Thursday, November 29, 2012

‘अजातशत्रू’ प्राध्यापक!

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ही ‘समाजमान्यते’ची ठळक खूण मानली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ही समाजमान्यता शिक्षक, प्राध्यापक यांना होती, तशीच साहित्यिकांनाही होती. मराठीतले बहुतांश लेखक हे प्राध्यापक (मराठी व इंग्रजीचे ) आहेत. या प्राध्यापक मंडळींनीच मराठी साहित्याची बहुतांश निर्मिती केली आहे. त्यामुळे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना मिळाला, यातून त्यांची ‘समाजमान्यता’ सिद्ध होते

कोत्तापल्ले गेली चाळीस-बेचाळीस वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात आहेत. नांदेड जिह्यातील खेडय़ात जन्मलेल्या कोत्तापल्ले यांचा आजवरचा संघर्ष कौतुकास्पद आहे. मराठीचे अध्यापन, विद्यापीठीय संशोधन आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील त्यांचा वावर जिनिअस म्हणावा असाच आहे. ‘अजातशत्रू’ असेच त्यांचे वर्णन केले जाते, कारण आपल्या सहकाऱ्यांना प्रत्येक गोष्टीत सामील करून घेत, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत आणि गुणीजणांना प्रोत्साहन देण्याबाबत कोत्तापल्ले यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे. त्यामुळेच सर्व गटातटाच्या आणि संस्थांच्या लोकांमध्ये कोत्तापल्ले सहजपणे सामील होतात, त्यांना सामील करून घेतलंही जातं. अशा व्यक्ती अलीकडच्या काळात भिंग घेऊन शोधायची वेळ आली आहे. महाराष्ट्रातल्या उच्चशिक्षणाचा दर्जा आणि प्राध्यापकांचा वकूब दिवसेंदिवस घसरतोच आहे. 'प्राध्यापक' या शब्दाला हल्ली फारशी प्रतिष्ठा राहिली नाही त्याचे कारणही हेच आहे. किंबहुना हा शब्द आता 'मध्यमवर्गीय' या शब्दासारखा हेटाळणीसाठी वापरला जाऊ लागला आहे.
हा बदल गेल्या वीस वर्षांत झाला आहे. कारण या काळात प्राध्यापक आणि साहित्यिक यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. एकेकाळी शिक्षक, प्राध्यापक आणि लेखक यांच्याविषयी समाजात मोठा आदर होता. त्यांच्या शब्दांना किंमत होती. ती अलीकडच्या काळात राहिली नाही. पूर्वी शिक्षक-प्राध्यापक मंडळी खाजगी टयूशनचा जोड धंदा करायची, आता ती  नियतकालिके (आयएसएसएन क्रमांक असलेली ) आणि प्रकाशन संस्था  यांचा जोड धंदा करू लागली आहेत. शासनाने आपल्याला भरपूर पगार, अनेक सवलती आणि कामाचे कमी तास दिले आहेत, ते आपण जो विषय शिकवणार आहोत, त्याची पूर्व तयारी-अभ्यास करण्यासाठी, हे समजून घेण्याएवढा  ज्यांचा वकूब नाही, त्यांच्याविषयी विद्यार्थांना आणि त्यांच्या पालकांना कसा आदर राहील?
अशा परिस्थितीत प्राध्यापक म्हणून नैतिकता, चारित्र्य आणि विद्वता यासाठी महाराष्ट्रात जी थोडी नावं घेतली जातात, त्यात नागनाथ कोत्तापल्ले यांचा प्राधान्याने समावेश केला जातो. ते निर्विवाद उत्तम शिक्षक आहेत. चांगल्या साहित्यिकाला जमणार नाही असे, विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवण्याचे काम त्यांनी इमाने-इतबारे केले आहे. ज्येष्ठ समीक्षक वा. . कुळकर्णी, सुधीर रसाळ, यु. . पठाण यांच्या संस्कारात वाढलेल्या कोत्तापल्ले यांनी तो वारसा अध्यापनातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे मौलिक काम केले आहेदासू वैद्य, इंद्रजीत भालेराव, कृष्णा किंबहुने हे त्यांचे विद्यार्थी मराठी साहित्यात नाव मिळवून आहेत.
वाङ्मयाची उत्तम जाण आणि सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती हा कोत्तापल्ले यांचा आजवरचा विशेष राहिला आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून ते अशाच पद्धतीने, किंबहुना याहून अधिक चांगल्या प्रकारे काम करतील असा भरवसा वाटतो. कोत्तापल्ले यांच्या काळात पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग चैतन्याने आणि साहित्यमय वातावरणाने भारलेला होता. आपल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, प्रशासन आणि उपक्रम  यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. प्रसंगी आपल्या भूमिकाही बाजूला ठेवल्या. तोच अनुभव ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असतानाही आला. स्पष्टवक्तपणाचे अनुचित प्रयोग न करता सर्वाना सांभाळून घेत, त्यांचा विश्वास जिंकत, त्यांना पेलेल अशीच जबाबदारी देत काम करून घेण्याची नामी हातोटी कोत्तापल्ले यांच्याकडे आहे. हे कौशल्य त्यांना आता संमेलनाध्यक्ष म्हणून काम करताना अधिक उपयोगी ठरेल. त्यामुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या साहित्य वातावरणात उत्साह येईल आणि साहित्य संस्थांचा कारभार काही प्रमाणात तरी सुधारेल अशी आशा करायला हरकत नाही. साहित्य संस्था आणि त्यांची शिखर संस्था असलेले महामंडळ हा हल्ली वावदूकपणाचा आणि पोरकटपणाचा नमुना झाले आहे. या संस्थांत काम करणाऱ्या मुखंडांच्या जिभेला लगाम व हाताला काम मिळेल, अशी तजवीज कोत्तापल्ले नक्कीच करू शकतात. 

इथे गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की, कोत्तापले यांच्याविषयीची साहित्यिक म्हणून - अगदी साहित्य रसिकांचीही - समाजाची पाटी कोरी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी जवळपास तीसेएक पुस्तकांचे लेखन केले असले तरी! त्यांनी कथा, कविता, कादंबरी, संपादन, अनुवाद अशा विविध प्रकारांत लेखन केले असले तरी त्यांची मुख्य ओळख समीक्षक अशीच आहे. ‘नवकथाकार शंकर पाटील’, ‘ग्रामीण साहित्य-स्वरूप आणि शोध’,‘साहित्याचा अन्वयार्थ’, ‘मराठी कविता- आकलन आणि आस्वाद’ अशी पुस्तके लिहिणारा समीक्षक कधीच लोकप्रिय असत नाही. पण कोत्तापल्ले यांनी लक्षणीय कथालेखनही केले. त्यांच्या कथा संवेदशीलतेने सामाजिक वास्तव टिपतात. म्हणूनच के. . पुरोहित यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखकालाही त्या मोलाच्या वाटतात. महात्मा फुले यांचे ‘शेतकऱ्याचा असूड’ आणि ताराबाई शिंदे यांचे ‘स्त्रीपुरुषतुलना’ यांच्या सुधारित आवृत्त्यांचे संपादनही त्यांचे आहे

कोत्तापल्लेंसारख्या उत्तम प्राध्यापकाची समाजाला जास्त गरज आहे. कारण अशी व्यक्तीच समाजाचे सांस्कृतिक नेतृत्व अधिक चांगल्या प्रकारे करू शकते. हल्ली योग्य माणसाकडे योग्य पदे सोपवली जात नाहीत अशी ओरड होत असते, पण बऱ्याचदा योग्य पदासाठी योग्य माणसे मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती असते. कोत्तापले यां ना आध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला, याचा अर्थ असा होतो की, योग्य माणसाकडे योग्य पद सोपवले गेले आहे. ती जबाबदारी त्यांना उत्तम प्रकारे पार पडता  यासाठी शुभेच्छा!


Saturday, November 24, 2012

निर्मळ, प्रांजळ पण पसरट आत्मचरित्र

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं 'चार नगरांतले माझे विश्व' हे आत्मचरित्र मराठीतलं एक वेगळ्या प्रकारचं आत्मकथन आहे, असं म्हणावं लागेल. निदान अलीकडच्या काळातलं तरी. केवळ मराठीतच नाहीतर जगभरच साहित्यातले सर्वाधिक वाद आत्मचरित्राच्या संदर्भातच होताना दिसतात. कारण बहुतांश वेळा आत्मचरित्र लिहिताना सोयीस्कर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आत्मसमर्थन वा कबुलीजबाब दिला जातो. सत्य-असत्याची आणि प्रसंगी कल्पितांची सरमिसळ केली जात असल्यानं आत्मचरित्राच्या सत्यतेबाबत बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले जातात. शिवाय 'सत्य' या संज्ञेचे अर्थही वेगवेगळे असतात, असं एका नोबेलविजेत्या शास्त्रज्ञानं म्हटलं आहे. कारण ते कुठल्या विषयाच्या संदर्भात आहे, यावर त्या सत्याची सत्यता अवलंबून असते. 

नारळीकरांच्या आत्मचरित्राबाबत असा काही वाद होण्याचं कारण नाही. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्त्व आणि कमालीचा सज्जनपणा त्यांच्या या लेखनातही पुरेपूर उतरला आहे. शिवाय कटुतेचे प्रसंग त्यांनी कटाक्षानं टाळले आहेत. त्यामुळे सगळंच काही सांगणार नाही, पण सांगेन ते सत्य सांगेन, या न्यायानं नारळीकरांनी हे लेखन केलं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. त्यातून त्यांची नम्रता, गुणग्राहकता, बुद्धिमत्ता यांचा प्रत्यय सतत येत राहतो. पण हेही खरंच की, नारळीकरांना स्वतच्या आयुष्याकडे फार तटस्थपणे पाहता आलेलं नाही. इतर व्यक्तींबाबतही हा तटस्थपणा त्यांनी फारसा दाखवलेला नाही. त्याला त्यांची ऋजुता आड आली असावी.


केंब्रिज आणि आयुका हा नारळीकरांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि क्रिएटिव्ह असा कालखंड होता. एका बाजूला संशोधन आणि दुसऱ्या बाजूला संस्थात्मक निर्मिती या दोन्ही आघाडय़ांवर नारळीकरांनी केलेलं काम आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावलेलं आहे. त्यातून आजच्या आणि उद्याच्या पिढय़ांना शिकण्यासारखं खूप काही आहे. 


नारळीकरांनी या आत्मकथनाला अवघं दोन पानांचं प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यात त्यांनी तीन महत्त्वाची विधानं केली आहेत-
- माझे आजवरचे आयुष्य मुख्यत्वेकरून चार नगरांत गेले - बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे. प्रत्येक संक्रमणाच्या वेळी आपण एक धाडस करतो आहोत असे वाटायचे.
- आत्मचरित्र कसे लिहावे याचे काही दंडक असले तर ते मला माहीत नाहीत. मला माझी गोष्ट जशी सांगाविशी वाटली तशी मी सांगितली आहे.
 - माझ्यावरील लेख, माझ्या सार्वजनिक मुलाखती वगैरेंतून माझ्याबद्दल पुष्कळ माहिती आता 'पब्लिक डोमेन'मध्ये आहे. तरी पण 'सांगण्याजोगी' नवी माहिती वाचकांना ह्य़ा आत्मकथनात मिळेल असे मला तरी वाटते.
'लोकांना माहीत नाही असं तुमच्या चरित्रात सांगण्याजोगं काही उरलं आहे काय?' या सुनीताबाई देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला नारळीकरांनी दिलेलं उत्तर म्हणजे त्यांचं वरील तिसरं विधान. त्याचा मात्र पुरेपूर प्रत्यय या आत्मकथनामध्ये येत राहतो.


असं म्हणतात की, आत्मचरित्र हे लेखकानं स्वतकडे त्रयस्थपणे पाहून लिहिलेलं स्वतचंच चरित्र असतं. त्यामुळे त्यातून 'मी कसा झालो -घडलो?' याची कहाणी सांगायची असते. रूढार्थानं हे आत्मचरित्रही त्याला अपवाद नाही. नारळीकर नावाचा सुखवस्तू मध्यमवर्गातला बुद्धिमान मुलगा बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे या चार शहरांमध्ये कसा घडला आणि आपल्या अफाट बुद्धिमत्तेनं त्यानं यशाची शिखरं कशी पादाक्रांत केली, याची ही उत्कंठावर्धक व प्रेरणादायी कहाणी  आहे.
नारळीकरांनी या आत्मकथनाचे एकंदर चार भाग केले आहेत. त्यानुसार बनारससाठी ८५ पानं, केंब्रिजसाठी २६० पानं, मुंबईसाठी १०६ आणि पुण्यासाठी ८१ पानं खर्च केली आहेत. 


नारळीकरांचं बालपण, माध्यमिक-महाविद्यालयीन शिक्षण बनारसमध्ये गेलं. म्हणजे बनारस विद्यापीठामध्ये. बनारसमध्ये आणि उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीच्या काळात कोल्हापूरमध्ये घालवलेले दिवस, हा त्यांच्या आयुष्यातील रम्य बालपणाचा काळ होता. त्याविषयी त्यांनी समरसून लिहिलं आहे.  


