Tuesday, June 9, 2015

वाङ्मयाभिरुची कुपोषित होऊ द्यायची नसेल तर...

परवा मुंबईत ‘सत्यकथा’चे संपादक राम पटवर्धन यांचा पहिला स्मृतिदिन साजरा झाला. मराठी साहित्यक्षेत्रातील काही निवडक मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. त्यात ‘सत्यकथा’ आणि ‘राम पटवर्धन’ या ‘अभिन्न समीकरणा’ला पुन्हा उजाळा दिला गेला, त्यांच्या आठवणी जागवल्या गेल्या. पण आज मराठीतल्या सर्वच प्रकारच्या वाङ्मयीन नियतकालिकांना ओहोटी लागलेली दिसते. ही नियतकालिके नित्यनेमाने प्रकाशित होत आहेत; पण त्यांची चर्चा मात्र समाजात होताना दिसत नाही. त्यातील साहित्याची फारशी दखलही घेतली जात नाही आणि त्यांच्या अंकाचीही फारशी कुणी वाट पाहताना दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाङ्मयाभिरुचीविषयी आणि साहित्याभिरुचीविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. त्या कुपोषित होऊ लागल्या आहेत. आजघडीला तरी यावर काही उपाय सुचवला जातो आहे, तसा प्रयत्न कुणाकडून केला जातो आहे, अशी स्थितीही नाही. पण एकेकाळी महाराष्ट्रात वाङ्मयीन नियतकालिकांची अतिशय समृद्ध परंपरा होती. त्या वाङ्मयाभिरुचीचे विहंगावलोकन केले, तरी बरेच काही हाती लागू शकते.
१८४० मध्ये ‘दिग्दर्शन’ हे मराठीतले पहिले मासिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. याच वर्षी ‘ज्ञानचंद्रोदय’ हे दुसरे नियतकालिक सुरू झाले. जुनी मराठी कविता मुद्रित स्वरूपात प्रकाशित करणे, एवढ्याच हेतूने ते पांडुरंग बापू जोशी-पावसकर यांनी सुरू केले होते. जांभेकर यांच्या ‘दिग्दर्शन’चे अनुकरण करणारी बरीचशी मासिके १८४० ते १८६० या काळात निघाली; पण त्यातील बहुतेक अल्पजीवी ठरली. १८४० ते १९०० काळात ११५ नियतकालिके सुरू झालेली दिसतात. त्यातली काही लवकरच बंद पडली. १८६० मध्ये ‘सर्वसंग्रह’, १८६७ मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’ सुरू झाले. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे ‘निबंधमाला’ १८७४ मध्ये सुरू झाले. मराठी साहित्यात ‘निबंधमाला’ने क्रांती केली, असे म्हटले जाते. चिपळूणकरांनी ‘निबंधमाला’च्या माध्यमातून महाराष्ट्राची अभिरुची घडवण्याचे काम काही प्रमाणात केले, असे म्हणायला हरकत नाही. ‘केरळकोकीळ’ हे मासिक १८८६ मध्ये सुरू झाले. ते १९१५ पर्यंत प्रकाशित होत राहिले. हे महाराष्ट्राबाहेर असलेल्या कोचीन येथून प्रकाशित होत होते. का. र. मित्र यांचे ‘मासिक मनोरंजन’ १८९५ मध्ये सुरू झाले. (त्यांनीच १९०९ मध्ये मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित केला.) आधुनिक मराठी वाङ्मयाचे पहिले व्यासपीठ म्हणता येईल, असे त्याचे स्वरूप होते. लघुकथेचा पूर्वज म्हणता येईल, अशा गोष्टींना मित्र यांनी ‘मनोरंजन’मधून सुरुवात केली. त्याला महाराष्ट्रात भरपूर लोकप्रियता मिळाली. मनोरंजनच्या ४० वर्षांत मराठीतील जवळपास सर्व तत्कालीन नामवंत लेखकांनी ‘मासिक मनोरंजन’मधून लिहिले. तत्कालीन महाराष्ट्राच्या विद्वत्तेचा आणि रसिकतेचा संगम या मासिकात पाहायला मिळतो. २० व्या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांतले मराठीतले सर्वश्रेष्ठ मासिक म्हणजे ‘मासिक मनोरंजन’. १९२६ नंतरचा काळ हा वाङ्मयीन नियतकालिकांचा काळ आहे. ‘नवयुग’, ‘रत्नाकर’, ‘यशवंत’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘प्रगति’, ‘ज्योत्स्ना’, ‘विहंगम’, ‘विश्ववाणी’, ‘वागीश्वारी’ या नियतकालिकांनी मराठी लघुकथेच्या विकासाला मदत केली. नंतरच्या काळात ‘अभिरुची’, ‘सत्यकथा’, ‘छंद’, ‘आलोचना’, ‘ललित’, ‘मसाप पत्रिका’, ‘प्रतिष्ठान’, ‘हंस’, ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’ यांसारख्या अनेक नियतकालिकांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.
