Monday, March 24, 2014

गो. पु. देशपांडे यांच्याविषयी..

2 August1938 – 16 October 2013
 गो. पु. यांचे निधन झाल्यावर हा लेख लिहिला होता. तो तेव्हा अप्रकाशित राहिला. आता इथे देतो आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गोविंद पुरुषोत्तम देशपांडे आत्ताआत्तापर्यंत पुण्यातल्या निवडक सार्वजनिक कार्यक्रमांत दिसत. त्यामुळे त्यांचं जाणं तसं अनपेक्षितच म्हणायला हवं. २ ऑगस्ट रोजी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता होणार होती. पण ते आता होणे नाही. असो. त्यांची महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक वर्तुळात ओळख आहे ती, ‘गोपु’ या नावाने तर दिल्लीच्या बुद्धिजीवी वर्तुळात त्यांना ‘जीपीडी’ या नावाने संबोधले जाई.
गोपु मराठीतले एकमेव राजकीय नाटककार होते, याबाबत कुणाचंही दुमत व्हायचं कारण नाही. मराठी नाटकाच्या सीमारेषा कौटुंबिक-सामाजिक या विषयाच्या मर्यादा उल्लंघून पुढे वा आजूबाजूला जाताना फारशा दिसत नाहीत. अशा काहीशा एकारलेल्या परिस्थितीत जाणीवपूर्वक राजकीय नाटक पुढे आणण्याचं काम गोपुंनी केलं. नाटककार म्हटला की, तो प्रमाणापेक्षा जास्त सर्जनशील असायचाच, असा आपल्याकडे परिपाठ असतो. त्यामुळे अशा नाटककारांच्या नाटकामध्ये प्रखर सामाजिक वास्तव असलं तरी त्यात फिक्शनचाच भाग अधिक असतो. शिवाय मराठी नाटककार हे मराठी कथा-कादंबरीकारांसारखेच राजकीय-सामाजिकदृष्ट्या बधिर असतात. त्यांचं या विषयांचं वाचन आणि आकलन फारच वरवरचं असतं. आणि तरीही आपल्याला वाटतं वा दिसतं तेवढंच सत्य असा त्यांचा आविर्भाव असतो. गोपुंच्या नाटकात हे दिसत नाही. त्याचं कारण त्यांची राजकारणाची समज अतिशय चांगली होती. किंवा असं म्हणू या की, इतर मराठी नाटककारांपेक्षा कितीतरी जास्त होती. अनेक वर्षे दिल्लीत राहिल्यामुळे, जवाहरलाल विद्याापीठासारख्या डाव्या विचारसरणीचं प्राबल्य असलेल्या ठिकाणी अध्यापन करत असल्यामुळे त्यांचा राजकारणाचा चांगला परिचय आणि अभ्यास होता.
वर्ग हा गोपुंचा आवडता शब्द. त्यांच्या भाषेत म्हणायचं तर, वसंत कानेटकर यांचा कौटुंबिक रोमँटिसिझम आणि विजय तेंडुलकरांचा कौटुंबिक हिंसाचार ही मराठी नाटकातली दोन स्कूल्स. या दोन्हींच्या मध्ये मराठी नाटकांची लांबीरुंदी संपून जाते. या दोन्ही स्कूल्सपेक्षा आणि एकंदरच मराठी नाटकांमध्ये गोपुंची नाटकं त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे वेगळी ठरतात. कारण ती पूर्णपणे राजकीय नाटकं आहेत. त्याहीपेक्षा विचारसरणीची नाटकं आहेत. गोपुंची वैचारिक बांधीलकी डाव्या विचारसरणीशी होती. डावे लोक आपले तत्त्वज्ञान प्राणपणाने जपायचा प्रयत्न करतात. जगण्यासाठी विचारसरणी ही नितांत निकडीची गोष्ट असते त्यांच्यासाठी. पण मानवी व्यवहार केवळ वैचारिक तर्कप्रामाण्यावर चालत नाही. आणि हेच नेमके डावे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची फरपट होते. अर्थात केवळ आपलीच विचारसरणी प्रमाण मानणाºया आणि तिला चिकटून बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत, ते होतंच. म्हणजे विशिष्ट ध्येयवादातून प्रेरित होऊन काम करणाºयांची शोकांतिका होते. हा विचारव्यूह मांडायचा प्रयत्न गोपुंनी आपल्या नाटकांमधून केला. त्यांचं पहिलं नाटक, ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ ते ‘शेवटचा दिस’पर्यंत हेच दिसतं. प्रखर सामाजिक जाणिवांना विचारसरणीची जोड असेल तर माणसांचं काय होतं, हे गोपुंच्या नाटकातून जाणून घेता येतं.