या आत्मचरित्रातील सर्वाधिक भाग नारळीकरांच्या केंब्रिजमधील वास्तव्यानं व्यापला आहे. ते साहजिकही आहे. पदवीनंतर त्यांनी केंब्रिजला प्रयाण केलं. तेथील शैक्षणिक वातावरणाविषयी नारळीकरांनी अतिशय सविस्तरपणे लिहिलं आहे. नारळीकरांनी या भागात केंब्रिज-ऑक्सफर्डमधील सुप्त स्पर्धा, सुट्टय़ांच्या काळात युरोप आणि युरोपबाहेर केलेले प्रवास, रँगलरीचे दिवस, फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले पीएच.डी.चे संशोधन, किंग्स कॉलेज फेलो, ई. एम. फोर्स्टर ('पॅसेज टू इंडिया'वाले) यांच्याशी झालेला स्नेह, मंगला राजवाडे यांच्याशी विवाह आणि संसाराची सुरुवातीची काही र्वष याविषयी लिहिलं आहे. त्यांच्या जगभर मान्यता पावलेल्या संशोधनाविषयी लिहिताना ते नेमकं काय आहे, हे सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीनं नारळीकरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. केंब्रिजमधील विद्यापीठीय पातळीवरील शैक्षणिक वातावरण आणि संशोधनासाठीची अनुकूलता या गोष्टी या भागातून चांगल्या प्रकारे जाणून घेता येतात. यात नारळीकरांनी केंब्रिजची आपल्याकडील विद्यापीठीय शिक्षणाशी तुलना केलेली नाही, पण त्यांनी दिलेले तपशीलच इतके परिणामकारक आहेत की, तशी तुलना वाचकाच्या मनात साकारू लागते.


केंब्रिजमध्ये असतानाच नारळीकरांच्या बुद्धिमत्तेची चुणूक खगोलशास्त्रज्ञांना जाणवू लागली होती. त्यांची गांभीर्यानं दखलं घेतली जाऊ लागली. थोडक्यात केंब्रिजमध्ये नारळीकरांचा भविष्यकाळ उज्ज्वल होता, पण त्यांनी केंब्रिजच्या वैभवाचा त्याग करून, भारतात परतायचा निर्णय घेतला. मुंबईला टीआयएफआरमध्ये क्वांटम कॉस्मॉलजीवर संशोधनाला सुरुवात केली. पुढे नेहरू तारांगणची निर्मितीही त्यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून झाली. त्याची राजकीय कहाणी वाचनीय आहे. या भागात नारळीकरांनी टीआयएफआरमधील वातावरण, संचालक आणि सहकारी, संशोधनाची पद्धत आणि राजकारण याविषयीही थोडक्यात लिहिलं आहे.


टीआयएफआरमधून बाहेर पडल्यावर वर्षभरातच नारळीकरांनी युजीसीच्या साहाय्यानं पुणे विद्यापीठाच्या आवारात आयुकाची निर्मिती करायला सुरुवात केली. चार्लस कोरिया यांच्या कल्पनेतून आयुकाची वास्तू साकारली. हा निर्मितीप्रक्रियेचा इतिहास रंजक आहे. आयुका ही भारतातली पहिलीवहिली वैज्ञानिक संशोधन संस्था, जी विज्ञानप्रसार व शालेय विद्यार्थ्यांत विज्ञान रुजवणं यासाठी सुरुवातीपासून काम करते आहे. जिचा प्रदीर्घ काळ संचालक म्हणून काम करताना नारळीकरांनी तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवून दिला. या काळात त्यांनी सरकारी अनास्था, लहरीपणा आणि राजकारण यांचाही अनुभव घेतला. पूर्णपणे आपल्या संशोधनाला वाहून घेतलेल्या शास्त्रज्ञांना जेव्हा प्रशासकीय काम करावं लागतं, त्यातील राजकारणाचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याचा सराव नसल्यानं ते वैतागतात आणि काहीसं नकारात्मक चित्र रंगवतात की काय असं वाटतं. नारळीकरांबाबतही याचा प्रत्यय येतो. त्यांची बहुतांश निरीक्षणं बरोबरच आहेत, पण निष्कर्ष काढताना मात्र त्यांनी काही ठिकाणी घाई केली आहे असं वाटतं.
'मागे वळून पाहताना' या शेवटच्या प्रकरणात नारळीकरांनी थोडंसं भाष्य, काही निरीक्षणं आणि काही खंत व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी सुरुवातीला आपल्या पाच स्फूर्तिस्थानांविषयी लिहिलं आहे. त्यात आई-वडील, शिक्षक, फ्रेड हॉएल, इ. एम. फॉर्स्टर आणि बाळासाहेब राजवाडे या पाच व्यक्तींचा समावेश आहे.  पण ही टिपणं फारच छोटी असल्यानं त्या त्या व्यक्तींचे स्वभाव, वैशिष्टय़ आणि गुण सांगण्यापलीकडे ती जात नाहीत.


त्यानंतर विश्वरचनाशास्त्राबाबत अतिशय नेमकी पण कळीचा मुद्दा माडंणारी टिपणी केली आहे. ते लिहितात, 'संशोधनाला उपलब्ध मुबलक पैसा. पैशापाठोपाठ संशोधनाच्या सुखसोयी, आणि त्यांच्याशी जोडलेला अधिकार. हे टिकवून धरायला तुमचे सिद्धान्त बरोबर आहेत हे पैसा पुरवणाऱ्यांना (बहुतांशी सरकारी समित्यांना) पटले पाहिजे. त्या 'मोहा'पायी आहे तो सिद्धान्त टिकवण्याचे प्रयत्न असतात.' पुढे नारळीकर लिहितात, 'विश्वरचनाशास्त्र हा विषय आज वैज्ञानिक राहिला नसून त्यांत अवैज्ञानिक अटकळबाजी वाढत चालली आहे.' 


यानंतर इंग्रजी आणि मराठी या भाषांविषयी म्हणजे इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाविषयी आणि मराठीच्या भवितव्याविषयी काही विधानं केली आहेत. त्यात कुठलाही ठोस युक्तिवाद नारळीकरांनी केलेला नाही. इंग्रजीचा प्रभाव वाढत जाणार आहे आणि ती यापुढच्या काळात अनिवार्य भाषा होणार आहे, हे निर्विवाद म्हणावं इतकं स्वयंस्पष्ट आहे. पण मराठी टिकायची असेल तर केवळ उत्कृष्ट साहित्यनिर्मिती होत राहिली पाहिजे, हे नारळीकरांचं मत रास्त असलं तरी पुरेसं आणि पर्याप्त वाटत नाही. तुमचा देवावर विश्वास आहे का, या अनेकवार विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तरही नारळीकरांनी सावधपणेच दिलं आहे. त्यात त्यांचा चतुरपणाच जास्त दिसतो. 


या आत्मकथनातून नारळीकरांचा जीवनविषयक दृष्टिकोन फारसा समोर येत नाही, त्यांच्या जगण्याविषयीच्या धारणाही पुरेशा स्पष्ट होत नाहीत. वाचकांना त्यांच्याविषयी नसलेली काही नवी माहिती सांगणं, (बहुधा एवढाच) हेतू असल्यानं हे आत्मचरित्र फार पसरट, पाल्हाळिक झालं आहे. या आत्मकथनाचं शीर्षकही अतिशय अनाकर्षक आहे.
या पुस्तकावर काटेकोरपणे संपादकीय संस्कार झाले असते तर हे टाळता येणं शक्य होतं. त्यामुळे पृष्ठसंख्या बरीच कमी होऊन ते अधिक सुटसुटीत झालं असतं. आशयही अधिक नेमकेपणानं वाचकांना भिडला असता. परिणामी वाचनीयता वाढली असती. पण संपादनाच्या पातळीवर जी साक्षेपी मेहनत घेतली जायला हवी होती, ती घेतली गेली नसावी असं वाटतं. 


नारळीकरांच्या या आत्मकथनाची पहिली आवृत्ती २६ जानेवारी रोजी प्रकाशित झाली. सुमारे पाचशेहून अधिक पानं, तेवढीच किंमत असलेल्या या पुस्तकाची २ ऑक्टोबर रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. यातून नारळीकरांविषयीचं महाराष्ट्रीयांचं कुतूहल आणि आस्था व्यक्त होते, हेही तितकंच खरं.


हे आत्मचरित्र वाचलंच पाहिजे, असं आहे. यात प्रेरणा घ्यावी अशा अनेक गोष्टी, प्रसंग आहेत. शिवाय हे नारळीकरांचं आत्मचरित्र असलं तरी एका अर्थानं काही प्रमाणात केंब्रिज, टीआयएफआर आणि आयुका यांचं चरित्रही आहे. ही चरित्रकथा जाणून घ्यावी अशीच आहे. त्यातून प्रत्येकाला काही ना काही नक्की मिळू शकतं. शास्त्रज्ञ आणि माणूस म्हणून नारळीकरांना काही प्रमाणात जाणून घेण्यासाठी हे आत्मकथन नक्कीच मदत करू शकतं. सुनीताबाईंनी विचारलेल्या प्रश्नाचा उत्तरार्ध बरोबर होता, पण त्याचा पूर्वार्ध मात्र अपूर्ण होता, याची खात्री हे आत्मकथन वाचताना पटते. पण नारळीकरांसारखी माणसं इतकी अफाट आहेत, की त्यांच्याविषयी अशा एखाद्या पुस्तकातून पूर्णपणे जाणून घेता येणं शक्य होत नाही, हेही तितकंच खरं.


चार नगरांतले माझे विश्व - जयंत विष्णु नारळीकर, मौज प्रकाशन गृह, मुंबई 
 
पृष्ठे - ५४६, मूल्य - ५०० रुपये.

Wednesday, November 21, 2012

लेखक अर्धाच पूल बांधू शकतो...

LOKSATTA, Sunday, November 11, 2012
कादंबरीकार- नाटककार किरण नगरकर यांच्याशी बोलणं हा एक सुंदर अनुभव असतो. आपण सेलिब्रेटी लेखक आहोत, याचा जराही अहंकार त्यांच्या बोलण्यामध्ये डोकावत नाही. उलट, स्वतकडे कमीपणा घेऊन ते आपल्या पुस्तकांच्या निर्मितीबद्दल, त्यामागच्या प्रेरणांबद्दल बोलतात. त्यांच्या 'रावण अँड एडी', 'गॉड्स लिटिल सोल्जर', 'ककल्ड' आणि 'द एक्स्ट्राज' या कादंबऱ्यांनी इंग्रजीमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. एक मराठी माणूस इंग्रजीमध्ये 'हायली रिडेबल' आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मराठीविषयी त्यांना कमालीचं प्रेम आहे.
पण मराठीतल्या साहित्यिक राजकारणाचा, गटबाजीचा आणि पूर्वग्रहांचा त्यांना भयंकर तिटकारा आहे. त्याविषयी बोलताना ते कळवळतात. नगरकरांना नुकताच जर्मन सरकारनं नागरी पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यानिमित्तानं दिवाळीच्या प्रसन्न वातावरणात एका वेगळ्याच विश्वात रमलेल्या लेखकाशी राम जगताप यांनी मारलेल्या या गप्पा...


तुमच्या जवळपास सर्व पुस्तकांचे अनुवाद जर्मनमध्ये झाले आहेत. या लेखनामुळे जर्मनी-भारत यांच्यामध्ये सांस्कृतिक अनुबंध निर्माण झाला. त्यासाठी नुकतंच तुम्हाला जर्मन सरकारतर्फे 'ऑर्डर ऑफ मेरिट' या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जर्मनी हा भारताचा जुना मित्र आहे. नेहरूंच्या काळापासून जर्मनीशी भारताचे अतिशय सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्याला तुमच्या सन्मानानं एक वेगळा आयाम मिळाला आहे. लेखन हीच लेखकाची कृती असते असं म्हणतात. त्यामुळे हा पुरस्कार विशेष मोलाचा वाटतो. तुमच्या काय भावना आहेत या पुरस्काराविषयी?
- आजच्या जमान्यात लेखनाला महत्त्व देणं दुर्मीळ आहे. त्यामुळे या पुरस्काराचा मला नक्कीच आनंद आहे, प्रश्नच नाही. मी जर्मनीत अनेक ठिकाणी बोलतो.. बोलत आलेलो आहे. मला त्यांचं नेहमी कौतुक वाटतं. अहो, ते वाचताहेत हो चक्क! कठीण पुस्तकंही ते वाचतात. अमेरिकेतही पुस्तकं भरपूर आहेत; पण जर्मनांचं प्रेम औरच. जर्मन लोक मला नेहमी सांगतात की, आमच्याकडे किती कमी अनुवाद होतात. जागतिक पातळीवर पाहता ३.५ टक्के अनुवाद फक्त जर्मनीत होतात. मला वाटतं अमेरिकेत ०.३ टक्के पण होत नाहीत. त्यामुळे ही खरोखरच गौरवाची गोष्ट आहे, की त्यांना अजूनही वाचनाचा नाद आहे. आपल्याकडे मी नेहमी स्वत:ची थट्टा करतो की, माझ्या पुस्तकाचं जेव्हा अभिवाचन असतं, तेव्हा मला लोकांना पैसे देऊन बोलवावं लागतं. याउलट जर्मनीमध्ये लेखक अभिवाचन करायला आला की ते पैसे देऊन ते ऐकायला येतात. हे तुम्हाला कुठे मिळणार आहे? अहो, इथं महाराष्ट्रात माझं नाव कुणी ऐकलंय का?