त्यातील ‘सत्यकथा’ हे १९३३ ते १९८२ या काळात प्रकाशित झालेले मासिक हा मराठी साहित्यातील मानदंड मानला जातो. श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन हे दोन दिग्गज ‘सत्यकथा’चे संपादक. ‘सत्यकथा’ने नवकथा, नवकविता, नवसमीक्षा आणि ललितगद्य यांच्याबाबतीत मराठी साहित्यात भरीव असे काम केले. साठच्या दशकातली मराठीमधली नवकथेची चळवळ ‘सत्यकथा’मधूनच सुरू झाली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर हे नवकथेचे प्रवर्तक. त्यांचे सर्वाधिक लेखन ‘सत्यकथा’मधून प्रकाशित झाले.

‘सत्यकथा’मध्ये फक्त ‘स्टॉलवर्ट’ लेखक लिहीत होते असे नाही. भागवत-पटवर्धन यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या लेखकांचा शोध आपल्यापरीने घेतला. त्यांच्या साहित्याला ‘सत्यकथा’मध्ये जागा दिली. त्यांना प्रोत्साहन दिले. ‘सत्यकथा’ हे केवळ वाङ्मयीन मासिक नव्हते, ती वाङ्मयीन चळवळ होती. साहित्य, चित्रकला, रंगभूमी, चित्रपट, संगीत असा विविध क्षेत्रातील मंडळी ‘सत्यकथा’शी जोडली गेलेली होती. भागवत-पटवर्धन या संपादकद्वयींनी ते जाणीवपूर्वक केले होते. केवळ मजकुराचे संपादन हे संपादकाचे काम नसते तर माणसांचेही संपादन त्याने निगुतीने आणि चाणाक्षपणे करायचे असते. ‘सत्यकथा’च्या भागवत-पटवर्धन या जोडगोळीने तेही मोठ्या प्रमाणावर केले आणि हेच ‘सत्यकथा’चे सर्वात मोठे बलस्थान होते.
‘सत्यकथा’ हा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह होता. त्यात सामील न होता, तिच्या प्रस्थापितपणाला आव्हान देत, ‘सत्यकथा’ला पर्याय म्हणून १९५५ ते १९७५ या काळात लघुनियतकालिकांची चळवळ सुरू झाली. ‘शब्द’, ‘अथर्व’, ‘आत्ता’, ‘भारुड’, ‘फक्त’, ‘येरू’, ‘वाचा’, ‘अबकडई’ अशी विविध लघुनियतकालिके याच चळवळीतली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर व्यवस्थाविरोधाच्या संघर्षातून ज्या विविध चळवळी निर्माण झाल्या, त्यातला महाराष्ट्रातला, मराठी साहित्यातला आविष्कार म्हणजे लघुनियतकालिकांची चळवळ होय. या चळवळीने चाकोरीबाहेरच्या साहित्याला मोठे व्यासपीठ मिळवून दिले. साहित्यातली लेखन-प्रकाशन यांच्या मिरासदारीला आव्हान दिले. त्यांच्या हस्तिदंती मनोऱ्यालाही काही प्रमाणात भगदाडे पाडली. त्यामुळे या लघुनियतकालिकांचे मराठी साहित्यावर काही परिणाम नक्कीच झाले. लघुनियतकालिकांचा प्रयोग तसा अल्पजीवी ठरला, पण त्यातून डॉ. भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, तुळशी परब, वसंत दत्तात्रेय गुर्जर, मनोहर ओक, नामदेव ढसाळ, अरुण खोपकर, चंद्रकांत खोत, चंद्रकांत पाटील, अशोक शहाणे यांसारखे शैलीदार, आशयसंपन्न आणि कसदार लेखन करणारे लेखक पुढे आले.