गोपुंच्या आधीही राजकीय विचारसरणीची नाटकं लिहिण्याचा फारसा प्रयत्न झाला नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार म. फुले यांनी तो प्रयत्न १८८५ साली ‘तृतीय रत्न’सारखं नाटक लिहून केला होता. पण त्याचे प्रयोगच तेव्हा होऊ शकले नाहीत. १९७२ साली प्रकाशित झालेल्या गोपुंच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या पहिल्याच नाटकाचं दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकानं केलं, तर त्यातील श्रीधर विश्वनाथ ही प्रमुख व्यक्तिरेखा डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. तीही ‘हे आपण केलेच पाहिजे’ उत्कट तीव्रतेतून. या नाटकाने त्यांनी चकित केलं होतं.
थोडक्यात, विचारसरणीशी प्रामाणिक बांधीलकी मानून सातत्याने गंभीर राजकीय नाटक लिहिणारे निदान मराठीमध्ये तरी गोपुंशिवाय दुसरं नाव घेता येत नाही. नंतरच्या काळात दलित लेखकांनी सामाजिक जाणीवेची नाटकं लिहिली. पण त्यात विद्रोह आणि चीड यांचं पारडं जास्त भरतं. गोपुंचा भारतीय विचारांचा चांगला अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या नाटकांमध्ये गांभीर्य आणि मोठा विचारव्यूह पाहायला मिळतो.
‘उद्ध्वस्त धर्मशाळा’चा त्या काळी खूप गाजावाजा झाला असला तरी त्यांच्या इतर नाटकांचं तसं झालं नाही. खरं तर त्यांची नाटकं दिग्दर्शक आणि प्रेक्षक या दोघांनाही सहजासहजी पेलता येतील, अशीच कधीच नव्हती. नाटक हा गंभीर कलाप्रकार आहे, ही डॉ. लागूंची धारणा असली तरी ती बºयाच मराठी दिग्दर्शकांची आणि प्रेक्षकांची नाही. त्यांच्यासाठी तो व्यवसायाचा आणि करमणुकीचाच भाग आहे. अशा परिस्थितीत गोपुंच्या नाटकाचे प्रयोग होणं शक्य नव्हतंच. पण त्यांनी म. फुले यांच्यावर लिहिलेल्या ‘सत्यशोधक’ या चरित्रनाटकाचे मागील दीड-दोन वर्षांत महाराष्ट्रभर १०० प्रयोग झाले. दिग्दर्शक अतुल पेठे यांनी पुणे महानगरपालिकेतील कामगारांना घेऊन हे नाटक केलं. त्याला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळाला. हे नाटकही राजकीय नाटकच मानलं जातं. मानलं जायला हवं. कारण सार्वकालीनत्व आणि समकालीनता असल्याशिवाय असं घडू शकत नाही.