वाङ्मयीन संस्कृती आणि वाङ्मयीन लोकशाही याविषयी जर्मनीकडून आपण बरंच शिकण्यासारखं आहे..?
- जर्मनीच्या बाजूनं बोलावं तेवढं कमीच. पहिली गोष्ट तर कधी विसरता येत नाही, की नाझींचा ज्यूसंहार कधीच विसरता येत नाही. सहा मिलियन ज्यूंना त्यांनी मारलं. त्याविषयीचा गिल्ट त्यांच्या लेखनात, कलेत सतत येत राहतो. याउलट आपण! आपल्याकडे 'ओलावा' नावाचा शब्द आहे. त्यामुळे आपण सगळं भावनिक करून टाकतो आणि नाकारतोही. आपल्या देशात काही थोर लोक होऊन गेले आहेत, त्यांनीपण काही भयाण गोष्टी केलेल्या आहेत. त्याविषयी आपण बोलू शकतो का? सुभाषचंद्र बोसांबद्दल कठोर सत्य बोलता येतं का? 

म्हणजे वाचकाकडून लेखकाला ज्या प्रकारचा प्रतिसाद हवा असतो, ज्याचा लेखक भुकेला असतो.. वाचक म्हणून लेखनाला न्याय देण्याचं काम जर्मनमध्ये खूप चांगल्या प्रकारे होतं असं तुम्हाला म्हणायचंय का?
- मला तरी तसं वाटतं. मी जेव्हा 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलं, तेव्हा त्यांनी ते ताबडतोब अनुवादित केलं. 'गॉड्स..'मधील एक अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा शेवटच्या पन्नास पानांत येते. त्याविषयी लिहिताना एका जर्मन समीक्षकानं असा प्रश्न विचारला की, ६००-७०० पानांचं पुस्तक लिहावं, तरीही अतिशय तुफान गती असावी. मात्र, इतका महत्त्वाचा विषय गंभीरपणे हाताळणं, हे जमू शकतं का? पुढे त्यानं लिहिलंय की, शेवटच्या पानांत महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची ओळख करून द्यायची, हा मॅडनेस आहे. थोडक्यात- ते बारकाईनं वाचतात.
आणखी एक : 'गॉड्स लिटिल सोल्जर'चा विषय आहे जहालमतवाद आणि दहशतवाद. हा आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईवर इतक्या वेळा हल्ला झालेला आहे! मुस्लीम राष्ट्र नसलेलं असं दुसरं कुठलंही शहर जगात नसेल. पण याविषयी आपल्या समाजामध्ये कधी बोलणं होतं का हो? त्याविषयी आपण सार्वजनिक चर्चा करतो का? कशामुळे हे होतंय? या हल्ल्यासाठी नेहमी मुस्लीम समाजाला दोषी ठरवलं जातं. एक गोष्ट लक्षात घ्यायलाच पाहिजे. आपण 'ब्लॅक फ्रायडे' पाहतो तेव्हा ती बरोबर कळते.. मुस्लीम समाज पण किती दु:खी आहे! मुंबईत दंगली झाल्या तेव्हा आपण त्यांची काय वाट लावली! 'मॅक्झिम सिटी'मध्ये सुकेतू मेहतानं एकाचं अवतरण दिलंय. तो माणूस म्हणतो- आग लागली ना, मग तेल बाहेर येतं!
व्ही.टी. - ताज- ओबेरॉयवर हल्ला झाला तेव्हा मी जर्मनीत होतो. ते मला विचारत होते- यू आर द एक्स्पर्ट ऑन धिस. मी त्यांना परत परत सांगत होतो की, मी कसला एक्स्पर्ट? बॉम्बहल्ला झाला की मला पहिल्यांदा वाटतं- मला काय समजलं यातून? हे कधीच थांबणार नाही का? कोणाला तरी मारायचं, यामागे काही एकच प्रेरणा असत नाही; कित्येक प्रेरणा असतात. मी फक्त एक प्रेरणा घेऊन 'गॉड्स लिटिल सोल्जर' लिहिलंय. याविषयी आणखी १०० लोकांनी लिहिलं तर उत्तम होईल. 


भारतीय मुस्लिमांचं चुकीचं आणि विपर्यस्त चित्रण केल्याबद्दल नुकत्याच मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवामध्ये ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड यांनी नोबेलविजेते व्ही. एस. नायपॉल यांच्यावर जाहीर टीका केली. या विपर्यस्त लेखनामुळेच नायपॉल यांना नोबेल मिळालं असावं, असं कार्नाड यांनी उपहासानं म्हटलं आहे.
- कार्नाडांचा मुद्दा अतिशय चांगला आणि ठळक आहे! कार्नाड हा अतिशय शांत प्रकृतीचा माणूस आहे. त्यामुळे त्यांना तीव्रपणे तसं वाटलं असणार, तेव्हाच ते हे बोलले असतील. 


सध्या लेखनावर केवळ आपल्याकडेच नव्हे तर जगभर घोषित-अघोषित आणि सरकारबाह्य़ सेन्सॉरशिप लादल्या जात आहेत. त्यांचं प्रमाण वाढत आहे. जर्मनीत काय स्थिती आहे?
- तिथे अशा सेन्सॉरशिप बिलकुल नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे विद्यापीठांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. वेगवेगळी मतं, दृष्टिकोन मांडण्याचं स्वातंत्र्य जर्मनीमध्ये निश्चित आहे; तितकं अमेरिका-युरोपमध्येही नसेल.


'रावण अ‍ॅण्ड एडी' आल्यावर काही समीक्षकांनी तुमच्याविषयी म्हटलं होतं, ''Wow, you must have been born in the toilets of chawl'' आता त्याचा दुसरा भाग 'द एक्स्ट्राज' आल्यावर त्याच्याविषयी काय प्रतिक्रिया आहेत?

- ''रावण अ‍ॅण्ड एडी' इज लास्ट वर्ड ऑन बॉम्बे!' असं एकानं लिहिलं होतं. तेव्हा त्याला मी सांगितलं- धिस इज नॉट फायनल बुक ऑन बॉम्बे. कितीतरी लोकांनी लिहिलं आहे. तो खूप प्रामाणिक होता. त्यानं म्हटलं की, नगरकर माझ्याशी बिलकुल सहमत नाहीत. असो.
'द एक्स्ट्राज'मध्ये व्हेरी व्हेरी फनी सेक्स आहे. आपल्याकडच्या शिल्पांमध्ये, मंदिरांमध्ये सेक्स आहेच की! पण आपल्याला शरम कसली? कपडे काढल्याची! 'द एक्स्ट्राज'मध्ये गंभीर विनोद आहे, पण त्यात भरपूर मजा आहे. मला तमाशा फार आवडतो. आपल्या लोककलांमध्ये सेक्सबद्दल काहीही प्रॉब्लेम नाही. स्त्री-पुरुष देवांची छानपैकी टर उडवतात. फॅन्टॅस्टिक खरं बोलतात. हे आपल्या रक्तामध्येच आहे. त्यामुळे ते माझ्या पुस्तकामध्येही येतं. पण 'द एक्स्ट्राज'मधल्या मुंबईविषयी, बॉलीवूडविषयीच बोललं जातं. हे पुस्तक खदाखदा हसवतं, याच्याकडे कुणी लक्षच द्यायला तयार नाही.


आपल्या लोककलांमध्ये हा जो निरागस, स्वच्छंदी मनमोकळेपणा आहे, तो साहित्यातून व्यक्त झाला की आपल्याला पचवणं कठीण जातं..?
- तुम्ही अगदी बरोबर बोललात. पचवणं कठीण जातं! मग आमच्यातली दांभिकता बाहेर येते. आमचा समाज असा नाही. आम्ही सभ्य लोक आहोत. मला वाटतं, देवांना २४ हात असतील, पण आपल्याकडच्या लोकांना कमीत कमी दहा करोड हात आहेत. जेवढे पैसे खिशात भरता येतील तेवढे भरायचे आणि वर चांगुलपणाचा आव आणायचा.


'सात सक्कं त्रेचाळीस' या माझ्या पुस्तकाच्या २७ वर्षांत फक्त एक हजार प्रती विकल्या जात असतील तर मराठीत लिहू कशाला?', असा प्रश्न तुम्ही याआधीही उपस्थित केला आहे. ही तुमची खंत काहीशी अस्वस्थ करणारी आहे. पण ती तितकीशी बरोबर नाही असं वाटतं. एक म्हणजे तुमची ही कादंबरी साठोत्तरी काळातील एक महत्त्वाची कादंबरी मानली जाते. दुसरं म्हणजे खप आणि वाचकप्रियता म्हणाल तर या दोन्ही गोष्टी एका मर्यादेनंतर मार्केटिंग, जाहिरात, वितरण यावरच अवलंबून असतात ना..
- तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. 'सात सक्कं त्रेचाळीस' प्रकाशित झाली त्या काळात एवढं मार्केटिंग नव्हतं. पण मी तुम्हाला एक सांगू का, ज्याविषयी मराठी वर्तमानपत्रं वा मासिकं कधी बोलत नाहीत- मी मराठीमध्ये लिहायला कसा लागलो? फक्त चौथीपर्यंत माझं शिक्षण मराठीतून झालं, त्यानंतर माझा मराठीशी संबंध पूर्णपणे तुटला. इंग्रजीशिवाय मला इतर कुठलीही भाषा येत नव्हती. कर्मधर्मसंयोगानं मी मराठी लिहायला लागलो. माझं मराठीला जे देणं आहे, ते मला कधीच फेडता येणार नाही.. आणि फेडायचंही नाही मला. भाषेचं ऋण कशाला फेडायचं? भाषेचं म्हणणं एवढंच- माझा आदर करा. भाषेतले शब्द म्हणजे गोल्ड कॉइन. २४ कॅरेट. ते सांभाळून वापरावेत. आजकाल कुठलंही पुस्तक 'फॅन्टॅस्टिक', कशालाही 'ग्रेट'! अरे, आहे काय? 'न्यूयॉर्कर'च्या पहिल्या संपादकानं असा कायदाच केला होता की, 'ग्रेट' हा शब्द वापरायचा नाही. कारण लोक त्याचा फार गैरवापर करतात. आता तर 'ग्रेट' हा शब्द मराठीच झालेला आहे. अहो, टॉलस्टॉय, शेक्सपीअर, कबीर हे लोक 'ग्रेट' असतील तर बाकीचे लोक 'ग्रेट' होऊ शकत नाहीत. त्यांना खालीच ठेवायला लागतं.


तुमची 'ककल्ड' कादंबरी भक्ती-परंपरेविषयी, 'रावण अ‍ॅण्ड एडी' ही मुंबईतल्या चाळसंस्कृतीविषयी, 'गॉड्स लिटिल सोल्जर' दहशतवादाविषयी.. टोकाचे म्हणता येतील असे हे विषय आहेत.. कुठल्याच कादंबरीचं एकमेकीशी साम्य नाही. हे कसं जमतं तुम्हाला?
- काही नाही, देवाची कृपा. आणि देवकृपेनं ते तसंच राहावं. आय डोन्ट वॉण्ट टु रिपीट मायसेल्फ. आपण कुणी खास आहोत असं प्रत्येकाला स्वत:बद्दल वाटत असतं. पण मला तसं वाटत नाही. 'सात सक्कं त्रेचाळीस'ची वेगळी शैली होती. तेव्हा ती काहींना आवडलीही होती. पण अमुक एक गोष्ट सक्सेसफुल झाली म्हणून परत परत तेच करत बसणं मला नाही पटत. नवे नवे फॉर्म शोधावेसे वाटतात. मला ओरिजिनल असण्याचा काहीही अभिमान नाही. कोण ओरिजनल बनणार आहे? महाभारतानं सगळं करून ठेवलेलं आहेत. इलियट-ओडिसीनं सगळं करून ठेवलेलं आहे. त्यामुळे ओरिजिनलच्या पाठीमागे जे लागतात ना, ते खरोखरच धन्य आहेत. मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण मला काही ते जमायचं नाही बुवा. माझी इच्छाही नाही. मला फक्त वेगवेगळ्या विषयांवर लिहायचंय, माझ्या परीनं.


तुम्ही 'ककल्ड' ही मीराबाईविषयीची कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पण तुम्हाला तर मीरेवर लिहायचं नव्हतं..?
- बिलकुल हात लावायचा नव्हता. 