‘अंतर्नाद’, ‘मसाप पत्रिका’, ‘ललित’, ‘कवितारती’, ‘पंचधारा’, ‘अनुष्टुभ’ ही मराठी नियतकालिके अजूनही प्रकाशित होत आहेत, पण या सर्व नियतकालिकांचे स्वरूप आता मरगळले आहे. सध्या आवर्जून वाचावे, नाव घ्यावे, ज्याचा दबदबा आहे असे म्हणावे असे एकही वाङ्मयीन नियतकालिक मराठीमध्ये नाही. ‘अंतर्नाद’ने सुरुवातीच्या काळात त्यादृष्टीने काहीएक चमक दाखवली होती. ‘प्रतिसत्यकथा’ असेही त्याचे वर्णन केले गेले, पण त्याच्या मर्यादा लवकरच उघड झाल्या. अलिकडच्या काळात ‘अभिधा’, ‘अभिधानंतर’, ‘नवाक्षर दर्शन’, ‘खेळ’, ‘ऐवजी’, ‘शब्दवेध’, ‘मुक्त शब्द’, ‘इत्यादी’, ही नियत-अनियतकालिके सुरू झाली आहेत, पण त्यांच्या वाङ््मयीन योगदानाची दखल घेण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल. त्यामुळे सध्यातरी मराठीमध्ये वार्षिक दिवाळी अंक सोडले तर भरीव आणि ठोस वाङ्मयीन योगदान देणारे दुसरे कुठलेही नियतकालिक नाही आणि ही परिस्थिती फारशी स्पृहणीय नाही.
प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या Patriots and Partisans या पुस्तकात Economic and Political Weeklyवर दीर्घ लेख लिहिला आहे. त्याच्या सुरुवातीला त्यांनी एच. एल. मेंकेन या अमेरिकन पत्रकार-सांस्कृतिक समीक्षकाचे अवतरण दिले आहे. मेंकेन म्हणतो - A magazine is a despotism or it is nothing. One man and one man alone must be responsible for all its essential contents. कुठलंही नियतकालिक हे एका माणसाच्याच खांद्यावर उभे असते आणि त्यामुळेच ते काहीएक भरीव कामगिरी करू शकते. स्वत:च्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून, निरलसपणे आणि असिधाराव्रताने काम केले, तर मराठी वाङ््मयाच्या नव्या पायाची उभारणी करण्यात, त्यासाठीचे नवे लेखक घडवण्यात किती आणि कशा प्रकारची कामगिरी करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ राम पटवर्धन यांनी ‘सत्यकथा’च्या माध्यमातून घालून दिला. त्यामुळेच तर त्यांचे पुन्हा पुन्हा, दरवर्षी स्मरण करणे ही साहित्यप्रेमींची, वाङ्मयीन नियतकालिकांच्या संपादकांची आणि मराठी लेखकांची सांस्कृतिक जबाबदारी आहे. ती त्यांनी निभवायला हवी. महाराष्ट्राची वाङ्मयाभिरूची आणि साहित्याभिरूची कुपोषित होऊ द्यायची नसेल तर राम पटवर्धन यांच्या स्मरणाला, त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याला पर्याय नाही.

Tuesday, June 2, 2015

चहा कपाने प्यावा की, बशीत घ्यावा?

रेखाचित्र - प्रदीप म्हापसेकर
सध्या देशभर नमो नमोचा जप चालू आहे. ‘टाइम्स’सारख्या आपल्या देशातील काही वर्तमानपत्रांनी व इतर प्रसारमाध्यमांनी महाधुरंधर माननीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांना पहिल्या वर्षाच्या परीक्षेत फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण केलं आहे. माध्यमं आणि मोदी यांचा हनिमून अजून संपला नाही, याचंच हे लक्षण आहे. बोलूनचालून हनिमूनच तो. कधीतरी संपणार. पण गमतीचा भाग हा आहे की, या सगळ्या प्रकारात मध्यमवर्ग मात्र आपण काही पाहिलं नाही, आपण काही ऐकलं नाही आणि आपण काही बोलणार नाही, या सुशेगाद वृत्तीने शांत आहे. त्याला कधी जाग येणार हा प्रश्न आहे. उघड आहे की, ती लवकर येणार नाही. कारण अजून मोदींनी त्यांच्या हितावर हातोडा पडेल, अशी साधी आवईही उठवलेली नाही.
‘सबका साथ, सबका विकास’ या मोदींच्या घोषणेत इतर कुणाचा समावेश असो-नसो मध्यमवर्गाचा समावेश मात्र नक्की आहे. आणि या वर्गाला हे पक्कं माहीत आहे की, इतर कुणाचं हित झालं नाही झालं, तरी आपलं मात्र नक्की होणार आहे. आता इतकी शाश्वती ज्यांना वाटते, ते इतरांची काळजी कशाला करतील? भारतीय मध्यमवर्गाचं हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याला ‘मी, माझं, मला’ या पलीकडच्या जगाशी देणं-घेणं नाही. भ्रष्ट व्यवस्थेमुळे भारतीय मध्यमवर्ग प्रचंड संतापतो. सरकारी यंत्रणांमधल्या, खासगी क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची स्वत:ला झळ बसली की, त्याला प्रचंड चीड येते. मग तो ‘गब्बर इज बॅक’मधल्या प्रा. आदित्यसारख्या कुणाला तरी आपला नेता, हिरो करतो. याच कारणांसाठी तो एकेकाळी अण्णा हजारे, गो. रा. खैरनार, अरुण भाटिया यांच्यासारख्यांच्या मागे उभा राहिला. नंतरच्या काळात अरविंद केजरीवाल यांच्यामागे गेला आणि गतवर्षी नरेंद्र मोदी यांच्यामागे. प्रामाणिक, निष्कलंक, सदाचारी आणि तडफदारपणा अंगी असलेल्यांचं एकंदर भारतीय जनमानसाला कमालीचं आकर्षण असतं. मग या लोकांनी निवडलेला मार्ग बरोबर असो नसो, ते त्याच्या मागे जायला तयार असतात.