गोपु हे वैचारिक शिस्त मानणारे आणि अ‍ॅकॅडेमिक प्रवृत्तीचे अभ्यासक होते. शिवाय लिहिणार ते गंभीर विषयावर. ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या प्रतिष्ठित साप्ताहिकात त्यांनी वीस-पंचवीस वर्षे सदरलेखन केले. मुंबईतून प्रकाशित होणाºया या साप्ताहिकाचा भारतातील बुद्धिजीवींच्यावर्तुळात चांगलाच दबदबा आहे. याशिवाय त्यांनी ‘निबंध’ हा विस्मृतीत जात असलेला वाङ्मयप्रकार टिकून राहावा म्हणून ‘चर्चक निबंध’ हे दोन खंडी पुस्तकही लिहिले. हा त्यांचा अतिशय आवडता साहित्यप्रकार. निबंधातून वैचारिक मांडणी चांगल्या प्रकारे करता येते. विचारांचा व्यापक पट मांडता येतो. पण तसं लेखन मराठीमध्येच होत नसल्याने ‘निबंधा’च्या वाट्याला फारसं कुणी जाताना दिसत नाही. कारण त्यासाठी वैचारिक शिस्त असावी लागते. आणि चांगल्या प्रकारे विचारही करता यावा लागतो. निबंधाच्या -हासाविषयी त्यांना सतत खंत वाटत असे.
गोपु काही विनाकारण विधानं करून प्रसिद्धी मिळवणारे नव्हते. पण वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीच्या (१९९८) निमित्ताने दिल्लीत झालेल्या परिसंवादात गोपुंनी त्यांच्यावर प्रखर टीका केली होती. त्यावर तेव्हा मोठं वादंग माजलं होतं. गोपुंनी महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा वल्गना खांडेकरप्रेमींनी केल्या होत्या. विचारांच्या लढाया विचारांनीच लढायच्या असतात. त्यात आततायीपणा आणि भाबडेपणा आणायचा नसतो, याचं भान आपल्याला अजूनही फारसं आलेलं नाही. त्यामुळे अशा प्रतिक्रिया दुर्दैवी असल्या तरी अनपेक्षित म्हणता येत नाहीत. पण योग्य वेळी आणि योग्य जागी केलेले औचित्यभंग स्वागतार्हच असतात. मात्र याबाबतीतही आपण निदान साक्षर व्हायलाही तयार नाही. तर ते असो.
गोपुंच्या नाटकांची यथायोग्य समीक्षा गेल्या तीस-चाळीस वर्षांत तरी झाली नाही. कारण त्यांची नाटकं समजण्याएवढं राजकीय आकलन मराठी नाट्यसमीक्षकांकडे नाही. त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणारच आहे. पण खरी भीती आहे, ती ही की, गोपुंनंतर राजकीय नाटक मराठीमध्ये लिहिलं जाणार की नाही? याचं उत्तरही आता देता येण्यासारखं नाही. त्यामुळे त्यांचा राजकीय नाटकांचा वारसा पेलायला कोण पुढे येणार हा प्रश्न आहे.
गोपु हे तसे बुद्धिजीवींच्या वर्तुळातले. त्यामुळे त्यांचा गोतावळाही त्याच वर्गातला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही. पण त्यांचा खराखुरा जिवलग मित्र होते, प्रा. राम बापट. गतवर्षी याच महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बापट यांचं निधन झालं. तर आता गोपुंचं. बापट लोकाभिमुख विचारवंत तर गोपु अ‍ॅकॅडेमिक. ही दोन्ही माणसं महाराष्ट्राचं वैभव होती. आता ती दोन्ही नाहीत. आणि रूढ शब्द वापरायचा तर त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणारी नाही.

शतक एकविसावे, दशक पहिले

एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं जग बदलवलं असं खरोखर म्हणता येईल की नाही, असा प्रशद्ब्रा काहींना नक्की पडू शकतो. पण या दशकात घडलेल्या नानाविध घटना, घडामोडी, तंत्रज्ञानातील बदल आणि जग गमावून बसलेल्या गोष्टी यांची गोळाबेरीज केली तर त्यात तथ्य आहे हे नाकारता येत नाही.