म्हणजे मीरेनं तुम्हाला तुमचे शब्द मागे घ्यायला लावले..?
- अहो, तिनं माझ्या थोबाडीत मारली. माझे शब्द माझ्याच घशात घातले. मी लहानपणापासून पोस्टरवरील किंवा कॅलेंडरवरील मीरेचा फोटा पाहत आलो होतो. म्हणून मला तिच्यावर लिहायचं नव्हतं. पण तो माझा मूर्खपणा होता. आपल्या हिंदी चित्रपटांनीसुद्धा तेच केलेलं आहे. परत परत तोच क्लिशे पुढे आणला जातो. पण मीरा क्लिशे नाही, ती बंडखोर आहे. शी इज वन ऑफ द फर्स्ट रिव्होल्यूशनरी. शी इज ऑल्सो फर्स्ट फेमिनन.
दुसरं इतिहास आणि भक्ती हे विषय 'ककल्ड'मध्ये ज्या पद्धतीनं मी हाताळले आहेत, तसे फार क्वचित कुणी हाताळले असतील. महाराजा कुमार मीरेशी लग्न करतो, पण ती त्याला सांगते- 'सॉरी, माझं कुणावर तरी प्रेम आहे!' तिचा प्रियकर हा कुणी साधासुधा माणूस नाही, तर तो साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहे. हा जो प्रेमाचा त्रिकोण आहे, तो अतिशय वेगळ्या प्रकारचा आहे. आणि तो भक्तीचा त्रिकोण आहे. पण यात आणखी एक गंमत आहे. महाराजा कुमारचा रोल मॉडेल आहे कृष्ण. गोपींबरोबर फिरणारा नाही, तर 'गीता'कर्ता कृष्ण! तो सगळं काही कृष्णाकडून शिकलेला आहे. तो त्याचा सखा, त्याचा देव साक्षात् त्याच्याच बायकोचा प्रियकर आहे. ही फार विचित्र परिस्थिती आहे. महाराजा कुमार तिचा खून करायचाही प्रयत्न करतो. पण त्याला शेवटी समजतं की, मीरेचं कुणावरच प्रेम नाही, तिचं फक्त कृष्णावरच प्रेम आहे. ही जी या कादंबरीतली गुंतागुंत आणि तणाव आहेत, ते या पुस्तकाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. मी 'ककल्ड' लिहायला घेतली तेव्हा आपण काय लिहिणार आहोत, याची मला काहीही कल्पना नव्हती. मला फक्त इतकंच माहीत होतं की, कुठल्यातरी एका क्षणी महाराजा कुमार स्वतला निळा बनवणार आहे.


मघाशी तुम्ही 'देवाची कृपा आहे,' असं म्हणालात म्हणून विचारतो- देवावर तुमचा विश्वास आहे?
- जेव्हा भक्तीचा संबंध येतो ना, तेव्हा! नारायणराव व्यास म्हणून एक गाणारे होते. एरवी कृष्णाची प्रेमगीतं मला सहन होत नाहीत अगदी. पण नारायणराव ती गीतं गातात तेव्हा मी त्यांचे पाय धरतो. तेव्हा मला कृष्ण खरा वाटतो.


भक्तीपरंपरेबद्दलची ही तुमची ओढ कुणामुळे निर्माण झाली? अरुण कोलटकरांमुळे?
- कोलटकर तुफान माणूस. हसून पोट दुखायचं. त्याचा सेन्स ऑफ ह्य़ूमर जबरदस्त होता. वाचन अगाध. समज बेफाम. दुसरं- माझ्या घरचे लोक प्रार्थना-समाजी. त्यामुळे आमच्याकडे ते होतंच. संतांचं तर आमच्याकडे फार कौतुक.


लेखकानं नैतिकता आणि न्याय यांच्यासाठी आपल्या लेखनाच्या माध्यमातून हस्तक्षेप करायचा असतो असं मानलं जातं. तसा हस्तक्षेप तुम्ही करत आला आहात. तुम्हाला मराठीमध्ये नैतिकता व न्यायासाठी झगडावं लागतं आहे का?
- कोलटकर, कधी कधी चित्रे यांनाही झगडावं लागलंच की! कोलटकरांचं तर बघायलाच नको. मला एकच वाईट वाटतं- हे लोक कसे गट करतात हो! जिथे कुठे चांगलं साहित्य असेल, तर तो एकच गट असायला हवा ना? मग एवढे गट कशासाठी करायचे, मला हे समजत नाही. 


तुम्ही अजूनही स्वतला कॉन्झर्वेटिव्ह (परंपरावादी) आणि अन्अ‍ॅडव्हेंचरस (अ-साहसी) मानता का?
- हो. जेवढी करामत करायला हवी होती, तेवढी मी केलेली नाही. त्यामुळे मी तसंच मानतो. प्रश्नच नाही. लोकांना ओरिजिनॅलिटीमध्ये अ‍ॅडव्हेंचर वाटतं. मला त्यात पडायचं नाही. मी गोष्टी सांगणारा माणूस. मला एका अत्यंत यशस्वी नाटककारानं सांगितलं होतं- तुला जमत नाही, तर तू कशाला लिहितोस? तू लिहायचं बंद कर. तेव्हा मी अर्थातच दुखावला गेलो होतो. त्यानंतर एक महिना, दोन महिने, तीन महिने गेले. मग मी स्वतला विचारलं, अरे बाबा, तू दुखावला गेलास त्याचं कौतुक आता पुरे. आता पुढे चल. 


आपल्याकडे गोष्ट रंगवून सांगण्याची बखरगद्याची परंपरा होती. ती आपण साहित्यातून फारशी पुढे आणली नाही. त्यामुळे मराठीचं नुकसान झालं असं म्हणता येईल का?
- हो, अगदी बरोबर. आपण ते समजून घ्यायला तयार नाही. सगळं काही आपल्याकडे आहे. शेक्सपीअर, टॉलस्टॉय, गार्सिया माक्र्वेझ मला पाहिजे; पण मला संतांशिवाय कधीच जगता येत नाही. काय म्हणून जगू मी? अहो, केवढी मोठी परंपरा आहे आपल्याकडे! चोखामेळा, नामदेव, बहिणाबाई.. तुफान. काय सेन्स ऑफ ह्य़ूमर बहिणाबाईचा! किती हलकंफुलकं, पण महत्त्वाचं बोलून जाते ती! मुक्ताबाई घ्या! ती आपल्या भावाला सांगते- दार उघड रे!


हल्ली मराठीच्या भवितव्याची चिंता मोठय़ा प्रमाणावर व्यक्त होऊ लागली आहे. मराठीपुढे इंग्रजीचं संकट उभं राहिलं आहे असं सांगितलं जातं. त्याविषयी काय वाटतं?
- मला यात अत्यंत खोटेपणा वाटतो! पण आग्र्युमेन्ट इज अ‍ॅब्स्युलिट्ली राइट. अशी कुठलीही भाषा म्हणत नाही, की फक्त मलाच आपुलकी दाखवा. भारतात चार भाषा बोलणं हे आरामात जमायला पाहिजे. सगळ्या प्रादेशिक भाषा म्हणतात की, इंग्रजीनं आमची वाट लावली. पण या भाषांना परस्परांबद्दल आदर वाटतो का? तुम्ही कधी बघितलंय- कुणी मराठी माणूस तमिळमध्ये इंटरेस्टेड आहे? गुजराती माणूस कन्नडमध्ये इंटरेस्टेड आहे? नाही. हे फक्त बोलण्यासाठी! मराठी माझी मातृभाषा आहे. त्यामुळे मला मातृभाषा आणि इंग्रजी बोलण्यामध्ये काही प्रॉब्लेमच वाटत नाही. शरमेची गोष्ट एवढीच, की मी फक्त दोनच भाषा बोलू शकतो. त्याही बेताच्या; चांगल्या नाही.


आपल्याकडे जी भाषा, लिंग, धर्म, पंथ आदी विविधता आहे, आणि या विविधतेतही वेगळ्या प्रकारची एकता आहे, त्या परंपरेला अलीकडच्या काळात काही भारतीय लेखकांकडूनच तडे जायला सुरुवात झाली आहे. भाषेचं राजकारण केलं जाऊ लागलं आहे..
- अगदी बरोबर बोललात तुम्ही. अहो, भाषा म्हणजे आपली आई. केवळ गोंजारणारी आई नाही. अतिशय कठीण आणि कठोर बाई आहे ती. त्यामुळे भाषेचं राजकारण केलं जाणं ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मला याचा राग येतो की, काही लोक म्हणतात मराठीवर आमचं प्रेम आहे. मग तुमच्या पोरांना कामापुरतं बोलता-लिहिता येऊ नये मराठी? आपल्याकडची कुठली भाषा अप्रतिम नाही? हिंदी-बंगाली याही अप्रतिम भाषा आहेत. आपल्याकडे किती भाषा आहेत! केवढी मोठी संपत्ती आहे ही! ही संपत्ती जगात कुणाकडे आहे? आपण शिक्षणाच्या माध्यमात किमान चार भाषांचा का समावेश करत नाही?


मराठीमध्ये तुमचा म्हणून एक चाहतावर्ग आहे. तो संख्येनं छोटा असेल; पण आहे. पण त्यांच्यासाठी तुम्ही दुर्मीळ असता. लेखक दुर्मीळ असणं हे त्याच्या वाचकासाठी अन्यायकारक असतं..
- मराठी वाचकांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच ठरतील. लेखक फक्त अर्धा पूल बांधू शकतो; उरलेला अर्धा पूल त्याचे वाचक बांधत असतात. कुणीही मला कधीही सांगावं- नगरकर तुमचा अमुक एक दिवस आम्हाला हवा आहे.. आपण तुमच्या साहित्याचं वाचन आणि चर्चा करू. माझी कधीही तयारी आहे. माझ्या अपेक्षा फार कमी आहेत. आय नीड एन्टायर वर्ल्ड ऑफ माय रीडर. माझ्या वाचकांसाठी कुठलीही तडजोड करायला माझी हरकत नाही. नाहीतर लिहायचं कशासाठी? 


... किरण नगरकरांशी बोलताना जाणवते ती त्यांची कमालीची लेखननिष्ठा, त्यांचं लेखकपण. लेखक म्हणून जगणं नेमकं काय असतं, याचा सच्चा अनुभव घ्यायचा असेल तर नगरकरांना भेटलंच पाहिजे. कारण लेखनाशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या राजकारणापासून कटाक्षानं अलिप्त राहणारा हा मनस्वी कादंबरीकार 'निवडितो ते सत्त्व' या धारणेनं लिहीत आहे, जगत आहे...

प्रिय वाचक हो !

गेले काही दिवस मी ब्लॉग वर काहीच लिहिले नाही. पण आता लवकरच मी पुन्हा लिहायला सुरुवात करेन म्हणतो. मधल्या काळात बरेच वाचन केले आणि काही नवे अनुभवही घेतले, ते आपल्याशी शेअर  करायचे आहे. तेव्हा भेटूच लवकर.
राम जगताप 

Sunday, September 16, 2012

महाराष्ट्रासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे : डॉ. मोरे

दैनिक एकमत, ११ सप्टेंबर २०१२ 
 महाराष्ट्र निकोप राहण्यासाठी मराठ्यांनी निकोप राहणे गरजेचे आहे असे मत जेष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळ आयोजीत बी. रघुनाथ महोत्सवात एक पुस्तक एक दिवस या अंतर्गत राम जगताप, सुशील धसकटे यांनी संपादीत केलेल्या मराठा समाज वास्तव आणि अपेक्षा या ग्रंथावर परिचर्चा आयोजीत करण्यात आली होती.
 या परिचर्चेत स्वतः दोन्ही संपादक तसेच या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभली आहे असे डॉ. सदानंद मोरे सहभागी झाले होते. पुढे बोलतांना डॉ. मोरे म्हणाले की या लेखातील बहुतेक लेख मराठा समाजातील लेखकांनी लिहलेले आहेत व ते चांगले आहेत. मराठ्यांनी लिहलेल्या लेखातही आत्मसमर्थनाचा सुर आहे. एकतर वास्तवाचे दर्शन आणि स्विकार किंवा आत्मटिका असे स्वरुप लेखांचे आहे. मराठ्यांमधील दोषाचे उदात्तीकरण करतांना कोणी दिसत नाही. हे लेख भांडारकर संस्था प्रकरणाच्या आधीचे आहेत. त्यामुळे पुर्वीचे अनेक संदर्भ आज बदलले आहेत. या प्रकरणानंतर मराठ्यांच्या संघटना आक्रमक झाल्या. मराठ्यांना दोषासगट स्विकारण्याची भाषा बोलु लागल्या. याचाच एक परिणाम म्हणजे मराठ्यांबद्दल चर्चा करण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीला लेखक सुशील धसकटे यांनी सांगितले की प्रस्तुत लेख संग्रहाची कल्पना आम्हाला सुचली ती सत्याग्रही जीवनधाराच्या मराठा विशेषंकावरुन विविध लेखांच्या माध्यमातुन छोट्या ग्रंथातुन वेळोवेळी मराठा समाजा विषयी लिखान झाले. काही वेळा तेवढ्या पुरती चर्चाही झाली. पण बहुतेक वेळा ती तेवढ्या पुरतीच राहिली. ती तशीच नियतकालीकांच्या पानाआडपडु न देता अधिकाधिक लोकांपर्यंत विशेषतः तरुण पिढी पर्यंत जावी म्हणुन त्यातील काही निवडक लेख या लेख संग्रहात उपलब्ध करुन दिले आहेत. राम जगताप म्हणाले की मराठा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज मानला जातो. मराठा तरुणांनी आत्मपरिक्षणाला सिध्द व्हावे हाच आमचा एकमात्र उद्देश हा पुस्तक निर्मितीमागे आहे असे ते म्हणाले कार्यक्रमास नागरीक उपस्थित होते.

Friday, September 7, 2012

समर्पक आणि समर्थ पर्यायी शब्दांसाठी...