१ मे रोजी ‘गब्बर इज बॅक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रा. आदित्य आणि दिग्विजय पाटील या दोन प्रवृत्तींमधला संघर्ष यात दाक्षिणात्य सिनेमा स्टाइलने दाखवला आहे. (मूळ तमिळ सिनेमाचा तो रिमेक आहे.) साहजिक आहे, हा सिनेमा हिट झाला. त्यात अक्षयकुमारच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘नाम व्हिलन का…, काम हिरो का!’ मोदी यांचीही काहीशी अशीच स्थिती आहे. गुजरात दंगलीच्या हत्याकांडातून न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलेलं नाही, पण भारतीय जनतेने मात्र त्याकडे कानाडोळा करत त्यांना पंतप्रधानपदी विराजमान केलं. या चित्रपटातल्या प्रा. आदित्यसारखाच मोदी यांचा कारभार आहे. टाळ्याखाऊ वक्तव्य, सततची सनसनाटी, बेमालूम रंगसफेदी आणि अर्धसत्य हेच सत्य म्हणून पुढे करत राहणं यात मोदी आणि कंपनी प्रवीण आहे. काम कमी, शिवाय ते करायची पद्धतही प्रा. आदित्यसारखीच अनैतिक, असंवैधानिक आणि अन्याय्य, पण त्याला अशा पद्धतीने ग्लोरीफाय करायचं की, लोकांना वाटावं, हीच पद्धत योग्य आहे. करायचं थोडं पण त्याचा वारेमाप डंका वाजवायचा, असा सगळा प्रकार आहे. त्यामुळे भारतीय मध्यमवर्गाच्या वाट्याला मोदी यांच्या राज्यात ‘गब्बर इज बॅक’च्या प्रेक्षकांसारखी बसल्याजागी टाळ्या वाजवणं आणि मोदींच्या ‘मन की बात’ला माना डोलावणं अशीच भूमिका येणार असं दिसू लागलं आहे. फेसबुक, वॉट्सअॅपवर त्यांच्या परदेश दौऱ्यांची टिंगलटवाळी होते खरी, पण जे प्रसारमाध्यमांत येतं, त्यावरच्याच त्या प्रतिक्रिया असतात आणि भारतीय प्रसारमाध्यमं सध्या मोदींच्या प्रेमात आहेत. शिवाय केंद्र सरकारच्या कुठल्या बातम्या प्रसारमाध्यमांपर्यंत जाऊ द्यायच्या याचा कडेकोट बंदोबस्त असल्याने ‘देखल्या देवा दंडवत’ अशी सर्वांची स्थिती आहे.
राजीव गांधी हे भारतीय मध्यमवर्गाचे पहिले हिरो होते. त्यानंतर मात्र देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाला मध्यमवर्गाचं हिरोपण मिळालं नाही. ते थेट नरेंद्र मोदी यांना मिळालं. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात हा मध्यमवर्ग विस्तारत होता. सरकारी सोयी-सुविधांचा लाभ घेत होता. तेव्हाच भाजपने या वर्गाला आपली भविष्यातली व्होटबँक करण्याचे मनसुबे रचले. त्याची शिस्तशीर आखणी केली. मोदी यांना त्याचाही फायदा झाला. त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतलं एक वर्ष संपलं असलं तरी त्यांच्या या मध्यमवर्गीय हिरोवर्शिपिंगला फारसा काही धोका निर्माण झालेला नाही. कारण ‘स्वच्छता अभियान’, ‘मेक इन इंडिया’, ‘मन की बात’ अशा मध्यमवर्गीयांना भुरळ पाडणाऱ्या अनेक योजना मोदी यांनी सुरू केल्या आहेत. याउलट तळागाळातला समाज, त्याच्या परिस्थितीत गेल्या वर्षभरात फारसा काही फरक पडलेला नाही. जमीन संपादनाबाबतचं विधेयक मोदींना राज्यसभेत मंजूर करून घेता आलं नाही, तेव्हा त्यांच्या सरकारला साक्षात्कार होऊन असा खुलासा करावा लागला की, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. प्रसारमाध्यमांनी हे बिल नेमकं काय आहे, त्याचा शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना किती नफा आहे याविषयी काहीही विचारमंथन केलं नाही. फेसबुक, वॉट्सअॅपवरही या विधेयकाबाबत फारशी चर्चा झाली नाही. त्याचं कारण उघड आहे, हा काही मध्यमवर्गाच्या आस्थेचा विषय नाही.