-----------------------------------------------------
कुठलंही शतक संपून नवीन शतक सुरू झालं की, त्याचा आढावा घेण्याची पद्धत असते. मागे वळून त्या शतकाकडे पाहिलं की, त्यात घडून आलेल्या किती तरी उलथापालथींनी आपण स्तिमित होऊन जातो. केवळ भारतापुरता विचार करायचा तर एकोणिसावे शतक हे भारतीय प्रबोधनाचं शतक मानलं जातं. या शतकात केवळ भारतातच नाही तर जगातही उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांत विधायक बदल घडून आले. जगाची एका नव्या संकल्पनेशी ओळख होऊन त्याचा प्रवास अधिकाधिक विधायकतेकडे होईल, असा आशावाद निर्माण झाला. पण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानंतरच त्याला पहिल्या महायुद्धाच्या रूपानं तडे जायला सुरुवात झाली. नंतर दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध यांनी जग ढवळून निघालं. जगातले किती तरी देश स्वतंत्र झाले आणि मग जग पुन्हा नव्या बदलांना सामोरं जाऊ लागलं. साठीच्या दशकानं तर साहित्यापासून समाजापर्यंत मोठं स्थित्यंतर घडवून आणलं. त्याचा प्रभाव ओसरतो न ओसरतो तोच नव्वदचं दशक सुरू झालं. विसाव्या शतकातल्या या शेवटच्या दशकानं एकविसाव्या शतकाची नांदी केली आणि मग एकविसावं शतक पुन्हा नवी आव्हानं घेऊन आलं आणि नव्या संधीही.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकानं आशा, निराशा आणि अनेक धक्कादायक गोष्टी यांचे संमिश्र रूप दाखवलं. म्हणून या दशकाला ब्रिटिश पत्रकार, लेखक आणि संपादक टीम फुटमन ‘द नॉटिज’ असं म्हणतो. २००० ते २००९ या दशकानं जग बदलवलं. दहशतवाद, युद्ध, आर्थिक पेचप्रसंग यांनी सुरुवात केली. यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, आयपॅड, विकिलिक्स, सीसीटीव्ही अशा अनेक तंत्रज्ञानीय चमत्कारांची सुरुवात केली. ग्लोबल वॉर्मिंग, रिअ‍ॅलिटी टीव्ही शोज, उच्चभ्रू संस्कृती-सेलिब्रिटी संस्कृतीचा उदय, ऑनलाइन शॉपिंग, सुपरमार्केट्स, आयट्यून्स, आयपॉड, आयट्युन्स अशा गोष्टींना जन्माला घातलं.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेतील वल्र्ड ट्रेड सेंटर दहशतवाद्याांनी जमीनदोस्त केले आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ‘वॉर ऑन टेरर’ची ललकारी दिली. ही घटना टीव्हीमुळे जगभर पोहोचली, पाहिली गेली. साहित्यापासून चित्रपटापर्यंत या घटनेचे कसकसे पडसाद उमटले याचा आढावा फुटमन यांनी पहिल्या प्रकरणात घेतला आहे.
दुस-या प्रकरणात अमेरिका-युरोपात मुस्लिमांविषयी तयार झालेल्या वातावरणाची आणि बुश यांच्या युद्धखोर कारनाम्यांची जंत्री सादर केली आहे.
तिस-या प्रकरणात ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचं गांभीर्य सांगतानाच अमेरिकेसारख्या भांडवलशाहीचा पुरस्कार करणाºया देशांनी पर्यावरणाच्या तत्त्वांना सोडचिठ्ठी कशी दिली, तर कतार, सौदी अरेबिया, चीन या देशांनी नव्या संधींचा कसा वापर करून घेतला याचा स्थूल आढावा घेतला आहे.