अलीकडच्या काळात मराठीमध्ये कोशवाडमयाची परंपरा चांगलीच रोडावली आहे. कोश तयार करणं हे तसं प्रचंड वेळखाऊ आणि कष्टाचं काम असतं. शिवाय त्यासाठी मोठया आर्थिक साहाय्याची गरज असते. शिवाय इतक्या खस्ता खाऊन तयार केलेल्या कोशांना वाचकांचा म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नाही. अशा अनेक कारणांमुळे कोशवाड्मयाची निर्मिती रोडावली, असे विश्लेषण काही लोक करतात. त्यात थोडेफार तथ्य आहे. पण थोडेफार म्हणावे इतकेच. कारण एकेकाळी मराठीमध्ये कोशवाड्मयाची समृद्ध आणि विपुल म्हणावी अशी परंपरा होती. अठराव्या-एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आजच्या तुलनेने सोयी-सुविधा फारशा नव्हत्या. आर्थिक साहाय्याचीही बोंब होती. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून कितीतरी प्रकारच्या वैविध्यपूर्ण कोशांची निर्मिती झालेली दिसते. म्हणजे कोशनिर्मितीसाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षाच प्रबळ ठरते. हल्ली तिलाच काहीशी ओहोटी लागल्याने कोशवाङ्मयाचे दुर्भिक्ष्य जाणवते आहे. तरीही काही लोक निष्ठेने कोश तयार करत आहेतच. वि. शं. ठकार हे त्यापैकीच एक. नुकताच त्यांनी ‘इंग्रजी-मराठी पर्यायकोश’ तयार केला आहे.



या पर्यायकोशाची काही वैशिष्टय़ं आहेत. एक, हा मराठीतला अशा प्रकारचा पहिलाच कोश आहे. दोन, प्रत्येक इंग्रजी शब्दाला पाचपाच-सहासहा मराठी पर्यायी शब्द दिलेले आहेत. त्यामुळे त्यातून आपल्याला हव्या त्या योग्य शब्दाची निवड करणं सोप होतं. तीन, या कोशाची निर्मिती चांगली आहे. मजबुत पुठ्ठाबांधणी असूनही त्याची किंमत तुलनेनं स्वस्त म्हणावी अशी आहे. एक महत्त्वाचा फरक सुरुवातीलाच समजावून घेतला पाहिजे. हा ‘इंग्रजी-मराठी’ थिसॉरस आहे, पर्यायकोश आहे. ही इंग्रजी-मराठी डिक्शनरी नाही. डिक्शनरीमध्ये इंग्रजी शब्दांचा सरळ मराठी अर्थ दिलेला असतो. तो मूळ शब्दाच्या अर्थाच्या जवळ जाणारा असतो. थिसॉरस वा पर्यायकोश डिक्शनरीच्या पुढचा टप्पा असतो. यात मूळ शब्दाच्या विविध अर्थछटा लक्षात घेऊन त्याला एकापेक्षा जास्त पर्यायी शब्द सुचवलेले असतात. त्यामुळे मूळ शब्द त्या वाक्यामध्ये नेमका कोणत्या संदर्भाने वापरलेला आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी योग्य मराठी पर्याय शोधणे सोपे होते.

त्यामुळे हा कोश विशेषत: इंग्रजीतून मराठीमध्ये अनुवाद/भाषांतर करणा-या व्यावसायिक अनुवादकांसाठी, पत्रकारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगी आहे. कुठल्याही भाषेतील शब्दांना त्या त्या भाषेतील सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक, राजकीय यांच्या संदर्भाबरोबरच प्रादेशिकतेचे आणि रीतीरिवाजांचेही कोंदण असते. शब्दांतून व्यक्त होण्याची प्रत्येक भाषेची एक विशिष्ट लकब असते, लहजा असतो. तो इतर भाषेत जसाच्या तसा अनुवादित करताना अनेकदा अडचणी येतात. कारण त्या भाषेत मूळ भाषेतल्या अर्थछटेसह त्या शब्दातली भावना व्यक्त होईल यासाठी तितका समर्पक आणि समर्थ शब्द असतोच असे नाही. ब-याचदा नसतोच. अशा वेळी त्या शब्दाच्या जवळ जाईल, असा पर्यायी शब्द योजावा लागतो. पण असा पर्यायी शब्द ऐनवेळी कसा सुचणार वा आठवणार? अनुवादकांना/भाषांतरकारांना अशा अडचणींना नेहमीच सामोरं जावं लागतं.

वाक्प्रचार-म्हणी यांचा अनुवाद करणं तर आणखीनच कठीण होतं. कारण या वाक्प्रचार-म्हणींना ब-याचदा मूळ भाषेतल्या सांस्कृतिकतेतून काही अर्थ चिटकलेले असतात. ते समजावून घेतल्याशिवाय त्यांचा अर्थासह अनुवाद करणं शक्य होत नाही. शिवाय इंग्रजी म्हणींचा अनुवाद करणं तर फार मुष्किलीचं काम होऊन बसतं. कवितेतील प्रतिमा आणि वाक्प्रचार-म्हणी ही अनुवादातील मोठी अडचण असते. ते लक्षात घेऊन ठकार यांनी इंग्रजी शब्दांसाठी मराठी वाक्प्रचार आणि म्हणीही सुचवल्या आहेत.

पुस्तकांचे अनुवाद करणा-यांकडे पुरेसा वेळ असतो, पण वर्तमानपत्रं वा वृत्तसंस्थांमध्ये काम करणा-या व्यक्तींना मात्र कमीत कमी वेळेत शक्य तेवढा निर्दोष अनुवाद करायचा असतो. अशा वेळी संबंधित अनुवादकाचं दोन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व असावं लागतं. शब्दसंग्रहही भरपूर असावा लागतो. पण तरीही योग्य वेळी योग्य शब्द सुचणे, हे तसं कसब आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी हाताशी एखादा चांगला पर्यायी शब्दकोश असणं उत्तम असतं. प्रस्तुत कोश त्यासाठी उत्तम पर्याय आहे. हल्ली मराठीमध्ये ब-याचदा भयानक वाक्यं आणि निर्थक शब्दांचा वापर केला जातो. त्याचं कारण योग्य शब्दांविषयीचं अज्ञान हेच असतं. म्हणायचं असतं एक, प्रत्यक्षात लिहिलं जातं दुसरंच, हा विनोद तर वर्तमानपत्रांमध्ये नेहमीच पाहायला मिळतो. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात अतिशय गैरलागू, धेडगुजरी शब्दांचा वापर केला जातो. म्हणून पत्रकारांनाही हा कोश हाताशी ठेवल्यास फायदा होऊ शकतो.

आणखी एक. कोश कसा वापरायचा हेही कौशल्याचं काम असतं. तो नियमित सरावाचा भाग असतो. सतत कोश वापरण्याची सवय लावून घेतल्याशिवाय कोशाच्या सामर्थ्यांचा नीट उलगडा होऊ शकत नाही. कोशातून आपल्याला हवी ती माहिती, शब्द अचूकपणे पटकन शोधून काढणे हा सरावाचा भाग असतो. एकदा का तो झाला की, मग कोश पाहण्याची गोडी लागते. तशी ती लागल्यावर कोशाच्या सामर्थ्यांचा सतत पुनप्रत्यय येतो. हा पर्यायकोश सतत जवळ बाळगळ्यास आणि वेळ मिळेल तसा अधूनमधून चाळल्यास आपल्या शब्दसंख्येत मोलाची भर पडू शकते. मराठी-इंग्रजी भाषांच्या अभ्यासक-प्राध्यापकांना, साहित्यिकांना, अनुवादकांना, पत्रकारांना आणि विद्यार्थ्यांना या कोशामुळे चांगलाच फायदा होईल. त्यांच्या इंग्रजी-मराठी या दोन्ही भाषा समृद्ध होण्यास हातभार लागेल. मराठी भाषाही चांगली समृद्ध असून एका शब्दाला किती विविध पर्यायी शब्द आहेत, याचा अंदाज या छोटेखानी कोशातून येईल. ‘हि-याला पैलू पाडणं’ हे कसब असतं. हि-यासारखे शब्दांनाही अनेक पैलू असतात. शब्दांचे हे विविध पैलू लक्षात घेऊन त्यांचा योग्य वेळी योग्य जागी वापर करणं, हेही कसबी कामच असतं. ते कसब शिकवण्याचं काम हा पर्यायकोश काही प्रमाणात नक्कीच करू शकतो.


इंग्रजी-मराठी पर्यायकोश : संकलक-संपादक : वि. शं. ठकार

नितीन प्रकाशन, पुणे

पाने : 328, किंमत : 200 रुपये

Monday, August 27, 2012

शहाणा वाचक आणि पुस्तकं

दुपारी एकपर्यंतचा वेळ टंगळमंगळ करण्यात गेला. नंतर सुशील आला. मग दोघं अविनाश काळे यांच्याकडे गेलो. रात्री नऊला त्यांच्याकडून परतलो. दुपारी सुशीलसोबत काम करताना एक गंमत सुचली. सुशीलच्या कायम बॅगेत असलेलं पुस्तक म्हणजे प्रा. यास्मीन शेख यांचं ‘मराठी शुद्धलेखन मार्गदर्शिका’ आणि माझ्या बॅगेत अरुण फडके यांचे ‘शुद्धलेखन तुमच्या खिशात’ व ‘मराठी लेखन कोश’. सुशीलने त्याच्या पुस्तकावर ‘माझं बायबल’ असं लिहिलं आहे. ते वाचून मी माझ्या दोन्ही पुस्तकांवर ‘माझं कुराण’ असं लिहिलं.
..................................................
काल रात्री साडेनऊच्या सुमारास सुनीता देशपांडे यांचं ‘प्रिय जी. ए.’ हे पुस्तक वाचायला घेतलं. मौजेने आतापर्यंत जीएंच्या पत्रांचे चार खंड काढले आहेत. त्यातल्या पहिल्या खंडात त्यांनी फक्त सुनीताबाईंना लिहिलेली पत्रं आहेत, तर इतर तीन खंडांत म. द. हातकणंगलेकर, जयवंत दळवी, माधव आचवल, अशा लेखकांना लिहिलेली पत्रं आहेत. ‘प्रिय जी. ए.’मध्ये सुनीताईंना लिहिलेली एकंदर 47 पत्रं आहेत. जी. एं.च्या पत्रांचे चारही खंड चाळताना ते पटकन विकत घ्यावे आणि निवांत वाचावे, अशी काही इच्छा झाली नाही. पण सुनीताबाईंचं हे पुस्तक चाळताना मात्र ते विकत घ्यावं, असं तीव्रतेनं वाटलं. किंबहुना हे जी. एं.च्या पत्रांपेक्षा सरसच वाटलं. म्हणून ते परवा मुद्दाम विकत घेतलं. काल रात्री इतर कुठलं काम करायचा कंटाळा आल्याने वाचायला घेतलं. अगदी दोन वाजेपर्यंत 155 पानं वाचून काढली. पुस्तक एकंदर 184 पानांचं आहे. पण पुस्तक काही विशेष आवडलं नाही. किंबहुना जवळवळ नाहीच. उगाच विकत घेतलं, असं वाटलं. एखाद्या ग्रंथालयातून मिळवून वाचलं असतं तरी चाललं असतं. सुनीताबाईंनी तशी कुठल्याच विषयांवर फार गंभीर चर्चा केलेली नाही. अमूक पुस्तक मी वाचलं, तुम्ही वाचलं का; मला आवडलं, तुम्हालाही आवडेल; अमूक पुस्तक तुम्हाला पाठवू का, अशी अगदीच प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे. बाकी नुसत्याच अळमटळम गप्पा. चकाट्या म्हणाव्यात अशा. 