मग त्याची चर्चा तरी कशाला करायची?
जे आपल्या फायद्याचं नाही, त्याची फारशी वाच्यता होणार नाही, हा मोदी आणि मध्यमवर्ग अशा दोघांचाही अजेंडा आहे. १९९१मध्ये आलेल्या उदारीकरणाच्या धोरणातून भारतीय मध्यमवर्गाचा विस्तार व्हायला सुरुवात झाली. परिणामी, तोवर भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या जात आणि धर्म या गोष्टींच्या जागी २०११मध्ये विकास आणि प्रशासन या गोष्टी आल्या. त्याला प्राधान्य देणारा भारतीय मध्यमवर्ग हा महत्त्वाकांक्षी आणि सुखसमृद्धीला महत्त्व देणारा आहे. सुशिक्षित, करियरिस्टिक असलेल्या या वर्गाला देशाचं राजकारण स्वच्छ, कार्यक्षम आणि विकासाभिमुख हवं आहे. साहजिकच या वर्गाच्या इच्छा-आकांक्षांचा प्रतिध्वनी सर्वत्र उमटायला सुरुवात झाली. दुसरीकडे जागतिकीकरणामुळे शिक्षण, आरोग्य, राहणीमान, संधी यांचा लाभ मिळवून या वर्गाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे भारतीय राजकारणाचं कर्तेपणही याच वर्गाकडे आलं. त्याचं ठसठशीत प्रतिबिंब २०१४च्या निवडणुकांत उमटलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे ‘भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलणारी निवडणूक’ असं या निवडणुकीचं नंतर वर्णन केलं गेलं.
‘मध्यमवर्गाचे भाष्यकार’ पवन वर्मा या वर्गाची वाढती आणि मतपेटीवर परिणाम करू शकणारी संख्या, अनिवासी भारतीयांचं वाढतं स्वदेश-प्रेम, आपल्या वर्गाबाबतची सजगता, हा वर्ग वयाने पंचविशीच्या आतबाहेर असणं, या वर्गाचं सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मोबाइल या साधनांवरील आधिपत्य, सामाजिक प्रश्नांविषयीचं भान आणि सरकार-प्रशासन यांच्या अकार्यक्षमतेविषयीची चीड अशी या वर्गाची भूमिका बदलण्याची सात कारणं सांगतात. या कारणांमुळे या वर्गाच्या व्यक्तिमत्त्वात, भूमिकेत, प्रभावात आणि गुणवत्तेत बदल झाला आहे. त्यातून कल्याणकारी समाजरचना विरुद्ध अनिर्बंध समाजरचना (आणि शासनरचनाही) असं द्वंद्व उभं राहू लागलं आहे. नेहमीच्या शब्दांत सांगायचं तर, हा ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा संघर्ष आहे. त्यात भाजपच्या कृपेने धर्मांधता, असहिष्णूता, अलिप्तता आणि जुनाट द्वेषपूर्ण मानसिकता यांची भर पडली. पण भारतीय मध्यमवर्गाला या कशाशीच देणं-घेणं नाही. ‘लॉ विदाऊट स्टेट’ अशी भारताची अवस्था होत चालली आहे. पण आपल्या हिताला बाधा पोहोचत नाही ना, मग हरकत नाही अशा पद्धतीने मध्यमवर्ग त्याकडे पाहतो आहे. केंद्र सरकार भ्रष्टाचार करत नाही ना, मग त्याने कसाही कारभार केला तरी चालेल, असा या वर्गाचा दृष्टिकोन तयार होऊ लागला आहे. थोडक्यात, गेल्या दोन दशकांमध्ये मोठ्या शहरांमधला भारतीय मध्यमवर्ग अधिकाधिक स्वार्थी, आत्मकेंद्री, समाजाविषयी असंवेदनशील आणि स्वत:च्याच खुज्या भावभावनांचं स्तोम माजवू लागला आहे. मोदी आणि भाजप यांनी याच मध्यमवर्गाला आपली व्होटबँक बनवून सत्ता काबीज केली आहे. तिला एक वर्षही झालं आहे. या वर्षाची गोळाबेरीज फारशी स्पृहणीय नाही,
पण मध्यमवर्गाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. त्याला एकाच गोष्टीची चिंता आहे.