प्रकरण चार ते आठमध्ये रिअ‍ॅलिटी टीव्ही शोजपासून आयपॉडपर्यंतच्या तंत्रज्ञानातील करामतींचे विहंगावलोकन केलं आहे.
नवव्या प्रकरणात जगातील एकमेव महासत्ता म्हणवल्या जाणाºया अमेरिकेचा -हास आणि नवी महासत्ता म्हणून पुढे येत असलेल्या चीनची घोडदौड मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दहाव्या प्रकरणात २००८च्या आर्थिक पेचप्रसंगाची उकल केली आहे.
शेवटच्या निष्कर्षाच्या प्रकरणात पुढच्या दशकात काय काय होऊ शकेल, याचा अदमास वर्तवला आहे. म्हणजे क्लिंटन कन्या चेल्सा ही ब्रिटनची पंतप्रधान होईल आणि तिला कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील युद्ध थांबवल्याबद्दल शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जाईल, पॉप गायिका मॅडोना आणि हॉलीवूड अभिनेत्री अँजेलिना जोली या (चुकून) एकमेकांची मुलं दत्तक घेतील, रिचर्ड ब्रॅनसनसारखा उद्याोगपती पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं विमान तयार करेल इत्यादी इत्यादी. 
तर ते असो. त्यानंतरच्या तीन परिशिष्टांत या दशकात जन्माला आलेले नवे शब्द, काळाच्या पडद्यााआड गेलेल्या व्यक्ती, संकल्पना आणि सांस्कृतिक मानदंड आणि दशकातील महत्त्वाचे वाक्प्रचार दिले आहेत.
९\११, इस्लामोफॅसिझम, इर्नोनॉमिक्स, नूब, ब्लूक (ब्लॉगचं पुस्तकरूप), सेक्सटिंग, डिकॅडिटीज, सेलेब्युटार्ड, बँकस्टर, ट्याइब अशा अनेक शब्द-संकल्पना २०००-२००९ या शतकात जन्माला आल्या, रूढ झाल्या.
जगाला एका विशिष्ट दिशेनं ढकलण्याचं, त्याला वळण लावण्याचं, निदान त्याला विचारप्रवृत्त करण्याचं काम वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान, बुद्धिमान आणि प्रतिभावान मंडळी करत असतात. पण या दशकात त्या आघाडीवरही मोठी हानी झाली आहे. बार्बारा कार्टलंड, डॉन ब्रॅडमन, जॉर्ज हॅरिसन, स्टॅन्ले अनविन, रॉबर्ता बोलॅनो, यासर अराफत, मर्लिन मन्रो, एडवर्ज सैद, जॅक देरिदा, रोनाल्ड रेगन, आर्थर मिलर, बेटी फ्रिडमन, जे. के. गालब्रेथ, सद्दाम हुसेन, इंगमार बर्गमन, बेनझीर भुत्तो, ऑर्थ सी क्लार्क, बॉबी फिशर, एडमंड हिलरी, मरिअम मकेबा, हेरॉल्ड पिंटर, जॉन अपडाईक अशा अनेक मान्यवरांना जग या दशकात गमावून बसलं. हे पुस्तक केवळ घटना-घडामोडींची जंत्री देत नाही तर त्यांचा कार्यकारण संबंध आणि त्यांची इष्टनिष्टताही स्पष्ट करतं. त्यामुळे पुस्तक दशकाचा अदमास देण्यात चांगल्यापैकी यशस्वी झालं आहे. ते केवळ दशकाची दैनंदिनी झालेलं नाही, हे विशेष.
हे पुस्तक वाचणं हा काहीसा रोलरकोस्टरमधून दशकभराचा केलेल्या प्रवासासारखा गमतीशीर अनुभव आहे.

द नॉटिज- अ डिकेड दॅट चेंजन्ड -द वल्र्ड २०००-२००९ : टीम फुटमन, क्रिमसन, लंडन, पाने : २०३ रुपये,  किंमत : ९.९९ पौंड.