हे पुस्तक चाळताना त्यातले पुस्तकांवरचे एक-दोन अभिप्राय वाचून सुनीताबाईंची वाचक म्हणून प्रगल्भता चांगली वाटली, म्हणून पुस्तक तत्परतेनं विकत घेतलं. वर वाचायचे कष्टही घेतले. पण निराशा झाली. मग ते ठेवून ज्यॉ पॉल सात्र्चं ‘वर्ड’ हे आत्मचरित्र वाचायला घेतलं. त्यातील ‘रीडिंग’ या पहिल्या प्रकरणातील 20-30 पानं वाचली. नंतर ‘उत्तम पुस्तक वाचताना लेखकाबरोबरचे मतभेद शोधले पाहिजेत’ हा विश्वास पाटील यांचा ‘ललित’च्या 2000सालच्या दिवाळी अंकातील लेख वाचायला घेतला. पाटील यांनी अतिशय चांगला लेख लिहिला आहे. पण तो पहिल्या चार पानांतच संपवायला हवा होता. नंतरचा मजकूरही सुरेख आहे खरा, पण तो आधीच्या मजकुराशी विसंगत वाटतो. कारण नंतर वाचनसंस्कृतीवरील चर्चा एकदम धर्माच्या प्रश्नाकडे वळते. पाटील लिहितात, ‘‘थोडक्यात बरेच काही सांगता येते. तो कौशल्याचा आणि तुमच्या भाषाप्रभुत्वाचा भाग असतो. पण मराठीतल्या साहित्य शारदेच्या वारसदारांना आणि मराठी प्राध्यापकांना हे किमान कौशल्य अवगत करता येत नाही, याचे पुरावे त्यांच्या लेखनातून, भाषणांतून, बोलण्यातून मिळत राहतात.’’ याच लेखात पाटील यांनी ‘क्रिटिक ऑफ रिलिजन अँड फिलॉसफी’ या पुस्तकाचा आणि त्याचा लेखक वॉल्टर कॉफमान याचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. कॉफमान लिहितो, ‘‘एका परिच्छेदात सांगून होईल ते सांगण्यासाठी पानंच्या पानं व पाच-दहा पानांत सांगून होईल त्याच्यासाठी पुस्तकच्या पुस्तक खर्ची घालणा-या लेखकांपासून शहाण्या वाचकानं दूर राहावं.’’
..................................................
आज रविवार असल्याने दिवसभर सुट्टी होती. त्यामुळे एका ग्रंथप्रेमी मित्राचा ग्रंथसंग्रह पाहायला त्याच्या घरी जायचं होतं. निघायला थोडासा वेळ होता म्हणून प्रा. रा. ग. जाधव यांचा एक चरित्र-वाङ्मयाविषयीचा लेख वाचायला घेतला. त्यात त्यांनी एके ठिकाणी व्हॉल्टेअरचं एक चिंतनीय वचन उद्धृत केलं आहे. ते असं - We owe consideration to the living; to the dead we owe truth only.  म्हणजे, जे जे गतकालीन आहे, गतार्थ आहे, केवळ इतिहास, परंपरा किंवा स्मृती यांच्या रूपानेच अवशिष्ट आहे; त्या त्या सर्वाबद्दल सत्य जाणून घेणं हीच आपली जबाबदारी आहे. उलट जे जे विद्यमान आहे, जिवंत व जगत आहे, वर्तमानकालीन आहे, त्याबाबत सत्यापेक्षा तारतम्यविवेक बाळगणं, ही आपली जबाबदारी आहे.’ श्रेष्ठ लेखक एका वाक्यात किती मोठा आशय आणि किती महत्त्वाचं सांगून जातो नाही? वॉल्टर कॉफमान म्हणतो ते खरंच आहे.

Tuesday, August 21, 2012

बंडखोर लेखिकेची पन्नाशी!

आपल्या लेखनाची सर्वाधिक किंमत चुकती करावी लागणं, त्यासाठी आपलं आयुष्यच पणाला लावावं लागणं, हे कुठल्याही काळात लेखकासाठी वेदनादायकच असतं. त्यातही धार्मिक कट्टरतावाद्यांविरुद्धचा लढा तर खूपच बिकट असतो. पण तो प्राणपणाने लढत जगातल्या असंख्य मुस्लीम आणि इतर स्त्रियांना आपल्यावर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या विरुद्ध बोलण्याची-लढण्याची प्रेरणा देणा-यांमध्ये तस्लिमा नासरीन यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागतो. त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख......
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तस्लिमा नासरीन येत्या 25 ऑगस्टला वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. पन्नाशी हा व्यक्तीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो, म्हणून त्यांच्या आजवरच्या लेखकीय कारकीर्दीचा आढावा घेणं सयुक्तिक ठरतं. 
“(Most of the) Publishers are afraid to publish her books. Book sellers are afraid to sell her books. Supporters afraid to support her publicly. Secularists are afraid to defend her when she is attacked by the religious fundamentalists.”
असं तस्लिमाच्या अधिकृत वेबसाइटवर एके ठिकाणी नमूद केलेलं आहे. 
तस्लिमाची आजवर 35 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यांचं विषयवार वर्गीकरण केलं तर काय दिसतं? 1986 ते 2008 या काळात 13 कवितासंग्रह, 1990 ते 2007 या काळात 5 निबंधसंग्रह, 1991 ते 2009 या काळात 8 कादंब-या, 1994 ते 2007 या काळात 2 लघुकथासंग्रह आणि 1999 ते 2012 या काळात 7 आत्मचरित्रविषयक पुस्तकं अशी तस्लिमाची एकंदर ग्रंथसंपदा आहे. वयाच्या तेराव्या वर्षी तस्लिमानी लिहायला सुरुवात केली. वयाच्या 24 व्या वर्षी (1986 साली) त्यांचा ‘शिकोरे बिपुल खुधा’ (Hunger in the Roots) हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. 1990 पर्यंत आणखी दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. 1990 मध्ये तस्लिमाच्या पहिल्या निबंधसंग्रहाचं प्रकाशन झालं. 1992 साली पहिली कादंबरी प्रकाशित झाली, तर 1999 साली पहिलं आत्मचरित्रविषयक पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे 2008 नंतर तस्लिमा पूर्णपणे कादंब-या आणि आत्मचरित्रविषयक लेखनाकडे वळल्या आहेत. 

तस्लिमाच्या ‘लज्जा’, ‘उतल हवा’, ‘नष्ट मेयेर-नष्ट गद्य’, ‘फरासी प्रेमिक’, ‘आमार मेयेबला’ या पुस्तकांचे आजवर मराठी अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये या अनुवादित पुस्तकांवर कुठलेही वाद झालेले नाहीत, हे विशेष. या पुस्तकांचा खपही चांगला झालेला आहे. तस्लिमाच्या ‘फेरा’ या कादंबरीचा ‘फिट्टमफाट’ या नावानं अशोक शहाणे यांनी अनुवाद केला असून तो मुंबईतील ‘अक्षर प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित झालेला आहे. बाकी सर्व पुस्तकांचे अनुवाद पुण्याच्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशित केले आहेत. त्यामुळे मराठी वाचकांनाही त्यांची जवळून ओळख आहे. 

19990 पासूनच बांगलादेशातील मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमा यांच्या विरोधात मोहीम सुरू केली होती. 1993 पासून 2004 पर्यंत तस्लिमा यांच्या एकंदर पाच पुस्तकांवर बंदी घालण्यात आली. ‘लज्जा’, ‘आमार मेयेबला’, ‘उतल हवा’, ‘को’, ‘सेई सोब ओन्ढोकार’ ही ती पाच पुस्तकं. तर ‘द्विखंडितो’ या पुस्तकावर प. बंगाल सरकारने 2003 साली बंदी घातली. मात्र सप्टेंबर 2005 मध्ये प. बंगालच्या उच्च न्यायालयाने ही बंदी उठवली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतभर मोठय़ा प्रमाणावर दंगली, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. याचीच प्रतिक्रिया म्हणून बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर तस्लिमा यांच्या ‘लज्जा’ या कादंबरीवर बंदी घालण्यात आली होती. 

1994 साली तस्लिमा यांना बांगलादेश सोडावा लागला. त्यानंतर त्या 10 वर्षे पाश्चात्य देशांमध्ये राहात होत्या. 2004 साली त्या कोलकात्यात परत आल्या. तिथे 2007 पर्यंत म्हणजे तीन वर्ष राहिल्या. 2008 मध्ये त्या स्वीडनला रवाना झाल्या. 2007मध्ये काही काळ दिल्लीमध्ये त्या राहत्या घरी स्थानबद्ध होत्या. तस्लिमा यांनी 2005  साली आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळावं, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांना केली होती. शिवराज पाटील तेव्हा गृहमंत्री होते. पण भारतातील प्रादेशिक विविधता आणि मुस्लीम समाजाची लक्षणीय संख्या विचारता घेता ताणतणाव निर्माण होण्याच्या खबरदारीतून त्यावर गृहमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही. 

पाकिस्तान आणि बांगलादेश हे मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेले देश आहेत. तेथील धार्मिक कट्टरता आणि त्याच्या दुष्परिणामांच्या बातम्या सतत अधूनमधून येत असतात. मात्र अशा बातम्या भारतामध्ये क्वचित म्हणाव्या अशा संख्येने घडतात. भारतात मुस्लिमांची संख्या तशी लक्षणीय आहे. तरीही भारतीय मुसलमान हा सर्वसामान्यत: सहिष्णू मानला जाई. त्याला बाबरी मशिदीच्या पतनानंतर ब-याच प्रमाणात तडे गेले. गेल्या वर्षी जयपूरच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सलमान रश्दी यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण होऊन त्यांना भारतातच येऊ न देण्याचा पण काही मुस्लीम संघटनांनी केला. असाच प्रकार तस्लिमा यांच्याबाबतीत प. बंगालमध्येही झाला होता. त्यांच्या ‘द्विखंडितो’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी नासरीन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. 

सलमान रश्दी आणि तस्लिमा यांची नेहमी तुलना केली जाते, परंतु त्यांच्या लेखनामध्ये एक मूलभूत म्हणावा असा फरक आहे. रश्दींचं संपूर्ण लेखन हे इंग्रजीमध्ये आहे तर तस्लिमा या आपलं लेखन मुख्यत: बंगालीमध्ये म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये करतात. त्यानंतर त्याचे इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अनुवाद होतात. रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या 1988 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमुळे 14 फेब्रुवारी 1989 रोजी इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा काढला. त्यानंतर बराच काळ रश्दी यांना भूमिगत राहून काळ काढावा लागला. या उलट तस्लिमा यांना त्यांच्या पुस्तकांमुळे बांगलादेश सोडावा लागला. त्यांच्यावर भारतात काही ठिकाणी हल्ले झाले. त्यांच्या पुस्तकांवर बंदी आली. पण त्यांना रश्दींसारखं फार काळ भूमिगत राहावं लागलं नाही. मुस्लीम कट्टरतावाद्यांनी तस्लिमाची हत्या करणा-याला दोन हजार डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. पण या फतव्याचंही काहीसं सलमान रश्दींसारखंच झालं आहे. तो आता अघोषितपणे मागे घेतल्यातच जमा आहे. 

रश्दी यांच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाने पाश्चात्य देशातील मुस्लीम लेखकांना इस्लाम आणि कुराण यांची चिकित्सा करण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर अशी पुस्तकं मोठय़ा संख्येनं लिहिली जाऊ लागली. अजूनही लिहिली जात आहेत. त्यात कथा-कादंब-या आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यातील अमेरिकास्थित लेखिका इरशाद मंजी यांच्या एका पुस्तकाचा गेल्या वर्षीच ‘तिढा आजच्या इस्लामचा!’ या नावानं मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांनीही तस्लिमा यांच्याप्रमाणेच इस्लाम धर्मातील आणि कुराणातील अनेक विसंगतींवर टीका केली आहे. इस्लाम आणि कुराणमध्ये स्त्रियांविषयी जी प्रतिकूलता आहे, त्यावर त्या वस्तुनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ पद्धतीनं झोड उठवतात. धर्म हा मानवताविरोधीच असतो, हे त्यांना मान्य नाही. म्हणजे मंजी या मध्यममार्गी आहेत, तशा तस्लिमा नाहीत. त्यांना इस्लाम धर्मच संपवून टाकावा, असं वाटतं. अशी काही त्यांची मतं टोकाची म्हणावीत इतकी एकारलेली असतात. त्यांची ही धारणा टोकाच्या फँटसीसारखी आहे. या कारणांमुळे तस्लिमा यांच्या अलीकडच्या लेखनात आक्रस्ताळेपणाही वाढताना दिसतो आहे. ‘सारे जण आपल्याविरुद्ध कट करत आहेत’, अशाच भूमिकेतून त्यांचं लेखन आणि वागणं-बोलणं असतं. एकटया-दुकटया व्यक्तींच्या प्रतिक्रिया फार गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, पण तस्लिमा ब-याचदा त्या प्रतिक्रियांनाच सामाजिक सिद्धान्त मानून लिहितात-बोलतात. हल्ली तस्लिमा जागतिक सेलेब्रिटी झाल्या आहेत. त्यामुळे त्या काय बोलतात, याकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं असतं. अशा वेळी तस्लिमा यांच्याकडून अधिक जबाबदारपणाची आणि सुसंस्कृतपणाची अपेक्षा आहे. पण ती त्या नेहमीच धुडकावून लावतात आणि अतिशय सवंग विधानं करतात. नुकत्याच अमेरिकेत गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची प्रतिक्रिया अशाच स्वरूपाची आहे.