मध्यमवर्गापुढे समस्या
हजार असती,
परंतु त्यातील एक
भयानक,
फार उग्र ती;
पीडित सारे या प्रश्नाने-
धसका जिवा
चहा-कपाने प्यावा
की, बशीत घ्यावा!
कुसुमाग्रजांनी या कवितेतून मध्यमवर्गीयांच्या चिंतेचा परीघ अतिशय नेमक्या शब्दांत आखला आहे. या अशा प्रश्नांनी भारतीय मध्यमवर्ग त्रस्त असताना या वर्गाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ करत तोही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते मध्यमवर्गाचे ‘डार्लिंग’ होण्यात आणखी एका गोष्टीची भर पडली. आपल्या ‘डार्लिंग’बद्दल वावगा शब्द उच्चारून भविष्यातील कामगिरीबद्दल उगाच का शंका व्यक्त करा, म्हणून हा वर्ग शांत, स्वस्थचित्त असावा.                                                                                    

संपलेल्या गोष्टीचे उरलेले प्रश्न

प्रिय अरुणा,
हे पत्र तुला लिहायला अंमळ उशीरच झाला आहे. तशीही तू गेली ४२ वर्षं कोमात होतीस. त्यामुळे या काळातही तुला पत्र लिहिलं असतं तर त्याचा मायना वेगळा असता, त्याचा उद्देशही वेगळा असता; पण तेही तुला वाचता- ऐकताही आलं नसतं. या पत्राचंही तसंच होणार आहे; पण तरीही तुला हे पत्र लिहावंसं वाटलं. वर्तमानपत्रातल्या अशा पत्राला ‘अनावृत पत्र’ म्हणतात,
हे तुला कदाचित माहीत असेल-नसेल; पण गेली ४२ वर्षं तू ज्या केईएम हॉस्पिटलमध्ये होतीस, तेथील तुझी देखभाल करणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि तुझ्याविषयी सहानुभूती, हळहळ वाटणाऱ्या आणि तुझ्यावर ज्या वासनांध पुरुषी प्रवृत्तीने बलात्कार करून तुझी दशा केली, त्या पुरुषी प्रवृत्तीबद्दल किमान ते कमाल संताप व्यक्त करणाऱ्या काहींपर्यंत हे पत्र पोहोचेल. २७ नोव्हेंबर, १९७३ रोजी केईएममधल्याच सोहनलाल या वॉर्डबॉयने साखळीने तुझा गळा आवळून तुझ्यावर बलात्कार केला आणि तेव्हापासून तुझं आयुष्य ना धड जीवन ना धड मरण, असं विचित्र होऊन बसलं. त्याची अखेर १८ मेला तुझ्या मृत्यूने झाली.
माणूस मेल्यावर त्याच्याविषयी वाईट बोलू नये, असा भारतीय संस्कृतीचा सर्वसाधारण संकेत आहे. खरं म्हणजे तो होता. आजकाल कुणी अशा सर्वसाधारण संकेताच्या गोष्टी पाळत बसत नाही. तुम्ही जिवंत असताना जे काही वागाल-बोलाल त्याचा जाहीर पंचनामा फेसबुकवर होतो. धोबीघाटावर जसं एकाच कपड्याला निवडून-निवडून यथेच्छ बडवलं जातं, तसं फेसबुकवरही केलं जातं; पण हेही तितकंच खरं की, तेथील माणसं तितकीच माणुसकी असणारी, संवेदनशीलही असतात. बघ ना, तुझी प्रकृती खालावत चालली आहे, याच्या बातम्या जाहीर झाल्या-झाल्या तुझ्याबद्दल फेसबुकवर चर्चा सुरू झाली. काहींनी तर तू गेलीस, असं गृहीत धरून तुला श्रद्धांजलीही वाहून टाकली. ‘RIP...…RIP’चा रिप्ले करायला फारसे श्रम पडत नाहीत; पण तूही फार ताणलं नाहीस. या आगाऊ ‘रेस्ट इन सायलेन्स’चा यथोचित आदर करत त्यांना आश्वस्त केलंस. तुझं अंतर्मन जागृत असलं पाहिजे,
याची त्यावरून खात्री पटली.
बातम्यांबरोबरच तू कथा-कादंबरी-नाटक यांचाही विषय झालीस. १९८५मध्ये हरकिसन मेहता यांनी ‘जड चेतन’ ही गुजराती कादंबरी तुझ्या आयुष्यावर लिहिली. १९९४मध्ये तुझ्यावर दत्तकुमार देसाई यांनी ‘कथा अरुणाची’ हे मराठी नाटक लिहिलं. १९९८मध्ये तुझ्या ५०व्या वाढदिवसाचं निमित्त साधून पूर्वाश्रमीच्या केईएममधील नर्स आणि नंतर पत्रकार झालेल्या पिंकी विराणी यांनी ‘अरुणाज स्टोरी’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलं. पुढे त्याचा मराठी अनुवादही झाला. लवकरच तुझ्या कथेवर आधारित चित्रपट येऊ घातलाय.
