाही; मग शारीरिक शिक्षा द्यावी लागते. पण नेहमी ती उपयोगात येतेच असे नाही आणि मग नैतिक बळ वापरावे लागते. आई मुलांचे लाड करते, पण चुकले तर तोंडात मारते; तसे कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याच्या वेळी करावे लागते, असे समर्थन हजारे करतात. अण्णा हजारे यांनी समाजकार्याला सुरुवात केली तेव्हा राळेगणसिद्धी व आसपास दारूच्या भट्ट्या ब-याच होत्या, दुकाने होती. हजारे यांनी गावक-यांची सभा घेऊन ही सर्व दुकाने व भट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ब-याच भट्ट्या बंद झाल्या. नंतर जो कोणी मद्यपान करील त्याला शारीरिक शिक्षा देण्याचे ठरले. हजारे यांनी शर्मा यांना सांगितले की, नियमभंग करणारास देवळाच्या समोरच्या काटेरी तार गुंडाळलेल्या खांबाला बांधून फटके मारले जातात. ग्रामसभेने ठराव करून गावातल्या पंचवीस तरुणांचा गट केला आणि ही फटक्यांची शिक्षा देण्याचा त्यास अधिकार दिला. काही मद्यप्यांना या तरुणांनी व हजारे यांनी मिळून फटके मारले, असेही गणपत बाळासाहेब पाठारे म्हणाले.

उपसरपंच कैलास पोटे यांनी स्वत:ला हा अनुभव आल्याचेही सांगितले. फटके मारून मग पोलिसांच्या हवाली केले जाते. कुटुंब नियोजनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी होते, असे हजारे यांनी शर्मा यांना सांगितले. त्यांचे म्हणणे असे की, कुटुंब नियोजन हे देशभर झाले पाहिजे. जात व धर्म यांचा विचार न करता याची अंमलबजावणी बळाचा वापर करून झालीच पाहिजे; आपण राळेगणसिद्धीमध्ये तसा तो करतो. तेथे धूम्रपान बंद असून केवळ धार्मिक चित्रपटच बघण्यास परवानगी आहे आणि फक्त धार्मिक गीतेच ऐकता येतात. हजारे यांनी केबल टीव्ही निषिद्ध ठरवला आहे. म्हणून एकाने आपल्या घरावर डिश अ‍ॅण्टेना लावल्यावर त्याची कडक हजेरी घेतली गेली व त्याने माफी मागितली. कैलास पोटे यांनी शर्मा यांना ही माहिती दिली.

अण्णा हजारे स्वत: शाकाहारी आहेत. त्यांच्या मते हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे शाकाहार हा अधिक योग्य ठरतो; मांसाहारामुळे लोक युद्धाला प्रवृत्त होतात. मांसाहार हा कनिष्ठच ठरवून तसा गलिच्छ आहार खाता, तसेच कपडे करता म्हणून तुमचे विचारही गलिच्छ असतात, असे हजारे यांनी हरिजन इत्यादींना ऐकवल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. अर्थात हरिजनांच्या शिक्षणाची व्यवस्था करून त्यांनी दोन-चार दलितांना महाविद्यालयीन शिक्षणही मिळवून दिले आणि ते डॉक्टर झाले. तथापि शर्मा यांचा मुख्य आक्षेप असा की, हजारे व त्यांच्या सहका-यांनी राळेगणसिद्धीमध्ये दलितांना मदत केली असली तरी त्यांच्या चौकटीत दलितांना वरच्या वर्तुळात हक्काची जागा नाही; त्यात उपकाराची भावना आहे, स्वाभाविक हक्क मान्य करण्याची नाही. तथापि रा. स्व. संघाचे इंग्रजी मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ ने काही वर्षांपूर्वी हजारे यांच्या कार्यासंबंधी एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. हिंदू

संस्कार लोकांवर ठसवण्याचे हजारे यांचे कार्य त्या लेखकाला आदर्श वाटले. धार्मिक विचारांच्या संस्कारांमुळे आपण सर्व एकाच कुटुंबाचे घटक आहोत ही भावना वाढली असे त्या लेखकाचे म्हणणे. तथापि दलितांमध्ये यामुळे आज्ञाधारकपणाची भावना बळकट झाली आणि बहुसंख्य जमातीचे वर्चस्व मानण्याची प्रथा चालू राहिली.

या सर्व माहितीवरून मला काही प्रश्न पडतात ते असे : फटक्यांची शिक्षा देण्याचा अधिकार हजारे आणि ग्रामसभा यांना कोणी दिला? पोलिस व सरकार यांना याची दखल घ्यावीशी का वाटली नाही? राज्य सरकार अण्णा हजारे यांचे दास बनले आहे काय? कुटुंब नियोजनाच्या बाबतीत संजय गांधींच्या पलीकडे हजारे यांची मजल गेली आहे असे दिसते. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य काही काळ होते तेव्हा त्याने प्रत्येक व्यक्तीचे जीवन साचेबंद केले होते. गाणीबजावणी बंद केली होती. हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये तालिबानच्या आधीच तसे केले. शाकाहार हा मांसाहारापेक्षा नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असे मानणे हा अहंकार आहे व चूक आहे. हिटलरने हजारो-लाखो ज्यूंना जिवंत जाळले. तो तर शाकाहारी होता. पण अण्णा हजारे यांना आपल्याभोवती जग फिरत असल्याचा भ्रम होत असून त्यांना जे मान्य तेच इतरांनाही मान्य झाले पाहिजे, असा त्यांचा हुकूमशाही दंडक आहे.