तस्लिमाचा लढा जगातल्या सर्वाधिक धार्मिक पगडा असलेल्या समाजातील मुल्ला-मौलवींविरोधात आहे. तेव्हा त्यांच्याशी त्यांच्याच पातळीवर जाऊन वाद-विवाद करण्याची गरज नसते. तस्लिमा यांच्या लेखनात ते भान ब-यापैकी पाळलंही जातं. पण त्यांची वक्तव्यं आणि विधानं यात मात्र त्या या गोष्टींना ब-याचदा हरताळ फासतात. टोकाची मतं व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना टोकाचा विरोध होतो, आणि म्हणून मोठय़ा प्रमाणावर बुद्धिमंतांचा पाठिंबाही मिळत नाही. त्यासाठी अधिक संयमितपणे व्यक्त व्हावं लागतं. विचारांची लढाई विचारांच्या पातळीवरच लढावी लागते. पाश्चात्य देशातील कितीतरी मुस्लीम लेखिका आणि लेखक अभ्यासावर आधारलेले आणि सज्जड पुरावे देणारं लेखन करत आहेत. त्यांचा प्रतिवाद मुस्लीम धर्माधांना सहजासहजी करता येत नाही. अशा लेखनाचा इष्ट परिणाम होऊन तो तळागाळातल्या समाजापर्यंत झिरपायला वेळ लागतो. कुठलाही सामाजिक बदल एकाएकी होत नाही. त्यासाठी मोठा काळ उलटावा लागतो. आणि त्या काळात आपल्या उद्दिष्टांसाठी अविरत काम करत राहणारी फौजही तयार करावी लागते. ती केली तरच या बदलाची गाडी सुरळीत राहते. कारण दीर्घकालीन समस्या या जटिल असतात, त्यामुळे त्यांच्यावरची उपाययोजनाही दीर्घकालीनच असावी लागते. असे प्रश्न शॉर्टकटने कधीही सुटत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे सारेच प्रश्न जसे कायद्याने सुटत नाहीत, तसे मोर्चे-आंदोलने आणि लेखन यातूनही सुटत नाहीत. या सा-यांचा एकसमयावच्छेदेकरून व्हावा लागतो. सध्याची परिस्थिती त्या दिशेनेच प्रवास करत आहे. त्यामुळे काळही तस्लिमा यांच्या बाजूने आहे. फक्त गरज आहे ती मर्मदृष्टीची. 20-30 हे तारुण्याचं आणि बंडखोरीचं वय असतं. 40-50 हा आयुष्याच्या प्रगल्भतेचा टप्पा असतो. तस्लिमा यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडून तशा प्रगल्भ व संयत लेखनाची-वर्तनाची अपेक्षा करणं, नक्कीच अनाठायी ठरणार नाही.

Monday, August 13, 2012

ज्ञान ते सांगतो पुन्हा!

अथातो ज्ञानजिज्ञासा हे यशवंत रायकर यांचे पुस्तक ज्ञान संकल्पनांची ओळख करून देणारे आहे. या पुस्तकाचा पहिला भाग 2010 मध्ये प्रकाशित झाला, तर दुसरा भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. भाग दोन प्राधान्याने तत्त्वज्ञ, त्यांच्या संकल्पना यांची ओळख करून देणारा आहे. यातील बहुतेक तत्त्वज्ञ, विचारवंत विदेशी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात शंकराचार्य यांच्यानंतर नवा कोणताही तत्त्वविचार मांडला गेला नाही, अशी मांडणी सुरेश द्वादशीवार यांनी अलीकडेच लिहिलेल्या त्यांच्या मन्वंतरया पुस्तकात केली आहे. म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान शंकराचार्य यांच्याबरोबरच थांबलं, त्यानंतर त्यात नवी भर कुणीच टाकलेली नाही, असा या मांडणीचा स्वच्छ अर्थ होतो. असो. हा मुद्दा वेगळा आहे. पण अथातो ज्ञानजिज्ञासाअसे म्हणताना भारतीय तत्त्वविचारापलीकडे जगात काय काय आहे आणि ते कुणी कुणी मांडलं आहे, याचा परामर्ष घ्यावा लागतो. रायकरांचं हे पुस्तक (भाग एक व दोनसह) त्यासंबंधीचा एक प्रयत्न आहे.
‘प्रस्थापित ज्ञानाने काही शंकांचे निरसन न केल्याने जिज्ञासेची कांस धरावी लागणे’, ही प्रस्तुत पुस्तकामागची रायकरांची भूमिका आहे. इथं प्रस्थापित ज्ञान म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान असं रायकरांना अभिप्रेत असावं. भाग एकमध्ये ‘एका अभ्यासूने जिज्ञासूंशी साधलेले मुक्तसंवाद’ अशी रायकरांची भूमिका होती, ती या भाग दोनमध्ये ‘एका वाचकाने जिज्ञासूंशी साधलेला मुक्तसंवाद’ अशी झाली आहे. जगातील ज्ञान संकल्पनांच्या अफाटतेचा केवळ अंदाज आल्यावर, त्यातील काहींचा प्रत्यक्ष परिचय करून झाल्यावर अशी नम्र भूमिका होणं अपरिहार्य असतं.
पुस्तकाची सुरुवात सॉक्रेटिस-प्लेटो-अ‍ॅरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञ त्रयीपासून होते. मग गॅलिलिओ, व्हॉल्टेर, कांट, आँग्यूस्त काँत, चार्लस डार्विन, नित्शे, युनॅमुनो, ऑर्तेगा, बट्र्राड रसेल, सात्र्, कार्ल पॉपर, खलिल जिब्रान, जॉर्ज मिकेश अशा जवळपास तीसेक तत्त्वज्ञांचा समावेश आहे. त्यात विसाव्या शतकातील दोन प्रसिद्ध विचारवंतांचाही समावेश आहे. ते म्हणजे इसाया बर्लिन आणि एडवर्ड सैद. ‘विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ विचारवंत’ असा बर्लिन यांचा सार्थ गौरव केला जातो. रायकरांनी त्यांचं ‘संकल्पनांचे इतिहासकार’ असं वर्णन केलं आहे. बर्लिन यांनी ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेची नव्याने मांडणी केली. त्यावर गेली पन्नास-साठ वर्षे चर्चा चालू आहे, या एकाच गोष्टीतून बर्लिन यांचं महत्त्व अधोरेखित होतं. सैद यांना ‘दुर्दम्य विचारवंत’ असं रायकरांनी म्हटलं आहे, ते मात्र फारसं समर्पक वाटत नाही. सैद यांच्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा त्यांचा विचार आणि त्यासाठीचा त्यांचा त्याग या गोष्टी ते हयात असतानाही वरचढ होत्या आणि आहेत. ‘ओरिएण्टॅलिझम’ या 1979 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात सैद यांनी पाश्चिमात्यांचा पौर्वात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा पूर्वग्रहदूषित आहे, याची सोदाहरण चिरफाड केली. या पुस्तकाने पाश्चिमात्यांच्या बौद्धिक एकाधिकारशाहीला पहिल्यांदाच इतक्या ठोसपणे तडाखे लगावले. याचबरोबर पॅलेस्टिनींची भरभक्कमपणे बाजू मांडण्याचं, इंडालॉजीचा पुरस्कार करण्याचं आणि सबाल्टर्न स्टडीजला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं अतिशय महत्त्वाचं कामही सैद यांनी केलं आहे. रायकरांनी सैद यांच्या या योगदानाचाही उल्लेख केला आहे. पण एक उल्लेख त्यांच्याकडून बहुधा अनावधानाने राहून गेला असावा. तो म्हणजे सैद हे विसाव्या शतकातल्या ‘विचारवंतांचे प्रतिनिधी’ होते-आहेत. ‘रिप्रझेंटेशन ऑफ इंटेलेक्च्युअल’ या पुस्तकात त्यांनी विचारवंत कोणाला म्हणावे आणि विचारवंतांची कर्तव्यं कोणती याची मांडणी करताना विचारवंतांनाही चार खडे बोल सुनावले आहेत. सैद यांनी ‘ओरिएण्टॅलिझम’मध्ये भारताचा समावेश केला नाही, अशी तक्रार केली आहे. ते मात्र तर्काला धरून नाही.
या विदेशी तत्त्वज्ञांनंतर टिळक, टागोर, इकबाल या भारतीयांचा तर पृथ्वी, मृत्यू, लोकसंख्या, शेतीची जन्मकथा, फलज्योतिष, बलात्कार अशा नऊ-दहा घटितांचाही समावेश आहे. या विषयसूचीवरून पुस्तकाचे सरळसरळ तीन भाग पडतात. रायकरांनी ते स्वतंत्रपणे नमूद केले नसले तरी ते लक्षात यावेत अशी उतरत्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे.
जागतिक पातळीवरील तत्त्वज्ञांनी मांडलेल्या ज्ञान संकल्पनाची थोडक्यात ओळख करून देत, त्या तत्त्वज्ञांचाही परिचय करून दिल्याने हे पुस्तक रोचक झाले आहे. तत्त्वज्ञान हाच मुळात काहीसा रुक्ष आणि अवघड विषय. त्यामुळे तो सर्वसामान्यांना कंटाळवाणा आणि दुबरेध वाटतो. हे लक्षात घेऊन रायकरांनी या पुस्तकाचं लेखन सर्वसामान्यांना रुचेल आणि पचेल अशाच पद्धतीने केलं आहे. पुस्तकभर या व्यवधानाचा प्रत्यय येत राहतो. बहुधा यातील सर्व लेख हे सदररूपाने वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी लिहिले असल्याचा हा परिणाम असावा.
‘ज्या वेळी जे मनाला भिडले त्याचा अमूक एक मर्यादेपर्यंत पाठपुरावा केला’ या विधानातून रायकरांनी स्वत:च एकप्रकारे या पुस्तकाची मर्यादाही सांगितली आहे. म्हणजे हा अभ्यास ज्ञानमार्गाच्या शिस्तीपेक्षा रायकरांच्या स्वत:च्या कुतूहलातून झाला आहे. दुसरं म्हणजे ही काही कथा-कादंबरी नव्हे. हे तत्त्वज्ञ आणि तत्त्वविचार यांची सांगड घालणारं पुस्तक आहे. ज्ञानाची आस काही सर्वानाच असत नाही आणि ज्यांना ती असते त्यांनाही ते पूर्णपणे समजावून घेता येतेच असं नाही. यातील पहिल्या प्रकारातल्या वाचकांना ज्ञानाकडे वळवण्याचं आणि दुस-या प्रकारातल्या लोकांना आश्वस्त करण्याचं काम, हे पुस्तक काही प्रमाणात निश्चित करू शकते.
रायकरांच्या भाषेला संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे ती सौष्ठवपूर्ण आणि आटोपशीर आहे. प्रगल्भ भाषा हा लेखकाच्या जमेचा भाग असतो, तेव्हा तो वाचकांच्या कसोटीचाही असतो. कारण लेखकाने जे लिहिले आहे ते आणि बिटविन द लाइन्स या दोन्ही गोष्टी समजावून घेत वाचकाला पुढे जावं लागतं.
‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ हा ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ असा स्वत:ला आकळलेलं इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ज्ञानसंकल्पना आणि वाचक यांच्यामध्ये संवादाची भूमिका निभावू पाहणारं पुस्तक आहे. या पुस्तकातील तत्त्वज्ञांचा विचार समजावून घेऊन त्यांच्या मूळ पुस्तकांपर्यंत वाचकाने गेलं पाहिजे, तेव्हाच ती ज्ञानजिज्ञासा ‘अथातो’ ठरेल!
अथातो ज्ञानजिज्ञासा : यशवंत रायकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे
पाने : 171,
किंमत : 200 रुपये                  