तुझी देखभाल करणाऱ्या नर्सेसनी तुझी वॉर्ड क्रमांक चारमधली खोली तुझं स्मृतिस्थळ म्हणून जाहीर करावं, अशी विनंती रुग्णालयाकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या नर्सिंग ट्रेनिंग स्कूलला तुझं नाव देण्याची घोषणा केलीय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तुझ्या नावानं एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला.
तो महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात समाजात आवाज उठवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जाणार आहे. तुझ्या नावे राज्यशासनानं स्मारक उभारावं, अशी मागणी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. लवकरच तुझ्या नावाने केईएम हॉस्पिटलच्या आवारात पुतळा उभारण्याची, तुझं नावच केईएम हॉस्पिटलला देण्याची मागणी होईल. तुझ्या नावानं एखादं उद्यान सुरू होईल. एखादा रस्ताही तुझ्या मालकीचा केला जाईल. या साऱ्या गोष्टी त्यांच्याबाबतच होतात, जे लोक आपल्या निधनानंतरही ‘जिवंत’ राहतात. याच कारणामुळे तू आधी होतीस, त्यापेक्षा आता अधिक मोठी झालीस.
तू जे भोगलंस, सोसलंस ते इतर कुणाच्याही वाट्याला कधीच येऊ नये, इतकं भयानक होतं. नर्स म्हणून केईएममध्ये तुला फार वर्षं झाली नव्हती... आणि तिथल्याच एका नराधमाने तुझं आयुष्य बरबाद केलं.
(हे आपल्याच माणसाने केलेल्या त्या अत्यंत निष्ठूर गुन्ह्याचं प्रायश्चित्त आहे, असं केईएममधील कुणी म्हटलेलं नाही, हेही नोंदवण्यासारखं आहे.) हे म्हणजे एकेकाळच्या सतीप्रथेसारखंच झालं. त्या काळी नाही का, नवऱ्याच्या धडधडत्या चितेत त्याच्या जित्याजागत्या बायकोला फेकलं जायचं आणि मग ‘सती गेली’ म्हणत नंतर तिचे देव्हारे माजवायचे, असा प्रकार होता. वर ‘बुद्ध्याच वाण धरिले करि हे सतीचे’, ‘मावळातल्या मर्द मराठ्या घेई सतीचे वाण’, ‘आता तर आहे पुण्य सतीचेच उणे’ असा या ‘सती’चा गुणगौरवही मराठी काव्यांतून अनेकांनी केला आहे. ‘सतीचं वाण’ हा वाक्प्रचारही याच प्रथेची देन आहे. १८२९पर्यंत लॉर्ड बेंटिंकने सतीप्रथा बंद करेपर्यंत भारतात जिवंत स्त्रियांना सर्रास नवऱ्याच्या चितेत ढकललं जात होतं. ज्या स्वखुशीने जात होत्या, त्यांना नवऱ्यानंतर मागे राहिलेल्या बाईचं काय होतं, याची जाणीव होती, म्हणून त्या नवऱ्याच्या चितेला जवळ करत. जिवंत बाईला जाळायचं आणि नंतर तिच्या व्रताची सतीचं वाण म्हणून तारीफ करायची, ही दांभिकता खास भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे, हे तुला माहीत होतं की नाही? 
तुही त्या अर्थानं सतीच. फार तर ‘आधुनिक सती’ म्हणू या; पण आपण मेल्यावर पुढे आपलं काय होईल, याची कल्पना तू केली होतीस की, नाही माहीत नाही. कुठलाही माणूस मेल्यावर त्याच्याविषयीची स्वाभाविक प्रतिक्रिया ही ‘चांगला माणूस होता’ अशीच (मोघम) असते! पण तू सर्वसामान्य नव्हतीस. या घटनेनंतर तुझ्या वाट्याला ‘नको असलेलं सेलिब्रिटीपण’ आलं होतं. तुझ्याकडे देश-विदेशातील प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलेलं. जरा काही खुट्ट झालं की, सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर खिळायच्या. तुझ्या मरणानं त्यात आता भरच पडली आहे. आता तुला ‘लिजंड’ (दंतकथा) म्हणून जिवंत ठेवलं जाईल. तुझ्याबद्दल वाटणारी हळहळ, सहानुभूती यांचा टक्का अजून वाढला आहे. काहींचा संतापही अनावर होत राहील; पण असे आवाज नेहमीच छोटे असतात. आता हेच पाहा ना, तू म्हणे कुठल्याही पुरुषाचा आवाज ऐकला, तरी घाबरून ओरडायचीस; पण आता तुझ्या नावानं विविध मागण्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचीच संख्या अधिक आहे. याला काव्यगत न्यायच म्हणावं लागेल.