Monday, July 30, 2012

वाचणा-याची रोजनिशी

११ फेब्रुवारी
आज पुस्तक प्रदर्शनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळी लवकरच ते पाहायला गेलो. कुणीही आलेलं नव्हतं. त्यामुळे मला सर्व पुस्तकं निवांत पाहता आली. आधी बंगाल डिव्हायडेड-१९३८ टू १९४७हे पुस्तक घेतलं. नंतर भारतातल्या एका ब्रिटिश नोकरशहाचं-आर्किटेक्टचं चरित्र घेतलं. पण ज्यामुळे खूप आनंद व्हावा, असं एकही पुस्तक मिळालं नव्हतं. शिवाय या दोन्हीपैकी पहिलं सीकॅटेगेरीतलं म्हणजे १२० रुपयांना तर दुसरं डीकॅटेगेरीतलं म्हणजे ५० रुपयांना होतं. त्यामुळे तीच घेण्याच्या विचारात होतो, तोच द प्लेजर्स ऑफ रीडिंगहे अण्टोनिया फ्रेझर या लेखिकेने संपादित केलेलं पुस्तक मिळालं. प्रत थोडी कराब झालेली होती, पण पुस्तक चांगलं होतं. यात ४० वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लेख लिहिले आहेत. त्यांना पूरक अशी उत्कृष्ट चित्रं ४० चित्रकारांनी काढलेली आहेत. रॉयल आकाराचं हे आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं पुस्तक फारच सुंदर आहे. त्यातील लेखकांनी आपल्या वाचनावर झालेला घरचा - आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा - परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. त्या त्या लेखाला चित्रकारानं अतिशय सुंदर चित्रं काढली आहेत. पुस्तकांचं महत्त्व, त्यांचे उपयोग आणि त्यांची फँटसी याविषयीची ही चित्रं बेहद्द अप्रतिम म्हणावी अशी आहेत. शिवाय प्रत्येक लेखकानं लेखाच्या शेवटी माझी आवडती पुस्तकं म्हणून दहा पुस्तकांची यादी दिली आहे. काहींनी तीच का आवडली, याची कारणमीमांसा केली आहे, तर काहींनी आवडती दहा पुस्तकं सांगणं कठीण आहे, तरीही फार विचार करून ही दहा नावं देत आहे, असा अभिप्राय दिला आहे. हे पुस्तक वर्गातलं असल्यानं त्याची किंमत २५० रुपये होती. अर्थात ते ६०० रुपयांना असतं तरी मी घेतलंच असतं म्हणा. मग आधीची दोन्ही पुस्तकं टाकून देऊन हे एकच पुस्तक घेतलं आणि आनंदानं ऑफिसाला परतलो.
१२ फेब्रुवारी
अलीकडच्या काळात अगदी भरमसाठी म्हणावी इतकी पुस्तकं विकत घेतली. वाचलीही तशीच अधाशासारखी. त्यामुळे इंग्रजीतल्या अनेक नव्या लेखकांच्या आणि परकीय भाषांतल्या कितीतरी मान्यवर लेखकांच्या ओळखी झाल्या. हा ग्रंथसंचय भरपूर आनंद देणारा ठरला. आपलं अजून लग्न झालेलं नाही, वयाच्या या टप्प्यावरही आपण लग्नाविषयी फार गंभीर नाही आणि लग्न न होण्याचं वैषम्यही वाटत नाही, याचं मुख्य कारण म्हणजे मैं और मेरी किताबें’!
१४ फेब्रुवारी
काही पुस्तकं पुन्हा पुन्हा भेटत राहतात. प्रदीप सॅबॅस्टीयन या पुस्तकप्रेमी लेखकाविषयी पहिल्यांदा ऐकलं ते जयप्रकाश सावंतांकडून. मग त्यांचे द हिंदूमधील लेख वाचायचा सपाटा लावला. अतिशय सुंदर लेख लिहितो हा माणूस! एके दिवशी सावंतांनी सांगितलं की, सॅबॅस्टीयन यांचं पुस्तक आलं आहे. मग ते फ्लीपकार्टवरून मागवलं. ‘द ग्रोनिंग शेल्फ अँड अदर इन्स्टन्सेस ऑफ बुक लव्हहे त्यांचा वाचन, ग्रंथसंग्रह आणि ग्रंथांविषयीच्या ग्रंथांविषयीचा लेखसंग्रह आहेही उत्तम. त्याची निर्मितीही प्रकाशकानं चांगली केली आहे. या पुस्तकाच्या शेवटी पूरक वाचनासाठी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे. त्यातली एक्स लिब्रिस’, ‘द मॅन हू लव्हड बुक्स टू मच’, ‘८४ चेरिंग क्रॉस रोड’, ‘द बुक ऑफ लॉस्ट बुक्स’, ‘हिस्ट्री ऑफ रीडिंगअशी काही पुस्तकं आपल्या संग्रही आहेत आणि ती आपण यापूर्वीच वाचली आहेत, याचं समाधान वाटलं. पण इतर काही पुस्तकं मात्र वाचलेली नाहीत आणि ती आपल्या संग्रहीपण नाहीत, याचं वाईटही वाटलं. त्यामुळे ती आता एकेक करून मागवायची, असं ठरवलं.
१५ फेब्रुवारी
पाशा पिंपळापुरे यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेहून येताना माझ्यासाठी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक आणलं होतं. ते त्यांनी मला ६ फेब्रुवारीला दिलंही. पण त्यांनी ते आधीच वाचायला सुरुवात केली होती. त्यामुळे तेच त्याच्या प्रेमात पडले. पुस्तक देताना ते मला म्हणाले, ‘‘हे पुस्तक आणलंय तुझ्यासाठी, पण सध्या मीच ते वाचतोय. खूपच छान पुस्तक आहे. मलाही आवडलंय. माझं एक प्रकरण वाचून व्हायचं आहे, ते झालं की पुस्तक तुला देतो. दरम्यान या पुस्तकावर तुझं नाव लिहून ठेव.’’ मला पुस्तकावर स्वत:चं नाव लिहायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी विकत घेतलेल्या कोणत्याही पुस्तकावर - मग ते नवे असो की जुने - स्वत:चं नाव लिहीत नाही. पण हे पुस्तक परत आपल्या ताब्यात येईल की नाही, या धास्तीपोटी त्यावर मी नाव लिहून ते परत पिंपळापुरेंना वाचायला दिलं.
पण या पुस्तकाचा किस्सा भारी आहे. ‘पॅशन फॉर बुक्सबद्दल मी पहिल्यांदा ऐकलं ते नीतीन रिंढे यांच्याकडून. गेल्या वर्षी त्यांनी त्यावर एक लेखही लिहिला. नंतर त्यांनी मला ते पुस्तक वाचायला दिलं. पुस्तक फार मस्त होतं. मग मी ते शोधायचा प्रयत्न केला. पण ते आता आऊट ऑफ प्रिंट झालं होतं. त्यामुळे निराश होऊन मी त्याचा पिच्छा सोडला. काही दिवसांनी या पुस्तकाची महती उन्मेष अमृते या मित्रापर्यंत गेली. तोही त्याच्या प्रेमात पडला. पण त्यालाही ते मिळेना, तेव्हा त्याने ते अमेरिकेतल्या मित्राकडून मागवायचं ठरवलं. तेव्हा त्याने माझ्यासाठीही एक प्रत मागवली. या दोन्ही प्रती हार्ड बाऊंड होत्या. नीतीन रिंढेंकडची प्रत मात्र पेपरबॅक होती. अमृतेने मागवलेल्या प्रती महिनाभरात आल्या. माझी प्रत त्याने रिंढेंकडे दिली. पण रिंढेंनी माझी हार्ड बाऊंड प्रत स्वत:कडेच ठेवून मला स्वत:कडची पेपरबॅक प्रत दिली. रिंढे मित्रच असल्याने मला काही बोलता आलं नाही. पण मी नाही म्हटलं तरी थोडा नाराज होणार, हे त्यांनी आधीच हेरून स्वत:कडची इतर दोन-चार पुस्तकं मला भेट दिली. ती पुस्तकं चांगली होती. त्यामुळे ही तडजोड मी मान्य केली.
पॅशन फॉर बुक्सची एक प्रत असताना पुन्हा त्याचीच दुसरी प्रत पिंपळापुरेंनी भेट दिली. तेव्हा माझ्याकडे हे पुस्तक आहे, असं मी त्यांना अजिबात सांगितलं नाही. कशाला सांगा? आपल्या आवडत्या पुस्तकाच्या एकापेक्षा जास्त प्रती संग्रही असलेल्या बऱ्याच. शिवाय मित्रांनी प्रेमाने दिलेल्या भेटीचा अनमान का करायचा? उन्मेषला मी पुस्तकाचे पैसे देऊ केले, तेव्हा तो तडकून म्हणाला होता, ‘‘लेका, फार पैसे झाले का तुझ्याकडे?’’ फार पैसे झाले नाही पण एकाच पुस्तकाच्या दोन प्रती झाल्या ना!
१९ फेब्रुवारी

एक्स लिब्रिसया अॅनी फीडमनच्या पुस्तकाविषयी पहिल्यांदा अरुण टिकेकरांच्या अक्षरनिष्ठांची मांदियाळीया पुस्तकात वाचलं होतं. त्यानंतर दोनेक वर्षानी एक्स लिब्रिसप्रत्यक्षात पाहायला मिळालं ते जयप्रकाश सावंतांकडे. मग ते झपाटल्यासारखे वाचून काढलं. अॅनीनं अतिशय जिव्हाळ्यानं पुस्तकांविषयी, तिच्या संग्रहाविषयी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींविषयी लिहिलं आहे. यातला मॅरिइंग लायब्ररीहा पहिला लेख लेख तर केवळ अप्रतिम आहे. अॅनी आणि तिचा नवरा दोघांचाही ग्रंथसंग्रह एकाच घरात स्वतंत्र असतो. लग्न झालं, मुलं झाली, तेव्हा अॅनीला वाटलं की, आपण आता एकजीव झालेले पती-पत्नी आहोत, मग आपला ग्रंथसंग्रह तरी का स्वतंत्र ठेवायचा? तोही एकत्र करून टाकू. पण तो एकत्र करताना धम्माल उडते. दोघांच्या त - हा वेगवेगळ्या. त्यामुळे ग्रंथांचं सामिलीकरण करताना मतभेद होतात. पण प्रचंड चर्चा, वाद होऊन शेवटी ग्रंथसंग्रह एकत्र केला जातोच. अॅनी लेखाच्या शेवटी लिहिते, ‘हीज बुक्स अॅण्ड माय बुक्स आर नाऊ अवर बुक्स. वुई आर रिअली मॅरिड!’
हे पुस्तक वाचलं खरं, पण त्याच्या शीर्षकाचा काही तेव्हा उलगडा झाला नाही. अलीकडे पाशा पिंपळापुरे यांनी पॅशन फॉर बुक्सहे पुस्तक भेट दिलं. अमेरिकेत दोन-तीन महिने लेकीकडे असताना त्यांनी ते हाफ प्राइज असणाऱ्या एका पुस्तकाच्या दुकानात घेतलं होतं. हे पुस्तक सेकंडहॅण्ड आहे. मात्र तरीही त्याची प्रत फारच चांगली आहे. अगदी नवी म्हणावी अशी. आधी हे पुस्तक ज्याचं होतं, तो उत्तम वाचक असावा आणि ग्रंथप्रेमीही. त्यामुळे त्याने हे पुस्तक फार जपून वाचलं. विकताना त्यावर आपली नाममुद्रा नोंदवून ठेवली. ती अशी - ‘एक्स लिब्रिस - डॅनिअल आर. विंटरिच.’ म्हणजे हे पुस्तक विंटरिंच यांच्या मालकीचं होतं. तेव्हा मला अॅनीच्या एक्स लिब्रिसया पुस्तकाच्या शीर्षकाचा उलगडा झाला. हा मूळ लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ अमूकच्या मालकीचंअसा आहे. इंग्रजीमध्ये अनेक लेखक-ग्रंथालयं त्यांनी विकत घेतलेल्या नव्या-कोऱ्या पुस्तकावर एक्स लिब्रिस..’ असा स्टिकर लावतात. त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत. या स्टिकरवर पुस्तकाशी संबंधित एक चित्र असतं. त्या चित्राच्या वरच्या बाजूला एक्स लिब्रिसहे दोन शब्द आणि चित्राच्या खाली ज्याचं ते आहे त्याचं नाव असतं.
२१ फेब्रुवारी
आज फ्लीपकार्टवरून मागवलेली दोन पुस्तकं आली. त्यातील पहिलं आहे अर्नोल्ड बेनेट या लेखकाचं हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’. हे पुस्तक १९०८ साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. या पुस्तकाविषयी पहिल्यांदा वाचलं होतं, ते प्लेजर ऑफ रीडिंगमध्ये. त्यात मायकेल फूट या लेखक-राजकारण्याने अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेआणि लिटररी टेस्ट : हाऊ टु फॉर्म इटया दोन पुस्तकांचा उल्लेख केला आहे. ही दोन्ही पुस्तकं, पुस्तिका म्हणाव्यात इतकी छोटी आहेत. जेमतेम शंभरेक पानांची. पण फूटने त्यांचं खूपच कौतुक केलं आहे. फूट लिहितात, ‘आय डू थिंक दॅट लिटल बुक, लिटरली, चेंजज्ड माय लाइफ’.
दुसरं आलेलं पुस्तक आहे पलाश कृष्ण मेहरोत्राचं द बटरफ्लाय जनरेशन’. या पुस्तकाविषयी फ्लीपकार्टवर पहिल्यांदा न्यू रिलिजया विभागातली पुस्तकंपाहताना वाचलं होतं. पण आपल्या आवडीचा विषय नाही म्हणून ते दोन-चार वेळा पाहून सोडून दिलं होतं. पंधरा दिवसांपूर्वी त्यावर इंडियन एक्स्प्रेसमध्ये परीक्षण आलं. ते फार छान लिहिलं होतं. त्यामुळे त्याविषयीची उत्सुकता पुन्हा चाळवली गेली. मागच्या आठवडय़ात ते फ्लीपकार्टवर पाच-सात वेळा पाहिलं. मग एकदाचं परवा मागवून टाकलं. आज आलंही. या पुस्तकाच्या फ्लॅपवर लिहिलं आहे, ‘‘हाफ ऑफ इंडियाज पॉप्युलशन इज अण्डर द एज ऑफ ट्वेन्टी फाइव्ह. इन २०२०, द अव्हरेज पर्सन इन इंडिया विल बी ओन्ली २९ इयर्स ओल्ड, कम्पेअर्ड विथ ४८ इन जपान, ४५ इन वेस्टर्न युरोप अॅण्ड ३७ इन चायना अॅण्ड द युनायटेड स्टेटस.’’ आजच्या भारतीय तरुणांना पलाशने टेक्नीकुलर यूथअसं म्हटलं आहे.
ही दोन्ही पुस्तकं पाशांनी पाहिली तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तू असली पुस्तकं कशाला घेतोस? ती फार ऑर्डिनरी आहेत.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘पलाश कृष्ण मेहरोत्राचं पुस्तक आजच्या तरुणाईविषयीचं आहे. म्हणून मी ते मागवलं आहे. तर अनरेल्ड बेनेटच्या हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डेविषयी मायकेल फूटने प्लेजर्स ऑफ रीडिंगमधल्या लेखात असं म्हटलंय की, या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं. फूट हा काही ऑर्डिनरी माणूस नाही.’’ त्यावर पाशा म्हणाले, ‘‘फूट मार्क्सवादी होता. तो एमपी होता. लंडनचा पंतप्रधान होता होता राहिला. त्यानं असं म्हटलंय म्हणजे ते पुस्तक नीट वाचलं पाहिजे. नंतर मला वाचायला दे.’’