तुझं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं, त्या डॉक्टरचं पुढे काय झालं, याबाबत कुणीच फारसं जाणून घेतलं नाही. त्यानं लग्न केलं का? तो नंतरही केईएममध्येच होता? तिथूनच निवृत्त झाला? तो या सगळ्या प्रकाराकडे कसं पाहतो? हे कुणालाच जाणून घ्यावंसं वाटलं नाही. तुझ्या घरच्यांनी तुझ्याकडे इतकी वर्षं पाठ फिरवली; पण परवा “आम्हाला अरुणाला हॉस्पिटलनं भेटू दिलं नाही,” असा आरोप मात्र जरूर केला. गेली ४२ वर्षं तुझी देखभाल केईएममधील ज्या डॉक्टरांनी-नर्सेसनी केली, त्यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये थोडंफार छापून आलं. त्यांचा त्याग वाखाणण्यासारखाच आहे. इतक्या निरलस वृत्तीने त्यांनी तुझी सेवा केली, याबद्दल त्यांचं जरूर कौतुक केलं पाहिजे; पण ही निरलस वृत्ती उद्या इतर कुणा दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या सामान्य स्त्रीच्याबाबतीत दाखवली जाईल? जिला नातेवाईकांनी वाऱ्यावर सोडून दिलं आणि जिच्याकडे आपल्या आजारावर उपचारांसाठी पैसे नसतील अशी एखादी वृद्ध वा आजारी व्यक्ती केईएममध्ये आली, तर तिच्यावर तुझ्यासारखेच उपचार केले जातील? तिचीही तुझ्यासारखीच देखभाल केली जाईल? ती व्यक्ती केईएमची कर्मचारी नसेल, तिचं नावही अरुणा शानबाग नसेल; पण तिला मिळणाऱ्या सेवासुविधा तुझ्यासारख्याच
असतील? असं घडू शकेल? राज्य सरकारने तुला या हॉस्पिटलमधून हलवण्याचे एक-दोन वेळा प्रयत्न केले; पण ते तुझी देखभाल करणाऱ्या नर्सेसनी हाणून पाडले. तसाच प्रकार इतर एखाद्या जराजर्जर रुग्णाबाबत घडेल? केईएममधील कर्मचारी व व्यवस्थापन तिच्या पाठीशी इतक्याच ठामपणे उभं राहील? तुझ्या बलिदानातून केईएम नावाचं हे सरकारी हॉस्पिटल व तेथील डॉक्टर-नर्सेस या पुढच्या काळात समाजासमोर कोणता आदर्श उभा करतील? त्यांच्या त्यागाची, निरलस सेवेची परंपरा तुझ्यानंतरही चालूच राहील? ‘रुग्णसेवा हीच समाजसेवा’ असंच त्यांचं ब्रीद असेल? होईल? की तुला विशेष अपवाद ठरवून इतर गोरगरीब रुग्णांना उपचारांअभावी, देखभालाअभावी या हॉस्पिटलच्या दारात, नाहीतर खाटांवर तडफडावं लागेल? नर्सची वाट पाहत तासनतास वेदनांनी तळमळत राहावं लागेल? तुझ्या देखभालीबाबतीत जे केईएममध्ये घडलं, त्याची सातत्यानं पुनरावृत्ती घडत राहिली, तर तेच तुझं खरं स्मारक असेल, नाही का?
राहता राहिला समाजाचा मुद्दा. त्यातल्या अनेकांनी तुझ्याप्रती सोशल मीडियावर सद्भावना व्यक्त केल्याच आहेत. उरलेल्या अनेकांनी असं जाहीरपणे व्यक्त न होताही तुझ्या मृताम्यास शांती लाभो, असं मनोमन नक्कीच म्हटलं असेल. काहींच्या भावनांचा मात्र तुझ्या मृत्यूनं स्फोट झाला असेल. ते ‘आणखी अशा किती
अरुणा घडणार?’ असे संतप्त सवाल उपस्थित करतील. काहींना खजीलही वाटेल. हे सारे आपापल्या जागी बरोबरच आहेत. प्रश्न आहे तो, यापलीकडे जाण्याचा. मानसिकता बदलण्याचा. आपल्यामध्ये दडलेले सोहनलालचे
छोटे-मोठे अंश खुडून टाकण्यासाठी यांपैकी किती लोक पुढाकार घेतील? तसं घडणं हीच तुला खरी श्रद्धांजली ठरेल, नाही का?